दसर्याच्या दिवशीच ठरवलं होतं आपण मैत्रिणी एकमेकींना भेटू सोन वाटायच्या वेळेस तेव्हाच ठरवू की उद्या पहिल घर कुणाच घ्यायचं? ....ठरलं तर उद्या माझं घराला सर्वानुमते पहिला नंबर मिळाला होता. ......आम्ही आमच्या वेटाळात दहाबारा मैत्रिणी त्यात भरणा चिल्यापिल्ल्या बहीण भावांचा असे करत जवळपास पंधरा सोळा तरी असणारच होतो. पण दरवर्षी होणारा गोंधळ यावेळेस टाळायचा असं मनापासुन ठरवलेलं होतं.........तर सांगायचा मुद्दा हा की, ज्याच घर आदल्या वर्षी शेवटी घेणार त्याला समोरच्या वर्षी पहिल्या नंबरचा मान मिळणार असं ठरल्याने माझा यावेळेस पहिला नंबर लागला .कशात म्हणताय?......अहो भुलाबाईचे गाणी म्हणण्यासाठी .........जवळजवळ सात आठ जणांकडे भुलाबाई बसतात तेव्हा प्रत्येकाकडेच सगळी गाणी म्हणण जमत नाही म्हणून तेपण ठरवल की कधी कोणत गाण कुठे गाळायच .कधी कोणाकडे कोणतं म्हणायचं. कमीत कमी पाचा गाणी कम्पलसरी म्हणायचीच मग ते ओळखीच घर असो वा अनोळखी. ........ठरलं तर मग ..........चला उद्यापासुन भुलाबाई बसणार म्हणून खूष!......प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा खाऊ मिळेल म्हणून स्वप्नरंजन चाललेलं. .आईला तर बजावुनच ठेवलं होतं की आई ,आपल्या घरचा खाऊ लवकर ओळखू येऊच नये म्हणून मस्त युक्त्या शोध. .........!
रेशमी रुमाल टाकलेला सुंदरसा चौरंग .त्याच्याभोवती ज्वारीची किंवा ऊसाची धांड आणि शंकर- पार्वती आणि तिच्या मांडीवर बसलेला पिटुकल्या गणेशची मुर्ती मांडायची ती लोभस मुर्ती बघून आपणही घरात इतकच लाडक असाव असं मनात येत असायचं.मुर्तीला दाराच्याच कडेला वाढलेल्या गुलबाक्षिच्या पिवळ्या गुलबाक्षीरंगाची मिक्स वेणी तिही हाताने गुंफलेली भुलाबाईला वाहायची आणि दोन छोट्या छोट्या समया समोर लावायच्या संध्याकाळच्या त्या रम्य प्रकाशमय वातावरणात अंगणातल्या चमेली ,जाई जुईच्या सुगंधात गाणी म्हणण्याचा उत्साह आणखीणच वाढायचा त्या निरभ्र आकाशातील अंगणात चांदण, जणू अंगणातल्या जाई-जुईचा सडाच शिंपडल्याचा भास व्हायचा.........!
पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे ला खड्या जोषात झालेली सुरुवात मध्येच आवाज खोलात गेलेला बघून घरातली मोठी ताई एखाद नवीनच गाणं सुरु करुन जोष वाढवायला मदत करायची .त्यातच आतुन कसले कसले खमंग वास आले की लक्षपरत विचलीत व्हायचं.....अशा वेळेस अडखित जाऊ खिडकीत जाऊने परत जोष यायचा . आपल्याच बहिण भावांची,मित्र मैत्रिणींची नांव गुंफतांना असली धमाल यायची की त्याला काही तोडच नाही. एखाद नां मध्येच यमक न जुळणारही असायचा पण मैत्रिणीला तेवढच छान वाटेल म्हणून तेही चालून जायचं .
....एक लिंबू झेलूबाई दोन लिंबू झेलूला छोट्या छोट्या.परकरी मुलींना घेऊन दोघिंनी मिळून हाताचा पाळणा करुन त्यात सुपारी किंवा लिंबू ठेवून रितसर हळदीकूंकू फुल वाहून सगळ्या सख्यांनापण कुंकू लावल्या जायचं. लहान वयातच आपसुकच किती छान शिकवण मिळत होती. रुसवा फुगवा हेवेदावे होतच आसतात पण ते न दुखवता सोडवायचे कसे हे शिकलो. खेळतांना मोठ्यांना मान तार मिळतोच पण आपल्या छोट्या छोट्या मैत्रिणींनाही पुढे करुन त्यांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे याची जाणीव त्यांना करुन द्यायची .या आणि अशा कितीतरी गोष्टी सहजपणाने शिकल्या जातात अशा उत्सव -सणांमधून !......खिरापतीचा खाऊ बंद डब्यातला ओळखणे हे आणखी एक कसब .डबा हालवला की त्याचा नाद खणखणता येतो कां बसका येतो कां येतच नाही.की,सुगंध येतो त्यावरुन तो पदार्था ओळखणे म्हणजे पेपरमधल जणू अवघड गणितच सोडवणे. ओळखल्यावर मात्र हास्याचे फवारे आणि नुसती धमाल ......
असे हे कोजागिरीपर्यंत पाच दिवस चालणार आणि कोजागिरीला प्रत्येक घरी किमान पदार्थांचा नैवेद्य असणार म्हणजे नुसती चंगळ !पण शेवटाला मात्र खाऊन खाऊन थकलेला जीव आणि गाणी म्हणून म्हणून दमलेला आवाज शेवटी मिळालेल्या पदार्थांना जवळच्या डब्यात बंद करायची वेळ यायची .आणि शेवट वेटाळातल्या सामुहीक कोजागिरीच्या दुधाने रात्री बारा वाजता मसाला दूध घेऊन गोड आणि सुफळसंपूर्ण व्हायचा. लक्ष्मी आणी कुबेर प्रसन्न होऊन शुभ्र चांदण्यांची बरसात करायचे!....
शरदाच्या चंद्राची शितल किरणे
खेळत आली जल- भूमीवरी
स्वच्छ चांदणे अंथरले हे
धरणी आणि आकाशामध्ये
रोमांचित झाली ती अगदी
हरिततृणांच्या पात्यांनी
वाटे डोलतात हे वृक्षही
मन्द शितल वार्याने !!!
@अर्चना मुळ्ये.
No comments:
Post a Comment