" संध्याकाळी पाच वाजता येतात आणि सकाळी आठ वाजता परत जातात।"
आसामातल्या पार्वतीपूरच्या भास्कर संस्कार केंद्राचे अशोकभैय्या सांगत होते।
मी चकित।ही काय शाळेची वेळ?
ते म्हणाले," ही शाळा नाही।हा संस्कारवर्ग।"
इतका वेळ?
माझा हा प्रश्न बाहेर पडण्यापूर्वी अशोकभैय्या म्हणाले,
" शाळा आहेत इथे वेगवेगळ्या।मुलं दहा साडेदहाला शाळेला जातात। तुला सांगतो,३६ वर्षापूर्वी आम्ही इथे आलो तेव्हा नव्हत्या शाळा आणि शिक्षणाच्या सोयी।आम्ही सुरु केली होती तेव्हा पहिली शाळा।आता शाळा आहेत बऱ्याच। पण तुम्ही शाळेत मुलांना पाठवलं म्हणजे झालं का?इथे घरोघरी दारिद्रय पाचवीला पूजलेलं।तांदूळापासून मादकपेयं तर घरोघरी बनवली जातात।बायकामुलं सगळे पितात।अशानी संस्कार कसे व्हायचे?जवाबदार नागरिक कसे घडायचे?मुलांच्या सवयी,स्वच्छता,आरोग्य आणि अभ्यासाचं काय?आम्ही हे सगळं संस्कारवर्गाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय।शाळा पाचवीपर्यंतची सुरु आहेच।पण आता संस्कारवर्गाचं काम भरपूर वाढलंय।
या संवादानंतर मला अशोकभैय्या,अलकाताईच्या खऱ्या कामाची ओळख व्हायला सुरुवात झाली।आठवडाभर त्यांच्याबरोबर राहून,रोज सकाळ संध्याकाळ मुलांशी बोलून मला तिथे चाललेल्या प्रचंड कामाचा थोडासा परिचय झाला।संस्कारवर्ग,होमवर्क,ट्यू शन,ट्यूटोरिअल्स ,फिल्ड वर्क ,या वापरून गुळगुळीत झालेल्या शहरी शब्दांचा खरा अर्थ कळायला भास्कर संस्कार केंद्रात आठवडाभर रहायला हवं।तिथली स्थानिक भाषा शिकून ,लोकांना आपलंसं करून,मुलंमुली संध्याकाळ रात्रभर ठेवायला तयार करून,त्या मुलांना घडवण्यासाठी या दांपत्यानी ३६वर्ष रक्ताचं पाणी केलंय।आता तर शिकणाऱ्या मुलामुलींना रात्रभर रहायला बोलावणं आणि जवाबदारी घेणं म्हणजे शहरी पांढरपेशा भाषेत "आ बैल,मुझे मार" किंवा मराठीत "लष्कराच्या भाकरी भाजणं "आहे।पण ही दोघंही ते जीव ओतून करतायत।
इंग्रजी,गणित शिकवण्यापासून ,उठण्याबसण्याचे रिवाज शिकवण्यापासून तर आरत्या श्लोक,मंत्रपुष्प,गीतेचे अध्याय तोंडपाठ करून घेईपर्यंत सगळं काही मनापासून केलं जातंय।मुलं शिकतायत,अभ्यास करतायत,शिस्त अंगी बाणवतायत,ठरल्या वेळी मंदिरात आरती पूजेला येतायत,वाटून दिलेली कामं करतायत,व्यायाम करतायत,घरुन आणलेला डबा नीट खाऊन घासूनपुसून ठेवतायत,आपल्या गावच्या रीतीपध्दती गाणी गोष्टी लोकसंगीतनृत्य यांचा आनंद घेतायत नि सांभाळही करतायत।पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूर अमरावतीला दोन महिने राहायला येताना अशोकभैय्या अलकाताई चार पाच मुलामुलींना सोबत घेऊन येत।त्यांना शहरी संस्कृती, खानपान कपडे,बोलचाल ,स्वयंपाकपाणी सगळं शिकायला मिळावं असा त्यांचा प्रयत्न असे।दरवर्षी वेगवेगळी मुलं येत।असं अनेकांना अनेक तऱ्हांनी दोघं तयार करत होते। अलीकडे एकदा तीसेक मुलांना या भागातील वेगवेगळ्या संस्थांकडून त्यांनी कलाप्रदर्शनाची संधीही मिळवून दिली होती।
हे सगळं शांतपणे चिकाटीने,आणि कुठेही गवगवा न करता तब्बल तीन तपे सुरु ठेवणाऱ्या अलकाताई अशोकभैय्या यांच्याबद्दल काय बोलावं?अनेक पुरस्कार,कौतूकाचे क्षण वाटयाला आले,नाही असं नाही।पण, इथे शिकलेल्या मुलांनी पुढे लहान मुलांना शिकवायला इथेच येणं,किंवा शनिवारी संध्याकाळी संस्कारवर्गाला सुट्टी म्हणून मुलं आपापल्या घरी असतात तर तेव्हा त्यांच्या मायबापांनी एकदिवस दारु बंद ठेवणं, हे या दोघांना पुरस्कारापेक्षा जास्ती महत्वाचं वाटतंय।खरंय।
"कोणी दखल घेणं न घेणं,आर्थिक मदत,वस्तू पाठवणं,यापेक्षा या मुलांना संधी देता येईल का हे कोणी पाहणं महत्वाचंय।" अशोक भैय्या तळमळीनी सांगतात।
म्हणजे?
"लाईक युथ एक्सचेंज प्रोग्राम......"अशोकभैय्या म्हणतात....
"म्हणजे यांना तुमच्याकडे बोलवा। मिसळू द्या।इथल्या कला तिथे सादर करू द्या।नवीन शिकण्याची संधी द्या।त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून द्या। स्वतःची खरी ओळख निर्माण करु द्या।खूप शार्प,कलावंत,बुद्धिवंत मुलं आहेत यांच्यात।त्यांच्यातून उत्कृष्ट कलाकार,खेळाडू,धावपटू निर्माण होण्याची शक्यताआहे ।आमच्या क्षमता मर्यादित आहेत।आम्हाला यासाठी तुमच्या मदतीच्या हातांची गरज आहे।"
अशोकभैय्यांचं बोलणं मनात साठवूनच मी परत माझ्या गावी आले।मुलांसाठी संधी शोधण्याचा प्रयत्न करायचाच असं ठरवूनच।तोवर पुस्तकं,खेळणी,कपडे या रूपानं तर मुलांपर्यंत पोहोचता र्यईलच।तुम्हालाही।पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे
तुम्हाला काही सांगता येईल का ?मुलांना आपापल्या शहरात बोलावण्याच्या एखाद्या अशा संधीबद्दल?
No comments:
Post a Comment