Monday, October 14, 2019

(झ)कास पठार

बऱ्याच वर्षांपूर्वी हिमालयातील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'बद्दल ऐकल,फोटो बघितले तेंव्हाच तिथे कधी तरी जायचं  ठरवलं होतं. काळाच्या ओघात याचा विसर पडला.
गेल्या 4,5 वर्षापूर्वी,साताऱ्याजवळ एका पठारावर , सप्टेंबर-ऑक्टोबर मधे' व्हॅली ऑफ फ्लोवेर्स' सारखाच रानफुलांचा गालिचा फुलतो अस ऐकलं.युनेस्को नी 2012 मध्ये याला'वर्ल्ड हेरिटेज साईट' घोषित केल्यानंतर कास पठार जास्त प्रसिद्ध झाल, लोकांचा ओघ वाढला.ओळखीचे बरेच जण तिथे जाऊन आले ,त्यांनी टाकलेले फोटो बघून,हिमालयात तर नाही पण इतक्या जवळ असलेल्या कास पठाराला तरी नक्की भेट द्यायचं ठरवलं.साधारण 1सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर हा तिथला सिझन!पण ते बरचस हवामानावर अवलंबून असत.मुख्यतः पाऊस थांबल्यावर थोडं ऊन पडायला लागल की फुल फुलतात.कधी कमी पावसामुळे तर कधी अति पावसामुळे सिझन मागे पुढे होऊ शकतो ! तो विशिष्ट सिझन गाठायचा असल्याने काही न काही कारणांनी जाण लांबत गेलं. यावर्षी मात्र कोणत्याही हालतीत तिथे जायचंच असा मनाशी ठरवलं.
साताऱ्याहून सांगली जवळ असल्याने शनिवारी सकाळी कास अन पुढे सांगलीचा प्लॅन आखला. वीकएंड ला तिथे ऑनलाइन बुकिंग करून जावं लागतं.बुकिंग त्यांच्या वेब साईट वरून होत.विकेंड ला एन्ट्री फी 100 ₹ ,इतर दिवशी 50 ₹( 12 वर्षाखालील मुलाना व जेष्ठ नागरिकांना तिकीट नाही). 7-11,11-3 अन 3-6 असे बुकिंग स्लॉट आहेत.एका दिवशी फक्त 3000 लोकांना प्रवेश मिळतो.
आम्ही 21 सप्टें., 11-3 स्लॉट च बुकिंगऑगस्ट मधेच केल.
ट्रेन रिसर्व्हेशन करायच्या वेळेस मात्र सुभाष नि बॅक मारला ,'मी  डायरेक्ट सांगली ला पोचेन,कास पठार बघण्यात मला इंटरेस्ट नाही'.तो नाही म्हणल्यावर विनय दादा पण नाही म्हणाला. मग ताई आणि मी ,पुण्याहून त्यांच्या गाडीने  जायचं ठरवल. मी पुढे सांगलीला जाणार ,येताना ताई एकटी राहील म्हणून तिनी तिच्या मैत्रिणी ला(अश्विनी) विचारलं ,ती पण तयार झाली.
सप्टें.मधे पुणे ,सातारा भागात झालेल्या  मुसळधार पावसाने मात्र आमच्या मनसुब्यावर पाणी फिरवलं. तिथे खूप चिखल झालाय ,फुलांच्या पाकळ्या गळून गेल्या,काहीही बघायला मिळणार नाही अस कळलं. रीझर्व्हेशन झाले होते,सांगलीला मुलांना भेटायला  जायचंच होत,त्यामुळे पुण्याला तर जाऊ मग बघू पुढे काय ते,असा विचार करून 20 ला पुण्याला पोचले.
दुपारी 4 वाजता एकदा बुकिंग ऑफिस ला फोन करून विचारायच,जर काहीच फुल नसतील तर कास पठार न जाता अजून एक दिवस पुण्यातच थांबून सांगलीला निघायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे तिथे फोन केला ,तर सकाळी थोडा पाऊस झाला पण आता पाऊस नाहीये ,रात्रभरात पडला तर काही सांगता येत नाही ,अस ते म्हणाले.
पाऊस नाही म्हंटल्यावर आमच्या आशा पल्लवीत झाल्या.
मग ड्रायव्हर ची शोधाशोध सुरू झाली. एक ओळखीचा ड्रायव्हर होता त्याच जमणार नव्हत.ताई कडला ड्राइवर (संदीप भाऊ) जो नुकताच लागला होता,तो पुरेसा स्मार्ट नाही ,त्याला रस्ते वगैरे पटकन कळत नाहीत,अस विनय दादांनी सांगितल्यामुळे तो पण बाद झाला. इतक्या वेळेवर ड्राइवर मिळण कठीणच होत. हे सुभाष ला कळल्यावर ,तो म्हणाला असा प्रॉब्लेम असेल तर मी येतो कास ला ( तो कार नी  रात्री 9 पर्यंत पुण्याला पोचणार होता).तिथुन आपण सांगलीला जाऊ.फक्त ताई अन तिच्या मैत्रिणीला परत येताना बस नि यावं लागेल.तस अश्विनीला विचारलं.सासर माहेर पुण्यात,अन नातेवाईक मुंबई किंवा अमेरिकेला!त्यामुळे कायम कार ,विमान फार फार तर ट्रेन च्या प्रवासाची सवय असल्यामुळे तिनी बस नि यायला सपशेल नकार दिला.
आता काय करायचं मोठा प्रश्न पडला!
शेवटी ताई म्हणाली,आम्ही तर पुण्याहून कधी पण जाऊ शकतो,तुझी खूप ईच्छा होती,तर उद्या तू अन सुभाष कास ला जा ,तिथून पुढे सांगली ला!
सुभाष बरोबर गेली तर 10 मीं. तो भरभर चक्कर मारेल आणि म्हणेल,'तेरड्याची फुल काय बघायची,सगळीकडे अशीच फुल आहेत, इथूनच दिसतंय सगळं ,कशाला वेळ घालवायचा,त्यापेक्षा सांगलीला लवकर जाऊन मुलांबरोबर जास्त वेळ घालवू!' अशी मी त्याची नक्कल करू दाखवली. मग लगेच सुभाष नि पण 'तुम्ही बायका एकेका फुलाजवळ जाऊन ,अय्या किती सुंदर न! काय गोड रंग आहे ग! माझ्या मैत्रिणीच्या नणंदेकडे न अश्याच रंगाची साडी आहे,अस म्हणत म्हणत 3 तास लावालं'अस म्हणून माझा टोला परतवला!
मग मार्स अन ज्युपिटर वासींचा सामना असा काही रंगला की हसून हसून पोट दुखायला लागलं.
शेवटी पुरेश्या स्मार्ट नसलेल्या संदीप भाऊंना स्मार्ट फोन च्या मदतीने स्मार्ट बनऊन न्यायचं ठरवलं.अन रात्री 10 वाजता एकदाची कास ट्रिप ठरली. अश्विनी ला तसा फोन केला. तो ड्रायव्हर घाटात गाडी चालवू शकेल का ? हाय वे वर चालवायची त्याला सवय आहे का ? अश्या त्या चिंतातुर जंतू च्या किंतु परंतु च निरसन करून शेवटी संदीप भाऊंना फोन केला.नशीब इतक्या वेळेवर सांगूनही ते तयार झाले.
रात्रभर पाऊस न पडो अशी प्रार्थना करत झोपलो.सकाळी छान उघाड होता.

बरोब्बर 7.30 ला गुगल काकूच्या मार्गदर्शनाखाली कास ला निघालो.
अश्विनी,कास पठार वर रिसर्च करून आली होती ,'ट्रिप ऍडवायसर'वरचे एक एक रिव्यू तिनी गाडीत सांगितले.त्यातले बरेचसे रिव्ह्यू, 'जेवढं ऐकलं तेवढं छान नाहीये,भ्रमनिरास झाला,असा सूर लावणारे  होते (कदाचित योग्य सिझन गाठता न आल्याने). ते ऐकून आम्हाला  आपण हा अट्टाहास उगीचच केला अस वाटायला लागलं.
10 वाजता साताऱ्याला पोचलो,तिथून 25 km. चा घाट चढून मग कास पठार होत.कास पठार बद्दल संमिश्र भावना मनात घेऊन आम्ही घाट चढायला लागलो.
खूप पाऊस झाल्याने,सर्वदूर दाट झाडी होती,दरी मध्ये ढग उतरले होते.दोन नद्या त्यावरील बंधारे,अन कास तलाव, आलटून पालटून दर्शन देत होते.
हिरवळीच्या,गर्द हिरवा,हिरवा अन पोपटी अश्या तिन्ही छटा डोंगरावर दिसत होत्या।पोपटी रंगावर तर स्पॉट लाईट पडल्यासारखे सूर्यकिरण पडली होती,त्यामुळे तो अजूनच खुलून दिसत होता. कास पठार च ट्रेलर दाखवणारी पिवळी फुल एका ठिकाणी विस्तीर्ण जागेत फुलली होती. ईटूकली पिटुकली रंगीबेरंगी रानफुल पण मधूनच दिसत होती.घाटातला प्रवास खूपच सुंदर होता.कास पठार कसेही असो ,हे सौंदर्य पाहूनच 'पैसा वसूल' फीलिंग आलं!
पार्किंग मध्ये गाडी ठेऊन पुढे 2-3 km.बस नि पठारावर नेतात.10 ₹  तिकीट होत। 5 min.तिथे पोचलो.
पोचल्याबरोबर अद्भुत दृश्य नजरेसमोर आलं!नजर जाईल तिथपर्यंत गुलाबी फुलांचा गालिचा पसरला होता!
एका मोठ्या कॅनव्हास वर गुलाबी रंग सांडून तो वेडावाकडा पसरलाय अस ते पाहून वाटलं.
तिथल्या ऑफिस मधून गाईड घेऊन(गाईड फी 100 ₹ आहे)कास पठार हिंडायला निघालो.
खूप सुंदर आणि नाजूक नाजूक फुलं होती.गाईड या फुलांचे बोटॅनिकल नाव सांगेल अस वाटलं ,ते लक्षात ही राहिले नसते अन इतकी जड नाव त्या पिटुकल्या फुलांना शोभले पण नसते!
पण त्यांनी सांगितलेली नाव खूपच इंटरेस्टिंग होती। हळदी,मिकी माउस, अबोलीका,बटन,टूथब्रश,सीतेचे अश्रू ( रावणाने सीतेला पळवून नेल तेंव्हा इथे तिचे अश्रू पडले)अशी नाव त्यांनी सांगितली.
'अबोलीका'तर इतकं कोमल अन नाजूक होत की त्याकडे जास्त वेळ पाहिलं तरी त्याच्या पाकळ्या गळतील अस वाटलं. कुठे गुलाबी गालिच्यावर मधेच जांभळी फुलं ,तर कुठे जांभळ्या फुलांमध्ये पिवळी पांढरी फुल उगवली होती.रानफुलच ती ,मनात येईल तशी मनात येईल तिथे फुलली होती.पण त्यांनी साधलेली रंगसंगती मात्र अप्रतिम होती.काही फुल तर इतकी सूक्ष्म होती की गाईड नि दाखवली नसती तर ती आम्हाला दिसलीही नसती.गाईड नि एक झुडूप दाखवलं,त्याला दर 8 वर्षांनी फुलं येतात 2008 मध्ये अन 2016 मध्ये आले होते आता एकदम 2024 मध्ये येतील अस त्यांनी सांगितल. 8 वर्षानीच उमलायच हे त्या फुलांना कसं कळत असेल बर! खरच निसर्गाची किमया अद्भुत आहे! 
मधेच भुरुभरु पाऊस,मधे च कडक ऊन ,थंड गार वारा तर होताच.त्या 2 तासात आम्ही तिन्ही ऋतू अनुभवले.
फ्रेश हवा,तिन्ही बाजूनी हिरवेगार डोंगर,आणि भोवती रंगीबेरंगी फुलांचा गालिचा,खूपच हटके अनुभव होता तो! जे अनुभवलं त्यातल एक टक्काही मी शब्दात पकडु शकले नाहीये.
2 तास कसे गेले कळलही नाही. 
जायची वेळ झाली होती.वरपर्यंत गाड्या येताना दिसल्या ,म्हणून विचारलं तर तुम्ही पण तुमची गाडी बोलावू शकता अस सांगितलं(आधी बस नि वरपर्यंत आणण्याचं कारण कळलं नाही)आम्ही  गाडी वर बोलावली.तिथून थोड्या अंतरावर असलेल्या कास तलाव ला गेलो. तिथे पण पार्किंग होत.कदाचित खालचं पार्किंग फुल झालं की मग गाड्या इथे पाठवत असावे. तलावात भरपूर पाणी होत.तीन बाजूनी डोंगरांनी वेढलेला शांत तलाव ,खूपच छान वाटला.
फुललेली भरपूर फुल बघायला मिळाल्यामुळे आमचा तरी कास चा अनुभव छान आहे.एक मात्र खर, शिस्तीत वाढलेल्या,अन रेखा अमिताभ च्या सिलसिला मूळे प्रसिद्ध झालेल्या ट्युलिप गार्डन सारखी अपेक्षा ठेऊन जर कोणी गेल तर त्यांचा नक्कीच भ्रमनिरास होईल.
कारण कास ची फुलं,अगदी आपल्या अवती भवती सहज दिसणारी (उदा. तेरडा) साधी रानफुल आहेत.
कुठलीही निगा न राखता,ठराविक वेळी, असंख्य प्रमाणात उमलून पूर्ण पठार झाकून टाकणारी नाजूक फुलं हेच इथलं वैशिष्ठय! फक्त तुम्हाला त्यांची मर्जी (ते फुलतील ती वेळ) सांभाळता आली पाहिजे!

Sunday, October 13, 2019

या निसर्गा संगे....

 गॅलरीतून दिसणारं विस्तीर्ण आकाश, खाली हिरवाकंच शालू ल्यायलेली ताजी टवटवीत आणि वार्‍‍याच्या  झुळूकीवर डोलणाारी भात शेती! हिरव्या रंगाच्या छ्टा लक्ष वेधून घेतात. त्याचा तो मखमली, मुलायम स्पर्श डोळ्यांना, तनामनाला सुखावून जातो. नजरेच्या टप्प्यात दिसणार्‍या हिरवी, पोपटी शाल पांघरलेल्या टेकड्या... काय बहारदार निसर्ग! एकटेपणा जरा सुद्धा जाणवू देत नाही हा निसर्ग! शब्देविण संवादू असचं मैत्र असतं त्याचं. त्या टेकड्या म्हणजे आमचं weather forecast department आहे. टेकड्यांवर करडे काळे, पाण्याने गच्च भरलेले ढग दाटून आले कि पाऊस नक्कीच येणार. ढगांच्या दाटीने सहज कळतं पाऊस कितीवेळ पडणार.          ते भरलेले ढग बघितल्यावर कळले नभ उतरू आले म्हणजे काय असतं. असं वाटतं ते ढग टेकड्यांशी खेळायलाच खाली उतरले आहेत. धावत जाऊन आपणही सामिल व्हावं का त्यांच्यात आणि उतरलेले ते नभ ओंजळीत घ्यावे. त्याचा स्पर्श, सुगंध अनुभवावा. ढगातून बरसणार्‍या धारा मी कधी इतक्या जवळून बघितल्या नव्हत्या. ढगाचं /नभाचं ते आवेगात बरसत राहणं आणि रितं झाल्यावर नाहिसं होणं हे फारच विलोभनीय असतं. आणि आता श्रावणात तर लगेच सुंदर पिवळं सोनेरी ऊन पडतं. पाण्याच्या प्रत्येक थेंबात दिसणारे उन्हाचे ते प्रतिबिंब रंगीत आणि मनोहारी जणु हिरे, माणिक, रत्नांचा गालीचा अंथरला आहे. पूर्वेला काळसर ढगाला आलेली चंदेरी कडा आणि त्यावर आलेले ते सुरेख इंद्रधनुष्य! नजर हटत नाही त्या दृश्यावरून! समोर दिसणार्‍या विस्तीर्ण आकाशामुळे हा नजारा अजून स्पष्ट दिसतो. इंद्रधनूची कमान उंच इमारतींच्या वरून खुणावते आपल्याला. अशावेळी श्रावणाची, निसर्गाची गाणी आपसूक आपल्या ओठांवर येतात. अशाच काही निसर्गाच्या गाण्यांवर थोडसं.
तसे तर अनेक गाणे आहेत निसर्गावर पण या तीन गाण्यातील निसर्ग मला अधिक आवडला. त्यातले शब्द, चाल, संगीत, आवाज सगळे असे काही झकास जमले आहे की अगदी हुबेहुब चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
 या मराठी गाण्यात - हे जीवन   सुंदर आहे नितळ निळाई आकाशाची अन् क्षितिजाची लाली.           दवात भिजलेल्या वाटेवरती किरणांची रांगोळी   काय सुरेख वर्णन. या पूर्ण गाण्यात सकारात्मक आणि नकारात्मक विचार आणि माणसानेच निसर्गाचा ह्रास कसा केला हे तर आहेच पण रुक्षपणा, उपहास, हतबलता  जाणवते... त्या ओळी   -      अहो, आता विसरा हे सगळे.
 इथे इमारतींच्या जंगलातला  वनवास
 त्यातून दिसणार टिचभर आकाश                आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास . हे वास्तव फार विदारक  सत्य आहे. माणूस निसर्गापासून दूर दूर गेला आहे. त्याचेच कर्म भोगतो आहे. इतकं असूनही जगण्यातला जिवंतपणा, त्यातला रसरशीतपणा जाणवून आपल्याला पुन्हा उभारी मिळते. पानामधली सळसळ हिरवी अन्  किलबिल पक्षांची...                                                       इथे तिथे  संगीत अनामिक एकच घुमते आहे.     हे जीवन सुंदर आहे... निसर्गाचे हे सुरेल संगीत आपल्याला पण ताल धरायला लावते आणि गाणी म्हणायला भाग पाडते.
तो काय म्हणतो - पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझं 
 कपड्यांचा सत्यानाश आणि सर्दीला आमंत्रण. 
तर तीचा विचार पहा हं किती सकारात्मक ऊर्जा देणारा   पाऊस झिमझिमणारा आणि                पाऊस कोसळणारा 
 टपटप पागोळ्यातून अपुल्या ओंजळीत येणारा
 जगण्यावरचे प्रेम जणु हे धुंद बरसते आहे... हे जीवन सुंदर* आहे. आजूबाजूला इतक्या नकारात्मक गोष्टी असूनही आपण सकारात्मक, चांगले ते घ्यावे आणि आनंदी रहावे असेच हे गाणं आपल्याला सांगते आहे. तणावविरहीत जगावे. निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद असतो तो निर्मळपणा आपल्यात आणावा.

 ये कौन चित्रकार हैं._ या गाण्यातील निसर्ग हिमालयाच्या कुशीतला आहे हे चटकन लक्षात येत. _हरीभरी वसुंधरा पर नीला नीला ये गगन के जिसपे बादलों की पालकी उडा रहा है पवन।दिशाएँ देखो रंगभरी चमक रही उमंगभरी।   "बादलों की पालकी "काय मस्त शब्द योजना आहे. नजरेसमोर निळ्याशार आकाशावर पांढरेशुभ्र ढगांचे पुंजके आणि त्यांचे क्षणोक्षणी बदलणारे आकार येतात.  *किस ने फूल फूल से किया शृंगार है। कुदरत की इस पवित्रता को तुम निहारलो। इनके गुणों को अपने मन में तुम उतार लो। चमका दो आज लालिमा अपने ललाट की।* या निसर्गाकडून किती गुण घेण्यासारखे आहे ते गुण माणसाने आपल्यात  आणले तर मग बघा आपल्या ललाटा वरच्या रेषा कशा चमकतील. आपल्या सारखे भाग्यवान आपणच होणार. निसर्ग प्राणीमात्रांना फक्त देत राहतो कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता. आपणही असे निस्वार्थपणे सगळ्यांशी वागावे.               
 _तपस्वियों सी है ये पर्वतों की चोटियां। ये बर्फ की घुमरदार  घेरदार घाटियाँ ध्वजा से ये हुए है वृक्ष देवदार के । अहाहा काय सुरेख वर्णन केले आहे आणि ते पण नेमक्या शब्दात! नजरेसमोर हिमालचल प्रदेश उभा राहिला. त्यातला तो घुमरदार, घेरदार हे शब्द मला खासच आवडले. हिमाच्छादित मोठ्या मोठ्या पर्वतरांगा आणि त्यातले ते वळणदार, नागमोडी घाटातले रस्ते. दुसर्‍या बाजूला दरीतील उंच उंच देवदार झाडे नजरे समोर येतात. आणि वर अजून एक निरागस प्रश्न _ये किस कवी की कल्पना का चमत्कार है ?  चित्रकार तर "तो" आहेच पण हळूवार, कोमल ह्रदयाचा कवी  पण बनवलं. क्या बात है. इतका अवर्णनीय निसर्ग निर्माण केला. हे वर्णन ऐकून खुषीच्या लहरी जणू निर्माण होतात आणि मनातले किंतू परंतु दूर पळतात.
असे आणखी एक गाणे आठवले ज्याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतला आहे आपल्या लहानपणी. दिल ढुंढता है, है फिर वही फुरसद के रातदिन.... ठंडी सफेद चादरों पर, लेट के तारों को देखते रहे छतपर पड़े हुए। आता ते फुरसतीचे क्षणही गेले आणि गच्चीवर, अंगणात झोपण्याचे दिवसही पार बदलून गेले.
आता हे तिसरे गाणे. निसर्गप्रेमी लोकांना या गाण्यातील वर्णनासारखे करावे वाटत असणार नव्हे ते हे करतच असतात. काय आहे ते...
  नदी सागराच्या खोल पाण्यात पोहावे 
 त्या शितल पाण्यात मन हे चिंब भिजावे     त्याच्या अथांगपणाने मन काळभर यावे           त्या सोनेरी वाळूत चित्र सुंदर रेखावे     मावळतीला दूर जहाज एक दिसावे.  काय मंडळी आहे ना scenic beauty या ओळीत. लगेच आपल्या  डोळ्यासमोर क्षितिजाला टेकलेला सूर्य आणि आणि त्याच्या त्या सुरेख रंगछटा सगळे सगळे अगदी स्पष्ट दिसायला लागते. जणूकाही आपण समुद्र किनार्‍यावर उभे आहोत.
 घनदाट वनातून वाट काढीत चालावे          काळ्या दरीत पारीत मन भरून फिरावे
सावलीत झाडाखाली डोळे हलकेच मिटावे
 मन स्वछंदी होऊन दूर दूर भटकावे 
 वार्‍याच्या गाण्याने मन हरपून जावे. 
मला मित्रमैत्रिणीं बरोबर  केलेली भटकंती, छोट्या छोट्या सहली सार आठवलं.  आपण हा अनुभव कधी ना कधी घेतलेलाच असतो.
 हा सारा पसारा घडणार्‍याशी बोलावे 
 त्याने दिले हे जे सुख एकवार भोगावे 
 त्याचे स्वरूप जाणावे त्याचे दर्शन स्मरावे
सगुण निर्गुण निराकार जो कोणी असेल त्याचाच  मी एक अंश आहे. आत्म्याचा परमात्म्याशी संवाद साधयला याहून सोपा मार्ग कोणता असेल? निसर्गाशी तादात्म्य पावणे म्हणजे त्याच्यात मिसळणे असेल का? हाच मोक्ष असेल का? आणि खरचं असं असेल तर मातीतून येशी मातीत मिसळून जाशी... म्हणून म्हणावेसे वाटते या निसर्गाच्या संगे असे फिरत रहावे... काय सांगावे हा पसारा निर्माण करणारा खरच आपल्याला भेटेलही.

 अंजली

स्मरणातल्या भुलाबाई!

दसर्याच्या दिवशीच ठरवलं होतं आपण मैत्रिणी एकमेकींना भेटू सोन वाटायच्या वेळेस तेव्हाच ठरवू की उद्या पहिल घर कुणाच घ्यायचं? ....ठरलं तर उद्या माझं घराला सर्वानुमते पहिला नंबर मिळाला होता. ......आम्ही आमच्या वेटाळात दहाबारा मैत्रिणी त्यात भरणा चिल्यापिल्ल्या बहीण भावांचा असे करत जवळपास पंधरा सोळा तरी असणारच होतो. पण दरवर्षी  होणारा गोंधळ यावेळेस टाळायचा असं मनापासुन ठरवलेलं होतं.........तर सांगायचा मुद्दा  हा की, ज्याच घर आदल्या वर्षी शेवटी घेणार त्याला समोरच्या वर्षी पहिल्या नंबरचा मान मिळणार असं ठरल्याने माझा यावेळेस पहिला नंबर लागला .कशात म्हणताय?......अहो भुलाबाईचे गाणी म्हणण्यासाठी .........जवळजवळ सात आठ जणांकडे भुलाबाई बसतात तेव्हा प्रत्येकाकडेच सगळी गाणी म्हणण जमत नाही म्हणून तेपण ठरवल की कधी कोणत गाण कुठे गाळायच .कधी कोणाकडे कोणतं म्हणायचं. कमीत कमी पाचा गाणी कम्पलसरी म्हणायचीच मग ते ओळखीच घर असो वा अनोळखी. ........ठरलं तर मग ..........चला उद्यापासुन भुलाबाई बसणार म्हणून खूष!......प्रत्येक ठिकाणी  वेगवेगळा खाऊ मिळेल म्हणून स्वप्नरंजन चाललेलं. .आईला तर बजावुनच ठेवलं होतं की आई ,आपल्या घरचा खाऊ लवकर ओळखू येऊच नये म्हणून मस्त युक्त्या शोध.  .........!

रेशमी रुमाल टाकलेला सुंदरसा चौरंग .त्याच्याभोवती ज्वारीची किंवा ऊसाची धांड आणि शंकर- पार्वती आणि तिच्या मांडीवर बसलेला पिटुकल्या गणेशची मुर्ती मांडायची ती लोभस मुर्ती बघून आपणही घरात इतकच लाडक असाव असं मनात येत असायचं.मुर्तीला दाराच्याच कडेला वाढलेल्या गुलबाक्षिच्या पिवळ्या गुलबाक्षीरंगाची मिक्स वेणी तिही हाताने गुंफलेली भुलाबाईला वाहायची आणि दोन छोट्या छोट्या समया समोर लावायच्या संध्याकाळच्या त्या रम्य प्रकाशमय वातावरणात अंगणातल्या चमेली ,जाई जुईच्या सुगंधात गाणी म्हणण्याचा उत्साह आणखीणच वाढायचा त्या निरभ्र  आकाशातील अंगणात चांदण, जणू अंगणातल्या जाई-जुईचा सडाच शिंपडल्याचा भास व्हायचा.........!
पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे ला खड्या जोषात झालेली सुरुवात  मध्येच आवाज खोलात गेलेला बघून घरातली मोठी ताई एखाद नवीनच गाणं सुरु करुन जोष वाढवायला मदत करायची .त्यातच आतुन कसले कसले खमंग वास आले की लक्षपरत विचलीत व्हायचं.....अशा वेळेस अडखित जाऊ खिडकीत जाऊने परत जोष यायचा . आपल्याच बहिण भावांची,मित्र मैत्रिणींची नांव गुंफतांना असली धमाल यायची की त्याला काही तोडच नाही. एखाद नां मध्येच यमक न जुळणारही असायचा पण मैत्रिणीला तेवढच छान वाटेल म्हणून तेही चालून जायचं .
  ....एक लिंबू झेलूबाई दोन लिंबू झेलूला  छोट्या छोट्या.परकरी मुलींना घेऊन  दोघिंनी मिळून हाताचा पाळणा करुन त्यात सुपारी किंवा लिंबू ठेवून रितसर हळदीकूंकू फुल वाहून सगळ्या सख्यांनापण कुंकू लावल्या जायचं. लहान वयातच आपसुकच किती छान शिकवण मिळत होती. रुसवा फुगवा हेवेदावे होतच आसतात पण ते न दुखवता सोडवायचे कसे हे शिकलो. खेळतांना मोठ्यांना मान तार मिळतोच पण आपल्या छोट्या छोट्या मैत्रिणींनाही पुढे करुन त्यांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे याची जाणीव त्यांना करुन द्यायची .या आणि अशा कितीतरी गोष्टी सहजपणाने शिकल्या जातात अशा उत्सव -सणांमधून  !......खिरापतीचा खाऊ बंद डब्यातला ओळखणे हे आणखी एक कसब .डबा हालवला की त्याचा नाद खणखणता येतो कां बसका येतो कां येतच नाही.की,सुगंध येतो त्यावरुन तो पदार्था ओळखणे म्हणजे पेपरमधल जणू अवघड गणितच सोडवणे. ओळखल्यावर मात्र हास्याचे फवारे आणि नुसती धमाल ......
असे हे कोजागिरीपर्यंत पाच दिवस चालणार आणि कोजागिरीला प्रत्येक घरी किमान पदार्थांचा नैवेद्य असणार म्हणजे नुसती चंगळ !पण शेवटाला मात्र खाऊन खाऊन थकलेला जीव आणि गाणी म्हणून म्हणून दमलेला आवाज शेवटी मिळालेल्या पदार्थांना जवळच्या डब्यात बंद करायची वेळ यायची .आणि शेवट वेटाळातल्या सामुहीक कोजागिरीच्या दुधाने रात्री बारा वाजता मसाला दूध घेऊन गोड आणि सुफळसंपूर्ण व्हायचा.  लक्ष्मी आणी कुबेर प्रसन्न होऊन शुभ्र चांदण्यांची बरसात करायचे!....

     शरदाच्या चंद्राची शितल किरणे
     खेळत आली जल- भूमीवरी
       स्वच्छ चांदणे अंथरले हे
         धरणी आणि आकाशामध्ये
         रोमांचित झाली ती अगदी
         हरिततृणांच्या पात्यांनी
           वाटे डोलतात हे वृक्षही
           मन्द शितल वार्याने  !!!

@अर्चना मुळ्ये.

Wednesday, October 9, 2019

नाळ


"नाळ" हे शीर्षक वाचून, या लेखाचा संबंध नागराज मंजुळेच्या "नाळ" चित्रपटाशी आहे की काय? कदाचित तुमच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे. पण वाचकहो... सुरूवातीलाच शपथेवर स्पष्ट करते की, एका नामसाधर्म्या पलिकडे या लेखाचं त्या चित्रपटाशी कोणतंही साम्य नाही. मग ते नाही तर काय आहे? खरं सांगू का? याक्षणी मलाही स्पष्टपणे माहित नाही. एक धूसरसं कल्पनाचित्र मनात उमटलंय. त्याला शब्दबद्ध करायचा हा प्रयत्न आहे. 

   
त्यांचं झालं असं की परवा, नवरात्रात गावी जायचं होतं. पण सध्या शासकीय कृपेने म्हणा अथवा वरुण कृपाप्रसादे म्हणा... सगळीकडेच रस्ते देदणादण उडविणारे आहेत. गावाकडे जाताना तर अधिकच हलाहल करतात. त्या आंतरराष्ट्रीय रस्त्यांवरुन आपली चार चाकी नको तर सरकारी लाल डब्बा अधिक सोयीचा, असा सूज्ञ विचार करुन 'एष्टी' नामक वाहनावर दृष्टी ठेवत स्थानकावर उभे होतो. गाव ज्या तालुक्यात आहे त्या नावाचा उल्लेख असणारा फलाट नि बाकडे पकडून बसायचा विचार होता. पण सोबतच्या अनुभवी सोबतीणीने तसे करू दिले नाही. नजर भिरभिरत ठेवून, कान उद् घोषणेकडे रोखून, तोंडानं माझ्याशी गप्पा मारणा-या तिच्या या "त्रि-अवधानी" कौशल्याचं नाही म्हटलं तरी मला कौतुक वाटत होतं. पाच-दहा मिनिटे झाली असतील अचानक तिने मला ओढत नेले. थोडावेळ कळले नाही पण मग लक्षात आले की आपल्याला हवी ती ही एष्टी मैदानात उभी आहे. सवा-या उतरताहेत तोच चपळाईनं तिने दुसरा क्रमांकाचा बाक पकडला. 'पहिला रिकामा असताना तो का सोडलास?', या माझ्या प्रश्नावर शांतपणे तिने सांगितले की तो वाहकासाठी म्हणजे कंडक्टरसाठी राखीव असतो. आम्ही बसलेल्या जागेवर काही लिहिले आहे का? ते बघायला अभावितपणे नजर वर गेली तर तेथे चक्क विधानसभा नि विधानपरिषद सदस्यांसाठी राखीव लिहिले होते. माझा नजरेचा रोख न् देहबोली तिला लगेच कळली. मला हात धरून खाली बसवत ती म्हणाली,"बस इथेच. कोणी येत नाही" गाडी सुरु झाली. मला वाटले निघाली. पण छे....! ती फलाटावर लागली. तेथे माझ्यासारखे नवखे चढले. मोक्याच्या जागा आधीच बळकावलेल्या पाहून चरफडले. मला आता सोबतीणीचा प्रचंड आदर वाटू लागला. किती तिला ज्ञान! किती तिची दूरदृष्टी! धन्य तिचे त्रि-अवधान! 

आता तुम्ही म्हणाल की, या सगळ्या एष्टी पुराणाचा नि 'नाळ' शीर्षकाचा काय संबंध? नसला तर काय झाले? यालाच तर भुमिका बांधणे म्हणतात नं? भलेही काही जणं त्याला 'नमनाला घडाभर तेल' असं हिणवतील पण आपण आपलं सोडायचं नाही...सांगत सुटायचं! वाचणारा वाचतो नि कधी अर्थ लावतो तर कधी बोल...! हं...! गाडी निघाली. सोबतीणीच्या चपळाईने खिडकीजवळची जागा मिळाली होती. रस्ता नेहमीचा होता. सगळ्या ओळखीच्या खुणा त्याच होत्या पण तरी नेहमी स्वतःच्या गाडीने करत असलेला प्रवास आणि आजचा हा जनपरिवहन प्रवास... दोन्हीत काही वेगळेपण होतं. ठिकठिकाणी असणारे विनंती थांबे, नवखे प्रवासी... बुजरे! तर डेलीवाले... सराईत! त्यात विद्यार्थी आणि शिक्षक अधिक! गाडीनं रेल्वे फाटक ओलांडलं. भौरद फाटा सोडून डाबकीला भोज्ज्या करत एष्टीनं पुढला रस्ता पकडला न् वाचकहो, तिथेच माझ्या मनात या लेखाचा कोंब रुजला.

तो कसा? लेख पुढे वाचाल तेंव्हा त्याचा उलगडा होईलच. डाबकी ओलांडत असताना का कोण जाणे पण श्रीराम पाटील यांची आठवण आली. त्यांची ती, त्यांच्या वर्णाशी मिळतीजुळती काळी टोपी, किंचित स्थुल बांधा झटक्यात नजरेसमोर आला. पाठोपाठ त्याकाळात त्यांचा कसा राग यायचा, तेही आठवलं. खरंतर राग यायचं तसं काही कारण नव्हतं पण ते दर चार आठ दिवसांनी एखादं स्थळ सुचवायला घरी यायचे नि कोणत्याही नवतरूणीप्रमाणे तेंव्हा मला लग्न करायचं नव्हतं. आईला मात्र ते भावाप्रमाणे जवळचे वाटायचे कारण त्याकाळात लग्न ठरविण्यासाठी कोणतेही डाॅट कॉम नव्हते तर या अशा मध्यस्थ संस्थाच असायच्या. अशा अनेकांचे दोनाचे चार करून देण्यात त्यांचा हातखंडा होता. अर्थात आमच्या बाबतीत तो उपयोगी पडला नाही म्हणा. कारण आमचे भले आम्ही स्वतःच करून घेतले होते. पण खरंच त्या मामांनी कित्येकांचे संसार मार्गी लावून दिले होते. 
आता डाबकी कधीच मागे पडलं. गायगावची खुण असणारे पेट्रोल टॅन्क दिसायला लागले तसे श्रीराम पाटलांच्या आठवणी मागे पडल्या नि गायगावचे दिनकरभाऊ दिसू लागले. हे गाव मावशींचं गाव. तशा मला अकरा मावशी! पण त्यातल्या मी केवळ तिघींना प्रत्यक्ष बघितलं होतं.  इतर आठ मावशांप्रमाणेच ही मावशी पण मी कधी बघितली नाही. कारण माझ्या जन्माच्या कित्येक वर्षं आधी ती हे जग सोडून गेलेली. मात्र तिला झालेल्या भयंकर सासुरवासाच्या कथा ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो होतो. त्यामुळे गायगाव म्हटले की ती मावशीची न पाहिलेली  खाष्ट सासू उगाचच डोळ्यासमोर उभी ठाकते. तसंच दिनकरभाऊंच्या मुलीच्या लग्नात माडीवरचं भलं थोरलं मधमाशांचं बदकन् पडलेलं पोळं नि झालेली पळापळ आठवते.

आठवणींचा पिंगा फेर धरत होता. गणपतीला नमस्कार करून सावरत असतानाच नाथ महाराजांचा मठ, तलाव सदृश्य काळ्या दगडातील बांधकाम दिसू लागलं. अरेच्चा! निमकर्दा आलं की...! "हे इथून असं उजव्या हाताला वळलं की माझ्या माहेराची वाट आहे", सोबतीणीला मी म्हणाले. ती काही न कळून बघायला लागली. कळणार तरी कसं? आज माझं माहेर मुंबईत स्थिरावलं आहे. पण मूळ तर इथलंच आहे नं...! क्षणभर उगाचच वाटलं, आपले बाबा याच रस्त्यावरून गेले-आले असतील. तेंव्हा, त्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी शिक्षणाचा मार्ग धरला म्हणून सगळं घरदार सुशिक्षित झालं, हे आई न् चुलत भावांकडून कितीतरी वेळा ऐकलेलं, ते आजही लक्षात आहे. याच रस्त्यावर आमच्या प्रिय मावशीचं टाकळी गाव आहे. मिणमिणत्या कंदिलाच्या उजेडात तिनं चुलीवर केलेल्या चवदार स्वयंपाकाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत असते. कासामावशी जणू आईची प्रतिमाच! दोघींमध्ये प्रचंड साम्य. तेच सारखेपण सुमनताईतही उतरलं आहे. आई नेहमी सांगायची की, म्हशीचं आवंदुध पिवून ती अशी दणकट झाली आहे, न् दुधाचा तोच स्फटीक गोडवा वात्सल्याच्या रूपात तिच्यात आहे. 
    मायेच्या या धाग्यात गुंतत असताना एष्टीनं एक वळण घेतलं. बाहेर बघितलं तर मोरगाव! नकळत अंगावर रोमांच उभे राहिले. हे गाव मी कधीच आतून बघितलं नाही. इथल्या लोकांचाही कधी प्रत्यक्ष परिचय झालेला नाही. पण तरी सुद्धा जशी बाळगुटी घ्यावी तशा या गावाशी निगडीत हकिकती ऐकल्या आहेत. म्हणून हे गाव कधी परकं वाटलंच नाही. मोरगाव आणि मोरगावची वाघिण इतकी वर्ष झालीत तरी आमच्या हाडीमासी रूतलेली आहे. गम्मत होती का राव? स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षं आधी एखाद्या स्त्री मध्ये इतकी तडफ असावी? मोरगावची वाघिण... म्हणजे माझ्या जीजीची (मोठ्या काकूची) आई. ती अतिशय तडफदार होती. कोर्टाच्या खटल्यांसाठी इथून घोड्यावर बसून, स्वतः चालवत नागपूरला जायची. तिच्या हातात बंदूकबिंदूक असायची. सोबत एखादा नोकर... तिच्या शौर्याच्या कथा ऐकताना, तिची जरब कशी होती, याच्या हकिकती ऐकताना अंगावर मूठभर मांस चढायचं. 
   हे काय? उरळची शाळा! बाबा याच शाळेत तर शिकलेत. लोणाग्रावरून हेल्यावर बसून उरळ पर्यंत येणारे बाबा कसे दिसत असतील? याचं कल्पना चित्र आजवर अनेकदा रंगवलेलं ते आताही मनातल्या मनात रेखाटणं सुरू होतं. न् निंबा फाटा आला. कृष्णाभाऊंचं गाव निंबा! ते कधी बघितलं नाही पण फाट्यावरून असंख्य वेळा जाणं येणं झालंय. वळण घेत एष्टी पुढे निघाली. इथेच तर तीस वर्षांपूर्वी माझा भयंकर अपघात झाला होता. आजही शरिरावर ती चिन्ह मिरवावी लागताहेत. 
कारंजा...! रामचंद मामाचं गाव! हा मामा का बरं? हे अनेक वर्ष समजत नव्हतं. तो धोतर नेसायचा पण कपाळाला गंध लावायचा, बोटांना रंगोटी करायचा आणि लचकत चालायचा. हा असा का? हे कळत नव्हतं. त्याचे सख्खे सुद्धा त्याला हिडीसफिडीस करायचे. त्याच्या भावाबरोबर त्याचा शेतीसंबंधी काही वाद होता. मात्र आमच्या घरात त्याला आपुलकी, ओलावा जाणवायचा त्यामुळे तो अधूनमधून यायचा. आला की, गावच्या ब-याच गोष्टी सांगायचा. 

 
 अंदूरा, अडसूळ पार करून नयनाच्या मनात्री पर्यंत आलो. पंचगव्हाण फाट्यानं श्रीधर महाराजांबरोबर झालेल्या अध्यात्मिक वादाची आठवण करून दिली. आता थोडं अंतर की आमचा फाटा येणारच होता. आज तिथे मुलं दुचाकी घेऊन हजर असतील पण पूर्वी धुरळा उडवत येणा-या एष्टी कडे नजर ठेवत, गाडी न् बैल दोन्ही सजग असत. त्रास होवू नये म्हणून त्या बैलबंडी किंवा छकड्यात गाद्या गिर्द्या टाकून तयार असायची. फाट्यावरच्या पाणपोईवर माणसं नि बैल पाणी पिऊन तृप्त व्हायचीत.
  करायचीत, व्हायचीत, न्यायचीत...हा सगळा भूतकाळ झाला. वर्तमानाला भूतकाळात राहता येत नसलं तरी रमायला आवडतं. हा सगळा आठवणींचा गोफ विणला जाताना, मी लेखाला, "गोफ आठवणींचा" असं शीर्षक का दिलं नाही? त्याला नाळ का म्हणतेय? असा प्रश्न साहजिकच मनात येऊ शकतो. तर वाचकहो, या पूर्ण प्रवासा दरम्यान मला सारखं जाणवत राहिलं की आजवर प्रवास खूप केला. अनेक वाहनातून, विविध गावं ओलांडत कधी मुक्काम करत हा प्रवास झाला. पण ती गावं मला अनोळखी होती. मात्र मायेच्या धाग्यानं, प्रेमानं, मातीशी नातं सांगणारी ही गावं... या गावांसंदर्भातल्या बहुतांश आठवणी या आईनं सांगितलेल्या, तिच्या संबंधातून आलेल्या आहेत. तिच्या नाळेतून ते आमच्या पर्यंत आलं. त्यावर आमचं पोषण झालं. त्या नाळेद्वारेच प्रत्येक गावाशी भावबंध जुळले. आईकडून आमच्या पर्यंत आणि आता आमच्या कडून पुढल्या पिढीपर्यंत! हा बंध 'नाळ' बंधच  तर म्हणावा लागेल नं? म्हणून या लेखाचे शीर्षक नाळ!

सीमा शेटे (रोठे), अकोला.

(फोटो सौजन्य : गुगल)

Tuesday, October 8, 2019

मेरे रशके कमर

काल मेरे रशके कमर हे गीत ऐकलं आणि ते मनात घोळत राहिलं. हे गीत बादशाहो
चित्रपटात असलं तरी मूळ रचना फार वेगळी आहे. कमर जलालवी यांच्या फ़ना बुलंदशहरी
ह्या शिष्याने ही गझल लिहिली होती आणि नुसरत फतेह अली खान यांनी ती कव्वाली पद्धतीने
स्वरबद्ध करून गायली होती. माझ्या मनात घोळतेय ती ही मूळ रचना. ही सूफी  गझल आहे.
सूफी परंपरा आपल्या मधुरा भक्तीची उर्दू बहीण आहे. यात अध्यात्मावर लिहिताना शृंगाराचा
रूपकात्मक वापर केला जातो.
सुरुवातीला शायर म्हणतो,
“मेरे रश्के क़मर तू ने पहली नज़र जब नज़र से मिलाई मज़ा आ गया”
रश्क म्हणजे मत्सर आणि कमर म्हणजे चंद्र. रश्क-ए-कमर म्हणजे चंद्रालाही जिच्या सौंदर्याचा
हेवा वाटेल अशी व्यक्ती. अर्थातच ह्या आपल्या प्रेमपात्राला उद्देशून शायर म्हणतोय, तुझ्याशी
पहिल्यांदा नजरानजर झाली तो क्षण अत्यानंदाचा होता. (हरी पाहिला रे- मधली भावना
हीच.)

बर्क सी गिर गयी काम ही कर गयी आग ऐसी लगायी मज़ा आ गया
अचानक वीज कोसळावी आणि आग लागावी, तशी त्याची गत झाली. ही आगही साधी नव्हे,
तर इष्काची! गोविंदाग्रजांच्या कवितेतला लखलखत्या विजेच्या प्रेमात पडलेला वृक्ष आठवतो?
वीज कोसळून दुभंगला, मात्र हर्षाच्या लहरी येऊन हसला. तशीच वीज कोसळल्यावर
लागलेली (भक्तीची) आग या शायरालाही आनंद देऊन गेली.
पुढे ह्या सूफी गझलेत हाला वादही मिसळतो नि शायर म्हणतो,

जाम में घौल कर हुस्न की मस्तियाँ चांदनी मुस्कुराई मज़ा आ गया
चाँद के साए में ऐ मेरे साकिया तू ने ऐसी पिलाई मज़ा आ गया
इथे चांदनी आहे ती अध्यात्माची. सौंदर्याची मस्ती आहे ती मधुराभक्तीच्या. ही भक्तीची नशा
चढत जाते , चंद्राला साक्षी ठेवून.
नशा शीशे में अंगड़ाई लेने लगा बज़्म रिन्दान में सागर खनकने लगा
मैकदे पे बरसने लगी मस्तियाँ जब घटा गिर के छाई मज़ा आ गया
काचेच्या प्याल्यासारखंच नश्वर जीवन असतं मानवाचं. त्या प्याल्यात सुरा फेसाळत जाते तशी
भक्ती आयुष्यात भिनत जाते. मद्यपींच्या मैफलीत जसे चषक किणकिणत असतात, तशी
ईश्वरनिष्ठांच्या  मांदियाळीत भक्ती रुणझुणत असते. त्या भक्तीची नशा चढलेले भक्तगण पाहून
आभाळाचंही मन भरून येतं. इथे आकाशतत्त्व भक्ताला ईश्वराच्या आणखी जवळ घेऊन जातं.
ईश्वरी कृपेचा वर्षाव अधिकच बेभान करतो.

बे-हिजाबाना वो सामने आ गए और जवानी जवानी से टकरा गयी
आँख उनकी लड़ी यूँ मेरी आँख से देख कर ये लड़ाई मज़ा आ गया
या संतसमागमातून आत्मारामु प्रकटतो. एका क्षणी अज्ञानाच्या अंधाराचे जाळे फिटते आणि
आकाश मोकळं होऊन प्रत्यक्ष ईश्वर समोर येतो. दिठीला दिठी मिळते आणि आयुष्याचं सार्थक
होतं.
आँख में थी हया हर मुलाक़ात पर, सुर्ख आरिज़ हुए वसल की बात पर
उसने शर्मा के मेरे सवालात पे ऐसे गर्दन झुकाई मज़ा आ गया
एकदा भेट झाली की पुन्हा पुन्हा होत राहणारच. अशा प्रत्येक भेटीची खुमारी काही औरच
असते. हळूहळू अंतिम मीलन नजरेच्या टप्प्यात येऊ लागतं, प्रीतीला प्रीत मिळू लागते.
अध्यात्मात हा सूफी इतका पुढे जातो, की प्रत्यक्ष ईश्वर त्याला भेट देतो.
आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की मूळ सूफी पंथ जरी इस्लाम चा एक अविभाज्य
घटक असला, तरी तो थोडा गूढवादाकडे झुकणारा आहे. शिवाय सूफी पंथियांच्या
मधुराभक्तीला कट्टर इस्लामचा विरोध आहे. कारण उघड आहे, मधुराभक्ती ही जशी ईश्वराच्या
सगुण उपासनेच्या मार्गाने जाते, तशी सूफी भक्तीही काफराना समजली जाते. त्यामुळे मुल्ला,
मौलवी, शेख हे कट्टर मुसलमान सूफी लोकांशी कायम फटकून वागत आले आहेत. मात्र पैठण
च्या ब्राह्मवृंदाने संन्याशाच्या मुलांचा धिक्कार केला, तरी हरी पाहण्याचं भाग्य त्या सच्च्या
भक्ताच्याच वाट्याला येतं, तसं मुल्ला-मौलवी कितीदा नमाज पढले, तरी या सूफी संताच्या
भक्तीशी त्यांची बरोबरी होऊ शकत नाही.
तुकोबांच्या भक्तीची टर उडवणारे कर्मठ जसे वैकुंठीचं विमान पाहून नतमस्तक झाले,
तसेच हे कट्टर मुसलमान या सूफी संतांची ईश्वराशी जवळीक पाहून समूळ बदलले, नतमस्तक
झाले. आपली पवित्रता गमावून बसले. (हा उल्लेख औपरोधिक आहे, इथे पवित्रता ही पवित्रा
किंवा कर्मठपणा या अर्थी घेता येईल) त्यांची पारसाई, अर्थात (तथाकथित) पावित्र्य विरघळून
जाताना पाहून या सूफीला आनंदच मिळणार!
पुढील कडव्यात हेच वर्णन येतं-
शेख साहिब का ईमान बिक ही गया देख कर हुस्न-ए-साक़ी पिघल ही गया
आज से पहले ये कितने मगरुर थे लुट गयी पारसाई मज़ा आ गया

आता शायर पुन्हा मघाच्या अंतिम मिलनाची वाट चालू लागतो. हे क्षणभंगुर आयुष्य
नष्ट झालं आणि त्यानंतर ही त्याच्या प्रेमपात्राने त्याचा खास सन्मान केला. त्याच्या कबरीवर
फुलांची चादर चढवून आपलं प्रेम व्यक्त केलं.
ऐ फ़ना शुकर है आज बाद-ए-फ़ना उसने रख ली मेरे प्यार की आबरू
अपने हाथों से उसने मेरी क़ब्र पर चादर-ए-गुल चढ़ाई मज़ा आ गया
आयुष्यभर ज्याचा ध्यास घेतला, त्याने शेवटी या जगातून त्या जगात गेल्यावरही आपल्या
मायेचं पांघरूण घातलं आणि भक्ताची तपश्चर्या फळाला आली. सूफी परंपरेप्रमाणे भक्ताचं
अस्तित्व नष्ट होऊन तो भगवंताशी एकरूप झाला.  फ़ना ..हे शायराचं नाव (तखल्लुस)
आणि बाद ए फ़ना  (मरणोत्तर) या शब्दांनी शेवटच्या कडव्यात आणखी मजा आली
आहे. नुसरत फतेह अली खान यांनी ही गझल कव्वाली च्या फॉर्म मध्ये बांधून तिला चार चांद
लावले आहेत. त्यामुळे ती एकदा ऐकली की दिवसभर कानात, मनात घोळत राहते.

© श्रुती देसाई राजे

Monday, October 7, 2019

आमिश


" निसर्ग बघायला म्हणून निघालो तर
गाडीच्या खिडकीतून बेटी झाडंच मधे मधे येत होती..."

आपल्या तथाकथित निसर्गप्रेमाला कवी अशोक नायगावकरांनी असा मिश्कील चिमटा घेतला आहे. आपण पर्यटनाला गेलोच तर निसर्गाला बघतो ते ही कॅमेर्‍याच्या भिंगातून. तिथे दूरचित्रवाणीशी संपर्क आला नाही तर आपण जगापासून तुटू की काय अशी भिती वाटू लागते. एकदाचा मोबाईल ’रेंज’ मधे आला की आपल्या जीवात जीव येतो. माणसाला शेवटी गरज असते फक्त चार हात जमिनीची, हे तत्वत: मान्य असलं तरी प्रत्यक्ष जगताना भौतिक साधनांशिवाय- इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांशिवाय पान हालत नाही. म्हणूनच चंगळवादाचा मुकुटमणी असं ज्या अमेरिकेला म्हटलं जातं तिथे मात्र एक समूह-पंथ या सगळ्या पासून दूर निसर्गाच्या कुशीत निवांत आयुष्य जगतो आहे यावर विश्वास बसेना. आधुनिक जीवनशैलीच्या धकाधकीपासून अलिप्त असणार्‍या त्यांच्या प्रांतातून प्रत्यक्ष बग्गीतून फेरफटका मारल्यावर कुतूहल, आश्चर्य, आनंद, समाधान अशा संमिश्र भावना मनात दाटून आल्या. या समाजाचं-पंथाचं नाव आहे "आमिश"...जगण्याच्या सगळ्या आमिषांपासून मुक्त असलेल्या या आमिश मंडळींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विलक्षण आहे.

जेकब अमान (या नावावरूनच "आमिश" म्हटले जाऊ लागले) यांनी सुरू केलेल्या या आमिश चळवळीने युरोपात सन १६४४-१७२० च्या दरम्यान चांगलेच मूळ धरले. यातले बहुसंख्य लोक १७ व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत स्थलांतरित झाले. पेनसिल्व्हेनिया भागात त्यांचे वास्तव्य जास्त प्रमाणात आहे. ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळी तत्वे अनुसरणारे गट (प्रोटेस्टंट, अनाबाप्टीस्ट इ.) त्यांच्यात निर्माण झाले असले तरी त्यांची जीवनपद्धती साधारण सारखीच आहे. जणू ते सगळे निसर्गपुत्र आहेत. पवनचक्की आणि केरोसिन, लाकूड, कोळसा अशा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ते त्यांची वीजेची माफक गरज भागवतात. (त्यामुळे भारनियमन हा ’सहिष्णू’ शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही) अमेरिकेत सर्रास आढळणारा दिव्यांचा लखलखाट त्यांना आवश्यक वाटत नाही. बहुतेक सगळे आमिश वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त टुमदार घोडागाडी वापरतात. काही कामासाठी आमिश शहरात जातात तेव्हा अद्यावत कार्सच्या बाजूला सिग्नलला थांबलेली त्यांची देखणी बग्गी (खिडकी असलेल्या पेटीसारखी दिसणारी) लक्ष वेधून घेते. प्रत्येक घरी बग्गीसाठी ऐटबाज घोडे तर शेतीसाठी खेचरं पाळली जातात. एका खोलीच्या शाळेत आठवीपर्यंत औपचारिक शिक्षण घेतल्यावर आमिश मुले शेतीचं शिक्षण घेतात. शेती व शेतीशी संबंधित उद्योग हेच त्यांच्या चरितार्थाचं साधन आहे.

समूहाच्या भौगोलिक मर्यादांमुळे असेल, बाहेरच्या जगाशी संपर्क न ठेवताही आमिश आरामात जगतायत, उलट त्यामुळे त्यांचे आपसातील संबंध (मोबाईल किंवा सोशल नेटवर्किंग साईट्स न वापरताही) अधिक दृढ झाले आहेत आणि त्यांची संख्या गेल्या अर्धशतकात तिपटीने वाढली आहे असं त्यांच्या समाजप्रमुखांचं मत आहे. आमिश चर्चपरिवारातच त्यांचे विवाहसंबंध होतात. मोठं कुटुंब ही देवाची देणगी आहे असे ते मानतात. मुलांचं उत्तम संगोपन करणं, नाती जपणं याला त्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या कुटंबाचा अतिशय प्रभाव असतो. मुलांची मानसिक, शारिरीक आणि आध्यात्मिक प्रगती होते आहे ना याकडे कुटंबाचा कटाक्ष असतो. मुले वडिलांना शेती व इतर बाहेरील कामात मदत करतात तर मुली आईला गृहोद्योगात मदत करतात. कुटुंबाला हातभार लावणे हे प्रत्येक जण आपले कर्तव्य समजतो. वृद्ध माणसे शेवटपर्यंत कुटुंबाच्या आधारानेच जगतात. पाण्यापासून निर्माण होणारी उर्जा वापरून, डिझेल जनरेटरवर चालणार्‍या हत्यारांच्या सहाय्याने १००% लाकडी फर्निचर-घरे बनवण्याचे कौशल्य आमिश लोकांच्या प्रत्येक पिढीत आढळते. काही आमिश जर्मन भाषा बोलतात तर बहुसंख्य आमिश इंग्रजीचा वापर करतात. चर्चमधे जर्मन तर इतर ठिकाणी इंग्रजी गीते जुन्या पद्धतीनेच गायली जातात. फक्त खाजगी कार्यक्रमात वाद्ये वाजविली जातात, जाहीररित्या नाहीत. सण समारंभांना नातेवाईक-मित्र आवर्जून एकत्र येतात. सामाजिक एकोप्यामुळे आणि संयमी, सरळ, सोप्या जगण्यामुळे माध्यमातून रोरावत येणार्‍या "मनोरंजनाच्या" महापुरात ते वाहून जात नाहीत. माध्यमं त्यांच्या विश्वात शिरलेलीच नाहीत.


अमेरिकेतील मुक्त लैंगिक जीवन-पद्धतीच्या पार्श्वभूमीवर अमिश स्त्री-पुरूषांच्या सहजीवनातले वेगळेपण उठून दिसते. यांत्रिक जगातल्या ताणतणावांपासून, जीवघेण्या स्पर्धेपासून दूर असल्याने वैवाहिक तसेच कौटुंबिक आयुष्यात सौख्य आणि स्थैर्य आपसूक येते. रविवारी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर तरूण-तरूणींना एकमेकांसह वेळ घालवण्याची मुभा असते. मात्र त्यांना उघड्या टपाच्या बग्गीतून फिरायला जाणे बंधनकारक असते. जोमदार पीक झाल्यावर म्हणजे नोव्हेंबर महिन्यातले मंगळवार विवाहासाठी निश्चीत केले जातात. वधू निळा पोशाख घालते. माणसांमधे असूया, तणाव निर्माण करणार्‍या गोष्टी (उदा: दागदागिने) विवाहप्रसंगी देखील निषिद्ध असतात.(असे आपल्याकडे चुकून जरी घडले तर केवळ या विषयाला वाहिलेल्या मालिका माथी मारणार्‍या तमाम दूरचित्रवाणी वाहिन्या बंद पडतील..असो.) लग्नानंतर नवदांपत्य मित्रपरिवार आणि नातेवाईकांना भेटण्यात काही दिवस घालवतात आणि मग संसाराला सुरूवात करतात. कपड्यातही बटन किंवा झिप ऐवजी हुकचा वापर केला जातो आणि ते घरी शिवले जातात. पांढरा शर्ट, काळी पँट,काळे जॅकेट-कोट व विशीष्ट प्रकारची हॅट असा साधारणपणे पुरूषांचा तर स्कार्फ, पायघोळ झगा, त्यावर ऍप्रन असा स्त्रियांचा पोशाख असतो. मुलांचे छोटेसे पोशाख सुद्धा अशाच स्वरूपाचे असतात, थंडीचा मोसम वगळता मुले चक्क अनवाणी चालताना आढळतात. स्त्रियांचे तपकिरी, सोनेरी लांब केस मागे अंबाड्यासारखे बांधलेले असतात. त्यावर बांधलेल्या "केप" वरून त्यांचे वय आणि वैवाहिक स्थिती कळते. विवाहित पुरूष चाळीशी नंतर मिशी नाही परंतु दाढी राखतात. या प्रतीकांमुळे अमेरिकन पद्धतीप्रमाणे विवाहाची अंगठी घालायची त्यांना गरज वाटत नाही. दागिने आणि कपड्याचा सोस हा मुद्दा एकूणच निकालात निघतो आणि तुलना, हेवा असे प्रश्नच निर्माण होत नाहीत.

भारतासारख्या देशात अनेक आदिवासी किंवा वनवासी थोड्याफार फरकाने याच पद्धतीने जगतात, असे वाटेल पण तसे नाही. त्यांच्या घराला जगाकडे उघडणारी खिडकीच नसल्याने आदिवासी लोक निसर्गपुत्र म्हणून नाईलाजाने जगतात, त्यांच्यावर शिक्षणाचा संस्कार होत नाही, अंधश्रद्धेचा पगडा मनावर असतो. गरीबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे शोषण केले जाते. आमिश लोकांनी मात्र ही जीवनशैली स्वेच्छेने स्वीकारली आहे. ते स्वयंपूर्ण आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची "मन ,बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण" अशी व्याख्या केली आहे. या नजरेतून पाहिले तर आमिश सर्वार्थाने सुशिक्षीत आहेत. त्यांना बाहेरच्या बेभान जगापासून अलिप्त राहायचे आहे.

आमिश जीवनाबद्दल जाणून घेतल्यावर मनात आले, एखादा छंद, लेखन, संशोधन, व्यवसाय यासाठी स्वत:ला झोकून द्यावं किंवा खूप पैसा कमवावा, त्याचा उपभोग घ्यावा, जग पाहावं, नाव कमवावं अशा आकांक्षा आमिश तरूणाईमधे निर्माण होत नसतील का? निरीक्षणातून तरी असेच उत्तर मिळते की आमिश संस्कृतीच्या स्थैर्यासाठी, हितासाठी आणि भवितव्यासाठी वैयक्तिक महत्वाकांक्षेला गौण स्थान दिलं जात असावं. काही समाजशास्त्रज्ञांना ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी वाटते. मात्र प्रेम आणि त्यागाच्या पायावरच, ’जगा आणि जगू द्या’ म्हणत आमिश जीवन कणखरपणे उभे आहे. काही बंडखोर आमिश तरुणांनी व्यक्तिपेक्षा समूहाला महान ठरवणार्‍या या जीवनपद्धतीला नकार देण्यासाठी त्यातून पलायन करणे, सार्वजनिक स्थळी गोळीबार करणे असे विरोध दर्शवणारे मार्ग अवलंबले आहेत. पण अशा घटनांचे प्रमाण तुरळक असल्याचे कळले.आधुनिकीकरणाच्या प्रभावामुळे आमिश मंडळींमधे कट्टर विरूद्ध बदलांचा माफक प्रमाणात स्वीकार करणारे असे गट देखील पडू लागले असले तरीही "निसर्गाकडे चला" हा मूलमंत्र आमिश लोकांनी आजही जपला आहे.

माध्यमांचा अतिरेक, निसर्गाची लूट, व्यसने, व्यभिचार, हव्यास अशा आचार, विचार आणि विहारातील सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून लांब राहून मनमोकळा श्वास घेणारे आमिश आजच्या जगात वेगळे ठरतात ते यामुळेच. काही जणांना असं जगणं, वैज्ञानिक प्रगतीचा आस्वाद न घेणं हा मागासलेपणा, विचीत्रपणा वाटतो. यातलं तथ्य ज्यांना प्रश्न पडतायत त्यांनी शोधावं, आमिश आजही शांतपणे जगत या व्यवहारी जगाला केवळ कृतीनेच ठाम उत्तर देत आहेत.

Wednesday, October 2, 2019

आवाज की दुनिया

या वाटेवर रघुपती आहे,
त्या वाटेवर शिळा
सांग साजणी, कुठे ठेऊ मी,
तुझा उमलता गळा
गान कोकिळा लता मंगेशकर च्या वाढदिवशी कुणीतरी लिहिलेल्या ह्या ओळी वाचल्या आणि तत्क्षणी कानात
उमटला, तो तिचा सुमधुर आवाज.
आवाज--- एखाद्याची ओळख त्याचा आवाज असू शकते? लता दीदी, अमिताभ बच्चन ह्या सारख्या हस्ती चा
विचार केला तर नक्कीच होय.लताची ओळख म्हणजे तिचा जादूई आवाज. अमिताभ चा खास वेगळ्या धाटणीतला भारदस्त आवाज, ही त्याची वेगळी ओळख. मी जेव्हा एका खासगी बँकेत काम करत होते तेव्हा एक सद्गृहस्थ मला नेहमी म्हणायचे, "मॅडम, तुमचं अक्षर फार सुरेख आहे. अक्षरावरून माणसाचा स्वभाव कळतो".. पण एखाद्याचा चेहरा आणि त्याचा आवाज ह्यात मात्र विसंगती असूच शकते. इतकंच काय; पण आवाज आणि अंतरंग ह्यातही साम्य नसू शकतं. आणि काही समीकरणं तर आपणच माणसांनी तयार केलेली असतात. जसे, पुरुषाचा आवाज हा भारदस्तच हवा.त्यामुळे एखाद्या किनरया आवाजाचा पुरुष ऐकायला कसासाच वाटतो. बाई म्हटली की तिचा आवाज मंजूळ, नाजूकच हवा.भसाडया आवाजाची बाई, दिसायला कितीही गोड दिसत असली तरी ऐकायला नकोच वाटते, त्यात ती भांडखोर असेल तर----? एखादा पोलीस ऑफिसर किंवा आर्मी मधील मेजर, बायकी आवाजात बोललेलं कानाला आणि मनालाही रुचत नाही.
माणसा माणसामध्ये च आवाजाच्या बाबतीत किती भिन्नता आढळून येते. एखाद्या व्यक्तीचा आवाज मृदू,
मुलायम, आश्वसक, तर एखाद्या व्यक्तीचा कर्कश, कानावर आदळणारा. कुणाचा आवाज काळजाला भिडतो, तर
कुणाचा काळजाचा थरकाप उडवतो. परिचित व्यक्तींना म्हणूनच आपण आवाजावरून न बघताही सहज ओळखू शकतो. पक्षी, प्राणी, ह्यांच्या बाबतीतही तोच प्रकार. अर्थात, त्यांच्या आवाजाला ओळखही आपणच दिलेली. त्यांचा जो ध्वनी आपल्याला ऐकू येतो त्या नुसार त्या आवाजाला नाव दिले जाते. लहान मुलांना आपण तसेच शकवतो. चिवचिवाट करणाऱ्या त्या चिमण्या, कावकाव करणारे ते, कावळे, भुंकणार तो कुत्राच, डरकाळी फोडतो,तो वाघ आणि फुत्कारतो तो साप-----असे किती तरी प्रकारचे आवाज आपण ऐकत असतो आणि प्रत्येक आवाजाची लय, गती, जात सगळंच भिन्न. त्याचे आपल्या मनावर होणारे परिणाम देखील भिन्न.
मी जेव्हा जेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या (वेगात असलेल्या) ambulance चा आवाज ऐकते, तेव्हा तेव्हा हे आणि
असलेच विचार मनात येत राहतात. प्रत्येक प्रकारच्या आवाजमागची पार्श्वभूमी, आजूबाजूच्या परिसरावर होणारा
परिणाम, ह्यात किती वेगळेपण असू शकते. Ambulance चा आवाज ऐकला की नकळत आत कुठेतरी हलल्या गत होतं. मनावर दुःखाचे एक सावट दाटून येते. एक अनामिक भिती मनाला घेरते, बापरे! काय असेल आतल्या पेशंट ची कंडिशन? फार सिरीयस असेल का? त्याच्या नातलगांची मनस्थिती कशी असेल? थोडी हुरहूर, थोडी अस्वस्थता-----
अग्निशमन दलाच्या गाडीचा आवाज ऐकला की तसेच काहीसे होते. कुठेतरी आग लागली आहे, हे निश्चित; पण
त्या आगीचे स्वरूप कितपत भयानक असेल? कुणाचा जीव तर----?
पोलिसांच्या गाडीचा, सायरन चा आवाज--- धडकी भरवणारा आवाज. कुठेतरी काहीतरी भयंकर घडले असेल.
दंगल? मारामारी? की मर्डर? राडा आणि मर्डर हे शब्दच मनाचा थरकाप उडवण्यास पुरेसे असतात.
रात्रीच्या वेळी जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज-- -- हा आवाज सगळ्यात त्रासदायक. रात्रीच्या निरव
शांततेत, बेसूर्या ,भयाण ओरडणार्या कुत्र्यांचा आवाज ऐकून प्रत्येकाला प्रचंड राग येत असणार.काही कुत्री तर
अक्षरशः राडल्यासारखी भुंकत असतात. एखाद्या अप्रिय घटनेची चाहूल असते, ती, असं म्हणतात. अशुभाचा संकेत म्हटल्यावर अजूनच नकोसा वाटतो तो आवाज.
हॉस्पिटल मध्ये पेशंट च्या किंचाळण्याचा, विव्हळण्या चा आवाज---जगात किती प्रकारची दुःख आहेत, किती
तऱ्हेतऱ्हेचे रोग आहेत आणि कोण मृत्यू शी कशी झुंज देतो आहे, हे पाहून मन कातर व्हायला होते.
आकाशात कडकडणार्या विजांचा आवाज, भूकंपचया धक्क्याचा आवाज, दोन वाहने एकमेकांशी भिडतात, तेव्हा
होणाऱ्या अपघाताचा आवाज, जल प्रलय होत असताना होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा, वादळात सुसाट वाहणाऱ्या
वाऱ्याचा, झाडा पानांचा आवाज---- हे सगळे आवाज मनात धडकी भरवणारे, अस्वस्थ करणारे, उद्विग्नता आणणारे, थोडक्यात नकारात्मक ऊर्जा पसरवणारे आवाज वाटतात. याउलट मंदिरातील घंटेचा मंजुळ नाद, एखाद्या सुंदर( सुंदर च असली पाहिजे असं काही नाही) ललनेच्या हातातील बंगड्यांच्या किणकिण असा गोड आवाज, संथ वाहणाऱ्या झऱ्यातील पाण्याचा आवाज, एखाद्या गायकाच्या गळ्यातून येणाऱ्या, एखाद्या वादकाच्या वाद्ययातून येणारा सुमधुर, लयबद्ध सुरांचा आवाज, शांत स्वरात भजन कीर्तन करणाऱ्या भक्ताचा आवाज-- - हे सगळे आवाज मनाला प्रसन्न करणारे, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे वाटतात.

ह्या आवाजात एक वेगळाच आवाज असतो, तृतीयपंथी ह्यांच्या टाळी वाजवण्याचा आवाज. अगदी भिन्न. असो.
पण विचार केला तर चक्रवायला होते. पहा ना, घरातल्या भांड्यांचा आवाज, भांडणाचा आवाज, तोही घरातला,
गल्लीतील, रस्त्यावरील, रेल्वे स्थानकवरील हमाल, विक्रेते, ह्यांचे आवाज, भाजी बाजारातील रस्त्यावर फिरणाऱ्या
भाजी विक्रेत्यांचा आवाज, चालताना होणारा पावलांचा आवाज, दारावरच्या बेल चा आवाज( फोन चया रिंग चे तर
विविध प्रकारचे टोन) , रस्त्यावरील वाहनांचा आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज, छपरावरून गळणार्या पावसाचा आवाज, गारांचा आवाज --- ---बापरे बाप! इतके सारे आवाजाचे प्रकार? आणि एका 'आवाज' ह्या शब्दावरून एक आख्खा लेख तयार होईल असे कधी वाटलेही नव्हते. पण आता थांबते. नाहीतर तुम्ही म्हणाल, काय ही बया! जराही आवाज न करता किती हे आवाज डोळ्यासमोर आणले.

ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक अजून वेगळाच आवाज नमूद करायचा राहिलाच. युद्धाला तोंड फुटल्यानंतर, युद्ध
भूमीवरचा तोफांचा, गोळीबाराचा आवाज, ज्याची आपल्या सारख्या सीमेपासून शेकडो योजने लांब असलेल्या
सामान्य जनतेला सुतराम कल्पना येत नाही. आपल्या दृष्टीने अपरिचित असलेला आवाज (आपण फक्त t v वर,
सिनेमात ऐकलेला असतो) सीमेलगतचया जनतेसाठी भयावह असू शकतो आणि सच्च्या सैनिकांसाठी
स्फुरणदायी.. - असो.

तेव्हा, थांबावं च म्हणते, आवाज न करता.
शेवटी जाता जाता एक गोष्ट फक्त नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे,'अंध' व्यक्तींसाठी आवाज ही फार मोठी
देणगी असते. जगाला परखण्याचे, संपर्क साधण्याचे ते एकमेव नसले तरी एक महत्वाचे माध्यम नक्कीच आहे.

- माणिक नेरकर.

Tuesday, October 1, 2019

नावात काय नसतं ?

काल मिक्सर चे भांडे दुरुस्त करायला म्हणून आमच्या नेहमीच्या स्टील च्या दुकानात ‘स्टील पॅलेस’मधे  गेले. मिक्सर त्याच्याकडूनच घेतले होते. त्याची एजन्सी   त्याच्याकडे असल्याने काही प्रॉब्लेम आला की तेथेच जावे लागते. एरवी सुद्धा मला त्या  दुकानात जायला फार आवडतं.  त्याच्याकडे एकतर चांगल्या क्वालिटी चे स्टील असते आणि दुसरं म्हणजे तेथे सगळी छान छान चकचकीत भांडी इतकी सुंदर शिस्तीत लावून  ठेवली असतात की बस्स, बघत राहावेसे वाटते. सुमारे ३० वर्षांपासून मी बघतेय, तेव्हासुद्धा अशीच छान लावून ठेवलेली चक चक चकाकणारी भांडी बघून खूप प्रसन्न वाटायचे. तेव्हा मी माझ्या मावशीकडे शिकायला राहत होती. त्यावेळेस मावशी नेहमी ह्याच दुकानातून भांडी घ्यायची. येथे थोडा भाव जास्त असायचा पण भांडे एकदम मजबूत, दणकट चांगल्या क्वालिटीचे असायचे. मावशीला टपऱ्या भांड्यांची फार चीड यायची. तिच्याकडे सगळी भांडी  कशी जाडजूड बुडाची. वाट्या, पेले, ताटं सुद्धा मोठाले. कोणाकडे छोट्या छोट्या वाट्या पहिल्या की  घरी आल्यावर हमखास तिचा शेरा असायचाच, “काय मेल्या नकट्या वाट्या! आडजीभ खाय अन पडजीभ वाट पाय!  वाटी कशी हवी, पाहूनच मन तृप्त झाले पाहिजे”. ते आठवलं की मनात येतं आत्ताच्या रिसेप्शन मधल्या स्वीट साठी असतात त्या पिटुकल्या प्लॅस्टिकच्या वाट्या बघून कायच म्हणाली असती ती! तर सांगायचे असे होते कि मिक्सर दुरुस्ती ला टाकला आणि नेहमी सारखी त्या शिस्तीत लावलेल्या भांड्यांवर नजर फिरवली तर मला ते छोटेसे उभट भांडे दिसले. खरं तर इतकी भांडी आहेत घरात, अर्ध्याहून अधिक तर माळावर ठेवली आहेत पण मला बरेच दिवसांपासून तसे साधारण २ ग्लास ताक बसेल असे उभट भांडे हवे होते. आता दोघेच असल्याने तेवढेसे ताक करायला नेहमीचे भांडे घेतले की दही अगदी बुडाशी राहून नीट घुसळल्या जात नाही म्हणून अगदी हवे तसे छोटेसे पण उभट भांडे दिसल्याने मी खुश होऊन लगेच घेतलेही ते भांडे! नाव वगैरे पण टाकले झकासपैकी अन घरी आल्यावर लगेच घासून बिसून उदघाटन सुद्धा केले उत्साहात. इतकी गम्मत वाटत होती स्वतःचीच!  मनात म्हटले सुद्धा की एवढे वय वाढले तरी नविन भांड्याचा आनंद अगदी तस्साच पूर्वीसारखा अन भांड्यावर नाव टाकायची हौस पण तश्शीच अजूनही. भांड्यांवरची ही नावे अजूनही कुणाकुणाच्या, कुठल्या कुठल्या आठवणी करून देतात न! स्वयंपाक घरात काम करतांना ही नावं दिसली की काय काय आठवतं!  

परवा असाच एक डबा  उडतांना नाव दिसले सौ. मरोडकर काकूंकडून चि. सौ. कां. मधुमतीस सप्रेम भेट. मरोडकर काकू वाचल्यावर अचानकच सगळं जुनं आठवायला लागलं. आमचा तो अंजनगावचा आलकरींचा वाडा, त्यातली ती १२-१३ बिऱ्हाडं, त्यातलचं  एक बिऱ्हाड आमचं. माझ्या लग्नात अख्खा वाडा आईच्या मदतीला कसा तत्पर होता ते आठवलं. तेव्हा काही आतासारखी पूर्ण कॉन्ट्रॅक्ट वगैरेची पद्धत नव्हती. सगळ्या शेजारणींनी अगदी निवडण टिपण, पापड कुरडया पासून सगळी मदत केलेली! त्यातल्याच एक ह्या मरोडकर काकू! झर्रकन सगळं डोळ्यासमोरून गेलं! त्या सगळ्या आठवणी फेर धरून नाचायला लागल्या. तसंच एकदा माळावरची भांडी काढतांना तो छोटासा स्टील चा चंबू दिसला. मी लहान असताना मला फार आवडायचा म्हणे! नंतर केव्हातरी माझा मुलगा लहान होता तेव्हा आईकडून त्याच्यासाठी म्हणून मी घेऊन आलेली. तो बघताच लेकाचा लहानपणीचा गोंडस गोबरा चेहरा आठवून भरून आले. मनात आलं किती भराभर मोठी होतात  मुलं! लक्षात सुद्धा येत नाही अन मग अचानकच एक दिवस प्रश्न पडतो, "आई ..आई!" म्हणत भोवती भोवती करणारा हाच का तो आपला लेक म्हणून? बघा, हा पिटुकला चंबू कुठल्या कुठे घेऊन गेला!  प्रत्येक भांड्याची अशीच वेगवेगळी कहाणी! माझ्या नणंदेने दिलेली अंजली ची स्टील ची चाळणी. काहीही चाळायला गेली की नणंदेची आठवण हमखास येणारच. दुसऱ्या एका चुलत नणंदेनी दिलेला कोथिंबीर ठेवायचा जाळीचा डबा. काढला की ती उभी राहते नजरेसमोर! एक गुंडीचा पोळ्यांचा डबा असाच एका मामीने दिलेला! साखरेचा मोठा पाच किलोचा डबा बाबांच्या शाळेतल्या एका शिक्षकांनी दिलेला. त्यांनी मला सुद्धा शिकवलेले. त्यामुळे डब्यावरचं नाव वाचलं की एखादा कठीण प्रश्न विचारून उत्तराच्या अपेक्षेने पूर्ण वर्गावर नजर फिरवणाऱ्या त्या शिक्षकांची छबी नजरेसमोर उभी राहते. त्यावेळेला कार्यप्रसंगी बहुतेक भांडी देण्याचीच प्रथा असायची. लग्नात कुणीकुणी दिलेली मोठी मोठी पातेली, डबे, ताटं अन आणखी काय काय! मुलांच्या बारशाला, वाढदिवसाला कुणी कुणी दिलेले छोटे छोटे डब्बे! आताशा तर ते एवढंसं काही ठेवायला छान उपयोगात येताहेत. आणि त्यावरचं नाव वाचलं की मग माझा फ्लॅशबॅक सुरु! म्हणून तर म्हणतेय की  "नावात काय नसतं?", बघायला गेलं तर नावात खूप काही असतं हो!  
           "बर्तन बर्तन पे लिखा है, 
               देनेवाले का नाम! 
            और हर नाम से जुडी 
               उन खूबसूरत यादों को सलाम!" 

सौ. मधुमती वऱ्हाडपांडे
अकोला