दिनांक 29 मे 2020 रोजी माझ्या यजमानांची कोवीड टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना ताप आल्यावर टेस्ट करायला पाठवले होते आणि घरातच आयसॉलेट केले होते .मी ,माझ्या सासुबाई ,दोन मुले त्यांच्या संपर्कापासून लांब होतो. यजमानांना 29 मे ला जी एम सी मध्ये ऍडमिट केले .मी मुलांना घेऊन जीएमसी गाठले आणि आमची स्वाब टेस्ट करण्याची विनंती केली. नियमाप्रमाणे आम्हाला लक्षणं नाहीत तर टेस्ट ची गरज नाही म्हणून ऑक्सीजन सॅच्युरेशन ,टेंपरेचर तपासून आम्हाला quarantine सांगितले (दोन्ही चांगले होते). सासूबाईंना न्यायला गाडी नसल्याने आणि त्यांना चालणे अवघड म्हणून ताबडतोब उन्हात नेले नव्हते.
प्रशासनातर्फे काही जणांनी येऊन आमची चौकशी केली. आम्हाला पीकेव्ही quarantine सेंटर ला जायला सांगितले. मी विनंती केली की सासुबाई (71 वर्षे )थायरॉईड ,बीपीच्या पेशंट आहेत .घरी त्यांचं रुटीन व्यवस्थित सुरू आहे .लक्षणं नाहीत .शिवाय मुलांना घरात खाणेपिणे वेळेवर मी करू शकते तर मला home quarantine ठेवा. 14 दिवस मी नियमाने quarantine राहते. काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घेते. माझी विनंती मान्य केली नाही. आम्ही चौघे पिकेवी ला गेलो . सिटी बस मध्ये चढताना सासूबाईंना पायरीवर पाय ठेवून जाणे खूप कठीण झाले. शिवाय त्यांना सतत घरात राहण्याची सवय असल्याने दुपारी एक चे ऊन्ह त्यांना असह्य झाले.
पिके विला पोचल्यावर बॉइज् होस्टेल समोर गाडी उभी करून कर्मचाऱ्यांनी आम्हाला आत कोणत्याही खोलीत जायला सांगितले.
तळमजल्यावर पाणी साचलेले ,आजूबाजूची झाडे झुडपे ,डास- सापांची भीती म्हणून दोन जिने थांबत थांबत चढवून सासूबाईंना खूप हिमतीने पहिल्या मजल्यावर नेले.
त्यातल्यात्यात कॉमन टॉयलेट च्या जवळची खोली निवडली .समोरासमोरच्या दोन खोल्यांमध्ये आम्ही चौघे राहू असे ठरले. नेमके किती दिवस राहायचे ,आमची स्वाब टेस्ट केव्हा होणार ,इथे काही गरज पडली तर कोणाला संपर्क करायचा याबद्दल तिथे आलेल्या कोणालाही काही माहिती नव्हती .खोल्या धूळ ,जाळ्यांनी भरलेल्या होत्या .पंखे सुरू होते .आम्ही सोबत रद्दी पेपर आणले ते टेबलवर पसरून त्यावर सामान ठेवले .मास्क बांधायला कुरकुरणारा माझा मुलगा इतकी धूळ बघून चेहऱ्यावर पंचा बांधूनच बसला. त्याला धुळीची ऍलर्जी आहे .पट्टीच्या लोखंडी पलंगावर पातळ गादीवर सासूबाई थकून आडव्या झाल्या .दुपारचे तीन वाजले होते .सोबत आणलेला डबा खाऊन मुलांना काॅट शिवाय कुठेही फिरू नका ,बैठे खेळ खेळायला सांगून मी कोणी चौकशी करायला दिसतं का म्हणून शोधलं .शेवटी मैत्रिणींना, डॉक्टरांना फोन केले. तेव्हा आजचे टेस्टिंग बंद झाले उद्या सकाळी बघू म्हणून निरोप मिळाला. म्हणजे उद्या पर्यंत या जागेत वेळ काढायचा हे पाहून अंगावर काटा आला .हात ,चेहरा सोबत आणलेल्या साबणाने धुवावा म्हणून बाथरूम जवळ गेले .तिथली भीषण अवस्था बघून सॅनिटायझर हातावर लावून बसून राहिले .बाथरूम मध्ये दरवाजे तुटके, असह्य दुर्गंधी ,अस्वच्छता पाहून डोकं भणभणायला लागलं. कसं बसं रात्रीपर्यंत वेळ काढला .शिणून झोपायचे ठरवले तर खोलीतला एकमेव बल्ब बंद पडला.
अंधारात रात्र कशी काढणार ?काही सोय नव्हती. मेस वाला केटरर ओळखीचा त्याने त्याच्या कामाची गडबड आटोपल्यावर बल्ब पाठवला. तो आम्ही खोलीत लावून घेतला .रात्री सासूबाईंना बाथरूमला जायचे म्हणून धरून नेले तर तिथे पुन्हा अंधार! दिवा नाही .मोबाईलचा उजेडात कसेबसे त्या जाऊन आल्या. मेस मधून सकाळी नाश्ता ,दोन वेळा जेवणाचा डबा देतात कळले .नाश्ता गरम चांगला दिला.मात्र जेवणात पोळ्या इतक्या जाड की सासुबाई ना चावणं कठीण. भाजी मध्ये दोन वाट्या पाणीदार रस्शात तीन ते चार बटाट्याच्या फोडी होत्या. पोट रिकाम ठेवू नये म्हणून थोडं पोटात सगळ्यांनी ढकललं. पाण्याच्या कॅन्स दोनदा पाठवतात कळलं .दुसऱ्यादिवशी आर ओ च्या कॅन्स पाइपने भरल्या जात होत्या. घरी वापरायचं पाणी सुद्धा आपण असे भरत नाही.
कोणाही कडून खाणेपिणे मागवायचं तर पिकेवि चा एरिया लांब पडतो इतकं लांब सगळ्यांना येणं अवघड. म्हणून आहे ते नीभवायचं अशी मनाची तयारी केली .आमची स्वाब टेस्ट दुसऱ्या दिवशी झाली. काहींनी सांगितलं लक्षण नाही तर का केली ,काहींनी सांगितलं सगळ्यांची इथे आल्यावर करतातच. नेमका कोणता प्रोटोकॉल कोणाच्या आदेशावरून पाळतात कळायला मार्ग नव्हता .
दुसरी रात्र पण अंधाऱ्या बाथरूम आणि कॉरिडॉरमध्ये काढली .आमच्या खोलीच्या आत आपापल्या कॉटवर बसून पत्ते, गाण्याच्या भेंड्या ,नाव गाव वस्तू प्राणी असं मुलांना गुंतवून ठेवणे सुरू होतं .पण आजूबाजूला बघायला किळस वाटावी एवढी अस्वच्छता होती .तिसऱ्या दिवशी कॉरिडॉर झाडायला आणि बाथरूम स्वच्छ करायला स्टाफ आला. आम्ही आमच्या खोल्या झाडून कचरा बाहेर नेला. पण पुन्हा पाण्याने हात धुण्याची सोय नाही !लोकही खिडकीतून बाहेर हात काढून धुणे, चुळा भरून बाहेर थुंकणे प्रकार करताना दिसत होते. इन्फेक्शन ची भीती वाढत होती.
तिसऱ्या दिवशी प्रशासनाकडून छोटा साबण आणि सॅनिटायजर, मास्क अशी कीट देण्यात आली .बऱ्याच लोकांनी या गोष्टी स्वतःच्या स्वतः आधी आणलेल्या होत्या. दररोज डॉक्टरांकडून ऑक्सिजन सॅच्युरेशन ,टेंपरेचर बघितले जात होते .पण त्या रांगेत उभी माणसं सगळ्या स्तरातली होती .
ज्यांची स्वतःची नीट राहण्याची सोय नाही, खूप दाट -अस्वच्छ वस्ती आहे ,अशिक्षित किंवा आरोग्याचे महत्त्व माहिती नसलेल्या लोकांना quarantine सेंटरला आणणे समजू शकतो .पण जे स्वतःहून quarantine राहून प्रशासनाचा ताण कमी करण्या इतपत जबाबदार आहेत त्यांना अशा ठिकाणी ठेवणे म्हणजे विषाणू प्रसाराला वाढवणे आहे .
कोरोना विषाणूचा संसर्ग धोकादायक आहेच .त्याचबरोबर अस्वच्छतेमुळे पोटाचे आजार ,आंघोळी नसल्याने ऊन घामामुळे त्वचेचे आजार ,डास माशांमुळे कितीतरी नवीन आजारांना हे सेंटर आमंत्रण ठरते की काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे .
सरकारी यंत्रणेने ,आरोग्य विभागाने त्वरित सत्य परिस्थिती लक्षात घेऊन सामाईक धोरण ठरवावे .
जनतेच्या आरोग्याशी खेळणे ,प्रयोग करणे थांबवावे.तिसरा दिवस आणखीन वेगळाच उगवला दोनदा बस मधून लोकांना आमच्या बिल्डिंगमध्ये सोडले. म्हणजे संपूर्ण खोल्या लोकांनी भरल्या गेल्या. सगळ्या स्तरातील लोक होते .दुपारच्या जेवणाचा पॅक आणायला गेले तर एक जेमतेम दीड वर्षाचे बाळ घेऊन त्याची आई तिच्या खोलीसमोर चकरा मारत होती .दोघांनीही मास्क लावले होते .मी पण अर्थातच मास्क लावला होता. म्हणून सुरक्षित अंतरावरून ती कोण कुठली चौकशी केली. एका सुखवस्तू घरातल्या तिने सर्व माहिती पुरवली. दुमजली घरातल्या पहिल्या मजल्यावर ती, तिचा नवरा व हे लहान बाळ आणि खालच्या मजल्यावर प्रौढ सासू-सासरे ,वृद्ध आजे सासू आणि दीर राहतात. आजे साधूंना दम्याचा त्रास झाल्यावर तपासले असता त्या कोरोना पॉझिटिव निघाल्या .घरातल्या सगळ्यांच्या टेस्ट केल्यावर ती स्वतः, तिचे बाळ आणि नवरा निगेटिव्ह आले. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून हे तिघे पीकेवी मध्ये आले होते .इथे किती दिवस राहायचे याची स्पष्ट कल्पना नव्हतीच.
दिवसभर सतत फोन घेण्यात आणि सावली सारख्या दोन दिवसापासून सोबत असणाऱ्या डॉक्टर अलका आणि आरती यांच्या कॉन्टॅक्ट मधून काय मार्ग काढावा याची सोय लावण्यात गेला .सकाळी रिपोर्ट अपेक्षित होते. ते कसे येतात त्याप्रमाणे पुढे काय ते ठरणार होते. याची रूपरेषा एकीकडे ठरवणे चालू होते. मधून मधून मुलांशी बोलणे चालू होते .कसे रिपोर्ट येऊ शकतात त्याप्रमाणे काय काय करावे लागेल याची त्यांना कल्पना देऊन मनाची तयारी करणे सुरू होते.
पुन्हा एकदा रात्र झाली.जे अन्न समोर होतं ते पूर्णब्रम्ह समजून चौघांनी पोटात ढकललं. रात्री अकराच्या दरम्यान अचानक वीज गेली. सोबत मेणबत्ती वगैरे नव्हती .30 ते 40 टक्के चार्ज असलेले दोन फोन दोन खोल्यांमध्ये फ्लॅश लाईट लावून ठेवले. कधी लाइट ,पंखे सुरू होणार ,मोबाईलचे चार्जिंग टिकणार का हा प्रश्न होताच. वारही बंद झाल्यामुळे घामाघूम झालो होतो .त्यात सासूबाईंना बाथरूम ला जायचे होते फ्लॅश लाईट च्या उजेडात तिथपर्यंत जाण्याचे दिव्य पार पडले ! पण परत येताना त्यांना दरदरून घाम फुटला .चक्कर येते असे जाणवायला लागले. कसेबसे धरून त्यांना कॅट पर्यंत आणले आणि झोपवले. स्पॉन्डिलाइटिस, वर्टिगो ,हाय बीपी आहे की आणखी काही ?अशा रात्री गुडूप अंधारात त्रास कमी नाही झाला तर काय असा विचार करतानाच त्यांना ओआर एस देणे ,ओढणीने वारा घालणे सुरू ठेवले .शेवटी एवढ्या रात्री आरती ला फोन केला .तिने शांतपणे परिस्थिती समजून सरळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले .पंधरा मिनिटात ऍम्ब्युलन्स घेऊन डॉक्टर आले ते फक्त कोरोना ड्युटीवर होते .त्यांनी आॅक्सिजन सॅच्युरेशन बघितले ,टेंपरेचर बघितले आणि जास्त त्रास असेल तर पर्यायी व्यवस्था काहीच नव्हती तर मला सोबत गेल्यावर मुलांना इथेच कसे ठेवायचे असे ठरवले .लाईट लवकर येण्याची शक्यता नाही हे त्यांनी आधीच सांगितले आणि ते परत गेले नॅपकीन ओला करून सासुबाईंचे हात पाय चेहरा पुसणे, ओढणीने वारा करणे सुरू ठेवले .देणे सुरू ठेवले अर्ध्या तासाने त्यांना थोडे बरे वाटू लागले. दोन तास थांबत थांबत वारा घालणं सुरू ठेवले त्यामुळे त्या झोपू शकल्या.
पहाटे चार वाजता लाईट आले त्यानंतर मी झोपले.
घरात लाईट गेले तरी इन्व्हर्टर आहे, घर सवयीचे असते ,भीती नसते.
इथे सगळंच भयावह !अशी रात्र काढतांना इतर लहान मुलांचे किती हाल झाले असतील हा विचार जास्त अस्वस्थ करत होता अशा परिस्थितीत आम्ही सतत एकमेकांशी बोलत होतो वातावरण हलकेफुलके ठेवून स्वतःला उत्साही ठेवत होतो त्यामुळे ती रात्र पार पडली.
एखाद्या कमजोर मनाच्या ,घाबरलेल्या व्यक्तीला हा प्रसंग निभावणे अगदी घातकही ठरू शकले असते. अशा असुविधांमुळे पूर्ण विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे प्रशासनाने खरंच नियंत्रणाचे उपाय किंवा तरतुदी यांची पूर्तता करण्यात घाई केली असे म्हणावेसे वाटते.
आमच्या पुरतं म्हणाल तर माझे भाऊ-भावजया ,मित्रपरिवारातील स्वाती ,अर्चना ,राहुल, नातेवाईक या सर्वांचा आर्थिक, मानसिक सपोर्ट सुरुवातीपासून होता आणि स्वतःला कसे मॅनेज करायचे याबाबतीत आम्ही पक्के राहिलो.
परिणामी आज 71 वर्षाच्या सासूबाई आणि माझे यजमान ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
पण आमच्या बरोबर असलेले इतर लोक ,आमच्या नंतर या प्रसंगातून जाणारे लोक त्यांना कितपत सपोर्ट मिळाला? ते त्यातून कसे निभावले? त्यांचे पुढे काय झाले? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत.
No comments:
Post a Comment