Friday, June 12, 2020

मामाच्या गावाला जाऊया..

लॉकडाऊन च्या काळात आम्ही बहिणी आत्तापर्यंत, तीन चारदा तरी duo वर बोललो. प्रत्येक वेळेला ,'आत्ता आपण सगळ्या एकत्र अन ते पण छिंदवाड्याला असतो तर काय मजा आली असती नाही ' असा एकदा तरी विषय निघायचा!
खरच खूप धमाल केली आम्ही छिंदवाड्याला प्रत्येक उन्हाळ्यात! 
आम्ही सहा जणी (आम्ही तिघी अन तीन  मामेबहिणी,) दोन दोनच्या जोड्याच होत्या आमच्या!  प्रत्येक जोडीतील दोघींमधे  फक्त पाच सहा महिन्याचं अंतर होत.
 जे काही करायचं ते जोडीने! (माझी जी जोडी आहे आरती ती पण योगायोगाने सासरची केळकरच)! मामे भाऊ आमच्यापेक्षा बराच लहान होता.
 उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आई एक महिना तरी माहेरी जायची.लहान असताना आई बरोबर अन पुढे एकटच जायला लागलो.जाताना पाहिले नागपूरला मावशीकडे काही दिवस मुक्काम अन मग पुढे छिंदवाडा ! 
फाटकावर,
विष्णू जनार्दन परांजपे.- वसंत विष्णू परांजपे.
अंतरवेल
नर्सिंगपूर रोड
छिंदवाडा.
अशी संगमरवरी दगडावर काळ्या अक्षरात कोरलेल्या पाटीनी सुरू होणारी, जवळ जवळ गावाच्या बाहेर असलेली आजोबांची ही जागा,एकरभर तरी होती. फाटकातून शिरलं की एक चिंचोळी पाऊलवाट ज्याच्या एका बाजूला आमचं शेत ,अन दुसऱ्या बाजूला सलामी देत उभी असणारी आंब्याची दहा झाड ! त्याला लागून कुंपण अन लगेच दुसऱ्यांचं शेत होत.पाऊलवाटे नी सरळ गेलो की समोर प्रशस्त बंगला होता. सुरुवातीला आजोबांनी तीन चार खोल्यांच घर बांधलेल .पुढे मामानी, झाडाला फांद्या फुटाव्या तशा खोल्या वाढवत त्याचा टुमदार बंगला केला.
 प्रत्येक वेळेला गेलं की काही तरी नवीन बांधकाम केलेलं दिसायचं.
घराच्या मागच्या बाजूला भली मोठी विहीर अनेक फुलझाड ,गोबर गॅस ,गोठा ,आऊट हाऊस एक पाण्याचं टाक(आमची रोजची आंघोळ इथेच असायची) अस सगळं होत. बऱ्याच भाज्या पण लावल्या होत्या.शेतात पण फणस ,पेरू बोर,रायआवळा ही झाड होती.  
तिथला दिनक्रम म्हणजे,
सकाळी उठल्यावर पहिले गोठ्यात जायचं ,गडी गायीचं दूध काढायचा तेंव्हाच ते प्यायच, त्या धारोष्ण दुधाची चव अजूनही जिभेवर आहे.
आजी ला थोडी फार मदत करायची. सगळ्या जोडयाना काम वाटूंन दिली होती. मग आंघोळ करून भटकायला निघायचं.फाटकातून बाहेर पडलं की लगेच, एका बाजूला हनुमानाच देऊळ (त्यात अजून रामाचं वगैरे असे 3,4 देऊळ होते) अन एक बाजूला पटेल म्हणून एक कुटुंब  राहायचं.आधी देवळात जाऊन  दर्शन घेऊन तिथल्या बाबाजी(पुजारी) शी गप्पा मारायच्या मग पटेलांकडे चक्कर मारायची. त्यांच्या 3 सुना होत्या.त्या सगळ्याच भाभीशी,आम्ही स्वयंपाक घरात बसून गप्पा मारायचो. खर तर आम्ही बरच लहान होतो,त्या लेकुरवाळ्या, डोक्यावर  पल्लू घेऊन राहणाऱ्या भाभी शी  काय बोलायचो आठवत नाही आता! पण एक तास सहज  निघून जायचा तिथे. घरी येऊन जेवण वगैरे झालं की मग मात्र संध्याकाळ पर्यंत घरातच उनाडक्या सुरू असायच्या.पत्ते, अष्टचंग, कॅरम,टेबल टेनिस, स्केटिंग (जे मला कधी जमल नाही),गाणी लावून नाच करणे असे उद्योग चालायचे.
   दुपारचं खाण झालं की आजोबा रुद्र शिकवायचे.घर गावाबाहेर असल्याने जवळच टेकडी होती, संध्याकाळी तिथे फिरायला जायचो. येताना,पळसाची पान आणून जेवण्यासाठी पत्रावळी, बनवायच्या.
आजी संध्याकाळी एक वेळच जेवायची,  तीच जेवण झालं की मग तिच्या भोवती कोंडाळ करून रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकायच्या. 
 जेवण व्हायच्या आधी गच्चीवर पाणी मारून गाद्या टाकायच्या.अन जेवणानंतर  लोणच्याची फोड धुवून ती चोखत गादीवर बसून मस्तपैकी गप्पा मारायच्या.आमच्या चादरी सुद्धा ठरलेल्या होत्या. 'तुम्ही आमच्या गादीवर बसून गादी गरम केली ,आमची चादर विस्कटली, 'अशा क्षुल्लक कारणावरून लहान जोडी शी भांडण तर ठरलेलंच होत! भांडण्याचा हा कार्यक्रम दिवसातून बऱ्याच वेळा साजरा व्हायचा. मोठी जोडी फारशी भांडणात नसायची,पण आम्ही अन लहान जोडीत मात्र सतत चकमक सुरू असायची. त्या अजूनही, 'तुमच्या आयांनी आम्हाला लहानपणी खूप त्रास दिला'अस आमच्या मुलांना सांगत असतात.
मामाकडे फॅंटम, मँड्रेक जादूगार ,चाचा चौधरी ,चंदामामा ही सगळी पुस्तक पोस्टानी यायची ,ती पाहिले वाचण्यासाठी आमची धडपड असायची. किस्त्रीम, माहेर ही मासिक पण यायची(अर्थात ती मोठं झाल्यावर वाचायला लागलो).वाचनाची आवड तिथेच लागली मला. 
जोरात वार सुटलं की ,आंबे पडायचे ,ते गोळा करून चोखून खाण्याची मजा काही औरच होती।त्या मधे एक गोटी आंबा होता ,एकदम छोटा आकार ,पण अप्रतिम गोडवा होता त्याला.
घरी काम करायला नजिया बाई नावाच्या आदिवासी बाई यायच्या ,टेकडीच्या पलीकडे त्यांचं घर होत। त्यांच्याकडे जाऊन एकदा बटाट्याचा रस्सा अन भाकरी खाऊन आल्याच मला आठवतंय.
बहिणींच्या मैत्रिणी आता आमच्याही ओळखीच्या झाल्या होत्या ,त्यांच्याकडेही पाहुणचार व्हायचा. 
 रविवारी,मामा घरी असायचा त्यादिवशी शेतात काम करणे, गाडी धुणे,गोठा साफ करणे अशी काम आम्हा सगळ्यांना करायला लावायचा, त्या कामाचे पैसे पण मिळायचे.
  मामा एकदम हरहुन्नरी होता.प्रसिद्ध सर्जन तर होताच शिवाय नंतर लॉ  केलं त्यातही तो मेरिट आला। फोटोग्राफी चा छंद होता, घरी डार्क रूम बनवली होती,पुस्तकात माहिती वाचून फोटो डेव्हलप करायला तो शिकला,घरच्या छोट्या मोठ्या रिपेअरी तोच करायचा. शेती ची पण खूप आवड होती। जुन्या काळी बारीक वायर च्या पर्सेस ची फॅशन होती ,त्या सुद्धा त्यांनी आई अन मालुताई ला स्वतः विणून दिल्या होत्या।असो..
या आठवणी बरोबरच छिंदवाड्यामुळे घडलेल्या ट्रिप्स पण आठवल्या.
मामाच्या दवाखान्यात प्रमिला पिल्ले म्हणून  केरळ ची नर्स होती।ती दर वर्षी उन्हाळ्यात एक महिना सुट्टी काढून घरी जायची.आरती अन तीच विशेष सख्य! तीनी सहज आरतीला गावाला चलतेस का विचारलं,ती, तयार झाली. मामा मामी पण पाठवायला तयार झाले. ,'तू तिथे मी' असल्यामुळे मी पण जायचं हे ओघानी आलच। आई बाबां ची पण हरकत नव्हती.आम्ही चक्क एक महिना दीदी कडे जाऊन राहिलो.चौथी किंवा पाचवी ला असेन मी तेंव्हा.आत्ताची परिस्थिती बघून अस वाटत ,कसे काय तयार झाले असतील आमचे आई बाबा अशा अनोळखी ठिकाणी एकट पाठवायला! तेंव्हा खरच सगळं विश्वास ठेवण्याजोग वातावरण होत नाही का!
तिथे पोळ्या मिळणार नाहीत म्हणून आम्ही इथूनच महिनाभर पुरेल एवढी कणिक घेऊन गेलो होतो. दिदीच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर समुद्र ! संध्याकाळ तर तिथेच घालवायचो, ( शिवाय प्रातर्विधी साठी तीच जागा होती!) .एक लग्न पण अटेंड केलं. दिदीची बहीण(कांची),आई सगळ्यांनी खूप लाड केले.थोडं मल्याळम पण शिकलो.तांदुळ अन नारळाचे विविध प्रकार तिथे खाल्ले .खोबरेल तेलातल्या भाज्या मात्र शेवटपर्यंत आवडल्या नाही। तिथूनच कन्याकुमारी ला पण जाऊन आलो. 
त्यानंतर लगेचच्या उन्हाळ्यात, प्रकाश ट्रॅव्हल्स नागपूर ( याचे मालक प्रमोद पेंडके ,मावशीच्या छान ओळखीचे) बरोबर साऊथ टूर ला आम्ही दोघीच गेलो.बाकी सगळे फॅमिली बरोबर होते.आम्ही दोघीच आलो म्हणून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं .पण त्यामुळे सगळेच आमची खूप काळजी घ्यायचे. बंगलोर म्हैसूर उटी ,कांचीपुरम , रामेश्वरम, कन्याकुमारी(परत एकदा) ,ही  ट्रिप पण मस्त झाली.
 नंतर प्रकाश ट्रॅव्हल्स बरोबरच जम्मू-काश्मीर ट्रिप केली.यावेळेला मामाचे चंद्रपूर चे दोन डॉक्टर मित्र (सालफळे, सोनवलकर)अन त्यांची फॅमिली होती.या ट्रिप मध्ये पहिल्यांदा विमानाचा प्रवास केला( जम्मू ते श्रीनगर). बर्फ बघितला! 
छिंदवाडयाच्या या सुट्या म्हणजे एकप्रकारे उन्हाळी शिबिरच होत आमच्यासाठी! 
खूप काही शिकलो, मजा पण केली .
आयुष्यातले ते  वर्ष आठवताना आजही तेवढाच आनंद होतो.
पुढे मामा अचानक 50 वर्षी हार्ट अटॅक ने गेला. मामी वगैरे नागपूरला शिफ्ट झाले. 
काही वर्षांपूर्वी परत एकदा छिंदवाडयाला गेलो होतो. वाळवी नि पोखरलेलं ते घर अन ओसाड शेत पाहून खूप खुप वाईट वाटलं. 
आता ते जुन सगळं पाडून मामे भाऊ तिथे घर बांधणार आहे ,असच कधी मधी  जाऊन राहायला!
आत्ताही आम्ही सहा जणी एक, दोन वर्षात कुठेतरी एकत्र जमतोच. पण,छिंदवाडया च घर पूर्ण झालं की एकदा तरी सगळ्या जणीनी तिथे जाऊन पूर्वीची मजा अनुभवायची अस स्वप्न आम्ही पाहतोय!

No comments:

Post a Comment