भावनिक गोंधळ आपण सतत अनुभवत असतो. नैराश्य, भिती, चिंता, असहाय्यता, अपराधीपणा, राग यासारख्या भावनांची तिव्रता आजूबाजूला आपण आपल्या सकट सगळ्यांचीच बघत असतो. भावनिक संतुलन, भावनिक साक्षरता येण्यासाठी अनेक उपाय आहे. आपण समाजात राहतो. आपले नातेसंबंध निकोप कसे ठेवायचे? कठीण माणसं, कठीण प्रसंग कसे हाताळायचे? यासाठी मानसशास्त्र पुरेसे नाही तर मानसशास्त्राच्य्या जोडीला अध्यात्मिक आणि तात्विक बैठक असणं खूप गरजेचे आहे. यासाठी सच्चे देव शास्त्र गुरु या त्रयींनी आपल्यासाठी मार्ग दाखवला आहे. त्या मार्गाने जाण्यासाठी अनेक उपाय त्यांनी सांगितले आहे. मनाचे श्लोक, बारा भावना, वैराग्य भावना, मेरी भावना इत्यादी. जैन मुनि आचार्य 108 प्रमाणसागर महाराजांनी भावनायोग हा मनाचा व्यायाम विकसित केला आहे. त्याचे खूप चांगले परिणाम जनामनावर होत आहेत. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी भावनायोग लाभदायक ठरतो आहे. मनाची व्याप्ती, व्यथा आणि हीत या संत, गुरुंनी बरोबर ओळखली आणि आपल्या सारख्या सामान्य साधकाला मार्गदर्शन केले.
पंडित जुगलकिशोरजी मुख्तार यांची मेरी भावना त्याचे दुसरे नाव राष्ट्रीय नित्यपाठ हे आहे. शाळेच्या पुस्तकात पहिल्या पानावर प्रतिज्ञा लिहलेली असते भारत माझा देश आहे... तसाच हा राष्ट्रीय नित्यपाठ प्रत्येकाने रोज करायला हवा आपल्यातील तात्विक, अध्यात्मिक बैठक मजबूत होण्यासाठी क्रोध मान माया लोभ यावर जे विजय मिळवू शकतात त्यांना मोक्ष मार्ग गवसतो.काय आहे त्या राष्ट्रीय नित्यपाठात की आपण रोज करायला हवा? तर आत्म्याचे त्या चैतन्य शक्ती चे गुण काय आहे हे तर त्यात सांगितले आहेच त्याप्रमाणे आपण कसे वागायचे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. स्वतः पासून सुरुवात करत समाज, देश आणि त्यापुढे अख्खं जग कसे सुखी होईल हे सांगितले आहे. स्वतःत काय बदल करायचे तर राग, द्वेष, अहंकार, ईर्ष्या, खोटे पणा इत्यादी नकारात्मक अवगुण सोडून द्यायचे आणि त्याऐवजी सरळ सत्य आचरण, मैत्रीपूर्ण संबंध, दिनदुखींची सेवा माझ्या कडून घडू दे. दुसर्यांच्या गुणांची बेरीज आणि दोषांची वजाबाकी मला करता येऊ दे. कुठल्याही विपरीत परीस्थितीत न्यायमार्गावर सोडता कामा नये. कोणी चांगले म्हणो वाईट म्हणो, पैसा येवो किंवा जावो. भिती, लालूच, मरण आले तरीही, सुखात दुःखात समान राहिले पाहिजे. साक्षीभाव मला अमलात आणता येऊ दे. कारण कोणतीच गोष्ट निरंतर राहत नाही. त्यामुळे इष्ट अनिष्ट योग आला तसा तो जाणार आहेच. त्यात सहनशीलता दाखवली की त्रास होत नाही. प्रत्येक व्यक्तीने असे वागायचे ठरवले तर समाजात चांगले परिणाम बघायला मिळतील. आपापसातील वैरभाव, अभिमान सोडून माणूसकीचा धर्म आचरण करून ज्ञान, चरित्र उन्नत केले पाहिजे. अशा समाजातून घडलेला नेता पण तसाच येईल माणूसकीच्या धर्माने आणि न्याय्य पद्धतीने राज्य करू शकेल. अशा या देशात पाऊस वेळेवर आणि पुरेसा पडू दे. रोग, महामारी, दुर्भिक्ष्य पसरूच नये आणि प्रजा शांतिपूर्ण समाधानाने जगावी. परस्परांबद्दल प्रेम पसरू दे. अप्रिय, कटूक, कठोर शब्द हद्दपार होऊ दे. परम अहिंसाधर्म (शारिरीक आणि मानसिक अहिंसा यात अभिप्रेत आहे) सगळ्या जगात पसरू दे. सगळे प्राणीमात्र सुखी होऊ दे. प्रत्येक सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टींचा समावेश या नित्यपाठात केला आहे.
अशी ही मेरी भावना, राष्ट्रीय नित्यपाठात केलेली प्रार्थना, विनम्र विनंती!! प्रत्येकाने एकमेकांसाठी करून संपूर्ण जगाला त्याचा लाभ करून द्यायला हवा. आजच्या घडीला याची सर्व मानवजातीला नितांत गरज आहे.
अंजली
No comments:
Post a Comment