Monday, October 14, 2019

(झ)कास पठार

बऱ्याच वर्षांपूर्वी हिमालयातील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'बद्दल ऐकल,फोटो बघितले तेंव्हाच तिथे कधी तरी जायचं  ठरवलं होतं. काळाच्या ओघात याचा विसर पडला.
गेल्या 4,5 वर्षापूर्वी,साताऱ्याजवळ एका पठारावर , सप्टेंबर-ऑक्टोबर मधे' व्हॅली ऑफ फ्लोवेर्स' सारखाच रानफुलांचा गालिचा फुलतो अस ऐकलं.युनेस्को नी 2012 मध्ये याला'वर्ल्ड हेरिटेज साईट' घोषित केल्यानंतर कास पठार जास्त प्रसिद्ध झाल, लोकांचा ओघ वाढला.ओळखीचे बरेच जण तिथे जाऊन आले ,त्यांनी टाकलेले फोटो बघून,हिमालयात तर नाही पण इतक्या जवळ असलेल्या कास पठाराला तरी नक्की भेट द्यायचं ठरवलं.साधारण 1सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर हा तिथला सिझन!पण ते बरचस हवामानावर अवलंबून असत.मुख्यतः पाऊस थांबल्यावर थोडं ऊन पडायला लागल की फुल फुलतात.कधी कमी पावसामुळे तर कधी अति पावसामुळे सिझन मागे पुढे होऊ शकतो ! तो विशिष्ट सिझन गाठायचा असल्याने काही न काही कारणांनी जाण लांबत गेलं. यावर्षी मात्र कोणत्याही हालतीत तिथे जायचंच असा मनाशी ठरवलं.
साताऱ्याहून सांगली जवळ असल्याने शनिवारी सकाळी कास अन पुढे सांगलीचा प्लॅन आखला. वीकएंड ला तिथे ऑनलाइन बुकिंग करून जावं लागतं.बुकिंग त्यांच्या वेब साईट वरून होत.विकेंड ला एन्ट्री फी 100 ₹ ,इतर दिवशी 50 ₹( 12 वर्षाखालील मुलाना व जेष्ठ नागरिकांना तिकीट नाही). 7-11,11-3 अन 3-6 असे बुकिंग स्लॉट आहेत.एका दिवशी फक्त 3000 लोकांना प्रवेश मिळतो.
आम्ही 21 सप्टें., 11-3 स्लॉट च बुकिंगऑगस्ट मधेच केल.
ट्रेन रिसर्व्हेशन करायच्या वेळेस मात्र सुभाष नि बॅक मारला ,'मी  डायरेक्ट सांगली ला पोचेन,कास पठार बघण्यात मला इंटरेस्ट नाही'.तो नाही म्हणल्यावर विनय दादा पण नाही म्हणाला. मग ताई आणि मी ,पुण्याहून त्यांच्या गाडीने  जायचं ठरवल. मी पुढे सांगलीला जाणार ,येताना ताई एकटी राहील म्हणून तिनी तिच्या मैत्रिणी ला(अश्विनी) विचारलं ,ती पण तयार झाली.
सप्टें.मधे पुणे ,सातारा भागात झालेल्या  मुसळधार पावसाने मात्र आमच्या मनसुब्यावर पाणी फिरवलं. तिथे खूप चिखल झालाय ,फुलांच्या पाकळ्या गळून गेल्या,काहीही बघायला मिळणार नाही अस कळलं. रीझर्व्हेशन झाले होते,सांगलीला मुलांना भेटायला  जायचंच होत,त्यामुळे पुण्याला तर जाऊ मग बघू पुढे काय ते,असा विचार करून 20 ला पुण्याला पोचले.
दुपारी 4 वाजता एकदा बुकिंग ऑफिस ला फोन करून विचारायच,जर काहीच फुल नसतील तर कास पठार न जाता अजून एक दिवस पुण्यातच थांबून सांगलीला निघायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे तिथे फोन केला ,तर सकाळी थोडा पाऊस झाला पण आता पाऊस नाहीये ,रात्रभरात पडला तर काही सांगता येत नाही ,अस ते म्हणाले.
पाऊस नाही म्हंटल्यावर आमच्या आशा पल्लवीत झाल्या.
मग ड्रायव्हर ची शोधाशोध सुरू झाली. एक ओळखीचा ड्रायव्हर होता त्याच जमणार नव्हत.ताई कडला ड्राइवर (संदीप भाऊ) जो नुकताच लागला होता,तो पुरेसा स्मार्ट नाही ,त्याला रस्ते वगैरे पटकन कळत नाहीत,अस विनय दादांनी सांगितल्यामुळे तो पण बाद झाला. इतक्या वेळेवर ड्राइवर मिळण कठीणच होत. हे सुभाष ला कळल्यावर ,तो म्हणाला असा प्रॉब्लेम असेल तर मी येतो कास ला ( तो कार नी  रात्री 9 पर्यंत पुण्याला पोचणार होता).तिथुन आपण सांगलीला जाऊ.फक्त ताई अन तिच्या मैत्रिणीला परत येताना बस नि यावं लागेल.तस अश्विनीला विचारलं.सासर माहेर पुण्यात,अन नातेवाईक मुंबई किंवा अमेरिकेला!त्यामुळे कायम कार ,विमान फार फार तर ट्रेन च्या प्रवासाची सवय असल्यामुळे तिनी बस नि यायला सपशेल नकार दिला.
आता काय करायचं मोठा प्रश्न पडला!
शेवटी ताई म्हणाली,आम्ही तर पुण्याहून कधी पण जाऊ शकतो,तुझी खूप ईच्छा होती,तर उद्या तू अन सुभाष कास ला जा ,तिथून पुढे सांगली ला!
सुभाष बरोबर गेली तर 10 मीं. तो भरभर चक्कर मारेल आणि म्हणेल,'तेरड्याची फुल काय बघायची,सगळीकडे अशीच फुल आहेत, इथूनच दिसतंय सगळं ,कशाला वेळ घालवायचा,त्यापेक्षा सांगलीला लवकर जाऊन मुलांबरोबर जास्त वेळ घालवू!' अशी मी त्याची नक्कल करू दाखवली. मग लगेच सुभाष नि पण 'तुम्ही बायका एकेका फुलाजवळ जाऊन ,अय्या किती सुंदर न! काय गोड रंग आहे ग! माझ्या मैत्रिणीच्या नणंदेकडे न अश्याच रंगाची साडी आहे,अस म्हणत म्हणत 3 तास लावालं'अस म्हणून माझा टोला परतवला!
मग मार्स अन ज्युपिटर वासींचा सामना असा काही रंगला की हसून हसून पोट दुखायला लागलं.
शेवटी पुरेश्या स्मार्ट नसलेल्या संदीप भाऊंना स्मार्ट फोन च्या मदतीने स्मार्ट बनऊन न्यायचं ठरवलं.अन रात्री 10 वाजता एकदाची कास ट्रिप ठरली. अश्विनी ला तसा फोन केला. तो ड्रायव्हर घाटात गाडी चालवू शकेल का ? हाय वे वर चालवायची त्याला सवय आहे का ? अश्या त्या चिंतातुर जंतू च्या किंतु परंतु च निरसन करून शेवटी संदीप भाऊंना फोन केला.नशीब इतक्या वेळेवर सांगूनही ते तयार झाले.
रात्रभर पाऊस न पडो अशी प्रार्थना करत झोपलो.सकाळी छान उघाड होता.

बरोब्बर 7.30 ला गुगल काकूच्या मार्गदर्शनाखाली कास ला निघालो.
अश्विनी,कास पठार वर रिसर्च करून आली होती ,'ट्रिप ऍडवायसर'वरचे एक एक रिव्यू तिनी गाडीत सांगितले.त्यातले बरेचसे रिव्ह्यू, 'जेवढं ऐकलं तेवढं छान नाहीये,भ्रमनिरास झाला,असा सूर लावणारे  होते (कदाचित योग्य सिझन गाठता न आल्याने). ते ऐकून आम्हाला  आपण हा अट्टाहास उगीचच केला अस वाटायला लागलं.
10 वाजता साताऱ्याला पोचलो,तिथून 25 km. चा घाट चढून मग कास पठार होत.कास पठार बद्दल संमिश्र भावना मनात घेऊन आम्ही घाट चढायला लागलो.
खूप पाऊस झाल्याने,सर्वदूर दाट झाडी होती,दरी मध्ये ढग उतरले होते.दोन नद्या त्यावरील बंधारे,अन कास तलाव, आलटून पालटून दर्शन देत होते.
हिरवळीच्या,गर्द हिरवा,हिरवा अन पोपटी अश्या तिन्ही छटा डोंगरावर दिसत होत्या।पोपटी रंगावर तर स्पॉट लाईट पडल्यासारखे सूर्यकिरण पडली होती,त्यामुळे तो अजूनच खुलून दिसत होता. कास पठार च ट्रेलर दाखवणारी पिवळी फुल एका ठिकाणी विस्तीर्ण जागेत फुलली होती. ईटूकली पिटुकली रंगीबेरंगी रानफुल पण मधूनच दिसत होती.घाटातला प्रवास खूपच सुंदर होता.कास पठार कसेही असो ,हे सौंदर्य पाहूनच 'पैसा वसूल' फीलिंग आलं!
पार्किंग मध्ये गाडी ठेऊन पुढे 2-3 km.बस नि पठारावर नेतात.10 ₹  तिकीट होत। 5 min.तिथे पोचलो.
पोचल्याबरोबर अद्भुत दृश्य नजरेसमोर आलं!नजर जाईल तिथपर्यंत गुलाबी फुलांचा गालिचा पसरला होता!
एका मोठ्या कॅनव्हास वर गुलाबी रंग सांडून तो वेडावाकडा पसरलाय अस ते पाहून वाटलं.
तिथल्या ऑफिस मधून गाईड घेऊन(गाईड फी 100 ₹ आहे)कास पठार हिंडायला निघालो.
खूप सुंदर आणि नाजूक नाजूक फुलं होती.गाईड या फुलांचे बोटॅनिकल नाव सांगेल अस वाटलं ,ते लक्षात ही राहिले नसते अन इतकी जड नाव त्या पिटुकल्या फुलांना शोभले पण नसते!
पण त्यांनी सांगितलेली नाव खूपच इंटरेस्टिंग होती। हळदी,मिकी माउस, अबोलीका,बटन,टूथब्रश,सीतेचे अश्रू ( रावणाने सीतेला पळवून नेल तेंव्हा इथे तिचे अश्रू पडले)अशी नाव त्यांनी सांगितली.
'अबोलीका'तर इतकं कोमल अन नाजूक होत की त्याकडे जास्त वेळ पाहिलं तरी त्याच्या पाकळ्या गळतील अस वाटलं. कुठे गुलाबी गालिच्यावर मधेच जांभळी फुलं ,तर कुठे जांभळ्या फुलांमध्ये पिवळी पांढरी फुल उगवली होती.रानफुलच ती ,मनात येईल तशी मनात येईल तिथे फुलली होती.पण त्यांनी साधलेली रंगसंगती मात्र अप्रतिम होती.काही फुल तर इतकी सूक्ष्म होती की गाईड नि दाखवली नसती तर ती आम्हाला दिसलीही नसती.गाईड नि एक झुडूप दाखवलं,त्याला दर 8 वर्षांनी फुलं येतात 2008 मध्ये अन 2016 मध्ये आले होते आता एकदम 2024 मध्ये येतील अस त्यांनी सांगितल. 8 वर्षानीच उमलायच हे त्या फुलांना कसं कळत असेल बर! खरच निसर्गाची किमया अद्भुत आहे! 
मधेच भुरुभरु पाऊस,मधे च कडक ऊन ,थंड गार वारा तर होताच.त्या 2 तासात आम्ही तिन्ही ऋतू अनुभवले.
फ्रेश हवा,तिन्ही बाजूनी हिरवेगार डोंगर,आणि भोवती रंगीबेरंगी फुलांचा गालिचा,खूपच हटके अनुभव होता तो! जे अनुभवलं त्यातल एक टक्काही मी शब्दात पकडु शकले नाहीये.
2 तास कसे गेले कळलही नाही. 
जायची वेळ झाली होती.वरपर्यंत गाड्या येताना दिसल्या ,म्हणून विचारलं तर तुम्ही पण तुमची गाडी बोलावू शकता अस सांगितलं(आधी बस नि वरपर्यंत आणण्याचं कारण कळलं नाही)आम्ही  गाडी वर बोलावली.तिथून थोड्या अंतरावर असलेल्या कास तलाव ला गेलो. तिथे पण पार्किंग होत.कदाचित खालचं पार्किंग फुल झालं की मग गाड्या इथे पाठवत असावे. तलावात भरपूर पाणी होत.तीन बाजूनी डोंगरांनी वेढलेला शांत तलाव ,खूपच छान वाटला.
फुललेली भरपूर फुल बघायला मिळाल्यामुळे आमचा तरी कास चा अनुभव छान आहे.एक मात्र खर, शिस्तीत वाढलेल्या,अन रेखा अमिताभ च्या सिलसिला मूळे प्रसिद्ध झालेल्या ट्युलिप गार्डन सारखी अपेक्षा ठेऊन जर कोणी गेल तर त्यांचा नक्कीच भ्रमनिरास होईल.
कारण कास ची फुलं,अगदी आपल्या अवती भवती सहज दिसणारी (उदा. तेरडा) साधी रानफुल आहेत.
कुठलीही निगा न राखता,ठराविक वेळी, असंख्य प्रमाणात उमलून पूर्ण पठार झाकून टाकणारी नाजूक फुलं हेच इथलं वैशिष्ठय! फक्त तुम्हाला त्यांची मर्जी (ते फुलतील ती वेळ) सांभाळता आली पाहिजे!

No comments:

Post a Comment