Sunday, May 15, 2022

मंगल कार्य

 


धावत-पळत मंगल कार्यालय गाठलं. जवळजवळ साडेअकरा होत आले होते. चांगलाच उशीर झाला होता. आता कदाचित सर्वांचा ओरडा ऐकावे लागणार, अशा विचारात मी तिथे गेले. पाहते तर... सर्वत्र सामसूम. कार्य आहे की नाही, इतकी शांतता. तसे मंडप सजावट वगैरे सर्व काही होतं पण समोर कोणी दिसत नव्हतं. आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना... असे एक क्षण वाटून गेले.

 असं होणार नाही. नेहमीप्रमाणे जरी माझ्या हातून पत्रिका गहाळ झाली होती तरी लग्न दिनांक आणि स्थळ - मुहूर्त हे सगळं आदल्या दिवशी लहान भावाला विचारून कन्फर्म करून घेतलं होतं, त्यामुळे तशी काही चूक झाली नसावी याबद्दल खात्री होती. आत मध्ये तर जाऊ...म्हणत आत कार्यालयात गेले. तर भव्य अशा सजवलेल्या सभा मंडपासमोर जरीचा झब्बा कुर्ता व फेटा घालून वधूपिता इतरांसह गप्पा गोष्टी करताना दिसले आणि हायसं वाटलं. 
'चला योग्य ठिकाणी आलो.'
 संपूर्ण सभागृहात तशी तुरळकच माणसं होती. मला पाहताच वधूपिता सुहास्य मुद्रेने पुढे आलेत. 
मी म्हटलं, "मला वाटलं, उशीर झाला."
 माझ्या या वाक्यावर..., "असा कसा उशीर होईल? 12:50 चा मुहूर्त आहे ना!" हे त्यांचे उत्तर...
 (मुहूर्ताची वेळ अकरा सांगणाऱ्या भावाला काय म्हणावं?)
 "चला म्हटलं जरा लवकर जाऊ तेवढीच आपली मदत", असं वरकरणी हसत मी म्हटलं.
"मदत वगैरेची काही गरज नाही हो... आपण ए टू झेड कॉन्टॅक्ट दिलं आहे. सर्व तेच करणार. आपण मस्तपैकी तयार व्हायचं आणि एन्जॉय करायचं".
 हे ऐकलं आणि जाणवलं काळ बदलला आहे. आज लग्न म्हणजे एक इव्हेंट्! इव्हेंट मँनेजमेन्टवाले तो सोहळा दृष्ट लागावा इतपत चांगला करतात. पण तरीसुद्धा या सर्वात पाच सहा दिवस चालणाऱा तो पूर्वीचा लग्न सोहळा, त्या चालीरिती आपल्याला कुठे तरी आठवत राहतातच नं...
पूर्वी लग्न म्हटलं की, मुलीकडच्यांना चांगलाच ताण असायचा. एक म्हणजे वरपक्षाचा वरचष्मा! दुसरं सगेसोयरे, व-हाडी माणसांचं आदर स्वागत! तिसरं मुलीच्या सासरी जाण्याचं दुःख! लग्न ठरल्यापासून मुलीच्या आईच्या डोळ्याच्या धारा वाहायला लागायच्या, "तांदूळ ओढून आलेत हो, आता काकण सुटे पर्यंत कुठलं काम करायचं नाही. पुढे अख्खा जन्म नशिबाला कामं बांधली आहेतच" एखादी आजी, मामी, आत्या, मावशी असं कुणीतरी समजून सांगायचे. लग्नघर म्हटलं की, कितीतरी एक ना दोन शंभर काम असायची. ती निपटायसाठी तेवढेच हात मदतीला असायचेत. त्यासाठी महिना पंधरा दिवस आधीपासून जवळची      व-हाडीण मुक्कामी असायची. मुहूर्तापासून कामं सुरु होत असत. पाच सवाष्णींसह जात्या पाट्याची पूजा करुन शेवया, वड्या, कुरड्या, पापड, किकसा वगैरे करायला सुरुवात व्हायची. 
   तेंव्हा लग्न हे कुणा एकाच्या मुलीचं नसायचं तर तो, अमक्या गावच्या मुलीचा तमक्या गावच्या मुलासोबत असणारा लग्नसंबंध असायचा. केवळ घराणीच नाही तर गावांचं ते मनोमिलन असायचं.
 तेंव्हाचा सगळा व्यवहार धान्याच्या बदल्यात चालायचा. पैसा हे चलन व्यवहारात खूप नंतर आलं. आज प्रत्येकाजवळ पैसा आहे आणि मुख्य म्हणजे तो स्वतःसाठी उपयोगात आणण्याची वृत्ती आहे. पुढल्या पिढीसाठी गाठीला बांधून ठेवण्याची गरज आज वाटेनाशी झाली आहे. त्यांचं ते पाहून घेतील, असा मनात विचार त्यामागे असतो.
   

पूर्वी हळद चढवण्याआधी बलुत्याच्या सगळ्या कुळांना 'नग' देण्याची पद्धत होती.  त्यात एकएक करंजी,अनारसा, लाडू, पोळी आणि किकसा- पापड असायचा. 'किकसा' हा शब्दही आजकाल तसा फारसा परिचित नाही. आज हळद सर्वांना माहीत आहे पण पूर्वी हळद आणि ज्वारीचे उबटन तयार केलं जायचं, ते म्हणजे किकसा! तो किकसा आणि सुपारी-हळकुंडाचा गेठा, हे दोन्ही आधी जात्याला बांधल्या जायचं आणि नंतर मग नवरदेवाला चढवलं जायचं. एकदा गेठा बांधल्यावर ते जातं नवरदेव म्हणून सव्वा महिना तसंच ठेवलं जायचं.
   काय एक-एक पद्धती होत्या... लग्नाआधी नानमुखाची किंवा हळदीची गावपंगत असते तेंव्हा वरमाय आपल्या ओटीत तांदूळ घेऊन भोजन मंडपाच्या चारी दिशांना आधी तांदूळाची आणि नंतर पाण्याची शिंपडण करून 'मांडव शिंपते'. 
मांडवाच्या दारी 
वरमाय बायातीन
मांडव शिंपला
नवरीच्या मावशीनं


देव्हारा लिंपो कुणीही पण त्यावर नवरदेव नवरीच्या नावासह अंबरवेल काढण्याचा मान 'फुयी'चाच असायचा! अंबरवेलासोबत त्या चित्रात चंद्र सूर्य, पालखी, घोडा, तुळशी वृन्दावन असं सगळं रेखाटल्या जायचं. तोरणताटी तयार करण्यासाठी आणि ती टाकण्यासाठी हवा असायचा मामा! जेवणारच्या पाटीसाठी पाच कुळातले पाच जणं, देव कुंडी बसवण्यासाठी भाऊबंदकीचे लोक हवे असायचे. देवकुंडीसाठी शेतातली सौंदळची काडी, रुई, चराट्याची फांदी नि आंब्याची डाखोळी... देव्हाऱ्याजवळ पाच मडक्यांमध्ये ठेवलेली हळद-कुंकू, अक्षता, किकसा वगैरेची उतरंड... देवघरात देवक बसवणं म्हणजे भाऊबंदातील देव आपल्या घरात आणून विड्याच्या पानावर त्याची प्रतिष्ठापना करणं...., 

मांडवाच्या दारी 
अहिर भारी भारी
कुणाची नेसू साडी
ल्यायले भावाची पितांबरी

 थट्टामस्करी, उखाणे, कोडी घालत रात्र जागवत केल्या जाणारे अनारसे, करंज्या, पुऱ्या... एकमेकींच्या कानगोष्टी, उखाळ्यापाखाळ्या, टोमणे, रुसवेफुगवे सगळंच काही असायचं. अगदी मानाच्या एका पोळीच्या तुकड्यावरून होणारी भांडणं, शिदोरीची गंमत... हे सगळंच काही त्यात होतं. त्या असण्यात खूप मौज होती आणि आता त्या नसण्यात एक प्रकारचं सुनेपण आहे.  
     लग्न ठरणं, लग्न करणं आणि लग्न होऊन निभवणं... या सर्व महत्वाच्या टप्प्यांवर अनेक पद्धती बदलल्या आहेत.  काही अनावश्यक होत्या तर काहीत काळानुरूप बदल झाला. हल्ली पूर्वी इतका वेळ नसल्याने १२.५० च्या लग्नाला १२.४९ पर्यंत व-हाडी येतात. सुलग्न लावतात. आग्रहाची वाट न बघता बुफे आस्वाद घेतात. आता सगळे जणं लग्न एन्जॉय करतात. खूप छान प्रकारे संगीत, मेहंदी, हळद, लग्न, गृहप्रवेश हे सर्व विधी आनंदात पार पडतात. पण कधीतरी जुन्या चालीरीती सहजच आठवतात. मनात विचार येतो, काळ आहे तो बदलत राहणारच. बदल झालेत, चांगले की वाईट... हे ज्याचं त्यानं ठरवावं. बदल झाला हे मागल्या पिढीनं समजून घ्यावं आणि नव्या पिढीसह एन्जाँय करावं, नाही का?

-सीमा शेटे - रोठे, अकोला.

No comments:

Post a Comment