आज तंत्रज्ञान घरोघरी पोहोचून व्यवस्थित विराजमान झालेले आहे. सध्याच्या कोरोना प्रभावित टप्प्यात तर प्राथमिक गरजांपासून सर्वच बाबतीत तंत्रज्ञान वापरणे हा एक वादातीत पर्याय झालेला आहे. भाजी किराण्यचे ऑनलाइन पेमेंट ,वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शैक्षणिक क्लासेस, विविध विषयातील स्पर्धा ,पारिवारिक समारंभापासून सगळच तंत्रज्ञानाच्या पुरेपूर वापरामुळे शक्य होत आहे. प्रत्येक घरातला वय वर्षे तीन ते चार पासून वय वर्षे 75 ते 80 पर्यंत सर्वच सदस्य तंत्रज्ञाना भोवती गोवले गेले आहेत .
यावरून आजच्याच दिवशी बरोबर एका वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग डोळ्यासमोर आला. त्यावेळी तंत्रज्ञानाची मदत घेतल्यामुळेच तो प्रसंग पार करता आला होता. बारावीच्या पुढचे शिक्षण घ्यायला माझ्या मुलाला मुंबईला कॉलेज प्रवेशासाठी जायचे होते. ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करणे, कॉलेज हॉस्टेल इत्यादी बघून घेणे एकाच वेळी करावे म्हणजे पुढे त्याचा तो कॉलेज सुरू झाल्यावर जाऊ शकेल म्हणून आम्ही तीन ऑगस्ट ला ट्रेन ने निघालो. एडमिशन साठी चार आणि पाच अशा दोन तारखा मिळाल्या होत्या. चार ऑगस्ट ला पोहोचून कॉलेजचे काम करून घ्यावे आणि काही अडचण आलीच तर पाच तारखेचा एक दिवस हाताशी ठेवावा म्हणून पाच ऑगस्टला परतीचे रिझर्वेशन केले होते. ट्रेन निघाल्यावर सहज गप्पांमध्ये लक्षात आले माझे बाबा 4 ऑगस्टला देवाघरी गेले आहेत ,त्याच तारखेला मुलाची पदवी अभ्यासक्रमाला ऍडमिशन होते आहे!
पावसाळ्याचे दिवस असल्याने ट्रेनची वेळ मागेपुढे होऊ शकते हे गृहीत धरून कल्याणला नातेवाईकांकडे उतरून पुढे कॉलेजला जायचे की सरळ दादरला उतरायचे ते ठरवावे लागणार होते. दरम्यान इगतपुरी च्या आसपास पाऊस सुरू झाल्याचे लक्षात आले. पहाटेच्या वेळी बाहेर पाऊस आणि अंधार यापलीकडे काही दिसत नव्हते. दिवस उजाडला तसे बाहेरचे निसर्गसौंदर्य एकटक बघत रहावेसे वाटत होते .कसारा घाट जवळ आला तसे सगळीकडे गर्द हिरवळ ,डोंगरावरून फेसाळत जाणारे पांढरेशुभ्र झरे आणि पावसाची अखंड रिमझिम या अनुभवात तरंगत असतानाच ट्रेन थांबली अचानक !आम्ही आपल्या गप्पा -खाण्यात रमलेलो. काही वेळाने लक्षात आले की अजूनही ट्रेन सुरू झालेली नाही .पण स्वतःलाच धीर दिला होईल सुरू .आपण सध्या वेळेत आहोत म्हणजे ठरल्याप्रमाणे पोहोचू नक्की. थोड्यावेळाने ट्रेन सुरू झाली पण वेग मंदावला होता. दुसऱ्यांदा जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा आजूबाजूला खुसपुस सुरू झाली. इथे नेहमीच पावसाळ्यात प्रॉब्लेम येतो. एकदा का कसारा घाट सोडून आंबिवली पर्यंत गेलो की पुढे काही घोर नाही .पण तोपर्यंत काही सांगता येत नाही !
ही नवीन माहिती कळल्यावर आम्ही जरा काळजीत पडलो .पण आहे दुपारपर्यंत चा वेळ त्यामुळे इथून बाहेर पडायला उशीर झाला तर सरळ कॉलेजला जाऊ मध्ये कुठे न उतरता, असा प्लान बी वापरायचे निश्चित करून आम्ही निश्चिंत झालो. थोडाफार खाऊ सोबत होता तो खाऊन निवांत बसलो. आजूबाजूला ,बाहेर कसलीही हालचाल ,दुसऱ्या ट्रेनचे आवाज असे काही जाणवत नव्हते. अर्धीअधिक बोगी अजून साखर झोपेत होती .पुस्तक आणि भोवतालचा निसर्ग वाचणे सुरू ठेवले .वातावरणामुळे लक्षात आले नाही पण दहा वाजून गेल्यावर ही ट्रेन जिथल्या तिथेच थिजलेली होती .मग जरा बोगीमध्ये सगळ्यांच्या हालचाली, फोनाफोनी, चर्चा सुरू झाल्या .दुपारी बाराच्या दरम्यान ट्रेन पुन्हा हलली. बहुतेकांनी हुश्श केलं. काहींनी चक्क एकमेकांना टाळ्या दिल्या. अजूनही पुढे जात राहिलो तर कॉलेजचे काम करायला पुरेसा वेळ होता.
थोडे पुढे गेल्यावर मात्र ट्रेन जी थांबली ती चार तास त्याच जागेवर !लोक चक्क खाली उतरून बाहेर फिरायला लागले .झाडाखाली बसून गप्पा मारणे ,मोबाईल बघणे सुरू होते. मग लक्षात आले मोबाईलचे चार्जिंग पुरेसे टिकले पाहिजे. जो तो आपला मोबाईल चार्ज करून ठेवू लागला. पॅन्ट्री मधून आलेले रेल्वे मिल घेऊन बहुतेकांनी जेवून घेतले होते .पण ट्रेन नक्की कधी निघणार आणि आता निघणार की नाही अशी भीती वाटू लागली. पुढून आणि मागून कुठलीच ट्रेन येत जात नव्हती. संपूर्ण ट्रॅक ठप्प झाला होता तिथे उतरून रस्त्याने वगैरे जाण्याचा प्रश्नच नव्हता .घाटात मध्येच कुठेतरी ट्रेन थांबलेली असल्याने गुपचूप बसून वाट बघणे हेच हातात होते. संध्याकाळी पाचच्या दरम्यान ट्रेन पुढे निघाली ही खरंच हलली की आपल्याला भास झाला असे एक क्षण वाटून गेले. पण खरंच पुढे जाऊन ट्रेनने बरा वेगही घेतल्याचे जाणवले .आतापर्यंत संपर्कात असलेल्या सगळ्यांना आम्ही निघालो वगैरे मेसेज टाकले .चार्जिंग टिकवायला हवे म्हणून व्हाट्सअप वर चॅटिंग जास्त सुरू होते. नशीब नेटवर्क चांगले होते. जरा रिलॅक्स होऊन बसतोय तेवढ्यात कसारा स्टेशन वर ट्रेन थांबली आणि ती पुढे थांबूनच राहिली .मग रेल्वे कर्मचाऱ्यांनी निरोप दिले -स्टेशनवर उतरून फुड पॅकेट्स वाटप सुरू आहे ते घेऊन या. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती .अन्न पाण्याची सोय सर्व प्रवाशांना पुरेल एवढी रेल्वेने केली हे बघून कौतुक वाटले .स्टेशन वर सगळीकडे मोठ्या संख्येने पोलीसही होते. बऱ्याच जणांनी तिथून उतरून बाय -रोड पुढे जाण्याचा निर्णय घेतला .काहींनी जवळपासच्या भागातून गाड्या बोलावून ट्रेन सोडली. आता मात्र बिकट वेळ आमच्यावर आली. पुढे उतरून जावे तर ओळख पाळख नाही ,रूट अनोळखी. ट्रेनमध्ये बसून राहावे तर सिक्युरिटी आहे पण किती वाट बघावी लागेल याचा नेम नाही. आधीच आम्ही बारा तास एकाच कंपार्टमेंटमध्ये होतो .दिवस मावळतीला आलेला म्हणून अजूनच चिंता वाटू लागली.मी आणि दोन मुलं -काय करावे ते सुचेना .फोनवर सगळ्यांच्या सूचना सुरूच !
इतक्यात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अनाउन्स केले बाहेर एसटी बसेस आहेत त्यांनी कल्याणला जा. रेल्वे रिकामी करा .सूचना दिल्या- दिल्या लागलीच ट्रेनमधले लाइट पंखे बंद करून दरवाजा लॉक करणे सुरू झाले. पर्याय नव्हताच. भराभर बॅग्ज गोळा केल्या.निघालो. डोक्यावरून पाऊस, आजूबाजूला अंधार! माणसं चालली होती त्या दिशेने निघालो स्टेशनबाहेर तीन बसेस उभ्या होत्या .असे वाटले खास रेल्वे प्रवाशांसाठी आणलेल्या आहेत ,पण तसे नव्हते. त्यात आधीच प्रवासी बसले होते. एक वेगळ्याच ठिकाणची बस होती. नाव वाचून कल्याणच्या बस मध्ये चढेपर्यंत सराईत प्रवाशांनी बस मध्ये जागा पटकावल्या होत्या. आम्ही जागा नव्हती तर चक्क बसच्या बोनेटवर बसलो .पायाशी सामान कसेतरी कोंबले. भिजलेलो होतोच .पण कल्याण पर्यंत जायला मिळतंय पुढे टॅक्सीने पोचता येईल असे वाटून बसलो. बस निघाली. साधारण दोन तास लागतील. म्हटलं काढूया दोन तास बॉनेटवर. सतत कोसळणाऱ्या पावसाने बस धीम्या गतीने सरकत होती. व्हाट्सअप वर मेसेज पाठवणे, रूट ट्रॅक्टरवर आपलं नेमकं लोकेशन समजून घेणं सुरु होते. दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी ही बस पण थांबली!!
पुढे जायला जो पूल आहे तो ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे बस इथेच थांबवावी लागली असे कळले .हा सगळ्यात उंच पूल होता यावरून पाणी आहे म्हणजे पुढच्या आणखीन दोन पुलांवरून पाणी असणार म्हणून बस पुढे जाणार नाही कळले. एका भोजनालयाच्या दिशेने हात करून कंडक्टर म्हणाला- काय तरी खाऊन घ्या सगळ्यांनी. रात्री बस मध्ये बसून रहावे लागणार .शरीर आणि डोकं दोन्ही अवघडलेलं होतं .खाली उतरून पाय मोकळे करायला निघालो .दरम्यान सतत संपर्कात असलेला माझा भाऊ आणि भाचा म्हणाले आम्ही ऑनलाईन पुढच्या ट्रॅक चेक केले आहेत. ठाण्याजवळ पाणी साचलेले नाही. ड्रायव्हर कंडक्टर ला सांगून बस ठाण्याहून पुढे न्या .ठाणे स्टेशन वर पोचवायला सांगा .पहाटे पाचला लोकल असते त्यांनी तुम्ही येऊ शकाल. बरोबरच होते रात्रभर बसमध्ये बसून काहीच निष्पन्न होणार नव्हते. भाच्याच्या ओळखीच्या नगरसेवकांची माणसे विचारपूस करायला आली .जवळच एका शाळेत अशा पावसात अडकलेल्या लोकांची सोय केली आहे .तिथे रात्रभर थांबा म्हणून सांगितले .पण पुढे निघून जाण्यात शहाणपण होते. मात्र बस मधल्या एवढ्या प्रवाशांचे एकमत व्हायला हवे.
तंत्रज्ञान आणि आजचे शतक कितीही प्रगती करत असले तरी रात्री नऊ आणि दहा वाजता अशा वातावरणात एक बाई आपल्याला शहाणपण शिकवते आहे, सतत फोनवर बोलते आहे हे टिपणाऱ्या नजरा त्याच जुन्या सामाजिक व्यवस्थेतल्या होत्या! मग कंडक्टर आणि एका प्रवाशाला व्यवस्थित समजावून सांगितले. फोनवर भावाशी बोलणे करून दिले. कुठला रूट पाणी नसलेला आहे ,इथून पुढे जाता येईल असे पटल्यावर त्यांनी लगेच बस अस त्या रूटने पुढे न्यायला होकार दिला. दरम्यान बसचे, त्या जागेचे ,अडकलेल्या प्रवाशांचे फोटो सोशल मीडियावर पाठवले .काही ओळखीच्या लोकांच्या मदतीने नेमके त्या जागेवर मदत पोचवणे शक्य होईल का ते बघायचे होते. कारण आमच्याकडे आलेले बरेच प्रवासी आजूबाजूला छोटे लॉज किंवा शाळा, मंदिर इत्यादी ठिकाणी थांबले होते .नजरेच्या टप्प्यातील एकमेव भोजनालयातील थंडगार समोसे आणि बिस्किटाचे पाकीटही संपले होते. सोशल मीडियाचा असाही वापर करण्याची पहिल्यांदाच वेळ आली होती.
एकदाची बस ठरवलेल्या रूट वरून ठाण्याकडे निघाली. भावानी मला व्हाट्सअप लोकेशन आॅन ठेवायला सांगितले. दरम्यान भावजयीचा भाऊ- आमचा कुमार ,दादा नेत्रा वहिनी ठाण्याला राहतात. त्यांच्याशी बोलून मला रात्री तिथे थांबण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. बस ठाणे स्टेशन वर जाणार होती. सर्व प्रवाशांना सोडायला. आम्ही अलीकडे माजिवडा नाक्याला उतरायचे ठरले .बस पुढे जाताना नेमका रस्ता, आजूबाजूचे ठळक ठिकाण, सगळं माझ्या व्हाट्सअप लोकेशन वर माझा भाऊ आणि भाचा बघत होते. भावाने लगेच फोन करून सांगितले- पुढे चार पाच मिनिटात तुमचा स्पॉट येईल तिथे उतरा. कुमार घ्यायला येतो आहे. आम्ही सामान गोळा करून उतरण्याच्या तयारीत असताना घड्याळांमध्ये रात्रीचे बारा पन्नास झाले होते. कंडक्टरला सांगून आम्ही तिथे खाली उतरलो. कुमार दादाने फोन करून सांगितले- वर्षा काळजी करू नकोस. पुलाच्या खाली उजव्या हाताने थांब म्हणजे पाऊस लागणार नाही. आम्ही पोचतोय.
मी एक मोठा आवंढा गिळला .खाली उतरून सांगितलेल्या ठिकाणी आडोशाला थांबलो, बस इतर प्रवाशांना घेऊन पुढे गेली. एक दोन मिनिट थांबलो असू आम्ही. लगेच भाच्याचा फोन -आत्या तुमची बस पुढे का जात नाहीये ?मला कळेना हा काय विचारतोय. लगेच लक्षात आले माझे लोकेशन मी पुढे सरकलेली दाखवत नव्हते ,काळजीपोटी त्यांनी फोन केला होता. मी त्याला समजावून सांगत असतानाच कुमार आणि नेत्र आले. आम्ही सुरक्षित आहोत याची त्या क्षणाला खात्री पटली. घरी पोचून झोपायला दोन वाजले होते.
सकाळी नेत्रांनी गरम नाश्ता आग्रहाने खायला घालून मुलांशी गप्पा मारून त्यांचा मूड एकदम मस्त केला. कुमार दादाने त्याच्या गाडीने कॉलेज पर्यंत सोडले आणि पुढे तो त्याच्या ऑफिसला गेला.
पाच तारखेचा हातचा ठेवलेला दिवस ऍडमिशन पूर्ण करायला वापरून परतीची फक्त आमची निघणारी ट्रेन गाठून परतीच्या प्रवासाला निघालो. कारण इतर ट्रेन्स अतिवृष्टीमुळे कॅन्सल करण्यात आल्या होत्या! आम्ही सुखरूप परतून दुसऱ्या दिवशी रुटीन सुरू केले.
राहून राहून वाटत होते 4 ऑगस्ट चा योगायोग असा साधला! बाबांच्या आशीर्वादाने अडचणी भयंकर येऊन सुद्धा तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यातून सुटका करून घेतली. जुने त्यातल्या सोन्यावर विश्वास ठेवून नवीन ते आत्मसात करण्याची तयारी ठेवली तर कुठलीही अडचण मोठी नाही याची खात्री पटली.
डॉ वर्षा देशपांडे
No comments:
Post a Comment