Friday, July 10, 2020

वृद्धाश्रम

एकदा प्रवासात हायवेवर एक वृद्धाश्रमाची पाटी पहिली. आजूबाजूला शेते, मागे
डोंगर, समोर हायवे. या निसर्गरम्य वातावरणाचं वर्णन करणारी जाहीरात. वानप्रस्थ वगैरे
कल्पनांचा उल्लेख. आणि या निसर्गरम्य वातावरणासाठी, आधुनिक वानप्रस्थाश्रमासाठी
शहराच्या गर्दीपासून दूर, एकांत मिळेल अशा जागी हा वृद्धाश्रम होता. आजवर जेवढ्या म्हणून
वृद्धाश्रमांच्या पाट्या पहिल्या, त्या अशाच जागी होत्या. सहज मनात विचार आला, वृद्धाश्रम
अशाच जागी का असतात?

एका वृद्धाश्रम चालकाने वानप्रस्थाची कल्पना मांडली. संसारातून विरक्त होऊन
घराबाहेर पडायचं तर अशा निसर्गरम्य ठिकाणी निवास करायला हवा आणि गर्दी,
गजबजाटापासून दूर राहायला हवं असं त्याचं मत. पण प्राचीन काळची वानप्रस्थाश्रमाची
संकल्पना आणि आजची वृद्धाश्रमाची संकल्पना यांत काहीच फरक नाही का? वानप्रस्थाश्रम हा
त्या काळी वृद्धांचा स्वतःचा चॉईस असायचा. असे आज ‘बाय चॉईस’ वृद्धाश्रमात राहणारे वृद्ध
किती असतात?

अनेक महिला मंडळे, सामाजिक संस्था यांच्या उपक्रमांत ‘वृद्धाश्रमाला भेट’ असा
एक उपक्रम असतो. ही भेट झाल्यावर ‘अनुभवकथन’ ओघाने आलेच. सर्वच्या सर्व अनुभवांमध्ये
एक मुद्दा अगदी एकसारखा असतो, ‘आता पुन्हा कधी याल ?’ किंवा ‘येत जा असेच अधून
मधून’ हे त्या आश्रमातील वृद्धांचं वक्तव्य. याचाच अर्थ ते वृद्ध बाहेरच्या लोकांच्या भेटीसाठी,
सहवासासाठी आसुसलेले असतात. त्यामुळे त्यांना अशा सो कॉल्ड निसर्गरम्य वातावरणात
एकाकी वाटतं. आपण संसाराचा, सांसारिक पाशांचा त्याग करून इथे आलो आहोत, ही भावना
नसते, तर आपल्याला इथे ‘आणून टाकलं’ हीच भावना प्रभावी असते. पूर्वी फक्त ‘मुलाला आणि
सुनेला नकोसे झाल्यामुळे वृद्धाश्रमात आलेले’ वृद्ध तिथे राहत असतात असं मानलं जायचं.
आता मात्र मुलेच नाहीत म्हणून , किंवा असलीच तर परदेशात आहेत म्हणून, किंवा इतर
कोणत्याही कारणाने मुला-सुनेच्या किंवा लेकी-जावयाच्या घरात न राहता स्वतंत्र राहायचे
म्हणून अनेक वृद्ध वृद्धाश्रमात राहणे पसंत करू लागले आहेत. त्यांची पार्श्वभूमी सधन आहे. ते
‘बिचारे’ नाहीत. त्यांना संसाराचा किंवा सामाजिक जीवनाचा त्यागही करायचा नाहीये. मग
त्यांच्यावर हा एकांतवास का लादला जातो?

जिकडे पाहावे तिकडे फक्त वृद्ध आणि वृद्ध नजरेस पडणार. कुणीही तरुण, उत्साही

व्यक्ती आसपास नाही. समाजात मिसळणे नाही, बाजारात किंवा नाटक सिनेमाला,
व्याख्यानांना जाणे नाही. या सर्वांमुळे वृद्धाश्रम ही शिक्षा वाटू लागते. या वृद्धांपैकी जे
धडधाकट असतील, आपली आपण काळजी घेण्याजोगे असतील त्यांना तर हे वृद्धाश्रम म्हणजे
तुरुंगच वाटतात. निसर्गरम्य मात्र निर्मनुष्य जागा दोन दिवस वीकेंड हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून

बऱ्या वाटतात. कायमचे निवासस्थान म्हणून या जागा आपल्यापैकी तरी किती जणांना
आवडतील? मग हे, आयुष्यात आनंदाने जगलेले, समाजात मिळून मिसळून राहिलेले
,लोकांमध्ये वावरलेले, कर्तृत्ववान वृद्ध अशा अज्ञातवासात आनंदाने जगतील का? तिथे राहून
राहून ते हळूहळू ‘बिचारे’ आणि अगतिक होत जातात.

अनेक वृद्धांचे परदेशी असलेले नातेवाईक त्यांच्यासाठी भेटवस्तू पाठवत राहतात.
त्या त्यांच्यापर्यंत पोहचतही नाहीत. आधी सांगितलेल्या सुविधा मिळत नाहीत. कितीतरी
प्रकारचे अपहार होत राहतात. आणि परदेशात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना ते काळतही
नाही. कधीकधी वाटतं, हे आश्रम यासाठीच तर असे गावाबाहेर नसतील?

कोरोनामुळे आपण सर्वांनी नुकताच लॉकडाऊन चा अनुभव घेतला. आपण
आपापल्या घरी, आपापल्या कुटुंबियांसह मजेत होतो. रोज नवे पदार्थ, नवे खेळ, झूम मीटिंग्स,
फेसबुक, यु ट्यूब आणि इतर apps चोवीस तास हात जोडून सेवेशी हजर होते, तरी आपण
कंटाळलो होतो. काहीजण मानसिक आजारांना बळी पडले. लॉकडाऊनमध्ये मानसिक दृष्ट्या
निरोगी राहण्यासाठी काय करावं यावर मानसशास्त्रज्ञ लेख लिहू लागले. का घडावं असं?
कारण मानव समाजशील प्राणी आहे. सोशल डिस्टंसिंगला अजून सरावलो नाही आपण, मग या
वृद्धांना तर सोशली क्वारंटाइन केलं जातंय. जवळपास नजर जाईल तिथपर्यंत कोणतेही गाव
नाही. वस्ती नाही. आश्रमातील सहनिवासी आणि कर्मचारी सोडले तर बाहेरचे कुणीही दृष्टीस
पडणार नाही, किंवा आतील वृद्ध बाहेर कोणासही दिसणार नाहीत अशी ‘चोख’ व्यवस्था! अशा
ठिकाणी राहून त्यांचं आयुष्य दहा वर्षांनी कमी होत असावं.

मला वाटतं ‘वृद्धाश्रम’ ही संकल्पना री-डिफाईन करायची गरज आहे. वृद्धाश्रम
शहरात असावेत. किमान जिथून बाजार, नाट्यगृहे, सिनेमा हॉल जवळ असतील; जिथे गॅलरीत
उभं राहिल्यावर कुणी तरुण, कुणी लहान मुले दृष्टीस पडतील अशा ठिकाणी तरी असावेत.
म्हणजे मग ते खऱ्या अर्थाने आयुष्याची सेकंड इनिंग खेळू शकतील. समाधानाने जगातील आणि
समाधानाने जगाचा निरोप घेतील.

No comments:

Post a Comment