Friday, May 14, 2021

आठवणींची शिंपण

 


"काँलनीतल्या बायकांनी आज मुलाबाळांसह सिनेमा पहायला जायचं ठरवलं. नुकताच लागला असल्यानं खूप गर्दी होती. म्हणून तर तिकिटं काढायची जबाबदारी दोनतीन मुलांकडे दिली. सगळ्याजणी छान तयारी वगैरे करून सिनेमाला गेल्या. तिकिटं मिळाली असतील की नाही? याची प्रत्येकीला थोडी धाकधुक वाटत होतीच. पण हातात तिकिटं फडकवणारी मुलं दिसलीत आणि त्यांना 'हुश्श' झालं. सगळे आनंदात होते. आधीचा शो संपला. मग बाहेरच्या उभ्या असलेल्यांना आत सोडायला सुरुवात झाली आणि... आत्तापर्यंत आनंदानं फुललेले चेहरे पार लटकले. कारण?

कारण मुलांनी नाटकाची काढतो तशी पहिल्या रांगेतली तिकिटं काढून ठेवली होती. समोरच्या पडद्यावर लंबोळके चेहरे दिसत होते. मान वर करून अख्खा सिनेमा पहाताना डोळ्यांवर आला तो ताण वेगळाच होता".
      पहिल्या रांगेतली तिकिटं काढणारा हा बहाद्दर म्हणजे आमचा दादा ! साधारण साठ ते सत्तरच्या दशकात मुंबईत बांद्रयाहून चालत जात प्लाझा टाँकीज मधली ही 'तिकीट पराक्रम' स्टोरी आईकडून आणि दादाकडून आजवर शंभर सव्वाशे वेळा तरी ऐकलेली. ती पुन्हा एकदा आठवायला निमित्त झालं ते एका पुस्तकाचं वाचन....
वाचणा-या प्रत्येकाला नाँस्टेल्जिक करणारं हे पुस्तक आहे, 'सिनेमा पाहणारा माणूस' ! म्हणायला हे त्यांचं आत्मकथन आहे. पण त्याहीपेक्षा भारतीय सिनेमाच्या बदलत्या रुपाचा तो लेखाजोखा आहे. अशोक राणे हे चित्रपट समीक्षक म्हणून सगळ्यांना माहिती आहेतच. पण ते आणखी ब-याच भुमिकेत सगळ्ययांना परिचित आहेत. ते काय आहेत? या प्रश्नाचं तेच उत्तर देतात, "मी सिनेमा पाहणारा माणूस"! सिनेमा जगणाऱ्या या माणसानी घेतलेला हा धांडोळा वाचताना वाचकही जुन्या आठवणींमध्ये रमतो. जसं मला सिनेमा संदर्भात एक एक गोष्ट आठवू लागली होती. दादाचं पहिल्या रांगेची तिकिटं काढणं हे त्यापैकीच एक ! 

मला लहानपणी आपलं उगाचच वाटायचं की, आमच्या अकोल्यातच फक्त एका रांगेत सिनेमा टाँकीज आहेत. म्हणजे पहा नं... समजा तुम्हाला 'मानेक' टाँकीज मध्ये तिकीट नाही मिळालं तर तुम्ही धावतपळत 'श्याम' गाठू शकता. नसेलच तिथे तर समोरच 'प्लाझा'. थोडं अंतर काटलं की 'रिगल' नि खेटूनच शालीनी. चौक ओलांडला की 'चित्रा' आणि वळसा घातला की 'वसंत'... असे जवळपास एकाच रस्त्यावर सगळी सिनेमाची दुनिया ! मला वाटायचं की हे फक्त आपल्याच इथलं वैशिष्ट्य. पण या पुस्तकानं मला जाणवून दिलं की त्याकाळात देशभरात बहुतांश शहरात अशीच रचना होती. त्याला कारण भारतीयांची मानसिकता! एकदा घरातून बाहेर पडलो आहोत नं? तर सिनेमा पाहूनच घरी जायचं. त्यासाठी प्रेक्षकांची ही सोय बघितल्या जायची. आणि मुख्य म्हणजे रिळांच्या डब्ब्यांची ने आण करणं सोयीचं व्हायचं.


पुस्तक वाचता वाचता समांतर स्वतःच्याही आठवणी जाग्या होत होत्या. राणे एका प्रकरणात सिनेमा बुकलेट आणि तिकिटांचा संग्रह छंदाबद्दल लिहितात. असा छंद असणाऱ्या एका प्रसिद्ध साहित्यिकाचा ते उल्लेख करतात. त्या साहित्यिकाचं नाव वाचता क्षणी मी तर चमकलेच. त्यांच्या जवळ केवळ संग्रह आहे असे नाही, तर या चोपड्या 'ए टू झेड' अशा अल्फाबेटिकली सांभाळून ठेवलेल्या आहेत...  ते साहित्यिक आहेत, भालचंद्र नेमाडे!
स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा सिनेमा माणसाला बसल्या जागेवरून जगभर फिरवून आणतो, असं जे अशोक राणे म्हणतात ते किती खरं होतं. एक काळ होता,  ज्यात दर शुक्रवारी ही नवी दुनिया खुली व्हायची. थिएटर असो की ओपन थिएटर पहिल्या दिवशीचा पहिला खेळ पहायला झुंबड उडायची.  गणेशोत्सव- शारदोत्सवात मैदानात मधोमध पडदा उभारून चित्रपट दाखवला जायचा. बायकांच्या वाट्याला सहसा उलटी बाजूच यायची. पण त्याची गंमत काही वेगळी होती. एकीकडे काही रिळं झाली की तो डब्बा दुसऱ्या उत्सवात आणि तिथला इथे... यामध्ये कितीतरी गमतीजमती घडत. अशाच गंमतींचे पुष्कळ किस्से यात आहेत. पडद्यावरल्या देवाची भावभक्तीने पूजा करणारा प्रेक्षक तर मी पण पाहिला आहे, जय हो संतोषी माता की...
सिनेमाचं जादुई जग आजही भुरळ घालतंच पण तो सत्तरचा जमाना काही वेगळाच होता बाबू मोशाय😊
मला आठवतं...मी, अरू आणि कौमुदी साधारण एकाच वयाच्या. आम्हाला 'गोपाल कृष्ण' सिनेमा दाखविण्याची जबाबदारी दादावर होती. (पुन्हा दादा आहेच. काय करणार? माझं लहानपण बहिणींपेक्षा जास्त दादा आणि त्याच्या मित्रांमध्येच गेलंय, त्यामुळे आठवणीही त्याच आहेत) तो आम्हाला सिनेमाला घेऊन गेला. शालिनी टाँकीज सुर्यवंशींचं! म्हणजे आईच्या मैत्रिणीचं. तिथे त्याने आम्हाला बाल्कनीत बसवून दिले. माझ्या आणि कौमुदीच्या मध्ये अरू. आणि तो बाजूला रिगलमध्ये कोणता दुसरा सिनेमा बघायला निघून गेला. सिनेमा सुरू होताच काही क्षणात कौमुदी झोपून गेली. आणि पडद्यावर अक्राळविक्राळ पुतना मावशी अवतरली. झालं जे मी भोकाड पसरलं. 'अरू घरी चल' चा धोशा लावला की बिचारी अरू पुढे काही पाहू शकली नाही की काका (म्हणजे माझा दादा) येईपर्यंत उठूही शकली नाही. मध्यंतरात तो आला नि त्याने पापकाँर्न वगैरे वगैरे बरेच काही घेऊन दिले, तेंव्हा कुठे मी शांत बसली. ही गंमत आजही आमची अरू खूप रंगवून सांगते. त्याचीही आठवण हे पुस्तक वाचताना मनात जागी झाली. 

ब्लँकची तिकिटं, तेंव्हाचे लेडीज, पोक्त  भासावे म्हणून मिशा रंगवणे वगैरे अनेक गोष्टी यात येतात. तेंव्हा त्या कुठे न कुठे तरी आपल्याही.बाबतीत घडलेल्या असतात नि त्याचीच एक स्मरणसाखळी आपण न कळत गुंफत नेतो. मला खात्री आहे, हे वाचत असताना तुमच्याही मनात अशाच काही आठव ढगांनी गर्दी केली असेल. हो नं? अरे मग थांबलात कशाला? करा झरझर टाईप आणि बरसू द्या...  होऊन जाऊ द्या आठवणींची शिंपण!

- सीमा शेटे - रोठे,. अकोला.

No comments:

Post a Comment