Monday, June 15, 2020

कोरोना से डर नही लगता साहब काॅरन्टाईन से लगता है

दिनांक 29 मे 2020 रोजी माझ्या यजमानांची कोवीड टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना ताप आल्यावर टेस्ट करायला पाठवले होते आणि घरातच आयसॉलेट केले होते .मी ,माझ्या सासुबाई ,दोन मुले त्यांच्या संपर्कापासून लांब होतो. यजमानांना 29 मे ला जी एम सी मध्ये ऍडमिट केले .मी मुलांना घेऊन जीएमसी गाठले आणि आमची स्वाब टेस्ट करण्याची विनंती केली. नियमाप्रमाणे आम्हाला लक्षणं नाहीत तर टेस्ट ची गरज नाही म्हणून ऑक्सीजन सॅच्युरेशन ,टेंपरेचर तपासून आम्हाला quarantine  सांगितले (दोन्ही चांगले होते). सासूबाईंना न्यायला गाडी नसल्याने आणि त्यांना चालणे अवघड म्हणून ताबडतोब उन्हात नेले नव्हते.
 प्रशासनातर्फे काही जणांनी येऊन आमची चौकशी केली. आम्हाला पीकेव्ही quarantine सेंटर ला जायला सांगितले. मी विनंती केली की सासुबाई (71 वर्षे )थायरॉईड ,बीपीच्या पेशंट आहेत .घरी त्यांचं रुटीन व्यवस्थित सुरू आहे .लक्षणं नाहीत .शिवाय मुलांना घरात खाणेपिणे वेळेवर मी करू शकते तर मला home quarantine ठेवा. 14 दिवस मी नियमाने quarantine राहते. काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घेते. माझी विनंती मान्य केली नाही. आम्ही चौघे पिकेवी ला गेलो . सिटी बस मध्ये चढताना सासूबाईंना पायरीवर पाय ठेवून जाणे खूप कठीण झाले. शिवाय त्यांना सतत घरात राहण्याची सवय असल्याने दुपारी एक चे ऊन्ह त्यांना असह्य झाले.
  पिके विला पोचल्यावर बॉइज् होस्टेल समोर गाडी उभी करून कर्मचाऱ्यांनी आम्हाला आत कोणत्याही खोलीत जायला सांगितले.
 तळमजल्यावर पाणी साचलेले ,आजूबाजूची झाडे झुडपे ,डास- सापांची भीती म्हणून दोन जिने थांबत थांबत चढवून सासूबाईंना खूप हिमतीने पहिल्या मजल्यावर नेले.

त्यातल्यात्यात कॉमन टॉयलेट च्या जवळची खोली निवडली .समोरासमोरच्या दोन खोल्यांमध्ये आम्ही चौघे राहू असे ठरले. नेमके किती दिवस राहायचे ,आमची स्वाब टेस्ट केव्हा होणार ,इथे काही गरज पडली तर कोणाला संपर्क करायचा याबद्दल तिथे आलेल्या कोणालाही काही माहिती नव्हती .खोल्या धूळ ,जाळ्यांनी भरलेल्या होत्या .पंखे सुरू होते .आम्ही सोबत रद्दी पेपर आणले ते टेबलवर पसरून त्यावर सामान ठेवले .मास्क बांधायला कुरकुरणारा माझा मुलगा इतकी धूळ बघून चेहऱ्यावर पंचा बांधूनच बसला. त्याला धुळीची ऍलर्जी आहे .पट्टीच्या लोखंडी पलंगावर पातळ गादीवर सासूबाई थकून आडव्या झाल्या .दुपारचे तीन वाजले होते .सोबत आणलेला डबा खाऊन मुलांना काॅट शिवाय कुठेही फिरू नका ,बैठे खेळ खेळायला सांगून मी कोणी चौकशी करायला दिसतं का म्हणून शोधलं .शेवटी मैत्रिणींना, डॉक्टरांना फोन केले. तेव्हा आजचे टेस्टिंग बंद झाले उद्या सकाळी बघू म्हणून निरोप मिळाला. म्हणजे उद्या पर्यंत या जागेत वेळ काढायचा हे पाहून अंगावर काटा आला .हात ,चेहरा सोबत आणलेल्या साबणाने धुवावा म्हणून बाथरूम जवळ गेले .तिथली भीषण अवस्था बघून सॅनिटायझर हातावर लावून बसून राहिले .बाथरूम मध्ये दरवाजे तुटके, असह्य दुर्गंधी ,अस्वच्छता पाहून डोकं भणभणायला लागलं. कसं बसं रात्रीपर्यंत वेळ काढला .शिणून झोपायचे ठरवले तर खोलीतला एकमेव बल्ब बंद पडला.
अंधारात रात्र कशी काढणार ?काही सोय नव्हती. मेस वाला केटरर ओळखीचा त्याने त्याच्या कामाची गडबड आटोपल्यावर बल्ब पाठवला. तो आम्ही खोलीत लावून घेतला .रात्री सासूबाईंना बाथरूमला जायचे म्हणून धरून नेले तर तिथे पुन्हा अंधार! दिवा नाही .मोबाईलचा उजेडात कसेबसे त्या जाऊन आल्या. मेस मधून सकाळी नाश्ता ,दोन वेळा जेवणाचा डबा देतात कळले .नाश्‍ता गरम चांगला दिला.मात्र जेवणात पोळ्या इतक्या जाड की सासुबाई ना चावणं कठीण. भाजी मध्ये दोन वाट्या पाणीदार रस्शात तीन ते चार बटाट्याच्या फोडी होत्या. पोट रिकाम ठेवू नये म्हणून थोडं पोटात सगळ्यांनी ढकललं. पाण्याच्या कॅन्स दोनदा पाठवतात कळलं .दुसऱ्यादिवशी आर ओ च्या कॅन्स पाइपने भरल्या जात होत्या. घरी वापरायचं पाणी सुद्धा आपण असे भरत नाही.
 कोणाही कडून खाणेपिणे मागवायचं तर पिकेवि चा एरिया लांब पडतो इतकं लांब सगळ्यांना येणं अवघड. म्हणून आहे ते नीभवायचं अशी मनाची तयारी केली .आमची स्वाब टेस्ट दुसऱ्या दिवशी झाली. काहींनी सांगितलं लक्षण नाही तर का केली ,काहींनी सांगितलं सगळ्यांची इथे आल्यावर करतातच. नेमका कोणता प्रोटोकॉल कोणाच्या आदेशावरून पाळतात कळायला मार्ग नव्हता .

दुसरी रात्र पण अंधाऱ्या बाथरूम आणि कॉरिडॉरमध्ये काढली .आमच्या खोलीच्या आत आपापल्या कॉटवर बसून पत्ते, गाण्याच्या भेंड्या ,नाव गाव वस्तू प्राणी असं मुलांना गुंतवून ठेवणे सुरू होतं .पण आजूबाजूला बघायला किळस वाटावी एवढी अस्वच्छता होती .तिसऱ्या दिवशी कॉरिडॉर झाडायला आणि बाथरूम स्वच्छ करायला स्टाफ आला. आम्ही आमच्या खोल्या झाडून कचरा बाहेर नेला. पण पुन्हा पाण्याने हात धुण्याची सोय नाही !लोकही खिडकीतून बाहेर हात काढून धुणे, चुळा भरून बाहेर थुंकणे प्रकार करताना दिसत होते. इन्फेक्शन ची भीती वाढत होती.
 तिसऱ्या दिवशी प्रशासनाकडून छोटा साबण आणि सॅनिटायजर, मास्क अशी कीट देण्यात आली .बऱ्याच लोकांनी या गोष्टी स्वतःच्या स्वतः आधी आणलेल्या होत्या. दररोज डॉक्टरांकडून ऑक्सिजन सॅच्युरेशन ,टेंपरेचर बघितले जात होते .पण त्या रांगेत उभी माणसं सगळ्या स्तरातली होती .
ज्यांची स्वतःची नीट राहण्याची सोय नाही, खूप दाट -अस्वच्छ वस्ती आहे ,अशिक्षित किंवा आरोग्याचे महत्त्व माहिती नसलेल्या लोकांना quarantine सेंटरला आणणे समजू शकतो .पण जे स्वतःहून quarantine राहून प्रशासनाचा ताण कमी करण्या इतपत जबाबदार आहेत त्यांना अशा ठिकाणी ठेवणे म्हणजे विषाणू प्रसाराला वाढवणे आहे .

कोरोना विषाणूचा संसर्ग धोकादायक आहेच .त्याचबरोबर अस्वच्छतेमुळे पोटाचे आजार ,आंघोळी नसल्याने ऊन घामामुळे त्वचेचे आजार ,डास माशांमुळे कितीतरी नवीन आजारांना हे सेंटर आमंत्रण ठरते की काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे .
सरकारी यंत्रणेने ,आरोग्य विभागाने त्वरित सत्य परिस्थिती लक्षात घेऊन सामाईक धोरण ठरवावे .
जनतेच्या आरोग्याशी खेळणे ,प्रयोग करणे थांबवावे.तिसरा दिवस आणखीन वेगळाच उगवला दोनदा बस मधून लोकांना आमच्या बिल्डिंगमध्ये सोडले. म्हणजे संपूर्ण खोल्या लोकांनी भरल्या गेल्या. सगळ्या स्तरातील लोक होते .दुपारच्या जेवणाचा पॅक आणायला गेले तर एक जेमतेम दीड वर्षाचे बाळ घेऊन त्याची आई तिच्या खोलीसमोर चकरा मारत होती .दोघांनीही मास्क लावले होते .मी पण अर्थातच मास्क लावला होता. म्हणून सुरक्षित अंतरावरून ती कोण कुठली चौकशी केली. एका सुखवस्तू घरातल्या तिने सर्व माहिती पुरवली. दुमजली घरातल्या पहिल्या मजल्यावर ती, तिचा नवरा व हे लहान बाळ आणि खालच्या मजल्यावर प्रौढ सासू-सासरे ,वृद्ध आजे सासू आणि दीर राहतात.  आजे साधूंना दम्याचा त्रास झाल्यावर तपासले असता त्या कोरोना पॉझिटिव निघाल्या .घरातल्या सगळ्यांच्या टेस्ट केल्यावर ती स्वतः, तिचे बाळ आणि नवरा निगेटिव्ह आले. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून हे तिघे पीकेवी मध्ये आले होते .इथे किती दिवस राहायचे याची स्पष्ट कल्पना नव्हतीच. 

दिवसभर सतत फोन घेण्यात आणि सावली सारख्या दोन दिवसापासून सोबत असणाऱ्या डॉक्टर अलका आणि आरती यांच्या कॉन्टॅक्ट मधून काय मार्ग काढावा याची सोय लावण्यात गेला .सकाळी रिपोर्ट अपेक्षित होते. ते कसे येतात त्याप्रमाणे पुढे काय ते ठरणार होते. याची रूपरेषा एकीकडे ठरवणे चालू होते. मधून मधून मुलांशी बोलणे चालू होते .कसे रिपोर्ट येऊ शकतात त्याप्रमाणे काय काय करावे लागेल याची त्यांना कल्पना देऊन मनाची तयारी करणे सुरू होते.
 पुन्हा एकदा रात्र झाली.जे अन्न समोर होतं ते पूर्णब्रम्ह समजून चौघांनी पोटात ढकललं. रात्री अकराच्या दरम्यान अचानक वीज गेली.  सोबत मेणबत्ती वगैरे नव्हती .30 ते 40 टक्के चार्ज असलेले दोन फोन दोन खोल्यांमध्ये फ्लॅश लाईट लावून ठेवले. कधी लाइट ,पंखे सुरू होणार ,मोबाईलचे चार्जिंग टिकणार का हा प्रश्न होताच. वारही बंद झाल्यामुळे घामाघूम  झालो होतो .त्यात सासूबाईंना बाथरूम ला जायचे होते फ्लॅश लाईट च्या उजेडात तिथपर्यंत जाण्याचे दिव्य पार पडले ! पण परत येताना त्यांना दरदरून घाम फुटला .चक्कर येते असे जाणवायला लागले. कसेबसे धरून त्यांना कॅट पर्यंत आणले आणि झोपवले. स्पॉन्डिलाइटिस, वर्टिगो ,हाय बीपी आहे की आणखी काही ?अशा रात्री गुडूप अंधारात त्रास कमी नाही झाला तर काय असा विचार करतानाच त्यांना ओआर एस देणे ,ओढणीने वारा घालणे सुरू ठेवले .शेवटी एवढ्या रात्री आरती ला फोन केला .तिने शांतपणे परिस्थिती समजून सरळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले .पंधरा मिनिटात ऍम्ब्युलन्स घेऊन डॉक्टर आले ते फक्त कोरोना ड्युटीवर होते .त्यांनी आॅक्सिजन सॅच्युरेशन बघितले ,टेंपरेचर बघितले आणि जास्त त्रास असेल तर पर्यायी व्यवस्था काहीच नव्हती तर मला सोबत गेल्यावर मुलांना इथेच कसे ठेवायचे असे ठरवले .लाईट लवकर येण्याची शक्यता नाही हे त्यांनी आधीच सांगितले आणि ते परत गेले नॅपकीन ओला करून सासुबाईंचे हात पाय चेहरा पुसणे, ओढणीने वारा करणे सुरू ठेवले .देणे सुरू ठेवले अर्ध्या तासाने त्यांना थोडे बरे वाटू लागले. दोन तास थांबत थांबत वारा घालणं सुरू ठेवले त्यामुळे त्या झोपू शकल्या. 
पहाटे चार वाजता लाईट आले त्यानंतर मी झोपले.
 घरात लाईट गेले तरी इन्व्हर्टर आहे, घर सवयीचे असते ,भीती नसते.
 इथे सगळंच भयावह !अशी रात्र काढतांना इतर लहान मुलांचे किती हाल झाले असतील हा विचार जास्त अस्वस्थ करत होता अशा परिस्थितीत आम्ही सतत एकमेकांशी बोलत होतो वातावरण हलकेफुलके ठेवून स्वतःला उत्साही ठेवत होतो त्यामुळे ती रात्र पार पडली.

 एखाद्या कमजोर मनाच्या ,घाबरलेल्या व्यक्तीला हा प्रसंग निभावणे अगदी घातकही ठरू शकले असते. अशा असुविधांमुळे पूर्ण विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे प्रशासनाने खरंच नियंत्रणाचे उपाय किंवा तरतुदी यांची पूर्तता करण्यात घाई केली असे म्हणावेसे वाटते.

आमच्या पुरतं म्हणाल तर माझे भाऊ-भावजया ,मित्रपरिवारातील स्वाती ,अर्चना ,राहुल, नातेवाईक   या सर्वांचा आर्थिक, मानसिक सपोर्ट सुरुवातीपासून होता आणि स्वतःला कसे मॅनेज करायचे याबाबतीत आम्ही पक्के राहिलो.
 परिणामी आज 71 वर्षाच्या सासूबाई आणि माझे यजमान ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
 पण आमच्या बरोबर असलेले इतर लोक ,आमच्या नंतर या प्रसंगातून जाणारे लोक त्यांना कितपत सपोर्ट मिळाला? ते त्यातून कसे निभावले? त्यांचे पुढे काय झाले? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत.

Sunday, June 14, 2020

अ‍ॅक्वेरियम

इंडस्ट्री कशी चालते, टेलिकम्युनिकेशन मेंटेनन्स म्हणजे नेमकं काय, थिअरीपलिकडे फारसं कळत नव्हतं. वय २१ चालू. फायनल रिझल्ट नुकताच लागलेला. इंटरव्ह्यूतल्या एकाही टेक्नीकल प्रश्नाचं मला धड उत्तर देता आलं नव्हतं. निघताना अचानक मी त्यांना इतकच म्हटलं होतं,’ सर, तुम्ही पण करियरच्या सुरुवातीला या स्टेजमधून गेला असाल ना! मला एक संधी द्या. मी २ महिन्यात सगळं शिकून दाखवेन.’ ते संमिश्र अर्थाने हसले आणि आठवड्याभरात चक्क मला ’ट्रेनी इंजिनीयर’ म्हणून नेमणूक पत्र आलं.

कंपनीची अनेक चित्रविचित्र उत्पादनं. अमेरिकेत पोर्कसाठी डुकरांची वाढ जोमाने व्हावी म्हणून ज्याचं इंजेक्शन दिलं जातं ते ’पपेन’, इरिगेशनची उपकरणं, सोलर सिस्टीम्स, पाईप्स, परदेशात घरांच्या तावदानासाठी वापरल्या जाणार्‍या शीट्स, कांदा-लसूण आणि फळांच्या पावडरी वगैरे. हे सगळं तयार करणारे, एकमेकांपासून १०,१२ किमी अंतरावरचे ३ भलेमोठे प्लांट्स, आयटीआय ते आयआयटी रेंजमधले दोनेक हजार कर्मचारी, त्यांचे पर्सोनल, स्टोअर, प्रॉडक्शन, पॅकेजिंग, एक्स्पोर्ट, डिस्पॅच वगैरे अनेक विभाग. ते एकमेकांना जोडण्यासाठी वापरण्य़ात येणारे हजार एक इंटरकॉम्स, मिनी एक्स्चेंज, शे दोनशे टेलेक्स, फॅक्स, पेजर्स, अधिकार्‍यांच्या कारमधल्या वायरलेस यंत्रणा. या अवाढव्य जंजाळाचा मेंटेनन्स करणार्‍या डिपार्ट्मेंटला मी रुजू झाले. यातल्या काही गोष्टी मी जन्मात पाहिल्या नव्हत्या, हाताळणं तर दूरच. डिपार्ट्मेंटला मी एकटीच मुलगी. टेक्नीकल मेंटेनन्सला मुली निरुपयोगी असं सार्वत्रिक मत. अगदी पुण्य़ाच्या बजाज ऑटोनेही आमच्या वर्गातल्या ८ मुलांना निवडले तेव्हा ’लेडिज कँडिडेट्स डू नॉट अप्लाय’ अशी नोटीस लावली होती. या सहकार्‍यांनाही ’मुलगाच हवा होता’. माझी ब्याद लवकर टळावी म्हणून त्यांनी जणू असहकार पुकारला. एक प्रकारचे रॅगिंगच. कशाच्याही नीट नोंदी नसल्याने कसे काम करावे ते कळेना. दुसर्‍याच दिवशी त्यांनी २०० कनेक्शनच्या सर्किटचे टेस्टींग दिले. संदर्भ न सांगितल्याने गोंधळून जाऊन मी पूर्ण चुकवले. पुण्याच्या कॉलेजमध्ये इतकंही शिकवलं नाही वाटतं- या टाईपचे टोमणे जिव्हारी लागले. जेवायच्या सुट्टीत एकटीच कँटीन शोधत गेले. बरीच गर्दी होती पण मुलींची संख्या नगण्य त्यामुळे ’कौन नया पंछी आयेला है’ टाईप बोचणार्‍या नजरा. चुकलेले टेस्टींग. खाल्लेली बोलणी. कुणीही ओळखीचे नाही. त्यात अपडाउनचे दोन दिवसाचे विचित्र अनुभव. आदल्या दिवशी ट्रेन लेट झाल्याने घरी पोचायला झालेला उशीर. आज जेमतेम चहा घेऊन कशीबशी धावत पकडलेली गाडी. कसं होईल इथे आपलं! नोकरीची तर प्रचंड गरज होती. मला घास जाता जाईना.

तेवढ्यात समोर तिशीची एक स्मार्ट, सावळी बाई येऊन बसली. सरस्वती. माझा नवखा, रडवा चेहरा पाहून मला डबा ऑफर करत साउथ टोनमधल्या इंग्लीशमध्ये म्हणाली, ’नवीन आहेस ना! घाबरु नकोस. न लाजता, न चिडता, न रडता, काय ते निगरगट्टपणे विचारत जायचं. हिमतीने शिकत जायचं. सगळं जमतं.’ मग हसत हिंदीत म्हणाली, ’गब्बरसिंग क्या कह कर गया, जो डर गया..?’ ’वो मर गया’ असं म्हणताना मला खूप धीर आला आणि हसूही. आमची पुढे घट्ट मैत्री झाली. ती एमडींची सेक्रेटरी होती. कॉर्पोरेट जग कोळून प्यायली होती. मग असेच एक एक गुरु भेटत गेले.
कॉम्युटर मेंटेनन्स विभागातली, केसांच्या बटा मानेने उडवत, मनगटाभोवती बांधलेल्या रुमालात स्क्रू ड्रायव्हर खोचून तरातरा चालणारी रुबीना. वाटेत भेटणार्‍यांना ’क्या भिडू, काय मंता जोशीसाहेब, गुडमॉर्नींग सिन्हा सर’ असं व्यक्तीनुसार विश करत लीलया दुरुस्त्या करणारी. मला घेऊन सगळे प्लांट फिरुन आली. तिने तिच्या बोहरी हिंदीत कानमंत्र दिला, ’इथे मुलगी असण्याचं कौतुक करत बसशील तर आहे तिथेच राहशील. कोणी एक दिली तर आपण दोन द्यायच्या पण आवाज न करता. आवाज केला तर बाईलाच एक्स्प्लनेशन देत बसावं लागतं. वायर खाली घ्यायचीय तर प्रसंगी स्वत: शिडी चढायची, उई वुई करत इलेक्ट्रीशियनची वाट नाही पाहत बसायचं.’
माझ्या इंग्लीश मधल्या चुका काढणारे डायरेक्टर रामचंद्रन सर. परतीची बस चुकल्याने एकदा त्यांनी आम्हा तीन जणांना स्टेशनपर्यंत लिफ्ट दिली. दोघे पुरुष कारमध्ये मागे बसले, एवढ्य़ा सिनियर साहेबाच्या शेजारी कसं बसायचं म्हणून मी पण मागेच बसू लागले. ते डाफरले, ’मै क्या तुम्हारा ड्रायव्हर हूँ? कल कॅबीन मे आना, तुम्हारा एक एटिकेट्स ट्रेनिंग लेता हूँ।’ दुसर्‍या दिवशी त्यांनी खरंच फोन करुन बोलावलं. शिकवलं. कार मध्ये बसतानाच्या मॅनर्सपासून, मिटिंगमध्ये कसे बसावे, काटे-चमचे वापरायचे नियम.. इथपर्यंत. पुढे एकदा म्हणाले होते की त्यांची फॅमिली मद्रासला असते. माझ्याकडे पाहून त्यांना लेकीची आठवण येते. वर हसत म्हणाले होते, ’ती पण तुझ्यासारखीच धांदरट आहे.’
कंपनीच्या ’आयएसओ’ विभागात इंग्लीश कागदपत्रांचे अनुवाद कामगारांना समजेल अशा मराठीत करण्य़ाचं काम निवृत्त प्राध्यापक पाटीलसर करायचे. माझी वाचनाची आवड कळल्यावर, मेन बिल्डिंगच्या काचेतून माझ्या बिल्डिंगकडे जाताना मी त्यांना दिसले की ते काही शब्द काढून ठेवत. मी एमआयएसचा सर्व्हर चालू करुन पहिला फोन त्यांना करायचे. शब्द ऐकायचे आणि दिवसभरात आठवतील तेवढॆ प्रतिशब्द जिथे मेंटेनन्स सुरु असेल तिथून त्यांना फोनवर कळवायचे. आवडले तर ते वापरायचे नाहीतर अधिक चपखल शब्द सांगायचे.
वर्षभराने भेटलेली ब्रिटीश जोआन. नवर्‍याचा आमच्या कंपनीतला रिसर्च लांबला म्हणून लंडनमधली नोकरी सोडून त्याच्यासोबत येऊन राहिलेली. सकाळी शॉर्ट्स घालून गावभर सुळकन सायकलिंग करत फिरणारी, आवड म्हणून कॉर्पोरेट लेखनाचे प्रशिक्षण देणारी, सोनेरी केसांची अवखळ जोआन. एकमेकींचे अ‍ॅक्सेंट नीट कळत नसतानाही कशी कोण जाणे आमची मैत्री झाली. त्यामुळे केवळ ऑफीसर्ससाठी असलेल्या बॅचमध्ये ज्युनिअर असूनही शिकता आले. मेमो लिहिणे, निगोशिएशन स्किल्स वगैरे भानगडी तेव्हा प्रथमच ऐकल्या. थोड्याफार कळल्या.
दोनच वर्षात, कंपनीने विकत घेतलेल्या नव्या टेलीकॉम कंपनीत उत्तम पदावर इंटर्नल ट्रान्सफर मिळाली. भविष्य आमूलाग्र बदलून टाकणारी संधी होती. उत्साहात पेढे वाटप सुद्धा केलं. परंतु केवळ असूयेपोटी, मी पर्यायी व्यक्ती ट्रेन करेतो ती स्थगित व्हावी असा मेल रातोरात एमडींना गेला. हा धक्का इंडस्ट्रीचा क्रूर चेहरा दाखवून गेला. इथल्या गळेकापू स्पर्धेत किती सावध राहावं लागतं याचा धडा शिकवून गेला..

’फाईंडिंग निमो’ मधला निमो दोन विश्वं अनुभवतो. एक अ‍ॅक्वेरियममधलं आणि एक विशाल समुद्रातलं.
पुण्य़ाला शिकताना एकटीने केलेले प्रवास, होस्टेलचे खास अनुभव यामुळे आपल्याला खूपच जग कळलंय या भ्रमाचा भोपळा म्हणजेच माझ्या अ‍ॅक्वेरियमची काच या सगळ्या भल्याबुर्‍या गुरुंच्या कृपेने अखेर फुटली.

अशी किती माणसं सांगावीत. साडेतीन वर्षात कंपनीत शेकडो परिचय झाले. काही माणसं जवळची झाली. काही दुखावून गेली. त्यांना सरळ करायला, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला एव्हाना मी शिकले होते पण त्यांचे प्रमाण फार कमी. मुळात माणसं पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसतात. त्यांच्या वागण्य़ामागे परिस्थितीजन्य कारणं असतात. आपण त्यांच्याकडे एकाच कोनातून पाहतो आणि तेवढ्याच अनुभवाच्या तुकड्यांवरुन मत बनवतो हे लक्षात आलं. ज्यांनी सुरुवातीला त्रास दिला होता त्यांच्याशी तर कौटुंबिक संबंध निर्माण झाले. माझ्यासह त्यांचेही डोळे सेंड ऑफ पार्टीमध्ये ओलावले होते. आता बावीस वर्ष उलटूनही बहुतेकांनी मैत्री जपली आहे. काहींशी मधल्या काळात काहीसा तुटलेला संपर्क सोशल मिडीय़ामुळे पुन्हा जुळला. सिनियर मंडळी काळाच्या पडद्याआड गेलीच पण रुबीना सुद्धा अल्पशा आजाराचे निमित्त होऊन गेली. मला ’ती’ पहिली संधी देणारे सर म्हणजे श्रीराम पुढे माझा चांगला मित्र झाला. आता तो परदेशात असला तरी मैत्री तशीच टिकून आहे. मला आयुष्यात पाय रोवून उभं राहायला शिकवणारी सरस्वती मात्र कुठेतरी हरवलीय.
'अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमें मिलें
जिस तर सूखे हुऎँ फूल किताबों में मिलें ..'
पण मी तिला अजूनही शोधते आहे.

Saturday, June 13, 2020

लाॅकडाऊन आणि आई


लाॅक डाऊन शब्द पाहिल्यावर वैतागू नका! थांबा! लॉक डाउन मधील माझ्या आईबद्दल सांगण्यापूर्वी थोडसं माझ्या आई बद्दल:-माझी आई, वय 79 वर्षे, मुंबईत मुलुंड येथे 2000 पासून (बाबा गेल्यापासून) एकटी राहते. काही वर्षे, कुणी ओळखीतल्या पेईंग गेस्टस आणि सात-आठ वर्षे माझी मुलगी सोबत होत्या. पण तशी ती सर्व एकटीने मॅनेज करते य इतकी वर्षं! आणि आता ऑगस्ट 2019 पासून एकटीच राहते ती! तिचा तिथे समवयस्क मैत्रिणींचा छान ग्रुप आहे. जवळच्या देशमुख गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक, महिला मंडळ, सीनियर सिटीझन क्लब, विरंगुळा केंद्र, आपल्या पंचम सारख्या संस्थेची सदस्या, त्यामुळे सतत काहीना काही कार्यक्रमानिमित्त बाहेर जाणे सुरू असते. पुणे, पार्ले खालोखाल मुलुंडला नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. छान आपल्यासारखंच एकमेकीत ठरवून सिनेमा, नाटक, व्याख्यान, परिसंवाद इत्यादी कार्यक्रम अटेंड करत असते ती! कधीकधी जास्त कार्यक्रम झाले तर शांत राहते. देवपूजा, धार्मिक व
इतर वाचन, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज यांच्या पोथ्यांचे वाचन इत्यादी नियमित चालू असते. (त्यांच्यावर तिची नितांत श्रद्धा आहे).
                  8 मार्चला तिचा स्वतःचा व माझ्या जिजाजींचा वाढदिवस आटोपून, ती माझ्या बहिणीकडून (दहा-बारा दिवस राहून) मुलुंडला परतली आणि अचानक जनता कर्फ्यू ,लॉक डाऊन जाहीर झाला. थोडीशी कल्पना होती तर आठ-दहा दिवसांच्या भाज्या, मास्क, सॅनी टाइझर,औषधे इत्यादी तयारी करून ठेवली होती तिने! पण किराणा वाल्याने ती मुलुंडला नसल्याने यादी रखडवली व नंतर सामान संपले म्हणून सांगितले. लोकांनी पॅनिक होऊन खूप मोठे सामान भरण्याचा परिणाम! तिचे सतत त्याला फोन करणे सुरू होतेच. त्यात तिन्ही कामाच्या बायका यायच्या बंद झाल्या. एरवी फक्त स्वयंपाकीण बाईने केलेल्या भाजीचे रिनोवेशन, गरम भाताचा कुकर व इतर काही स्पेशल पदार्थ ती करते. (सुगरण आहे माझी आई !चविष्ट स्वयंपाक करते अगदी!) पण आता अगदी सगळेच झाडूपोछा, भांडी, स्वयंपाक तिला करावे लागले. मला व माझ्या बहिणीला वाटायचं की कसं करेल ही? पण तिने हिंमतीने हळूहळू सगळी कामे करायला सुरुवात केली. जसजसे लॉकडाउनचे दिवस वाढायला लागले, तर माझी बहीण व तिचे मिस्टर म्हणाले की पोलिसांची परवानगी मिळते का बघू, तुम्ही आमच्याकडे या. पण तिने ठाम    नाही सांगितलं,कारण चेंबूर भाग जरा जास्त प्रभावित होता आणि इतके दिवस घर सोडून आवडत नाही, माझ्याकडे आली तरी जाण्याची घाई असते. आपल्या घरीच करमतं (सगळ्यांचं तसंच असतं म्हणा, माझं तर आत्ताच तसं झालंय).

आमचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर आहे, तिला आम्ही सांगितलं की काही झालं तरी दार उघडून बाहेर जाऊ नको. मग दारालाच पिशवी बांधून ठेवली, त्यात दूधवाला दुधाची पिशवी ठेवायचा. बाकी कुणीही वर येत नव्हतं. कचरा वाली पण बंद! मग तिनेच वॉचमनला रोजचे ज्यादा पैसे ठरवून, तिचा रोजचा कचरा खाली ठेवलेल्या  डस्टबिन         मध्ये टाकण्याची सोय केली. जसजसे  लॉकडाउनचे दिवस वाढू लागले, तशी भाजी संपली, घरपोच भाजीसाठी, माझ्या मुंबईच्या मैत्रिणींनी मला बरेच नंबर पाठवले, पण प्रत्यक्षात भाजी घरी पोहोचत नव्हती. बरेचदा मुख्य मार्केट बंद हा प्रॉब्लेम असायचा. मला इथे खूप वाईट वाटायचं, कारण इथे दारावर काय, बाजारात काय भाजीच भाजी! तरी ती तक्रार करत नव्हती. करते मी ऍडजेस्ट, कांदे बटाटे आहेतच, भातांचे प्रकार करेन, तू नको काळजी करू, असं मलाच समजवायची! पण इतक्या उन्हाचं लिंबू,कैरी नाही. सरबत, पन्हंपण काही घेऊ शकत नाही. एरवी ती एकटी असूनही घरात सर्व भरलेलं असतं. पण आता काही वेळच मिळाला नाही. माझा मैत्रिणींशी कॉन्टॅक्ट करणं सुरू होतं . काही मैत्रिणी तर शाळा सोडल्यापासून भेटल्या नव्हत्या,पण तरी त्यांनीही आईला घरपोच भाजी फळे मिळावी म्हणून खूप प्रयत्न केला. शेवटी बरेच दिवसांनी एक जण तयार झाला. हुश्श! एका मैत्रिणीचा नातेवाईकच होता तो! तरी मे संपून जून सुरू झालाय,पण अजून कैरी काही तिला दिसली नाही.तसेच साधा चिवडा करायला कुरमुरे पाकिट मिळायला तयार नाही.असो.
    संध्याकाळची वेळ जरा हुरहुर लावणारी असते. म्हणून मी रोज संध्याकाळी तिच्याशी मनसोक्त गप्पा मारते. एरवी इतकं नियमित आणि तेही इतका वेळ बोलणं नसतं आमचं! कारण ती रोज बाहेर जाते, तर बिझी असते. (मी  तर फारच!)त्यांच्या गार्डनमध्ये सगळे सणवार मस्त साजरे होतात. चैत्रातलं हळदीकुंकू, डाळ पन्हे , संक्रांतीला तिळगुळ, कोजागिरीला आटीव दूध इ. आता अगदी घरात म्हणजे सोपं नसणार तिच्यासाठी!  घरात इतकी माणसं असून,आपल्या बर्‍यापैकी ऍक्टिव्हिटीज चालू असून  आपण कंटाळलो. तर तिला इतके महिने असं घरात बंद कसं वाटत असेल, असं मला रोज वाटत राहतं.

तिच्या गार्डन मधल्या काही लहान वयाच्या मैत्रिणींनीही, फोन करून विचारलं की काही हवं असेल तुम्हाला तर जरूर सांगा.पण सुरुवातीला अशी काही परिस्थिती होती की ती असं काही करण्याच्या फंदात पडली नाही. तसे शेजारी मदत करू शकतात, करतात. पण रोज त्यांना त्रास देणे योग्य नाही, म्हणून आई सर्व स्वतः मॅनेज करीत असते. एकदा सोसायटीच्या सेक्रेटरीने तिला औषधे,कोकम सरबत ,हिट स्प्रे इत्यादी वस्तू आणून दिल्या. असेच दिवस पुढे पुढे चालू आहे त.
      मे महिन्यात उन्हाने मात्र जरा त्रासली होती. एसी लावू नका, म्हणत होते सगळे! त्यामुळे उकाड्यातच सगळी कामं चालायची. नंतर खूप तापमान वाढल्यावर, लावायला लागली एसी थोडा वेळ! पेपर येत नसल्याने व व्हाट्सअप ही नाही, त्यामुळे जगाशी संपर्क काय तो टीव्हीवरच्या बातम्यांतून! त्या दिवसातून एकदा कशाबशा पाहू शकतो आपण! मग मीच शनिवार रविवारच्या लोकसत्ता पुरवणी मधलं तिला फोनवर सांगत राहाते. मी वाचत असलेल्या पुस्तकाबद्दलही! बहिणीशी व इतर नातेवाईकांशी फोनवर रोजच गप्पा चालतात. तिची खास मैत्रीण परांजपेमावशी पुण्याला अडकली होती, ती मुलुंडला परत आली, आईला भेटली नाही तरी आईला बरं वाटायला लागलं. (कसंअसतं ना माणसाच्या मनाचं?)
           काही दिवसांपूर्वी माझ्या बहिणीच्या विंगमध्ये अगदी शेजारी, वरच्या व खालच्या फ्लॅटमध्ये ही केसेस झाल्या. तर तिची विंग सील झाली. तिच्याशेजारी राहणाऱ्यांशी खूप जुने आणि चांगले संबंध आहेत. इतके वर्षे झाली तर आमचेही! त्यांच्याकडे थोडी क्रिटीकल सिच्युएशन तयार झाली. दुर्घटनाही घडली. तर आम्हाला सगळ्यांनाच खूप स्ट्रेस आला. तशातही ती कणखरपणे बहिणीला समजावत राहायची. (मनात बहिणीची सतत काळजी वाटत असूनही)
     प्रत्येक लाॅक डाऊन नंतर ,ती स्वतःला पुढच्या लॉक डाउन साठी मनाने तयार करायची. आता तिथे गार्डन, मैदाने उघडणार, या कल्पनेने तिला पुन्हा मनाला उभारी आलीये. म्हणते कशी, मी बाहेर केव्हा जायचं ते पाहीन, पण सर्व हळूहळू सुरु तर होतंय! परवा चक्रीवादळ झालं, पाऊस आला खूप जोरात, तर छत्री शोधून ठेवली आहे. जायचं तेव्हा जाईन बाहेर, पण छत्री हवी ना!  तर अशी आहे माझी लॉक डाउन मधली आई!

Friday, June 12, 2020

मामाच्या गावाला जाऊया..

लॉकडाऊन च्या काळात आम्ही बहिणी आत्तापर्यंत, तीन चारदा तरी duo वर बोललो. प्रत्येक वेळेला ,'आत्ता आपण सगळ्या एकत्र अन ते पण छिंदवाड्याला असतो तर काय मजा आली असती नाही ' असा एकदा तरी विषय निघायचा!
खरच खूप धमाल केली आम्ही छिंदवाड्याला प्रत्येक उन्हाळ्यात! 
आम्ही सहा जणी (आम्ही तिघी अन तीन  मामेबहिणी,) दोन दोनच्या जोड्याच होत्या आमच्या!  प्रत्येक जोडीतील दोघींमधे  फक्त पाच सहा महिन्याचं अंतर होत.
 जे काही करायचं ते जोडीने! (माझी जी जोडी आहे आरती ती पण योगायोगाने सासरची केळकरच)! मामे भाऊ आमच्यापेक्षा बराच लहान होता.
 उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आई एक महिना तरी माहेरी जायची.लहान असताना आई बरोबर अन पुढे एकटच जायला लागलो.जाताना पाहिले नागपूरला मावशीकडे काही दिवस मुक्काम अन मग पुढे छिंदवाडा ! 
फाटकावर,
विष्णू जनार्दन परांजपे.- वसंत विष्णू परांजपे.
अंतरवेल
नर्सिंगपूर रोड
छिंदवाडा.
अशी संगमरवरी दगडावर काळ्या अक्षरात कोरलेल्या पाटीनी सुरू होणारी, जवळ जवळ गावाच्या बाहेर असलेली आजोबांची ही जागा,एकरभर तरी होती. फाटकातून शिरलं की एक चिंचोळी पाऊलवाट ज्याच्या एका बाजूला आमचं शेत ,अन दुसऱ्या बाजूला सलामी देत उभी असणारी आंब्याची दहा झाड ! त्याला लागून कुंपण अन लगेच दुसऱ्यांचं शेत होत.पाऊलवाटे नी सरळ गेलो की समोर प्रशस्त बंगला होता. सुरुवातीला आजोबांनी तीन चार खोल्यांच घर बांधलेल .पुढे मामानी, झाडाला फांद्या फुटाव्या तशा खोल्या वाढवत त्याचा टुमदार बंगला केला.
 प्रत्येक वेळेला गेलं की काही तरी नवीन बांधकाम केलेलं दिसायचं.
घराच्या मागच्या बाजूला भली मोठी विहीर अनेक फुलझाड ,गोबर गॅस ,गोठा ,आऊट हाऊस एक पाण्याचं टाक(आमची रोजची आंघोळ इथेच असायची) अस सगळं होत. बऱ्याच भाज्या पण लावल्या होत्या.शेतात पण फणस ,पेरू बोर,रायआवळा ही झाड होती.  
तिथला दिनक्रम म्हणजे,
सकाळी उठल्यावर पहिले गोठ्यात जायचं ,गडी गायीचं दूध काढायचा तेंव्हाच ते प्यायच, त्या धारोष्ण दुधाची चव अजूनही जिभेवर आहे.
आजी ला थोडी फार मदत करायची. सगळ्या जोडयाना काम वाटूंन दिली होती. मग आंघोळ करून भटकायला निघायचं.फाटकातून बाहेर पडलं की लगेच, एका बाजूला हनुमानाच देऊळ (त्यात अजून रामाचं वगैरे असे 3,4 देऊळ होते) अन एक बाजूला पटेल म्हणून एक कुटुंब  राहायचं.आधी देवळात जाऊन  दर्शन घेऊन तिथल्या बाबाजी(पुजारी) शी गप्पा मारायच्या मग पटेलांकडे चक्कर मारायची. त्यांच्या 3 सुना होत्या.त्या सगळ्याच भाभीशी,आम्ही स्वयंपाक घरात बसून गप्पा मारायचो. खर तर आम्ही बरच लहान होतो,त्या लेकुरवाळ्या, डोक्यावर  पल्लू घेऊन राहणाऱ्या भाभी शी  काय बोलायचो आठवत नाही आता! पण एक तास सहज  निघून जायचा तिथे. घरी येऊन जेवण वगैरे झालं की मग मात्र संध्याकाळ पर्यंत घरातच उनाडक्या सुरू असायच्या.पत्ते, अष्टचंग, कॅरम,टेबल टेनिस, स्केटिंग (जे मला कधी जमल नाही),गाणी लावून नाच करणे असे उद्योग चालायचे.
   दुपारचं खाण झालं की आजोबा रुद्र शिकवायचे.घर गावाबाहेर असल्याने जवळच टेकडी होती, संध्याकाळी तिथे फिरायला जायचो. येताना,पळसाची पान आणून जेवण्यासाठी पत्रावळी, बनवायच्या.
आजी संध्याकाळी एक वेळच जेवायची,  तीच जेवण झालं की मग तिच्या भोवती कोंडाळ करून रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकायच्या. 
 जेवण व्हायच्या आधी गच्चीवर पाणी मारून गाद्या टाकायच्या.अन जेवणानंतर  लोणच्याची फोड धुवून ती चोखत गादीवर बसून मस्तपैकी गप्पा मारायच्या.आमच्या चादरी सुद्धा ठरलेल्या होत्या. 'तुम्ही आमच्या गादीवर बसून गादी गरम केली ,आमची चादर विस्कटली, 'अशा क्षुल्लक कारणावरून लहान जोडी शी भांडण तर ठरलेलंच होत! भांडण्याचा हा कार्यक्रम दिवसातून बऱ्याच वेळा साजरा व्हायचा. मोठी जोडी फारशी भांडणात नसायची,पण आम्ही अन लहान जोडीत मात्र सतत चकमक सुरू असायची. त्या अजूनही, 'तुमच्या आयांनी आम्हाला लहानपणी खूप त्रास दिला'अस आमच्या मुलांना सांगत असतात.
मामाकडे फॅंटम, मँड्रेक जादूगार ,चाचा चौधरी ,चंदामामा ही सगळी पुस्तक पोस्टानी यायची ,ती पाहिले वाचण्यासाठी आमची धडपड असायची. किस्त्रीम, माहेर ही मासिक पण यायची(अर्थात ती मोठं झाल्यावर वाचायला लागलो).वाचनाची आवड तिथेच लागली मला. 
जोरात वार सुटलं की ,आंबे पडायचे ,ते गोळा करून चोखून खाण्याची मजा काही औरच होती।त्या मधे एक गोटी आंबा होता ,एकदम छोटा आकार ,पण अप्रतिम गोडवा होता त्याला.
घरी काम करायला नजिया बाई नावाच्या आदिवासी बाई यायच्या ,टेकडीच्या पलीकडे त्यांचं घर होत। त्यांच्याकडे जाऊन एकदा बटाट्याचा रस्सा अन भाकरी खाऊन आल्याच मला आठवतंय.
बहिणींच्या मैत्रिणी आता आमच्याही ओळखीच्या झाल्या होत्या ,त्यांच्याकडेही पाहुणचार व्हायचा. 
 रविवारी,मामा घरी असायचा त्यादिवशी शेतात काम करणे, गाडी धुणे,गोठा साफ करणे अशी काम आम्हा सगळ्यांना करायला लावायचा, त्या कामाचे पैसे पण मिळायचे.
  मामा एकदम हरहुन्नरी होता.प्रसिद्ध सर्जन तर होताच शिवाय नंतर लॉ  केलं त्यातही तो मेरिट आला। फोटोग्राफी चा छंद होता, घरी डार्क रूम बनवली होती,पुस्तकात माहिती वाचून फोटो डेव्हलप करायला तो शिकला,घरच्या छोट्या मोठ्या रिपेअरी तोच करायचा. शेती ची पण खूप आवड होती। जुन्या काळी बारीक वायर च्या पर्सेस ची फॅशन होती ,त्या सुद्धा त्यांनी आई अन मालुताई ला स्वतः विणून दिल्या होत्या।असो..
या आठवणी बरोबरच छिंदवाड्यामुळे घडलेल्या ट्रिप्स पण आठवल्या.
मामाच्या दवाखान्यात प्रमिला पिल्ले म्हणून  केरळ ची नर्स होती।ती दर वर्षी उन्हाळ्यात एक महिना सुट्टी काढून घरी जायची.आरती अन तीच विशेष सख्य! तीनी सहज आरतीला गावाला चलतेस का विचारलं,ती, तयार झाली. मामा मामी पण पाठवायला तयार झाले. ,'तू तिथे मी' असल्यामुळे मी पण जायचं हे ओघानी आलच। आई बाबां ची पण हरकत नव्हती.आम्ही चक्क एक महिना दीदी कडे जाऊन राहिलो.चौथी किंवा पाचवी ला असेन मी तेंव्हा.आत्ताची परिस्थिती बघून अस वाटत ,कसे काय तयार झाले असतील आमचे आई बाबा अशा अनोळखी ठिकाणी एकट पाठवायला! तेंव्हा खरच सगळं विश्वास ठेवण्याजोग वातावरण होत नाही का!
तिथे पोळ्या मिळणार नाहीत म्हणून आम्ही इथूनच महिनाभर पुरेल एवढी कणिक घेऊन गेलो होतो. दिदीच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर समुद्र ! संध्याकाळ तर तिथेच घालवायचो, ( शिवाय प्रातर्विधी साठी तीच जागा होती!) .एक लग्न पण अटेंड केलं. दिदीची बहीण(कांची),आई सगळ्यांनी खूप लाड केले.थोडं मल्याळम पण शिकलो.तांदुळ अन नारळाचे विविध प्रकार तिथे खाल्ले .खोबरेल तेलातल्या भाज्या मात्र शेवटपर्यंत आवडल्या नाही। तिथूनच कन्याकुमारी ला पण जाऊन आलो. 
त्यानंतर लगेचच्या उन्हाळ्यात, प्रकाश ट्रॅव्हल्स नागपूर ( याचे मालक प्रमोद पेंडके ,मावशीच्या छान ओळखीचे) बरोबर साऊथ टूर ला आम्ही दोघीच गेलो.बाकी सगळे फॅमिली बरोबर होते.आम्ही दोघीच आलो म्हणून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं .पण त्यामुळे सगळेच आमची खूप काळजी घ्यायचे. बंगलोर म्हैसूर उटी ,कांचीपुरम , रामेश्वरम, कन्याकुमारी(परत एकदा) ,ही  ट्रिप पण मस्त झाली.
 नंतर प्रकाश ट्रॅव्हल्स बरोबरच जम्मू-काश्मीर ट्रिप केली.यावेळेला मामाचे चंद्रपूर चे दोन डॉक्टर मित्र (सालफळे, सोनवलकर)अन त्यांची फॅमिली होती.या ट्रिप मध्ये पहिल्यांदा विमानाचा प्रवास केला( जम्मू ते श्रीनगर). बर्फ बघितला! 
छिंदवाडयाच्या या सुट्या म्हणजे एकप्रकारे उन्हाळी शिबिरच होत आमच्यासाठी! 
खूप काही शिकलो, मजा पण केली .
आयुष्यातले ते  वर्ष आठवताना आजही तेवढाच आनंद होतो.
पुढे मामा अचानक 50 वर्षी हार्ट अटॅक ने गेला. मामी वगैरे नागपूरला शिफ्ट झाले. 
काही वर्षांपूर्वी परत एकदा छिंदवाडयाला गेलो होतो. वाळवी नि पोखरलेलं ते घर अन ओसाड शेत पाहून खूप खुप वाईट वाटलं. 
आता ते जुन सगळं पाडून मामे भाऊ तिथे घर बांधणार आहे ,असच कधी मधी  जाऊन राहायला!
आत्ताही आम्ही सहा जणी एक, दोन वर्षात कुठेतरी एकत्र जमतोच. पण,छिंदवाडया च घर पूर्ण झालं की एकदा तरी सगळ्या जणीनी तिथे जाऊन पूर्वीची मजा अनुभवायची अस स्वप्न आम्ही पाहतोय!

Thursday, June 11, 2020

दान, आनंदाचं

" गा ळीत  पाणी खोल मनात
मंद पिवळा उजेड भरे
सुखभराने इवलेपणी
जीव मासोळी होऊन फिरे
झरे पाझर कुठून कसे
रितेपणाला येतात भरू
दयावंत हे दान घेताना
नको कसला अर्थ विचारू" 
 किती सुंदर ओळी ह्या शांताबाईंच्या.   काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, काही भावना व्यक्त करायच्या नसतात, काही स्पर्श जाणिवेनेच अनुभव करायचे असतात, तसच काही दान हे असं असतं की घेणाऱ्याने त्याचा कुठलाही अर्थ लावायचा नसतो, फक्त तो अनुभव मनात साठवायचा असतो, खोल एका कोपऱ्यात.
 रोजच्या जगण्यात अनेक प्रकारची "दाने" आहेत, जसे अन्नदान, वस्तू दान,अवयव दान--- ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक महत्वाचे दान आहे, ते म्हणजे आनंदाचे दान. ज्यात घेणारा आणि देणारा दोघांनाही सारखाच आनंद मिळतो, आणि कुणाचे नुकसान नाही की कुठला बॅलन्स ही कमी होत नाही.
 आनंद हा विचार करून मिळतो का हो? नक्कीच मिळतो.दुःख मागावे लागत नाही, किंबहुना ते आपसूकच वाट्याला येते, नशीबाने, तर कधी स्वतःच्या कर्माने. ; पण आनंदाचं तसं नाहीये. आनंद शोधावा लागतो, विचारांती मिळवावा लागतो. आनंदाचे क्षण वेचावे च लागतात, असे म्हणतात ते अगदी खरंय. त्यातही असा आनंद जर अनपेक्षितपणे  वाट्याला आला, नकळत बसणारा गोड धक्का वाटावा असा , तर मग काय, सोन्याहूनही पिवळे. मला अशाच  हव्या हव्याशा वाटणाऱ्या आनंदाचा अनुभव त्या दिवशी अनपेक्षितपणे घेता आला.  आणि तो मिळवून दिला माझ्या माहेरच्या मंडळींनी.  " माहेर" म्हटलं की  कुठल्याही स्त्री चा 'विक पॉईंट' मग ती कुठल्याही वयोगटातली असो, कुठल्याही आर्थिक, सामाजिक परिस्थितीतील असो.  बहिणाबाईंनी म्हटलेलंच आहे, 
"लागे पायाले चटके,
रस्ता तापीसनी लाल
माझ्या माहेरची वाट
माले वाटे मलमल"
 माहेरच्या माणसांची ओढ, त्यांनी केलेलं आपलं कौतुक, ह्याचं कायमच जिवाला अप्रूप वाटत असतं.    माझ्या लेकीला बाळंतपणासाठी ह्या "कोरोना आणि लॉक डाउन " मुळे आम्ही माहेरी आणू शकलो नाही आणि  आम्ही देखील इच्छा असून तिच्या पाशी जाऊ शकलो नाही, ही गोष्ट माझ्या बऱ्याच मैत्रिणींना माहीत आहे . त्याविषयीची खंत माझ्या बोलण्यातून मधून मधून येते तशी ती माझ्या बहिणींशी बोलतानाही येत होतीच. हीच खंत नेमकी ओळखून माझ्या मोठ्या ताईच्या लहान कन्येने (जी दोन मुलांची आई आहे ) एक सुंदर प्लान केला. तिने  आमच्या लाडक्या लेकीचे  "ऑनलाईन डोहाळजेवण " करावे ही संकल्पना तिच्या समवयस्क बहिणींजवळ मांडली. त्यात तिच्या दोन बहिणी, मधल्या ताईच्या 3 मुली, एक मुलगा, दोन्ही मामा, त्यांचा परिवार, माझी मोठी मुलगी---ह्या सर्वांशी चर्चा करून एक नेटका प्रोग्राम अरेंज केला.  आमचे जावई आणि लेकीची सासू ह्यांना  मात्र पूर्वकल्पना दिली. आम्हाला आणि लेकीला एक दिवस आधी सांगितले, तेही वेळेवर तयार असावं म्हणून.  अन्यथा 'सरप्राईज ' च देणार होती मंडळी.  आठ दिवस आधीपासूनच म्हणे त्यांची चर्चा सुरू होती, झूम app डाउनलोड करून घाय, सगळ्यांना ऑपरेट करता येते ना, नसल्यास ट्रेनिंग देण्यात येईल, संध्याकाळी 7 पर्यंत सगळ्यांनी किचन ची कामे आटोपून रेडी रहावे, कारण जेवण काही ऑनलाईन मिळणार नाहीये---वगैरे वगैरे--- आणि ठरल्या दिवशी, ठरल्या वेळेवर सगळे अगदी हजर होते.  बाल गोपाल मिळून जवळपास 38 जण तरी एकाच वेळी ऑनलाईन होते. त्यात भाचीने परिवारानुसार ग्रुप्स बनवले आणि एकेका ग्रुप ने turn by turn राधाशी, जावयाशी बोलायचे असे ठरले. कुठेही काहीही गोंधळ नाही. दोन जणींनी गाणे म्हटले. एका भाचीने कविता  केली जी दुसऱ्या भाचीच्या लेकीने म्हणजे  दहावीत असणाऱ्या नातीने इतकी सुरेख सादर केली--- कवितेची कल्पना अशी होती की येणारे बाळ सगळ्यांशी बोलते आहे.  त्याच्या आई,बाबांबद्दल, आजी आजोबांबद्दल सांगतेय, ते देखील आपल्या गोतावळ्यात यायला किती उत्सुक आहे वगैरे---- मोठ्या ताईकडे जी काही मिठाई होती,  ती वाटयांमध्ये ठेवून  मिठाई ओळखण्याचा प्रकार देखील ऑनलाईन साजरा केला गेला. एकंदरीत "शॉर्ट फॉर्म" मध्ये ऑनलाईन डोहाळे जेवणाचा आनंद घेता आला. 
ह्या सगळ्या प्रकारावरून एक गोष्ट लक्षात आली की आताची पिढी ही स्मार्ट आणि शार्प तर आहेच; पण त्याचबरोबर ऍडव्हान्स टेकनिक चा योग्य त्या ठिकाणी,योग्य तसा वापर करण्याचे कौशल्यही तिच्याजवळ आहे, जे कौतुकास्पद आहे. लॉक डाउन च्या ह्या कठीण काळात लोकांनी आपापल्या परीने स्वतःला, कुटुंबाला गुंतवून ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, अजूनही करत आहेत.  प्रतिकूल वातावरणातही हवी तशी वातावरण निर्मिती कशी करता येते आणि दूर राहूनही एखादा सोहळा सोबतीने कसा छान साजरा करता येतो हे त्यादिवशी आमच्या भाचे कंपनीने दाखवून दिले. आम्ही तर ह्या एकाच गोष्टीसाठी त्यांचे आयुष्यभर ऋणी रहायला तयार आहोत. माझी लेकही त्या दिवशी मनाने 'फ्रेश' झाली. फक्त माझी तिला 'त्या" रुपात पहायची इच्छा राहून गेली,ही खंत त्या कार्यक्रमाने जरा तरी कमी झाली.  आम्हाला तिचा डोहाळजेवणचा कार्यक्रम दणक्यात करायचा होता; पण असो. माणसाच्या सगळ्याच इच्छा कुठे पूर्ण होत असतात? पण ह्या " ऑनलाईन" कार्यक्रमाने आमच्या पदरात आनंदाचे पुरेपूर दान घातले, एवढे निश्चितपणे म्हणू शकेन. त्यानिमित्ताने एकाच वेळी इतक्या सगळ्यांना पहाता आले, बोलता आले आणि मन भरून आले.
 हे असे आनंदाचे दान प्रत्येकाच्या पदरात पडो.  देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.म्हटलेच आहे ना की आनंद ही एकच गोष्ट अशी आहे ,जी विभागल्याने दुप्पट होते.   
ना देण्यावर निर्बंध
ना घेण्यावर निर्बंध
द्यावा आनंद, घ्यावा आनंद
आनंदाने पुलकित व्हावे
मना मनातील भावबंध
आनंदाचे झरे, आनंदाचेच वारे
आनंदाचा पसरावा,असा सुगंध
जीवन-बाग च व्हावी,
एक आनंद -छंद
एक आनंद छंद😊🙏 


माणिक

Wednesday, June 10, 2020

गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे

आशा भोसलेंच्या आर्त स्वरात आरती प्रभुंच्या ओळी कानावर पडल्या अन आत कुठेतरी हलल्यासारखं झालं. वाटलं, आपण खूप प्रेम करीत असलेल्या व्यक्तीला काहीही कारण नसतांना ते सांगणं जेव्हा राहूनच जातं तेव्हा किती कालवाकालव होत असेल न काळजात! अन गाणं ऐकता ऐकता नकळतच आईची मूर्ती डोळ्यासमोर आली अन डोळे भरून आले.
आईला जाऊन आता पाच वर्षे झालीत. तिची ती नऊवारी नेसलेली, गोरीशी, कपाळावर ठळक कुंकू लावलेली, नाजूक बांध्याची आणि शांत चेहऱ्याची मूर्ती डोळ्यासमोर येते. अचानकच ध्यानी मनी नसतांना ती गेली. आदल्या दिवशी मी तिला दारातच उभ्याउभ्या भेटली होती, नेहमीप्रमाणेच घाईघाईत होती मी. "आत येते का ग ?" तिनेही सवयीने विचारले. "अग, उशीर झालाय ग ! छोटू आला असेल घरी, येते मी!" म्हणत म्हणत मी गाडीवर बसलीसुद्धा. तेव्हा मी माझ्या भावाकडे त्याच्या इन्स्टिटयूट मधे काम करायची. माझ्याकडे ऑफिस वर्क, फी डिपार्टमेंट होतं त्यामुळे रोज घरी निघतांना सगळा  हिशोब घेऊन भावाकडे जायची. तो वर राहायचा अन आईबाबा खाली. मी वरुन खाली यायची वाट बघत ती बरेचदा उभी असायची दारात. कधी आग्रहाने घरात बोलवायची अन आज काय संक्रांत आहे, आज काय नवरात्रातला मंगळवार आहे, आज काय  श्रावणातला शुक्रवार, आज नागपंचमी आहे, तर कधी आज सहजच म्हणून मंगळवारची सवाष्णीची ओटी भरायचीय  म्हणून  बसवायची पाटावर. हळदकुंकू लावून, एखादं ब्लॉउज पीस देऊन ओटी भरायची. "अग आई, मी नाही शिवत ग मॅचिंग असल्याशिवाय ब्लॉउज! तू कशाला कुठून कुठून काढून देतेस ब्लॉउज पीसेस!" त्यावर तिचं ठरलेलं उत्तर "असू दे ग, माहेरवाशिणीचा हक्क असतो तो!" आज ते आठवलं की डोळे नुसते भरून येतात तिच्या आठवणीने!  रोज येता येता तिला अशीच उभ्या उभ्या भेटायची मी. तिला वाटायचं मधुमतीला चहा तरी करून द्यावा, काहीतरी हातावर टाकावं तिच्या, क्वचित इतकंस काहीतरी छोटूसाठी द्यावं. बस्स इतकंच! पण मी कायम घाईत. "नको ग, मला काही चहाचं कौतुक नाहीय! तुला तर माहितीच आहे. अन आत्ता खरंच नको ग काही. चल येते !" म्हणत मी निघायचीही. त्याही दिवशी अशीच घाईघाईत घरी आले अन दुसऱ्या दिवशी सकाळीच  8 वाजता भावाचा फोन. "आईला आयकॉन ला अँडमीट केलंय. सकाळी बाथरूमला गेली तर तिथेच पडली. बहुदा बीपी एकदम वाढल्याने झालं असावं असं डॉक्टर म्हणताहेत." मला एकदम काहीच सुचेनासं झालं. लगेच कपडे बदलून हॉस्पिटल ला पोहचली तर तिथे कळलं तिला ICU त ठेवलंय. "अरे, काल संध्याकाळी तर एकदम ठीक होती रे, अचानकच काय झालं?" हे मी भावाशी बोलतेय तेवढ्यात डॉ. लोटे ICU तुन बाहेर येतांना दिसले. आमच्याजवळ येताच म्हणाले. "शक्यता फारच कमी आहे. कुणाला बोलावयाचे असेल तर बोलावून घ्या!" ते ऐकल्यावर बाकी पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला अन डोळे अविरत पाझरायला लागले.  
काल दोन मिनिटं तिच्याशी बोलले असते तर असा कोणता उशीर होणार होता मला? मनात आलं आपण किती गृहीत धरत होतो तिला. खूप अपराधी वाटत होतं. सारखी दरवाज्यात उभी असलेली तिची मूर्ती डोळ्यासमोर येत होती. बस्स ती माझी तिची शेवटची भेट. नंतर सात आठ दिवसात डिस्चार्च मिळाला दवाखान्यातून. पण ना तिला हालचाल करता येत होती, ना बोलता येत होतं, ना काही खाता पिता येत होतं! बघायची पण त्या नजरेत ओळख नव्हती! असून नसल्यासारखच उरली होती! आणि महिन्याभरातच ती गेली सुद्धा. तिच्या आठवणी तर अगणित आहेत. तिचं आमच्यासाठी जीव पाखडणं, तिने आमच्यावर केलेले संस्कार, तिचं मायेने खाऊ घालणं वगैरे वगैरे असंख्य आठवणी. पण हे गाणं ऐकता ऐकता आतमध्ये जी तार छेडल्या गेली अन त्याअनुषंगाने माझ्या मनातली जी खंत जागी झाली तेवढं फक्त या लेखात सांगते. 

आम्ही तेव्हा अंजनगाव ला राहायचो. मला आठवतं, तिचं वाचन अफाट होतं. ज्ञानेश्वरीचा  केवढातरी अभ्यास तिने केला होता. मुख्य म्हणजे एकपाठी म्हणतात ना तशी होती ती. प्रचंड पाठांतर होतं तिचं. ज्ञानेश्वरीतल्या कितीतरी ओव्या, केवढेतरी संस्कृत श्लोक, स्तोत्रं, कितीतरी कविता मुखोद्गत होत्या तिच्या. ती स्वतःही खूप सुंदर कविता करायची. मंगलाष्टकं तर तिने कैक केले असतील! कुणाही परिचिताचे लग्न असेल अंजनगावात तर मंगलाष्टकं तिचेच असायचे. आणि इतक्या पटकन करून द्यायची की बस्स! तेव्हा आमच्याकडे तरुण भारत यायचा. त्यात तर वाचकांचे मनोगत मध्ये तिची प्रतिक्रिया हमखास असायचीच. कुठल्याही छोट्या मोठ्या घडामोडीवर एखाद्या पोस्टकार्ड किंवा अंतर्देशीय पत्रावर पटकन काहीतरी खरडायची अन द्यायची पाठवून! रफ वगैरे काही नाही. सगळं एकदम फेअरच! मुख्य म्हणजे ते छापूनही यायचं! तेव्हाचे तरुण भारतचे संपादक मा. गो. वैद्य यांनी एकदा अग्रलेखात तिचा उल्लेख केला होता की अंजनगाव सारख्या छोट्याश्या गावातली ही स्त्री कुठल्याही घडामोडींवर इतक्या मार्मिक प्रतिक्रिया देते तर हिला पत्रकार का म्हणू नाही ? खरं म्हणजे केवढा हा गौरव ! पण आम्ही कधीही तिचं कौतुक केलेलं मला आठवत नाही. बाबांचा सुद्धा स्वभाव असा की कधी तोंडावर कौतुक केलेलं अजिबात आवडायचं नाही त्यांना. आता जेव्हा मी किरकोळ एवढसं काहीतरी लिहिते, सोशल मिडिया वर पोस्ट करते आणि चार लोकांचे “लाइक्स” आले की लगेच हुरळून जाते तेव्हा खूपदा मनात येतं की आई एवढं सुंदर, अभ्यासपूर्ण लिहायची पण आपण तिच्या लिखणाला काय किंवा कुठल्याच गोष्टीला दाद अशी दिलीच नाही कधी. मात्र आम्ही कधी महत्व दिलं नसलं तरी अंजनगावात बाकी तिला खूप मानायचे सगळे. कुणालाही कुठे काही बोलायचं असेल, काही कविता, निबंध वगैरे लिहून हवा असेल तर तिच्याकडे यायचे लोक. तीही अगदी
आनंदाने पटकन मदत करायची त्यांना. आमच्या घराशेजारी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.मधुकर वाकोडे राहायचे. ते तेथे सारडा कॉलेज ला मराठीचे प्राध्यापक होते. त्यांच्याकडून तिला कॉलेज मधली खूप चांगली चांगली पुस्तके वाचायला मिळालीत. कुठलेही नवीन पुस्तक आले ते आवर्जून आईला वाचायला आणून द्यायचे. खूपदा त्यातल्या बऱ्याच पुस्तकांवर ती सुंदर समीक्षापर लेखही लिहायची. तिच्या कितीतरी समीक्षा त्यावेळच्या सुप्रसिद्ध मासिकात, सत्यकथेत छापूनही यायच्या. म्हणजे नक्कीच त्या तोडीचं तिचं लिखाण असायचं पण आम्ही कधी तिचं तोंडभरून कौतुक केलं नाही का कधी मनमोकळी दाद दिली नाही! का कुणास ठाऊक पण मनातून जरी वाटले तरी आमचा अविर्भाव कायम “त्यात काय एवढं ?” असाच राहायचा. कधी कधी वाटतं तिचं कमालीचं साधं राहणं अन  साधं वागणं-बोलणं त्यामुळे कदाचित आम्ही तिला कायम “अंडरएस्टीमेट” करत गेलो. कायम गृहीत धरत गेलो तिला. कदाचित “आई” हे नातंच मुळी असचं असतं! तिनेही कधी बोलून दाखवलं नाही पण तिलाही आमच्याकडून कणभर तरी कौतुकाची आस असेलच न कुठेतरी? पण तिने अगदी सहजतेने ती अपेक्षा सोडून दिली होती कदाचित. आता ते आठवलं की खूप वाईट वाटतं. तसं पाहिलं तर खुप समाधानी वृत्तीची होती ती. शेवटी शेवटी खूपदा म्हणायची “देवानी अगदी सगळं भरपूर दिलं आयुष्यात, आता फक्त भरल्या कपाळाने न्यावं मला!” आणि तसेच झाले. जरी अचानक गेली तरी मुलं, सुना, नातवंड सगळ्यांच सुख उपभोगून तृप्त मनाने गेली ती! 16 जून हा तिचा जन्मदिवस! त्यानिमित्याने तिला साश्रुनयनांनी आदरांजली अन तिच्या हयातीत तिला द्यायचा राहून गेलेला एक खुप मोठ्ठा "लाइक"!

सौ. मधुमती वऱ्हाडपांडे 

अकोला