Friday, April 15, 2022

व्यंकटेश स्तोत्र.... एक उत्कट काव्य!

 मला आठवतं माझी आई अंघोळ करून आली की व्यंकटेश स्तोत्र म्हणायची.अजूनही ती म्हणते.लहानपणी तिचं ऐकून ऐकून आपोआपच ते पाठ झालं आणि थोडं मोठं झाल्यावर रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला की आई आम्हाला ते म्हणायला लावायची.

         पुढे काॅलेजमध्ये शिकायला गेल्यावर मराठी साहित्य हा विषय मोठ्या आवडीने घेतला आणि या विषयाला मिळालेल्या चांगल्या प्राध्यापकांमुळे भाषेतले साहित्य आणि साहित्यातलं सौंदर्य थोडं थोडं समजायला लागलं.त्यावेळी रोज व्यंकटेश स्तोत्र म्हणता म्हणता त्यातल्या वाङमयीन सौंदर्याची चुणूक हळूहळू कळायला लागली.मग पुन्हा पुन्हा स्तोत्र म्हणून त्यातलं सौंदर्य लुटायचं हाच उद्योग झाला.
         तोपर्यंत व्यंकटेश स्तोत्र म्हणजे देविदासांनी विष्णुला प्रसन्न करून घेण्यासाठी केलेली आराधना एवढंच फक्त माहिती होतं.पण व्यंकटेश स्तोत्रातील रसाळ भाषा, उपमा-दृष्टांतांची उधळण देविदासांच्या उच्च कवित्वाची साक्ष देते.
          "अठरा भार वनस्पतींची लेखणी|
          समुद्र भरला मषि करुनि|
          माझे अवगुण लिहिता धरणी|
          तरी लिहिले न जाती||"
      असे जेंव्हा देविदास आपल्या अवगुणांचे वर्णन करतांना म्हणतात तेंव्हा त्यांच्या अलौकीक काव्यप्रतिभेचे दर्शन घडते. परमेश्वरासमोर आपला कमीपणा वर्णन करतांना देविदास म्हणतात'अहो मी केवढा अवगुणी! माझ्या अवगुणांचे वर्णन करण्यासाठी अठरा भार (हजार तोळे) वनस्पतींची अर्थात एवढी प्रचंड लेखणी केली,शाई म्हणून समुद्राचं पाणी वापरलं आणि लिहिण्यासाठी कागद म्हणून अवघ्या धरणीचा उपयोग केला तरी ते पुरेसे ठरणार नाही.'अतिशयोक्तीचा इतका उत्तम आणि समर्पक उपयोग या स्तोत्राला वाङमयीन उच्चतेवर नेऊन पोहोचवतो.

      परमेश्वराशी थोडासा वाद घालताना तर कवीच्या प्रतिभेला स्फुरण चढते.स्वतःचं दारिद्र्य दूर करण्यासाठी देविदास जेव्हा भगवान विष्णूंना आळवतात तेव्हा,
             "लक्ष्मी तुझे पायातळी |
             आम्ही भिक्षेसी घेऊनी झोळी |
             येते तुझी ब्रिदावळी |
             कैसी राहील गोविंदा ?"
     लक्ष्मी तुझ्या पायाशी बसते आणि आम्ही तुझे भक्त म्हणविणारे हातात भिक्षेची झोळी घेऊन फिरतो.अशाने तुझा मोठेपणा राहील का?असा रोखठोक प्रश्न परमेश्वराला विचारून कवी मोकळा होतो. पुढे तो म्हणतो,
          "कुबेर तुझा भांडारी |
          आम्हा फिरविसी दारोदारी |
          यात पुरुषार्थ मुरारी |
          काय तुजला पै आला?"
  तू आमचा पालनकर्ता साक्षात विष्णू आणि तुझा भांडारी कुबेर.असे असताना माझ्या सारखे तुझे भक्त भिक्षेसाठी वणवण फिरतात,यात हे व्यंकटेशा तुला फार मोठा पुरुषार्थ वाटतो का? असे म्हणताना देविदासांनी केलेला विरोधालंकाराचा उपयोग किती समर्पक वाटतो पहा.
            " द्रौपदीसी वस्त्रे अनंता |
            देत होताही भाग्यवंता |
            आम्हालागी कृपणता |
            कोठून आणिली गोविंदा?"
  अर्थात द्रौपदीला वस्त्रे पुरवताना तू दाखवलेली उदारता योग्यच होती.पण आम्हाला देताना तू इतका कंजूस का होतोस? दोन भक्तांमध्ये इतका भेदभाव? असे टिकास्त्र परमेश्वरावर सोडताना देविदासांना कोणतीही भीती वाटत नाही.

            एकामागून एक येणारी दृष्टातांची माला हे ज्ञानदेवांच्या कवित्वाचं वैशिष्ट्य आहे.एखादं तत्व सांगताना वाचकाला एक दृष्टांत भावतो न भावतो,पटतो तोच दुसरा, तिसरा आणि अनेक! देविदासांच्या या व्यंकटेश स्तोत्रात सुध्दा स्वतः ची अयोग्यता परमेश्वराला सांगताना ते लिहितात,
            " उडदामाजी काळे गोरे|
            काय निवडावे निवडणारे|
            कुचलिया वृक्षाची फळे|
            मधुर कोठोनि असतील|
            अराटी लागी मृदुता |
            कोठोनि असेल कृपावंता |
            पाषाणाची गुल्मलता |
            कैशियापरि फुटतील ||"
   अर्थात उडदामध्ये काळे -पांढरे निवडणे शक्य आहे का? काजरा या कडू, विषारी फळे येणाऱ्या वृक्षाला गोड फळं कुठून येतील? काटेरी झाडाला मृदुता येऊ शकेल का? किंवा दगडाला कधी अंकुर फुटतो का? म्हणजेच मी हा असा नखशिखांत अपराधी,पापानी भरलेला पण आता मी तुला शरण आलो आहे.तेंव्हा आपल्या या भक्ताची लाज तुला राखावीच लागेल.कारण तुझ्या या केविलवाण्या भक्ताचा अपमान म्हणजे शेवटी तुझाच अपमान नाही का? म्हणून देविदास पुढे म्हणतात,
   " समर्थाचे घरीचे श्वान | त्यास सर्वही देती मान |तैसा तुझा म्हणवितो दीन | हा अपमान कवणाचा?"


        माझ्यासारख्या आकंठ पापात बुडालेल्या भक्तावर जर तुझी कृपा झाली तर माझं सगळं पाप धुतल्या जाईल, हे व्यंकटेशाला सांगताना कवीने दिलेले दृष्टांत अभ्यासण्यासारखे आहेत.
            " नीच रतली रायासी |
            तिसी कोण म्हणेल दासी |
            लोह लागता परिसासी |
            पूर्वस्थिती मग कैची?
            गावीचे होते लेंडवोहळ|
            गंगेसी मिळता गंगाजळ |
            कागविष्ठेचे झाले पिंपळ|
            तयासि निंद्य कोण म्हणे?"
    असे एकामागून एक सरस आणि समर्पक दृष्टांत देविदास सहज पणे देऊन जातात आणि पुन्हा श्री विष्णूला विचारतात की अशा मला जर तू आपला भक्त मानलं आहेस तर मग
             "कन्या देउनिया कुळ|
             मग काय विचारावे |"
  अत्यंत मौलिक आणि व्यवहारिक सिध्दांत कुठलाही आव न आणता किती सहजपणे सांगितला आहे.शेवटी भक्ताची आर्त हाक ऐकून भगवान विष्णू जेव्हा कवीच्या अंतःकरणात प्रकट होतात तेव्हा व्यंकटेशाच्या मूर्त स्वरूपाचे देविदासांनी केलेले वर्णन (श्लोक ५४ते५९) तर त्यांच्या प्रतिभेचा अप्रतिम फुलोर वाटतो.
        श्री विष्णूची सुंदर,निळसर नखं " इंद्रनिळाचिये परी" म्हणजे इंद्रनील रत्नासारखी दिसतात आणि 'करकमळ' "रातोत्पलाचिये परी" अर्थात लाल कमळाप्रमाणे वाटतात.व्यंकटेशाच्या मुखाचे
        " दोन्ही अधरांमाजी दंतपंक्ती|
        जिव्हा जैसी लावण्यज्योती|"
असे वर्णन करून श्रीहरीच्या नाकाचे वर्णन किती आगळ्या पद्धतीने केले आहे पहा.
          "सरळ सुंदर नासिक|
          जेथ पवनासी झाले सुख|"
   पुढे श्रीहरींच्या नेत्रांकडे पाहून कवी म्हणतात,
       "  त्रिभुवनीचे तेज एकवटले|
       बरवेपण सिगेसि आले|
       दोन्ही पातयांनी धरिले|
       तेच नेत्र श्रीहरीचे||"
   इथे देविदासांच्या कल्पनाशक्तीने सुध्दा परमोच्च बिंदू गाठला आहे असे म्हणावेसे वाटते.
       कोणतंही स्त्रोत्र म्हंटलं की भक्तीरसाने ओथंबलेलं ! नाना तऱ्हेने परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न असतो. ऋषिमुनींनी, संतांनी रचलेल्या स्तोत्रांत भक्ती, श्रध्दा, आर्तता, आत्मविश्वास या सगळ्याबरोबर जाणवते ती त्यांची ओसंडून वाहत असलेली काव्यप्रतिभा! याच दृष्टिकोनातून व्यंकटेश स्तोत्राकडे पाहण्याचा हा एक प्रयत्न!


गिरिजा गिरीश कानडे

बहुदुधी आखूडशिंगी....

 माझी आई मुलुंडला राहते.(एकटी) आमची सोसायटी बरीच जुनी झाल्याने, आता रिडेव्हलपमेंटला गेली आहे. तर आई पुढे प्रश्न की, सर्वांसोबत जायचे की नाही? तिने निर्णय घेतला की, हा फ्लॅट विकून दुसरा फ्लॅट घेऊ. पण रिडेव्हलपमेंटच्या फंदात पडू नाही.कारण ती चक्क लॉटरी असते! झाली तर अगदी दोन-तीन वर्षात उभी राहते बिल्डिंग! सॉरी, टॉवर ! नाहीतर रखडते. २२ मजली होणार आहे.मग आम्ही तो फ्लॅट विकण्याच्या मागे लागलो. तो त्यामानाने लवकर विकला गेला. विशेष त्रास न होता! आणि अपेक्षेप्रमाणे पैसेही मिळाले. मग आम्ही असे ठरवले की, आता आलेली रक्कम गुंतवून हिच्यासाठी भाड्याने फ्लॅट घेऊ .म्हणजे पुढेमागे काही वेगळा निर्णय घ्यायची वेळ आली तर सोपे जाईल. पण capital gain ,taxes इत्यादी खूप भानगडी पाहता विकतच फ्लॅट घेण्याचे ठरले. आणि सुरू झाला शोध.... त्याचीच ही कहाणी!

             मी अगदी मुलुंडला पोहोचले,त्या दिवशीपासून फ्लॅट पाहायला सुरुवात केली. कारण माझी मैत्रिण गीता, तिने आधीच ब्रोकर्सचे फोन नंबर मला पाठवले होते. पहिल्याच दिवशी चार फ्लॅट्स पाहिले आणि मग सुरू झाला सिलसिला..... रोज सकाळ झाली की, ब्रोकर्सना फोन ,त्यांचे मला फोन !वेळ ठरविणे. साधारण अकरा वाजता निघायचो आई आणि मी रोज मोहिमेवर !सकाळी काही फ्लॅट्स पाहायचो.घरी आल्यावर जेवण ,थोडी विश्रांती की परत साडेचार पाच वाजता निघायचो. संध्याकाळच्या आत घर पाहणे जरूरी ! कारण मग घरात पुरेसा उजेड, हवा येते की नाही, हे कसे समजणार? असं रोज सुरू होतं.सुरुवातीला ४-५ दिवसानंतरच एक फ्लॅट खूप आवडला दोघींनाही! मग बाकी फॅमिली मेंबर्सनाही दाखविला. मला वाटलं, चला लवकर आटोपली मोहीम!पण नाही.त्यानंतर एक नविन शत्रू समोर आला. तो होता, OC !(occupation certificate).त्या आम्हाला आवडलेल्या फ्लॅटला ते नव्हते. हा शब्दच माझ्यासाठी नविन होता. मग OC नसण्याची कारणे,त्यातील प्रॉब्लेम्स लक्षात घेणं हे केलं. झालं, तो फ्लॅट कॅन्सल झाला!
             आमची मोहीम परत नव्याने सुरू! काही फ्लॅटस् जे नविन सोसायटीत होते, ते सातव्या ,दहाव्या ,चौदाव्या मजल्यावर असायचे. मग आई म्हणायची, मला खाली बघताना गरगरेल.(वय ८१ वर्ष) मलाही ते पटायचं, मग तो फ्लॅट नको.
 १-२ फ्लॅट खूप आवडले, तर सेकंड फ्लोअर, (लिफ्ट नाही) म्हणून नको.
काही अगदी रिमोट एरियात एकटी कशी मॅनेज करणार ?म्हणून नको.
एक दोन फ्लॅट अगदी मध्यवर्ती एरियात बाकी सगळे छानतर चारी बाजूंनी सोसायटीज ...हवा उजेड नाही, नको.
एक दोन फ्लॅट ,अगदी मनपसंत असे होते, तर आऊट ऑफ बजेट! ( महत्त्वाचा मुद्दा) नको.
काही ठिकाणी सगळं छान होतं, पण तिथून घरातून एक माणूस दिसायचं नाही. दूरपर्यंत शेत, आणि नंतर हायवे असं लोकेशन होतं. आई म्हणाली, मला अशा घरात भीती वाटेल. नकोच!
काही फ्लॅटस् खूप आवडायचे, तर ती बिल्डींग जुनी, म्हणजे पंचवीस वर्ष जुनी असायची. म्हणजे ती नजीकच्या काळात   redevelopment जाऊ शकते. नको रे बाबा!
घाई असल्याने,under construction नकोच.
आणि जी घरं आवडायची,तिथे ओ.सी. चा प्रॉब्लेम! माझ्या काही मित्रमंडळींचा सल्ला,  OC नसेल तर घर पाहूच नकोस! तर काहींचं म्हणणं, मुलुंड मध्ये निम्म्या घरांना OC नाहीये !CC आहे ना पुरे! मला काहीच समजेना.कुणाचं ऐकावं? त्यातून इतके ब्रोकर्स, त्यांचं आणखीन काही वेगळच म्हणणं! OC नसण्याची प्रत्येक सोसायटीची वेगवेगळी कारणे ऐकून, आता मी एवढी knowledgeableझालेय की मीच कन्सल्टन्सी सुरू करू शकते.थोडीथोडकी नाही पन्नास घरं पाहिली राव! त्यातून ब्रोकर्स लोकांचं प्रेशर ! मॅडम, थर्टीफर्स्टच्या आधी करा खरेदी स्टॅम्प ड्युटी वाढेल नाही तर! मला वाटायचं वेळेत झालं तर बरं !पण आईच्या अटी, available घरं ,आमचं बजेट या सगळ्याची जुळवाजुळव करताना तारांबळ उडत होती माझी!बहुदुधी आखूडशिंगी.. चा अर्थ चांगलाच कळला मला!

          आवडलेल्या घरांपैकी एकेठिकाणी OC नव्हतीच, शेअर सर्टिफिकेटही नव्हतं. तरी आमचे परिचित ब्रोकर केळकर यांच्या आग्रहानुसार, मी सकाळी वकिलांना जाऊन भेटले. त्यांनी थोडा दिलासा दिला की अहो,इतकं काही घाबरू नका. ही बिल्डिंग काही पाडणार नाही बीएमसी! पण मला प्लॅन वगैरे डॉक्युमेंट्स पाहावे लागतील. रात्री साडेनऊ वाजता एका हॉटेलमध्ये मी, केळकर व त्या सोसायटीचे सेक्रेटरी केतकर अशी आमची मीटिंग झाली. माझा शंकांचे निरसन करायला! मी रात्री साडेदहा वाजता परत आले. पण माझे समाधान न झाल्याने ते घरही सोडून द्यावे लागले.
         मैत्रिणींनो,एवढं वर्णन करून सांगायचं कारण असं की,ज्या क्षेत्राशी माझा सुतराम संबंध कधी आला नाही,त्या क्षेत्रात मी हळूहळू लीलया विहार सुरू केला.सगळ्या गुजराती ब्रोकरशी रोज डील करत होते. माझा कॉन्फिडन्स वाढत चालला होता.पुण्यात मुलाचा फ्लॅट घेताना आलेले अनुभव इथे काहीच कामास येत नव्हते .कारण ही मुंबई होती ना!

आता फक्त एकच घर उरले होते. तिथे आईला पुन्हा एकदा नेऊन, पुरेसा उजेड हवा आहे की नाही, हे दाखवायचे शिल्लक होते. पण त्यादिवशी नेमका सूर्यदेवाने असहकार पुकारला. आणि तो बेत रहित झाला. आणि अगदी योगायोगाने नितीन भाईचा( Broker) फोन आला की,तुमच्या अगदी घराजवळ एक फ्लॅट आहे . झालं पुन्हा नवीन उत्साह! सेम एरियामध्ये म्हणून जास्तच खुशीने गेलो.  खूप आवडला फ्लॅट!गार्डन फेसिंग, बाकी सर्व अटींमध्ये बसणारा! मुलगी पाहताक्षणीच पसंत अशी अवस्था! वेळ कमी होता, आई तर खूपच खुश होती. तिच्या लाईफ मध्ये काहीच चेंज होणार नव्हता.फक्त बजेट थोडं वाढवावं लागणार होतं,पण सगळं जुळून येतय, म्हटल्यावर लगेच पुढे काय करायचं सांगा.असं मी त्या ब्रोकरला सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की ,एक छोटासा प्रॉब्लेम आहे त्यांनी आधी एक डील केलं होतं,ते तुटलं. तर तुम्हाला साधारण तेवढच बजेट ठेवावे लागेल . म्हटलं,ओके बघू.
      हा फ्लॅट फायनल करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली. सारखे मिस्टर पोळ व माझी एक मैत्रिण साधना,  तिच्या मिस्टरांचा सल्ला कारण या क्षेत्रात ते थोडे अनुभवी आहेत .म्हणून मग असे ठरले की,आधी सर्व डॉक्युमेंट्स पहायचे आणि मगच टोकन द्यायचे .का कुणास ठाऊक! पण मला माझं intuition सांगत होतं,  की नाही द्यायचं टोकन आपलं समाधान झाल्याशिवाय!
        मग सकाळी जेव्हा आईला मी परत घर पहायला नेलं,तेव्हा त्या ब्रोकरनी मला सांगितलं की ,या आधी जे डील झालं होतं ,त्या माणसाने 21 लाख रुपये दिले आहेत .पण तुम्ही काळजी करू नका .आम्ही पाहतो सगळं. मग तर मला आणखीनच वेगळं वाटायला लागलं. मधल्या दोन -तीन तासात मी पुन्हा मिस्टर पोळ आणि माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांशी बोलले . पण प्रत्यक्षात मला ती सिच्युएशन फेस करून  डील करायची होती .दुपारी चार वाजता मी गेले .तीन ब्रोकर, त्या फ्लॅटचे owner, त्यांची मिसेस अशी आमची मीटिंग झाली.मीच बोलायला सुरुवात केली. त्या मिस्टर अँड मिसेस ना प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर ते मिस्टर सारखे ,त्यांच्या बायकोला सांग तू ,बोल आता, असं म्हणायचे आणि दोघेही धड उत्तरं देत नव्हते . मग माझी खात्री पटली,दाल में कुछ काला है .मी आणखीनच आक्रमक झाले .आणि त्यांच्या तोंडून खरे काय ते बाहेर काढले. हे तिन्ही ब्रोकर एक शब्दही बोलले नाहीत .त्यांनी जी मेघा मॅडम पाहिली होती ती वेगळी होती .देवानेच मला बुद्धी आणि शक्ती दिली. सगळ्यांनी मिळून आम्हाला फसवण्याचा पूर्ण प्लॅन केला होता .कारण एकदा टोकन दिलं, तेही लाखांमध्ये !की तुम्ही अडकलात !पण मी खंबीर होऊन त्यांचा डाव मोडून काढला. ते दोघे शेवटी हात जोडून माझी माफी मागू लागले. ते बऱ्यापैकी सभ्य वाटत होते .पण दुसरीकडे घराच्या सौद्यात विचित्र फसल्याने त्यांनी हा प्लॅन केला होता. इतकी उद्विग्नता आली,या सगळ्या प्रकारानंतर! बापरे !वाचलो ,असं वाटलं.

    मग मात्र लगेच दुसऱ्या दिवशी जिथे आईला हवा, उजेड पुरेसा आहे की नाही हे  पहायचे होते ,ते घर पाहिले.तिथे तिच्या मॅक्झिमम अटी पूर्ण होत होत्या. ते घर एकदाचे फायनल झाले. हुश्श!
       नंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे negotiation! तेही मी एकटीने केले. प्रत्येक वेळी Mr . Pol मला, तू करू शकतेस !कर ,कर म्हणायचे. अरे, ते काय साडी ड्रेसचे बार्गेनिंग आहे का? पण मी तेही केले . त्यात यश मिळाले.
एवढं सगळं करेपर्यंत 30 मार्च उजाडली होती. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि टोकनचा चेक देऊन आता चालणार नव्हतं. कारण ३१ मार्चचा धाक!बँकेत जाऊन RTGS करावं लागणार होतं. सकाळपासून घर ते वकिलांचे ऑफिस, पुन्हा बँक  -घर ते वकिलांचे ऑफिस, पुन्हा बँक अशा बऱ्याच चकरा झाल्या. बँक मॅनेजर ला भेटून विनंती करून कसे तरी ते काम त्यादिवशी पार पडले. बँक मॅनेजर, lawyer mam, ब्रोकर हितेशभाई, अमोलजी(जे घर आम्ही घेतले त्याचे owner) यांचे खूप सहकार्य लाभले.चांगली माणसं ,चांगले अनुभव याचीही प्रचिती आली. शेवटी या सगळ्याच्या रिसीटस् ताब्यात घेऊन आईकडे सुपूर्त केल्या. 

माझी मोहीम फत्ते झाली. बहुदुधी आखूडशिंगी...... सापडली एकदाची! सगळं हिमतीने केलं तर खरं मी! पण शेवटी त्या वकीलांच्या ऑफिसमध्येच सर्वांसमोर माझ्या आनंदाश्रूंना रोखू शकले नाही.

Thursday, April 14, 2022

आठवणीतल्या चुली

 चूल म्हटली की एकदम मला माझं लहानपण दिसायला लागतं. अंजनगाव-सुर्जीच्या छोट्याश्या गावातला आमचा तो आलकरींचा वाडा नजरेसमोर येतो. त्यातलंच एक चार खोल्यांचं आमचं बिर्‍हाड. भाड्याने घेतलेलं. एखाद्या चौकोनाचे चार सारखे खण केल्यासारखं लेआऊट असलेल्या  चार लहान लहान खोल्या. त्यातलीच एक कॉर्नरची खोली, म्हणजे आमचं स्वयंपाकघर! त्याच्याच  एका  कोपऱ्यात आईने विटा अन माती वापरून केलेला एक छोटासा चौकोनी बैठा ओटा अन त्यावर विराजमान असायणाऱ्या छानश्या दोन चुली आणि प्रत्येकीला जोडून असलेली एक एक शेगडी! आलटून पालटून त्या चुली वापरल्या जायच्या. स्वच्छ सारवलेल्या त्या सुबकश्या चुली अन शेगड्या बघून नेहमीच फार प्रसन्न वाटायचं. आई स्वतःच त्या चुली घालायची. आमच्या त्या वाड्याच्या मध्यभागी एक मोठ्ठा पांढऱ्या मातीचा ढिगारा होता. तिथून ती माती आम्ही आईला आणून द्यायचो. चुली घालण्याचा तो सोहळा म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असायची. केव्हातरी वर्ष दीडवर्षात जेव्हा जुन्या चुली खराब व्हायच्या तेव्हा हा चुली घालण्याचा कार्यक्रम व्हायचा. त्या भिजवलेल्या मऊ मऊ मातीचा गार गार स्पर्श अन थेट आत पर्यंत जाणारा तो मंद सुगंध खूप आवडायचा मला. आम्ही पण मध्ये मध्ये लुडबुड करत छोट्या छोट्या  खेळण्यातल्या चुली घालायचो, मातीचे बैल, भाज्या वगैरे वगैरे बनवायचो. खूप मजा यायची. 


              मला अजूनही ते सगळं अगदी स्पष्ट आठवतं. सकाळी उठल्या उठल्या आईचं सगळ्यात पहिलं काम असायचं ते म्हणजे चुलीला नमस्कार करून, एका कोळश्यावर थोडं रॉकेल टाकून चूल पेटवायचं. मग त्यावर चहाचं आधण चढवायचं. आईचा तो स्पेशल चहा मोठा खासच असायचा. तिला दुसऱ्या कुणाच्या हातचा चहा कधी आवडायचा नाही. भरपूर पत्ती, भरपूर दूध टाकून, भरपूर उकळवलेला, तो दाटसर चहा खरंच मोठा खासच लागायचा. एकदम टपरीवर मिळतो तसा! अन् तिलाही तो भरपूरच हवा असायचा. एका मोठा  बसका स्टीलचा पेला भरून ती तो घ्यायची. आम्हालाही काही चहा प्यायला मनाई वगैरे नसायची. त्यामुळे आम्हीही मजेत त्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घ्यायचो. सकाळच्या चहात ती कलमी, सुंठ, मिरे वगैरे टाकून बनवलेला मसाला आणि दुपारच्या चहात गुलाबकळी टाकायची. गुलाबकळी म्हणजेच गुलकंदी गुलाबी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या. त्या चहात टाकल्या की खूप छान स्वाद यायचा चहाला. आम्ही आवडीने प्यायचो. चुलीवरचा सगळाच स्वयंपाक फार रुचकर व्हायचा. लाकडं छान पेटले की त्याचे लालभडक, रसरशीत निखारे पडायचे. लाकडं बाजूला करून एका मोठ्या झाऱ्यावर ते निखारे घेऊन आई ते बाजूच्या शेगडीत टाकायची. मग त्यावर क्रमाने वरण आणि भात शिजायचा. निखारे थोडे विझत आले की पुन्हा त्यावर भर टाकल्या जायची. ते लालभडक, गर्द केशरी रंगाचे रसरसणारे निखारे बघून मला नेहमीच पळसाच्या फुलांचा भास व्हायचा. 


          आमची साडेअकराला शाळा असायची. आई बरोबर साडेदहा पावणे अकराला कणकेचा पिंडल घेऊन चुलीजवळ बसायची आणि आम्हाला हाक मारायची. बाबा आणि आम्ही तिघे भावंडे आपापली ताटे घेऊन तिच्या भोवताली बसायचो. मला अजूनही लाकडी पाटावर बसून सरसर पोळ्या लाटण्यात मग्न असलेली तिची मूर्ती डोळ्यासमोर येते. चुलीतल्या जाळाचा लालसर गुलाबी प्रकाश तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर फार खुलून दिसायचा. आणि भराभर पोळ्या लाटताना होणारी तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्यांची, एका लयीत होणारी मंजुळ किणकिण कानाला मोठी गोड वाटायची. ती पटापट तव्यावरच्या गरमागरम, मऊसूत पण वरतून छान, खरपूस भाजलेल्या पोळ्या लोणकढे तुपाने माखून आम्हाला एका मागोमाग एक वाढायची. सकाळ, संध्याकाळ दोन्ही वेळेला मस्त अशा गरमागरम पोळ्या खाऊन तृप्तीचा ढेकर देण्यातलं सुख काही औरच होतं! आता विचार केला की वाटतं खरंच किती कष्ट करायच्या जुन्या बायका! आज आमच्या हातापायाशी कामवाल्या बायका असून सुद्धा गरम पोळ्या करून वाढायचे जिवावर येते. एखाद्यावेळेस  करावे लागले तरीसुद्धा थकायला होते. कालाय तस्मै नमः! अजून काय?


           तर आमची सगळ्यांची जेवण उरकल्यावर मग  शेवटी ती स्वतःसाठी एक भाकरी करून घ्यायची. बरेचदा तिच्या त्या टम्म फुगलेल्या भाकरीचा पोपडा तूप मीठ लावून मीच चवीचवीने मटकावून टाकायची. खूपदा ती आमच्यासाठी दुपारी खायला म्हणून मस्त पानगे करून ठेवायची. छोटे छोटे, गोल गोल पानगे निखाऱ्यावर मस्त फुगत जायचे ते बघायला खूपच मज्जा यायची. कधीकधी ती स्वयंपाक आटोपल्यावर लाकडं विझवून उरलेल्या निखाऱ्यांमध्ये पाच सात बटाटे टाकून ठेवायची. त्या मंद निखाऱ्यांवर ते छान खरपूस भाजले जायचे. दुपारी आम्ही ते सोलून, वर तिखट मीठ भुरभुरून, थोडं लिंबू पिळून चवीने फस्त करायचो. तर कधी त्यावर दूधसाखर टाकून त्याची मस्त स्वीट डिश व्हायची. उन्हाळ्याच्या दिवसात अशाच प्रकारे ती त्यात कैऱ्याही भाजायची आणि संध्याकाळी त्यात गूळ टाकून मस्त पन्हं करायची. फ्रिजबीज नव्हते तेव्हा पण माठातलंच थंडगार पाणी टाकून केलेलं ते पन्हं अगदी “अमृताहुनी गोड” असंच लागायचं.


        तेव्हा घरोघरी चुलीच असायच्या त्यामुळे लाकडं विकत घ्यावे लागायचे. लाकडाच्या मोळ्या विकणारे मोळीविक्रेते नेहमी दारावरून जायचे. बरेचदा मोळी विकणारा जादा पैसे घेऊन त्यातली जाड जाड खोडं फोडूनही द्यायचा. कधीकधी तर बाबा स्वतः कुऱ्हाड घेऊन लाकडं फोडायचे. बिनबाह्यांचे बनियन आणि खाली गुंडाळलेला एक पंचा, अशा वेशातले बाबा लाकडं फोडतांना कसे घामाघूम व्हायचे ते मला अजूनही चांगलेच स्मरते. त्यांचं लाकडं फोडायचं काम झाल्यावर आजूबाजूला उडालेल्या छोट्या मोठ्या झिलप्या गोळा करायचं माझं काम असायचं. ते करतांना  कधीमधी एखादी शिळकही बोटात जायची. मग सुई घेऊन ती काढण्याचा एक कार्यक्रम व्हायचा. चूल म्हटल्याबरोबर ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. 


             नंतर काही वर्षांनी म्हणजे मी सातवी आठवीत असताना आमच्या घरी गॅसची शेगडी आली. तेव्हा त्याला बर्शन म्हणायचे. स्टीलची चकचक शेगडी आणि त्याची ती डोळ्यांना सुखावणारी, जादुई भासणारी निळी निळी फ्लेम! कोण अप्रूप तेव्हा वाटलं होतं तेव्हा! शिवाय आईचं काम आता थोडं सोपं झाल्याने फार बरंही वाटलं होतं. एका क्षणात, हवं तेव्हा सुरु बंद होणारी शेगडी! नाही कोळसे, नाही रॉकेल, नाही फुंकणीने फूफू करण्याची गरज! जादूच जणू!


           शिवाय आता चुली मुळे होणाऱ्या धूराचाही त्रास कमी झाला. पावसाळ्यात, विशेषतः जेव्हा सलग पाच सहा दिवस झड असायची तेव्हा सगळी लाकडं ओलसर, सरदलेली असायची अन पटकन पेटायची नाहीत. त्यामुळे जास्तच धूर व्हायचा. तो डोळ्यात जाऊन डोळे चुरचुरायचे. स्वयंपाक घराच्या वरची  कौलं आणि आणि भिंती सुद्धा वरच्या बाजूला काळ्याकुट्ट होऊन जायच्या. नंतर गॅसची शेगडी आल्यावर बाबांनी एकदा स्वतः खपून स्वयंपाकघराला रंग दिला होता. तेव्हा केवढं चकाचक दिसायला लागलं होतं स्वयंपाकघर!


           नंतर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा सासरी पुन्हा एकदा चुल भेटली. पण थोड्या आधुनिक पेहरावात. घरी गॅस होताच पण स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात चूलपण होती. मुद्दाम सांगण्यासारखं म्हणजे ही एक वेगळीच चूल खास "मगन चूल" म्हणून ओळखली जायची. ती तेथे सेंटर ऑफ सायन्स फोर व्हिलेजेस(CSV) ह्या संस्थेने विशिष्ट शास्त्रीय दृष्टिकोनातून बनवली होती. ह्यात एक चूल अन त्याने जोडून एक शेगडी होती. त्यांच्या मध्ये एक मोठे गोल् छिद्र होते. ह्या मधल्या छिद्रातून जास्तीचा जाळ त्या दुसऱ्या शेगडी ला मिळायचा. शिवाय त्याला एक स्पेशल धुराडे लावलेले, ज्यातून सगळा धूर बाहेर जायचा. सुबक फिनिशिंग असलेली ती चूल मला नेहमी नऊवारी नेसणाऱ्या आजींनी सलवार कमीज घातल्यावर जसं वाटेल तशी वाटायची. कुतूहलाने त्याबद्दल माहिती मिळवली तर कळले की ह्या चूलीचे तंत्र तामिळनाडूच्या कल्लूपट्टी येथील गांधीनिकेतन मध्ये विकसित करण्यात आलं आहे. ग्रामीण स्त्रियांच्या सुविधेसाठी तीस टक्के इंधनबचत करणारी ही चूल पर्यायाने पर्यावरणाचे कमीतकमी नुकसान व्हावे ह्या उद्देशाने तयार करण्यात आली होती. अजूनही वर्धेच्या मगन संग्रहालयात ही चूल पहावयास मिळते. माझे लग्न झाल्यानंतर तीन-चार वर्ष वर्षे तरी ही चूल घरात विराजमान होती. आमच्याकडे रोज नाही पण सणवारांना बहुदा वापरल्या जायची. पुढे  मग तीन चार वर्षांनी घराचे नूतनीकरण करतांना त्या जागी दुसरा ओटा, दुसरी गॅसची शेगडी आली. आणि अश्या रीतीने ही चूलही इतिहास जमा झाली. अश्या या सगळ्या हृदयाच्या कुपीत जपून ठेवलेल्या चुलींच्या स्मृती! अचानकच कधीतरी ह्या कुपीचं झाकण उघडतं अन त्या स्मृतींचा मंद दरवळ नकळतच मला भूतकाळात घेऊन जातो आणि त्याबरोबरच चुलीवरच्या गरमागरम, स्वादिष्ट जेवणाची चव जिभेवर रेंगाळायला लागते! 


©मधुमती वऱ्हाडपांडे


Wednesday, April 13, 2022

मुळेबाई

गणपतीस्तोत्र म्हणून झाल,आकडे मोजून झाले,पाढे१९ चा सुद्धा म्हणून झाले पण निद्रादेवी काही प्रसन्न होईना .पण डोक्यातल्या राक्षसाने डोक वर काढू नये म्हणून ,दहावीच्या  वर्गातल्या मैत्रीणी आठवायला सुरवात केली ७५ टक्के आठवल्या.सहजच शिक्षक आठवायला लागले. मुळेबाई, या नावावर गाडीअडली,आणि जाणवल आपल्या आजपर्यंतच्या शालेय जीवनात ह्या नावाशी फारच जवळच नात आहे.  

  .  मुळेबाई, पायान अधु, गोऱ्या,ठेगण्या, दात थोडेसे पुढे ,लांबआकाराचाचेहरा ,अविवाहित,स्वभाव थोडासा.खडुस ,माझ्यावर त्यांचा विशेष लोभ,नाकरिकशास्त्र शिकवायच्या ,त्या ७व्या वर्गाच्या वर्गशिक्षिका होत्या ,दर महिन्यात हजेरीबुकात नाव लिहून घ्यायच्या अक्षर चांगलना आमच! माझेकडून ,काम पूर्ण  झाल की, शाब्बासकी द्यायच्या .त्या वर्षी शाळेत गँदरिंगला मत्स्यगंधा नाटक बसवण चाल होत ,मी आणि जयश्री या नाटकात  होतो, मला पहिला आणि शेवटचा अंकातच काम होत. दुसऱ्या अंकाची प्रँक्टीस सूरु झाली की,मी वर्गात जात असे ,एकदा ऐनवेळी पहिल्या अंकाचीच तालीम करायची ठरली., जयश्री मला बोलवायला आली,.त्यावेळी मुळे बाईंचा पिरेड सुरु होता. तिने बोलावल्याचा निरोप दिल्यावर ,त्या रागातच तिला म्हणाल्या ,

अग स्वतः पिरेड करतच नाहीस तिला तर करू दे . तिने जाऊन राजेबाईंना सांगितल, दुसऱ्या दिवशी फतवा निघाला नाटक होईपर्यंत कुणीही तासिकेला जाणार नाही. ह्या पहिल्या मुळेबाई माझ्या शालेय जीवनातल्या,.

      पुढे शिक्षण झाल, लग्न झाल, नोकरी लागली. पुन्हा एकदा शालेय जीवन सुरु झाल, यावेळी सुध्दा मुळेबाई होत्याच.

         भरतकाम, वीणकाम, वाचन , भरपूर बोलण आणि हसण  ,खाण याची मनापासून आवड असलेल्या विज्ञान शिक्षिका, हसऱ्या चेहऱ्याच्या ,शरीरान स्थूल.पण,एकदम अँकटीव्ह ,स्वभाव कडक पण प्रेमळ ,स्टाफमध्ये सिनीयर, समजावयाच्या, रागवायच्या लगेच प्रेमाने बोलायच्या ,अन्याय खपायचा नाही . विद्यार्थीप्रिय. त्याच्याकडून भरपूर शिकायला मिळाल. वेगवेगळे किस्से ,वाचलेल्या पुस्तकाच कथानक  सांगायच्या . तब्येतीच्या कुरबुरीपाई  सेवानिवृती.घ्यावी लागली .आम्हा दोघींच जरा ज्यास्तीच गुळपीठ होत. फोनवर भरभरुन बोलायच्या , अर्धापाऊण.तासाची निश्चिंती ,वेळ आणि बोलण्याच्या पध्दतीवरुनच सासुबाई म्हणायच्या मुळेबाई आहेत वाटत.

          २००८साली ज्युनीयर कॉलेजला ईतिहास साठी आलेल्या आरती मूळे ,पहिल्या दिवसापासूनच यांची नि माझी छान गट्टी जमली, वयान लहान ,गोऱ्या ,उंच  कविता करणाऱ्या ,विद्यार्थिनींच्या लाडक्या आम्ही दोघी नेहमीच बरोबर रहात असू. मनमोकळ बोलणाऱ्या .

 .....       मी मुख्याध्यापक झाल्यावर निरोपाच्या समारंभात   माझा परिचय करुन देतांना माझ्यावर  छानशी कविता करणाऱ्या.

     .निवडश्रेणी प्रशिक्षणात अनेक वर्ष मी तज्ज्ञ म्हणून होते पण स्त्री शिक्षिका मी एकटीच .२०१४-१५च्या प्रशिक्षणाला माझे बरोबर सहकारी म्हणून आली ती सीमा मुळे. पुन्हा मुळेच.राष्ष्ट्रीय टिळक हायस्कूलची  MSc.  गणित   Phd. हुशार, विविध उपक्रम.राबणारी   मदतीला सदैव तयार असलेली.हिच्याशीही छान गट्टी जमली. 

       मुख्याध्यापक झाल्यावर माझी पुर्वाश्रमीची वसमतकर आम्ही एकाच शाळेत शिकलो, बी.एड.पण बरोबरकेल ती रंजना मुळे , तुझ्या प्रेरणेने पद स्वीकारल , कुठलही काम करतांना आधी कस करायच ,अग अस झाल आता काय करु असा सल्ला मागणारी . मुळेबाई. 

        अशा या पंच मुळेबाई .

      विद्यार्थ्यांचा विचार केला तेव्हा लक्षात आल ,मुळे आडनावाचे अनेक विद्यार्थीसुध्दा आहेत त्यातले काही आजही संपर्कात आहेत.

मुळे आडनावाशी आपला जवळचा नात आहे 

झोप येत नव्हती म्हणून केलेल्या युक्ती मधून हा नवीन शोध लागला.

      सेंकड ईनिंग सुरु झाली त्यातही कुणी मुळेबाई येतात का याची मी वाट.पहाते आहे.


             कल्पना कोलारकर ,अकोला


वधू शोधणे आहे

 साधारण  पाच ते सहा वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता," जावई शोधणे आहे". आता उमेदवार बदलला आहे,त्यामुळे शिर्षकही आणि थोडेफार लेखाचे स्वरूपही. गेल्यावेळी उमेदवार होती आमची छोकरी, राधा. सगळे म्हणायचे, तुमची छोकरी दिसायला छान आहे, स्वभाव गोड आहे, साधी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती डॉक्टर होतेय, तेही स्पेशालिस्ट डॉक्टर. काही प्रॉब्लेम येणार नाही. असं हा हा म्हणता जुळेल लग्न---आम्हालाही काहीसं असच वाटत होतं. ; पण तिचे लग्न जमवताना मात्र खूप अडचणी आल्या, बरेच खराब अनुभव आले आणि बराच मनस्ताप ही झाला.   समाजाचे मेळावे अटेंड केले. इतरही जेवढ्या म्हणून  वधू--वरांना  "परस्परांच्या गळ्यात मारायला" 😉सॉरी, गळ्यात बांधायला अती उत्सुक विवाह जुळवणाऱ्या संस्था असतात, त्या सगळ्यांमध्ये नाव नोंदवून झाले.  समाजात तर मुख्य अडचण होती ती मुलगी मेडिकल प्रोफेशन मध्ये असण्याची. पहिली गोष्ट "नाकापेक्षा मोती जड" वर पक्षाला सहसा मान्य नसतेच. त्यातून मेडिकल लाईन वगळता इतर कॅण्डीडेट्स जास्त करून "इंजिनिअरिंग" क्षेत्रातील-- त्यांना मेडिकल लाईन अजिबातच न चालणारी.  परदेशी शिकणारी मुले शक्यतो यादीतून बाद च व्हायची. कारण "तिकडे" जाऊन परत अभ्यास करा, परत डिग्री मिळवा---असे प्रकार, इतर अडचणी येणार त्या वेगळ्याच. बँक आणि सरकारी कर्मचारी,जसे कलेक्टर वगैरे---सतत 3 ते 4 वर्षांनी बदल्या ठरलेल्या.  मग ह्या डॉक्टर मुलींनी कितीदा आपला संसार आणि क्लिनिक हलवत रहायचे?  बरं ह्या अडचणी सगळ्या समजू शकतो आपण; पण सोशल मीडियावर ऑनलाईन संशोधन करत असताना जो मनस्ताप होतो तो तर "ज्याचे जळते, त्यालाच कळू जाणे". दोन दोन तास त्या पिटुकल्या स्क्रीनवर  डोकेफोड करून हाती काय लागणार? एकतर सतराशे साठ पर्याय--- त्यातून  काही "इंटरेस्ट" असे  येतात की-----मती गुंग व्हावी. 10 वी, 12 वी झालेले, रिक्षा वाले, मेकॅनिक--असले कॅण्डीडेट्स जेव्हा एका डॉक्टर मुलीला इंटरेस्ट पाठवतात, त्यावेळी काय मनस्थिती होत असेल? अशा वेळी "आता माझी सटकली रे--" म्हणत "समोरच्याच्या उरावर बसून थयथया नाचावे की काय इतका संताप व्हायचा. "झुल्फे बहाद्दर असेल तर सरळ झिंज्या उपटून हातात द्याव्या---टकलू  असेल तर त्याच्या  गुळगुळीत टकल्यावर  मस्तपैकी धिंनधिंनाधीन करत तबला वाजवावा,अशी प्रचंड उर्मी उफाळून यायची.( आता ह्या उर्मीचं तरी काय करावं बाई--?)

 अशा वेळी माझा शांत, सोशिक--- स्वभाव वाटला का तुम्हाला? छे: हो. अशा वेळी माझा शांत, सोशिक नवरा धावून यायचा मदतीला आणि मला  "त्या भयंकर उर्मीतून" बाहेर काढायचा. हुश्श! 
मंडळी, लेकीच्या वेळी जो अनुभव तोच थोड्याफार फरकाने लेकाच्या बाबतीत. लोकं म्हणतात, "वराची बाजू भक्कम आणि वधूची बाजू लंगडी"  असं काहीही नसतं बरं .  विवाह संबंध जुळवत असतांना भले भले "लंगडे" होतात.  असो. तर लेकीचा प्रॉब्लेम मेडिकल प्रोफेशन होता; तर लेकाचा प्रोफेशन, "फिल्म लाईन" जी चित्र,विचित्र गैरसमजुती, अनेक प्रकारचे पूर्वग्रहदूषित--वगैरेंनी अगोदरच  "संशयित" ह्या सदरात मोडत असते.  आता प्रत्येक आई बापाला आपली मुलं म्हणजे जगातील सुंदर मुले वाटत असतात. साहजिकच आहे. आणि आहे आमचा मुलगा स्मार्ट. स्मार्ट आहे, मनमिळाऊ आहे, खूप जास्त सेन्सेटिव्ह आहे, केअरिंग आहे----पण हे सगळे गुण "लग्नाच्या बाजारात चालत नाहीत. तिथे "शो-ऑफ" ला, दिखाऊपणाला जास्त  महत्व.. निव्वळ पाणी खरं असून चालत नाही. वधूपक्षाच्या कॉमन अपेक्षा म्हणजे सरकारी नोकरी हवी, उच्चशिक्षित हवा, वेल् सेटल झालेला असावा आणि शक्यतो "शॉर्ट फॅमिली" असणारा हवा.
मुली आता खूप शिकतात, करिअर करतात, बऱ्यापैकी matured झालेल्या असतात, त्यामुळे एकतर "त्यांच्या मतावर फर्म" असतात.  आमचे चिरंजीव "फिल्म इंडस्ट्रीत"  आहेत म्हटल्यावर-- काहींनी विचारले, " फिल्म लाईन म्हणजे---पार्ट्या, ड्रिंक्स---सगळंच आलं. तुमचा मुलगाही "घेत"🍺🍷असेल ना? कधी मधी?" 
 माझा चेहरा समोरच्याला फोनवर दिसत नाहीये हे पक्क माहीत असूनही मी बापडी अगदी केविलवाणा चेहरा करून म्हणणार, " नाही हो.😞आमचा मुलगा " घेत" ही नाही आणि "देत"👊ही नाही. फारच साधा सरळ आहे हो तो. पण हे देखील आजकाल कुणाला पचनी पडत नाही.  त्यात आमचा  मुलगा आमच्याकडे वाजवीपेक्षा जास्त लक्ष देतो, किंवा तो "ममाज बॉय" आहे म्हटलं तर तिकडे लागलीच लग्न ठरण्याअगोदरच  मुलीचे "स्थान डळमळीत" व्हायला सुरुवात होणार.🤦‍♀️😄"पदभार" सांभाळण्या आधीच तिच्या अढळ पदाला धक्का लागणार.
एकाने तर मला अक्षरशः हैराण केलं. प्रथम फोन मी केला होता अर्थात, मुलीची चौकशी करण्यासाठी. तर तिकडून मुलीचे वडील----" तुम्ही काय सुरेख बोलता हो---तुमचा आवाज किती गोड वाटतो ऐकायला🙄---माझ्या बायकोला असलं छान बोलणं जमतच नाही😲
तुम्ही मला या आधी का नाही भेटलात?" My God!😇🤔
नंतर सद्गृहस्थ म्हणतात, गम्मत केली हो, माझा स्वभाव आहे तो-- काही मनावर घेऊ नका--" मनात म्हटलं, लग्न जुळण्याआधी जर ही "अशी" चेष्टा? तर मग जुळल्यानंतर, झाल्यानंतर "कशी" चेष्टा करशील बाबा तू?😂 काहींनी विशेषतः मुलीच्या आई मंडळींनी विचारलं, "त्याला गर्ल फ्रेंड" तर असेलच---" मी परत न दिसणारा गरीब चेहरा करून म्हटलं, " फ्रेंड्स आहेत बऱ्याच; पण खास अशी गर्ल फ्रेंड नाही हो कुणी" 
असंच अजून बरच काही---- 
खरं तर आजकाल पार्टीज, ड्रिंक्स  हे सगळं इतकं कॉमन झालंय आणि ते सगळ्यांना माहीत आहे म्हणजे कल्पना असतेच तशी. आणि गर्ल फ्रेंड चं म्हणाल तर शाळकरी मुलांना देखील असते हो. अगदी दुसरी,तिसरीत असल्यापासून मला ती आवडते किंवा तो आवडतो असे जेव्हा वाचायला ,ऐकायला मिळते तेव्हा नवलच वाटते. अशा परिस्थितीत आमचं लेकरू ह्या सगळ्यांपासून जाणूनबुजून दूर रहातो हे सांगूनही कुणाला कसे पटावे?😊
परवा तर आमचीच एक मैत्रीण म्हटली, जॉब लागल्या लागल्या काही लगेच लग्न करून द्यायची घाई करू नये. चांगलं "मोकळेपणी" 😉हुंदडू द्यावं मुलांना, चार दोन अफेअर होऊ द्यावीत😲  😄😄अर्थात, तिच्या लेकीचं लग्न झालेलं आहे आणि जावई संशोधन थांबलेलं आहे त्यामुळे ती अगदी सहज हे बोलू शकली. असो.
आम्ही तर लेकाला स्पष्टपणे सांगून टाकलंय, बाबा रे, आण तुझ्याच पसंतीची  मुलगी. चालेल आम्हाला. 
लेकीच्या वर -संशोधनावेळी "होणार सून मी---" ही मालिका सुरू होती आणि ती प्रचंड गाजतही होती. त्यावेळी मला सारखं वाटायचं की माझ्या लेकीला शशांक केतकर सारखा जोडीदार मिळायला हवा. अर्थात, तिला त्याच्यापेक्षाही स्मार्ट जोडीदार मिळाला, हा भाग वेगळा; पण लेकाच्या वेळी कुठल्या मालिकांमध्येही अशी कुणी मुलगी दिसत नाही किंवा आवडत नाही की "हिच्यासारखीच हवी" आपल्या लेकाची लाईफ पार्टनर---- आदर्श सुना बऱ्याच असतात तशा मालिकांमध्ये---- पण आजकाल तर चेहरेही धड दिसत नाहीत.😞
तुमच्या बघण्यात कुणी असेल तर सांगा बुवा----आमच्या सुयोग्य वरासाठी ----सुयोग्य वधू-----🙏😊

माणिक नेरकर.