"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी----" अगदी शाळेत असल्यापासून हे गाणं ऐकत आलेली आहे.अरुण दातेंनी अक्षरशः जीव ओतला आहे गाण्यात."का राणीने मिटले डोळे,दूर दूर जाताना,का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गातांना----" ह्या ओळी असोत किंवा"अजुनी रुसुनी आहे, खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ, पापणी हलेना----" ह्या कुमार गन्धर्व ह्यांच्या आर्त ओळी असोत---ऐकल्यानंतर काळजात कुठेतरी कालवाकालव झाल्याशिवाय रहात नाही. मनात,आतल्या आत काहीतरी हलल्यासारखे,खुपल्यासारखे होते.दोन प्रेमी जिवांची जेव्हा ताटातूट होते,तेव्हा संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झाल्यागत भासते.भविष्य अंधःकारमय दिसू लागते.कुठल्याच गोष्टीत मन रमत नाही,कुठलाही आनंद मनाला भुरळ घालू शकत नाही,विरह वेदनेने व्याकुळ होणारा जीव आतल्याआत घुसमटत जातो, संपत जातो-----अर्थात अशी सगळी अवस्था होत असते, हे फक्त वर्णनात वाचलेलं, ऐकलेलं किंवा चित्रपटात,पाहिलेलं--;पण प्रत्यक्षात खरच होत असेल का अशी अवस्था? "प्रेम" हा विषय तसा झाडून सगळ्या लेखक,कवी,चित्रकार वगैरे मंडळींचा आवडीचा, आपुलकीचा. प्रेमावर भरभरून लिहिलं जातं, बोललं जातं,दाखवलं जातं; पण खरंच असतं का इतकं शुद्ध, निखळ, निःस्वार्थ प्रेम?
आजकालच्या तरुण पिढीचं एकंदरीत वातावरण बघता तरी वाटत नाही असं प्रेम कुणी करत असेल म्हणून. कारण क्षणात प्रेम जमलं,आणि तासात ब्रेकअप झालं----लग्न होऊन वर्ष सहा महिने होत नाहीत तर पटत नाही म्हणून सेपरेशन झालं---- लग्नाची बायको/नवरा असताना पर पुरुषा विषयी/परस्त्री विषयी आकर्षण वाटणं----हे सगळं "कॉमन" झालंय हल्ली.एकाच जोडीदाराशी "लॉयल" असणं, त्याच्या गुण दोषांसकट त्याचा स्वीकार करून संसार सुरळीत होण्याच्या दृष्टीने (दोन्ही बाजूने) प्रयत्न करणं हे साधारण कमी होत चाललंय.
हे सगळं लिहिण्यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीने लक्ष वेधून घेतलं होतं.बातमी होती," चिमणीच्या विरहात वर्षभरापासून तिच्या येण्याची वाट पहातोय चिमणा, आर्त चिवचिवाट करतोय--सतत---" नागपूरच्या एका कुटुंबात घडलेली चिमणा-चिमणीच्या विरहाची प्रत्यक्ष कहाणी,अगदी आंखो देखा हाल----पिलांची चाहूल लागल्यानंतर चिमणीला जिवापाड जपणारा चिमणा, दाणे टिपण्यासाठी बाहेर पडलेली चिमणी हॉल मधल्या पंख्याला धडकून बेडरूम मध्ये जाऊन पडते आणि तिथेच प्राण सोडते. घरची मंडळी तिला जड अंतःकरणाने घराच्या मागील आवारात नेऊन पुरतात. चिमण्याला ह्याची काहीच कल्पना नसते. तो चिमणा म्हणे त्या दिवसापासून रोज त्याच्या चिमणीची वाट पहात आर्त चिवचिवाट करतोय. इतर कुणाही चिमणीला जवळपास फिरकूही देत नाही,हल्लीच्या भाषेत,"आव्हान केलं, प्रपोज केलं" तरी. एक चिमणी तर म्हणे आपल्या दोन पिल्लांना घेऊन त्याच्या घरट्यात आलीही; पण तिलाही त्याने हुसकावून लावलं.जणू म्हणत होता, "दोनो ने किया, था प्यार मगर, मुझे याद रहा,तू भूल गयी----" हृदयात कुठेतरी खोलवर जाऊन भिडली ही गोष्ट. आणि आठवायला लागली सहज ती गाणी,"मुरगा मुरगी प्यार से देखे----" दो कलिया मधलं छोट्या गोड नितुच्या आवाजातील निरागस गाणं -----आणि वैजयंतीमाला वर चित्रीत झालेलं , "दो हंसो का जोडा बिछड गयो रे-----"
हे असं,इतकं निरतिशय, एकनिष्ठ प्रेम पक्षीही करू शकतात? की फक्त पक्षीच करू शकतात? विचार करण्यासारखी बाब आहेच. ख्यातनाम अरण्यऋषी "मारुती चितमपल्ली" म्हणतात,की माणसापेक्षा पक्षांमध्ये हे प्रेम अधिक गहिरे असते. जसे सारस म्हणजे क्रौंच पक्षी. सारस नेहमी जोडीने रहातो आणि फिरतो.एकाच जोडीदाराशी एकनिष्ठ असलेला सारस पक्षी जोडीदाराला मरेपर्यंत सोडत नाही.दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा अन्नपाणी वर्ज्य करून प्राणत्याग करतो. असे म्हणतात की एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या पती-पत्नीला सारस पक्ष्यांच्या सान्निध्यात ठेवायची प्रथा भारतात एकेकाळी होती.दोघांपैकी एकाची शिकार केली किंवा झाली तर त्याचा/तिचा जोडीदार झुरून प्राण त्यागतो.
माणूस हा सर्वांमध्ये संवेदनशील प्राणी आहे असे म्हणतात(सगळे म्हणतात म्हणून आपणही म्हणायचे) ; पण माणसांमध्ये आढळते का इतकी एकनिष्ठता? काही कारणे असूही शकतात, पर्यायी जोडीदार निवडण्यामागे,कधी स्वेच्छेने तर कधी तडजोड करायची तयारी नसते म्हणून, कधी कधी नाईलाज म्हणूनही; अर्थात तो एक वेगळा आणि चर्चेचाच भाग आहे म्हणा; पण तरीही हा संवेदनशील समजला जाणारा मनुष्यप्राणी इतकं उत्कट ,निःस्वार्थ प्रेम करूच शकत नाही,अपवाद असतीलही बोटावर मोजण्याइतके, आणि इतकं उत्कट आणि निखळ प्रेम करायला समोरची व्यक्तीही तितक्याच ताकदीची हवी असा गोड युक्तिवाद ही केला जातोच. माणसांच्या जगात ,जोडीदाराचा "आश्वस्त सहवास",पुरेसा विश्वास,सोबत जीवन जगण्याचा आनंद आणि ओढ---किमान इतक्या गोष्टी पुरेशा असतात प्रेम टिकविण्यासाठी. पक्ष्यांच्या जगात काय नियम असतील ह्या बाबतीत? आपल्या नजरेत तर पोपट म्हणजे सगळे एकजात दिसायला सारखेच, आपण सगळ्या पोपटी रंगाच्या पक्ष्याला पोपट म्हणून मोकळे होतो(पण बरेचदा आपलाच पोपट होत असतो) चिमणी म्हटली तर सगळ्या चिमण्या इथून तिथून सारख्याच असणार,त्यात अजून वेगळं काय असणार? असा विचार आपल्या मनात येतोच कारण आपण तेवढं बारकाईने निरीक्षण करतही नाही. प्रत्येक मनुष्य दिसायला,म्हणजेच रंग रूपाने ,उंची,जाडीने वेगळा असतो,तो झटकन ओळखला जातो; पण हे पक्षी कसे ओळखत असतील आपल्या जोडीदाराला? कुठली खूण लक्षात ठेवत असतील? त्यांचे प्रेम कसे जमत असेल? प्रेम करण्याची पद्धत कशी असेल? त्यांची भाषा तर पक्षी प्रेमीं ना कळते म्हणतात; पण तरी असे बरेच प्रश्न आहेत ज्याविषयी माहिती करून घ्यायला हवी, त्यांच्याही "life style" चा अभ्यास करायला हवा, असं प्रकर्षाने वाटू लागतं, असलं काही वाचल्यावर.
खरं सांगायचं तर "प्रेमाच्या बदल्यात प्रेम" इतकं साधं,सरळ समीकरण असायला हवं, माणसाच्याही जीवनात. जाणिवेची जाणीव, वेदनेची संवेदनशील। ओळख, एक हळुवार ,नितळ मन,जोडीदाराला समजून घेणारं----अजून काय हवं असतं? अगदी जीवच ओवाळून टाकायला हवा असं नाही; पण किमान जीव कासावीस व्हायला हवा,त्याच्या/तिच्या साठी.
अगदीच चांद तारे तोड लावू---इतका अतिरेक नसला प्रेमात;तरी जोडीदाराच्या सहवासात चंद्राची शीतलता, ताऱ्यांच्या प्रकाशाचा दिलासा हवा. "तू नहीं तो कोई और सही" हा तटस्थ पणा नसावा,तर "तुम अगर साथ देनेका वादा करो---" असा विश्वास असायला हरकत नसावी.
आज प्रेमाच्या नावाखाली जो गोंधळ घातला जातोय, भावनांचं जे विडंबनात्मक प्रदर्शन केलं जातंय, एकतर्फी प्रेमातून जोडीदाराला विद्रूप केलं जातंय, हत्या केली जातेय ,उद्वेगाने, निराशेतून आत्महत्या होताहेत---- हे सगळं पाहून वाईट वाटतं, चिडही येते.
-प्रेम भावनेचा खरा अर्थच ज्यांना कळलेला नाहीये, त्यांनी प्रेम कसे करावे, हे ह्या पक्ष्यांकडून शिकायलाच हवे, नाही का?
माणिक नेरकर.
No comments:
Post a Comment