Wednesday, May 15, 2019

बापरे बापू

’लास्ट स्टेज.. लास्ट एकदम’
आम्ही घाबरुन- ’कुणाची?’
’आपले नाना ओ.. गंगाजल गंगाजल.. तुळशी.. घाला म्हटलं’
आम्ही -’कोणाला?’
’नानाच्या भावाला हो.. मुंबई मुंबई.. काय गर्दी ..जेमतेम भेट.. अ‍ॅ बापरे’
आम्ही अर्थ लावून घेतला. कोणतेतरी नाना शेवटचे श्वास घेत असून त्यांचा भाऊ मुंबईहून गाडीला भयंकर गर्दी असूनही कसाबसा पोचला आणि त्याची आणि नानांची भेट होताच नानांनी श्वास सोडला.
आम्ही असे अर्थ लावून घेत घेत या इसमाशी म्हणजे बापूंशी गेली अनेक वर्ष संवाद साधत आहोत. बापू घराजवळच राहतात. ते स्वत:वर फिदा असलेल्या जमातीतले आहेत. आयटीआय मध्ये शिक्षक होते, केव्हाच निवृत्त झाले आहेत. ’ड्रिल ड्रिल, कोपर्‍यात ए.. अस्सं, वायर वायर, अ‍ॅ बापरे’ असं करत त्यांनी कसं काय शिकवलं असेल आणि त्यातून विद्यार्थ्यांना काय कळलं असेल हे एक आम्हाला कोडंच आहे.
एकदा ते ओरडतच घरात आले.  ’हत्ती हत्ती ...पोसा.. पांढरा'
आम्ही गोंधळलेल्या अवस्थेत..'मुलांना काय.. नुसती चक्कर.. इंजिन.. इंजिन बंद. अ‍ॅ बापरे त्यापेक्षा भाड्याने.. भाड्याने मस्त..’
याचा अर्थ ’मुलगा कार घ्या म्हणतो आहे, त्याचे काय जाते, काम नसले तर कारचे इंजिन खराब होते म्हणून उगाच फिरवावी लागते. म्हणजे हे पांढरा हत्ती पोसणे आहे. त्यापेक्षा लागेल तेव्हा मस्तपैकी भाडयाने गाडी घेऊन फिरावे’ हुश्श.

बापू आता समाजसेवा करतात, म्हणजे असं त्यांना वाटतं. पत्नी निवृत्त शिक्षिका. साध्या, नीटनेटक्या. चारही मुलींची लग्नं आणि मुलाचा प्रेमविवाह झालेला. इकडे ही जोडी टुकीने राहते आहे.
बापू डाय करत नाहीत. ’वय वय ..तसंच मस्त.. डाय अ‍ॅलर्जी.. नस्ता ताप..अ‍ॅ बापरे’
त्यांच्या अंगावर भरघोस शुभ्र केस आहेत. कानातूनही डॊकावत असतात, तोंडात अधूनमधून तंबाखूचा बार असतो. सावळा चेहरा, खुरटी पांढरी दाढी, मध्यम बांधा. अंगावर पांढरट किंवा पिवळा बुशकोट, तपकिरी किंवा काळी पँट. तब्येत टकाटक कारण ’रोज फिरायला.. लांब.. फ्रेश फ्रेश दिवस.. तुम्ही दिसला नाही.. उशीर उशीर.. अ‍ॅ बापरे’

फिरणं झालं की चहा घेत त्यांचं पेपरवाचन असतं. ते फक्त स्थानिक राजकारणाच्या बातम्या वाचतात. तो त्यांचा ऑक्सीजन आहे. काहीच बातमी नसेल तर ते अस्वस्थ होतात की आता एवढया मोठया दिवसाचं करायचं काय. त्यांचा स्थानिक लाडका दलबदलू नेता ज्या पार्टीत, ती त्यांची पार्टी त्यामुळे त्यांचा ह.मु बदलत असतो. त्यांना स्वत:चे मत नाही, विचार नाही. बिनबुडाच्या गडूसारखे कधी ते घड्य़ाळाकडून, कधी इंजिनाकडून ,कधी धनुष्याकडून तर कधी पंजाकडून बोलतात. त्या नेत्याच्या वाढदिवसाला वृक्षारोपण, फळवाटप वगैरे करणारी जी मंडळी असते त्यात हे आघाडीवर असतात.
’पेशंट पेशंट, केळी.. सगळ्य़ांना केळी, सपरचंद काय महाग .. रुपया पडला म्हणे ..अ‍ॅ बापरे’
वास्तविक रुपया पडला म्हणजे नेमकं काय झालं हे पोटापुरती पुरेशी पेन्शन मिळवणार्‍या बापूंच्या गावी नसते. लोक म्हणतात ते आपणही म्हणायचे.
सामूहिक विवाह टाईप कार्यक्रम तर त्यांचा फेवरेट. त्याच्या आयोजन मिटींगला ते जातात. सोहळ्य़ाहून आल्यावर अशीच अगम्य वर्णनं करतात. त्यातून कुणीतरी भांडी, मंगळसूत्र आणि सफारी सूट मिळतो म्हणून कसं डबल लग्नाला उभे राहिले, यांनी त्यांना कसं शिताफीने पकडलं, मंत्री कसे लेट आले, प्रत्यक्ष जोड्या किती- दाखवल्या किती, वगैरे बहुमोल माहिती तुकड्यातुकड्यातून कळते.
’समाजसेवा.. या माध्यमातून.. आपलं काय. राहिले ४ ,६ वर्ष ...भजना पेक्षा कार्य कार्य.. काय? ..अ‍ॅ बापरे’
’बेटी बचाओ’ टाईप कार्यक्रम असेल तर ते भाषण वगैरे पण देतात. झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आणि इंदिरा गांधी या तिघींची नावे घेऊन झाली की
’आज या समाजात.. मुलं फारेन.. आयटी का फायटी.. अग्नीला पोचतो का..मग जवाई मुल्गाच दुसरा.. कुस्ती...पोलीस.. रनिंगमध्ये मेडल पोरीलाच. ती आपली ही जिंकली नं..कप कप.. शिकवा खूप.. अ‍ॅ बापरे’
त्यांना मेडलवाल्या पोरी, स्पर्धेचं नाव, क्रीडाप्रकार वगैरे लक्षात असणं अशक्यच. इंग्लीशशी तर ३६ चा आकडा. स्वत:च्या पोरींना मात्र यांनी जेमतेम बारावी आटोपून उजवलेलं. मुलींना साध्या शाळेत आणि मुलाला खास कॉन्व्हेंटला शिकवलेलं. वंशाचा दिवा म्हणून फक्त मुलासाठी डिंकाचे लाडू करणारं यांच घर. तरी पोरी सुस्थळी नांदत पुढे शिकल्या आणि बापूंची छाती फुगायला कारण झाल्या.
तर अशा सगळ्या इव्हेंटचे फोटो काढून घेऊन ते छापून आणणे, मग तो पेपर काखोटीला मारुन चार घरी तो फोटो दाखवणे आणि कृतकृत्य होणे हा त्यांचा एक छंद आहे. कुणी कौतुक केले की
’ख्या ख्या.. उगीच आपलं हो.. समाजाच्या माध्यमातून.. प्रेम प्रेम  ..लोकांच प्रेम इतकं...अ‍ॅ बापरे’.

आता इतके भरीव कार्य करणार्‍याच्या वाढदिवसाला चार लोक ’हारार्पण’ करायला येणारच. त्यादिवशी बापू गुळगुळीत दाढी करुन, करकरीत कुर्ता घालून लोडाला टेकून बसतात. एखाद दुसरा गडी बुके घेऊन येतोच कारण चहानास्ता भरपूर उपलब्ध असतो. बुके घेतानाचा फोटॊ महत्वाचा.
’घ्या खा खा.. निमित्त निमित्तमात्र.. हॅ हॅ..बुके कशाला कशाला.. मिठाई पण.. अ‍ॅ बापरे’
मुलामुलींनी त्यांची सत्तरी जोरदार केली. भरपूर पाहुणॆ, हॉल, रोषणाई. जेवणाआधी भाषणं. त्यांचा जन्म ऑगस्टमधला म्हणून एका मित्राने त्यांना थेट क्रांतीसूर्य हे महान बिरुदच बहाल करुन टाकलं. मोठा केक त्यावर ७० मेणबत्त्या आणि मोठी सुरी. बर्थडे सॉंग वाजू लागले. बापू नाचू लागले. नातवंड ओरडली ’केक केक’. बापूंनी करवतीसारखी सुरी दोन्ही हातात धरुन केक कापायला सुरुवात केली. ५,७ मेणबत्त्या फुंकेतो बिचार्‍यांना धाप लागली. मग बाकी काम इतरांनी केले. बापूंनी भाषण केले. एरवी ते काय बोलतात हे बहुतेकांना कळत नाही त्यात भरुन आलेले डोळे आणि मन, धाप लागल्याने वेगाने घेतलेला श्वास यामुळे ते काय बोलतायत ते अजिबातच कळेना. ’जीवनाची उणीव की जाणीव.. जीवन.. बास बास.. इतिकर्तता.. शंभर वर्ष.. नको नको..अ‍ॅ बापरे’ इतकच कळलं. 

कोणत्यातरी सरकारी योजनेच्या अंतर्गत घराशेजारच्या खोलीत २ शिवणयंत्रे ठेवून त्यांनी २ गरजू बायकांना कामाला लावले. पुढे त्या बायका कंटाळून सोडून गेल्या तरी त्या रिकाम्या खोलीत सगळया शासकीय जयंत्या मयंत्या साजरा झाल्याच्या बातम्या बापू बिनदिक्कत छापायला पाठवून देत. त्यात कोणी भाषणात काय म्हटले याचे अजब वर्णन असे. नातलग बायकांची नावे ते अमकीने प्रस्तावना केली, तमकीने आभार मानले म्हणत छापत त्यामुळे पेपरात नाव आल्याच्या आनंदापोटी कुणी आक्षेपही घेत नसे. या बातम्यांच्या बळावर त्यांनी एक दोन पुरस्कारदेखील पदरात पाडून घेतले.

इतके सगळे करुनही समाजात आपल्याला हवे तसे स्थान अद्याप मिळाले नाही. मोठॆ मंत्री संत्री आले की आपल्याला शेवटच्या रांगेत बसावे लागते याची बापूंना रुखरुख असावी. शेतकर्‍यांसाठी काही तरी केल्याशिवाय हे घडणार नाही या भावनेतून ते एखाद्या मधल्या फळीतल्या स्वघोषित नेत्याला पकडून ते लगतच्या खेड्यात जाऊन शेळीपालनावर अगम्य भाषेत भाषणे देऊ लागले. मग त्यांनी एक लेख लिहिला आणि तो कसा लिहिलाय हे पाहा म्हणाले. त्यात शेळीपालनाचे फायदे १) शेती व्यत्रिक्त भरपूर कमाई २) पैसा खेळतो ३) मुलीचे लग्न ४) दारात गाडी
असे लिहिले होते. नशीब लेखात ’अ‍ॅ बापरे’ नसते. शेळीपालनामुळे मुलीचे लग्न कसे जमेल असे विचारायचे नाही. बापूंचे लॉजिकच खतरनाक. तो लेख अर्थात सर्व पेपरनी नाकारला. बापू खट्टू झाले पण तोवर त्यांना ’बोंडअळी’वर भाषण देणारा एक जण भेटला. तो विषय अधिक चर्चेत असल्याने बापू त्याला चिकटले. ते आता त्या ’प्रकल्पा’त व्यस्त आहेत. ते ही जमले नाही तर कोणत्या ना कोणत्या निवडणुका असतातच. सहकारी बँकेच्या पॅनेल पासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुका त्यांना जीव रमवायला चालतात. मग ’कार्यकर्ता.. प्रचार.. वेळ.. वेळ कुठे.. अ‍ॅ बापरे’

आयुष्यात धड कोणतीच क्रिया न केल्याने क्रियापदं त्यांच्यावर रुसली असावीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून ती गायब असतात. असे असले तरी बापू मनाने सरळ आहेत. आयुष्यात कुणी दिशा न दिल्याने वेळ घालवायची साधनं शोधतायत. लोकेषणेत मन रमवतायत. एके काळी मुलींवर अन्याय केला असला तरी सुनेला मात्र लेकीसारखे वागवतात. कुणाचे भले केले नाही तरी कुणाचे कधी वाईट करत नाही. म्हणून त्यांच्या ’गाळलेल्या जागा’ भरत का होईना बापूंशी संबंध आणि संवाद टिकवून ठेवासा वाटतो.

Saturday, May 11, 2019

खेळ


बालपणीचा काळ सुखाचा!    ........खरच आमच्या लहानपणी शब्दशः अशीच परिस्थिती होती. ते दिवस हुंदडायचे बागडायचे खेळायचे होतेच आणि आम्ही त्याचा पुरेपुर वापर करुन घेत असु .मुळात शाळेत असताना नापास न होणे हे एकच ध्येय असल्याने आणि अव्वलात येण्याची हुशारी नसल्याने फारसा ताण कधी घेतलाच नाही. आजुबाजुला सर्वसाधारणपणे वातावरणही तसलच होतं .त्यामुळे पास होण्यातच हुशारी मोजली जायची सर्वसाधारण घरात. !......पण खेळाची आवड भरपूर !अगदी  लहानपणासुन म्हणजे दुसरीत असल्यापासुनच  घराजवळच  समर्थ क्रीडामंडळ होते तिथे सगळी लहानमोठीमुले अगदी ५ते२५वयोगटातली येत असत. त्यामुळेही असेल खेळाची आवड लागली.शिस्तीत तरिही खेळीमेळीने तिथे सगळ पार पडत असे.जसेकी,५वा.क्रिडांगणावर प्रथम प्रार्थना आणि नंतर राऊंड मारणे एकत्र वार्मिंगअप  करणे .अगदी लहानपणापासुनच  मलाही सेंटरमध्ये उभे राहुन व्यायाम घेण्याची सवय लागली.त्यानंत आपला जो गेमप्रकार असेल त्याचा त्याचा सराव करणे आणि शेवटी परत प्रार्थनेने विसर्जन! .............अशापद्धतीने लहानवयातच समुहात कसे रहावे,कसे वागावे, असे संस्कार नकळतच  झाले.  


       कुठल्याही खेळासाठी शारिरीक ताकद,लवचिकता,तत्काळ निर्णय क्षमता ,मेहनत आणि लक्षावर केंद्रीत होण अशा शारिरिक, मानसिक  क्षमतांची नितांत गरज असते. पण मैदानात उतरलो की,खेळ कधी खेळायला मिळेल याचीच उत्सुकता जास्त राहायची. पण आमचे सिनियर्स मात्र आम्हाला मैदानाच्या सभोवार बसवुन मोठे कसे खेळतात यांचे निरीक्षण करायला लावीत. अतिशय कंटाळा यायचा पण ताकीद मोडायची हिम्मत कुणात नसे. तसा basket ball game खेळायला आणि समजायलापण कठीणच. प्रमाद(foul)घडण्याची शक्यताच जास्त  त्याचमुळे त्यातील बारकावे लक्षात यावे म्हणुनही असेल बहुदा..............कुठलिही नवी गोष्ट शिकताना त्यातील skillआत्मसात करणं जास्त गरजेच असतं. जस स्वयंपाक सगळेच करतात पण पोळी कुणाची गोल,पातळ,नरम होते कशी टम्म फुगते त्यावरुन तिचा  सुगरणपणा कळतो तसेच बास्केट सगळेच टाकतील पण ती थ्रीस्टेपमध्ये टाकणार ,कां पास टू पासदेऊन टाकणार ,कां थ्री पॉईंट अंतरावरुन टाकणार ,कां झीरो पॉईंटवरुन टाकणार ,कां स्क्रीन शॉट टाकणार ,कां डॉज देऊन टाकणार. हेत्या वेळेसच्या परिस्थितीवर खेळाडूला ठरवाव लागतं ती क्षणाची क्रिया असते. अंगाबांध्याने बुटकी रोडखोड असुनही मला या खेळाची आवड लागली ती महाविद्यालयात गेल्यावर अकरावी पासुन .सिनियर्सच्या हाताखाली शिकण्याचे ते दिवस होते. विशिष्ट कोचींग वगैरे असला प्रकार नव्हताच . मैदानाची साफसफाई करणे पाणी मारणे मैदान आखणी करणे अशी सगळीच कामे   आम्ही मोठ्या हिरहिरीने करत असु. त्यात लहान -महान असा कुठलाही भेदभाव नसे .पडेल ते काम आनंदाने करणे बस!.......मला वाटत यातुनच  आपण घडत असतो .सगळ्यांशी जुळवुन घेण्याच तंत्रही शिकत गेलो. पाहीजे तिथे वाद ,हवा तिथे संवाद !हेही ओघाओघाने घडतच असे.  हळूहळू गेम सुधारत गेला तसतशी आणखी रुची वाढू लागली   आता 1st इयर पासुन होणार्या   university    matches  चे वेध  लागू लागले  नि लागले दणकून सरावाच्या मागे आमच्या इथे आम्ही मुलांसोबतही खेळायचो म्हणजे आपला stamina तपासला जायचा कुठे कमी पडतो ते कळायच आणि  स्टफनेस वाढायचा. कधीमधे  अम्पायरशीपपण करायला मिळायची .अम्पायरशीप करताना तर फारच बारीक नजरेने फाऊल दाखवण्याच कसब पणाला लागत असे.त्यात परत वादावादी भांडणही व्हायची पण ती खेळतानापुरतीच नंतर सगळ परत जैसे थे! आयुष्याची शिकवण अशीच मिळते नकळत!.आणि शेवटी फायनल इयरला असताना मी  university team ला select झाले .कलरकोट होल्डर होणार होते.  त्यासाठी लागणारा सराव अगदी अंगमेहनतीने चिकाटीने करावा लागे.

अमरावतीची हनुमानव्यायामशाळा म्हणजे क्रीडापंढरीच तेथील प्रत्येक खेळाचे ३/४आधुनिक पद्धतीचे मैदान मन मोहवुन टाकायचे. ज्यावेळेस basketballचे सगळीकडे लाकडी बोर्ड असायचे त्यावेळी १९८७काळात एक मैदान fiber bordचपण होतं तिथे खेळताना वेगळ टेक्निक आणि लाकडी बोर्डवर खेळताना वेगळ ं! आणि आंतर विद्यापिठीय सामने तर चक्क पहिल्यांदा जेव्हा मद्रासला झाले तिथे तर चक्क wooden groundआणि fibre bord होता.ज्याचा आम्हाला कधीही सराव नव्हता. आम्ही टारकोर्टवर खेळणारे खेळाडू, इथे ड्रीबलींग जरा जरी जोरात झालं तरी क्यारी फाऊल हटकून व्हायचा म्हणजे हळूवार ballवर प्रेशर देऊन ड्रीबलींग करावे लागे. तसेच शॉट टाकताना बोर्डसपोर्टने टाकला तर लाकडी बोर्डापेक्षा fiberबोर्डवर ballचा स्पर्श जोरात नको असायचा कारण त्या बोर्डवर तो फार उसळत असे अशावेळेस विदाऊट बोर्डसपोर्ट बास्केट करणेच जास्त सोयीच असायच.त्यासाठी परफेक्शन आणि ऊंची असण फार महत्त्वाच असायच  अशा वेगवेळ्या परिस्थितीशी वेगवेगळ्या चांगल्या टीमशी खेळताना जे अनुभव येत ते पण उपयोगी पडायचे पुढच्यावेळेसाठी,   आंतर विद्यापिठासाठी माझी निवड    मद्रास १९८७,१९८८वनस्थली विद्यापीठ(महिलाविद्या.)    राजस्थान आणि १९८९ आणंद! गुजराथ विद्यापीठ अशी तीन वर्ष सतत  Hat trick  झाली. आनंदाचे उल्हासाचेच दिवस होते ते. आजही काही अंशी जे बरेच गुण टिकून आहेत. त्याचा कुठेतरी ह्या संस्कारांचा परिणाम आहे हे नक्कीच !!! जसे कलाकाराला कला सादर करण्यासाठी स्टेज खुणावत असतो. तसेच आजही मैदान दिसले की मैदान मला खुणावत असतं !पण आता ते सगळं स्मृतीतच जपून ठेवलं आहे.

Friday, May 10, 2019

ये मुलाकात

"अरे भाई,शेहेरमे हो भी या नही? बहोत दिनोसे मुलाकात ही नही हुई। " किंवा " खूप दिवसांनी भेट होतेय आपली,नाही?" " अरेच्चा।इतक्यात आपली गाठ भेटच नाही" --------- अशा प्रकारचे संवाद नेहमीच कानावर पडत असतात.तर असा हा शब्द--- मुलाकात,भेट,गाठ--कधी तो खूप जवळचा वाटतो,कधी विरहाने ओथंबलेला वाटतो,तर कधी फक्त औपचारिक; पण  आपल्या महान गितकारांनी ह्याच शब्दावरून किती नी कशा सुरेख रचना केल्या आहेत नी त्या रचनांना मूर्त रूप देऊन त्यांचं सौंदर्य वाढवायचे काम  केलंय आपल्याच एक से बढकर एक संगीतकार  आणि गायकांनी. आणि  आपल्या सारख्या असंख्य रसिक श्रोत्याना परमोच्च आनंदाची प्राप्ती करून दिली  आहे. 
 बघूया तर-----
" आज उनसे पेहेली मुलाकात होगी 
फिर आमने सामने बात होगी---- " सिनेमाचा रुबाबदार नायक घोड्यावर बसून ऐटीत घोडा दामटवत  आपल्या भावी वधूला भेटण्यासाठी निघाला आहे. वाटेतील बहारदार वातावरण आणि तितकेच प्रसन्न पण संभ्रमित मन. पहिली वहिली भेट-- कशी होईल? "ती" कशी असेल? "अन देखा,अन जा ना  सा मुखडा कैसा होगा, ना जाने वो आ
चांद सा तुकडा कैसा होगा---" उत्सुकता आणि साशंकतेने भरलेल्या मनाने पहिल्या भेटीसाठी आतुरलेला  प्रियकर गितकाराने किती छान रंगवला आहे? (पराय या धन- किशोर कुमार)
    "राह मे उनसे मुलाकात हो गयी
जिसे डरते थे,वही बात हो गयी ----" (विजय पथ- कुमार सानू,अलका yagnik)
 प्रियकर आणि प्रेयसीच्या भेटीचा क्षण.  भेट व्हावी असे तर वाटतेच, पण त्याच बरोबर,ह्या भेटीतून काय निष्पन्न होईल,ह्याविषयी अंधुकशी धाक धुकही वाटत रहाते. प्रेमात एक पाऊल पुढे तर टाकायचे  आहे,पण एक  अनामिक भीतीही आहे मनात,समाजाची.
  "ये मुलाकात  इक  बहा ना   है,प्यार का सिलसिला पुराना है ---"
(खानदान- लता) 
ही प्रेयसी जरा जास्तच धीट आणि स्वतःच्या निर्णया शी ठाम असलेली दाखवली आहे. "भेट" हे तर एक निमित्त आहे,प्रेमात पडण्याची परंपरा तर फार पूर्वीपासून चालत आलेली आहे,अगदी पाण वठ्यावरील भांडणापासून. ,त्यामुळे तिच्या मनात ना काही शंका आहे,ना कसली भीती.प्रेमाच्या नी प्रियकराच्या भेटी बाबत तरी ती बेधडक आहे.😃
 " रिमझिम के तराने लेके आई बरसात
याद आई किसिसे वो पेहेली मुलाकात---" ( काला बाजार- गीता दत्त, रफी) ,
अहाहा: संगीतकार  S. D. बर्मन नी काय सुरेल संगीत दिलंय.👌👌प्रेमात पडल्या नंतरची पहिली भेट,तीही मस्त,धुंद,रोमँटिक पावसाळी वातावरणात? ☂💦  क्या बात है। प्रेमी जंनसाठी आणि गीतकार,कवी ह्या मंडळींसाठी पावसाचा रंग फक्त सुंदर च असू    शकतो. रिमझिम पडणारा पाऊस,हलक्या  बरर्सनाऱ्या सरी--- विरही जिवा ना नेहमीच साद घालत असतात.
हे गाणं म्हणजे अबोल,हळुवार प्रीतीचे एक सुरेख ,मनमोहक असे चित्रं च भासते.

'ये दुनिया वाले  पुछेंगे, मुलाकात हुई, क्या बात हुई,ये बात किसीसे ना केहेना----"
  जिच्या भेटीची तीव्र इच्छा मनात आहे, ती अत्यंत प्रिय व्यक्ती भेटल्यानंतर  एक ख़ुशी आहे,पण त्याचबरोबर हजारो शंकाही आहेत मनात,लोकांच्या प्रश्नांना काय अन कसे सामोरे जायचे? प्रियकर प्रेयसीला समजावतो आहे,"-हे प्रिये,तुझे डोळे फार बोलके आहेत ग. ते सगळं काही सांगून जातात. तू  तुझ्या डोळ्यातील  भावा वरून अजिबात कळू देऊ नकोस की तू माझ्या प्रेमात आहेस. तुम लोगोसे ये ना केहेना,सावरीया से लागे नयना;---" प्रेयसी काही कमी नाहीये. ती त्याच्याच शब्दात त्याला समजावते, "  मै तो ये प्यार छुपा लुंगी, तुम कैसे दिलको संभालोगे----" तुझ्या मनात माझी जी प्रतिमा कोरली गेलीये,तिला जगासमोर आणायची घाई तुला देखील झालीच आसेल. तेव्हा चुकूनही असलं काही करू नकोस,जेणेकरून माझी बदनामी होईल-----"  खरंच,  मनातले भाव गीताच्या रूपाने क्वचितच कुणी मांडू शकेल. 
   
  " लग जा गले--- शा यद  फिर इस जनम में मुलाकात हो ना हो----" लता दीदींनी गायिलेले हे गाणे,पूर्ण आर्तता,व्याकुळता,
दर्शवणारे,कानाला अतिशय सुमधुर भासणारे गीत.  "छोटीसी मुलाकात प्यार बन गयी----" ह्या गाण्यातून खेळकर ,नटखट भाव प्रकट होतात.  अशीच सुरेल गाणी मराठीतही ऐकायला मिळतात. बघूया----
       "भेट तुझी माझी स्मरते,अजून त्या दिसाची----" कुसुमाग्रज ह्यांचं गीत,यशवंत देव ह्यांचं संगीत आणि अरुण दाते ह्यांचा भावपूर्ण स्वर--- हा प्रियकरही धुंद अशा  पावसातील आपल्या प्रेयसीच्या भेटीचे स्मरण करून व्याकुळ होतोय.  वादळ? तेही,धुंद? रात्रं? तीही पावसाची? ,कल्पना तरी पहा ना. एखादा डिटेक्टिव्ह लेखक ह्या वरून एखादी सस्पेन्स स्टोरी लिहू शकेल😳😱 पण दोन प्रेमी जीव😍😘 रम्य कल्पनेतच रममाण होतील.😊
"जाईन विचारीत रानफुला--- भेटेल तिथे ग  सजण मला--" शांता बाईंची अतिशय सुंदर रचना,किशोरी आमोणकर नी त्यात जीव ओतलेला---  राना वनातून,फुलफुलातून प्रेयसी  आपल्या प्रियकराला शोधत निघाली आहे . रस्त्यात ज्या ज्या ओळखीच्या खुणा आहेत, त्या तिला तिच्या साजणा पर्यंत नक्की पोचवतील ही खात्री देखील आहेच. भग्न शिवालय, निर्जन परिसर, पळस फुलांचे दाट बन, जंगलात  हर्षाने नाचणारा मोर आणि नंतर निळ्या ढगातून बरसणारे पाणी,  हे सगळं तिला तिच्या  जिवलगा पर्यंत घेऊन जाणार आहेत.😘 हाऊ स्वीट ना?😊  
" भेटी लागे जिवा---लागली ती आस,पाहे रात्रं दिवस,वाट तुझी---" संत तुकाराम ह्यांचा  लता दीदींनी गायिलेल्या हया अभंगात एका निसन्ग, निस्वार्थ भक्ताची,परमेश्वराच्या भेटीसाठी चाललेली तळमळ दिसून येते. "त्याच्या" भेटीसाठी मन व्याकुळ झालं आहे,दुसरं तिसरं काहीही सुचत नाहीये,त्या शिवाय. विठ्ठलाच्या भेटीची ओढ, पराकोटीची श्रद्धा, निर्मळ भक्तीचा ध्यास--- जिथे सगुण आणि निर्गुण  ह्यातील भेद,अंतर कमी होते,असे आत्मा आणि परमात्म्याचे मीलन घडवणारी भेट,त्या भेटीची आस---  खरोखर अंतर्मनाला भिडणारी ही रचना--- अशी किती उदाहरणे द्यावीत? ,  हा खरोखर एक न संपणारा प्रवास आहे,जो अनंत काळ पर्यंत सुरूच असणार आहे. आणि ह्या सुंदर प्रवासा चे आपण  ( सध्या तरी) साक्षीदार आहोत,हे आपले भाग्यच नव्हे का? 
मुलाकातो का दौर तो चलताही रहेगा लेकिन.."आजकी मुलाकात बस इतनी..."






Monday, May 6, 2019

महाराणी ताराबाई

( चार एक वर्षांपूर्वी मराठा सेवा संघाच्या नवरात्र व्याख्यानमालेत मला वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. विषय होता,"महाराणी ताराबाई". त्यावेळी बराच अभ्यास करून मी काही माहिती संकलन केली होती. ती माहिती आणि त्यावरून माझ्या नोंदी-मतं असं एक व्याख्यान तयार झालं होतं. या भाषणाच्या नोटस् परवा अचानक सापडल्यात. तेंव्हा ते तुम्हा सर्वांसमोर लेखरूपात मांडावं, असं मला वाटलं नि यावेळी मी ब्लाॅगसाठी हाच विषय निवडला. वाचा नि जाणून घ्या इतिहासाची ही काही पानं...........)

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की शिवाजी महाराजांनी मराठी राज्य स्थापना सतराव्या शतकात केली. प्रमुख चार शत्रू होते,मोगल-आदिलशहा-सिद्धी-पोर्तुगीज या सर्वांचा बिमोड करत हिंदूंच्या सार्वभौम राज्याची  स्थापना त्यांनी केली. 1674 चा राज्याभिषेक सोहळा आणि 1680 मधला महाराजांचा मृत्यू... हा सर्व घटनाक्रम आम्ही आजवर असंख्य वेळा ऐकला आणि मालिकांमध्ये पाहिला आहे. 
त्यानंतरची औरंगजेबाच्या दक्षिण प्रदेशांमध्ये दाखल होण्याची हकीकत आपल्याला माहित आहे. त्याच्याशी संभाजी महाराजांनी दिलेल्या झुंजीची आणि नऊ वर्षाच्या संघर्षानंतर 1689 यावर्षी पकडल्या जाण्याची व हाल हाल होऊन मारल्या गेल्याची तसंच येसूबाई आणि शंभू पुत्र शाहू शहेनशहाच्या कैदेत असण्याची वर्णनं अंगावर शहारे येत आपण ऐकली आहेत. केवळ  मराठाच नव्हे तर इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला हे सांगताना, ऐकताना, पहाताना एकीकडे अभिमान वाटतो तर दुसरीकडे दुःखाने काळीज पिळवटुन जातं. इथवरच्या घटना आपल्याला तोंडपाठ आहेत. यानंतरचा इतिहास मात्र फारसा माहित नाही. तो माहित असणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी असली तरी अगदीच  नाही असंही नाही.  1689 नंतर काय झालं? तर भोसल्यांच्या घरात 'पालथा जन्मलेले' आणि 'पातशाही पालथी करेल' अशी ज्यांच्याबद्दल अपेक्षा व्यक्त केली गेली ते राजाराम आणि त्यांच्या तीन राण्या मागे उरल्या. 1689 ते 1700 पर्यंत अकरा वर्षाचा काळ राजारामांनी मोगलांशी लढा दिला. पण सतत धावपळ त्यांना सोसली नाही. त्यांची मुळातली नाजूक प्रकृती अधिक खालावली आणि 2 मार्च 1700 मध्ये त्यांचे निधन झाले. ही वार्ता कळताच मराठीशाही मध्ये शोककळा पसरली तर मुघलशाही मध्ये आनंदाचे उधाण आले. ज्या मराठी राज्यावर अधिराज्य गाजवण्याचे स्वप्न घेऊन औरंगजेब दक्षिणेत उतरला होता, ते स्वप्न आता  साकार होणार होतं. कारण आता मागे उरल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या  असहाय्य विधवा सुना आणि नकळत्या वयातील नातू! सेना सरदार होते...पण निर्नायकी! नेत्या शिवाय भांबावलेले ते शूर वीर काय करणार? जास्तीतजास्त एखादे वर्ष लढू शकतील आणि मग विजय मिळवून आपण परत आपल्या राजधानीला जाणार...या मनोराज्यात तो दंग झाला.

हाय रे किस्मत! मराठे कोणत्या मुशीतून आले आहेत, याचा त्याला अंदाज आला नाही. औरंगजेब याच मातीत मिसळला पण त्याला मराठ्यांवर विजय मिळविता आला नाही. कोणताही पुरुष नेता नसतानाही हे घडले होते. ते कसे? 1707 यावर्षी औरंगजेबाचे निधन झाले. त्याची आकांक्षा, लालसा, इच्छा सर्व धुळीला मिळविणारं व्यक्तिमत्व कोणतं होतं? ती होती एक स्त्री! साधीसुधी नव्हे मुत्सद्दी कणखर आणि शौर्य शालिनी! अशी ही स्त्री म्हणजे शिवरायांची सून आणि राजारामांची पत्नी ताराराणी! फक्त कोणाची सून, मुलगी, पत्नी, माता, आजी एवढीच तिची ओळख आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधायला मुळातून तिचं चरित्र आपल्याला वाचावं लागतं. She was a clever, intelligent women & had obtained reputation असं तिचं वर्णन तारीख-ए- दिलकुशा या फारसी पुस्तकात भीमसेन सक्सेना यांनी लिहिलं आहे.  
"ताराबाई बुद्धिमान व शहाणी सैन्याची व्यवस्था व राज्यकारभार याबाबत मोठा लौकिक" अशी मोगली इतिहासकार काफीखान यांनी लिहिलेली नोंद आहे.
 "दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी 
ताराबाई राम राणी | भद्रकाली कोपली
 राम राणी भद्रकाली | रणरंगी क्रुद्ध झाली 
प्रलयाची वेळ आली | मुगल हो सांभाळा"
.... असे कवींद्र गोविंद यांनी कवन केले आहे. तर परशुराम चरित्र काव्य यामध्ये,
"ताराबाई धैर्य पुरुषा शूरत्व आणि बळे घेओनी नृप राम स्वामी सह तेजे प्राप्त झाली दळे"
 असे तिचे वर्णन 'परशुरामांची चरित्र काव्यात आहे.

  ही ताराराणी तळबीड, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील देशमुख हंसाजी मोहिते यांची कन्या! हंसाजी पराक्रमी. ते शिवाजींचे सेनापती होते. चिपळूणच्या युद्धात त्यांनी पराक्रम गाजविल्यामुळे 'हंबीरराव' ही त्यांना पदवी मिळाली होती. ते सोयराराणी साहेबांचे भाऊ. त्यांना शिवराज्याभिषेकानंतर  8 महिन्यानी एक कन्या झाली. नाव ठेवलं, सीता! कदाचित पुढचा  वनवास हासुद्धा सिते प्रमाणेच तिच्या नशिबात असावा. 'कॅरेक्टर इज द डेस्टिनी'.... माणसाचा स्वभाव हीच त्याची नियती! त्याच्या दुःखाचे ती कारण असते, असं म्हटल्या जातं. सोयराबाई आणि संभाजी महाराज यांच्यात सख्या नव्हतं. पण संभाजी आणि हंबीर रावांमध्ये मात्र जवळीकता होती. महाराजांच्या मृत्यूनंतरच्या वेगवान घडामोडीत हंबीररावांनी संभाजींना साथ दिली. 
सोयरा पुत्र राजारामांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत  जानकीबाई बरोबर विवाह झाला होता. सोयराबाईंच्या मृत्यूनंतर संभाजींनी राजारामांचा विवाह मोहिते कन्येशी ठरवला. ही मुलगी लहानपणापासून तडफदार नि लढाऊ बाण्याची होती. घोड्यावर बसणे. दांडपट्टा चालवणे, ही तिची आवड होती. सोबत मुळाक्षरांची ओळख सुद्धा करून घेणे सुरू होतं. लग्न झालं तेव्हा आठ वर्षाची सीता आणि तेरा वर्षाचे राजाराम होते. लग्न झाल्यावर ती सीता ची तारा- ताराची ताराऊ-ताराबाई- ताराराणी झाली. तसंच राजकारणाच्या  पटावरील चालींचा भाग म्हणून घाटगे घराण्यातील राजस बाई ताराबाईंची सवत म्हणून भोसले घराण्यात आली. (जी पुढे ताराबाईंच्या वनवासाला कारणीभूत ठरली) हे दोन्ही विवाह संभाजी महाराजांच्या पुढाकाराने झालेत. त्यानंतरच्या आयुष्यात राजारामांनी अंबिका बाईंशी विवाह केला. शिवाय त्यांच्या अनेक नाटक शाळा होत्या. त्यातली सगुणाबाई राजारामांना अत्यंत प्रिय अशी नाटक शाळा होती. 

 संभाजीमहाराजांच्या  नजर कैदेत रायगडावर पाच सहा वर्ष राहावे लागले तेव्हा ताराराणीने कळत नकळत त्यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरविले होते. युद्ध कौशल्य आणि त्याचं तंत्र तिने जाणून घेतलं होतं. ताराराणीचं वय नकळतं! पण येसूबाईंचा सहवास आणि संभाजींची तडफ यातून ही हुशार मुलगी खूप काही शिकत गेली. तिने आपली आत्या, सोयराराणी हिचे हाल बघितले होते... तेही नकळत तिच्या मनावर परिणाम करून गेले. या सगळ्याचा तिच्या मनावर प्रभाव पडला आणि पुढील आयुष्यावर देखील त्याचा परिणाम झाला. संभाजी महाराज मोगलांच्या कैदेत सापडले रायगडाला वेढा पडला. सर्वांना प्रतापगडावर पाठविण्याचा निर्णय झाला. येसूबाईंनी राजारामांचा मंचकारोहण विधी करून घेतला. प्रतापगड-पन्हाळा-विशाळगड-वेंगुर्ला बंदर- खुष्की या मार्गाने  बिदनूर आणि शेवटी जिंजी असा दगदगीचा प्रवास झाला. इकडे येसूबाई आणि शंभू पुत्र शाहू मोगलांच्या अटकेत सापडले.  संभाजींच्या मृत्यूनंतर  राजाराम मंचकारोहण विधीद्वारे राज्याचे  प्रमुख होते आणि राज मंडळ सुद्धा अस्तित्वात होते. राजाराम जिंजीत...! कुटुंबकबिला मात्र दक्षिणेत होता. तेव्हा राजमंडळाची प्रमुख म्हणून ताराबाई रामचंद्र अमात्य यांच्यासह जातीने सर्व कारभार पहात होती. तिची जरब पूर्ण कारभारावर होती. "शिवरायांची सून खरी" अशी तिच्याबद्दल नोंद तत्कालीन कागदपत्रांमध्ये आहे. जिंजीच्या वास्तव्यात ताराबाईंना मुलगा झाला. शिवाजी त्याचे नाव! अंबिकाबाईना मुलगी झाली. मात्र ती लगेच मरण पावली. त्याआधी सगुणाबाईना कर्ण नावाचा मुलगा झाला.  तो राजारामांचा अत्यंत लाडका होता. त्यामुळे मुळातच कणखर असणारी तारा अधिकच करडी झाली.  तिने आपलं सर्व लक्ष मुत्सद्देगिरी आणि राजकारण यावरच केंद्रित केलं होतं. दरम्यान जिंजीला मोगली सैन्याचा वेढा पडला. राजाराम निसटले पण तीनही बायका, दोन मुलं, दोन मुली, अनेक नाटक शाळा, कर्मचारी अशी चार हजार माणसं मोगलांच्या ताब्यात सापडले. पुढे बऱ्याच वाटाघाटी होऊन राजस्त्रियांची सुटका करण्यात आली. (याठिकाणी मनात काही प्रश्न उभे राहतात इतिहासात फक्त घटनांची नोंद असते कार्यकारण भाव नसतो तो तज्ञ अभ्यासक वाचक लावत असतात. असो.)

 काही काळानंतर राजसबाईंना मुलगा झाला. ज्याचे नाव संभाजी ठेवण्यात आले. जो पुढे ताराबाईंच्या दुःखाचे कारण झाला. या काळातही ताराबाई न्यायनिवाड्याचे काम करत होत्या. अगदी मातब्बर सरदारांमधला तंटाही त्यांनी सामोपचाराने निकालात काढण्याची नोंद कागदोपत्री आहे. 'ताराबाईंनी पतीच्या हयातीतच आपला पौरुषी कार्योत्साह आणि बुद्धिमत्ता निदर्शनास आणून दिली होती', असे इतिहास तज्ञ जदुनाथ सरकार यांनी लिहिले आहे. त्याच काळात तिने राज्यकारभाराची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्यास प्रारंभ केला.
 अखेर दगदग सहन न होऊन राजाराम महाराजांचे निधन झाले. मरेपर्यंत आपण मंचकारोहणाद्वारे गादीवर आल्याची त्यांना जाणीव होती. मरतानाही त्यांच्या मनात शाहूच्या सुटकेचाच विचार होता.  अंबिकाबाई सती गेली. त्यावेळी ताराबाई पंचवीस वर्षाची आणि राजसबाई तेवीस वर्षाची  होती. आता या असहाय्य विधवा स्त्रिया काय करणार?  या विचाराने औरंगजेब खूप आनंदात होता. पण मराठ्यांचे पाणी त्याला माहीत नव्हते. मरेंगे पर हटेग नही... असे ते मरहट्टे होते. स्वातंत्र्याचा स्फुलींग ज्यांनी तनामनात चेतविला त्या शिवरायांची सून, ताराराणी दक्षिणेच्या नभांगणातील दैदिप्यमान असा तारा... अस्तित्वात होता, हे त्यानं लक्षात घेतलं नव्हतं. हा होता 1675 ते 1700 पर्यंतचा इतिहास! हा पहिला कालखंड... ज्यामध्ये ताराराणीच्या अस्तित्वाची चुणूक अधून मधून जाणवत होती. त्यानंतरचा 1700 ते 1707  हा दुसरा कालखंड... त्यात फक्त आणि फक्त ताराराणीचा प्रभाव इतिहासावर आहे. असं काय केलं तिनं?

 राजारामांच्या मृत्यूनंतर विखुरलेल्या मराठ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न तिने केले. कर्णाला राजा करण्याचे घाटत असताना आक्रस्ताळेपणा न करता पण आडून आडून निष्ठावान सरदारांची चाचपणी सुरू केली. पण कर्ण तीन आठवड्यातच देवीची लागण होऊन मरण पावला. इतरांची तयारी नसताना काहीजणांना दुखावून सुद्धा तिने शिवाजीची मुंज करून घेतली आणि राज्यभिषेक करविला. राजकारण आणि युद्धक्षेत्र दोन्हीवर बाईची जबरदस्त पकड होती. सैन्याचे डावपेच, नेतृत्व आखणीचे गुण इतके जबरदस्त होते की बादशाही सैन्याची सुद्धा दाणादाण उडाली होती.  इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी तिचे वर्णन करताना लिहिले आहे की "मोगल सैन्याला शौर्य दाखविण्याची संधी नाही, त्यांना लढण्याला अवसर राहिला नाही, टिकून राहणे त्यांच्यासाठी शक्य नाही आणि त्यांना पळण्याची सुद्धा शक्ती नाही" असं काय केलं ताराराणीने? तर शक्य तितका  किल्ला लढवायचा  मनुष्यहानी टाळायची शिबंदी संपत आली की वाटाघाटी करून शत्रूकडून भरपूर पैसे घेऊनच किल्ला शत्रूच्या स्वाधीन करायचा. किल्ला जिंकल्याचा आनंद शत्रूला मिळू द्यायचा नाही आणि मोगलांची पाठ वळताच पुन्हा किल्ला काबीज करायचा. असे शिस्तबद्ध नियोजित संघटन कौशल्य हे या राणीचं वैशिष्ट्य होतं. खानदेश- वऱ्हाड- माळवा- गुजरात- तेलंगणा- तामिळनाडू- कर्नाटक सर्वत्र धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, हिंदुराव घोरपडे, कृष्णा सावंत, निंबाळकर इत्यादी सरदार धुमाकूळ माजवत होते. त्यांचा बंदोबस्त करायला मोगली सैन्य जाईपर्यंत ते दुसऱ्या भागात निघून गेलेले असत. सारावसुली, शत्रू प्रदेशात लूट हे सुरू होतं. एकाच वेळी उत्तर- दक्षिण आणि पश्चिम भागात लढणं मोगली सैन्याला जड जात होतं. त्यात या प्रदेशातला प्रतिकूल निसर्ग... यामुळे बादशहाचे हजारो सैनिक गारद झाले. शिवाय लाखो रुपयांची संपत्ती नष्ट होऊ लागली. आपली उभी हयात राजकारण मुत्सद्देगिरी नी शह-काटशह करण्यात घालवलेला मातब्बर मुरब्बी बादशहा शहेनशहा आणि  अवघी पंचविशीच्या उंबरठ्यावरील राजकीय  रणांगणात नुकताच प्रवेश केलेली वीरांगणा यांचा तो सामना होता.
 ताराराणी  हिमतीची खरीच!  एकीकडे आक्रमण तर दुसरीकडे बचावात्मक धोरण अवलंबून मुलासाठी सप्तहजारी मनसब आणि देशमुखी  हक्क मागून,  त्या बदल्यात सात किल्ले  देण्याची तयारी... अशा वाटाघाटी तिने सुरू ठेवल्या. औरंगजेब मात्र बिनशर्त माफीचा  तगादा  लावून बसला होता. 
ताराराणीने या स्वातंत्र्यलढ्यात आपला जीव ओतला. प्रत्यक्ष रणांगणावर, लष्करी तळावर, एका किल्ल्यावरुन दुसऱ्या किल्ल्यावर ऊन- वारा- पाऊस कशाचीही तमा न बाळगता  ही राणी तळपत होती.  सैन्याच्या व्यथा जाणून घेत होती. आपल्या अधिकाऱ्यांच्या शौर्या बद्दल शाबासकी देत होती. या सगळ्या काळात बहुतेक वेळा पन्हाळा हेच तिचं आश्रयस्थान होतं. या पन्हाळ्याचे तिच्या आयुष्यात विशेष स्थान होते. या कर्तबगार राणीच्या शौर्याचे वर्णन इटालियन प्रवासी निकोल्लो मनुची यानेही केले आहे. केवळ औरंगजेबाच्या हट्टामुळे होणारे मोगलांचे नुकसान आणि ताराराणी या मराठी राणीचे संघटन चातुर्य याच्या नोंदी मनुचीने केल्या आहेत. 1707मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. मोहम्मद आझम-शाह-आलम गादीवर बसला. दिल्ली कडे जाता जाता मात्र त्यानं मराठ्यांमध्ये दुफळीचं बीज टाकलं. इथून सुरू होतो ताराराणीचा तिसरा कालखंड...! 1707 ते 1761  म्हणजे तिच्या मृत्यूपर्यंत...

हा दैदिप्यमान तारा हळूहळू कसा निस्तेज होत गेला...तो घटनाक्रम कोणत्याही इतिहास प्रेमीसाठी  वेदनादायी आहे. अंतर्मुख करणारा आहे. शाहआलम यांनी संभाजी पुत्र, शाहू यांची सुटका केली आणि मोगलांचे मांडलिक म्हणून त्यांना मराठी राज्यात परत पाठवले. (मनात प्रश्न उभा राहतो की हे औरंगजेबाला का सुचले नसेल पण पुन्हा तेच इतिहासात नोंदी आहेत कारणं नाहीत) मोठ्या निकराने लढा देऊन राखलेलं राज्य असं सहजासहजी दुसऱ्याला देणार कसं? 'राखील तो चाखिल' या न्यायाने ते राजारामांच्या वारसांकडे असावं, ही ताराबाईंची भूमिका! तर दुसरीकडे 'थोरल्यांचा हक्क' ही परंपरागत मनोवृत्ती! (यामुळेच तर राजारामांनी सुद्धा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला नव्हता.) यामध्ये अवघे  मराठे ओढले जाऊ लागले. धनाजी जाधवांसारखे पराक्रमी सरदार तटस्थ राहू इच्छित होते. तर खंडेराव दाभाडे यांच्यासारखे शूरवीर ताराबाईंच्या बाजूने उभे राहिले. भरीस भर हा शंभू पुत्र नाहीच, तो तोतया आहे... अशी आवई ताराबाईंनी उठवून दिली. सर्वत्र संशयाचं गोंधळाचं वातावरण होतं. दोन स्वामींच्या  निष्ठेत घुसमटलेल्या 'शंकर नारायण' या सचिवांनी तर हिरकणी खाऊन आत्महत्या केली. शाहूंनी त्याच्या मुलाला नारोशंकरला पुढे सचिव म्हणून नेमले. तोरणा- राजगड- रोहिडा- चंदनवंदन- पावनगड -वसंत गड हे किल्ले हस्तगत करत, शाहूंनी आपला अंमल बसविला. स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. तर इकडे ताराबाईंनी पन्हाळ्यावर स्वतंत्र गादी निर्माण केली. तेच कोल्हापूर संस्थान! सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणाहून कारभार चालत होता. त्यातच अचानक राजसबाई आणि संभाजी यांनी ताराबाई आणि पुत्र शिवाजी याला कैद केली व आपली राजवट सुरू केली. (हे कसे घडले हे एक गूढच आहे पण ते घडले) त्यातच शिवाजी देवी लागण होऊन मृत्यू पावला. सून भवानी बाईला मुलगा झाला. राजाराम त्याचे नाव! त्याला दगाफटका होऊ नये म्हणून बाईंनी त्याला कोकणात पाठवला आणि तो मेला म्हणून  सर्वत्र सांगितले.  संभाजी आणि शाहू यांच्या मधील लढाईनंतर ताराबाईंची मुक्तता झाली. आता त्या साताऱ्याला राहू लागल्या. शाहू आजारी पडले. त्यांना मूलबाळ नाही म्हणून दत्तकाचा शोध सुरू झाला. यावेळी बाईंनी आपला नातू राजाराम याला पुढे केले. शाहू पत्नी, सकवारबाई यासाठी तयार नव्हती. शाहूच्या मृत्यूनंतर तीने अधिक काही अडथळा आणू नये म्हणून तिला सती जाण्यास भाग पाडले. "सकवार राहिल्यास राज्याचा डोहणा करेल, राज्य बुडवील. सकवारबाई साहेबास सती घालवावी न जातील तर बळे न्यावी" अशा ताराबाईंच्या हस्ताक्षरातील नोंदी आहेत.

 राजाराम गादीवर आले पण अनुभवी ताराबाईंच्या सल्ल्याने जाण्याऐवजी पेशव्यांच्या आहारी गेले. ताराराणींनी अखेर त्यांना नजर कैदेत ठेवले. ताराबाई आणि पेशव्यांमधला संघर्ष वाढता राहिला. ताराराणींना उमाबाई आणि यशवंतराव दाभाडे येऊन मिळाले. निजामाची सुद्धा मदत घेण्याचे प्रयत्न झाले. रामराजे हे आपल्या वंशाचे नाहीत असे त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. कोल्हापूरच्या संभाजींना गादीवर बसवा, असेही त्या म्हणू लागल्या. पुढे पेशव्यांच्यात आणि त्यांच्यात समेट झाला. तरी ताराबाईंच्या मनातील त्यांच्याबद्दलचा राग गेला नव्हता आणि छत्रपतींच्या घराण्यातील या धाडसी स्त्री बरोबर उघड शत्रुत्व पेशव्यांना  पेलवण्या सारखे नव्हते. या सगळ्या घडामोडींमध्येही सामान्य जनतेच्या गरजांकडे ताराराणींचे काटेकोर लक्ष होते.
 अशा या अस्थिर वातावरणात, वयाच्या 86 व्या वर्षी 1761 शाली ताराराणी यांचं निधन झालं. जीवन संपलं. कर्तृत्व मागे उरलं. एखाद्या राजपुरूषाप्रमाणे तडफ गाजवणा-या या राणीचे कार्य.... 1) करवीर संस्थान निर्मिती
2) वेगवेगळ्या मार्गांनी कर जमा करून स्वराज्यासाठी त्याचा विनियोग, याला शिवाजी नीती असं नाव त्यांनी दिलं होतं.
3) सैन्याचा पगार अपुरा पडल्यास वतन देण्यास आरंभ केला.
4) युद्धात कामी आलेल्यांच्या नातेवाईकांना मोकासा जमिनी दिल्या.
5) दरोडेखोरी लुटमारी यापासून संरक्षण दिलं.
6) बेरडांना पायबंद घातला.
7) धार्मिक कार्यासाठी सहकार्य केलं.
 हे त्यांचं महत्त्वाचं कार्य!
 प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या या स्त्रीचं वर्णन  अशा प्रकारे केलेलं आहे....
  •राजाराम यांच्यापेक्षा बायको समर्थ होती - गो. स. सरदेसाई, इतिहासकार 
  •काफीखान तिच्या चातुर्याची  वाखाणणी करून तिनं राज्य विस्तार कसा केला ते नमूद करतो.
 •  Tarabai was a stronger ruler than her husband- भीमसेन सक्सेना (तारीख-ए-दिलकुशा) 
 कर्तृत्वाच्या ऐन शिखरावर उभे राहण्याचे सद्भाग्य आणि सावत्र मुलगा व पुतण्याच्या नजर कैदेत 35 वर्ष राहण्याचे दुर्भाग्य लाभलेली,  तरीपण खंबीर आणि दृढनिश्‍चयी मनाच्या या स्त्रीचं जीवन चरित्र वाचल्यावर आपलं मन नकळत काही बाबी टिपत जातं... 
 ▪इतरांच्या आणि तिच्या लढायांमधला फरक आपल्याला जाणवतो. शिवाजी महाराजांना रक्ताच्या नात्याशी फार मोठा संघर्ष करावा लागला नाही, त्या कटकटी सांभाळायला त्यांची आई समर्थ होती. 
▪संभाजींना तो करावा लागला. पण ते राज्याचे वारस...! हे सर्वांनी मान्य केले होते.
▪ राजारामांना फक्त शत्रूंशी मुकाबला करावा लागला.
▪ याउलट ताराराणी यांची अवघी हयात रक्ताच्या नात्याशी संघर्ष करण्यात गेली. 
▪अंगी कर्तुत्व असूनही परंपरागत मानसिकतेचा फटका त्यांना बसला.
▪ त्यांनी हे राज्य टिकवले  म्हणून टिकले, हे कोणी लक्षातच घेतलं नाही. 
▪ नवऱ्यानं केलेली प्रतारणा बाजूला सारून,  मुलाच्या मृत्यूचं दुःख गिळून, नातवाच्या नाकर्तेपणाला वेसण घालून ही बाई ताठ जगली. तिला जर घरच्यांची साथ मिळती तर  इतिहास वेगळा असता. पण तसे घडायचे नव्हते.
 दुसरी एक नोंद...
 त्या काळातली चरित्र वाचलीत तर जाणवतं मराठ्यांनी मुलीचा जन्म कधी नाकारला नाही. ती सन्मानानं जन्माला आली. इतकंच नव्हे तर पुरुषी समजल्या जाणाऱ्या कलांमध्ये पारंगत होत राहिली.  मग ते तिरंदाजी असो की घोडेस्वारी अथवा मुळाक्षरांची ओळख तिला करून देत असत.  राजकारणाच्या कामात, सदरेच्या कामकाजात, न्याय निवाड्याच्या प्रकरणात स्त्रीला सहभागी करून घेतल्या जायचं. असं होतं तर मग आता का आम्ही मुलीचा जन्म नाकारतो आहोत? तिला का दुय्यम स्थान देतो? जरा विचार करायला हवा. मोगलांच्या अटकेत राहूनही परत आलेल्या स्त्रियांना सन्मानाने वागविणारी त्या काळातली चरित्र वाचली की आजच्या काळातली स्त्रीची असहाय्यता ठळकपणे जाणवते.

 खरं म्हणजे, शेवटी इतिहास काय असतो? तर... घडून गेलेल्या घटना तपासून त्यापासून बोध घेणे आणि पुढे जाणे. पुढे जाताना एक सूत्र लक्षात ठेवायला हवं आहे की, कोणत्याही शहराचा इतिहास हा दगड विटांच्या इमारतीत नसतो. तो इथल्या सामान्य जनांच्या डोळ्यात वाचायचा असतो. डोळे वाचायचे तर ते निर्मळ असावेत. निर्मळ डोळे तेव्हाच दिसतात, जेव्हा आमचं मन सुंदर असतं. मन सुंदर तेव्हाच असतं, जेंव्हा मनात माणुसकी वसत असते. ती चिरंतन राहू द्या, वृद्धिंगत होऊ द्या, हीच अपेक्षा!

Sunday, May 5, 2019

मिनिमलिझम

याविषयी अनेकांनी खूप छान लेख लिहीले आहे. मी नवीन आणखी काय लिहिणार? पण मिनिमलिझम चा प्रत्यय मात्र मी घेतला. नुकतेच शिफ्टिंग केेले त्यावेळी. पुण्याला शिफ्ट व्हायचे हे जेव्हा ठरले तेव्हा अक्षरशः भोवळ आली होती. तीन मजली घरातील पसारा आवरणे अंगावर काटा आणणारे होते. आणि हा पसारा काही थोडाथोडका नाही तर 30, 40 वर्षाचा होता. घरातील व्यक्ती कमी होत गेली आणि घर मोठे मोठे होत गेले. आणि मग जाणवू लागले की इतके मोठे घर नको गं बाई! आवरता आवरता नाकी नऊ येत होते. फिरून फिरून पाय दुखत होते. काळानुरूप आपणही आपल्यात बदल हे केलेच पाहिजे. आजच्या काळातील एक परवलीचा शब्द अपडेट करणे अगदी तसेच अपडेट वेळोवेळी होणे आवश्यक आहे. इथे मनात विचार आला खरचं गरज नसताना आपण किती फाफटपसारा वाढवत नेतो. हा पसारा आवरताना मी एक सूत्र लक्षात घेऊन हे काम केले. ते सूत्र असे कि मागच्या एक वर्षात हे सामान आपल्याला किती वेळा लागले? याचे उत्तर "एकदाही नाही" असे आले कि ते सामान, वस्तू discard करायच्या. तरीही मी बरेच आवरत आणले होते पण भांडी, गाद्या, दुलया, फर्निचर, पलंग, पंखे अरे बाप रे ही यादी संपणार नाही. शिवाय भंगार जे प्रत्येक महिन्याला by default एरवी पण जमा होतच असते. अबबबब!

कुटुंबातील सदस्य होते तोपर्यंत तेच घर छान वाटायचं. काळ बदलतो तशा गरजा बदलतात आणि पसारा आवरावा लागतो. गरजवंताला या चीजवस्तू द्यायच्या होत्या पण असे गरजवंत अशावेळी नेमके सापडत नाही. फुकटात मिळाल्याला किंमत रहात नाही असा काहीसा गोंधळ सुरू होता. तरीही शेवटी जास्तीत जास्त वस्तू तशाच दिल्या. सगळ्यात जास्त त्रास भांडी आवरताना झाला. पंक्तीचे सगळे साहित्य घरात होते. ताटांची चळत, मोठी, मोठी पातेली, बरं ती ताटांची चळत एखाद्या मंगलकार्यालयाला द्यावी तर तशा ताटात हल्ली चा बफे होत नाही. भांड्यांची पण पार रया गेलेली. त्यावेळी तशीच गरज होती. एकाच मांडवात तीन लग्न झाले म्हणून आणि महालक्ष्मी च्या प्रसादाला दरवर्षी 100, 100 किंवा त्यापेक्षा जास्त लोक जेवायला यायचे. पण आता काळ बदलला आहे आता पुन्हा असे सामान लागणार नाही.आता असे तीन लग्न घरी होणे नाही आणि सणवारही इतक्या मोठ्या प्रमाणावर होत नाही हे नक्की. आताशा पाहुणे पण येणे कमीच झाले आहे. पूर्वी सारखे महिना महिना राहणे आता होणे नाही. म्हणून हा आवरलेला पसारा आता वाढणार नाही याची मी खूप काळजी घेते आहे. माझ्या नंतर तो पसारा आवरायचा त्रास कोणालाही होऊ नये ही माफक अपेक्षा आहे. जगण्यासाठी फारच कमी गोष्टी लागतात हे आता जाणवू लागले आहे. बाकी सब मोह माया है. जैन धर्मातील एक अतिशय उत्तम आणि आवश्यक सूत्र अपरिग्रह! अपरिग्रह म्हणजे अंतरंगातून ममत्वभाव सोडणे. व्यक्ति, वस्तूंचा त्याग करून जगणे आपल्या सारख्या सांसारिकांना शक्य नाही म्हणून मग कमीतकमी गरजा आणि कमीतकमी सामान ठेवणे त्यातल्या त्यात करू शकतो. कोणत्याही वस्तू ची किंवा कुठल्याही सामानाची खरेदी करताना नीट विचार करून खरचं याची आवश्यकता आहे का? हे पडताळून पाहावे.   

आणखी एक गोष्ट म्हणजे फारच आवश्यक गोष्ट खरेदी करावी लागली तर प्रथम जुन्या वस्तूंची विल्हेवाट लावायची मगच नवीन वस्तू घरात आणायची. जोपर्यंत भागतय तोपर्यंत चलने दो हा एक उपाय करून बघता येईल. जीवनाचा काय भरवसा म्हणून आपला पसारा आवरून ठेवलेला चांगला. म्हणजे एक पाउल मिनीमलिझम कडे जाईल. असे एक एक पाऊल जाणे जमले कि आपोआप  माझा मिनिमलिझम साध्य होईल असे वाटते.   आहे त्या परिस्थितीत चित्तवृत्ती समाधानी ठेवणे अतिशय गरजेचे आहे. हौसेला मोल नाही म्हणतात. परंतु मोल मोजल्या शिवाय हौस पूर्ण कशी होणार?  कुठेतरी थांबायला हवेच आहे नाहीतर हौसमौजेला तर अंतच रहात नाही. ज्याला कुठे थांबायचे हे कळते तो खरा सुखी मनुष्य! जी व्यक्ती  संतुष्टपणा ही सवय करून घेईल ती व्यक्ती मिनिमलिझम  नक्की अमलात आणू शकते. 
 Less is more ही उक्ति आणि युक्ति कायम लक्षात ठेवून येथून पुढचा प्रवास.

Saturday, May 4, 2019

सहचर

नियमितपणे दळण दळणाऱ्या मालिका बघतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे जर महानगरीय कथा असेल तर संयुक्त कुटुंब असो किंवा विभक्त कुटुंब असो 'विवाहबाह्य संबंध ' असल्याशिवाय मालिकेला धार येत नाही. नवीनच सुरु झालेल्या एका मालिकेत तर हा मामला खुल्लमखुल्ला सुरु आहे नायिकेच्या नवऱ्याला हे माहित आहे आणि तो उदात्त भावनेने तिला ह्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे मालिकेचा TRP कमी होईपर्यंत अर्थातच हे प्रयत्न सुरु राहतील.  "चित्रपट किंवा मालिका समाजमनाचा आरसा असतात" अशी एक पळवाट ह्या निर्मात्यांकडून आपण कायम ऐकत असतो काही अंशी ते खरेही आहे  पण प्रत्येकच उच्चशिक्षित जोडप्यांमध्ये असे संबंध असतात का किंवा असतील का ? असा प्रश्न पडतो...वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर असलेली काही यशस्वी जोडपी किंवा मोठ्या पदावर काम करणारा नवरा किंवा बायको आणि घर सांभाळणारी बायको किंवा कधीकधी अगदी नवरा सुद्धा सुखाचा संसार करत असतात पण तरीही कधीमधी आपणही आपल्या आजूबाजूला असलं काही घडतंय का असं उगीचच शोधत राहतो काही आढळलच तर मिठमसाला लाऊन ती बातमी खमंग करतो. उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन ,लठ्ठ पगाराची नोकरी मिळवलेली आजकालची तरुण पिढी छान नियोजन करून स्वतःच करिअर घडवते , त्यांच्या एकमेकांशी बोलण्याचालण्यात छान मोकळेपणा असतो एक मुलगा आणि मुलगी एकमेकांचे चांगले मित्र असतात. आजकालचे कामाचे तास, तिथला ताण, स्पर्धा  ह्या सगळ्याची त्यांना जाणीव असते आणि तरीही अशी मुलंमुली जेव्हा जोडपी बनून समोर येतात तेव्हा त्यांच्यातला समंजसपणा  कुठे हरवतो ?..

.स्वतःच्या उच्चशिक्षित सहचरापेक्षा अजून 'एखाद्याच्या' किंवा 'एखादीच्या' आधाराची गरज त्यांना का वाटत असेल ? की असं काही असल्याशिवाय स्टेटस पूर्ण होत नाही , त्याशिवाय तुमच्या कर्तबगारीवर तुमचे सहकारी किंवा वरिष्ठ विश्वास ठेवत नाहीत ?                  पूर्वीच्या काळी जेव्हा बहुतेक करून नवऱ्याचं आणि बायकोचं कार्यक्षेत्र हे पूर्णपणे वेगळं होतं तेव्हा अशा घटना घडल्या असत्या तर नवल वाटले नसते कारण त्या जोडप्यांमध्ये 'बौद्धिक भूक'  भागवू शकेल असा संवाद निर्माणच होत नसेल , पण तरीही कुठल्या तरी एक तत्वावर ते संसार टिकले त्यात गोडी होती असे नाही , पण मग आत्ताचे चर्चेच्या अनेक फेऱ्या करून जुळवलेले ,जुळलेले , तोडून पुन्हा मांडलेले असे संसार तरी कुठे सुरळीतपणे सुरु आहेत ?  आर्थिक , सामाजिक, बौद्धिक दृष्ट्या सम पातळीवर वावरणारी कित्येक जोडपी घटस्फोटाच्या निर्णयावर येतात तेव्हा वाईट वाटतं. मला वाटतं शेवटी commitment पेक्षा adjustment महत्वाची. प्रेमापायी कधीमधी संशय येणं, मत्सर वाटणं हा मनुष्यस्वभाव आहे  पण एकदा समोरच्याला स्वीकारले , थोडंबहुत सोडण्याची तयारी असली की commitment निर्माण होतेच त्याला वेळ द्यावा लागतो हे मात्र नक्की आणि ही तयारी दोन्हीबाजूने हवी.

         मालिकांमध्ये दाखवतात तसे 'मोठ्यांचा दबाव' , 'लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात' असलं काही मानणारी पिढी आता संपली. आजची पिढी विचार करणारी आहे, सुशिक्षित आहे स्पष्टपणे बोलणारी आहे. एकमेकांना असलेले ताणतणाव , गरजा,  स्वातंत्र्य , हक्क , अधिकार सगळं  उत्तमपणे समजून घेणारी आहे . फक्त गरज आहे की दोन माणसं एकत्र येऊन सहवासाने प्रेम , सुसंवाद निर्माण करु शकतात, दोन कुटुंब जोडू शकतात नवीन पिढी घडवू शकतात ह्या गृहितकावर ठाम विश्वास ठेवण्याची .