आठवतं का तुम्हाला लहानपणी मोठ्ठा गोल बनवून "मामाचं पत्र हरवलं ...तेच आम्हाला सापडलं!" खेळलेलं? चाळीशी ओलांडलेल्या सगळ्यांना तर नक्कीच आठवतं असेल ते. केवढी मजा यायची न ? सहजच ती आठवण आली अन चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. दुसऱ्याच क्षणी मात्र त्याची जागा किंचित विषादाने घेतली. वाटलं ह्या टेक्नोसॅव्ही जगात खरंच कुठे हरवून गेलंय ते मामाचं पत्र आता? कुणालाच न सापडण्यासाठी! आजच्या डिजिटल जगाची तर काय गोष्ट ? अनेक वेगवेगळी नवनवीन माध्यमं आहेत संपर्कासाठी. फेसबुक काय, व्हाट्स अँप काय, इंस्टाग्राम काय आणिक काय काय सांगावं! निमिषार्धात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात संपर्क साधता यायला लागलाय. पण का कुणास ठाऊक तो जिव्हाळा नाही वाटत. काहीतरी, कुठेतरी खटकतंय हे नक्की. हे इन्स्टंट कॉपी-पेस्ट-फॉरवर्डचं जग कुठेतरी थोडंसं कोरडं वाटतंच. पत्रामधला जो ओलावा, जो जिव्हाळा, जी आर्द्रता आपण अनुभवलीय त्याची बरोबरी नाहीच व्हायची कधी!
किती सुंदर होते न ते दिवस! आपण पत्र लिहण्याचे, आपल्याला कुणाचं पत्र येण्याचे! त्यातला आनंद आपल्या पिढीने कसा भरभरून लुटलाय! मामा, मामी, आत्या, काका, काकू, मावशी, आजी, आजोबा वगैरे वगैरे जवळच्या नातेवाईकांचे पत्र म्हणजे कोण आनंद असायचा! अशा पत्रांचे अगदी छान सार्वजनिक वाचन सुध्दा घराघरात व्हायचे. काही पत्र पुन्हा पुन्हा वाचण्यात वेगळीच गम्मत असायची. त्यातल्या त्यात एखादी ओळ आपल्याबद्दल असेल तर मग पाहायलाच नको! खुप महत्वाचं असल्या सारखं वाटायचं. पत्रं कशी माणसांना एकमेकांशी बांधून ठेवायची. आपल्याला येणारं पत्र काय किंवा आपण कुणाला लिहिलेले पत्र काय- त्यातली गोडी अवीटच होती! तेव्हाचे पत्रांचेही काही संकेत असायचे. एखादी दुःखद बातमी असेल तर पत्राला मायना नसायचा. थेट "कळविण्यात अत्यंत खेद होतो की ..." अशी सुरवात असायची. तसेच लग्नकार्य , मुंज वगैरे शुभकार्यांची पत्रे आवर्जून हळदीकुंकवाच्या बोटासोबतच यायची. कोणाला तीर्थरूप अन कोणाला तीर्थस्वरूप लिहायचं ह्याचेही संकेत असायचे. जावाईबापूंना किंवा प्रतिष्ठित लोकांसाठी श्री. रा. रा. हा विशेष मायना असायचा. कालानुरूप हे सगळे मायने आता एकाच “डिअर” मध्ये अंतर्धान पावले आहेत! खास गुलाबी रंगाच्या लिफाफ्यात, गुलाबाच्या सुकवलेल्या पाकळ्या वगैरे टाकून येणाऱ्या पत्रांचं तर एक वेगळंच विश्व असायचं! त्या पत्रांमध्ये जी उत्कंठा, आतुरता, प्रेम असायचं त्याची बरोबरी आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातले फास्टेस्ट फास्ट आणि लेटेस्ट लेट कुठलेच अँप करू शकणार नाही एवढं नक्की! मुख्य म्हणजे पत्र लिहल्यावर ते पोस्ट करणे, समोरच्या व्यक्तीला ते मिळणे अन मग त्याचे उत्तर येणे, ह्यातला वाट बघण्याचा
जो कालावधी असायचा न, तोही मोठा मनोहर होता. आजच्या सगळं काही ‘इन्स्टंट’ ची सवय झालेल्या पिढीला कदाचित हे सगळं खूप बोअरिंग वाटेल. अर्थातच दोष त्यांचा नाहीय कारण ज्या फास्ट, डिजिटल जगात ते वाढताहेत त्या जगात “पेशन्स” हा शब्दच मोठ्या मुश्किलीने सापडतो आजकाल!
कधीकधी वाटते ती हुरहूर, ते पोस्टमन ची वाट पाहणं ह्यात सुद्धा एक वेगळीच गोडी असायची. “डाकिया डाक लाया ... , डाकिया डाक लाया ....” म्हणत सायकलवर टांग टाकून पत्र वाटप करत करत सगळ्या गावाच्या चेहऱ्यावर हसू पसरवणारा राजेश खन्ना कोण विसरू शकतो बरे? त्याने तर पोस्टमनला सामान्य माणसांच्या हृदयात एक खास जागा मिळवून दिली होती.
चित्रपटसृष्टीने तर अनेक सुंदर सुंदर गीतांमधून ह्या “खताच” चांगलंच भांडवल केलेलं दिसून येतं. राजेंद्रकुमारच्या ”ये मेरा प्रेमपत्र पढकर ..." ने लाखो प्रेमीजीवांचं हृदय केवढं तरी धडधडायचं अन देवानंद च्या “फुलोंके रंग से, दिलकी कलमसे, तुझको लिखी रोज पाती ...." ने असंख्य प्रेमवीर गुलाबी स्वप्नात हरवून जायचे! “फुल तुम्हे भेजा है खत में ..”, “अफसाना लिख रही हूँ ..”,“हमने सनमको खत लिखा…”,”खत लिख दे सावरियाके नाम बाबू …”,वगैरे वगैरे कितीतरी सदाबहार गाणी कायम प्रेक्षकांच्या हृदयात विराजमान झालेली होती तर “चिठ्ठी आयी हैं...वतनसे चिठ्ठी आयी हैं …”,”संदेशे आते हैं …”सारख्या गीतांनी डोळे आपसूक पाझरायला लागायचे! थोडक्यात पत्र म्हणजे हृदयाला हात घालण्याचे मोठे अमोघ शस्त्र होते फिल्लमवाल्यांचे!
आज ते सगळं कुठेतरी हरवलयं. अर्थातच त्या गोष्टी आज आपल्याला नव्या आकर्षक फॉर्म मधे भेटतातच ह्यात काही दुमत नाही. टेक्नोलॉजी सोबत आपल्याला जगता यायलाच हवं अन नविन तंत्रज्ञानाचे आपण स्वागतच करायला हवे आणि अर्थातच आपण ते करतोही. आजच्या लॉकडाउन च्या कालावधीत तर ह्या सगळ्या अतिजलद संपर्क माध्यमांचा केवढातरी दिलासा प्रत्येकाला वाटला हेही खरेच! एका क्षणात तुमच्या प्रियजनांशी तुम्ही सहज संपर्क करू शकता आहात. अगदी सगळं सगळं पटतं. बदलत्या जगासोबत जुळवून घेणेच शहाणपणाचे असते हेही कळतं ! पण अजूनही आठवणींच्या त्या साम्राज्यात हरवून गेलं की मामाच्या पत्रासोबतच आपण अनुभवलेली ती सगळी गोडीही हरवलीय ही खंत मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी उरतेच! कालाय तस्मै नमः ! अजुन काय?
मधुमती वऱ्हाडपांडे,
अकोला
No comments:
Post a Comment