Thursday, May 14, 2020

रामायण... रामायण

कपिल शर्मा च्या शो मध्ये रामानंद सागर यांचे पुत्र आणि सीता, राम, लक्ष्मण यांच्या भूमिका सादर केलेले कलाकार अरुण गोविल,, सुनील लहरी, दीपिका आले होते. त्यांचे त्यावेळेसचे अनुभव ऐकून मनापासून रामायण बघण्याची इच्छा झाली.  पण नंतर विसरले ते. शो पाहताना असं माहीत पण नव्हते की असा न भूतो ना भविष्यति  lock down आपल्या जीवनात येईल. लोकांना घरात तर बसवलं पण त्या बरोबर त्यांच्या मनोरंजनासाठी जुन्या मालिका  प्रसारित करण्याची कल्पना प्रशंसनीय आहे.      

जेव्हा त्या मालिका प्रसारित झाल्या तो 90 च्या दशकाचा काळ पुन्हा आठवला. रस्ते, बाजारपेठ अगदी लॉकडाऊन झाल्यासारखे तेवढा एक तास ओस पडायचे. लोकं मोठ्या भक्तिभावाने रामायण बघत असत. मंत्रमुग्ध करण्याची क्षमता या महाकाव्यात आहे असं मला वाटतं. हल्ली ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट तर इतिहासाचा विपर्यास करतात पण रामानंद सागर यांनी दाखवलेले हे रामायण बरचं सुसंगत आणि बरचसं पटणार वाटतं. त्यांची टिम चांगली अभ्यास करून नेमकी कथा सादर करीत होती. लोकांना काही तरी चांगले देण्याचा त्यांचा प्रयत्न प्रामाणिक वाटला. वाल्मिकी, तुलसीदास, बंगाली आणि तमिळ भाषेत लिहिलेले रामायण इतके संदर्भ घेऊन त्यांनी रामायण बनवले हे त्यांनीच मालिकेच्या सुरुवातीला येऊन सांगितले. खरंतर इतक्या विविध भाषेत रामायण लिहिले गेले तर त्याचा मूळ गाभा, मूळ स्वरूपात व्यक्तिप्रमाणे बदल होत गेले असतीलही. तंत्रज्ञान आजच्या सारखं नसूनही बर्‍याच प्रमाणात परीणाम आणण्याचा प्रयत्न केला आहे. अध्यात्मिक तत्वज्ञानाची शिकवण संवादातून दिली गेली आहे. अगदी कुंभकर्णाची राक्षसी, झोपाळू प्रतिमा देखील तशी नव्हती. तो चांगला ज्ञानी, तप करणारा, कर्तव्य /जबाबदारी जाणणारा होता. हे लक्षात येते. असे अजून काही प्रसंग आहे ज्यांचे खरे स्वरूप लक्षात येते. जसे सीतेचे अग्निदिव्य, गर्भवती असूनही सीतेचा वनवास. 
राक्षस लढाई, रावण युद्ध बघताना एखादी कार्टून फिल्म बघितल्या सारखी वाटते खरी पण सर्वसामान्य प्रेक्षक ते बुध्दीजीवी प्रेक्षक असा मोठा आवाका लक्षात घ्यावा लागतो. (mass to class) सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावलं पाहिजे, त्यात नुकतच दूरदर्शन भारतात सुरू झालेले असल्याने सर्व थरातील प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून मालिका बनवण्याचं अवघड काम रामानंद सागर यांनी केले.

छोट्या छोट्या भूमिकांपासून मुख्य भूमिकांपर्यंत कलाकार निवडही चांगली केली. त्यांचे संवाद, अभिनय यावर बरीच मेहनत घेतली आहे हे जाणवतं. वैयक्तिक जीवनात किंवा पडद्यामागे ते कलाकार कसे आहेत माहीत नाही. रामासारखे आदर्शवत नसतीलही कदाचित ते शक्यही नाही आजच्या कलियुगात. पण तरी सुद्धा राम कसा असेल तर तो हा असा असेल हे चित्र डोळ्यासमोर उभे करायला तो कलाकार यशस्वी झाला आहे. ती एक हलकीशी स्मितरेषा डोळ्यातून, ओठातून आणि पूर्ण देहबोलीतून अलगदपणे व्यक्त करण्यात कलाकार यशस्वी झाला आहे. असे प्रत्येक पात्र यशस्वी झाले आहे.वाल्मिकी ऋषि अगदी बरोबर घेतले आहे. धीरगंभीर, तपस्वी, तेजस्वी! सगळ्यात जास्त टिआरपी लाभलेली रामायण मालिका पुन्हा स्टार प्लस वर पुर्नप्रसारीत होते त्यातच त्या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. आजच्या लॉकडाऊनच्या अस्थिर, निराशाजनक वातावरणात रामायण शाश्वत सत्य वाटू लागले. 
दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा! 
जय श्री राम 🙏

No comments:

Post a Comment