Thursday, May 13, 2021

टूर डी बालपणीचे प्रवास

 


आज सहाव्या वर्गात शिकणाऱ्या लेकीची वर्च्युअल ट्रीप शाळेने काढली होती. सध्याच्या कोरोना प्रभावामुळे ही आभासी जगात नेलेली पिकनिक सगळ्यांनाच खूप नवलाईची वाटली. मुलांबरोबर त्यांचे उत्साही पालक सुद्धा घरबसल्या थेट पीरामिडस ऑफ इजिप्त बघून आले. त्यामुळे आजपासून लेकीला "व्हर्चुअली फॉरेन रिटंर्ड" असे बिरूद तिच्या दादाने चिकटविले आहे.

या सगळ्या धामधुमीत मला पण लहानपणापासून केलेले त्या त्या वेळी खूप एक्सायटिंग वाटलेले प्रवास आठवले .अंदाजे चौथ्या वर्गात असताना चंद्रपूर हुन ताडोबा अभयारण्यात वडिलांबरोबर गेल्याची आठवण माझ्यासाठी खूप रम्य आहे .मोठ्या भावाची बारावीची परीक्षा बाबांच्या फॉरेस्ट कॉलेजच्या स्टडी टूर च्या वेळी होती .त्यामुळे तो आईबरोबर चंद्रपूरला थांबला होता. मधला भाऊ आणि मी बाबांबरोबर ऑफिसच्या जीपने ताडोबाला गेलो होतो .बाकी सगळा स्टाफ बस ने आला होता. तिथल्या रेस्ट हाऊस मध्ये राहणं म्हणजे पर्वणीच होती .प्रशस्त आवार ,भरपूर झाडं ,फुलझाडं ,खिडक्यांना जाळी चे पट ,सागवानी लाकडाचे सगळे फर्निचर ,झोपण्याच्या पलंगांवर पांढऱ्या शुभ्र चादरी ,आणि मच्छरदाण्या ....सगळं डोळ्यासमोर आता ही स्पष्ट दिसतं आहे. जंगल सफारी सकाळ-संध्याकाळ आणि बाबांच्या कामाच्या वेळेला पत्ते, गाण्याच्या भेंड्या खेळणे ,तिथल्या पाळीव कुत्रा मांजरी, ससे ,पोपट,लव्हबर्ड्स शी खेळणे असे दोन दिवस अगदी मजेत गेले .पहिल्यांदाच हत्तीवर बसायला या ठिकाणीच मिळाले होते. खाण्यापिण्याची पण खास चव होती .काहीशा तिखट चवीच्या फणसाची भाजी तिथे जशी होती ती पुन्हा कुठेही मिळाली नाही .त्या 2 दिवसात घराची ,आईची अजिबात आठवण नाही !कधी झोप लागते ते कळायचं नाही ,कधी उजाडलं ते घड्याळात बघितलं नाही .परत निघताना मात्र नाराज नव्हते वाटत. घरी जाऊन कधी आईला आणि मोठ्या भावाला सगळं सांगतेय याची वाट बघतच प्रवास पूर्ण केला होता.

अशीच एक आठवण एसटी बसने पहिल्यांदा केलेल्या प्रवासाची. सहावीत असताना ,काय घटना घडली ते नीट आठवत नाही कारण त्यावेळी कळत नव्हते पण माझ्या काकूं बरोबर आम्हाला चंद्रपूर ते अकोला बस ने प्रवास करावा लागला होता .कुठेही जायचे तर बाबांच्या ऑफिसची जीप असायची. मला कळायला लागल्यावर सार्वजनिक बसने जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती .आमचे काका कायम ट्रेन ने प्रवास करायचे .मात्र काकू आणि आता चुलत बहिणी पण नको रे बाबा ,बसच बरी -म्हणून बसनेच प्रवास असायचा त्यांचा. तर अशा काकूंबरोबर मी आणि माझा भाऊ असे आम्ही तिघे निघालो. दोन सीटवर आम्ही तिघे म्हणजे माझं सॅंडविच !भावाला सरक म्हटलं की तो दादागिरी करणार आणि काकूंना व्यवस्थित बसता यावं म्हणून त्यांना काही म्हटलं नाही .जमेल तशी आपापली जागा घेऊन बस फुल्ल झाल्यावर आम्ही निघालो. या काकू मुळातच खूप अबोल. बस मधली गर्दी ,भावाचे पण चेहऱ्यावरचे त्रस्त भाव बघून कुठे फसलो आपण असे झाले होते मला. लोकांना बस लागते म्हणजे काय होतं ते या प्रवासानच मला शिकवलं .त्यातल्या त्यात काकूंना काही बोलतं करावं म्हणून मीच त्यांना घरातल्या सगळ्यांच्या नावाचे अर्थ विचारायला सुरुवात केली. अलका ,संजीव ,राजीव....करत करत सचिन ,नितीन अशी माझ्या भावाच्या नावाचा अर्थ त्यांनी सांगितला .सचिन हे इंद्राचे नाव आणि नीतीने वागणारा तो नितीन! माझ्या भावाने स्वतःची कॉलर टाइट करून घेतलेली मी तिरप्या डोळ्यांनी बघितली. माझी मात्र फार निराशा झाली. साधं ,सरळ वर्षा नाव !कोणीहीअर्थ सांगेल ! आई-बाबांना चांगलं कठीण नाव ठेवायला काय हरकत होती ?असं वाटून गेलं. हा प्रवास संपवून आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. पुढे कधीतरी आई-बाबांना माझे नाव जरा वेगळे, चांगले का ठेवले नाही असे विचारायचे ठरवले .जुलै महिन्यातला माझा जन्म .आईने सहज सांगून दिले -अगं तू झालिस तेव्हा बक्षी काकू भेटायला आल्या होत्या. खूप खुश होत्या .दोन भावांना बहिण झाली म्हणून .आणि म्हणाल्या- ये बारिश के मौसम की है| इसका नाम "वर्षा "रखो.  झालं माझं नाव ठरलंही! पुढे अनेक वर्ष आई-बाबांनी फार विचार केलाच नाही कोणीतरी सांगितलेलं नाव दिलं ठेवून -यावरून माझे भाऊ मला चिडवत राहिले आणि मी चिडत राहिले.

असेच कायम लक्षात राहिलेले काही प्रवास म्हणजे चंद्रपूर ते पैठण वृक्ष दिंडी काढली तो, नागपूर ते पुणे पहिल्यांदा ट्रेनच्या फर्स्ट क्लासने प्रवास केला तो, नागपूर ते भोपाळ बहिणीबरोबर दोघींनी केलेला प्रवास ,नागपूर ते अकोला पहिल्यांदा एकटीने केलेला प्रवास ,आई बाबा आणि आम्ही तिघेही पहिल्यांदा जीवाची मुंबई करायला गेलो तो प्रवास. असे अनेक प्रवास झरझर डोळ्यांपुढून आज दिवसभर जात आहेत. त्यात अजून थोडी रमते आणि लिहिणे इथेच थांबवते.

-वर्षा देशपांडे -

No comments:

Post a Comment