दरवर्षी नित्य नेमाने "वारी" करणारे वारकरी, वारी चुकुनही चुकू नये, ती घडावी म्हणून जिवाचा आटापिटा करणारे आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसायची तयारी असणारे वारकरी---आणि जी घडावी, सफल संपूर्ण व्हावी म्हणून अक्षरशः स्वतःला ज्यासाठी झोकून देतात, ती वारी--ह्या सगळ्याविषयी मनात एक कुतूहल होते, उत्सुकता होती, जी बऱ्याच जणांना असेलच. ऊन,पाऊस, वारा, वादळ, थंडी--कशाचीही पर्वा न करता, अनवाणी पायांनी, खाण्यापिण्याची आबाळ सोसूनही जे कधीही वारी चुकू देत नाहीत, आणि इतके कष्ट घेऊनही प्रत्यक्ष आषाढीला फक्त कळसाचेच दर्शन घेऊन समाधान पावतात. त्यांच्यात इतकं "आत्मिक बळ" कुठून येत असेल? कुठली "अनामिक इच्छा, आंतरिक ओढ" त्यांना हे सगळं करायला प्रवृत्त करत असेल?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जरी नाही तरी बरीचशी माहिती मिळण्याचा योग आला. पालघरला लेकीकडे आलेली असतांना "वारकरी संप्रदाय" हे गुरुदेव शंकर अभ्यंकरांचे पुस्तक वाचायला मिळाले. ह्या पुस्तकात भारतीय संप्रदाय, वारकरी संप्रदाय, पंढरी महात्म्य, पुंडलिक महात्म्य, प्रमाण ग्रंथ,जसे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव,चांगदेवपासष्ठी,हरिपा ठ---अशी बरीच प्रकरणे असून त्याविषयी माहिती दिलेली आहे. याशिवाय वारकरी संप्रदायाचे योगदान, संप्रदायातील संत पुरुष, वारकऱ्यांची तीर्थक्षेत्र ह्याविषयी खूप काही वाचायला मिळाले.
"गुरू तेथे ज्ञान|ज्ञानी आत्मदर्शन|
दर्शनी समाधान|आथी जैसे|"
"प्रपंची भाग्य, परमार्थी वैराग्य
दोन्ही यथासांग,दोन्हीकडे".
(समर्थ रामदास )
महाराष्ट्रातील सर्व संप्रदायामध्ये संख्येने निःसंशय मोठा,प्रधान आणि अत्यंत लोकप्रिय असलेला असा "वारकरी संप्रदाय" हा महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे. कर्नाटकात आणि काही अंशी आंध्रप्रदेशातही प्रचलित असलेल्या या संप्रदायालाच "भागवत धर्म" वा "माळकरी पंथ" असेही म्हणतात. वारकरी संप्रदाय म्हणजे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांचा अभूतपूर्व समन्वय होय.
वारकरी संप्रदायाचे भाग्य असे की ज्ञानदेवांसारख्या विभूतीमत्वाने याच भागवत धर्माला शिरोधार्य केले. नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची ध्वजा गंगा-सिंधूच्या खोऱ्यात नाचविली. एकनाथांसारखे क्रांतदर्श महात्मे या संप्रदायाला लाभले. समाजातील जातिभेद नाहीसे व्हावेत म्हणून नाथांनी जी क्रांती केली त्याला तोड नाही.आपल्या अभ्यासाने, चिकाटीने आणि श्रद्धेने "नराचा नारायण होता येते" हे तुकारामांनी देहूसारख्या लहान गावात राहूनही सिद्ध केले. समर्थ रामदासही विठ्ठलाचे परमभक्त होते. देह थकेतो पंढरीची वारी करत होते.;परंतु रामदासी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी धर्मकारण आणि राष्ट्रकारण यांचा अभूतपूर्व समन्वय घडविला.
वारकरी संप्रदायाला फार उत्तुंग कर्तृत्वाचे संत परंपरेने लाभले.परिणामी वारकरी संप्रदायाची लोकप्रियता शिगेला पोचण्यास मोलाची मदत झाली. पैकी काही संत म्हणजे, अमळनेरकर सखाराम महाराज, विसोबा खेचर, कान्होबा(तुकया बंधू),गुरू गोविंद, गोरा कुंभार, चोखामेळा, जनाबाई, तुकाराम, एकनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई,दामाजी, दासगणू, बहिणाबाई, कान्होपात्रा, नामदेव----अशी जवळजवळ शंभराहून अधिक नावे पुस्तकात दिलेली आहेत.
वारकरी संप्रदायाने गृहस्थाश्रमी माणसाला आत्मोद्धाराचा अत्यंत सुलभ मार्ग दाखवला. देहदंड न देता, कोणतीही कठोर उपासना न करता परमेश्वराला आत्मसात करण्याचा मध्यम मार्ग ह्या संप्रदायाने स्वीकारला. ज्ञानेश्वर नाथपंथी होते, (त्यांची भावंडं पण) एकनाथ महाराज नाथ आणि दत्त सांप्रदायिक होते. शिवाय त्यांच्या घराण्यात सूर्याची उपासना होतीच.समर्थ रामदास घराण्यात देखील सूर्योपासना असल्याचे इतिहास सांगतो. असे असूनही या सर्वांना वारकरी संप्रदायाला आलिंगन द्यावेसे वाटले. यातच ह्या पंथाची थोरवी निःसंशय प्रस्थापित होते. अन्य कोणताही मार्ग न स्वीकारता, सामान्य जनांच्या उद्धाराचा भक्तियुक्त मध्यम मार्ग प्रापंचिकांसाठी हितकारक आहे,हे सर्व संतांनी जाणले होते. वारकरी संप्रदायाची प्रवृत्ती समन्वयात्मक असल्यामुळेच तो रुजला, वाढला आणि लोकप्रियतेच्या कळसाला जाऊन पोचला.हा महाराष्ट्रातील असला तरी त्याचे स्वरूप विश्वात्मक भावाचे आहे.कारण त्याची बैठक अद्वैत तत्वज्ञानाची आहे.
वारकरी कोण आणि वारी म्हणजे काय,ह्या विषयी देखील अभ्यंकर महाराज सामान्यांना पटेल अशीच माहिती सांगतात.
पंढरीची वारी करणारा तो "वारकरी". महाराष्ट्रातील अन्य तीर्थक्षेत्री नित्यनेमाने वारी करणारे आहेत; पण त्यांना वारकरी म्हणत नाहीत. पंढरीला ज्या व्यापक प्रमाणात आणि एकत्रितपणे भक्त येतात, त्या संख्येने अन्य क्षेत्री जात नाहीत.
आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री ----अशा चार प्रमुख वाऱ्यांपैकी वारकऱ्यांना प्रिय असलेली वारी म्हणजे"आषाढी वारी". वारी करी ह्याचा अपभ्रंश होऊन वारकरी हा शब्दप्रयोग तयार झाला असावा. ज्ञानदेवांनी स्वतःला आणि अन्य भक्तांनाही "वारीकर " म्हटले आहे.
"कायावाचामने जिवे सर्वस्वे उदार
बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारीकर "|
संत नामदेवांनीही ,
"आले आले रे हरीचे डिंगर
वीर वारीकर पंढरीचे"|
असा उल्लेख केलेला आहे.
"वारी" म्हणजे प्रवाशांची टोळी.(कै. राजवाडे) अमरकोषाने "वार" याचा अर्थ "संघात" असा नेमका दिला आहे.
"संकल्पाची सरे वारी
सरे अहंकाराची वारी
सारीतसे वारी,संसाराची
तेथ सरली वारी,क्रोधाचीही
एरव्ही द्वइताची वारी,
सारूनी ऐक्याचा परिवारि".
ह्यामध्ये ज्ञानदेवांनी यातायात, येरझारा, फेरा--असे वारीचे वेगवेगळे अर्थ अभिप्रेत केले आहेत. पंढरपूरची वारी जन्म मरणाची यातायात चुकवते असाही अर्थ अभिप्रेत आहे. द्वैत सरले की आत्मसाक्षात्कार होतो, अद्वैताचा गोमटा लाभ होतो,असेच ज्ञानदेवांना सुचवायचे असेल.
वारीचा हेतू स्वानंदसुखाचा आहे आणि हा आनन्द संतांनी ,त्यांच्या वाड्:मय मूर्तींनी आणि तत्त्वज्ञानाने दिला. वारी च्या संपूर्ण प्रवासात वारकरी तहान भूक विसरून अक्षरशः तल्लीन होऊन जातात.
नवीन पिढीतील युवक युवतींना या वारीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. सर्वप्रथम म्हणजे वारकऱ्यांची अतूट श्रद्धा,जे सर्व प्रकारच्या गैरसोयी सोसून पांडुरंगाच्या भेटीसाठी श्रद्धेने चालत रहातात.ही श्रद्धा कोणत्याही तराजूत तोलता येत नाही.दुसरे म्हणजे शारीरिक श्रम झेलण्याचा काटकपणा . अडीचशे ते तीनशे किमी चालणे,तेही उन्हा पावसात, सोपे नाही.कसोटीच लागते क्षमतेची. विशेषतः स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने चालतात. मुक्कामाचे ठिकाणी थंड पाण्याने स्नान वा जे प्राप्त होईल ते अन्न ब्रह्म हे चौथे अप्रूप.पाचवे म्हणजे स्वावलंबन. आपापले गाठोडे सांभाळणे, कपडे धुणे,वेळच्या वेळी आवरणे, ज्याची कामे त्यालाच करावी लागतात. सहावे म्हणजे संघटन. सातवे म्हणजे विराट-विशाल विविधतेतील एकात्म भाव! या सगळ्यातून येणारा अनुभव--- जो प्रत्यक्ष घेणाराच समजू जाणे" " या तो अनुभवाच्या गोठी"----
वारकरी संप्रदायाचे हेही वैशिष्ट्य म्हणावे लागेल की भूतदया, शांती, क्षमा, अहिंसा, सत्य यासारख्या सद्गुणांनी वारकऱ्याला अलंकृत करण्याचा प्रयत्न या संप्रदायाने केला.
वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र "रामकृष्णहरी"--राम आणि कृष्ण---या दोन अवतारांमध्ये भारतीय संस्कृतीचे अवघे सार सामावले आहे. पांडुरंगानेच सर्व अवतार धारण केले आहेत, अशी वारकरी संतांची श्रद्धा आहे. भक्तांच्या चित्ताचे हरण करणारा तो हरि---भक्तांची दुःखे नाहीशी करून ती हरण करणारा तो हरि असा आशय गर्भ शब्द म्हणजे "हरि".
वारकरी संप्रदायात सकाळी, दुपारी व सायंकाळी असे तीन वेळा भजन करण्याची रीत आहे. सकाळच्या भजनाची सुरुवात बहुदा "जय जय रामकृष्णहरी" या मंत्राने करतात.तर काहीजण ती ज्ञानदेव माऊलींच्या उच्चारानेही करतात. मराठवाड्यात मात्र "भानुदास एकनाथ" म्हणून भजनाला प्रारंभ करतात.त्यानंतर "रूप पाहता लोचनी" हा अभंग म्हणतात.यानंतर "सुंदर ते ध्यान"--या तुकारामांच्या अभंगाने दुसरी मालिका सुरू होते. तिच्यातील दहा अभंग झाल्यावर भूपाळ्या आणि वासुदेव, आंधळा, पांगळा, मुका, बहिरा, जोगी,जाते, दळण, गौळणी इत्यादी भारुडातले पद्यप्रकार म्हटले जातात.
वारकरी संप्रदायाच्या भजनात निरूपण नसते. वारीतील भजनाला मात्र खूप महत्व असते.
संतांची अनेक रूपके, भारुडे वारीत सानंद , साभिनय सादर केली जातात. या सर्व रुपकांचा, भारुडांचा ,खेळांचा वरवरचा अर्थ प्रापंचिक; पण लक्षणार्थ मात्र अवघा पारमार्थिक कल्याणाचा! .ज्ञानदेवांची रूपके त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणेच भव्यदिव्य आहेत. त्यांचे "घोंगडीचे" रूपक सर्वश्रुतच आहे.त्यांचे "गाईचे " रुपकही अप्रतिम आहे. त्यांच्या तीन गायी म्हणजे "त्रिपुटी". आणि दुभती गाय म्हणजे "साक्षात पांडुरंग".
गोंधळ, पांगुळ, पिंगळा, वासुदेव, व्यापार, धेनू, स्वप्न अशा नित्य परिचयाच्या अनेक विषयांमधून नामदेवांनी भक्तीची अनेक सुंदर रूपके मांडली आहेत. त्यांचे "पिंगळा" हे रूपक असेच सुंदर आहे.
अज्ञानाचा अंधकार जाऊन ज्ञानाची प्रभात येत असल्याचे प्रतीक म्हणजे "पिंगळा" होय.
तसेच नाथांची भारुडे वारकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. लोकभाषेतील जेवढ्या परंपरा लोकरीतीनुसार "बहुरुढ त्यांना भारुड" म्हणतात. नाथांची भारुडे म्हणजे जनजागृतीची उपदेशपर रुपकेच होत.( विंचू चावला, कान्होबा तुझी घोंगडी ) प्रत्येक रुपकामागे गहन अर्थ दडलेला आहे, जसे वासुदेव ह्या रुपकातून---"दुर्गुण टाकून सद्गुणांसंगे---सुखदुःखा समान सकळ जीवांचा कृपाळ
ज्ञानाचा उद्बोध भक्तीप्रेमाचा कल्लोळ|" . अशी स्थितप्रज्ञता अंगी बाणविण्यास सांगतो. मोहभ्रांतीचा अंधार त्यागून गुरुसंगतीत ज्ञानाचे डोळे प्राप्त करण्याचा उपदेश "आंधळा" करतो.
वारीत जो "फुगडी" प्रकार खेळला जातो, ती प्रपंचरूपी फुगडी आहे. फुगडी घालताना त्रिगुणांची वेणी पाठीवर उडते, ती आवरली पाहिजे. "हुंबरी" हा तोंडाने विशिष्ठ आवाज काढून करण्याचा खेळ होय. तुकारामांना हा आवाज आत्मनादाचा वाटतो. "टिपरी" च्या खेळात क्रोध, अभिमान पायतळी अंथरले जातात.
"दिंडीनृत्य" हा अजून एक विशिष्ट प्रकार. महाराष्ट्रातील वारकरी आषाढी, कार्तिकी एकादशीला संतांच्या किंवा देवाच्या पालखीपुढे भजन करीत नाचत जातात,त्यांना दिंडी असे म्हणतात. दिंडी या शब्दाचे लहान दरवाजा व पताका असे दोन अर्थ आहेत. आपल्याना स्वर्गाची दारे खुली व्हावीत या हेतूने वारकरी भजन करतात, म्हणून त्यांच्या वाटचालीला दिंडी नाव पडले अशी एक कल्पना आहे. आणि सोनोपंत दांडेकर ह्यांच्या मते, भजनी मंडळातील एकजण दिंडी नावाचे वीणेसारखे वाद्य वाजवीत पुढे जातो आणि बाकीचे त्याच्या मागोमाग जातात, म्हणून त्या मंडळाला दिंडी म्हणतात.
"पायी वारी घडो, देह संताघरी पडो
अवघी एकाचीच वीण, तेथे कैचे भिन्न,भिन्न."
वारकरी संप्रदायातील लोक पंढरपुरास जाताना आपल्याबरोबर संतांच्या पादुकांच्या पालख्या वाहून नेतात, हेही आपण सर्वजण जाणतोच.
ह्यात "रिंगण" हा एक प्रकार फारच सुंदर असतो. माऊलींच्या पालखीची एकूण सहा रिंगणे आषाढी वारीत होतात. ह्या रिंगणाची रचना अत्यंत शिस्तबद्ध असते. मध्यभागी छोट्या वर्तुळात पालखी रथ उभा असतो. त्याभोवती वर्तुळात पताकांच्या रांगा वैभवाने उभ्या असतात. त्याभोवतीच्या गोलात दोन्ही अश्वांचा प्रदक्षिणा मार्ग असतो. त्याही बाहेरच्या गोलात असंख्य भक्तगण असतात. बाहेरच्या शेवटच्या वर्तुळात दिंड्यांची रांग असते. या पाच वर्तुळांचे मिळून "रिंगण" तयार होते.
चोपदार सर्व दिंड्याना गोलाकार करतात.त्यांचे भजन, फुगड्या, हमामा, झिम्मा इत्यादी खेळ चालू असतात. दोन्ही अश्व रिंगणात येतात,त्यावेळी आनंदाचा कल्लोळ होतो. प्रथम पालखीचे दर्शन झाल्यावर अश्व गोलाकार धावतात. त्यात मोकळ्या अश्वावर साक्षात ज्ञानेश्वर माऊली वा पांडुरंग माऊली आरूढ आहे अशी भाविकांची श्रद्धा असते. दुसऱ्या अश्वावर चोपदार असतो. चोपदाराच्या अश्वाला देवाच्या अश्वाने मागे टाकून प्रदक्षिणा पूर्ण केली की रिंगण पूर्ण होते. त्यांनतर मृदुंगाचा घोष संपूर्ण आकाशाला व्यापून टाकतो.
अहाहा! किती सुरेख वर्णन! वाचून किंवा tv वर पाहून किमान एकदा तरी आयुष्यात ह्या वारीत सहभागी व्हावे आणि हा सुंदर अनुभव प्रत्यक्षात घ्यावा, असे वाटल्यावाचून रहात नाही.
खरे सांगायचे तर भारतातील सर्व भक्तीसंप्रदायांनी हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती अभंग रहावी म्हणून फार मोठे सृजनशील योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील संप्रदाय त्याला अपवाद नाहीत. विशेषतः वारकरी संप्रदायाची परंपरा लक्षणीय ठरते, ती त्या वेळच्या परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर. एका अत्यंत प्रतिकूल कालखंडात यवनी आक्रमणाचे जबरदस्त तडाखे या भूमीला बसत असतांना रामदासी, वारकरी आणि दत्त आदि संप्रदायांनी जी कामगिरी केली ती निःसंशय प्रशंसनीय आहे. त्या भयावह आक्रमणांनी भारताचे भावजीवन आणि सांस्कृतिक जीवन उद्धवस्त करून टाकले होते. आक्रमणाच्या कालखंडात निर्माण झालेल्या दऱ्या वारकरी संप्रदायातील संतांनी नाहीशा केल्या.
मराठी भाषा आणि मराठी संस्कृती शुद्धाति शुद्ध ठेवण्याचे महनीय कार्य देखील वारकरी संप्रदायाने केले. ह्या संप्रदायाची साहित्य संपदा फार श्रीमंत आहे. मराठीचा गौरव वाढवण्याचे अन टिकवण्याचे काम ह्या संप्रदायाने केले., ह्या सर्व दृष्टीने ह्या संप्रदायाचे योगदान लक्षात घेण्याजोगे आहे.; पण वारी, वारीची परंपरा, संतांचे योगदान---याविषयी फारच थोड्याना माहीत असते. त्याविषयी उद्बोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी ह्या संप्रदायाने काही ठोस नियोजन केल्यास योग्य होईल. वारीचा आनंद शतगुणित होईल. वाटचाल सुकर, सुलभ व्हावी म्हणून सर्व तिर्थक्षेत्राहून येणारे मार्ग चौपदरी व्हायला हवेत, विश्रांतीचे थांबे अधिक असावेत, सार्वजनिक स्वच्छतेच्या सुविधा अधिक प्रमाणात असाव्यात. महाराष्ट्र शासन याबाबत योगदान करतेच, त्यात अजून वाढ व्हावी.
तसे अन्नदान करणारे, वारकऱ्यांची व्यवस्था बघणारे देखील भरपूर आहेत आणि आजकाल बराच सुशिक्षित समाज देखील वारीत सहभागी व्हायला लागला आहे, हे विशेष.
शेवटी एक महत्वाचा मुद्दा---
वारकरी संप्रदायाची गुणवत्ता श्रेष्ठ आहेच; पण आज दिसणारा वारकरी संप्रदाय हा सर्वार्थाने निर्दोष आहे असे मात्र म्हणता येणार नाही, अशी खंत अभ्यंकर महाराजांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक संप्रदायात काही ना काही उणिवा असतात, तशा ह्या संप्रदायात देखील आहेत. वारकरी फडांमुळे पारंपारिक अध्ययन उत्तम होते हे खरे आहे;पण त्यालाही एक विशिष्ट चौकट असल्यामुळे चौफेर वाचन करणारे बहुश्रुत कीर्तनकार फार थोडे असतात. कीर्तनात विश्वात्मक अनुभूतीची वचने हे बोलतात;परन्तु तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेल्या समर्थ रामदासांसारखे श्रेष्ठ संत आणि त्यांचा दासबोधासारखा अलौकिक ग्रंथ हा मात्र त्यांना त्याज्य असतो.हा विरोधाभास न उलगडणारा आहे.
असो.
शेवटी श्रद्धा महत्वाची. भाव तिघेच देव, नाही का? खरे भक्त "वारीचा आनन्द" खऱ्या अर्थाने अनुभवतात. मागील वर्षांपासून ह्या निखळ आनंदावर "कोरोना "चे दाट आणि वाईट सावट आले असले तरी ह्या वर्षी ते संकट नक्कीच दूर होईल आणि विट्ठल भक्त "वारीचा पुरेपूर आनंद उपभोगतील, अशी आशा करूया.
आपण वारीत शरीराने प्रत्यक्षात सहभागी नाही होऊ शकलो तरी मनाने आणि अगदी मनापासून सहभागी होण्याचा प्रयत्न करूया.
"कांदा मुळा, भाजी
अवघी विठाई माझी
लसूण, मिरची, कोथिंबीरी
अवघा झाला माझा हरी
मोट, नाडा, विहीर, दोरी
अवघी व्यापिली पंढरी
सावता म्हणे केला मळा
विठ्ठल पायी, गोविला गळा "
जय हरी विठ्ठल.


माणिक
No comments:
Post a Comment