Tuesday, February 15, 2022

श्रद्धांजली नको, कविता आवर

 नुकत्याच लता मंगेशकर गेल्या, रमेश देव, अनिल अवचट, बिरजू महाराज, बिपीन रावत हे सारे त्यांच्या थोडेच आधी गेलेले. प्रत्येक वेळी कुणी गेलं की त्यांच्याविषयीच्या माहितीचा आणि आठवणींचा महापूर समाज माध्यमांवर येत असतो. ते स्वाभाविकही आहे. पण आताशा एक नवीन ट्रेंड सुरु झालाय, कवितेतून श्रद्धांजली वाहण्याचा! लतादीदींच्या निधनानंतर तर या काव्यात्मक श्रद्धांजलीचा इतका अतिरेक झाला की ‘श्रद्धांजली नको, कविता आवर’ असं म्हणावंसं वाटू लागलं.

आजकाल झालंय काय, की साहित्याला वाहिलेले असंख्य समूह समाज माध्यमांवर सक्रीय झालेत. या समूहांवर कित्येक थोर्थोर साहित्यिक, कवी, कवयित्री असतात. प्रत्येकच जण आपलं प्रत्येक लिखाण (अति)उत्साहाने त्या समूहावर टाकत असतं. त्यातलं ९५% तद्दन सुमार दर्जाचं असतं. ४% जरा बरं तर क्वचित १% चांगलं असतं. मात्र या सुमार लेखनाचं एवढं कौतुक सुरु असतं, की माझ्यासारखा एखादा रसिक वाचक गोंधळात पडतो. कविता म्हणून ज्या लिखाणाची भरभरून प्रशंसा होत असते त्यात लय, शब्दसौंदर्य आणि इतर काव्यगुणांचा पूर्ण अभाव असतो. काही ठिकाणी वृत्ताची प्रचंड मोडतोड असते तर काही ठिकाणी वृत्त काटेकोर पाळलेलं असूनही काव्यात प्राणच नसतो. गझलांना तर आजकाल एवढे सुगीचे दिवस आलेत की संपूर्ण उर्दू, अरबी आणि पर्शियन भाषांतील एकूण गझलांपेक्षा मराठीत जास्त गझला लिहून झाल्या असतील. अक्षरशः दगड उचलला की गझलकार आणि गझलकारा सापडतात आजकाल. काही गझलकार मुद्दाम मतला, मक्ता, गैरमुरद्दफ, मुसलसल, गैरमुसलसल असे शब्द (बरेचदा चुकीचे ) वापरून इतरांवर इम्प्रेशन पाडू पाहतात. प्रत्यक्ष सुरेश भट, इलाही जमादार यांसारख्या गझलकारांचा झाला नाही एवढा यांचा उदोउदो होत असतो. या सर्व प्रकारच्या पद्यांची होणारी प्रचंड वाहवा पाहता ‘हे सर्व खोटारडे आहेत, की आपल्याला काव्यातलं काही समजेनासं झालंय’ असा प्रश्न पडू लागतो.

‘अप्रतिम’ हा शब्द तर इतका वापरला जातो, की खरोखरच्या अप्रतिम लिखाणासाठी तो वापरावासा वाटत नाही. आणि हो, १% चांगल्या लिखाणाचं नशीब मात्र खडतर असतं. कारण या ‘अप्रतिम’, ‘बढिया’, ‘बहोत खूब’ म्हणवल्या जाणाऱ्या कवितांच्या भाऊगर्दीत त्याची दखलही कुणी घेत नाही.

एक आणखी नवीन प्रकार म्हणजे एक विषय किंवा चित्र घेऊन/देऊन कविता पाडणं! विषय जाहीर व्हायचा अवकाश, त्या विषयावरील कवितांचा धबधबा समूहावर सुरु होतो. किल्ली फिरवताच खेळण्यातील माकड किंवा अस्वल कसे झांजा वाजवायला सुरुवात करतात, तसे विषय किंवा चित्र मिळताच हे कवी कवितांचा रतीब सुरु करतात. एकाही कवितेला चव नसते. पण ‘समूहाची मानसिकता’ ओळखणारे बरोब्बर ‘अहो रूपं, अहो ध्वनी’ सुरु करतात. बरं, या कवी- कवयित्रींचा अविर्भाव आणि अभिनिवेश असा असतो की कालिदासापासून कुसुमाग्रजांपर्यंत सर्व मंडळी याच्या घरी पाणी भरत असावी. यांनी नामवंत एकाही साहित्यिकाचं साहित्य वाचलेलं नसतं. 

(एका समूहावर आरती प्रभू मुंबईत राहत होत्या की पुण्यात? हा प्रश्न विचारला गेला, तर दुसरीकडे केशवसुतांचा आणि पुलंचा कसा घरोबा होता, यावर एकाने प्रकाश टाकला होता. मी न राहवून केशवसुत पुलंच्या जन्माआधी गेल्याचं सांगितलं तर दुसऱ्याने ‘त्यांना बोरकर म्हणायचं होतं’ असं सांभाळून घेतलं. मग मूळ लेखकाने होय होय, तेच ते असं म्हटलं!) यांच्या नावाआधी उपाधी असल्यागत ‘कवी’ आणि ‘कवयित्री’ असे शब्द लावले जातात. इतरांनी नाही लावले, तर ते स्वत:च लावून घेतात. म्हणजे आपली ओळख करून देताना “नमस्कार, मी कवी अबक” किंवा “नमस्कार, मी कवयित्री कखग” अशी करून देतात.

सोऱ्यात गोळे भरून चकल्या पाडाव्यात तशा हे लोक भराभर कविता पाडत असतात. जो या कवितांचं (खोटंच, पणभरभरून) कौतुक करू शकत नाही, तो बरोबर वाळीत टाकला जातो. त्याची कितीही चांगली कविता असली तरी तिला अनुल्लेखाने मारलं जातं. पुढे कधीतरी तो सदस्य कंटाळून समूहाबाहेर पडतो किंवा निष्क्रिय सदस्य म्हणून त्याला काढून टाकलं जातं. काव्याचा सूर न सापडलेले हे बेसूर असुर या टोळीयुद्धात त्या प्रतिभावान एकांड्या शिलेदारांवर वरचढ ठरतात.

मला कधीकधी वाटतं, की हे असंच सुरु राहिलं तर चांगलं लिखाण बंदच होईल. वाईट नाणं चांगल्या नाण्याला चलनातून बाहेर काढू शकतं, या ग्रेशाम च्या नियमानुसार वाईट साहित्य चांगल्या साहित्याला हद्दपार करू शकेल. मग साहित्याचं भवितव्य या तथाकथित प्रतिभावान साहित्यिकांच्या हाती उरेल. हाही कलियुगाचाच परिणाम का? खरी प्रतिभा नाहीशीच होईल का? मग कदाचित समुद्रमंथनासारखं साहित्याचं मंथन करावं लागेल. आणि या साहित्य-रत्नाकरातून अस्सल प्रतिभावान रत्ने निपजतील. मी ते पाहायला असेन किंवा नसेनही. पण जिथे कुठे माझा आत्मा असेल, त्याला नक्कीच शांती मिळेल.

Monday, February 14, 2022

आयुष्याचा रंग

 


नक्की आठवत नाही पण साधारण 2015 हे वर्ष सुरू असावं, मी तेव्हा आकाशवाणीत काम करत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला दिनासाठी कोणता विशेष कार्यक्रम सादर करावा, यावर आम्ही विचार करत होतो... या चर्चेतून, "आदिवासी स्त्रियांच्या जगण्याचा आलेख" मांडण्याचं निश्चित झालं. एकदा ठरलं आणि मग आमचा शोध सुरू झाला. खीरकुंड, वस्तापूर, चिचपाणी या आदिवासी पाड्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. आधुनिक जगापासून दूर... पहाडाच्या कुशीत, दुर्गम भागात राहणाऱ्या या आदिवासी स्त्रीचं आयुष्य कसं आहे? सुधारणेचे कोणते कवडसे तिच्या पर्यंत पोहोचले आहेत? या प्रश्नांचा वेध आम्हाला घ्यायचा होता. 

नेहमीचा अनुभव असा होता की, कोणत्याही समाजाच्या - कोणत्याही व्यवसायाच्या स्त्रियांचा शोध घेणं सोपं असतं पण त्यांना बोलतं करणं आणि त्यांचं खरं जगणं जाणून घेणं कठीण असतं... हा अनुभव गाठीशी असल्याने एव्हाना हे आमच्या अंगवळणी पडलं होतं. वाटलं होतं की, इथेही तसाच अनुभव येईल... पण जणू कोणी यावं आणि आपल्या वेदनेला वाचा फोडावी, याचीच वाट पहात असाव्यात इतक्या मोकळेपणी त्या आदिवासी स्त्रिया बोलू लागल्या. सांगू लागल्या. त्यांच्या सांगण्यातून उलगडला होता त्यांच्या जगण्याचा संघर्ष! त्यांचा जीवन प्रवास! मुलीपणापासून तर  आजी होण्यापर्यंत बाईपणाच्या प्रत्येक टप्प्यातील वेदना, कष्ट आणि सुखसंवेदना त्यांनी मोकळेपणाने सांगितल्या. जी निर्भीडता त्यांच्या जगण्यात होती, तीच त्यांच्या बोलण्यातही होती. प्रसारमाध्यमांसमोर कथन करताना कोणताही संकोच त्यांच्यात नव्हता. खरंतर त्या फारश्या शिकलेल्या सुद्धा नव्हत्या. तिसरी चौथी पर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या या पाडयांमधील एखादीच जिद्दीने ज्ञानाच्या शोधात पाच- पाच तासांचा प्रवास करून दहावी बारावी पर्यंत पोहोचली होती. त्यापलीकडे शिक्षण घेणं त्यांच्यासाठी दुरापास्त होतं.

      या मुलींसोबत बोलताना एक आणखीन जाणवलं की, यांचं जगणं मोकळंढाकळं आहे, असं आपल्याला वाटतं पण त्या मोकळेपणा मागचे अडसर - कंगोरे चांगलेच बोचरे होते. सगळेजण म्हणतात, "यांच्यात बरं आहे... मुलीचा हुंडा मिळतो. तिला द्यावा लागत नाही", पण जगाला हे माहित नसतं की, मुलाकडचे लोक मुलीच्या आई-वडिलांना जो हुंडा देतात त्याबदल्यात जणू एखादा गुलामच विकत घेतात!... इतकी तिची पिळवणूक सबंध आयुष्यभर केली जाते. वयाच्या बाराव्या - पंधराव्या वर्षी तिला लग्न बंधनात अडकवलं जातं. त्यात आणखीन एक अडचण अशी की, दिवाळीच्या पांडव पंचमीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या मुलींना दुरून बघून मग त्यांच्या घरी जाऊन मागणी घातली जाते. प्रेमविवाह म्हणजे 'घरघुशीपण' असं समजलं जातं. अशा घरघुशी गोष्टींना तिथे मान्यता नाही आणि प्रतिष्ठा पण नाही. त्यामुळे ज्या दिसायला चांगल्या त्यांना पटकन मागणी येते परंतु ज्या साधारण ब-या आहेत किंवा नाहीत... अशांना अनेक तर्‍हेच्या यातना सोसाव्या लागतात. त्यांच्या रूपा प्रमाणे त्यांचा व्यवहार सुद्धा कमी-जास्त ठरवल्या जातो. लग्नानंतर कष्टाचा डोंगर पार करणं हा तर भोगवटा त्यांच्या नशिबी असतोच पण साध्या आरोग्य सुविधा सुद्धा कधी मिळत नाहीत. त्या आम्हाला सांगत होत्या की, "आम्ही बाळंतपण घरीच करतो. पहिले पाच दिवस बाळंतिणीला फक्त भगरीचे पातळ पाणी द्यायचं. इतर काही नाही. गोळ्यांवर आमचा विश्वास नाही." 

      कुपोषण वगैरे गोष्टी समजायच्या पलीकडे असतात. निसर्गात मनमुक्तपणे जगणं, नाच - गाणी हे सगळं जरी त्यांच्या आयुष्यात असलं तरी अंधश्रद्धांचं जोखड भोवती घट्ट आहे. मासिक पाळीचे पाच दिवस असोत की बाळंतपण अथवा मूलबाळ न होणं या सगळ्या काळात त्यांचं जगणं हे परंपरेच्या चौकटीतलं आणि अंधश्रद्धा जोपासणारं! ऐकतानाही अंगावर काटा उभा करणारं! भरीसभर छळायला सोबतीला व्यसनं असतातच. मिळणारा तुटपुंजा पैसा तोही खस्ता खायला भाग पाडतो. आदिवासी योजना भरपूर असल्या तरी त्यांच्या पर्यंत पोहचतच नाही.  तसं पाहता, त्यांच्या कष्टाचा आलेख सविस्तरपणे मांडायला पाचशे शब्दांची मर्यादा किंवा वीस मिनिटांचा अवधी अपुरा असतो इतकं त्यांचं आयुष्य बिकट आहे.  

    त्यांच्या मुलाखती घेऊन बाहेर पडताना आणखी एक जाणवलं की, ... निसर्ग आजूबाजूला चहुबाजूंनी फुललेला असतो... त्या निसर्ग सान्निध्यात आदिवासी पाड्याला भेट देणाऱ्या शहरी किंवा परदेशी पाहुण्यांसमोर चटकदार रंगाच्या रंगबिरंगी जोडालिजा परिधान केलेल्या... गळ्यात माळा, आसुली, नाकात नेठ्ठी, कानात तारोठा, हातात बिगडी, बोटात मुंदी, पायात दांदळे आणि हातात फुलांचे घोस घेऊन ढोल - बासरीच्या, घुंगराच्या नादात मागे पुढे पावलं टाकत, एका तालात नृत्य करणाऱ्या आणि मनातील उलथापालथीचा मागमूसही चेहर्‍यावर दिसू न देणाऱ्या त्या स्त्रियांच्या आयुष्यात मात्र प्रत्यक्ष रंगबिरंगी नव्हे तर फक्त नि फक्त करडा रंग आहे, हे तेव्हाच कळतं जेव्हा त्यांच्या अंतरंगात आपण डोकावतो!

- सीमा शेटे - रोठे, अकोला.

भास्कर संस्कार केंद्र,पार्वतीपूर,आसाम

संध्याकाळी पाच वाजता येतात  आणि सकाळी आठ वाजता परत जातात।"

आसामातल्या पार्वतीपूरच्या भास्कर संस्कार केंद्राचे अशोकभैय्या सांगत होते।

मी चकित।ही काय शाळेची वेळ?

ते म्हणाले," ही शाळा नाही।हा संस्कारवर्ग।"
इतका वेळ?

माझा हा प्रश्न बाहेर पडण्यापूर्वी अशोकभैय्या म्हणाले,
" शाळा आहेत इथे वेगवेगळ्या।मुलं दहा साडेदहाला शाळेला जातात। तुला सांगतो,३६ वर्षापूर्वी आम्ही इथे आलो तेव्हा नव्हत्या शाळा आणि शिक्षणाच्या सोयी।आम्ही सुरु केली होती तेव्हा पहिली शाळा।आता शाळा आहेत बऱ्याच। पण तुम्ही शाळेत मुलांना पाठवलं म्हणजे  झालं का?इथे घरोघरी  दारिद्रय पाचवीला पूजलेलं।तांदूळापासून मादकपेयं तर घरोघरी बनवली जातात।बायकामुलं सगळे पितात।अशानी संस्कार कसे व्हायचे?जवाबदार नागरिक कसे घडायचे?मुलांच्या सवयी,स्वच्छता,आरोग्य आणि अभ्यासाचं काय?आम्ही हे सगळं संस्कारवर्गाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय।शाळा पाचवीपर्यंतची सुरु आहेच।पण आता  संस्कारवर्गाचं काम भरपूर वाढलंय।

या संवादानंतर मला अशोकभैय्या,अलकाताईच्या खऱ्या  कामाची ओळख व्हायला सुरुवात झाली।आठवडाभर त्यांच्याबरोबर राहून,रोज सकाळ संध्याकाळ मुलांशी बोलून मला तिथे चाललेल्या प्रचंड कामाचा थोडासा परिचय झाला।संस्कारवर्ग,होमवर्क,ट्यूशन,ट्यूटोरिअल्स ,फिल्ड वर्क ,या वापरून गुळगुळीत झालेल्या शहरी शब्दांचा खरा अर्थ कळायला भास्कर संस्कार केंद्रात आठवडाभर रहायला हवं।तिथली स्थानिक भाषा शिकून ,लोकांना आपलंसं करून,मुलंमुली संध्याकाळ रात्रभर  ठेवायला तयार करून,त्या मुलांना घडवण्यासाठी या दांपत्यानी ३६वर्ष रक्ताचं पाणी केलंय।आता तर शिकणाऱ्या मुलामुलींना रात्रभर रहायला बोलावणं आणि जवाबदारी घेणं म्हणजे शहरी पांढरपेशा भाषेत "आ बैल,मुझे मार" किंवा मराठीत "लष्कराच्या भाकरी भाजणं "आहे।पण ही दोघंही ते  जीव ओतून करतायत।

इंग्रजी,गणित शिकवण्यापासून ,उठण्याबसण्याचे रिवाज शिकवण्यापासून तर आरत्या श्लोक,मंत्रपुष्प,गीतेचे अध्याय तोंडपाठ करून घेईपर्यंत सगळं काही मनापासून केलं जातंय।मुलं शिकतायत,अभ्यास करतायत,शिस्त अंगी बाणवतायत,ठरल्या वेळी मंदिरात आरती पूजेला येतायत,वाटून दिलेली कामं करतायत,व्यायाम करतायत,घरुन आणलेला डबा नीट खाऊन घासूनपुसून ठेवतायत,आपल्या गावच्या रीतीपध्दती गाणी गोष्टी लोकसंगीतनृत्य यांचा आनंद घेतायत नि सांभाळही करतायत।पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूर अमरावतीला दोन महिने राहायला येताना अशोकभैय्या अलकाताई चार पाच मुलामुलींना सोबत घेऊन येत।त्यांना शहरी संस्कृती, खानपान कपडे,बोलचाल ,स्वयंपाकपाणी सगळं शिकायला मिळावं असा त्यांचा प्रयत्न असे।दरवर्षी वेगवेगळी मुलं येत।असं अनेकांना अनेक तऱ्हांनी दोघं तयार करत होते। अलीकडे एकदा तीसेक मुलांना या भागातील वेगवेगळ्या संस्थांकडून त्यांनी कलाप्रदर्शनाची संधीही मिळवून दिली होती।

हे सगळं शांतपणे चिकाटीने,आणि कुठेही गवगवा न करता  तब्बल तीन तपे सुरु ठेवणाऱ्या अलकाताई अशोकभैय्या यांच्याबद्दल  काय बोलावं?अनेक पुरस्कार,कौतूकाचे क्षण वाटयाला आले,नाही असं नाही।पण, इथे शिकलेल्या मुलांनी पुढे लहान मुलांना शिकवायला इथेच येणं,किंवा शनिवारी संध्याकाळी संस्कारवर्गाला सुट्टी म्हणून मुलं आपापल्या घरी असतात तर तेव्हा त्यांच्या मायबापांनी एकदिवस दारु बंद ठेवणं, हे या दोघांना पुरस्कारापेक्षा जास्ती महत्वाचं  वाटतंय।खरंय।

"कोणी दखल घेणं न घेणं,आर्थिक मदत,वस्तू पाठवणं,यापेक्षा या मुलांना संधी देता येईल का हे कोणी पाहणं महत्वाचंय।" अशोक भैय्या तळमळीनी सांगतात।
म्हणजे?
"लाईक युथ एक्सचेंज प्रोग्राम......"अशोकभैय्या म्हणतात....
"म्हणजे यांना तुमच्याकडे बोलवा। मिसळू द्या।इथल्या कला तिथे सादर करू द्या।नवीन शिकण्याची संधी द्या।त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून द्या। स्वतःची खरी ओळख निर्माण करु द्या।खूप शार्प,कलावंत,बुद्धिवंत मुलं आहेत यांच्यात।त्यांच्यातून उत्कृष्ट कलाकार,खेळाडू,धावपटू निर्माण होण्याची शक्यताआहे ।आमच्या क्षमता मर्यादित आहेत।आम्हाला यासाठी तुमच्या मदतीच्या हातांची गरज आहे।"

अशोकभैय्यांचं बोलणं मनात साठवूनच मी परत माझ्या गावी आले।मुलांसाठी संधी शोधण्याचा प्रयत्न करायचाच असं ठरवूनच।तोवर पुस्तकं,खेळणी,कपडे या रूपानं तर मुलांपर्यंत पोहोचता र्यईलच।तुम्हालाही।पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे
तुम्हाला काही सांगता येईल का ?मुलांना आपापल्या शहरात बोलावण्याच्या एखाद्या अशा संधीबद्दल?

मेनी लाइव्हज मेनी मास्टर्स

 


"मेनी लाइव्हज मेनी मास्टर्स" हे मूळ इंग्रजी पुस्तक मध्यंतरी वाचायला मिळालं. याचे लेखक डॉक्टर ब्रायन वाईस हे मानसोपचार तज्ञ आहेत. यापूर्वी ७० च्या दशकात रेमंड मूडी यांनी त्यांच्या पुस्तकात अनुभव -मृत्यू समीपचे (near death experience) अशी नवी संज्ञा वापरून माणसांचा मृत्यूनंतरचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण तथ्यांसह हा विषय कुठे लिहिल्या गेल्याचे दाखले नाहीत. डॉक्टर ब्रायन वाईस यांनी प्रथम १९९४ मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर २००८ पर्यंत त्याच्या बर्‍याच आवृत्ती निघालेल्या आहेत.

 डॉक्टर वाईस यांच्या कॅथरिन नावाच्या रूग्णेला विचित्र भयावह स्वप्ने पडण्याचा आणि जुनाट चिंता रोगाने ग्रासले होते. तिच्या उपचारासाठी डॉक्टर वाईस यांनी नेहमीचे मानसोपचार, औषधोपचार करूनही जेव्हा तिला आराम पडला नाही तेव्हा हिप्नोसिस चा वापर करण्याचे ठरवले. या उपचार पद्धती दरम्यान कॅथरीन चे पुनर्जन्माचे अनुभव- पूर्वजन्मातील घटना तिने सांगणे, त्या हजारो वर्षांपूर्वीच्या जवळपास सात वेगवेगळ्या जन्म काळाचे आजच्या तिच्या अस्तित्वाशी संबंध असणे, आणि या उपचार काळात तिचे हळूहळू या आजारातून बाहेर येणे असा संपूर्ण अनुभव या पुस्तकात वर्णिलेला आहे.
 डॉक्टर वाईस फ्लोरिडा येथील प्रथितयश मानसोपचार तज्ञ आहेत. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल कॉलेज मधून वैद्यकीय पदवी त्यांनी मिळवली आहे. मियामी मधील प्रतिष्ठित माऊंट सिनाई मेडिकल सेंटरच्या मानसशास्त्र विभागाचे ते अध्यक्ष आहेत .अनेक रिसर्च पेपर्स त्यांच्या अभ्यासातून लिहिलेले आहेत. दररोज अनेक मानस व्याधीने ग्रस्त  रुग्णांना ते उपचार देतात. त्यांच्या कॅथरीन च्या आजारावरचा अनुभव त्यांचेही आयुष्य कसे बदलत गेला हे या पुस्तकात वाचणे अतिशय रोमांचक अनुभव होता .

मृत्यूनंतरचे विश्व, पुनर्जन्माचे दाखले त्यातील गूढ,  आत्म्याचे अस्तित्व (मास्टर्स) असे  अनेक तर्कबुद्धीला न पटणाऱ्या विषयांबद्दल हे पुस्तक वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पाडते.

 कॅथरीनचे  संमोहनातील उपचारांनी व्यक्त होणे, अचेतन मनातील अनुभव स्पष्ट नाव ,काळ, ठिकाणांसह सांगणे, यावर सुरुवातीला डॉक्टर वाईस यांचाही विश्वास बसला नव्हता .काही सिटिंग्ज नंतर जेव्हा तिच्या एका पूर्वजन्माविषयी सांगताना तिने डॉक्टर वाईस चा संबंध तिथे कसा होता, आज ज्या मित्र सुह्रदांनी तिला आग्रह पूर्वक त्यांच्याकडेच उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला, डॉक्टर वाईस यांच्या सध्याच्या फारशा माहीत नसलेल्या कुठल्याच पार्श्वभूमी बद्दल सविस्तर बोलणे ,डॉक्टर वाईस यांच्या वडिलांचा मृत्यू, पहिल्या अपत्याचा मृत्यू ,त्यांच्या वडिलांचे मूळ जुइश नाव जे कुणालाही ठाऊक असण्याचा संबंध नव्हता अशा बऱ्याच गोष्टींमुळे तसेच कॅथरिनचे पूर्वजन्मातील दाखले आणि दोन जन्मांच्या मधल्या अवस्थेत आत्मा ही संकल्पना, त्यांचे प्रकार विस्तृतपणे सांगणे या सगळ्यांमुळे पुस्तक वाचताना कुठेतरी तर्कबुद्धी पण गुंडाळून ठेवाविशी वाटते.

 घसा आवळल्यासारखे  अचानक भयावह अनुभव येणे, पाण्यात बुडण्याची भीती वाटणे ,जबरदस्त भय जाणवणे ही सगळी औषधांनी अठरा महिने कमी न झालेली लक्षणे जेव्हा संमोहन तंत्रामुळे कॅथरीन पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या बद्दल सांगू लागली आणि प्रत्येक सिटिंग गणिक तिची ही लक्षणे कमी होताना दिसू लागली तेव्हा डॉक्टर वाईस यांनी त्यांच्या बारीक नोंदी ,काही ऑडिओ टेप्स बनवायला सुरुवात केली. संमोहित अवस्थेतून बाहेर आल्यावर कॅथरीनला ते फारसे ऐकण्याची इच्छा नसायची .शिवाय तिचे याबाबत काही प्रशिक्षण /पूर्व ज्ञानही नव्हते .ठरवून- रंगवून एखादी कथा सांगावी याची शक्यता त्यामुळे वाटत नाही .प्रत्येक सिटिंग चे वर्णन शहारे आणणारे मात्र आहे.
 डॉक्टर वाईस  यांनी कॅथरीन नंतर या तंत्राने वेगवेगळ्या १२ रुग्णांवर उपचार पद्धती वापरून त्यांच्यात सकारात्मक बदल घडल्याचे म्हटले आहे. यातील प्रत्येक रुग्णाने पूर्वजन्मीचे अनुभव सांगत त्यातील गूढता कमी करत त्याचा या जन्मातील संबंध दाखवत आजार कमी झाल्याचे दाखले दिले आहेत.

 प्रामुख्याने आधी अनेक जन्मात आपले अस्तित्व होते तसे पुढेही अनेक जन्म आपण घेत राहू हा समज त्यांना मृत्यूच्या भीती पासून लांब ठेवू शकतो आणि निर्भय, आनंदी आयुष्य देऊ शकतो हा संदेश डॉक्टर वाईस या पुस्तकातून देतात .मूळ पुस्तक एक अनुभव मिळवण्यासाठी नक्की वाचायला हवे.

~~वर्षा~~