नुकत्याच लता मंगेशकर गेल्या, रमेश देव, अनिल अवचट, बिरजू महाराज, बिपीन रावत हे सारे त्यांच्या थोडेच आधी गेलेले. प्रत्येक वेळी कुणी गेलं की त्यांच्याविषयीच्या माहितीचा आणि आठवणींचा महापूर समाज माध्यमांवर येत असतो. ते स्वाभाविकही आहे. पण आताशा एक नवीन ट्रेंड सुरु झालाय, कवितेतून श्रद्धांजली वाहण्याचा! लतादीदींच्या निधनानंतर तर या काव्यात्मक श्रद्धांजलीचा इतका अतिरेक झाला की ‘श्रद्धांजली नको, कविता आवर’ असं म्हणावंसं वाटू लागलं.
आजकाल झालंय काय, की साहित्याला वाहिलेले असंख्य समूह समाज माध्यमांवर सक्रीय झालेत. या समूहांवर कित्येक थोर्थोर साहित्यिक, कवी, कवयित्री असतात. प्रत्येकच जण आपलं प्रत्येक लिखाण (अति)उत्साहाने त्या समूहावर टाकत असतं. त्यातलं ९५% तद्दन सुमार दर्जाचं असतं. ४% जरा बरं तर क्वचित १% चांगलं असतं. मात्र या सुमार लेखनाचं एवढं कौतुक सुरु असतं, की माझ्यासारखा एखादा रसिक वाचक गोंधळात पडतो. कविता म्हणून ज्या लिखाणाची भरभरून प्रशंसा होत असते त्यात लय, शब्दसौंदर्य आणि इतर काव्यगुणांचा पूर्ण अभाव असतो. काही ठिकाणी वृत्ताची प्रचंड मोडतोड असते तर काही ठिकाणी वृत्त काटेकोर पाळलेलं असूनही काव्यात प्राणच नसतो. गझलांना तर आजकाल एवढे सुगीचे दिवस आलेत की संपूर्ण उर्दू, अरबी आणि पर्शियन भाषांतील एकूण गझलांपेक्षा मराठीत जास्त गझला लिहून झाल्या असतील. अक्षरशः दगड उचलला की गझलकार आणि गझलकारा सापडतात आजकाल. काही गझलकार मुद्दाम मतला, मक्ता, गैरमुरद्दफ, मुसलसल, गैरमुसलसल असे शब्द (बरेचदा चुकीचे ) वापरून इतरांवर इम्प्रेशन पाडू पाहतात. प्रत्यक्ष सुरेश भट, इलाही जमादार यांसारख्या गझलकारांचा झाला नाही एवढा यांचा उदोउदो होत असतो. या सर्व प्रकारच्या पद्यांची होणारी प्रचंड वाहवा पाहता ‘हे सर्व खोटारडे आहेत, की आपल्याला काव्यातलं काही समजेनासं झालंय’ असा प्रश्न पडू लागतो.
‘अप्रतिम’ हा शब्द तर इतका वापरला जातो, की खरोखरच्या अप्रतिम लिखाणासाठी तो वापरावासा वाटत नाही. आणि हो, १% चांगल्या लिखाणाचं नशीब मात्र खडतर असतं. कारण या ‘अप्रतिम’, ‘बढिया’, ‘बहोत खूब’ म्हणवल्या जाणाऱ्या कवितांच्या भाऊगर्दीत त्याची दखलही कुणी घेत नाही.
एक आणखी नवीन प्रकार म्हणजे एक विषय किंवा चित्र घेऊन/देऊन कविता पाडणं! विषय जाहीर व्हायचा अवकाश, त्या विषयावरील कवितांचा धबधबा समूहावर सुरु होतो. किल्ली फिरवताच खेळण्यातील माकड किंवा अस्वल कसे झांजा वाजवायला सुरुवात करतात, तसे विषय किंवा चित्र मिळताच हे कवी कवितांचा रतीब सुरु करतात. एकाही कवितेला चव नसते. पण ‘समूहाची मानसिकता’ ओळखणारे बरोब्बर ‘अहो रूपं, अहो ध्वनी’ सुरु करतात. बरं, या कवी- कवयित्रींचा अविर्भाव आणि अभिनिवेश असा असतो की कालिदासापासून कुसुमाग्रजांपर्यंत सर्व मंडळी याच्या घरी पाणी भरत असावी. यांनी नामवंत एकाही साहित्यिकाचं साहित्य वाचलेलं नसतं.
(एका समूहावर आरती प्रभू मुंबईत राहत होत्या की पुण्यात? हा प्रश्न विचारला गेला, तर दुसरीकडे केशवसुतांचा आणि पुलंचा कसा घरोबा होता, यावर एकाने प्रकाश टाकला होता. मी न राहवून केशवसुत पुलंच्या जन्माआधी गेल्याचं सांगितलं तर दुसऱ्याने ‘त्यांना बोरकर म्हणायचं होतं’ असं सांभाळून घेतलं. मग मूळ लेखकाने होय होय, तेच ते असं म्हटलं!) यांच्या नावाआधी उपाधी असल्यागत ‘कवी’ आणि ‘कवयित्री’ असे शब्द लावले जातात. इतरांनी नाही लावले, तर ते स्वत:च लावून घेतात. म्हणजे आपली ओळख करून देताना “नमस्कार, मी कवी अबक” किंवा “नमस्कार, मी कवयित्री कखग” अशी करून देतात.
सोऱ्यात गोळे भरून चकल्या पाडाव्यात तशा हे लोक भराभर कविता पाडत असतात. जो या कवितांचं (खोटंच, पणभरभरून) कौतुक करू शकत नाही, तो बरोबर वाळीत टाकला जातो. त्याची कितीही चांगली कविता असली तरी तिला अनुल्लेखाने मारलं जातं. पुढे कधीतरी तो सदस्य कंटाळून समूहाबाहेर पडतो किंवा निष्क्रिय सदस्य म्हणून त्याला काढून टाकलं जातं. काव्याचा सूर न सापडलेले हे बेसूर असुर या टोळीयुद्धात त्या प्रतिभावान एकांड्या शिलेदारांवर वरचढ ठरतात.
मला कधीकधी वाटतं, की हे असंच सुरु राहिलं तर चांगलं लिखाण बंदच होईल. वाईट नाणं चांगल्या नाण्याला चलनातून बाहेर काढू शकतं, या ग्रेशाम च्या नियमानुसार वाईट साहित्य चांगल्या साहित्याला हद्दपार करू शकेल. मग साहित्याचं भवितव्य या तथाकथित प्रतिभावान साहित्यिकांच्या हाती उरेल. हाही कलियुगाचाच परिणाम का? खरी प्रतिभा नाहीशीच होईल का? मग कदाचित समुद्रमंथनासारखं साहित्याचं मंथन करावं लागेल. आणि या साहित्य-रत्नाकरातून अस्सल प्रतिभावान रत्ने निपजतील. मी ते पाहायला असेन किंवा नसेनही. पण जिथे कुठे माझा आत्मा असेल, त्याला नक्कीच शांती मिळेल.