Saturday, May 15, 2021

वाघ बघितल्याच्या गोष्टीची गोष्ट!

 ताडोबाच्या जंगल सफारीत जवळून वाघ बघता आला. खूप वर्षांची इच्छा पूर्ण झाली .माझ्या लहानपणी मी वाघाच्या खूप गोष्टी ऐकल्या वाचल्या  होत्या. त्यामुळे वाघाबद्दल एक कुतुहल आणि एक भीती मनात स्वभाविकच निर्माण झालेली होती. एकदा नागपूरच्या महाराज बागेतून पिंजऱ्यातला वाघ निसटला होता.तेव्हा तर त्या न बघितलेल्या वाघाच्या दहशतीनी मी चार दिवस झोपले नव्हते. असा वाघ त्याच्या नैसर्गिक - मुक्त वातावरणात इतक्या जवळून समोरासमोर बघता येईल असं कधी वाटलंही नव्हतं. प्रत्यक्षात त्याला समोर बघताना  त्याचे तेजस्वी काळे पिवळे पट्टे, त्याचे जबरदस्त पंजे, त्याहूनही जबरदस्त त्याची रोखलेली भेदक नजर ,त्या नजरेतली ती जरब ,तो धाक - तो  दरारा हे सगळं किती थरारक आणि अविस्मरणीय असेल, हे वेगळं सांगायला नको.  मनात असा प्रश्न आला , की या समोरच्या वाघाच्या मनात आलं आणि त्यानी सरळ एखाद्या जिप्सी वर झेप घेतली तर काय होईल? क्षणभर भीतीच वाटली . आपल्याला याची भीती का वाटते ? आणि आत्ता तो झेप घेईल असं वाटतंय याचं कारण तीच भीती आहे का ?माझ्या  लहानपणीच्या  मुलांच्या गोष्टीत बरेचदा वाघ म्हातारीच्या मागे लागलेला असायचा किंवा एखाद्या वाघाने माणसाला खाऊन टाकल्याची गोष्ट असायची. म्हणून भीती निर्माण झाली असावी. पुढेपुढे तर जेव्हा जिम कॉर्बेट वगैरे वाचत होते  तेव्हा वाघांचे भाससुद्धा व्हायचे, काही वेळा स्वप्नही तशीच भीतीदायक पडायची !  मग काही इंग्रजी गोष्टी ,काही कार्टून्स ,आणि हॉब्ज सारख्या चित्रमालिकांमधून वाटायला लागलं की , "अरेच्या! वाघ हा तर माणसाचा मित्रही असू शकतो!" या  छोट्या मुलाच्या गोष्टीत हॉब्ज हा वाघ, त्याचा मित्र बनून त्याच्या घरी राहात असतो आणि हा छोटा मुलगा त्याला आईपासून लपवून ठेवत असतो. आता ही मजेदार गोष्ट ऐकणाऱ्या मुलांच्या मनात वाघाबद्दल काय निर्माण होईल? तो या मुलांचा मित्रच होणार नाही का ? टारझन  नव्हता का ? म्हणजे आपण काय गोष्ट ऐकतो किंवा वाचतो त्यानुसार आपल्या मनात भीती, कुतूहल, मैत्री यापैकी काहीतरी निर्माण होत असतं का?  ज्या वेळेला या सगळ्याचा समग्रपणे विचार करता आला , त्यावेळेला अपरिहार्यपणे एक प्रश्न मनात उभा राहिला,   की इथे राहणारी ; रोज वाघ पाहणारी माणसं , आपापल्या मुलांना वाघाच्या कोणत्या गोष्टी सांगत असतील ? 

जंगल सफारीच्या गेट पासून ज्या पाणवठयावर आम्हाला वाघ दिसले होते  तिथपर्यंतचे अंतर कदाचित पंधरा किलोमीटर  असेल,  तिथपर्यंत , जवळपासच्या गावातली माणसं फिरताना दिसली होती का? इतक्या अंतरावर जिप्सी येईपर्यंत मध्ये आम्ही खूप पायवाटांवर ,वळणांवर ,शेतांच्या तुकड्यांपर्यंतही गेलो होतो, तर तिथे माणसे दिसली होती की ! कुठल्या कुठल्या वळणावरून गाडी पुढे जातांना डावीकडे उजवीकडे छोट्याशा शेताच्या तुकड्यांमध्ये काम करणारी,  दोन-तीन ,दोन-तीन माणसं दिसली होती.  मोहाची फुलं गोळा करणारी , झाडाच्या फांद्या गोळा करून नेणारी बायका नि माणसं पण दिसली होती.  प्रत्येक वेळी या घनदाट जंगलातल्या वातावरणात असे कुणी शेतकरी-  कष्टकरी दिसले की " यांना भीती वाटत नाही का ?" हा प्रश्न माझ्या मनात उभा राहात होता .मग मी गाईडला तसं विचारलं .तो म्हणाला की, " त्यांना सवय झालेली असते. लहानपणापासून हे लोक जंगलात फिरतात, मध गोळा करतात , डिंक गोळा करतात , मोहाची फुलं गोळा करतात , लाकडं - वाळलेली पानं गोळा करतात .आणि हेच तर त्यांच्या निर्वाहाचे साधन आहे . ही बरीच माणसं आदिवासी जमातीतली आहेत, ज्यांना शिक्षणाचा अजूनही फार गंध नाही." हे सगळं ऐकल्यावर पुन्हा मला असं वाटलं की इथली ही बाया माणसं आपापल्या मुलांना वाघाची गोष्ट कशी सांगत असतील ? 

     आम्ही या जिप्सीच्या प्रवासात शेताच्या बांधावर छोटी छोटी म्हणजे आपल्या गुडघ्यापेक्षाही कमी उंचीची देवळं पहिली होती .ही देवळं म्हणजे एक छोटासा ओटा आणि वर छत .मधल्या पोकळ जागेत छोट्या-छोट्या दोन तीन मूर्ती दिसायच्या. लांबून या मूर्ती कशाच्या आहेत ते कळलं नव्हतं . पण एकदा जवळून पाहता आलं आणि दिसलं की त्या वाघाच्या प्रतिकृती आहेत .म्हणजे इथले लोक वाघाला देव मानतात का ? तर , हो !  असं का? तर त्यांना वाघाची भीती वाटते ! आणि माणसाचा इतिहास हेच सांगतो की ज्याची भीती आपल्याला वाटते त्याला देव मानून आपण पूजतो! त्याची कृपा असली तरच निर्विघ्नपणे आपले आयुष्य पार पडेल असे आपल्याला वाटते. तर इथे या जंगलात आदिवासीना वाघ हा देव वाटतो!  कारण त्यांना त्याची भीती वाटते ! हे जंगल त्यांचं सहज पालनपोषण करू शकतं ,मात्र इथे फिरताना वाघाशी गाठ पडणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं! ज्या दिवशी जंगलात फिरून रानमेवा गोळा केला आणि वाघ दिसला नाही, त्याची चाहूल लागली नाही ,त्याचे पंजे मातीवर उमटलेले दिसले नाहीत , तो दिवस त्यांच्यासाठी भाग्याचा ! म्हणजे गंमत बघा ! की आम्ही दहा हजार रुपये भरून,  नेटवर बुकिंग करून,  नोकऱ्यांमधून सुट्टी घेऊन इथे वाघ बघायला येतोय. कधी कधी फक्त त्याच्या खुणा दिसतात कधी पंजे दिसतात, कधी कधी त्यानी शिकार करून अर्धवट खाऊन टाकलेला प्राणी दिसतो .तर एवढा अनुभव सुद्धा आमच्यासाठी थरारकच असतो! आणि इथे यांना वाघ दिसला नाही तर बरं वाटतं! मग, आज तरी निदान वाघ दिसू नये ,असं वाटणा-या या माणसांच्या अनुभवाचं काय ? त्यांच्या गोष्टीतला वाघ कसा असेल? आलाच वाघ समोर ; लाकडं किंवा मोह फुलं गोळा करतांना , तर काय करतात ते ?  हा प्रश्न मी आमच्या गाईडला विचारला ." कोणी करूच काय शकतो अशा वेळी? पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात काहीही अर्थ नसतो. चार सहा माणसं जवळ असली आणि भरपूर आरडाओरडा केल्यामुळे ती धावून आली तर काहीतरी वाचण्याची शक्यता असते.बाकी काय?"गाईड म्हणाला.
"  वाघाने हल्ला केला थेट, असं कधी होत नाही का ?" मी परत विचारलं. 
"होतं की ! बरेच वेळा असं होतं ! आणि तुम्हाला सांगू का?  की आज सकाळी सुद्धा असं झालेलं आहे !" गाईडचं हे बोलणं ऐकताना माझ्या घशाला कोरड पडली. तळहाताला घाम फुटला .मगाशी जवळून बघितलेला तो वाघ, त्याचे मजबूत पंजे,सुळे , त्याची भेदक नजर, त्यातला धाक हे सगळं मनाशी आठवत ,मी कल्पना केली की, मी शेतात काम करत असेल ,आजूबाजूला दोन-चार माणसं असतील, आणि अचानक असा वाघ समोर उभा ठाकला ,तर माझं काय होईल ? कल्पनेनेच माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं ! 
"काय झालं आज सकाळी?"  मी आवंढा गिळत विचारलं .
" आज सकाळी नवरा बायको आणि मुलगी असे तिघे त्यांच्या शेतीपासून बरेच दूर झाडाखाली मोहफुले गोळा करत असताना अचानक वाघ आला ."
" मग?" मी घाबरुन विचारलं.
" होतं काय की ,बरेचदा लोक खाली बसून मोह फुलं गोळा करत असतात , त्यांची नजर जमिनीकडे असते , त्यामुळे जनावर अगदी जवळ येईपर्यंत त्यांना पत्ताच लागत नाही! मग त्याच्या शरीराचा वास आणि गुरगुरणं यावरुन धोक्याची जाणीव होते .आणि मग मान वर करून शोधे पर्यंत ,उठण्याचा प्रयत्न करेपर्यंत वेळ निघून गेलेलीअसते. हा कुठला तरी गुडघ्या एवढ्या उंचीचा प्राणी आहे असं वाटून,नि तो आता काही तरी हालचाल करतो आहे हे दिसून वाघाला असुरक्षित वाटतं . तो क्षणात झेप घेतो .खरं तर वाघाची काही दुश्मनी नसते. तो प्रत्येक वेळी भुकेला असतो असं सुद्धा नसतं. तो स्वतः सुद्धा थोडा भित्रा असतोच. आणि जिथे स्वतःच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होते ,असं वाटतं तिथे तो आक्रमक होतो !"
" मग तिथे वाघ आल्यावर काय झालं ?"  मी विचारलं. 
"  काही नाही त्या वाघाने झेप घेतली त्या माणसाच्या अंगावर .त्या धक्क्याने अर्थातच तो माणूस मागच्यामागे कोलमडला. वाघाने आपले दात मागून-पुढून त्याच्या मानेत रुतवले. त्यामुळे तो माणूस ओरडण्याचा तर प्रश्नच नव्हता .मात्र या झटापटीची चाहूल जवळच काम करणाऱ्या त्याच्या बायकोला लागली." गाईड सांगत होता. " कल्पना करा की माणूस पाठीवर सरळ पडला आहे .त्याची मान वाघाच्या जबड्यात आहे, आणि  जणू काही वाघ आडवं पडलेल्या त्या माणसावर स्वार झाला  आहे . तो माणूस जिवाच्या आकांताने हातपाय झाडतो आहे.जेव्हा  त्या बाईला चाहूल लागते,ती वळून पाहते आणि तिला तिच्यापासून अवघ्या काही फुटांवर  हे दृश्य दिसतं , तेव्हा तिचं काय झालं असेल? " माझ्या डोळ्यांसमोर आता जणू ते चित्र दिसत होतं.

गाईडच्या या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं. माझी वाचा बसली होती . हातापायाला सूक्ष्म कंप सुटला होता . मी अवाक्षरही बोलले नाही .ती बाई करूच काय शकते ?काय केलंअसेल तिनी? पळून गेली असेल.  खूप ओरडली असेल.  मला आत्ता ऐकताना धडधडतय तसंच तिला पण छातीत भयंकर धडधडलं असेल . हातापायाला मरणाचा कंप सुटला असेल . धावून ओरडून डोळ्यापुढे अंधारी आली असेल .आणि नंतर नेमकं काय होतंय ते कळून , रडून-रडून तिनं आक्रोश केला असेल ! माझ्या मनाशी गाईडच्या प्रश्नाचं उत्तर साधारण असंच होतं .पण गाईड म्हणाला,"  तुम्हाला सांगतो,  त्या बाईनं पटकन पुढे होत माणसाचे दोन्ही  पाय तळपायांकडून पकडले आणि वाघाच्या तावडीतून त्याला सोडवण्यासाठी जबरदस्त झटापट केली . दुसरीकडे तोंडानी मदतीसाठी आक्रोश सुरू ठेवला .त्यामुळे आजूबाजूच्या शेतातली माणसं पण धावून आली आणि वाघ चक्क पळून गेला ! " 
" मग ? त्या माणसाचा जीव वाचला? "  
"  नाही!  दुर्दैवाने माणूस तिथेच खलास झाला!  पण तुम्हाला सांगतो की वाघाने माणूस मारणं या गोष्टीची जेवढी चर्चा झाली ,त्यापेक्षा जास्त चर्चा त्या बाईने माणसाचे पाय धरून त्याला ओढण्याचा प्रयत्न केला या तिच्या धीटपणाची  झाली !" आता हे नवं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. मनात परत एक विचार आला , की या बाईला तिच्या लहानपणी तिच्या आई-वडीलांनी वाघाची गोष्ट कशी सांगितली असेल?  आणि आता या नवरा बायकोची मुलगी ; जी हे दृश्य थोड्या अंतरावरून बघत होती ती ,या झटापटीत  आईचं धैर्य नि बापाचा मृत्यु बघत होती,ती पुढे तिच्या मुलांना वाघाची गोष्ट कशी सांगेल? 
जंगल सफारी संपली पण या प्रश्नांची मनात निर्माण झालेली भेंडोळी आणि या प्रश्नांनी केलेला पाठलाग अजूनही संपलेला नाही.....

No comments:

Post a Comment