भीमामाईचा उलगडणार प्रवास! अशी बातमी सकाळला वाचली. पुण्यातील भीमानदीचा उगमापासून ते कर्नाटक राज्यातील हद्दीतील भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास प्रथमच होणार आहे.मला हे वाचून "ब्रम्हपुत्राच्या शोधात " हा प्रदीप आपटेंचा लेख आठवला. 1878 ला जेव्हा कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नसतांना तंत्रज्ञानाचा शोधही लागला नसतांना अत्यंत कठीण, दुर्गम अशा पहाडांवर चढून, घनदाट जंगलातून वाट काढत ब्रम्हपुत्र नदाचा उगम आणि विस्तार शोधणे किती कष्टप्रद होते. त्या लेखात आश्चर्यकारक आणि इंटरेस्टिंग माहिती दिली आहे. त्यांच्या लेखातील काही इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून हे लेखन केले.
विशाल, विहंगम, तितकाच विक्राळ, फार विस्तीर्ण भाग व्यापणारा, दमवून टाकणारा जलौघ म्हणजे ब्रम्हपुत्र! याला स्त्रीलिंगी नदी नव्हे तर पुल्लिंगी "नद" म्हणतात! कारण तो ब्रम्हाचा पुत्र आहे. ब्रम्हपुत्राचे लांबच लांब पात्र, खोल दर्याखोर्यातला धडकी भरवणारा खळाळ आणि पुढला अवाढव्य प्रवाह, त्याचे विनाशी महापूर, अचानक होणारे पात्रबदल. नेपाळच्याही पलिकडून वाहणारी त्सांगपो नदी ब्रम्हपुत्र आहे का, ती नक्की कुठे उगम पावली? पुढे भारतात आल्यावर तिचे नाव ब्रम्हपुत्र झाले का? आपटे म्हणतात, सासरी जाणाऱ्या मुलीचे नाव बदलावे तशी त्याची नाव बदलतात. दक्षिण तिबेट मधून एका छोट्याश्या धारातून उगम पावल्यावर नेपाळ मध्ये प्रवेश केला की त्याचे नाव त्सांगपो होते. उगमापासून 2900 किलोमीटर चा लांब पल्ला गाठताना भारतात अरूणाचल प्रदेशात प्रवेश झाला की दिहंग नाव होते. बांग्लादेश मध्ये आला की जमुना नदी होते बांग्लादेशात पद्मा नदीशी संगम होतो .भारतात पद्मा नदीला गंगा नदी म्हणतात, तोच गंगा जमुना संगम! या संगमावर खूप मोठा त्रिभुजप्रदेश निर्माण झाला आहे तो अंतराळातून पण दिसतो असे म्हणतात. संगम झाल्यावर पुन्हा नाव बदलून मेघना नदी होते ती शेवटी बंगालच्याखाडीला जाऊन मिळते. ब्रम्हपुत्र चा प्रवास असा संपतो किंवा थांबतो. पाच देशांची माती यात मिसळते. असीम ताकद, विशाल आकार यामुळे पुल्लिंगी नाव आहे. भारतात प्रवेश केल्यानंतरच्या प्रवासात काझीरंगा आणि सुंदरबन हे नॅशनल पार्क या नदाच्या किनार्यावर आहे. भरपूर वृक्षसंपदा, जैवविविधता, प्राणी, पक्षी या जंगलांमध्ये बघायला मिळतात. .ब्रम्हपुत्राच्या किनार्यावर मानवी संस्कृती निर्माणही झाली आणि नष्टही होत असते. इतका प्रचंड, बेकाबू प्रवाह आहे की माणूस त्यापुढे यत्किंचितही नाही. अजूनही एक सुध्दा बांध किंवा पुल माणूस बांधू शकला नाही या नदावर. कारण पात्रच 18 किलोमीटर रुंदीचे आहे, शिवाय सतत बदलत जाणारा प्रवाह आणि अति विशाल आकार! त्यामुळे पुल बांधणे कठीण आहे.
नदीचे मूळ विचारू नये असे म्हणतात तरीही ब्रम्हपुत्र नदीचा उगम शोधून काढायचे महाकठीण काम चोखपणे केले गेले.
"त्यांची भारतविद्या " या सदरात प्रदीप आपटेंचे वाचनीय लेख येतात. कुतुहल, जिद्द, मेहनतीची तयारी असणारे अनेक परदेशी भारतात आले आणि गेले, काही तर इथेच राहिले. भारतातील अनेक गोष्टी त्यांच्या कष्टपूर्वक प्रयत्नांमुळे आपल्याला कळल्या ती त्यांची आपल्याला लाभलेली भारतविद्या! प्राचीन भारताचे भूवर्णन, जगाचे नकाशे, समुद्रमार्ग, दक्षिण आणि पश्चिम भारतातील प्राचीन लेण्या, अजिंठा वेरूळच्या लेण्या, तक्षशिलाचे स्तूप इत्यादी अनेक गोष्टींचे शोधन, अहवाल लेखन, लेण्यांचे चित्र काढणे त्यावर भाष्य करणे, ते सर्व जतन करणे इत्यादी अनेक अवघड कामे परदेशी चित्रकार, शिल्पकारांनी करून ठेवले आहे. त्याचा दस्तऐवज तयार करून त्या वास्तू आणि दस्तऐवज दोन्हीचे जतन करून पुढील पिढीला उपलब्ध करून ठेवला. अर्थात त्यातल्या काहीच परदेशी लोकांनी एवढे कष्ट घेतले, जसे भारतात असे अभ्यासू ज्ञानवंत होऊन गेले तसे काही परदेशी पण होते. आपल्या भारतीयांच्या मदतीने त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी करून ठेवल्या ज्याचा आपल्या भारतीयांना लाभ झाला. तर अशा परकीयांच्या कर्तृत्वाबद्दल, कामाबद्दल या लेखमालेत लिहिले आहे. प्रदीप आपटे लिहतात, " इतिहासाकडे बघतांना पराकोटीचा स्वाभिमान आणि टोकाचे हिणवणारे पूर्वग्रह हे दोन 'राहू - केतू ' संशोधनाला ग्रासतात. 'आपले" ते "चांगले" अशा हट्टापेक्षा "चांगले" ते "आपले" ही समबुध्दी इतिहास समजून घेतांनाही बाळगावी. "
1878 मध्ये पहाडांचा प्रचंड अभ्यास असलेला किंटुपी उर्फ केपी नावाच्या सिक्कीमला राहणार्या माणसाची नेमणूक एका जिद्दी आणि कष्टाळू हार्मान नावाच्या अधिकार्याने केली होती. हा किंटुपी उर्फ केपी अतिशय धडधाकट, चपळ आणि तडफदार होता. मात्र खुद्द त्यालाच सर्वेक्षण निरिक्षक म्हणून पाठवण्यात अडचण अशी होती की हा केपी बव्हंशी निरक्षर होता. जुजबी अक्षरापलिकडे त्याला वर्णन लिहणे, हिशेब करणे, नोंदी घेणे अजिबात येत नव्हते. म्हणून मग चिनी लामाला त्याच्या बरोबर पाठवले. या शोधमोहीमेची पध्दत खासच होती पत्र्याच्या पुंगळ्यामध्ये संदेश, नोंदी इत्यादींचे कागदाचे भेंडोळे भरायचे, लाकडाच्या (ओंडके कोरून) ओंडक्यात बरोबर ते अडकवायचे आणि नदीच्या प्रवाहात ती ओंडकी सोडून द्यायची. इकडे हार्मान ओंडकी हेरून ती पकडायचा आणि त्यातील माहिती, मजकूर गोळा करायचा. सुरुवातीला सगळे ठीक झाले पण नंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या. चिनी लामाने स्वतःच्या सुटकेसाठी केपीला गुलाम म्हणून विकून टाकले आणि या शोधमोहीमेतून गायबच झाला. केपी ने तब्बल दोन वर्षे गुलामीत काढली. परंतु त्याच्या चांगल्या वागणूकीमुळे त्याला तिर्थयात्रेला जाण्याची परवानगी कशीबशी मिळाली आणि केपीने तिथून स्वतःची सुटका करून घेतली. त्याला त्याच्या कामगिरीची आठवण होतीच त्याप्रमाणे त्याने हार्मानला निरोप पाठवायची सोय केली परंतु दोन वर्षांत हार्मान आणि इतर अधिकारी बदलून किंवा सोडून गेले होते. त्यामुळे सगळी मेहनत शब्दशः पाण्यात वाहून गेली होती. जिथून त्यांची शोधमोहीमेची सुरुवात झाली होती केपी तिथे पोहचेपर्यंत त्याला या बदलाची काहीच माहिती नव्हती. त्सांगपो नदी म्हणजेच ब्रम्हपुत्र! ब्रम्हपुत्राचे चढ उतार, दिशा, किनारे, गाव सगळे त्याच्या स्मरणात पक्के होते, परंतु नोंदलेले नव्हते. म्हणून नवे अधिकारी केपीचे म्हणणे ऐकून घेण्याच्या तयारीतच नव्हते. त्यांच्या मते चिनी लामा आणि केपी दोघेही वाट तरी चुकले किंवा घनदाट जंगलात एखाद्या प्राण्याच्या तावडीत सापडून त्यांचे काही बरेवाईट झाले असेल किंवा घनदाट जंगलातील आदिवासींच्या नजरकैदेत असतील. पण केपीच्या मिनतवार्यांनी नवीन अधिकारी कसेबसे तयार झाले. केपी च्या प्रवासाचा वृत्तांत नोंदला गेला पण त्याची सत्यता कशी पडताळून बघायची हा प्रश्न होताच. केपीने सांगितलेले निरिक्षण आणि वर्णने खरी आहे हे कळायला तब्बल तीन दशके गेली. केपीने इतका त्रास, कष्ट सोसूनही म्हणावा तसा सन्मान आणि बक्षिस त्याला मिळू शकले नाही कारण निरक्षरपणा! लेखक प्रदीप आपटे लिहीतात, "एवढे सगळे श्रेय एका अविद्येने हरपले. " शिक्षणाचे महत्त्व किती होते आणि आहे हेच यावरून कळते.
असा हा अद्भूत नद ब्रम्हपुत्र! उगमापासून तर समुद्राला मिळेपर्यंतच्या मोठ्ठ्या प्रवासात देवते प्रमाणे पूजलाही जातो आणि खूप ठिकाणी लोकांना घाबरवतो सुध्दा! एकीकडे अनेक जीव जंतूं निर्माण करतो आणि दुसरीकडे महापूराच्या तडाख्याने नष्टही करतो.
असे म्हणतात की नदी आपल्या पित्याला म्हणजे पहाडाला भेटायला पाऊस होऊन जाते. पुन्हा उगम पावते आणि स्वतः चे जीवन प्रवाही करते. उंच सखल भागातून, दरीखोरीतून स्वतः चा मार्ग स्वतः काढून, पुन्हा समुद्रात मिसळून जाते. जीवनप्रवाह मग तो आपला असो किंवा नदीचा /नदाचा सतत सुरू असतो. शेवटी मथितार्थ काय तर सगळ्यांचा प्रवास एकाच दिशेने... विलीन होण्यासाठीच आहे.
अंजली
ReplyForward |
No comments:
Post a Comment