मला स्वयंपाक -बिम्पाक नको सांगू बरं !....फार बोर काम आहे ते......वाटल्यास तुला बाहेरुन काही आणायचं असेल तर सांग आत्ता पटकन सायकलवर टांग मारुन आणून देते....हे आणि असे संवाद अगदी लग्नापर्यंत चालू असायचे माझे आईसोबत. तासनतास स्वयंपाकघरात बायका कशा काय रमतात बुआ ह्याच आश्चर्यच वाटायचं मला.
तसं बघायला गेलं तर सणावारी पाहुणेराहुणे असताना वरची मदत भरपूर करायचे पण स्वयंपाकाशी मला कधीच जवळीक कराविशी वाटली नाही .त्याला कारणही तशीच होती म्हणा....सकाळचा स्वयंपाक कायम सोवळ्यात करणारी माझी आई आम्हाला तिथे फारसं लुडबूडू देत नसे आणि संध्याकाळी तर फोडणीचं वरण,पिठल टाईप स्वयंपाक असायचा त्यामुळे मी त्याकडे लक्षदेत नसे. पण कॉलेजमध्ये होमसायन्स विषयच असल्याने तीथे शिकवले जाणारे पदार्थ आवडीने शिकणे नि ते घरी करुन पहाणे हे मात्र आवर्जून करु लागले.आजही मला आश्चर्य वाटतं आणि गंमतही वाटते की,घरी अजिबात स्वयंपाक नं करणरी ,मला फायनल प्रॅक्टीकलला पुरणाची पोळी आली ,पहिल्यांदा जरा घाबरले पण त्यावेळी माझी पोळी अव्वल झाली होती हे मला एक्स्टर्नल सोबतच आलेल्या इंग्रजीच्या साठ्ये मॅडमनी हळूच सांगितले आणि खरच मी प्रॅक्टीकलमध्ये हायेस्ट होते.....पण हे तेवढ्यापुरतच म्हणजे मार्क्स मिळवण्यापुरतच नंतर तुझामाझा काय संबंध नाय !.....अशा टाइप परत सुरु.
त्यातलच दुसरं कारणही होतं अगं मुलींच्या जातीला आयुष्यभर मग करणच आहे.आता राहू दे असं म्हणून कुणिही म्हणजे आई,आजी,आत्त्या,मावशी फारसं स्वयंपाकात मदत कर अशी अपेक्षाच ठेवत नसे .मलातर हेच हवं असायच जमेल तितकी सुटका मी त्यातून करुन घेत असे .सांगायचा मुद्दा हा की आधीच उल्हास नसायचा आणि कुणी राहू दे म्हणायलाच उशीर की ,मग तर पथ्यावरच पडायचं .
लग्नानंतरही फारशी परिस्थिती वेगळी नव्हतीच. ढुळूक फोडणीच वरण, बिना वाटणाच्या पातळढुळूक ताटभर संचार करणार्या भाज्या. म्हणजे पोटापुरत करणे व खाणे इतपतच स्वयंपाक येत होता नशीब नोकरीमुळे आम्ही दोघेच राहत होतो नाहीतर काही खरं नव्हतं . नवरा बिचारा !आपल्याला रोज जेवायला मिळतं यातच समाधान मानायचा. याला आपण सुगरण तर नक्कीच म्हणणार नाही पण माझ्या दोन्ही आज्या,आई,आत्त्या ह्या खरोखर सुगरणच! ..ती त्यांची चव आठवायची आणि व्याकुळ व्हायची, पण इकडे सगळाच रड!...चांगल खायच असेल तर पहिले स्वतःला येईल तेव्हाच पोटात जाईल हे लक्षात आल्यावर माझी मीच स्वतःला स्वयंपाकात रेटायला लागले .आणि हळू हळू हाताला चव येऊ लागली आता तुम्हाला वाटेल हे एवढे नमनाला घडाभर तेल कशाला!...............
तर सध्या lockdownच्या पिरेडमध्ये पुन्हा नव्याने नवीन नवीन डिशेस बनवण्याची ऊर्मी उफाळून येऊ लागली.मधल्या काळात रोजच्या धबडग्यात मनात असुनही जे करता येत नव्हते असे पदार्थ करुन बघु या असे मनात ठरवले.त्यात मार्गदर्शक ठरलेले युट्युब चॅनेल ,आणि सर्वात महत्त्वाचे होते ते मैत्रिणींचे चालते बोलते चॅनल!.....एकमेकींना अतिशय सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे ते ते पदार्थ आवडीने करावेसे वाटले.खरं सांगायच तर lockdownचा काळ हा नवं काहीतरी शिकण्याचा सुवर्णकाळ मानुन पदरात जितकं पाडुन घेता येईल तितकं घेण्याचा प्रयत्न अर्थात माझ्या कुवतीप्रमाणे .ऊन्हाळी वाळवणाचे पदार्थ आणि सोबतच केक,रसगुल्ला,जिलेबी,सुरळीची वडी, हाताच्या चकल्या असे खासमखास ठेवणीतले पदार्थ ज्यासाठी आपण नेहमीच हलवायाची वाट धरतो असे पदार्थ घरी करणे शक्य झाले म्हंटल्यावर मुठभर मांस चढणारच ना मैत्रिणींनो!......... असे पदार्थ गृपवर टाकले की काही सख्या रेसिपी विचारुन करुन बघायच्या व त्यात सक्सेसही व्हायच्या तेव्हा आणखी छान वाटायचं!. ह्या आनंदाची देवाणघेवाण करण्यातही एक वेगळाच आनंद होता .मनाला प्रसन्न ठेवणे हे आताच्या कठीण प्रसंगात एकप्रकारचं चॅलेंजच आहे तर त्यातच आपण दररोजच्या तोचतोचपणाला ब्रेक करुन वेगळेपण आणलं तर नक्कीच घरचे दारचे सगळेच खुश राहतील यात तीळभरही शंका नाही.
यात वेगवेगळेपणाच्या बाबतीत खरी साथ दिली ती टरबुजाने !...त्याचे पाठ-पोट सगळ्याचाच उपयोग करुनते फस्त केले आणि शेवटपर्यंत त्याची पाठ सोडली नाही. चेरी,वाळवणाचे पापड,सांडगे,थालीपिठ,धिरडे,असे सगळे प्रकार केले,अप्रतिम चवीचे झाले आणि मुख्य म्हणजे पौष्टिक म्हणूनही उत्तम होते. टरबुजाच्या पाठिशी मी इतकी प्रामाणिक आहे हे पाहून तर अहोंनी एक दिवस गंमतच केली. त्यादिवशी आम्ही खरबुज चिरले दुपारी आणि खाण आटोपल्यावर लेक ती सालं बाहेर टाकायला उचलत असतानाच अहो म्हणाले अरे टाकू नको ती सालं आईला काहोतरी बानवायच असेल त्याच!.........खरं सांगते मैत्रिणींनो आश्चर्यमिश्रीत भावाने मी हसत होते आणि सगळ्या सालांना आता माझाच एकमेव आधार आहे असं मनात आलं की काय ह्यांच्या!......किंवा तूच त्यांना मानाच स्थान देवू शकते बघ गं जरा त्यांच्याकडे! असेच सगळे भाव मनात पटापटा येऊन गेले.गोष्ट तशी गमतिची पण माझी आई नेहमीच म्हणते " एक गहू तीचे प्रकार बहू" कशातनं काहीनाकाहीतरी नक्कीच बनू शकतं,मग वाया कशाला घालवा..
आनंद द्या आनंद घ्या!!!:!_!
@अर्चना मुळ्ये.
No comments:
Post a Comment