Sunday, August 15, 2021

अ‍ॅबनॉर्मल ते न्यू नॉर्मल व्हाया नॉर्मल

 परवा अचानक माझा मुलगा विचित्र वागायला लागला. काही कारण नसताना चिडचीड, संताप वगैरे सुरु झाला. मग काहीतरी खाणं झालं आणि तो अचानक नॉर्मल झाला. तेव्हा त्याला भूक लागली होती हे लक्षात आलं. मग विषय निघाला TV वर सतत येणाऱ्या जाहिरातीचा. गेल्या काही वर्षांत ही जाहिरात नेहमी पाहायला मिळतेय. एखादी व्यक्ती सर्वांशी भांडायला उठते, अगदी मारायच्या तयारीत येते. आणि अचानक कुणाच्या तरी लक्षात येतं, तिला भूक लागलीय. मग एक चॉकलेट खाऊन ती लगेच नॉर्मल होते.

मुलाला आणि मला एकाच वेळी ती जाहिरात आठवली. मुलगा म्हणाला, “हं, म्हणजे हे असं होणं नॉर्मल आहे. त्याशिवाय का त्यांनी अशी जाहिरात बनवली असती?” मी चमकले. TV वर दिसतं ते नॉर्मल, ते प्रातिनिधिक, तेच खरं हे असं किती लोकांना वाटत असेल? मग मला दुसऱ्या एका चॉकलेटची जाहिरात आठवली. त्यात मोठ्या वयाच्या मुली सगळं तोंड भरवून चॉकलेट खातात. ते बघायलाही किळसवाणं वाटतं. पण हीच खरी खाण्याची पद्धत, हे अचूक प्रेक्षकांच्या मनावर ठसवायचा प्रयत्न यातून केला जातो. असं खाल्लं तरच तुम्ही ते ‘एन्जॉय’ केलं, नाही तर आपलं उगीचच ‘गिळलं’. काय साधलं जातं यातून? कुठे जातोय आपण ? कुठल्याही सभ्यपणा , सुसंस्कृतपणाशिवाय आदिमानव जसा वागत किंवा खात असेल, तसं आपण वागणं अपेक्षित आहे? मग आठवलं की, आजकाल तेच जगणं खरं, नैसर्गिक आणि प्रामाणिक म्हणायची फ़ॅशन आली आहे. आणि आपण जे संयमित, सभ्य पद्धतीने जगतो, ते कृत्रिम, खोटं, आणि अँबनॉर्मल ठरवलं जातंय. म्हणजे जे आपण इतकी वर्ष अँबनॉर्मल समजत आलो, ते आता न्यू नॉर्मल असणार आहे आणि आपलं वागणं अँबनॉर्मल!

मग TV वरची एकेक गोष्ट आठवत राहिली. जवळजवळ सगळ्याच मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंध दिसतात. अगदी अवंतिका, आभाळमाया पासून ते आता थेट एकीच्या नवऱ्याची दुसरी, तिसरी बायको घरात येऊन बसेपर्यंत. मग हा विषय मांडण्यातला फरकही जाणवत गेला. अवंतिका मध्ये हे असं वागणं चूक आहे हे तिचं ठाम मत होतं आणि तिच्या नवऱ्यालाही पुढे ते पटलं, तरी त्याची शिक्षा त्याला मिळालीच. आभाळमाया मध्ये नवर्याचं असं वागणं दुर्लक्षून नायिकेने त्याला नाही, तरी त्याच्या मुलीला स्वीकारलं. मात्र ह्या लोकांचं हे असं वागणं नॉर्मल नाही, हा विचार कुठेतरी मनात यायचाच (सीरियलवाल्यांच्याही). पुढे हे चित्र सरसकट दिसू लागलं आणि आता तर घरात गुणी बायको असताना नवरा राजरोस लफडी करताना दिसतो. ही लफडी साऱ्या कुटुंबासमोर सुरु असतात. सर्वांना ठाऊक असतात. आणि सर्वांनी ती स्वीकारलेली दिसतात. हाही प्रवास कुठल्या दिशेने जातोय?

भूक, मग ती पोटाची असो कि शरीराची, अशा असंयमित, असंस्कृत, खरंतर बीभत्स पद्धतीनेच भागवली जावी, हेच आता नॉर्मल असणार. आदिमानवाला तरी कुठे कुटुंब वगैरे संकल्पना ठाऊक होत्या?आदिमानव कपडे तरी कुठे घालत होता? म्हणजे आता कमी होत चाललेली कपड्यांची लांबी, कपडे न घालण्याची दिसू लागलेली इच्छा, हेही नैसर्गिक, न्यू नॉर्मल असणार आहे. आदिमानव खऱ्या अर्थाने ‘स्वतंत्र ‘ होता. त्यासाठी काही गोष्टींची किंमत त्याला मोजावी लागत असेलही, पण ते त्यातून मिळणाऱ्या स्वातंत्र्यापुढे अगदीच नगण्य असणार. तुम्ही ओल्ड नॉर्मल संकल्पनांना चिकटून बसणारे जुनाट, प्रतिगामी असाल तर तुम्हाला हे अँबनॉर्मल वाटू शकेल, पण हेच न्यू नॉर्मल आहे.

मग मधली हजारो वर्षं मानवाने जी सभ्यता, संस्कृती निर्माण केली, जोपासली, जपली, ते काय होतं? म्हणजे एवढी वर्षं प्रयत्नपूर्वक जो बदल मानवाच्या वागण्यात, व्यवहारात होत गेला, किंवा मानव जाणीवपूर्वक करत गेला, ते सर्व विनाकारण, व्यर्थ होतं? दोन तास खपून एखादं काम केलं आणि ते निरुपयोगी होतं असं कळलं तरी आपल्या जीवावर येतं. मग ही हजारो वर्षे मानव सुसंस्कृत बनण्यासाठी जे काही करत होता, ते निरुपयोगी ठरवताना जग इतकं नॉर्मल असू शकतं? कुठेतरी काहीतरी घोळ होतोय. माझ्याच डोक्यात काहीतरी केमिकल लोच्या झालाय. 

न्यू नॉर्मल जगात हा लोच्या दूर करण्यासाठी उपाय आहे का?

Saturday, August 14, 2021

टाळी ती वाजावी


 "टाळी वाजवावी

गुढी  उभारावी

वाट ही चालावी

पंढरीची ..."

चोखोबांचा अभंग कानावर पडला आणि त्यातल्या 'टाळी' शब्दावरच माझा जीव अडकला. 
दोन हातांचा क्षणाचा संगम नाद निर्माण करतो, त्यालाच आपण 'टाळी' म्हणतो. टाळी! ती एक किंवा दोन प्रहरांची असते. पण कधी कधी कुणाला उत्साहित करण्यासाठी अथवा शाबासकी देण्यासाठी, टाळ्यांचा 'कडकडाट' सुद्धा केल्या जातो. या टाळी वाजविण्याची गंमत असते बघा, टाळीच्या पद्धतीवरून त्या व्यक्तीच्या स्वभावाची कल्पना करता येते. विश्वास बसत नाही? मग आत्ता या क्षणापासून निरीक्षण करायला सुरुवात करा. तुम्हाला वेगवेगळे स्वभाव कळतील. काही अगदी दिलखुलास असतात तर काही तोंडदेखले असतात. काही वरकरणी आनंद पण अंत:करणात असूया घेऊन वावरणारे असतात... हे सगळे प्रकार त्यांच्या टाळी वाजविण्याच्या पद्धती वर्णन लक्षात येतात.

          पुण्याच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात एक सुभाषित लिहिलेलं आहे,...
 'आषाढ घना सम मिळो दाद रसिकांची अन्  उधळण व्हावी अविरत उन्मेषांची'... सुधीर मोघे यांचं हे सुभाषित! प्रतिभेचे उन्मेष साकारणाऱ्या प्रत्येक कलावंताला ही दाद हवी असते. त्याच्या ठायी जबरदस्त टाळ्यांची भूक असते. आणि म्हणूनच आम्ही निवेदक, कार्यक्रमात वारंवार टाळ्यांची दाद मागत असतो...! सादाला प्रतिसादाची अपेक्षा करणं चुकीचं आहे का? अहो, रंगमंचाची ही दुनियाच न्यारी आहे. इथे स्पॉटलाईटचा झोत अंगावर घेत  वावरणाऱ्या व्यक्तीचं ते सादरीकरणच नव्हे तर तो त्याचा परकाया प्रवेश असतो. रंगमंचावरचा तो क्षण त्या कलाकाराचा असूनही त्याचा नसतो. एक आगळा 'कला- उत्कंठते'नं भारलेला असा 'तो क्षण' असतो. समोरच्या रसिकांपासून चार बोटं उंच असण्याचा... तो क्षण! पण तरी मायबाप प्रेक्षकांच्या समोर नतमस्तक होण्याचा...त्यांच्या प्रतिसादाच्या टाळीची प्रतिक्षा करणारा तो क्षण असतो. नाटक असो अथवा संगीत, नृत्य, चित्र, काव्य... कला कोणतीही असो... काही जागा या टाळीच्या अपेक्षितच असतात. त्या ठिकाणी मन आपसूक प्रतिसादाची अपेक्षा करत असतं. कान टाळीचा आवाज ऐकायला अधीर झालेले असतात पण प्रेक्षागृहातनं टाळीचा निनाद गुंजत नाही, कलावंत खट्टू होतो पण निराश होत नाही. कोलमडत नाही. तसाच हसतमुखानं कार्यक्रम पुढे सुरू ठेवतो. कार्यक्रम झाल्यावर जेव्हा केव्हा रसिकांची भेट होते, तेव्हा ते म्हणतात,"तुमचा त्यादिवशीचा अमुक-अमुक कार्यक्रम खूप छान झाला, फार आवडला." 
आवडला? तर भल्या माणसा त्यादिवशी टाळी का वाजविली नाहीस? असा प्रश्न मनात उभा राहतो. एका टाळीला जोड दुसरीची, दुसरीला तिसरीची... अशी जोड मिळत जाते आणि टाळ्यांचा कडकडाट होतो, जो कलाकाराच्या मनात नवा हुरूप, नवा जोश प्रदान करतो.


टाळीचीही एक संस्कृती असते. काही गावं, काही रसिक हे त्या संस्कृतीचे पाईक असतात. तर काही मात्र कोरडे ठणठणीत! कार्यक्रमाचा प्रारंभ-मध्य दाद देण्याचे असतात, याचा जणू त्यांना गंधच नसतो. कर्तव्य म्हणून शेवटी कशीबशी टाळी वाजविली जाते. शेवटी कलावंताला आवाहन करून ती टाळी मागून घ्यावी लागते. यशवंत देव म्हणतात,...
"दाद द्या आणि शुद्ध व्हा. 
सोडीतो का सूर आम्ही?
 सोडीत व्हा वाहवा तुम्ही" 
ही वाहवाची भूक चांगल्यासाठीच असते. पण कधी कधी टाळी वाईट हेतूनेही दिली जाते. जसे, कोणाचा कार्यक्रम पाडायचा असेल तरीसुद्धा टाळीचा वापर केल्या जातो. ती टाळी कलावंताची एकाग्रता भंग करणारी, लय चुकविणारी असते. त्या टाळीची जोड एका लयीत नसते. हा असा प्रतिसाद कलाकाराला अपेक्षित नसतो. दाद हवी पण ती योग्य ठिकाणी हवी असते. त्यात कंजुषी नको. 

    कलावंत प्रसिद्ध असो की नवागत त्याच्या प्रकटीकरणाला दाद देणारी टाळी वाजायला हवी. पण...
पण... गेल्या दोन वर्षापासून या टाळीची भूक अधुरीच राहीली आहे. कारण? रंगमंच सुने झाले आहेत. प्रेक्षागृह रिकामे आहेत आणि कलावंत बंदिस्त खोलीत छोट्याशा पडद्यावर स्वतःची कला सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. समोरचा रसिक संख्येने कळतो पण त्याच्या देहबोलीची जाणीव होत नाही. ऑनलाईन कार्यक्रम होत आहेत. मात्र ती तात्पुरती व्यवस्था आहे ज्यामुळे सादरीकरणाला वाट मिळते आहे पण त्यात जिवंतपणा वाटत नाही, कारण त्या क्षणाला सजीव करणारा टाळीचा आवाज कानावर येत नाही.
 फिरून तो पूर्वीचा माहोल अनुभवायला मिळावा टाळ्यांचा कडकडाट व्हावा, अशीच अपेक्षा प्रत्येक कलावंताच्या मनात आहे. आणि आशा आहे तिथे मार्ग नक्कीच असणार. टाळी नक्की घुमणार. या विश्वासाने इथेच थांबते. प्रत्यक्ष दाद नाही पण लेखाला प्रतिसाद म्हणून तुमची ईमोजीची टाळी नक्की उमटेल, ही अपेक्षा मात्र ठेवते... नमस्कार!

- सीमा शेटे-रोठे, अकोला.

Friday, August 13, 2021

घ्या पेढा !

 तो धावतच आला. मी जाता-जाता वळून पाहिले तो माझ्याशी बोलायलाच आला होता. जवळपास दीड वर्षानंतर बघितलं पण आठवला, चेहरा विसरणं शक्यच नव्हतं. 

नुकत्याच पौगंडावस्थेत जाणार्‍या त्याला पहिल्यांदा त्याचा मामा माझ्याकडे घेऊन आला होता. गप्प गप्प राहतो, फारसा कोणामध्ये मिसळत नाही, कधी आनंदी वाटत नाही, इ, इ,  कोण? तर हा 12-13 वर्षांचा मुलगा! खोड्या, दंगामस्ती, हट्ट करणारी नुकतीच येऊ लागलेली अंगातली रग जिरवताना कधी रागवणारी या वयातली मुलं!  पण "हा" वेगळा होता. 

लहानपणापासून आईवडिलांची भांडणं आणि विकोपाला जाणारे वाद बघतच मोठा झालेला. दुर्दैव इतकं की तो 10 वर्षांचा असताना आई कसल्याशा आजाराने वारली. मायेची सावली कायमची गेली. वडील याच्याशी बरे वागत पण नवीन आईबरोबर त्याला ठेवायचे नाही म्हणून मामा त्याच्या घरी घेऊन आलेला. तिथे वर्षभरात तो त्याचे खाणेपिणे, अभ्यास, शाळा इतपत करत होता. पण एकटा-एकटा राहतो हे नं बघवल्याने मामा माझ्याकडे घेऊन आला. काही उपाय सांगा -त्यांचे निःशब्द करणारे शब्द अजून तसेच आठवतात. 

काही दिवस तो माझ्याकडे नियमित आला. नंतर एकटाही यायला तयार झाला. आमचे बोलणे, अॅक्टिव्हीटीज त्याला आवडायच्या. घरी आला की उजळलेला चेहरा बघून मामाच्या जीवात जीव यायचा. पुढे वर्षभरात त्याचे काही चांगले मित्रही झाले. काही स्पर्धांमध्ये, शालेय उपक्रमांमध्ये भाग घेऊन त्याने चांगली प्रगती साधली. कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून माझ्याकडे त्याचे अधूनमधून येणेही बंद झाले. स्वतःहून फोन वगैरे नव्हते केले त्यांनी कधी. माझ्याही स्मृतीच्या पडद्याआड गेली अनेक केसेस प्रमाणे ही पण केस. 
परवा मात्र दहावीच्या निकालानंतर तो भेटला. क्षणाचाही विलंब नं करता त्याच्या बोलण्याचा धबधबा वाहू लागला. सुरुवातीला आॅनलाईन अभ्यासाचा कंटाळा यायचा, दुसरीच टॅब उघडून इतर गोष्टींकडेच लक्ष द्यायचो इथपासून सगळं त्याने सांगायला सुरुवात केली. हळुहळू सरावलो. प्रयत्न सुरू केले पूर्वीसारखाच अभ्यास करण्याचे.प्रयेक गोष्टीची पीडीएफ, व्हिडीओ बघणं, वाचणं पुढे पुढे कंटाळवाणं वाटू लागलं. स्वतःहून पूर्वीसारख्या नोट्स काढायच्या तर ढोरमेहनत करतोय का अशी शंका येऊन ते अर्धवट रहायचं. आॅनलाईन परीक्षा खूप  घेतल्या शाळेनी पण उत्तर आलं नाही की पटकन कॉपी करण्याचा मोह व्हायचा. कळायचं चुकतय पण वळायचं नाही.... सगळं सगळं बोलत होता तो. 

           सुरुवातीला कधीही झोपा, कुठलेही कपडे घाला, आंघोळीचं, जेवणाचं काही गणितच नव्हतं.घराबाहेर पडायचं नाही आणि सतत त्याच चार भिंतीत चार लोकांनाच बघणं नंतर नंतर नकोसं वाटू लागलं. सोबतीला भरीस भर बाहेरच्या जीवघेण्या बातम्या सतत आदळत असायच्या. कोरोनामुळे, लाॅकडाऊन, मृत्यू, अत्यवस्थ, इतके " शे",इतके "हजार" याशिवाय काही ऐकूच येत नव्हतं. मित्रांचीही तीच गत. स्वतःहून फोनवर बोलणे, आॅनलाईन अॅक्टिव्हीटीज करणे, यामुळे तात्पुरतं बरं वाटायचं. लेकिन वो बात नहीं थी!

आज शाळा संपली हा विचार केला की छाती धडधडते. नवीन आयुष्याला सुरुवात करताना पाय कापतात. पळून जावंसं वाटतं कुठेतरी लांब. पण माझ्यामुळे आधीच सगळे चिंतेत असायचे. कशाला त्यांचा त्रास वाढवायचा म्हणून शूरपणाचा, सगळं नॉर्मल असल्याचा मास्क घालून फिरतो. पण हे किती काळ चालणार? 
आरोग्याचा धोका, सामान्यांचे हाल, सगळंच उदासवाणं. त्यातही मूठभर स्वार्थी माणसं आपल्या पोळीवर तूप कसं पडेल या फिकीरीत. खूप त्रास होतो विचार केला की. कधी एखादी चांगली गोष्ट घडली, काही आशादायक घडल्याचे कळले की मात्र पुन्हा उभारी वाटते. 

आज हे सगळं सगळं बोलून बरं वाटतंय. हा घ्या पेढा! दहावी पास झाल्याचा नाही बरं हा! तो निकाल तर सगळ्यांनीच आमची ईश्वरचिट्ठी निघाली म्हणून घोषित केलाय आधीच ! त्याचही काही वाटत नाही. यापुढे मात्र आल्या प्रसंगाला हसत सामोरा जाईन, मार्ग काढत राहीन. स्वतः अडणार नाही, कोणी अडलेला दिसला तर मदतीचा हात देईन. हा निश्चय पक्का केल्याचा पेढा घ्या! 

वर्षा

Sunday, August 8, 2021

चारणकथा

 चातुर्मास आला नि त्यातही श्रावण आला की " आटपाट नगर होतं " किंवा " ऐका गणेशा तुमची कहाणी " अशा कथा कहाण्यांची आठवण हमखास येतेच.प्रत्येक कहाणी काहीतरी समजावून शिकवून जाणारी असते .या कहाण्यांचा विचार करताना , मध्यंतरी काही कारणामुळे राजस्थानी लोकसाहित्याच्या संदर्भात अनेक गोष्टी ऐकण्यात आल्या त्या आठवल्या. त्यात एक जोगदेव यांची गोष्ट मला आवडली. ती सांगते.

         आपण जसं वारकरी हा  शब्द वापरतो तसं राजस्थानात चारण हा शब्द रूढ आहे.चारण म्हणजे परमेश्वरावर अटळ श्रध्दा असलेला आणि माणूसकी जपणारा संप्रदाय. अशाच चारण झालेल्या  जोगदेवांची ही एक गोष्ट.
         या जोगदेवांकडे राजस्थानातला एक प्रांत सांभाळायला होता .त्यामुळे एक प्रकारे त्यांचीच सत्ता तिथे होती.  अतिशय प्रेमाने आपल्या जनतेला ते सांभाळत होते आणि परमेश्वर भक्तीत लीन होते .चारण असल्यामुळे त्या धर्माचे पालनही ते  पुरेपूर करत होते. 
मात्र असं असूनही सर्व लोककथांमध्ये त्यांचे उल्लेख  'बाघी 'म्हणून आले आहेत .याचं कारण असं की त्यांचा इलाका आपल्या राज्याला जोडायचा घाट भावनगरच्या राजाने घातला होता . आणि जोगदेव यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे ते राजाचे आणि राज्याचे शत्रू ठरले .म्हणून ते बाघी .बाघी म्हणजे बंडखोर. पण बंडखोर असले तरी ते मातृभूमिकरता,राजकीय समीकरणांकरिता. एरवी त्यांनी आपला चारणधर्म मात्र कधी सोडला नाही .
       एकदा ते प्रवासात असताना एका गावात एका परिचिताच्या घराजवळ पोहोचले .परिचिताने त्यांना पाहिले आणि लगेच जवळ येऊन "भोजन के लिये चलिए "असा आग्रह केला .मात्र जोगदेव म्हणाले की "अभी समय नही है । फिर कभी आऊंगा। ".
      तो परिचित म्हणाला की ,"  मै भी तो चारण हूँ। और मेरे दर तक आकर अगर कोई भूखा प्यासा लोटे ये तो चारणधर्म के विरूध्द है । यह तो हो ही  नही सकता। "  मग जोगदेवांना प्रश्न पडला की काय करावे? त्यांनी सांगितले की त्यांना बाघी घोषित करून त्यांना पकडण्यासाठी भावनगरचा राजा स्वतः त्यांच्या मागावर इथपर्यंत आलेला आहे आणि त्यांना राजाच्या  हाती सापडायचे नाही. त्यामुळे त्वरा करून  तिथून निघून जाणेच योग्य आहे .
    मात्र हा परिचित असं म्हणाला की ," आप घर पधारिए, स्नान करिये, भोजन करिये और थोडा विश्राम करिये ।तब तक मै खुद आगे चल कर राजा से बात करके आता हूँ।" आणि तो खरच गेला. राजाला भेटला .इकडे येण्याचं कारण विचारलं.
            राजाने जोगदेव यांचे नाव सांगितलं तर तो म्हणाला, "जोगदेव ? ते तर माझ्या घरी आहेत! त्यांचे तर भोजनही अजून व्हायचे आहे!" 
           राजा म्हणाला ," ते बाघी आहेत , राजद्रोही आहेत . तुम्ही जर त्यांना मदत केली तर तुम्ही देखील  राजद्रोही ठराल. तेव्हा त्यांना माझ्या हवाली करा. "      
                      तो परिचित  म्हणाला,"  शक्य नाही ! त्यांना मी माझ्या घरात आश्रय दिला आहे .मी त्यांचा घात करणार नाही."
        राजा म्हणाला ," मग तुमचं काय म्हणणं आहे?"  
      तर चारण म्हणाला ,"की आपणही लांबवर प्रवास करून आले आहात .घरी चला. स्नान करा.माझ्या घरी जोगदेवां बरोबर आपणही भोजन करा. नंतर ते निघून जातील. ते माझ्या घरून निघून गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ते करा किंवा  हवं तर त्यांना पकडा.मात्रं माझ्या घरी ते असेपर्यंत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी असेल .मी माझ्या चारणधर्माचे पालन करीन. मग आपण मला राजद्रोही ठरवून शिक्षा केलीत तरी चालेल "
             राजाला फार आश्चर्य वाटलं. त्याने असं वागण्याचं कारण विचारलं. तर तो म्हणाला,"  हम चारण है राजाजी । और यही हमारा धर्म है।स्वागत तो मै जोगदेवजी की तरह  आपका भी करूंगा ।  परंतु उनकी रक्षा भी करूंगा ।आप राजा हो । आप अपना कर्म निभाइए और मुझे अपना धर्म निभाने दीजिए  ।" 
     त्याची एकनिष्ठा ,त्याचा प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा बघून भावनगरचा राजा जोगदेवांना न पकडता माघारी परत फिरला आणि निघून गेला. 
       काही काळानंतर याच राजाची राणी  कुठल्यातरी परकीय आक्रमणाच्या  संकटामुळे घरून राजकुमारासह पलायन करून  आपल्या नातेवाईकांच्या आश्रयाला  परगावी निघाली होती .वाटेत जोगदेवांच्या प्रांतातून तिला जावं लागलं .जोगदेव यांच्या भागातील काही लोकांनी तिला अडवून लुटण्याचं ठरवलं .जोगदेवांना हे कळलं .त्यांनी लोकांना थांबवण्याचा , समजावण्याचा प्रयत्न केला . लुटारू  म्हणाले , "तुम्ही चारण आहात ! तुम्ही तुमच्या मानवता धर्माचे पालन करा .आम्ही चारण नाही.  लुटेरे आहोत!आम्हाला आमच्या धर्माचे पालन करू द्या .  तुम्हाला लुटायचे नसेल तर नका लुटू .पण आम्हाला थांबवू नका . शिवाय ही तर तुमच्या शत्रूची बायको आहे. आम्ही तिला तसं सोडणार नाही."
     हे लोक ऐकत नाहीत असं बघून जोगदेव स्वतः घोड्यावर स्वार होऊन तलवार घेऊन निघाले. त्यांनी राणीला रस्त्यात गाठले आणि स्वतःचा घोडा राणीच्या पालखीबरोबर  ठेवत राणीला तिच्या मुक्कामापर्यंत पोहोचवून दिलं .राणीच्या पालखीतला छोटा  राजकुमार रस्त्यात प्रवासाला कंटाळून जोगदेवांना आवाज देऊन म्हणाला, " मामा मुझे आपके घोडेपर बैठना है !" तर जोगदेव यांनी त्याला आपल्या घोड्यावर घेतले .शत्रूच्या मुलाला घोड्यावरुन सुरक्षित ठिकाणापर्यंत पोचवणे आणि राणीने सुद्धा हा शत्रू आहे हे माहीत असून त्याच्या घोड्यावर आपल्या मुलाला बसू देणे यातच चारण समुदायाची परंप्रा वृत्ती- प्रवृत्ती , संस्कृती सामावलेली आहे,असं ही लोककथा सांगते .
             अशा अनेक लोककथा आपल्या भिन्न भिन्न प्रांतातल्या भिन्न भिन्न संस्कृती परंपरा आणि मानसिकता यावर प्रकाश टाकत असतात.  यांचा अभ्यास हा खरोखरच आपल्याला समृद्ध करणारा त्याचबरोबर आपले मनोरंजन करणारा भाग असतो.