Monday, March 15, 2021

जीवन मे एक बार जाना मालदीव...

 डिसेंबर मधे ,लोकांच्या मनात ट्रिप ला जाण्याचे वगैरे विचार येण्याइतपत कोविड चा प्रादुर्भाव कमी झाला! त्याच दरम्यान सिन्नर च्या डॉक्टर क्षत्रिय चा फोन आला,  'फेब्रुवारी मध्ये मालदीव ला जायचं का?'

फुकेत क्राबी टूर केला तेंव्हाच मालदीव चा प्लॅन बनला होता ,पण कोविड मुळे एक वर्ष असच गेलं.
आत्ता पण फेब्रुवारी पर्यंत वॅक्सिंन होईल
असा अंदाज होता ,त्यामुळे त्यांना हो म्हंटल. बुकिंग डॉ.क्षत्रिय च करणार होते.
डिसेंबर ,जानेवारी काही न काही कारणाने गडबडीत गेले ,त्यामुळे बुकिंग नक्की कधी कोण कोण येणार,मुंबई ला कधी जायचं, परत कधी येणार हे ऐकून होते,पण लक्षात रहात नव्हतं.
फेब्रुवारी उजाडला, आता मात्र तयारीला लागावं लागणार होतं.
त्यातून तनु ची एंगेजमेंट 27 फेब.ला सांगलीला करायची ठरली. त्यामुळे आधी लगीन कोंढाण्याचं (मालदीव) मग रायबाच (एंगेजमेंट) अस करून चालणार नव्हतं !
कारण मालदीवला 16 ला निघून 22 ला अकोल्याला येणार अन लगेच 25 ला सांगलीसाठी निघणार होतो.
मधे वेळ कमी होता ,त्यामुळे दोन्ही लग्न (तयारी)एकाच वेळेला करावी लागणार होती.
एकीकडे मिनी ड्रेस ,शॉर्टस,स्कर्टस सनस्क्रीन तर दुसरीकडे साडी ,ब्लॉउज,बांगड्या ,टिकली,
अश्या परस्पराविरोधी आघाडीवर लढाई सुरू होती.
लढाई वगैरे असे मोठे शब्द वापरलेत खरे, पण प्रत्यक्षात मात्र ,सगळी तयारी आरामात वेळेआधीच पार पडली.
काही बारीक सारीक काम फक्त बाकी होते.
मालदीव ला जाताना भरायच्या फॉर्म्स ची लिंक ग्रुप वर आली होती, ते काही फार किचकट काम असेल असं वाटलं नाही, सुभाष ते बघणार होता.
फॉर्म्स बघून मात्र तो वैतागून म्हणाला ,'कुठून मालदीव ट्रिप ठरवली अस झालं,कोरोना संपेपर्यंत विदेशात ट्रिप काढायलाच नको होती'.किती प्रकारचे फॉर्म्स आहेत हे !'
मी म्हंटल मला प्रिंटआऊट काढून दे मी बघते ते सावकाश. जाताना एकच हेल्थ declaration फॉर्म होता.येताना मात्र 2,3 फॉर्म्स होते.
फार काही कठीण नव्हतं पण तो ऑनलाइन भरायचा असल्याने नीट जमेल की नाही अस सुभाष ला वाटत होतं.
   आरोग्य सेतू पण आवश्यक होतं.
 RTpcr टेस्ट departure च्या 96 तास आधी करायची होती.आणि हा health declaration फॉर्म departure च्या 24 तास आधी भरायचा होता.
Rtpcr टेस्ट ,कुठे 96 तास तर कुठे 48 तास आधी लिहिलं होतं,ते एक confusion होता, एजंट ला विचारून ते क्लिअर झालं.
गुरुवारी मुंबई हुन फ्लाईट होत ,सोमवारी RTPCR साठी सॅम्पल दिलं. सॅम्पल मुंबई ला पाठवून रिपोर्ट मंगळवार संध्याकाळ पर्यंत द्यायचा प्रयत्न करतो ,अस लॅब वाल्या नि सांगितलं. रिस्क नको म्हणून आम्ही IMA ला जाऊन ही सॅम्पल देऊन आलो.दोन पैकी एक तरी रिपोर्ट वेळेत मिळावा हा उद्देश!
मंगळवारी रात्री पर्यंत दोन्ही रिपोर्ट आले नाहीत ,आम्ही मुंबईसाठी बुधवारीच गीतांजली नि निघणार होतो.
त्यात दोन दिवस आधी ,खेळताना माझा पाय लचकला, x-ray काढला,fracture नव्हतं ,पण दुखणं बरच पूरणार होत.
तिथे किती फिरावं लागणार आहे माहिती नव्हत (itinerary पहिली नव्हती अजूनही).
लंगड्या पायांनी कस फिरायचं?हे एक टेन्शन, रिपोर्ट आले नाहीत हे पण एक टेन्शन होतच !अन आले तर,रिपोर्ट निगेटिव्ह येतील की नाही?  पोसिटीव्ह आले तर कुठलं मालदीव अन कुठलं काय, सगळं मुसळ केरात !
या सगळ्या शक्यता गृहीत धरून ,'जे जे होईल ते ते पहावे' उद्या काय होईल ते बघू ,असा विचार करून शांतपणे झोपलो.

जीवन मे बार बार जाना मालदीव..

सकाळ उजाडली तीच मुळी आनंदाची बातमी घेऊन.रात्री उशिरा आमचे रिपोर्ट आले अन ते ही निगेटीव्ह.बाकी येणाऱ्या मेंबर्स चे(सिन्नर,नासिक,कर्नाल,अकोला असे आम्ही 28जण होतो) रिपोर्ट पण निगेटिव्ह असल्याचं ग्रुप वर कळलं. एक बाजी जिंकली होती.लगेच नऊ वाजता हेल्थ declaration फार्म सबमिट केला. त्याचा कोड पण आला, हुश्श!
आता निश्चिन्त झाल्यामुळे बाकी गोष्टी सुचायला लागल्या.आमचा कोविड चा बुस्टर डोस त्याच दिवशी होता. तो पण घेतला आणि गीतांजली नि मुंबई ला निघालो.
रात्री हॉटेल ला पोचेपर्यंत 11 वाजले.
सकाळी 9 च फ्लाईट ,होत  5.30 ला  एअरपोर्ट ला पोचलो.बाकी सगळे पोचले होतेच. अंजु विनायक, अन सिन्नर चे क्षत्रीय सोडले तर बाकी कोणी ओळखीचं नव्हतं ,पहिले सगळ्यांशी ओळख करून घेतली.
एअरपोर्ट वरचे बाकी सोपस्कार पार पडून बरोबर नऊ ला फ्लाईट निघालं.
डोक्याला मेहेंदी असणारे अन हाताला मेहेंदी असणारे असे ठळकपणे दोन ग्रुप फ्लाईट मध्ये होते. तीन तास वेळ लागणार होता ,प्रत्यक्षात पाऊण तास आधीच मालदीव ला पोचणार असल्याची घोषणा झाली.
5 लाख लोकसंख्या असलेला मालदीव देश म्हणजे हिंदी महासागरा मधे असलेली 1200 बेटांची साखळी आहे.
यातल्या दोन एकशे बेटावर वस्ती अन अंदाजे तेवढ्याच बेटांवर रिसॉर्ट आहेत.बाकी ठिकाणी शेती होते. मुख्यत्वे पर्यटनावर इथली इकॉनॉमी अवलंबून  आहे.हा इस्लाम धर्मीय देश असून, दिवेही ही त्यांची भाषा,जी बऱ्यापैकी उर्दू शी साधर्म्य सांगणारी आहे.
इथे मल्याळी पण बरेच आहेत.रुपाहिया हे इथलं चलन ,पण डॉलर मधे व्यवहार जास्त चालतात.
माले एअरपोर्ट ला आम्ही उतरलो. एअरपोर्ट खूपच छोटंआहे.immegration ला फार वेळ लागला नाही.हेल्थ declaration फॉर्म बद्दल तर कोणी विचारलही नाही. RTPCR report ला मात्र  पासपोर्ट एवढं महत्व होत, तो सगळीकडे दाखवावा लागला.
तिथून बाहेर आलो ,समोरच निळ्याशार  समुद्राचं दर्शन झालं. पुढचे तीन दिवस, आपले डोळे निळे झाले की काय ,अशी शंका येण्याइतपत हा निळा रंग सतत सोबतीला होता.
तिथून स्पीड बोटनी ,नकाई ढिगरि या आमच्या रिसॉर्ट ला निघालो.जवळ जवळ दीड तास लागला पोचायला. 
रिसॉर्ट खुपच सुंदर होत.पोचल्या पोचल्या, एकदम चवदार,रंगीबेरंगी welcome drink नी आमचं स्वागत झालं. मग एका चुणचुणीत मुलींनी ,रिसॉर्ट बद्दल सगळी माहिती दिली।काय फ्री आहे ,कशाचे चार्जेस लागतील ,लंच डिनर ब्रेकफास्ट कुठे लागेल हे सगळं सांगितलं.स्नॅक्स आणि ड्रिंक्स (हार्ड ,सॉफ्ट दोन्ही) तिथे कितीही घ्या ,फ्री होत. वेलकम ड्रिंक म्हणून दिलेला ज्युस मात्र परत मिळाला नाही।दुसऱ्या दिवशी तसाच ज्युस बनऊन आणायला सांगितला,तर आपका वेलकम खतम ,ज्युस खतम अस उत्तर मिळाल!
लंच ची वेळ होऊन गेली होती ,त्यामुळे आम्ही पिझ्झा आणि ज्युस वर ताव मारला .
थकलो होतो त्यामुळे रूम कडे निघालो. रेस्टॉरंट पासून बरच चालावं लागलं रूम पर्यंत पोचायला.
 रूम पाहून सगळा थकवा पळाला, लहान मुलासारखं आनंदानी उडी मारली (मनातल्या मनात )!
 रूम तर सुंदरच होती, त्याची रचना पण कल्पकतेने केली होती. बेड समोर  पूर्ण फ्रेंच डोअर होते. अन रूम मधून बाहेर एक ओपन प्लॅटफॉर्म होता,तिथे दोन बीच चेअर,दोन आरामदायक मोठ्या खुर्च्या ,एक लोखंडी टेबल अन दोन लोखंडी खुर्च्या होत्या.अन समोर, निळ्या रंगाच शेड कार्ड उलगडून ठेवल्यासारखा,  दिसणारा अथांग समुद्र! बर समुद्राचं पाणी पण इतकं स्वछ की पडलेली टाचणी सुद्धा दिसेल.अतिशय देखणा समुद्र आहे इथला.
सौंदर्याचं विश्लेषण करू नये त्याचा फक्त आस्वाद घ्यावा असं म्हणतात, त्यामुळे तिथे तर नाही पण परत आल्यावर ,तिथल्या निळ्या क्रिस्टल क्लिअर पाण्याबद्दल वाचलं। सॉल्ट कन्टेन्ट ,व सूर्यप्रकाश भरपूर, प्रदूषण नाही त्यामुळे  तिथे algi ची वाढ होत नाही, शिवाय खाली असणारी शुभ्र वाळू यामुळे तिथलं पाणी स्फटिकसारखं स्वछ आहे.
समुद्र आकाशाला रिफ्लेक्ट करतो  ,मालदीव ला नेहमीच स्वछ नीळ आभाळ असत, तसच पाण्यात असणारे phytoplankton microbs जे bioluminescent आहेत ,निळा प्रकाश सोडतात म्हणून इथलं पाणी निळसर छटा असलेलं आहे।(सौजन्य -- गुगल काकू).
असो-
 आम्हाला सगळ्यात आवडलेली जागा म्हणजे रूम बाहेरचा प्लॅटफॉर्म ! रूमपेक्षा जास्त वेळ आम्ही इथेच घालवला.
थोडा आराम करून तयार होऊन रिसॉर्ट बघायला  निघालो.
हे रिसॉर्ट एक इटालियन माणसाचं आहे ।इथला स्टाफ पण बऱ्यापैकी इटालियन होता. साधारण पाच एकर च हे बेट. समुद्रापासून फक्त पाच सहा फूट उंचीवर आहे,पण इथे भरती किंवा सुनामी च्या वेळेला ही रिसॉर्ट पर्यंत पाणी येत नाही असं कळल. इथे 34 वॉटर विला, 27 बीच विला आहेत। वॉटर विला समुद्राच्या बऱ्यापैकी आत, Y आकारात बांधल्या आहेत ,त्यामुळे रूम च्या समोर अन मागे दोन्ही कडे समुद्र।
सगळीकडे सपीठासारखी पांढरी शुभ्र वाळू ,नारळाची व बाकी पण अनेक झाड होती.फोटो साठी अनेक स्पॉट कल्पकतेने तयार केले होते.प्री वेडिंग,पोस्ट वेडिंग फोटोशूट करणारे बरेच कपल तिथे दिसले. त्यांच्या कडे पाहून आमचं पण छान मनोरंजन झालं.
रेस्टॉरंट मध्ये भरपूर सोफे ,चेअर मांडून ठेवलेले होते. वायफाय रूम मध्ये नसल्यामुळे इथेच लोकांचा डेरा  असायचा. त्याच्या बाजूला जेवणासाठी टेबल खुर्च्या मांडल्या होत्या.सगळीकडे फक्त वर छप्पर ,पण आजूबाजूला कुठेही भिंती नव्हत्या.समुद्र हा इथला USP ,तो सगळीकडून ठळकपणे दिसेल याची काळजी घेतलेली !बीच वरही खुर्च्या टेबल लावलेले होते.
या रिसॉर्ट वरच तीन दिवस आम्हाला राहायचं होत.कुठे जायची घाई नाही ,काही धावपळ नाही.खायचं प्यायचं ,मनात येईल तेंव्हा आराम करायचा, छान तयार व्हायचं अन ढीगभर फोटो काढायचे!  एकदम निवांत !
आम्ही तर जास्तीत जास्त वेळ रूम बाहेर च्या प्लॅटफॉर्म वर घालवला.बाहेर ऊन असल तरी वार खूप गार असायचं. सकाळचा चहा ,आराम ,दुपारचा चहा -स्नॅक्स, गाणी लावून डान्स करण गप्पा ,सगळं एका कोणाच्यातरी रूम मध्ये जमून ,इथेच केलं। 
रात्री शांत वातावरणात, बाहेर बसायचं ,चांदण्यांनी भरलेलं आकाश ,समोर समुद्र ,फक्त लाटांचा आवाज! कधी साथीला मोबाईल वर लावलेल्या जुन्या गाण्याचा आवाज!
 'सुख म्हणजे नक्की काय असत?' याच जणू हे उत्तर .इतकं भारी वाटायचं न की बास ! 
संध्याकाळ, आकाशात चाललेला विविध रंगांचा खेळ आणि सनसेट  बघत  बीच वर घालवायची. एक दिवस तर बीच वर गाणी लावून सगळ्यांनी डान्स केला. दोन तीन हनिमून कपल पण जॉईन झाले, खूप धमाल आली!
 तिथल्या समुद्रात शार्क खूप आहेत.एक दिवस फिश फीडिंग बघायला गेलो,मांसाचे तुकडे टाकले ,की मोठं मोठाले शार्क ते घ्यायला गर्दी करायचे।एकमेकांच्या अंगावर उडया मारून मांसाचा तुकडा खाण्याची त्यांची धडपड असायची। तिथल्या शार्कस ला माणसाची सवय आहे ,ते काही करत नाहीत।किनाऱ्याच्या अगदी जवळ सुद्धा ते आरामात दिसून यायचे.
तिथे स्नोरकेलिंग ,स्कुबा डायव्हीग ,कयाकिंग हे पण सगळं होत।
आपण स्नोरकलिंग करू म्हणून अंजु मागे लागली. फुकेत ला समुद्राच्या मध्यभागी बोट नेऊन स्नोरकलिंग करायचं होतं.लाईफ जॅकेट वगैरे घालूनही माझी हिम्मत झाली नव्हती ,पोहता येत नाही त्यामुळे पाय टेकले नाही की भीती वाटते (आपले पाय नेहमी जमिनीवर असावे याची मी स्ट्रॉंग सपोर्टर आहे😊).तिथून आल्यावर आपण पोहणं शिकायचं अस ठरवून स्वीमिंग सुरू ही केलं आणि कोविड मुळे ,3,4 दिवसात ते बंद ही पडलं.
 मागच्या अनुभवावरून मी अंजु ला नाहीच म्हंटल पण तिनी ऐकलं नाही . शेवटी ऑफीस ला जाऊन बुकिंग केलं.सगळा जामानिमा करून तयार झालो ,आमची ट्रेनर सरीन नावाची गोड मुलगी होती. मला भीती तर खूप वाटत होती।समुद्रात आत जाण्याआधी तिनी श्वास कसा घ्यायचा ,पाणी आत गेल तर कसं काढायचं वगैरे समजावून सांगितलं.पाण्यात डोकं घालून ट्रायल घ्यायला लावली ,पण मी लगेच डोकं वर काढायची. मला नाही जमत मी परत जाते अस दोघींनाही म्हणाले. शेवटी सरीन म्हणाली ,"पैसे तर तुम्हाला तसेही परत मिळणार नाहीत, डोकं वर ठेऊनच तुम्ही या ,फिश दिसली की मी सांगते मग डोकं आत टाका, एक तरी फिश तुम्ही बघा मग परत जा." शेवटी हो नाही करत तयार झाले।रबरी ट्यूब ला घट्ट धरून तिच्या मागे समुद्रात दूरवर गेले ,तिनी आवाज देऊन खाली बघायला सांगितलं.खाली पाहिलं मात्र अन मग संमोहित झाल्यासारखं स्वतःला निळ्या दरीत झोकून गपगुमान तिच्या मागे जायला लागले. काय अद्भुत विश्व होत समुद्राखालच! रंगीबेरंगी, वेगवेगळे  डिझाइन अंगावर मिरवणारे,लहान मोठे मासे ,सुंदर आकाराचे कोरल्स ,एक शार्क पण दिसला. हे सगळं इतकं सुंदर बघत असतानाही मधेच ,मनातली भीती डोकं वर काढायची, की मी पण पाण्याबाहेर डोकं काढून किनारा जवळ आला का बघायचे.एकदा तर ,'अंजु मला परत जायचं अस पण म्हंटल ,पण अंजु नि माझ्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी किनारा आला ,अन मला हायस वाटलं।)! भीती पायी आपल्याला सौंदर्याचा नीट आस्वाद घेता आला नाही ,याची रुखरुख अजूनही वाटतेय.
जाण्याचा दिवस जवळ आला. परत जाताना स्पीड बोटी ऐवजी सी -प्लेन नी एअरपोर्ट ला जाऊ असा विचार आम्ही केला होता .सी प्लेन 20 मी. तच पोचवत ,बोटी नि दीड तास लागतो.पण त्याच्या तिकिटांची चौकशी केली तर एकाच तिकीट चौदा हजार पडणार होत.हे ऐकल्यावर स्पीड बोटींनी समुद्राचं सौंदर्य बघत जायला जास्त मजा येईल यावर सगळ्यांच एकमत झालं.
दोन दिवस आधीपासून सगळीकडे परत lockdown होतंय अशा बातम्या कानावर पडत होत्या ,पण मेंदू पर्यंत त्या पोचत नव्हत्या. परतीचे वेध लागल्यावर मात्र मुंबई ला rtpcr करून थांबवून ठेवलं तर काय करायचं ,पोसिटीव्ह आलो तर कसं होईल, engagment ला जाता नाही आलं तर कसं?असे प्रश्न पडायला लागले.पण सुदैवाने मुंबई एअरपोर्ट वर rtpcr करून त्यांनी घरी जाऊ दिल ,रिपोर्ट चा मेसेज येणार होता.ते रिपोर्ट पण निगेटिव्ह आले.आम्ही सुखरूप अकोल्याला पोचलो.
 अशी कोविड च्या छायेत केलेली मालदीव ट्रिप सुफळ संपूर्ण झाली.  
जीवन मे एक बार नाही बार बार मालदीव ला जायला नक्की आवडेल !

Sunday, March 14, 2021

कपाट

  

" अरे, आपल्या घरात ना खूप कपाटं झालीयेत , आपण काही कपाटं कमी करू " एक दिवस सकाळी सकाळी ( रविवार सकाळ हं )मी हे जाहीर करून टाकलं . हातात मोबाईल , कानाशी tv असल्याने पहिला प्रयत्न अर्थातच  वाया गेला पण मला त्याची सवय असल्याने मी परत तोच डायलॉग ' अरे' च्या ऐवजी ' अहो' टाकून म्हटला , अपेक्षित परिणाम झाला ,   

   'अं , कुठे आहेत इतकी कपाटं ?आणि सामान आहे नं त्यात ?   ' असा प्रतिवाद करून डोळे परत मोबाईल मध्ये गुंतले पण मी " आज मै हार नहीं मानूंगी " च्या मूड मध्ये होती त्यामुळे , 
' अरे सामान कमी करू मग , उगीचच जागा आहे म्हणून ठेवल्या जातंय , ती कपाटं पण जुनी , खराब दिसतायेत आता ' असे म्हणून  मुद्दा लावून धरला .
" बरं आधी सामान काय कमी होतंय ते बघ , मग ठरवू ." 

          हे असे संवाद प्रत्येकच घरात हमखास होतच असतील . आमच्या घरात जितकी माणसं आहेत त्याच्या दुप्पट लहानमोठी कपाटं आहेत . माझ्या आजे सासुसासऱ्यांच्या काळातली सुदधा 2 कपाटं आमच्याकडे आहेत तरी ह्यात स्वयंपाकघरातली कपाटं धरलीच नाहीत . पूर्वी आपल्या मध्यमवर्गीय घरांमधून गोदरेजचं एकमेव कपाट असायचं आणि त्यात एका कुटुंबाचे सगळे कपडे अगदी सणासुदीला घालायचे सुद्धा  आरामात मावायचे शिवाय कपाटातल्या खालच्या कप्प्यात इतर सटरफटर समान , कलाकुसरीच्या वस्तूंना लागणारा कच्चा माल , लोकरीचे गुंडे हे सगळं असायचं , आता हे लिहितांना सुध्दा माझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये आणि तुमचंही " अरेच्चा , खरच की" असं होतंय , बरोबर ना ? ' मिनीमालिझम ' हे आपण तेव्हा सहज पाळत होतो आणि आता ते पाळायचे फक्त ठरवतो आहे पण अजून जमत नाहीये हे खरं . 

          फार पूर्वी वाडा संस्कृती असताना घरात माणसं जास्त तसे सामानही जास्त असे पण त्यात कपडे हा ऐवज मुळातच कमी असे आणि बंद कपाटापेक्षा फडताळ , ट्रंक , डबे , गाठोडी , बोचकी , खुंट्या ह्यातून वस्तू , दागदागिने ठेवण्याची पद्धत होती . घरातल्या कर्त्या पुरुषाच्या नावे फक्त एक बंद कपाट असे . पुढे  'हम दो हमारे दो ' चा काळ आला तशी कुटुंब छोटी व्हायला लागली आणि संसार साधारण 3 खोल्यांमध्ये ( खरंतर अडीच) सामावू लागला .  शहरी वातावरणामुळे घरं आटोपशीर ठेवण्याकडे कल वाढत गेला मग भिंतीतल्या कप्प्याना , माळ्यांना साड्यांचे झुळझुळीत पडदे आले आणि कपडे , महत्वाची कागदपत्रं , दागिने ठेवण्यासाठी गोदरेज चे कपाट घराघरात अवतीर्ण झाले . त्याकाळी लग्नात सगळ्यांनी मिळून हे कपाट अहेर म्हणून देण्याची जणू पद्धतच पडली . कपाटाच्या वर " चि. सौ. का. ......ताईला " असे लिहून पुढे नावाची जंत्री असणारी कपाटं मी माझ्या लहानपणी बघितलेली आहेत अर्थात ह्या कपाटांचं उपयोगीत्व निर्विवाद आहे .  'गोदरेजचं कपाट ' आणि ' पार्ले जी '  ची बिस्किटं ह्या दोन गोष्टी जगाच्या अंतापर्यंत राहणार असं माझं ठाम मत आहे .

         

पुढे साधारण 1990 नंतर हा मध्यमवर्ग  हळुहळू उच्चमध्यमवर्गात जाऊ लागला , उपग्रह वाहिन्यांच्या कृपेने जग जवळ येऊ लागले . स्त्रिया आर्थिकदृष्ट्या काहीशा स्वतंत्र होऊ लागल्या , समाजातला तिचा वावर वाढला आणि ' तिच्या ' सोयीनी , आवडीने घरांची रचना होऊ लागली . बैठी ,अंगण असलेली घरं कमी होऊ लागली , महानगरातून तर जवळपास नामशेष झाली आणि त्यांची जागा फ्लॅटसंस्कृतीनी घेतली . इनमिन 4 खोल्यांमध्ये अख्खा संसार ठेवायचा आणि परत सगळं कसं टिपटॉप दिसलं पाहिजे म्हणून मग जागा मिळेल तिथे कपाटं झाली , माळ्याच्या जागी कपाटं , बेडच्या , सोफ्याच्या आत कपाटं , स्वयंपाकघरात खास तिथल्या वस्तू ठेवायला म्हणून त्या पद्धतीने केलेली कपाटं शिवाय ते unbeatable गोदरेजचं कपाट असतंच आणि ह्या सगळ्यात तुडुंब भरलेलं सामान . मग कधीतरी महत्प्रयासाने त्यातलं काही सामान कमी केल्या जातं आणि थोड्याच दिवसात दुप्पट भरलं जातं आणि ते मनातलं मिनीमालिझम कुठेतरी माळ्यावरच्या बंद कपाटात ठेवून द्यावं लागतं , आपल्या बायकांचा जीव तर साड्या , ड्रेस , दागिने ह्यात इतका अडकलेला  असतो की खरंतर आपल्याला काहीच कमी करायचं नसतं पण नवं घ्यायचं तर असतं . माझ्या एका मैत्रिणीने ह्यावर एक भन्नाट आयडिया शोधून काढलीय ती लोकांना कपाटं भाड्याने देणार आहे , आपण दागिने जसे लॉकरमध्ये ठेवतो तसे तिच्याकडे जायचं आणि आपले जुने पण हवे असलेले कपडे त्यात ठेवायचे , काहीसं हटके असलेलं तिचे हे स्वप्न लौकर पूर्ण होवो हीच कामना . 

          मी मात्र ह्यावर माझ्या पद्धतीने मार्ग शोधलाय , मी कपाटंच कमी करण्याचं ठरवलंय . मागच्या रविवारी मी 2 कपाटं रिकामी केली पण ती घराबाहेर जाण्याच्या आता त्यात परत काहीतरी भरल्या गेलं , अर्थात
कपाटं रिकामी करण्याचे श्रम एका वेगळ्याच अर्थाने सार्थकी लागले , एक जुनं antique म्हणावं असं कपाट मी माझ्या बहुमूल्य पुस्तकांसाठी मिळवलं आणि आपल्या पुस्तकांसाठी एक स्वतंत्र कपाट असावं हे माझं कधीचं स्वप्न पूर्ण झालं .

          आज परत भंगारवाला दिसला मी परत अहोंना आवाज दिला पण हाय रे कर्मा !!..., "सध्या तुला काही त्याची अडचण होतेय का ?...नंतर बघू...." असे म्हणून माझी बोळवण करण्यात आली पण मी ठरवलंय ना , " मैं हार नहीं मानूंगी " त्यामुळे प्रयत्न चालू ठेवावे लागतील बघूया यश कधी येतंय ते 

ॐ सूर्याय नमः

 


सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण काय असते, हे दर महिन्याला एकाच ठिकाणाहून काढलेल्या सुर्योदयाच्या या छायाचित्रांवरून स्पष्ट होईल अशी पोस्ट आणि फोटो असे व्हॉटस् अप वर बघितले आणि याचा अनुभव मी पण घेते हे जाणवले. मी तर सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही चा अनुभव घेते कारण दक्षिणेकडे असलेली गॅलरी!


दक्षिणदिशा म्हणजे यमाची दिशा, घराचा दरवाजा दक्षिणेला नको, गॅस दक्षिण दिशेला नको हे आणि असे अनेक नकारात्मक नियम दक्षिण दिशेसाठी वास्तुशास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे. पण दक्षिण दिशा सुध्दा तितकीच महत्वाची आणि चांगली दिशा हे स्वतः अनुभवले आहे. एरवी भूगोल आणि दिशा ज्ञानाची माझी दशा कि दुर्दशा मलाच माहीत... शाळेत असताना भूगोल बरोबर मी पण गोल गोल फिरले. त्यातल्या त्यात नैऋत्य, आग्नेय, ईशान्य वायव्य (पहा आजही वायव्य दिशा आठवून आठवून लिहिली... देवाशप्पथ!! ) या दिशा आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता... मला ते राक्षस, राक्षसिणींचे नावे वाटायची आणि ते विकट हसत माझा खातमा करतायत असा भास होऊन मी अजूनच घाबरून गोंधळून जात होते. त्यात भर त्या वार्‍यांची... नैऋत्य मौसमी वारे, खारे वारे, मतलई वारे... अरे वा रे   वारे! भूगोल वार्‍याला उभे करीत नव्हता. ग्रहतारे ते तर बिचारे एका जागी स्वस्थ बसले नाहीत आणि मला पण स्वस्थ बसू दिले नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो स्वतः भोवती फिरतो अरे फिरु द्या ना त्यांना आमचा मेंदू का गरगर फिरवता असे विचारावे वाटायचे पण शाळकरी वयात कधी हिंमत झाली नाही. असो. पण दक्षिणेकडील गॅलरीत उभे राहून जेव्हा मी सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर विहंगम दृष्य रोज पाहू लागले, खास करून सूर्य जेव्हा दक्षिण गोलार्धात असतो तेव्हाच हे दृष्टीसुख घेता येते त्यामुळे भूगोला विषयी आवड, उत्सुकता निर्माण झाली. आकाशातला तो सुंदर, मनमोहक नजारा एकीकडे पश्चिमेला सूर्य अस्ताला क्षितिजावर सोनेरी, तांबडा होऊन निरोप घेण्याच्या घाईत आणि पूर्वेला निळसर राखाडी आकाशात चंद्राची नाजूक, कोमल कोर हसून आपल्याकडे बघत असते कळतच नाही हिचे स्वागत करावे की सूर्याला निरोप द्यावा... कधी कधी शुक्राची तेजस्वी चांदणी पण चंद्रकोरी सोबत असते. इतके विस्तीर्ण, अथांग आकाश मी कधी पाहिलेच नव्हते जितके मी ते इथे अनुभवते आहे. आकाशाचे मन मोहून टाकणारे रंग, आकार नुसते बघत रहावे... तरी मन भरत नाही. हळूहळू मला दिशा ज्ञान समजू लागले आणि समजले नाही तरी आता ताण नाही कारण मोबाईल मध्ये कंपास आहे माझ्या मदतीला.
23 सप्टेंबर आणि 22 मार्च हे दोन दिवस समान दिवस रात्रीचे असतात. त्यानंतर सूर्य जसजसा उत्तरेला सरकतो तसतसा दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते. तुम्ही म्हणाल हे भौगोलिक ज्ञान का बरं सांगते पण खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा मी सूर्याला एका टेकडीवरून दुसर्‍या टेकडीवर  रोज हळूहळू खाली घसरतांना बघते...  रोज थोडा थोडा खाली येत येत तो मार्च च्या शेवटी दिसेनासा होतो पूर्णपणे उत्तर गोलार्धात जातो, आणि आमची गॅलरी सुनी सुनी वाटायला लागते. 23 सप्टेंबर नंतर पुन्हा दक्षिण गोलार्धात शिरणे सुरू होते. काही दिवस असे सुने गेले आणि उन्हाची तीव्रता वाढायला लागली की मग मात्र ही थंड गॅलरीच आवडू लागते. मन चंद्रोदय आणि चंद्रास्ताचा आनंद घेवू लागते.पण चंद्राच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळांमध्ये खूप बदल असतात सूर्या सारख्या ठरलेल्या नसतात. त्यामुळे चंद्राचे दर्शन अनिश्चित असते. पूर्ण हिवाळा घरावर सूर्याचा प्रेमळ उबदार स्पर्श साथ देतो तर उन्हाळ्यात थंडावा. आधी कधी असा अनुभव आलाच नाही, आधी याच्या उलट हिवाळ्यात थंडगार घर आणि उन्हाळ्यात अक्षरशः भट्टी असायची हे असे काही भौगोलिक कारण लक्षातच आले नाही (त्या द्रुष्टीने कधी विचारच केला नाही. ) त्यामुळे हा वेगळा  सुखद अनुभव   विस्मयचकित करून गेला. दक्षिण दिशेची गॅलरी किंवा खिडकी ही  उत्साहवर्धक असते हे लक्षात आले. शेवटी आपल्या मानण्यावर सगळे अवलंबून असते मन चंगा तो सब चंगा. दिशेनी काही फरक पडत नाही हे पुन्हा अधोरेखित झाले. 


लडाखचे  सोनम वांगचुक (थ्री इडियट्स फेम फुंगसुक वांगडू) यांनी लडाखला भारतीय सैनिकांसाठी तंबू बनवले ते दक्षिण दिशेचा वापर करूनच बनवले. हे असेच तंबू त्यांनी गलवानला पण बनवले. कडाक्याच्या थंडीत भारतीय जवान सीमेचे संरक्षण करतात त्यांच्यासाठी हे उबदार तंबू वरदान ठरले आहे. दक्षिण दिशेकडून येणाऱ्या उन्हाचा शास्त्रीय पध्दतीने  वापर केला त्यामुळे तंबूतले तपमान चक्क 14 डिग्री सेल्सिअस इतके राहते जेव्हा की बाहेर उणे 14 डिग्री सेल्सिअस इतके असते. कितीतरी इंधन बचत झालीच परंतु प्रदुषणाचे प्रमाण अगदी कमी झाले. शिवाय जीव घेण्या थंडीपासून सैनिकांची सुटका झाली. हे वाचल्यावर मला दक्षिण दिशेबद्दलचा दृष्टीकोन बदलला. कुठलीही नैसर्गिक गोष्ट मुळात चांगलीच असते माणूस त्याला त्याच्या सोयीनुसार लेबलं लावून वाईट ठरवून टाकतो. हं फक्त दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये हे एकच कारण वैज्ञानिक आहे कारण चुंबकीय लहरी किंवा बल हे उत्तर दक्षिण असते. सगळ्या भौगोलिक घटना मग ते ग्रहण असो, उल्कापात असो, गुरू /मंगळ जवळ येणे असो किंवा चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे असो ह्या नैसर्गिक घटना मनात कुतूहल निर्माण करतात आणि दृष्टीसुख तर देतातच पण या अफाट पसार्‍यातल्या आपल्या यत्किंचित अस्तित्वाची जाणीव करून देतात.
  "भूगोल हे काही दैव नाही पण ते दैवाच्या जवळ जाणारे आहे. लहान मोठ्या प्रमाणात ही भौगोलिक परिस्थिती आपल्या उत्पाकतेला, आनंदाला आणि सृजनशीलतेला आकार देऊन जाते चालना देवून जाते." असे एक छान वाक्य गुगल वर वाचले होते मी आणि ते मला योग्य वाटले. आपला परिसर, आजूबाजूचे वातावरण याचा उपयोग करून चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात अंर्तभूत करणे म्हणजे भूगोल. जे सोनम वांगचुक यांनी केले. नैसर्गिक संसाधनांचा मानवी जीवनासाठी उपयोग करतांना त्या नैसर्गिक साधनांना कुठल्याही प्रकारची हानी न पोहचवता त्याचा वापर करणे म्हणजे भूगोल.


 वेगवेगळ्या समाजाचा, संस्कृतीचा अभ्यास करणे म्हणजे भूगोल. त्या त्या प्रदेशात असणारे उपलब्ध पर्याय, धान्य यावर आपले जगणे अवलंबून असते. त्याप्रमाणे सण, रिती पध्दती आपोआप निर्माण होतात आणि पुढेही सुरू राहतात. 
सूर्य, चंद्र, ग्रहतारे नेमून दिलेल्या मार्गावरून वर्षोनुवर्षे न चुकता, न कंटाळता जात आहे. म्हणून पृथ्वीवर सगळे सुरळीत सुरू आहे. (दिवस /रात्र) आपले जीवन खर्या अर्थाने व्यवस्थित आहे छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण नाराज न होता जीवनातल्या, निसर्गातल्या आश्चर्यचकित करणार्‍या घटनांचा आनंद घ्यावा. अशीही यमाची दिशा खरंतर आपल्याला जीवनाचे शाश्वत सत्य सांगते. छोट्या नचिकेताला जन्म मृत्यू चे गूढ उलगडून सांगणारा यम खरंतर ज्ञानी, विद्वान आहे आणि आपण उगाच या सत्यापासून पळत असतो. ॐ दक्षिण दिशाय् नमः! ॐ दश दिशाय् नमः! 

अंजली

Saturday, March 13, 2021

आमची जनाबाई!

 ऊन्हाळा !......सुट्टी म्हंटले की, पहिले आठवण होते ती आजोळची!.......चंद्रपुर माझं आजोळ !..दर सुट्टीतला नेमच जणू आजोळी जाण्याचा. त्या काळी तसही फार भटकंती करावी असं सामान्यांच्या घरात फारस घडत नसे .फारफार तर ऊन्हाळ्यात असणार्या नातेवाईंकाकडील लग्नाला हजेरी लावणे व आजोळी जाणे हे दोनच पर्याय समोर असतं. त्यातही चंगळ!.... ही आजोळीच व्हायची म्हणून मनात त्यालाच पहिला नंबर असायचा.

        उन्हाळ्याचे ते दिवस !...त्यातही चंद्र्पुरचा उन्हाळा ..तो सहन करण्याची ताकद कशी कोण जाणे पण तो देवच देत असे. घरात एकमेव काळा पंखा तो आजोबांच्या दिमतीत असलेला आणि आमच्याकडे त्याची मान वळतपर्यंत पुन्हा घर्मधारांनी शरिरावर ताबा घेतलेला असायचा पण ,त्यावरही एक मस्त उपाय होता.... आमच्याकडे हातपंखे असायचे,ते मुठीत घेऊन मस्त गरगर फिरवत बसायचो .....संध्याकाळी मात्र मस्त मजा असायची ......  !                                                       आमची जनाबाई उर्फ जनी म्हणजे जणू "नाम्याचीच जनी "  सतत कामात मग्न असलेली. तर ही जनाबाई संध्याकाळी दररोज घरासमोरच्या लांबलचक अंगणात झाडून मस्त सडा टाकायची तेही दारासमोरच्या विहिरीच पाणी काढून!....आहा ..तापलेल्या जमिनीचा मस्त खरपूस वास घेत.... तीने हातात घेतलेल्या चरवीची लयबद्ध हालचाल आणि पायाचे तालबद्ध तंत्र सांभाळत पाणी शिंपडताना बघण्याची मोठीच मजा वाटे. ..........नंतर मस्त नारळाच्या दोरीच्या खाटा टाकून गाद्या पसरविल्या जाई आणि त्यावर पांढर्या  स्वच्छ चादरी आंथरलेल्या ! हे सगळं जनीच करायची....बस्..!ते आंथरायचाच अवकाश की आमचे त्यावर लोळणे सुरु झालेच म्हणून समजा .तिकडून आमच्या आडदांड मनुमामाचा.... पोट्टे होsss....असा आवाज येताच आमचा ससा होऊन जायचा आणि गपगुमान बैठे खेळ,गप्पा टप्पा ,जरा सांजेची वेळ झाली की, शुभंकरोतीसह, हरिपाठ, रामरक्षा ....तालासुरात म्हणणे सुरु ! जोपर्यंत घरातुन जेवणासाठी हाकारा होत नाही तोपर्यंत !...नंतर जेवण झाल्यावर खाटेवर पडल्या पडल्या कधी तारे मोजायचो तर कधी गाण्याच्या भेंड्या! ....आणि हो एक मजा सांगायचीच राहिली आमच्याकडे छोटिशी खटोली होती ,घडवंची होती  त्यावर वयोमानानुसार झोपायचा नंबर लावला जाई. अर्थात खटोलीवर लहानांचाच नंबर लागे. आणि घडवंची बसकी पूर्ण लाकडी असल्याने पाठीला कडक लागे म्हणून आम्ही मुले तरी त्यावर झोपायचं टाळायचोच.
      सकाळ मात्र व्हायची ती जनीच्या सड्याच्या सपक! सपक!....आवाजाने सकाळी सहावाजताच ही अंगणाच्या झाडलोट आणि सड्यासाठी हजर ....ती होताच आजीने केलेल्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेणारी सायवानातील जनी अजुनही डोळ्यासमोरुन जात नाही.तीचा सदैव हसरा चेहराच कायम डोळ्यासमोर येतो. तीचं घर अगदीच हाकेच्या अंतरावर त्यामुळे किती चकरा होत होत्या हे मोजुनही सांगता यायचे नाही. हा गंमतीचा भाग सोडला व विचार केला तर आजच्या कामवाल्या बाईंशी तीची तुलना होणं अशक्यच!................................                आता सडासारवणानंतर ती घरी जाऊन आंग धुऊन  पारोशी भांडी घासायला हजर. !.......त्यातही तिच्या दिमतीला असणारा लवाजमा म्हणजे भांडभर चिंच,भांडभर चुलीतली राख, सोबतीला नारळाची घासणी..ह्या सगळ्यांना सोबत घेऊन सगळी पितळीची  भांडी लख्ख चकचकीत घासून   फडक्यानी पुसुन हात लावुन लावुन कोरडी करुन ओसरीवर पसरुन ठेवणार हा तिचा नित्यनेम, कारण आजीच सोवळं !....दुपार झाली की मात्र माझी आजी चुलीच्या शेवटच्या धगीवर परत भाताचा गंज शिजायला ठेवायची. सगळी जेवणं झाल्यावर हा कुणासाठी असा प्रश्न मनात पडत असतानाच माझी मोठीआई(आजी)जनेsssssअसा मोठ्याने तिला ऐकू जाईल असा हाकारा करायची व नानी आली वं म्हणतं पुढ्यात हजर ......आजी तिच्या हातात तो ताज्या वाफाळत्या भाताचा  गंज व सोबत काही शीळपाकं उरलेल पण द्यायची त्यात तिच्या अख्ख्या कुटुंबाला म्हणजे ते दोघ नवरा बायको आणि त्यांचा मुलगा दिपक यांना पुरायचं. तो साधारण आमच्याच वयाचा त्यामुळे आमच्यासोबत कधीमध्ये खेळायचापण.!....

   आमची जनी खरोखर वेगळीच होती. काळी सावळी पण नाकडोळे ऊठून दिसणारी बुटक्या बांध्याची. गुडघ्यापर्यंत नेसललं पातळ घट्ट पायाला चिपकल्यागत नेसालेली .केसाचा मोठा आंबाडा त्यावर फुल खोचलेलं कंपल्सरी. ते मग कण्हेरीचही चालायच तिला, कपाळावर ठसठशीत कुंकू रेखलेली आमची जनी एखाद्या घरंदाजबाईसारखी दिसायची !.....आब राखून वागणं हा तिचा स्वभाव होता.स्वच्छता ,नीटनेटकेपणात  जराही कमी नव्हती.पांढर्या मातीने सारवलेलं तिच छोटसच पण सुबक घर तर इतकं देखणं होत की बसं !......की,तीने आरसा लटकवलेल्या ठिकाणी केलेली बशींच्या तुकड्यांची वेलबुट्टी अजुनही डोळ्यासमोर येते. पण तिच्या आणखी एका गुणाचा उल्लेख इथे करावसा वाटतो . तो म्हणजे  ती तिच्या आईची एकुलती एकच मुलगी ती लग्नाळू  झाली तेव्हा तिला एका स्थळाकडून होकार आला ,तो चांगला कम्पाऊंडर आहे असं सांगितलेल म्हणून तीथे तीच लग्न झालं पण तो निघाला हाॕटेलात कपबश्या विसळणारा हरकाम्या !....ही मानी !...तो खोटारडा निघाला म्हणुन तडक माहेरी निघून आली ती तडक माझ्या आजीकडेच  आणि तिला सगळी हकीकत सांगितली  .जेव्हा तिचा नवरा तिला घ्यायला आला तेव्हा त्याकाळात माझ्या आजीने व तीने जायला चक्क नकार दिला .हे त्याकाळातलं केवढं मोठं धाडस केलं होतं दोघींनीपण अर्थात यामागे कारण असं होतं की, तिला अगदी लहानपणापासुन आजीने पाहीलं होतं ती तिच्या आईचा पदर धरुन पूर्वी आईसोबतच कामाला यायची आणि आई गेल्यावर तिचा वारसा हीने चालवला त्यामुळे तशी जबाबदारी आता आजीची असल्याने तिने तिला मायेने पाठिंबा दिला होता . पुढे तीचं शंकर वाढयाशी लग्न झाल ंपण दुर्दैवाने तोपण हल्ल्याच निघाला. तिच्या सुख दुःखाच्या सगळ्या गोष्टी फक्त आजीजवळच बोलायची जणू आजीची ती लेकच होती.  आता ती एकटीच संसाराचा गाडा हाकत होती.अगदी हसत हसत गोडीने. माझ्या लग्नाच्यावेळेसपण आईने तिला आणले होते. नंतर हळू हळू माझा संपर्क कमी झाला . आई सांगते की नंतर तिचा शेवट फारच दुःखात गेला .मुलगा सुन चांगले वागवत नव्हते म्हणाली .पणआजही तीची आठवण येताच मायेचा कढ आल्याशिवाय रहात नाही खरचं आमची जनी  ,                                     
"नामयाच्या जनीसारखी तिच्या नानीची जनी होती".

@अर्चना मुळ्ये.

कोरोना रिटर्न्स

  "फिर तेरी कहानी याद आई

फिर तेरा पसाना याद आया---" 

लता चे सुरेल स्वर  वातावरणात घुमत होते आणि अचानक धक्का लागल्यागत झाले. अरेच्चा! हे वहिदा दिलीप कुमारला म्हणतेय की आपणच आपल्या "त्या कोरोना " ला म्हणतोय? होय, नाईलाजाने का होईना, आपलाच म्हणावं लागतंय त्याला. जळू सारखा चिकटून जे बसलाय, जायचं नावच घेत नाहीये.😏  गेल्या वर्षी ह्याच दिवसात धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती की त्याने. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी साधर्म्य असणाऱ्या घटना जर पुन्हा नव्याने घडत असतील किंवा त्याच त्याच घटना परत परत घडत असतील, तर "इतिहासाची पुनरावृत्ती" होतेय, असं आपण सहज म्हणून जातो.खरं सांगायचं तर इतिहासाची पुनरावृत्ती ही संकल्पनाच काहीशी चुकीची वाटते. चुकांची पुनरावृत्ती हा शब्द प्रयोग ठीक आहे; पण इतिहासाच्या बाबतीत? इतिहास हा एकदाच घडत असतो, क्वचितच घडत असतो आणि तो घडवला जातो, प्रयत्नपूर्वक. जसा शिवाजी महाराजांनी घडवला, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घडवला. हजारो क्रांतिसूर्यानी घडवला.  अशा इतिहासाची नोंद मग अख्खे जग घेत असतं, असा इतिहास मनावर कोरला जातो आणि कागदावर उतरवला जातो, पुढील पिढीसाठी  प्रेरणादायी, संस्मरणीय ठरावा, म्हणून.

 घटनांची पुनरावृत्ती होतेय, हे मात्र  जाणवतंय.  कोरोना ने परत डोके वर काढायला सुरुवात केलीये, डोकेच नाही तर अख्खा च्या अख्खा मानगुटीवर येऊन बसलाय आणि म्हणूनच "इतिहास" आठवला.😊 गेल्या वर्षी जानेवारी पासून हलके हलके वारे वाहू लागले होते त्याचे मार्च नंतर कधी झंझावाती वादळात रूपांतर झाले, कळले देखील नाही.  सुरुवातीला काहींनी त्याला हलक्यात घेतले, टरही उडवली, मजा  घेत स्वतःची करमणूक ही करून घेतली. काही मात्र सतत घाबरलेले, भेदरलेल्या अवस्थेत राहिले. मृत्युच्या भीतीनं, आप्तेष्टांच्या दुरावण्याच्या भीतीनं, दूर असलेल्यांच्या काळजी च्या भावनेनं। ------ हा संपूर्ण कालखंड म्हटलं तर निराशाजनक, दुःखदायक, म्हटलं तर परीक्षा पहाणारा ठरला. माणसांनी स्वतःच्या डोळ्यादेखत आपल्याच माणसांचे मरण पाहिले, जिवंतपणीच क्षणा क्षणा चे मरण "एकाकी " जगणार्यांनी अनुभवले. आपलं कोण, परका कोण  हे ओळखायला शिकले. 
निवांत क्षणी जसे निसर्गाचे विविध रंग अनुभवले,तसेच माणसाच्या अंतरंगातील  रंगही शोधून झाले. टाळेबंदीमुळे गावाकडे परतणारे मजुरांचे लोंढेच्या लोंढे पाहिले, तशी रस्त्यावरील भयाण, करुण शांतता देखील अनुभवली. 
 खूप काही शिकवून देऊन, घेऊन गेला हा कोरोना---- छे: गेला कुठे अजून?  एखादा हरत चाललेला खेळाडू जसा पूर्ण ताकदीनिशी ,सगळा जोर एकवटून पुन्हा लढण्यासाठी उठून उभा रहातो, तद्वतच पुनरागमन झाले त्याचे😳 अर्थात, आता परिस्थितीत जरा बदल झालाय, हे नक्की. संकटांशी सामना केल्यानंतर जी ताकद अंगी येते, ती आता बहुतेकांमध्ये आली आहे. काही "लस" घेऊन "शक्तिमान" झाल्यागत वावरत आहेत. पूर्ण वर्षभराच्या अनुभवातून, सततच्या कानावर पडणाऱ्या उपदेशांच्या डोसातून, बघून, वाचून, ऐकून---- लोकांची भीती, दडपण आणि त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झालीये.  तरीही पुनरावृत्तीची आठवण करून देणाऱ्या बऱ्याच गोष्टी घडत आहेत. तेच ते कोरोना वरील पाचकळ विनोद, तीच गृहिणींची घरातील कामात बुडून जाण्याची वेळ, सुगरणीं चा पदर खोचून पुनश्च ऊतू आलेला कमालीचा ऊत--- रोजच्या  अपडेट्स देणाऱ्या कोरोना च्या धक्कादायक बातम्या आणि त्यामुळे अजूनच वाढलेला वातावरणातील ताण-----
 असे असले तरी बहुतेक जणांना ह्यातील "गंभीरता" जाणवलेली च नाहीये.  मास्क घालण्याविषयी, ठराविक अंतर पाळण्याविषयी अजूनही काही महाभाग सहजतेने घेत आहेत, इतकंच काय पण "लस" घेण्यासाठी देखील काही  साशंकता दाखवत आहेत. बिचाऱ्या आपल्या शास्त्रज्ञांनी दिवसरात्र मेहनत करून, सर्व कौशल्य पणाला लावून लोकांच्या  भल्याचा विचार करत जीव तोडून काम केले आणि आपण?----
 आपल्याला तर प्रत्येक वाईट गोष्टीचे खापर व्यवस्थेवर फोडण्याची वाईट सवय झालेली असते; पण ह्या व्यवस्थेची निर्मिती तरी कोण करतं? आपणच ना? 
 कोरोना परत आलाय. कशासाठी? ह्याचसाठी तर नसेल? आपल्याला निसर्गाचे संकेत ओळखता यायला हवेत,म्हणून? पर्यावरण, स्वच्छता ह्यांचे महत्व आपल्याला पटावे म्हणून? निव्वळ स्वतःचा जीव वाचवणं हेच उद्दिष्ट असू नये ,म्हणून? ह्या कोरोना च्या महामारीने आपल्याला काही काळातच जीवनाचे किती रंग दाखवून दिले? सत्याची दाहकता पटवून दिली, नात्यांचे महत्व----- ते पटलं आहे का पण? बऱ्याच जणांनी ह्या खडतर काळात नात्यांची जवळीक अनुभवली, नात्यांमधील निखळ आनंद लुटला; पण---पण तरीही आजही  वर्तमानपत्राचे प्रत्येक पान किमान एका तरी नातेसंबंधांचा खून झालेला दाखवते. आजही "पवित्र, निखळ" समजली जाणारी नाती अक्षरशः क्रूर पणे पायदळी तुडवली जाताहेत. क्रौर्याची परिसीमा गाठली जातेय, क्षुल्लक कारणावरून अत्यंत जवळच्या नात्याचा गळा दाबला जातोय. मग काय शिकलो आपण कोरोना पासून? पर्यावरण दूषित होऊ नये म्हणून जेवढा प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याहीपेक्षा जास्त, नाती दूषित होऊ नयेत म्हणून करायला हवंय.

" नफरत है निगाहोमे
देहेशत है फिजाओमे
ये कैसा जेहेर फैला---
दुनिया की हवाओमे " 
30 ते 35 वर्षा पूर्वीची ही रचना, आजही फारसा फरक पडलेला नाहीये, उलट हवा अजूनच गढूळ होत चाललीये.😔 ह्या कोरोना च्या महामारीने "नात्यांची जपणूक "करायचा जरी धडा दिला माणसाला, तरी भरपूर आहे. आज बहुतांश नात्यात इतकी छिद्रे झालेली आहेत,की बारीक रफू करावा लागेल की काय अशी शंका येऊ लागली आहे.
"चांगली नाती ही झाडासारखी असतात. सुरुवातीला त्यांची काळजी घयावी लागते;पण एकदा का बहरली, की आयुष्यभर सावली देतात, परिस्थिती कोणतीही असली तरी----" कधीतरी वाचलेल्या ह्या वाक्यात किती यथार्थता आहे, हे अनुभवाशिवाय पटणार नाही. 
 म्हटले तर "विस्मरण" ही फार चांगली गोष्ट आहे. मनाला यातना देणाऱ्या, वेदना देणाऱ्या गोष्टी विसरता यायलाच हव्यात; पण त्या मागची पार्श्वभूमी , कारणं ती मात्र विसरली जाऊ नयेत.
"Life gives us 2 gifts. 1st is "chance" and second is "choice"to select the best one for life" ---(कुणाचं वाक्य आहे माहीत नाही. माझं नक्कीच नाही.😊
"कोरोना" हा आपला "चॉईस" असूच शकत नाही, नाहीच आहे; पण तो एक "बेटर चान्स" नक्कीच होऊ शकतो. स्वतःला सुधारण्याची, स्वतः मध्ये बदल घडवून आणण्याची एक "संधी". 
 नाहीतर मग आहेच आपलं, येरे माझ्या मागल्या --- आणि असच होत राहिले तर कोरोना आला काय आणि गेला काय, एकदा आला काय किंवा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आला काय----काही फरक पडणार नाही. आपल्याला कोरोना देखील "सवयीचा एक भाग "होऊन जाईल. 
 वेळीच सावध होणे गरजेचे आहे. 
 माणसाने माणूसपण जपण्याची , नात्यांना योग्य तो न्याय देण्याची वेळ----अजूनही गेलेली नाहीये.एकदा का हातातून वेळ आणि संधी निसटली की मग काहीच शिल्लक उरत नाही,  माणसाचं "मी पण " देखील.
 जगा, पण खरेपणाने जगायला शिका.
"जरा मुक्त आणि बरे पाहिजे, जगण्यास काही झरे पाहिजे
नदी कुठे मी मागतो अमृताची?
मला फक्त पाणी खरे पाहिजे--" (ज्ञानेश वाकुडकर)
 प्रत्येक माणसाची अशीच तळमळ राहिली तर----? ?🙏😊

माणिक.