Tuesday, March 15, 2022

मोगरा फुलला....

"मोगरा फुलला "हे गो नी दांडेकर यांचे पुस्तक अचानक हाती पडले अनेक दिवसांपासून वाचायची इच्छा असलेले पुस्तक असे अचानक गवसले तर खूप बरे वाटले. पुस्तकावर निळया रंगाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांचा ध्यानस्थ चेहरा, गळयात रुद्राक्षाची माळ, भाळी चंदनाचा टिळा, केस थोडे वाढलेले, मिसरूडही न फुटलेला त्यांचा शांत, अविचल, चेहरा. मागच्या पृष्ठावर पुस्तकाबद्दल आणि गोनीदांबद्दल अल्प परंतु नेमक्या शब्दात परीचय करून देण्यात आला आहे. तो असा -- " ही कहाणी आहे विश्र्वात्मक झालेल्या देवमाणसांची! म्हणजे निवृत्तीनाथांची, ज्ञानदेवाची, सोपान -मुक्ताईची आणि प्रातःस्मरणीय अशा त्यांच्या माता पितरांची! त्यांनी लौकिकात जे भोगले, ते केवळ शब्दातीत आणि जे अलौकिक अनुभवले,ते तर शब्देविण संवादिण्यासारखे! "

अशांची चरित्रे -चित्रे रेखाटण्यास कलाकाराची, लेखकाची कल्पनाशक्ती आणि शब्दसिध्दी "अमृतातेंहि पैजा "जिंकणारी असावी लागते. गोनीदांची लेखनशैली अत्यंत शांत- सौम्य, प्रसन्न करणारी, जीवनाचा उध्दार करणारी, सकारात्मक अशी आहे.  कल्पित पात्रांच्या मुखातून अकल्पिताची कथा सांगितली आहे. गोनीदा या पुस्तकात प्राणा -  मनातून फुलून आले आहेत.

गोनीदा लिहीतात, सातशे वर्षापूर्वी आळंदी एक सुमार खेडे, तिथे विठ्ठलपंतांचा न्याय करतील असे पंडित असणे हे अगदीच असंभव. स्वतः विठ्ठलपंत शास्त्रवेत्ते. गृहस्थाश्रम पुन्हा स्वीकारण्यापूर्वी त्यांनी गुरूच्या आज्ञेपर शास्त्रोक्त प्रायश्चित्त घेतले होते. तरीही वनवासी विजनवास नशिबी आला. ही चार दिप्तीमान मुले ज्यांच्या कुशीत जन्मली ते विठ्ठलपंत आणि रूक्मिणी तपःपूत आणि साधुस्वभाव होती. शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी.

तसे तर आपल्या सर्वांना निवृत्ती  ज्ञानेश्वर ,सोपान, मुक्ताबाई आणि त्यांचे मायबाप विठ्ठलपंत, रुक्मिणी यांच्याबद्दल सगळीच माहिती आहे. पुस्तकात ते सर्व आले आहे तरीपण ते वाचतांना आपण त्यात गुंग होऊन जातो. कारण गोनीदांची लेखन शैली! 

 विठ्ठलपंत, रुक्मिणी भगवत गीता पावलोपावली जगले. आपल्या आचरणात आणून मुलांवर पण तेच संस्कार केले. यदृच्छालाभसंतुष्टव्दंव्दातीतविमत्सर ही गीतेतील सर्व विशेषणे त्यांच्या कुटीत आकारास आली होती.प्रत्यक्ष झाली होती. समाधानाचे,संतोषाचे पांघरुण त्या दोघांनी पांघरले होते. ज्या समाजाने त्यांना वाळित टाकले त्या समाजावर कधीही दोषारोप नाही, मनात कटुता नाही. किती कठीण होते जगणे. त्यांचे ते कष्टप्रद, खडतर जगणे वाचून आपलेही मन भरून येते. त्यावर फुंकर घालायला आपल्यासोबत कथेतील दोन पात्र येतात. विठ्ठलपंतांना तीर्थाटन करीत असतांना भेटलेले सोबती !  भलेही ते काल्पनिक पात्र असतील पण त्या पुस्तकाची हिच खास गोष्ट आहे ते  पात्र  जणू सूत्रधार बनून  आपल्याला त्यांच्यासोबत घेऊन जातात आणि विठ्ठलपंत, रूक्मिणी आणि त्यांच्या मुलांची दिव्यत्वाची प्रचिती वेळोवेळी देत राहतात.  शेवटपर्यंत त्यांनी विठ्ठलपंतांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांना साथ दिली अगदी ज्ञानेश्वर माऊली समाधी घेईपर्यंत!  

 रुक्मिणीची लहानपणीची जीवाभावाची सखी! तिच्याच वडिलांमुळे विठ्ठलपंतांना समाजातून बहिष्कृत केले जाते. तरीही तिची ही जीवाभावाची सखी रुक्मिणीला वेळोवेळी मदत करते. त्यामुळे तिचे माहेर तुटते, समाज तिला पण बहिष्कृत करतो तिच्याच वडिलांच्या सांगण्यावरून.  ज्ञानेश्वरांच्या वेळेचे रुक्मिणीचे बाळंतपण असो,रुक्मिणी विठ्ठलपंत अनंताच्या प्रवासाला गेलेले असो की ज्ञानेश्वरांची समाधी असो प्रत्येकवेळी ही सखी समर्थपणे साथ देते. मला वाटतं " माय मरो मावशी जगो "ही म्हण तेव्हाच रुजली असावी. या सखीचे आणि रुक्मिणीचे बालपणीचे वर्णन पण अतिशय हृद्य झाले आहे. आणि लग्नानंतर माहेरी बाळंतपणासाठी ही सखी येते ते प्रसंग अगदी कमी शब्दात पण तितकेच प्रभावीपणे गोनीदांनी लिहले आहे. 

एकेका प्रसंगाचे वर्णन पुन्हा पुन्हा वाचावे तर त्याची गोडी अजून अजून वाढत जाते. त्र्यंबकेश्वरला हे सर्व कुटुंब जाते ते वर्णन, त्या प्रवासात विठ्ठलपंत वाराणसीला जे शिकले ते मुलांना शिकवत होते. रोज भगवत गीतेवर प्रवचन करून गीता सोप्या भाषेत समजावून सांगत. अफाट बुध्दीमत्तेचे वरदान लाभलेले ते मुलं चटकन शिकत होते. गोनीदांचे भाषेवरचे प्रभुत्व ,गाढा अभ्यास प्रत्येक प्रसंगात अनुभवायला मिळतो. त्याकाळातील समाजजीवनाचे यथार्थ दर्शन होत जाते ते त्यांच्या भाषेमुळे.

 रावणाचा सीता स्वयंवराचा एक गमतीशीर प्रसंग मूळ रामायणात नसलेला परंतु कोणीतरी कौतुकाने रचलेला , असे सांगून गोनीदांनी  अत्यंत छान पध्दतीने , कमी शब्दात लिहीला आहे. तो ही संस्कृत भाषेत! वाचून आपणही मनापासून दाद देतो.

विठ्ठलपंतांची तीव्र इच्छा असावी गीता सामान्यांना समजेल अशा भाषेत लिहावी, ती इच्छा निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी लिहून घेऊन  पूर्ण केली असावी. ज्ञानेश्वरीच्या सुरूवातीला गणपतीचे वर्णन वाचून तर आपण थक्क होऊन जातो. इतके अप्रतिम लिहीले आहे. पुस्तक वाचतांना आपल्यालाही गीतेतील मनोज्ञ , सखोल तत्वज्ञान सोप्या शब्दात समजत जाते. आणि आपलेही आयुष्य सुसह्य होते.   या पुस्तकातील भाषा आपल्याला थेट ज्ञानेश्वरांच्या काळात घेऊन जाते. त्यामुळे आपणही त्या कथेतील एक होऊन जातो. असे  रसाळ, मधाळ भाषेतील हे पुस्तक आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावे असेच आहे. गोनीदांसारख्या संवेदनशील लेखकाने वाचकांच्या मनात खरोखर मोगरा फुलवला आहे. 

अंजली




 

No comments:

Post a Comment