Thursday, May 14, 2020

रामायण... रामायण

कपिल शर्मा च्या शो मध्ये रामानंद सागर यांचे पुत्र आणि सीता, राम, लक्ष्मण यांच्या भूमिका सादर केलेले कलाकार अरुण गोविल,, सुनील लहरी, दीपिका आले होते. त्यांचे त्यावेळेसचे अनुभव ऐकून मनापासून रामायण बघण्याची इच्छा झाली.  पण नंतर विसरले ते. शो पाहताना असं माहीत पण नव्हते की असा न भूतो ना भविष्यति  lock down आपल्या जीवनात येईल. लोकांना घरात तर बसवलं पण त्या बरोबर त्यांच्या मनोरंजनासाठी जुन्या मालिका  प्रसारित करण्याची कल्पना प्रशंसनीय आहे.      

जेव्हा त्या मालिका प्रसारित झाल्या तो 90 च्या दशकाचा काळ पुन्हा आठवला. रस्ते, बाजारपेठ अगदी लॉकडाऊन झाल्यासारखे तेवढा एक तास ओस पडायचे. लोकं मोठ्या भक्तिभावाने रामायण बघत असत. मंत्रमुग्ध करण्याची क्षमता या महाकाव्यात आहे असं मला वाटतं. हल्ली ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट तर इतिहासाचा विपर्यास करतात पण रामानंद सागर यांनी दाखवलेले हे रामायण बरचं सुसंगत आणि बरचसं पटणार वाटतं. त्यांची टिम चांगली अभ्यास करून नेमकी कथा सादर करीत होती. लोकांना काही तरी चांगले देण्याचा त्यांचा प्रयत्न प्रामाणिक वाटला. वाल्मिकी, तुलसीदास, बंगाली आणि तमिळ भाषेत लिहिलेले रामायण इतके संदर्भ घेऊन त्यांनी रामायण बनवले हे त्यांनीच मालिकेच्या सुरुवातीला येऊन सांगितले. खरंतर इतक्या विविध भाषेत रामायण लिहिले गेले तर त्याचा मूळ गाभा, मूळ स्वरूपात व्यक्तिप्रमाणे बदल होत गेले असतीलही. तंत्रज्ञान आजच्या सारखं नसूनही बर्‍याच प्रमाणात परीणाम आणण्याचा प्रयत्न केला आहे. अध्यात्मिक तत्वज्ञानाची शिकवण संवादातून दिली गेली आहे. अगदी कुंभकर्णाची राक्षसी, झोपाळू प्रतिमा देखील तशी नव्हती. तो चांगला ज्ञानी, तप करणारा, कर्तव्य /जबाबदारी जाणणारा होता. हे लक्षात येते. असे अजून काही प्रसंग आहे ज्यांचे खरे स्वरूप लक्षात येते. जसे सीतेचे अग्निदिव्य, गर्भवती असूनही सीतेचा वनवास. 
राक्षस लढाई, रावण युद्ध बघताना एखादी कार्टून फिल्म बघितल्या सारखी वाटते खरी पण सर्वसामान्य प्रेक्षक ते बुध्दीजीवी प्रेक्षक असा मोठा आवाका लक्षात घ्यावा लागतो. (mass to class) सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावलं पाहिजे, त्यात नुकतच दूरदर्शन भारतात सुरू झालेले असल्याने सर्व थरातील प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून मालिका बनवण्याचं अवघड काम रामानंद सागर यांनी केले.

छोट्या छोट्या भूमिकांपासून मुख्य भूमिकांपर्यंत कलाकार निवडही चांगली केली. त्यांचे संवाद, अभिनय यावर बरीच मेहनत घेतली आहे हे जाणवतं. वैयक्तिक जीवनात किंवा पडद्यामागे ते कलाकार कसे आहेत माहीत नाही. रामासारखे आदर्शवत नसतीलही कदाचित ते शक्यही नाही आजच्या कलियुगात. पण तरी सुद्धा राम कसा असेल तर तो हा असा असेल हे चित्र डोळ्यासमोर उभे करायला तो कलाकार यशस्वी झाला आहे. ती एक हलकीशी स्मितरेषा डोळ्यातून, ओठातून आणि पूर्ण देहबोलीतून अलगदपणे व्यक्त करण्यात कलाकार यशस्वी झाला आहे. असे प्रत्येक पात्र यशस्वी झाले आहे.वाल्मिकी ऋषि अगदी बरोबर घेतले आहे. धीरगंभीर, तपस्वी, तेजस्वी! सगळ्यात जास्त टिआरपी लाभलेली रामायण मालिका पुन्हा स्टार प्लस वर पुर्नप्रसारीत होते त्यातच त्या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. आजच्या लॉकडाऊनच्या अस्थिर, निराशाजनक वातावरणात रामायण शाश्वत सत्य वाटू लागले. 
दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा! 
जय श्री राम 🙏

हॉस्टेल के दिन भी क्या दिन थे...(भाग 3)

हॉस्टेल मध्ये भारताच्या विविध भागांतील मुली राहात .त्यातल्या त्यात उत्तर-पूर्वेकडच्या मुली,विशेषतःमेघालय,मिझोराम,मणिपूर,आसाम,बंगाल च्या मुली जास्त होत्या.नाही म्हणायला अकोल्याची एकमेव  मुस्लिम मुलगी agriculture ला होती ,जीच्याबद्दल फारसं कुणाचं मत चांगलं नव्हतं. पण ती माझी प्रेमळ दीदी होती . 
       आता हॉस्टेल आणि कॉलेज ची चांगलीच ओळख होऊ लागली.मला खूप धक्का बसला जेव्हा मी ऐकलं की कॉलेजमध्ये आमच्या department ला B.Sc. , M.Sc(Home-Sc.) केलेला एक मुलगा lab-assistant होता. त्याचं चालणं(अगदी catwalk) ,बोलणं (ओठाचा चंबू करून)आणि वागणं(चुगल्या करणं) मुलींनाही लाजवेल एवढं बायकी होतं. त्याला मुलं आणि मुली सुद्धा ट्रोल करायच्या . पण तो home-science शी एकनिष्ठ होता. 
      आमच्या खोलीच्या बाजूनेच कॉलेजमध्ये जाणारा रस्ता होता आणि माधुरी ला 'तो' खालून जाताना दिसला की ही खिडकीत थोडी लपून उभी राहायची अन 'लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याच...' हे गाणं रोज म्हणायची. जेव्हापासून त्याला कळलं की मी त्याच खोलीत राहते तेव्हापासून जणू मीच गाणं म्हणते असा तो माझ्यावर खार खायचा. एकदा त्याने वॉर्डन ला complaint पण केली. पण त्याचा परिणाम उलटा झाला ,आता माधुरी वेगवेगळे मराठी हिंदी गाणे अजून जोरात म्हणू लागली.तिचा आवाज खरंच छान होता,पण त्याचे किस्सेच जास्त गाजायचे.
                 एकदा संध्याकाळी माधुरी प्रचंड ठसका लागल्यासारखी खोकलत खोलीत आली ,डोळ्यातून पाणी वाहात होतं ! त्याही परिस्थितीत .....
कल्पना-  काय झालं ? 
माधुरी ठस्कतच- उशीर झाला होता म्हणून लुना जोरात चालवली .
कल्पना ओरडून - त्याने ठसका किंवा खोकला कसा येईल?
(मी माधुरीच्या पाठीवर हात फिरवून, पाणी देऊन ठसका घालवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते पण ती नको म्हणत होती.)
माधुरी- अग मी लुनाचा वेग वाढवला तसा जोरात गाण्याचा आलाप घेतला आणि एक मोठा कीडा डायरेक्ट माझ्या घशात गेला.
कल्पना रागात - तू वेडी आहेस का ? नाही तू म्याडच आहे. रस्त्याने गाणं म्हणायची काय गरज होती?इत्यादी,इत्यादी.....
इकडे मला हसावं की रडावं कळेना.
                 अतिशय हुशार आणि कलाकार (कवियत्री,लेखिका,गायिका,नटी,उत्तम चित्रकार,fabric painting तर ती आधी design trace न करता direct ब्रश ने काढायची,उत्तम मूर्तिकार,सुंदर अक्षर)असलेली मधुरी स्वाभाविकच थोडीशी खट्याळ आणि मूडी होती. तिचे आणि माझे बाबा साधारण एकाच वर्षी गेल्याने आमचं दुःख आम्ही वाटून घेत असू. कल्पना उंच आणि लांब केसांची, शांत,सोज्वळ आणि समंजस ! ती  माधुरीला एकाच वेळी म्याड आणि  वेडी म्हणायची. 

         हॉस्टेल मध्ये आल्यानंतर एका संध्याकाळी पहिल्या पावसाला सुरुवात झाली. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तश्या सर्व मुली होस्टेलच्या मधल्या चौकात येऊन पावसात नाचायला लागल्या.काही शॉर्टस घातलेल्या तर काही स्पगेट्टी घालून तर काही केप्री, छोटे छोटे फ्रॉक घातलेल्या मुली आपल्याच नादात आनंदाने नाचत होत्या . आणि माझं सगळं लक्ष चौकीदार मामांकडे जात होतं कारण ते निर्विकार नजरेने हॉस्टेल चे दिवे लावत होते . तेव्हा मी आश्चर्यानं कल्पनाला म्हंटलं काय या मुली मामांच्या समोर असे छोटे छोटे कपडे घालतात ? 
त्यावर ती थंड पणे म्हणाली एवढ्या वर्षात मामांची नजर मेली अग ! बघ त्यांचं लक्ष पण नाहीये समोर काय चालू आहे त्याकडे. 
         पावसाळ्यात तिथली लाईन खूपदा जायची. मग आम्ही सगळ्या मुली खोली बाहेरच्या पॅरापेट वॉल वर बसून अंताक्षरी खेळायचो. एक दोघी बोटांनी सावली नाचवून खूप छान मनोरंजन करायच्या. काहीच नाही तर भुताच्या गोष्टी रंगायच्या.त्यात भर पडायची ती एका मुलीनी हॉस्टेल मध्ये कशी आत्महत्या केली आणि तिची आत्मा इथेच कशी भटकते हे माझ्यासारख्या नवीन मुलींना रंगवून सांगितले जायचे. असंच एकदा लाईन गेलेली असतांना सगळ्या बेसावध होत्या आणि अचानक माधुरीने पांढरी ओढणी डोक्यावर घेऊन हातात मेणबत्ती घेऊन कही दीप जले कही दिल...हे गाणं म्हणून सगळ्यांना घाबरवून सोडलं होत. 
          दरम्यान माधुरी इंटर्नशिप साठी पुण्याला गेली .

आणि कल्पना(M.V.Sc.) आणि मी (M.Sc.) करत असलो तरी  दोघींचेही थेसिस चे गाईड नागार्जुन सर असल्याने आमचं छान चाललं होतं.माझ्या मुख्य गाईड स्वाती मॅडम च होत्या ज्या हॉस्टेल च्या वॉर्डन पण होत्या,तरी त्यांचं workload कमी व्हावं म्हणून मला थेसिस साठी animal experiment दिला होता. म्हणून नागार्जुन सर veterinari प्रोफेसर असले तरी माझे को-गाईड होते. मी मधुमेहींसाठी 2 फॉर्म्युला बनवले होते . ज्याचं परीक्षण मी पांढऱ्या उंदरांवर केलं. त्यासाठी मी स्वतः हैद्राबाद च्या NIN(National Institute of Nutrition)मधून 120 उंदीर पिंजऱ्यात घालून आणले होते.त्यावेळी मी परभणीहून हैद्राबाद ला गेले. तिथे मॅडम सोबत नसतांना त्यांच्या माहेरी 2 दिवस मुक्काम केला.त्यांच्या घरापासून NIN साठी 2 बसेस बदलून जाव लागत असे .तेलगू भाषा समजत नव्हती .पण इंग्लिश मधून संवाद साधल्या जात होता. मॅडम चे वडील खूप प्रेमळ होते.त्यांनी दोन्ही दिवस त्यांच्या सोबत राहणाऱ्या भाची ला सांगून मला डबा सुद्धा दिला होता. अजूनही आश्चर्य वाटतं की तश्या स्वाती मॅडम being warden आणि guide, खडूस म्हणूनच प्रसिद्ध होत्या. त्यांनी मला त्यांच्या माहेरी मुक्काम करण्याची परवानगी कशी दिली ? त्याहून आश्चर्य हे होतं की माझ्या आईने मला एकटीला हे उद्योग करण्याची परवानगी कशी दिली?उद्योग  यासाठी की livestockची ट्रेन ने transport करायची असल्यास खूप परवानग्या ,अर्ज करावे लागतात. आणि त्यासाठी तेव्हा मला दस्तुरखुद्द सर M.S. Swaminathan (जे तेव्हा NIN head होते)यांनीही मदत केली होती. असो मी खूपच भरकटले बहुदा...पण माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे खरंच आयुष्याची शिदोरी होती. 

         मी आणलेल्या त्या उंदरांना veterinary कॉलेजमध्ये कल्पनाच्या department मध्ये ठेवलं होतं . आणि माझा फॉर्म्युला home science कॉलेज मध्ये तयार करावा लागत असे. त्यामुळे माझ्या दोन्ही कॉलेज मध्ये सतत चकरा चालू असायच्या. त्याकाळी फोन फारसा नसल्यामुळे स्वाती मॅडम सरांसाठी निरोप द्यायच्या "मींनाल तुम उधर जा के सर को बोलो अभी बहुत देर हुई खाना खाने घर जावो करके" असा बहुतेक रोजच माझा कबुतर व्हायचा. पण एवढं सोडल्यास मला माझा प्रयोग खूप आवडायचा. फक्त उंदीर sacrifice करतांना खूप वाईट वाटायचं . प्रत्येकवेळी मी बाप्पाची माफी मागायचे.
   माझा प्रयोग संपला आणि कल्पना इंटर्नशिप साठी पुण्याला गेली आणि माधुरी परत आली. ती परत आल्यावर तिला काही कॉलेज च्या formalities वगळता फारसं काम नसे. तेव्हा तिच्या प्रतिभेला एवढा बहर चढला होता की तिला मी कधीच रिकामी बसलेलं बघितलं नाही. फक्त काहीवेळा मला तिची मॉडेल बनावं लागत असे.बरेचदा तर मी अभ्यास करायला बसलेली असतांना माझ्या नकळत ती sketches काढायची. मुलतानी मातीचं मूर्तिकाम करायला मात्र मला तिनी सांगितलेली pose घेऊन तासंतास बसावं लागायचं.आमची पाणी गरम करायला वापरत असलेली अल्युमिनियम ची काळी पडलेली कळशी कधी डोक्यावर तर कधी कमरेवर घेऊन रग लागेतो उभं करायची. त्या भानगडीत माझा एक पांढरा कुर्ता काळा झाला होता. 

           दरम्यान माझं लग्न ठरलं. तिसरे सेमिस्टर संपल्यावर साखरपुडा झाला आणि thesis submit झाल्यावरच लग्न करायचं ठरलं. इतर मुली premises च्या बाहेर त्यांच्या मित्रांना भेटायला बाहेर तासंतास  उभ्या राहायच्या.  पण सुधीर नी काय जादू केली होती माहीत नाही पण मी जे काही 2 वेळा त्याला भेटले तेव्हा चक्क मॅडम च्या घरी बसून भेटले.मला चौकीदार मामा  खालूनच निरोप द्यायचे जावई भेटायला आले म्हणून मॅडम नी बोलावलं असं सांगायचे. सगळ्या मुलींना खूप आश्चर्य वाटायचं. आम्हाला चहा ,सरबत पण मिळायचं. लग्न ठरल्यानंतर मॅडम कडे काही खास पदार्थ केला की मला बोलावून दिला जायचा. ही विशेष सवलत मिळणारी त्या हॉस्टेल मधली मी एकमेव मुलगी होते. 
        हॉस्टेल मध्ये माझ्या शेजारच्या खोलीतील तृप्ती, माधुरी, दीप्ती या junior मुलीपण खूप धमाल करायच्या. शिल्पा लोकल मुलगी होती, ती तृप्तीच्या खोलीत हॉस्टेल मध्ये दिवसभर कॉलेज चे submissions तयार करण्यासाठी थांबायची. फाटक बंद होताना घरी जायची. पण एकदा त्या तिघींना एक प्रोजेक्ट रात्रभर जागून करायचा होता . पण शिल्पाला नियमानुसार रात्री हॉस्टेल मध्ये थांबता येणार नव्हते. तरी ती गुपचूप खोलीतून बाहेर न निघता थांबली. संध्याकाळी 7 वाजता recreation hall मध्ये रोज प्रार्थना असायची . तेव्हा वॉर्डन हजेरी घायच्या. त्यानंतर हॉस्टेल ला कुलूप लावले की कोणी आत येऊन बघत नसे. त्या दिवशी पण हजेरी झाली आम्ही आपापल्या खोलीत गेलो. पण कोणीतरी मॅडम ला चुगली केली की तृप्तीच्या खोलीत शिल्पा आहे . मग काय लगेच आपा ,मामा आणि मॅडम वर आल्या आणि तृप्तीच्या खोलीची झडती घेतली . पण कोणीच नाही सापडलं म्हणून सगळे आले तसे चालले गेले. पण ते गेल्यावर मी घाबरतच गेले विचारायला की शिल्पा गेली कुठे? बघते तर काय ....घामाघूम झालेली शिल्पा तृप्तीच्या कपाटातून उडी मारत होती. आणि बाकीच्या कसं गंडवल म्हणून हसत होत्या.
               अश्या एक ना अनेक सुंदर आठवणी आणि अतिशय समृद्ध अनुभव घेऊन दोन वर्षांनी हॉस्टेल मधून घरी आले आणि महिनाभरात चतुर्भुज झाले.
                                                
                                                      मीनल

lockdown साइडइफेक्ट्स!


अगं आई....!.काय गं.... मी नाही गं.....  अगं वेळ आली की मी करीन गं सगळं........            आत्ता नको बा!......
मला स्वयंपाक -बिम्पाक नको सांगू बरं !....फार बोर काम आहे ते......वाटल्यास तुला बाहेरुन काही आणायचं असेल तर सांग आत्ता पटकन सायकलवर टांग मारुन आणून देते....हे आणि असे संवाद अगदी लग्नापर्यंत चालू असायचे माझे आईसोबत. तासनतास  स्वयंपाकघरात बायका कशा काय रमतात बुआ ह्याच आश्चर्यच वाटायचं मला.
       तसं बघायला गेलं तर सणावारी पाहुणेराहुणे असताना वरची मदत भरपूर करायचे पण स्वयंपाकाशी मला कधीच जवळीक कराविशी वाटली नाही .त्याला कारणही तशीच होती म्हणा....सकाळचा स्वयंपाक कायम सोवळ्यात करणारी माझी आई आम्हाला तिथे फारसं लुडबूडू देत नसे आणि संध्याकाळी तर फोडणीचं वरण,पिठल टाईप  स्वयंपाक असायचा त्यामुळे मी त्याकडे लक्षदेत नसे. पण कॉलेजमध्ये होमसायन्स विषयच असल्याने तीथे शिकवले जाणारे पदार्थ आवडीने शिकणे नि ते घरी करुन पहाणे हे मात्र आवर्जून करु लागले.आजही मला आश्चर्य वाटतं आणि गंमतही वाटते की,घरी अजिबात स्वयंपाक नं करणरी ,मला फायनल प्रॅक्टीकलला पुरणाची पोळी आली ,पहिल्यांदा जरा घाबरले पण त्यावेळी माझी पोळी अव्वल झाली होती हे मला एक्स्टर्नल सोबतच आलेल्या  इंग्रजीच्या साठ्ये मॅडमनी हळूच सांगितले  आणि खरच मी प्रॅक्टीकलमध्ये हायेस्ट होते.....पण हे तेवढ्यापुरतच म्हणजे मार्क्स मिळवण्यापुरतच नंतर तुझामाझा काय संबंध नाय !.....अशा टाइप परत सुरु.  
          त्यातलच दुसरं कारणही होतं अगं मुलींच्या जातीला आयुष्यभर मग करणच आहे.आता राहू दे असं म्हणून कुणिही म्हणजे आई,आजी,आत्त्या,मावशी फारसं स्वयंपाकात मदत कर अशी अपेक्षाच ठेवत नसे .मलातर हेच हवं असायच जमेल तितकी सुटका मी त्यातून करुन घेत असे .सांगायचा मुद्दा  हा की आधीच उल्हास नसायचा आणि कुणी राहू दे म्हणायलाच उशीर की ,मग तर पथ्यावरच पडायचं .
      लग्नानंतरही फारशी परिस्थिती वेगळी नव्हतीच. ढुळूक फोडणीच वरण, बिना वाटणाच्या पातळढुळूक ताटभर संचार करणार्या भाज्या. म्हणजे पोटापुरत करणे व खाणे इतपतच स्वयंपाक येत होता नशीब नोकरीमुळे आम्ही दोघेच राहत होतो नाहीतर काही खरं नव्हतं . नवरा बिचारा !आपल्याला रोज जेवायला मिळतं यातच समाधान मानायचा. याला आपण सुगरण तर नक्कीच म्हणणार नाही पण माझ्या दोन्ही आज्या,आई,आत्त्या ह्या खरोखर सुगरणच! ..ती  त्यांची चव आठवायची आणि व्याकुळ व्हायची, पण इकडे सगळाच रड!...चांगल खायच असेल तर पहिले स्वतःला येईल तेव्हाच पोटात जाईल  हे लक्षात आल्यावर माझी मीच स्वतःला स्वयंपाकात रेटायला लागले .आणि हळू हळू हाताला चव येऊ लागली आता तुम्हाला वाटेल हे एवढे नमनाला घडाभर तेल कशाला!...............

तर सध्या lockdownच्या पिरेडमध्ये पुन्हा नव्याने नवीन नवीन डिशेस बनवण्याची ऊर्मी उफाळून येऊ लागली.मधल्या काळात रोजच्या धबडग्यात मनात असुनही जे करता येत नव्हते असे पदार्थ करुन बघु या असे मनात ठरवले.त्यात मार्गदर्शक ठरलेले युट्युब चॅनेल ,आणि सर्वात महत्त्वाचे होते ते मैत्रिणींचे चालते बोलते चॅनल!.....एकमेकींना अतिशय सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे ते ते पदार्थ आवडीने करावेसे वाटले.खरं सांगायच तर lockdownचा काळ हा नवं काहीतरी शिकण्याचा सुवर्णकाळ मानुन पदरात जितकं पाडुन घेता येईल तितकं घेण्याचा प्रयत्न अर्थात माझ्या कुवतीप्रमाणे .ऊन्हाळी वाळवणाचे पदार्थ आणि सोबतच केक,रसगुल्ला,जिलेबी,सुरळीची वडी, हाताच्या चकल्या असे खासमखास ठेवणीतले पदार्थ ज्यासाठी आपण नेहमीच हलवायाची वाट धरतो असे पदार्थ घरी करणे शक्य झाले म्हंटल्यावर मुठभर मांस चढणारच ना मैत्रिणींनो!......... असे पदार्थ गृपवर टाकले की काही सख्या रेसिपी विचारुन करुन बघायच्या व त्यात सक्सेसही व्हायच्या तेव्हा आणखी छान वाटायचं!. ह्या आनंदाची देवाणघेवाण करण्यातही एक वेगळाच आनंद होता .मनाला प्रसन्न ठेवणे हे आताच्या कठीण प्रसंगात एकप्रकारचं चॅलेंजच आहे तर त्यातच आपण दररोजच्या तोचतोचपणाला ब्रेक करुन वेगळेपण आणलं तर नक्कीच घरचे दारचे सगळेच खुश राहतील यात तीळभरही शंका नाही.

यात वेगवेगळेपणाच्या बाबतीत खरी साथ दिली ती टरबुजाने !...त्याचे पाठ-पोट सगळ्याचाच उपयोग करुनते फस्त केले आणि शेवटपर्यंत त्याची पाठ सोडली नाही. चेरी,वाळवणाचे  पापड,सांडगे,थालीपिठ,धिरडे,असे सगळे प्रकार केले,अप्रतिम चवीचे झाले आणि मुख्य म्हणजे पौष्टिक म्हणूनही उत्तम होते. टरबुजाच्या पाठिशी मी इतकी प्रामाणिक आहे हे पाहून तर अहोंनी एक दिवस गंमतच केली. त्यादिवशी आम्ही खरबुज चिरले दुपारी आणि खाण आटोपल्यावर लेक ती सालं बाहेर टाकायला उचलत असतानाच अहो म्हणाले अरे टाकू नको ती सालं आईला काहोतरी बानवायच असेल त्याच!.........खरं सांगते मैत्रिणींनो आश्चर्यमिश्रीत भावाने मी हसत होते आणि सगळ्या सालांना आता माझाच एकमेव आधार आहे असं मनात आलं की काय ह्यांच्या!......किंवा तूच त्यांना मानाच स्थान देवू शकते बघ गं जरा त्यांच्याकडे! असेच सगळे भाव मनात पटापटा येऊन गेले.गोष्ट तशी गमतिची पण माझी आई नेहमीच म्हणते "  एक गहू तीचे प्रकार बहू"  कशातनं काहीनाकाहीतरी नक्कीच बनू शकतं,मग वाया कशाला घालवा..
आनंद द्या आनंद घ्या!!!:!_!

@अर्चना मुळ्ये.

माझे शाळा प्रवास

समाजात मिसळण्याची प्रत्येकाची पहिली पायरी ही शाळा असते किंबहुना असावी . आपल्या सरकारनेही आता अन्न , वस्त्र , निवारा ह्या मुलभूत हक्कांमध्ये ' शिक्षण ' समाविष्ट केले आहे आणि वयाच्या 15 वर्षापर्यंत शिक्षण अनिवार्य सुद्धा केले आहे . शाळा माणसाला सुशिक्षित तर बनवतेच पण प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी शाळा फार मोलाचे कार्य करते हे नक्की . 

             माझ्या वडिलांची नोकरी बदलीची असल्याने सतत 2,3 वर्षांनी नवा गाव , नवी शाळा , नवे वातावरण आणि नव्या मैत्रिणी मला लाभल्या. आपल्या जगण्यावर , विचारांवर ज्यांचा  कायमचा प्रभाव राहतो असे शिक्षकही लाभले . माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अकोल्यात  झाले त्यातही तीन शाळा बदलल्या. प्राथमिक शिक्षण हे घराजवळ असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले .  जवाहर नगर चौकात आजही ही माझी शाळा दिमाखात उभी आहे , बागबगीच्यानी रंगरंगोटीनी नटली आहे हे बघून खूप छान वाटतं , आतली खरी परिस्थिती काय आहे ते माहित नाही . घराजवळाची ही जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे ' वास्तू ' म्हणून सगळा आनंदच होता , वर्गखोल्यांना , खिडक्यांना दारे नाहीत , बरं दारे नाहीत तर लोखंडी गज आहेत का ?  तर तेही नाही , भिंतींना मोठमोठी भगदाडे पडलेली की आम्ही सहज ह्या वर्गातून त्या वर्गात जात असू . पावसाळ्यात तर शाळेच्या व्हरांड्यात गायीम्हशी आश्रयाला येत आणि सगळी शाळा शेणामुताच्या वासाने भरून जाई . ह्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणजे अगदी बटुमूर्ती होत्या शिक्षिका म्हणजे ' बाई ' आणि मुख्याध्यापिका म्हणजे ' मोठ्या बाई ' असा साधा सरळ मामला होता . छोट्याशा दिसणाऱ्या ह्या मोठ्या बाईंचा धाक मात्र इतका जबरदस्त होता की शाळेच्या वेळेआधी खेळत असलेल्या आम्ही मैत्रिणी त्या येतांना दिसल्या की कुठेतरी गडप होत असू . अशा ह्या शाळेने शिक्षणाचे संस्कार मात्र उत्तम केले हे आवर्जून सांगावे लागेल . इतिहास किती रंजक पद्धतीने शिकवता येतो हे मी तिथेच अनुभवले . 

माध्यमिक शिक्षणासाठी त्याकाळी अकोल्यात प्रसिद्ध असलेल्या ' न्यू इरा'  शाळेत मी प्रवेश घेतला , ह्या शाळेची आजची दयनीय अवस्था बघून फार वाईट वाटते . अकोलेकरांच्या कित्तीतरी पिढ्या ज्या शाळेत घडल्या तिथली भयाण शांतता आज अंगावर येते .  तिथे आम्हाला पेशकार म्हणून सर होते , इतका दयाळू शिक्षक मी पहिल्यांदाच पहिला. आम्हा मुलींना कधी अभ्यासाचा कंटाळा आला की आम्ही ' सर गोष्ट सांगा नं ' असा हट्ट करायचो आणि सर लगेच आम्हाला सुरस अशा गोष्टी सांगायचे , ती गोष्ट एका तासिकेत कधीच संपत नसे मग पुढल्या तासाला आम्ही आधी सरांना गोष्ट पूर्ण करायला सांगत असू आणि मग काय तो अभ्यास होई. ही शाळा माझ्या घरापासून फार लांब होती आणि रिक्षाची काही नीट सोय होईना म्हणून मग पुढल्या वर्षी माझी रवानगी घराजवळच्या ' भारत विद्यालय' मध्ये झाली .आमच्या वर्गात एकदा रामरक्षा पठणाची स्पर्धा घेण्यात आली , मी 15 दिवस अगदी छान तयारी केली पण प्रत्यक्ष स्पर्धेत मात्र माझी फें फें उडाली , एकच एक श्लोक वारंवार म्हटल्या जाऊ लागला आणि भीतीने मला त्यापुढचे काही आठवेना . बाकीच्यांचे मात्र छान मनोरंजन झाले असावे . इथे जेमतेम एक वर्ष काढले आणि मग वडिलांच्या बदलीमुळे आम्ही पुलगाव म्हणून एका छोट्या गावी राहायला गेलो . ' रंगलाल केजडीवाल '  नावाच्या ह्या शाळेने माझी जी काही व्यासपीठाची भीती होती ती घालवली . ह्या शाळेत लोणकर नावाचे एक सर होते , काही कारणाने तास होत नसेल तर विद्यार्थी खेळायला बाहेर पडतात पण असा एखादा तास होणार नसेल तर लोणकर सर वर्गावर येतील का ? अशी विचारणा आधी होत असे , आणि सर असतील तर कोणीही खेळायला बाहेर जात नसे , विद्यार्थ्यांचे असे प्रेम लाभणारा शिक्षक खरा भाग्यवंत .  ह्या शाळेत दोन वर्ष होत नाही तर निदान नववी , दहावी तरी एका ठिकाणी होऊ देत ( कारण पुढल्या वर्षी बदलीची शक्यता होती ) असा विचार करून आम्ही अमरावतीला आमच्या मूळ गावी राहायला आलो . 

इथे माझा प्रवेश घराजवळच्या सिंधी समाजातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका शाळेत वडिलांनी घेऊन ठेवला होता पण प्रत्यक्षात शाळा सुरु झाल्यावर त्या सिंधी वातावरणात  माझे मन काही रमेना , मी 4,5  दिवस गेले खरी पण मग मात्र सपशेल नकार दिला , मग काय आई आणि मी शिक्षण खात्यातर्फे जे काही प्रवेश होत त्यात नंबर लागावा म्हणून तिथे चकरा मारायला लागलो , सुदैवाने तिथे माझ्या वडिलांचे मित्रच शिक्षणाधिकारी होते त्यामुळे आता अमरावतीतल्या तेव्हाच्या सर्वोत्कृष्ट शाळेत मला सहज प्रवेश मिळू शकणार होता पण का कोण जाणे माझी इच्छा ' श्री समर्थ माध्यमिक विद्यालय ' इथेच जाण्याची होती . वडिलांनी आणि त्या काकांनी मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मी ठाम होते ( कशाच्या बळावर ते माहित नाही ). शेवटी एकदाचा मला तिथे प्रवेश मिळाला , मात्र हे सगळे इथेच थांबले नाही . त्या शाळेत पूर्ण संस्कृत आणि संयुक्त संस्कृत चे असे दोन वर्ग होते , माझे नाव संयुक्त च्या वर्गात होते पण हे कळेपर्यंत मी एक आठवडा पूर्ण संस्कृत च्या वर्गात बसले आणि तिथे माझ्या मैत्रीणीही झाल्या आता परत त्या दुसऱ्या वर्गात जाण्याची माझी तयारी नव्हती . वर्गशिक्षिका  अर्थातच ह्याला तयार नव्हत्या , " कारण आठव्या वर्गात तिचे संस्कृत नव्हते तर तिला नववीचे संस्कृत कसे कळणार ? " असा त्यांचा योग्य सवाल होता . शेवटी आईच्या  जबाबदारीवर आणि मैत्रिणींच्या भक्कम साथीवर मी त्याच वर्गात जाऊ लागले . शाळेची ही शेवटची दोन वर्षे मी माझ्या आवडत्या शाळेत अतिशय आनंदाने घालवली हे वेगळे सांगायला नकोच . 

                     अनेक शाळांमध्ये वेगवेगळ्या शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याचा योग आला , त्यांच्याकडून कळत नकळत झालेले संस्कार अजूनही मनावर कोरले गेलेले आहेत . खंत फक्त एवढीच आहे की सततच्या अशा शाळा बदलल्यामुळे प्रिय शिक्षक , शिक्षिका ह्यांची भेट होऊ शकत नाही , किंवा झालीच तर मी त्यांना आठवत नाही . बऱ्याच मैत्रिणी आता पुन्हा संपर्कात आहेत पण काही जिवाभावाच्या मैत्रिणी अजूनही कुठे आहेत , काय करतात हे माहित नाही .  
बघूया ...शेवटी 
" छोटीसी ये दुनिया , पहचाने रास्ते है
तुम कहीं तो मिलोगे , कभी तो मिलोगे
तो पुछेगे हाल "

Wednesday, May 13, 2020

मामाचं पत्र हरवलं ..!

आठवतं का तुम्हाला लहानपणी मोठ्ठा गोल बनवून "मामाचं पत्र हरवलं ...तेच आम्हाला सापडलं!" खेळलेलं? चाळीशी ओलांडलेल्या सगळ्यांना तर  नक्कीच आठवतं असेल ते. केवढी मजा यायची न ? सहजच ती आठवण आली अन चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. दुसऱ्याच क्षणी मात्र त्याची जागा किंचित विषादाने घेतली. वाटलं ह्या टेक्नोसॅव्ही जगात खरंच कुठे हरवून गेलंय ते मामाचं पत्र आता? कुणालाच न सापडण्यासाठी! आजच्या डिजिटल जगाची तर काय गोष्ट ? अनेक वेगवेगळी नवनवीन माध्यमं आहेत संपर्कासाठी.  फेसबुक काय, व्हाट्स अँप काय, इंस्टाग्राम काय आणिक काय काय सांगावं! निमिषार्धात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात संपर्क साधता यायला लागलाय. पण का कुणास ठाऊक तो जिव्हाळा नाही वाटत. काहीतरी, कुठेतरी खटकतंय हे नक्की. हे इन्स्टंट कॉपी-पेस्ट-फॉरवर्डचं  जग कुठेतरी थोडंसं कोरडं वाटतंच. पत्रामधला जो ओलावा, जो जिव्हाळा, जी आर्द्रता  आपण अनुभवलीय  त्याची बरोबरी नाहीच व्हायची कधी!

किती सुंदर होते न ते दिवस! आपण पत्र लिहण्याचे, आपल्याला कुणाचं पत्र येण्याचे! त्यातला आनंद आपल्या पिढीने  कसा भरभरून लुटलाय! मामा, मामी, आत्या, काका, काकू, मावशी, आजी, आजोबा वगैरे वगैरे जवळच्या  नातेवाईकांचे पत्र  म्हणजे कोण आनंद असायचा! अशा पत्रांचे अगदी छान सार्वजनिक वाचन सुध्दा घराघरात व्हायचे. काही पत्र  पुन्हा पुन्हा वाचण्यात वेगळीच गम्मत असायची. त्यातल्या त्यात एखादी ओळ आपल्याबद्दल असेल तर मग पाहायलाच नको! खुप महत्वाचं असल्या सारखं वाटायचं. पत्रं कशी माणसांना एकमेकांशी बांधून ठेवायची. आपल्याला येणारं पत्र काय किंवा आपण कुणाला लिहिलेले पत्र  काय- त्यातली गोडी अवीटच होती! तेव्हाचे पत्रांचेही काही संकेत असायचे. एखादी दुःखद बातमी असेल तर पत्राला  मायना नसायचा. थेट "कळविण्यात अत्यंत खेद होतो की  ..." अशी सुरवात असायची.  तसेच लग्नकार्य , मुंज वगैरे शुभकार्यांची पत्रे आवर्जून हळदीकुंकवाच्या बोटासोबतच यायची. कोणाला तीर्थरूप अन कोणाला तीर्थस्वरूप लिहायचं ह्याचेही  संकेत असायचे. जावाईबापूंना किंवा प्रतिष्ठित लोकांसाठी श्री. रा. रा. हा विशेष मायना असायचा. कालानुरूप हे सगळे मायने आता एकाच “डिअर” मध्ये अंतर्धान पावले आहेत! खास गुलाबी रंगाच्या लिफाफ्यात, गुलाबाच्या सुकवलेल्या पाकळ्या वगैरे टाकून येणाऱ्या पत्रांचं तर एक वेगळंच विश्व असायचं! त्या पत्रांमध्ये जी उत्कंठा, आतुरता, प्रेम असायचं त्याची बरोबरी आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातले फास्टेस्ट फास्ट आणि लेटेस्ट लेट कुठलेच अँप करू शकणार नाही एवढं नक्की!  मुख्य म्हणजे पत्र  लिहल्यावर ते पोस्ट करणे, समोरच्या व्यक्तीला ते मिळणे अन मग त्याचे उत्तर येणे,  ह्यातला वाट बघण्याचा 
जो कालावधी असायचा न, तोही मोठा मनोहर होता. आजच्या सगळं काही ‘इन्स्टंट’ ची सवय झालेल्या पिढीला कदाचित हे सगळं  खूप बोअरिंग वाटेल. अर्थातच दोष त्यांचा नाहीय कारण ज्या फास्ट, डिजिटल जगात ते वाढताहेत त्या जगात “पेशन्स” हा शब्दच मोठ्या मुश्किलीने सापडतो आजकाल! 

कधीकधी वाटते ती हुरहूर, ते पोस्टमन ची वाट पाहणं ह्यात सुद्धा एक वेगळीच गोडी असायची. “डाकिया डाक लाया ... , डाकिया डाक लाया ....” म्हणत सायकलवर टांग टाकून पत्र वाटप करत करत  सगळ्या गावाच्या चेहऱ्यावर हसू पसरवणारा राजेश खन्ना कोण विसरू शकतो बरे?  त्याने तर पोस्टमनला सामान्य माणसांच्या हृदयात एक खास जागा मिळवून दिली होती.

चित्रपटसृष्टीने तर अनेक सुंदर सुंदर गीतांमधून ह्या “खताच” चांगलंच भांडवल केलेलं दिसून येतं. राजेंद्रकुमारच्या ”ये मेरा प्रेमपत्र पढकर ..." ने लाखो प्रेमीजीवांचं हृदय केवढं तरी धडधडायचं अन देवानंद च्या “फुलोंके रंग से, दिलकी कलमसे, तुझको लिखी रोज पाती ...." ने असंख्य प्रेमवीर गुलाबी स्वप्नात हरवून जायचे! “फुल तुम्हे भेजा है खत में ..”, “अफसाना लिख रही हूँ ..”,“हमने सनमको खत लिखा…”,”खत लिख दे सावरियाके नाम बाबू …”,वगैरे वगैरे कितीतरी सदाबहार गाणी कायम प्रेक्षकांच्या हृदयात विराजमान झालेली होती तर “चिठ्ठी आयी हैं...वतनसे चिठ्ठी आयी हैं …”,”संदेशे आते हैं …”सारख्या गीतांनी डोळे आपसूक पाझरायला लागायचे! थोडक्यात पत्र म्हणजे हृदयाला हात घालण्याचे मोठे अमोघ शस्त्र होते फिल्लमवाल्यांचे!

आज ते सगळं कुठेतरी हरवलयं. अर्थातच त्या गोष्टी आज आपल्याला नव्या आकर्षक फॉर्म मधे भेटतातच ह्यात काही दुमत नाही. टेक्नोलॉजी सोबत आपल्याला जगता यायलाच हवं अन नविन तंत्रज्ञानाचे आपण स्वागतच करायला हवे आणि अर्थातच आपण ते करतोही. आजच्या लॉकडाउन च्या कालावधीत तर ह्या सगळ्या अतिजलद संपर्क माध्यमांचा  केवढातरी दिलासा प्रत्येकाला वाटला हेही खरेच! एका क्षणात तुमच्या प्रियजनांशी तुम्ही सहज संपर्क करू शकता आहात. अगदी सगळं सगळं पटतं. बदलत्या जगासोबत जुळवून घेणेच शहाणपणाचे असते हेही कळतं ! पण अजूनही आठवणींच्या त्या साम्राज्यात हरवून गेलं की मामाच्या पत्रासोबतच आपण अनुभवलेली ती सगळी गोडीही हरवलीय ही खंत मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी उरतेच! कालाय तस्मै नमः ! अजुन काय? 

मधुमती वऱ्हाडपांडे,

अकोला