आशा भोसलेंच्या आर्त स्वरात आरती प्रभुंच्या ओळी कानावर पडल्या अन आत कुठेतरी हलल्यासारखं झालं. वाटलं, आपण खूप प्रेम करीत असलेल्या व्यक्तीला काहीही कारण नसतांना ते सांगणं जेव्हा राहूनच जातं तेव्हा किती कालवाकालव होत असेल न काळजात! अन गाणं ऐकता ऐकता नकळतच आईची मूर्ती डोळ्यासमोर आली अन डोळे भरून आले.
आईला जाऊन आता पाच वर्षे झालीत. तिची ती नऊवारी नेसलेली, गोरीशी, कपाळावर ठळक कुंकू लावलेली, नाजूक बांध्याची आणि शांत चेहऱ्याची मूर्ती डोळ्यासमोर येते. अचानकच ध्यानी मनी नसतांना ती गेली. आदल्या दिवशी मी तिला दारातच उभ्याउभ्या भेटली होती, नेहमीप्रमाणेच घाईघाईत होती मी. "आत येते का ग ?" तिनेही सवयीने विचारले. "अग, उशीर झालाय ग ! छोटू आला असेल घरी, येते मी!" म्हणत म्हणत मी गाडीवर बसलीसुद्धा. तेव्हा मी माझ्या भावाकडे त्याच्या इन्स्टिटयूट मधे काम करायची. माझ्याकडे ऑफिस वर्क, फी डिपार्टमेंट होतं त्यामुळे रोज घरी निघतांना सगळा हिशोब घेऊन भावाकडे जायची. तो वर राहायचा अन आईबाबा खाली. मी वरुन खाली यायची वाट बघत ती बरेचदा उभी असायची दारात. कधी आग्रहाने घरात बोलवायची अन आज काय संक्रांत आहे, आज काय नवरात्रातला मंगळवार आहे, आज काय श्रावणातला शुक्रवार, आज नागपंचमी आहे, तर कधी आज सहजच म्हणून मंगळवारची सवाष्णीची ओटी भरायचीय म्हणून बसवायची पाटावर. हळदकुंकू लावून, एखादं ब्लॉउज पीस देऊन ओटी भरायची. "अग आई, मी नाही शिवत ग मॅचिंग असल्याशिवाय ब्लॉउज! तू कशाला कुठून कुठून काढून देतेस ब्लॉउज पीसेस!" त्यावर तिचं ठरलेलं उत्तर "असू दे ग, माहेरवाशिणीचा हक्क असतो तो!" आज ते आठवलं की डोळे नुसते भरून येतात तिच्या आठवणीने! रोज येता येता तिला अशीच उभ्या उभ्या भेटायची मी. तिला वाटायचं मधुमतीला चहा तरी करून द्यावा, काहीतरी हातावर टाकावं तिच्या, क्वचित इतकंस काहीतरी छोटूसाठी द्यावं. बस्स इतकंच! पण मी कायम घाईत. "नको ग, मला काही चहाचं कौतुक नाहीय! तुला तर माहितीच आहे. अन आत्ता खरंच नको ग काही. चल येते !" म्हणत मी निघायचीही. त्याही दिवशी अशीच घाईघाईत घरी आले अन दुसऱ्या दिवशी सकाळीच 8 वाजता भावाचा फोन. "आईला आयकॉन ला अँडमीट केलंय. सकाळी बाथरूमला गेली तर तिथेच पडली. बहुदा बीपी एकदम वाढल्याने झालं असावं असं डॉक्टर म्हणताहेत." मला एकदम काहीच सुचेनासं झालं. लगेच कपडे बदलून हॉस्पिटल ला पोहचली तर तिथे कळलं तिला ICU त ठेवलंय. "अरे, काल संध्याकाळी तर एकदम ठीक होती रे, अचानकच काय झालं?" हे मी भावाशी बोलतेय तेवढ्यात डॉ. लोटे ICU तुन बाहेर येतांना दिसले. आमच्याजवळ येताच म्हणाले. "शक्यता फारच कमी आहे. कुणाला बोलावयाचे असेल तर बोलावून घ्या!" ते ऐकल्यावर बाकी पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला अन डोळे अविरत पाझरायला लागले.
काल दोन मिनिटं तिच्याशी बोलले असते तर असा कोणता उशीर होणार होता मला? मनात आलं आपण किती गृहीत धरत होतो तिला. खूप अपराधी वाटत होतं. सारखी दरवाज्यात उभी असलेली तिची मूर्ती डोळ्यासमोर येत होती. बस्स ती माझी तिची शेवटची भेट. नंतर सात आठ दिवसात डिस्चार्च मिळाला दवाखान्यातून. पण ना तिला हालचाल करता येत होती, ना बोलता येत होतं, ना काही खाता पिता येत होतं! बघायची पण त्या नजरेत ओळख नव्हती! असून नसल्यासारखच उरली होती! आणि महिन्याभरातच ती गेली सुद्धा. तिच्या आठवणी तर अगणित आहेत. तिचं आमच्यासाठी जीव पाखडणं, तिने आमच्यावर केलेले संस्कार, तिचं मायेने खाऊ घालणं वगैरे वगैरे असंख्य आठवणी. पण हे गाणं ऐकता ऐकता आतमध्ये जी तार छेडल्या गेली अन त्याअनुषंगाने माझ्या मनातली जी खंत जागी झाली तेवढं फक्त या लेखात सांगते.
आम्ही तेव्हा अंजनगाव ला राहायचो. मला आठवतं, तिचं वाचन अफाट होतं. ज्ञानेश्वरीचा केवढातरी अभ्यास तिने केला होता. मुख्य म्हणजे एकपाठी म्हणतात ना तशी होती ती. प्रचंड पाठांतर होतं तिचं. ज्ञानेश्वरीतल्या कितीतरी ओव्या, केवढेतरी संस्कृत श्लोक, स्तोत्रं, कितीतरी कविता मुखोद्गत होत्या तिच्या. ती स्वतःही खूप सुंदर कविता करायची. मंगलाष्टकं तर तिने कैक केले असतील! कुणाही परिचिताचे लग्न असेल अंजनगावात तर मंगलाष्टकं तिचेच असायचे. आणि इतक्या पटकन करून द्यायची की बस्स! तेव्हा आमच्याकडे तरुण भारत यायचा. त्यात तर वाचकांचे मनोगत मध्ये तिची प्रतिक्रिया हमखास असायचीच. कुठल्याही छोट्या मोठ्या घडामोडीवर एखाद्या पोस्टकार्ड किंवा अंतर्देशीय पत्रावर पटकन काहीतरी खरडायची अन द्यायची पाठवून! रफ वगैरे काही नाही. सगळं एकदम फेअरच! मुख्य म्हणजे ते छापूनही यायचं! तेव्हाचे तरुण भारतचे संपादक मा. गो. वैद्य यांनी एकदा अग्रलेखात तिचा उल्लेख केला होता की अंजनगाव सारख्या छोट्याश्या गावातली ही स्त्री कुठल्याही घडामोडींवर इतक्या मार्मिक प्रतिक्रिया देते तर हिला पत्रकार का म्हणू नाही ? खरं म्हणजे केवढा हा गौरव ! पण आम्ही कधीही तिचं कौतुक केलेलं मला आठवत नाही. बाबांचा सुद्धा स्वभाव असा की कधी तोंडावर कौतुक केलेलं अजिबात आवडायचं नाही त्यांना. आता जेव्हा मी किरकोळ एवढसं काहीतरी लिहिते, सोशल मिडिया वर पोस्ट करते आणि चार लोकांचे “लाइक्स” आले की लगेच हुरळून जाते तेव्हा खूपदा मनात येतं की आई एवढं सुंदर, अभ्यासपूर्ण लिहायची पण आपण तिच्या लिखणाला काय किंवा कुठल्याच गोष्टीला दाद अशी दिलीच नाही कधी. मात्र आम्ही कधी महत्व दिलं नसलं तरी अंजनगावात बाकी तिला खूप मानायचे सगळे. कुणालाही कुठे काही बोलायचं असेल, काही कविता, निबंध वगैरे लिहून हवा असेल तर तिच्याकडे यायचे लोक. तीही अगदी
सौ. मधुमती वऱ्हाडपांडे
अकोला
No comments:
Post a Comment