Thursday, May 14, 2020

माझे शाळा प्रवास

समाजात मिसळण्याची प्रत्येकाची पहिली पायरी ही शाळा असते किंबहुना असावी . आपल्या सरकारनेही आता अन्न , वस्त्र , निवारा ह्या मुलभूत हक्कांमध्ये ' शिक्षण ' समाविष्ट केले आहे आणि वयाच्या 15 वर्षापर्यंत शिक्षण अनिवार्य सुद्धा केले आहे . शाळा माणसाला सुशिक्षित तर बनवतेच पण प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी शाळा फार मोलाचे कार्य करते हे नक्की . 

             माझ्या वडिलांची नोकरी बदलीची असल्याने सतत 2,3 वर्षांनी नवा गाव , नवी शाळा , नवे वातावरण आणि नव्या मैत्रिणी मला लाभल्या. आपल्या जगण्यावर , विचारांवर ज्यांचा  कायमचा प्रभाव राहतो असे शिक्षकही लाभले . माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अकोल्यात  झाले त्यातही तीन शाळा बदलल्या. प्राथमिक शिक्षण हे घराजवळ असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले .  जवाहर नगर चौकात आजही ही माझी शाळा दिमाखात उभी आहे , बागबगीच्यानी रंगरंगोटीनी नटली आहे हे बघून खूप छान वाटतं , आतली खरी परिस्थिती काय आहे ते माहित नाही . घराजवळाची ही जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे ' वास्तू ' म्हणून सगळा आनंदच होता , वर्गखोल्यांना , खिडक्यांना दारे नाहीत , बरं दारे नाहीत तर लोखंडी गज आहेत का ?  तर तेही नाही , भिंतींना मोठमोठी भगदाडे पडलेली की आम्ही सहज ह्या वर्गातून त्या वर्गात जात असू . पावसाळ्यात तर शाळेच्या व्हरांड्यात गायीम्हशी आश्रयाला येत आणि सगळी शाळा शेणामुताच्या वासाने भरून जाई . ह्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणजे अगदी बटुमूर्ती होत्या शिक्षिका म्हणजे ' बाई ' आणि मुख्याध्यापिका म्हणजे ' मोठ्या बाई ' असा साधा सरळ मामला होता . छोट्याशा दिसणाऱ्या ह्या मोठ्या बाईंचा धाक मात्र इतका जबरदस्त होता की शाळेच्या वेळेआधी खेळत असलेल्या आम्ही मैत्रिणी त्या येतांना दिसल्या की कुठेतरी गडप होत असू . अशा ह्या शाळेने शिक्षणाचे संस्कार मात्र उत्तम केले हे आवर्जून सांगावे लागेल . इतिहास किती रंजक पद्धतीने शिकवता येतो हे मी तिथेच अनुभवले . 

माध्यमिक शिक्षणासाठी त्याकाळी अकोल्यात प्रसिद्ध असलेल्या ' न्यू इरा'  शाळेत मी प्रवेश घेतला , ह्या शाळेची आजची दयनीय अवस्था बघून फार वाईट वाटते . अकोलेकरांच्या कित्तीतरी पिढ्या ज्या शाळेत घडल्या तिथली भयाण शांतता आज अंगावर येते .  तिथे आम्हाला पेशकार म्हणून सर होते , इतका दयाळू शिक्षक मी पहिल्यांदाच पहिला. आम्हा मुलींना कधी अभ्यासाचा कंटाळा आला की आम्ही ' सर गोष्ट सांगा नं ' असा हट्ट करायचो आणि सर लगेच आम्हाला सुरस अशा गोष्टी सांगायचे , ती गोष्ट एका तासिकेत कधीच संपत नसे मग पुढल्या तासाला आम्ही आधी सरांना गोष्ट पूर्ण करायला सांगत असू आणि मग काय तो अभ्यास होई. ही शाळा माझ्या घरापासून फार लांब होती आणि रिक्षाची काही नीट सोय होईना म्हणून मग पुढल्या वर्षी माझी रवानगी घराजवळच्या ' भारत विद्यालय' मध्ये झाली .आमच्या वर्गात एकदा रामरक्षा पठणाची स्पर्धा घेण्यात आली , मी 15 दिवस अगदी छान तयारी केली पण प्रत्यक्ष स्पर्धेत मात्र माझी फें फें उडाली , एकच एक श्लोक वारंवार म्हटल्या जाऊ लागला आणि भीतीने मला त्यापुढचे काही आठवेना . बाकीच्यांचे मात्र छान मनोरंजन झाले असावे . इथे जेमतेम एक वर्ष काढले आणि मग वडिलांच्या बदलीमुळे आम्ही पुलगाव म्हणून एका छोट्या गावी राहायला गेलो . ' रंगलाल केजडीवाल '  नावाच्या ह्या शाळेने माझी जी काही व्यासपीठाची भीती होती ती घालवली . ह्या शाळेत लोणकर नावाचे एक सर होते , काही कारणाने तास होत नसेल तर विद्यार्थी खेळायला बाहेर पडतात पण असा एखादा तास होणार नसेल तर लोणकर सर वर्गावर येतील का ? अशी विचारणा आधी होत असे , आणि सर असतील तर कोणीही खेळायला बाहेर जात नसे , विद्यार्थ्यांचे असे प्रेम लाभणारा शिक्षक खरा भाग्यवंत .  ह्या शाळेत दोन वर्ष होत नाही तर निदान नववी , दहावी तरी एका ठिकाणी होऊ देत ( कारण पुढल्या वर्षी बदलीची शक्यता होती ) असा विचार करून आम्ही अमरावतीला आमच्या मूळ गावी राहायला आलो . 

इथे माझा प्रवेश घराजवळच्या सिंधी समाजातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका शाळेत वडिलांनी घेऊन ठेवला होता पण प्रत्यक्षात शाळा सुरु झाल्यावर त्या सिंधी वातावरणात  माझे मन काही रमेना , मी 4,5  दिवस गेले खरी पण मग मात्र सपशेल नकार दिला , मग काय आई आणि मी शिक्षण खात्यातर्फे जे काही प्रवेश होत त्यात नंबर लागावा म्हणून तिथे चकरा मारायला लागलो , सुदैवाने तिथे माझ्या वडिलांचे मित्रच शिक्षणाधिकारी होते त्यामुळे आता अमरावतीतल्या तेव्हाच्या सर्वोत्कृष्ट शाळेत मला सहज प्रवेश मिळू शकणार होता पण का कोण जाणे माझी इच्छा ' श्री समर्थ माध्यमिक विद्यालय ' इथेच जाण्याची होती . वडिलांनी आणि त्या काकांनी मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मी ठाम होते ( कशाच्या बळावर ते माहित नाही ). शेवटी एकदाचा मला तिथे प्रवेश मिळाला , मात्र हे सगळे इथेच थांबले नाही . त्या शाळेत पूर्ण संस्कृत आणि संयुक्त संस्कृत चे असे दोन वर्ग होते , माझे नाव संयुक्त च्या वर्गात होते पण हे कळेपर्यंत मी एक आठवडा पूर्ण संस्कृत च्या वर्गात बसले आणि तिथे माझ्या मैत्रीणीही झाल्या आता परत त्या दुसऱ्या वर्गात जाण्याची माझी तयारी नव्हती . वर्गशिक्षिका  अर्थातच ह्याला तयार नव्हत्या , " कारण आठव्या वर्गात तिचे संस्कृत नव्हते तर तिला नववीचे संस्कृत कसे कळणार ? " असा त्यांचा योग्य सवाल होता . शेवटी आईच्या  जबाबदारीवर आणि मैत्रिणींच्या भक्कम साथीवर मी त्याच वर्गात जाऊ लागले . शाळेची ही शेवटची दोन वर्षे मी माझ्या आवडत्या शाळेत अतिशय आनंदाने घालवली हे वेगळे सांगायला नकोच . 

                     अनेक शाळांमध्ये वेगवेगळ्या शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याचा योग आला , त्यांच्याकडून कळत नकळत झालेले संस्कार अजूनही मनावर कोरले गेलेले आहेत . खंत फक्त एवढीच आहे की सततच्या अशा शाळा बदलल्यामुळे प्रिय शिक्षक , शिक्षिका ह्यांची भेट होऊ शकत नाही , किंवा झालीच तर मी त्यांना आठवत नाही . बऱ्याच मैत्रिणी आता पुन्हा संपर्कात आहेत पण काही जिवाभावाच्या मैत्रिणी अजूनही कुठे आहेत , काय करतात हे माहित नाही .  
बघूया ...शेवटी 
" छोटीसी ये दुनिया , पहचाने रास्ते है
तुम कहीं तो मिलोगे , कभी तो मिलोगे
तो पुछेगे हाल "

No comments:

Post a Comment