Wednesday, July 14, 2021

अमेरिका डायरी - जनजीवनातून फेरफटका 2

 


Mohini -Giving presentation

एका क्लबमधलं प्रेझेंटेशन आटोपून लगेच चेस्टर या गावात सुमारे १०० एकरात वसलेल्या देखण्या वाईडनर विद्यापीठाला भेट द्यायला गेलो होतो. ४० हून अधिक पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे पर्याय तिथे होते. भव्य प्रशस्त इमारत, हिरवंगार लॉन याचं आता विशेष वाटेनासं झालं होतं.
Widner University

इकडच्या कॉलेजेसच्या हिरवळींवर दिसणारं अजब दृश्य म्हणजे आपापले लॅपटॉप समोर उघडून काही विद्यार्थी अगदी नौकासन पोझमध्ये लोळत अभ्यास किंवा वाचन किंवा जे काय ते करत असतात. कुणी एकटे, कुणी ग्रुपने. इथे खात पीत बिनधास्त पहुडलेल्या विद्यर्थिनी बघून मला आजूबाजूच्या मुलांकडे दुर्लक्ष करत हनुवटी गळ्याला चिकटवून खालमानेने चालणार्‍या माझ्या काही कॉलेजमधल्या मैत्रिणी आठवून हसू यायचे. या विद्यापीठातली दालनं, विभाग, वाचनालयं बघायला बरच चालावं लागू नये म्हणून आवारात मिनी बसेस सतत फिरत असायच्या. 



Watching Saturn- Golden moment 
या गावात मॉल, कॅसिनो, एक स्टेडियम वगैरे पाहिलं पण आवर्जून लक्षात राहिलं ते हे विद्यापीठ. ते ही एका विशेष घटनेसाठी. इथल्या खगोलशास्त्राच्या प्राध्यापकांनी आम्हाला रात्री विद्यापीठाच्या गच्चीवरील त्यांच्या महाकाय टेलीस्कोपमधून अवकाशाचा नजारा बघायचे आमंत्रण दिले होते. आम्ही जेवण उरकून पटापट तयार होऊन पोचलो तर त्यानी सगळे सज्ज करुन ठेवले होते. गच्चीवरून सभोवताली लुकलुकणारे चेस्टर गावातले दिवे बघणं हा सुंदर अनुभव होताच पण तिथून आकाश केवळ अद्भुत दिसत होते. प्राध्यापकांनी आम्हाला त्या टेलीस्कोपच्या क्षमतेबद्दल सांगितले. त्याला डोळा लावला आणि मी जवळपास अत्यानंदाने ओरडायचीच बाकी होते कारण केवळ पुस्तकात, चित्रात पाहिलेला, प्रत्यक्षात १.३४ अब्ज किमी अंतरावर असलेला ’शनी’ म्हणजेच सॅटर्न अगदी जवळ, हाताच्या अंतरावर दिसत होता. त्याच्याभोवतीची रुपेरी कडी अगदी चमचमत होती. मुलांची त्या क्षणाला वेड्यासारखी आठवण आली. त्यांना त्या वयात शनीबिनी काही कळलं नसतं पण हे त्यांनी बघायलाच हवं होतं असं वाटलं. आम्ही सगळेच त्या अनुभवाने इतके भारावून गेलो होतो की नंतर सगळे मूक झाले. अनंत अवकाशातल्या अनेक आकाशगंगांपैकी एकीच्या अनेक सौरमालांपैकी एका सौरमालेचा भाग असलेला तो महाकाय पण आता अगदी चेंडूएवढा दिसणारा ’शनी’. त्या सौरमालेतल्या एका य:कश्चित ग्रहावरच्या अब्जावधी माणसांपैकी एक आपण. कदाचित आपले इतके नगण्य असणे जाणवल्याने कुणीच कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

At state capitol with a senator

पुढची विशेष भेट होती हॅरिसबर्गमधल्या स्टेट कॅपिटल इमारतीला म्हणजेच विधानभवनाला. (पेनसिल्व्हेनिया राज्याची जनरल असेंब्ली) विधिमंडळात Senate चे ५० आणि House of Representatives चे २०३ असे एकूण २५३ सदस्य असतात. फेडरल पद्धतीमुळे तिथली राज्ये स्वायत्त असल्यासारखे काम करु शकतात. राज्याचा गव्हर्नर हा सर्वेसर्वा. आपल्याइतके केंद्राचे नियंत्रण त्यावर नसते. त्यातून पेन्सिल्व्हेनिया राज्य म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्यचळवळीचा केंद्रबिंदू होते त्यामुळे त्याला विशेष मानाचे स्थान आहे. तर विधीमंडळाचे दैनंदिन कामकाज गॅलरीत बसून पाहण्याची आम्हाला संधी मिळाली. आत प्रवेश करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आमची कडक तपासणी झाली (म्हणजे कमरेच्या पट्ट्यापासून सगळे स्कॅनिंग ट्रे मध्ये टाकून) त्यामुळे आपला ट्रे बाहेर येईतो आमचे सर दोन्ही हातांनी पँट घट्ट पकडून उभे राहत. गॅलरीतून आम्ही त्यांचे कामकाज पाहिले. अगदी सौजन्यसप्ताह असावा तसे नम्रपणे त्यांचे बोलणे सुरु होते. शिरा ताणून आरडाओरडा नसेल, बेंच बडवणं नसेल आज या ठिकाणी तर याला काय अर्थ आहे का अध्यक्षमहोदय! अगदीच कोमट राजकारणी!
Senator's bench in the Main hall 

यांना एकदा आपल्या विधानसभेतली धमाल आणि रस्त्यावरची गॉगलधारी पोस्टरबाजी दाखवली की कळेल राजकारण किती खमंग प्रकार असतो. अर्थात तिकडचे राजकारणीही एकमेकांच्या उरावर बसतात पण सॉफिस्टिकेटेड पद्धतीने. असो. कामाचा तास संपल्यावर या भेटीसाठी आमंत्रित करणारे सिनेटर आमचे उत्सुक चेहरे पाहून आम्हाला गॅलरीतून मुख्य हॉलमध्ये घेऊन आले. काही जणांशी परिचय करुन दिला. तिथली

नेत्रदीपक झुंबरं, दिव्यांची आकर्षक रचना, सिव्हिल वॉरची प्रचंड तैलचित्रं विधानभवनाच्या रुबाबात भर घालत होती. आता हे सगळे लाईव्ह सेशन जॉईन करुन किंवा आभासी सहलीच्या माध्यमातून घरबसल्याही सहज बघता येते. http://www.pacapitol.com/keystone-classroom/legislature.cfm


’अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ या गाण्यावर आपल्या पिढीतल्या बहुतेक प्रत्येकाने आलटून पालटून एक हात कमरेवर आणि दुसर्‍या हाताच्या कुयर्‍या डॊलवत नाच केलेला असतो. हा बंगला चक्क प्रत्यक्ष पाहायला मिळाला तो हर्शेज चॉकलेटच्या भल्यामोठ्या फॅक्टरीमध्ये. स्वागतकक्षात चॉकलेटचे असंख्य प्रकार. आत गेल्यावर एका छोट्या गाडीत बसून आम्हाला त्या चॉकलेटनगरीची झलक दाखवण्यात आली. चिमुकला धबधबा, त्याजवळून वाहणारी नदी, काठावरची फुलं सगळं काही चॉकलेटचं. अध्येमध्ये चॉकलेटची कार्टून्स. अगदी मायानगरीत विहार केल्याचा अनुभव होता तो. या सगळ्यामधून गाडी हळूच पास होई तेव्हा ते मधाळ रंगाचं वाहतं चॉकलेट ओंजळीत उचलून घ्यावसं वाटे. सफर संपली. दर फार नसल्याने इथून आम्ही मुलांसाठी, नातलगांना भेट देण्यासाठी भरपूर चॉकलेट्सची खरेदी केली.


तिकडून दौरा होता सफरचंदाच्या बागेत. अगदी जमिनीला टेकायला आलेले लालचुटूक रसरशीत सफरचंदांचे घोस मी याआधी कधीच पाहिले नव्हते. तिथे बसून ज्युस घेतला. बाजूला एक सुंदर तळं आणि काठावर मासेमारी करत सुटटी घालवणारे हौशी. मागे इटुकलं फार्महाऊस. स्वप्नातलं घर. दुसर्‍या
with network admin of Newmann college

दिवशी न्यूमन कॉलेजचे कॉम्प्युटर नेटवर्क बघण्याची आणि शिकण्याची मला संधी मिळाली. व्यावसायिक ठिकाणी एकट्याने जावे लागे. तिथली अ‍ॅडमीन एक स्मार्ट मुलगी होती, तिने हातचं न राखता सगळी माहिती दिली, मला सिस्टीम ऑपरेटही करु दिली.


याच आठवड्यात एक मोठे हॉस्पीटल, तिमजली जिम आणि वावा या फूड कंपनीचा सबंध प्लांट आतून बघता आला. एका संध्याकाळी खास भारतीय पोशाखात चीज अ‍ॅंड वाईन पार्टीला हजर राहून आम्ही एक बॅले कम नृत्यनाट्य बघायला गेलो. प्रेमाचा त्रिकोण हे जगभरातलं सर्वाधिक आवडतं कथानक असलेल्या या बॅलेतील कलाकारांचा पदन्यास, तांत्रिक सफाई, पेहराव, नेपथ्य खिळवून टाकणारं होतं. तिकडून आम्ही एका भारतीय उपाहारगृहात डिनरला गेलो. खूप दिवसांनी वाफाळत्या पंजाबी डीशेस आणि तंदूर ’रोटी’ बघून मला एकदम कभी खुशी कभी गममधल्या काजोलसारखं देशप्रेमाचं भरतं आलं. आमच्यासोबत असलेले परदेशी पाहुणे पापड काट्याने तोडून खाताना पाहून आमची हसून पुरेवाट झाली.

Dinner at Indian Restaurant with host families


मग त्यांना आपले पदार्थ हाताने कसे खायचे ते प्रात्यक्षिक करुन दाखवलं. जेवणानंतर जरा दूरवर पार्क केलेल्या गाड्यांच्या दिशेने आम्ही निघालो. मी सिल्क साडी नेसलेली आणि स्लीव्हलेस ब्लाउज. आत हीटर्स असल्याने जाणवलं नाही पण बाहेर थंडीची जीवघेणी लाट आतून गेली. माझे दातच वाजू लागले. पाऊल टाकणं अवघड झालं. काकडल्याने श्वास घेता येईना. एका क्षणी तर मी आता कोसळते असं वाटलं. डॉ. श्रीयाने तिचा स्टोल माझ्याभोवती गुंडाळून मला खेचतच गाडीपाशी नेऊन आत ढकललं. माझे हात चोळले. आतल्या उबेने हळूहळू जीवात जीव आला. त्या क्षणी सियाचेन सारख्या ठिकाणी आपले सैनिक कसे जगत असतील याचा मी जगाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या चेस्टर गावात बसून विचार करत होते. 


Tuesday, July 13, 2021

थरार

 आम्ही दोघं पहिल्यांदा दुबईला गेलो, तेव्हा निकिता चे इंजीनियरिंग चे लास्ट इयर होते. त्यामुळे तिला आमच्या बरोबर येता आले नाही. मग जेव्हा अक्षयने दुबई सोडायचे ठरवले, तेव्हा आमची दोघींची दुबई ट्रीप ठरली.मी नुकतीच जाऊन आले होते,त्यामुळे एक्साइटमेंट अशी नव्हती फार! पण तेवढीच एकत्र मजा! अर्थात अबुधाबीची काही नवीन ठिकाणे बघायला मिळाली,तिथले  sand storms  अनुभवता आले. शॉपिंगही विदाऊट जेंट्स डिस्टर्बन्स मनसोक्त असे करता आले. 😀

         आम्ही दुबईला रात्री पोहोचलो.दुसऱ्या दिवशी लगेच साईट सिइंगला सुरुवात !पहिल्याच दिवशी Mall of Emirates पाहून, हॉटेलिंग ,शॉपिंग इत्यादी आटपून आम्ही मेट्रोने परत आलो.तिथे मेट्रो खूपच जास्त convenient पडते,टॅक्सी वगैरे पेक्षा! अक्षय ने आम्हाला कार्ड्स देऊन ठेवले होते, जे मेट्रो बस दोन्हीकडे चालतात. मेट्रो स्टेशन मधून बाहेर पडलो, बरीच रात्र होत आली होती. आता टॅक्सी करून घरी जाणार होतो, पण तेवढ्यात बस अगदी आमच्या समोर येऊन उभी राहिली, चला,चला करत बस मध्ये चढलो. बसला दोन दारं होती. गर्दी झाल्याने आम्ही मागच्या दाराने तर निकिता पुढच्या दाराने बस मध्ये चढली. आम्ही खूप दूर दूर होतो.फक्त कन्फर्म करून घेतलं की ही चढलीयेना?
          आणि मग इतक्या दिवसांनी भेटल्याने आमच्या गप्पा सुरू झाल्या, त्या जरा जास्तच रंगल्या. आमचा स्टॉप आल्याचे लक्षात आल्यावर अक्षय पटकन उभा राहिला आणि म्हणाला आई उतर, move fast! आणि उतरून गेला. बस मधून उतरताना कार्ड स्वाईप करावं लागतं. तर मी ते करत होते, तेवढ्यात बसचं दार lock होऊन गेलं. मी माझ्या परीने ते उघडण्याचा प्रयत्न करत होते आपल्यासारखं (दादा, बघा तर काय झालं,असं कोणाला म्हणणार?) दार काही उघडेना, क्षणभर काय करावे सुचेना, आणि स्वतःचा राग आला साधं दार उघडता येत नाही बसचं? मग मी जरा मोठ्याने हेल्प मागितली मग कुणीतरी सांगितलं तसं केलं आणि हुश्श! उघडलं एकदाचं दार! मी अक्षरशः उडीच मारली खाली! लगेच बस सुटली!
     (यात काय एवढं विशेष? असं वाटलं ना? थांबा!)
मी खाली उतरले,तशी अक्षय ओरडला ,अगं आई, निकिता कुठेय? म्हंटलं, मला काय माहित? मी कार्ड स्वाईप करेपर्यंत दार कसं लॉक झालं ते सांगितलं. आमच्या एकदम लक्षात आलं की किती भयंकर गोष्ट झाली आहे 🙄 बस मध्ये पुढच्या बाजूला असल्याने निकिता एकटीच बस मध्ये बसून पुढे निघून गेली होती. तिच्याजवळ ना घराचा ऍड्रेस, ना फोन (कारण आपल्या फोनची सिम तिथे चालत नाही.) ना कुठले फोन नंबर! त्या वेळी wa app  होतं, पण फोनच बंद होता ना! रात्रीची वेळ, बरं, तो discovery gardens म्हणून fully residential area!  प्रचंड संख्येने, एकसारख्या दिसणाऱ्या सुरेख आर्किटेक्चर चा नमुना असणाऱ्या अशा सगळ्या बिल्डिंग मला तर दुसऱ्यांदा गेले तरी, कन्फ्युज व्हायचं इतका अवाढव्य एरिया!काहीतरी मेन रोडवरच्या दुकानाची खूण लक्षात ठेवायची मी!
      मला जेव्हा समजलं की काय झालेय ते,माझ्या हाता पायातली तर शक्तीच गेली आणि डोळ्यातून धारा वाहायला सुरुवात झाली. रात्रीची वेळ ,सुनसान रस्ते, परका देश, दुबईलतला पहिलाच दिवस , बरं,कुणाची मदत मागावी, तर जवळ काहीच नाही.
आम्हाला गेल्यागेल्याच अक्षयने सगळे फोन नंबर व ॲड्रेस एका कागदावर लिहून दिले होते आणि बजावलं होतं की, कुठेही बाहेर पडाल तर पासपोर्ट आणि हा कागद जवळ ठेवा.पण पहिल्याच दिवशी असं काही होईल काय कल्पना ?ते सगळं माझ्या पर्समध्येच राहिलं. अचानक टॅक्सी ऐवजी बसमध्ये चढल्यामुळे!🤦🏻‍♀️ बरं, पुढचा स्टॉप कुठे आहे? शेवटचा स्टॉप किती दूर आहे? हे काहीही माहित नव्हतं. कारण अक्षय ही जास्त कारनेच  ट्रॅव्हल करायचा.
             अक्षय ने पटकन निर्णय घेतला. म्हणाला, आई ,मी बसच्या मागे धावत जातो. अरे ,काय वेडा आहेस का तू? बसचा  स्पीड काय? काहीतरीच!त्यावेळी तो  marathon, triathlon runner होता. तरी काय झालं ?त्याने खरंच बसच्यामागे धावायला सुरुवात केली. कल्पना करा, दुबई सारखी gulf country, काळोखे सामसूम रस्ते, डोळ्यासमोर निघून गेलेली बस, त्यामागून धावणारा अक्षय, कसं दृश्य असेल ते! मती गुंग होणे म्हणजे काय ते मला तेव्हा समजलं. आपण आता काहीच करू शकत नाही ,असं वाटून आणखीनच जोरात अश्रुधारा व्हायला लागल्याआणि मी तिथे एका दुकानात खुर्चीवर मटकन् बसून घेतलं. मनात इतके भयंकर आणि वाईट वाईट विचार आले की काय सांगू? आपली मुलगी आपल्याला आता कुठल्या परिस्थितीत भेटेल? (सर्व सिनेमा वेब सिरीज मध्ये पाहिलेलं पुस्तकात वाचलेलं असं सगळं डोळ्यासमोरून जाऊ लागलं.) सगळ्यात वाईट असतं ,ते हेल्पलेस फिलिंग!
        रस्त्यांवर तिथे एरवीही फक्त गाड्याच असतात आणि इतक्या रात्री तर कोणीच नव्हतं रस्त्यावर! काय करेल ही पोरगी? अशा सगळ्या विचारात मी असताना, अचानक मला अक्षय व निकिता समोरून येताना दिसले.मला आधी भासच वाटला, पण नाही दोघे शांतपणे चालत येत होते.
       तर मंडळी,झालं असं की आम्ही उतरल्यावर निकिताने सहज पाहिलं की,आम्ही आहोत ना बसमध्ये? पण तिच्या लक्षात आलं काय झालेय ते! ती पटकन  नेक्स्ट टॉप ला उतरून गेलीआणि काय करावं याचा जास्त विचार न करता,panic  न होता, शांतपणे बस ज्या मार्गाने आली होती त्या मार्गाने मागे चालत राहिली. अक्षय धावत होताच् भेटले दोघेजण! बाल बाल बचे! 🙏

Monday, July 12, 2021

वारकरी संप्रदाय

 


दरवर्षी नित्य नेमाने "वारी" करणारे वारकरी, वारी चुकुनही चुकू नये, ती घडावी म्हणून जिवाचा आटापिटा करणारे  आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसायची तयारी असणारे वारकरी---आणि जी घडावी, सफल संपूर्ण व्हावी म्हणून   अक्षरशः स्वतःला ज्यासाठी झोकून देतात, ती वारी--ह्या सगळ्याविषयी मनात एक कुतूहल होते, उत्सुकता होती, जी बऱ्याच जणांना असेलच. ऊन,पाऊस, वारा, वादळ, थंडी--कशाचीही पर्वा न करता, अनवाणी पायांनी, खाण्यापिण्याची आबाळ सोसूनही जे कधीही वारी चुकू देत नाहीत, आणि इतके कष्ट घेऊनही प्रत्यक्ष आषाढीला फक्त कळसाचेच दर्शन घेऊन समाधान पावतात. त्यांच्यात इतकं "आत्मिक बळ" कुठून येत असेल? कुठली "अनामिक इच्छा, आंतरिक ओढ" त्यांना हे सगळं करायला प्रवृत्त करत असेल? 

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जरी नाही तरी बरीचशी माहिती मिळण्याचा योग आला. पालघरला लेकीकडे आलेली असतांना "वारकरी संप्रदाय" हे गुरुदेव शंकर अभ्यंकरांचे पुस्तक वाचायला मिळाले.  ह्या पुस्तकात भारतीय संप्रदाय, वारकरी संप्रदाय, पंढरी महात्म्य, पुंडलिक महात्म्य, प्रमाण ग्रंथ,जसे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव,चांगदेवपासष्ठी,हरिपाठ---अशी बरीच प्रकरणे असून त्याविषयी माहिती दिलेली आहे. याशिवाय वारकरी संप्रदायाचे योगदान, संप्रदायातील संत पुरुष, वारकऱ्यांची तीर्थक्षेत्र ह्याविषयी खूप काही वाचायला मिळाले.
"गुरू तेथे ज्ञान|ज्ञानी आत्मदर्शन|
दर्शनी समाधान|आथी जैसे|"
"प्रपंची भाग्य, परमार्थी वैराग्य
दोन्ही यथासांग,दोन्हीकडे".
(समर्थ रामदास )
 महाराष्ट्रातील सर्व संप्रदायामध्ये संख्येने निःसंशय मोठा,प्रधान आणि अत्यंत लोकप्रिय असलेला असा "वारकरी संप्रदाय" हा महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे. कर्नाटकात आणि काही अंशी आंध्रप्रदेशातही  प्रचलित असलेल्या या संप्रदायालाच "भागवत धर्म" वा "माळकरी पंथ" असेही म्हणतात. वारकरी संप्रदाय म्हणजे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांचा अभूतपूर्व समन्वय होय. 

वारकरी संप्रदायाचे भाग्य असे की ज्ञानदेवांसारख्या विभूतीमत्वाने  याच भागवत धर्माला शिरोधार्य केले. नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची ध्वजा गंगा-सिंधूच्या खोऱ्यात नाचविली. एकनाथांसारखे क्रांतदर्श महात्मे  या संप्रदायाला लाभले. समाजातील जातिभेद नाहीसे व्हावेत म्हणून नाथांनी जी क्रांती केली त्याला तोड नाही.आपल्या अभ्यासाने, चिकाटीने आणि श्रद्धेने "नराचा नारायण होता येते" हे तुकारामांनी देहूसारख्या लहान गावात राहूनही सिद्ध केले. समर्थ रामदासही विठ्ठलाचे परमभक्त होते. देह थकेतो पंढरीची वारी करत होते.;परंतु रामदासी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी धर्मकारण आणि राष्ट्रकारण यांचा अभूतपूर्व समन्वय घडविला.
वारकरी संप्रदायाला फार उत्तुंग कर्तृत्वाचे संत परंपरेने लाभले.परिणामी वारकरी संप्रदायाची लोकप्रियता शिगेला पोचण्यास मोलाची मदत झाली. पैकी काही संत म्हणजे, अमळनेरकर सखाराम महाराज, विसोबा खेचर, कान्होबा(तुकया बंधू),गुरू गोविंद, गोरा कुंभार, चोखामेळा, जनाबाई, तुकाराम, एकनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई,दामाजी, दासगणू, बहिणाबाई, कान्होपात्रा, नामदेव----अशी जवळजवळ शंभराहून अधिक नावे पुस्तकात दिलेली आहेत.

वारकरी संप्रदायाने गृहस्थाश्रमी माणसाला आत्मोद्धाराचा अत्यंत सुलभ मार्ग दाखवला. देहदंड न देता, कोणतीही कठोर उपासना न करता परमेश्वराला आत्मसात करण्याचा मध्यम मार्ग ह्या संप्रदायाने स्वीकारला. ज्ञानेश्वर नाथपंथी होते, (त्यांची भावंडं पण) एकनाथ महाराज नाथ आणि दत्त सांप्रदायिक होते. शिवाय त्यांच्या घराण्यात सूर्याची उपासना होतीच.समर्थ रामदास घराण्यात देखील सूर्योपासना असल्याचे इतिहास सांगतो. असे असूनही या सर्वांना वारकरी संप्रदायाला आलिंगन द्यावेसे वाटले. यातच ह्या पंथाची थोरवी निःसंशय प्रस्थापित होते. अन्य कोणताही मार्ग न स्वीकारता, सामान्य जनांच्या उद्धाराचा भक्तियुक्त मध्यम मार्ग प्रापंचिकांसाठी हितकारक आहे,हे सर्व संतांनी जाणले होते. वारकरी संप्रदायाची प्रवृत्ती समन्वयात्मक असल्यामुळेच  तो रुजला, वाढला आणि लोकप्रियतेच्या कळसाला जाऊन पोचला.हा महाराष्ट्रातील असला तरी त्याचे स्वरूप विश्वात्मक भावाचे आहे.कारण त्याची बैठक  अद्वैत तत्वज्ञानाची आहे.
वारकरी कोण आणि वारी म्हणजे काय,ह्या विषयी देखील अभ्यंकर  महाराज सामान्यांना पटेल अशीच माहिती सांगतात.
पंढरीची वारी करणारा तो "वारकरी". महाराष्ट्रातील अन्य तीर्थक्षेत्री नित्यनेमाने वारी करणारे आहेत; पण त्यांना वारकरी म्हणत नाहीत. पंढरीला ज्या व्यापक प्रमाणात आणि एकत्रितपणे भक्त येतात, त्या संख्येने अन्य क्षेत्री जात नाहीत.
 आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री ----अशा चार प्रमुख वाऱ्यांपैकी वारकऱ्यांना प्रिय असलेली वारी म्हणजे"आषाढी वारी". वारी करी ह्याचा अपभ्रंश होऊन वारकरी  हा शब्दप्रयोग तयार झाला असावा. ज्ञानदेवांनी स्वतःला आणि अन्य भक्तांनाही  "वारीकर " म्हटले आहे.
"कायावाचामने जिवे सर्वस्वे उदार
बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारीकर "|
 संत नामदेवांनीही ,
"आले आले रे हरीचे डिंगर
वीर वारीकर पंढरीचे"|
 असा उल्लेख केलेला आहे.
"वारी" म्हणजे प्रवाशांची टोळी.(कै. राजवाडे)  अमरकोषाने "वार" याचा अर्थ "संघात" असा नेमका दिला आहे.
"संकल्पाची सरे वारी
सरे अहंकाराची वारी
सारीतसे वारी,संसाराची
तेथ सरली वारी,क्रोधाचीही
एरव्ही  द्वइताची  वारी,
सारूनी ऐक्याचा परिवारि".
ह्यामध्ये ज्ञानदेवांनी यातायात, येरझारा, फेरा--असे वारीचे वेगवेगळे अर्थ अभिप्रेत केले आहेत. पंढरपूरची वारी जन्म मरणाची यातायात चुकवते असाही अर्थ अभिप्रेत आहे. द्वैत सरले की आत्मसाक्षात्कार होतो, अद्वैताचा गोमटा लाभ होतो,असेच ज्ञानदेवांना सुचवायचे असेल.
वारीचा हेतू स्वानंदसुखाचा आहे आणि हा आनन्द संतांनी ,त्यांच्या वाड्:मय  मूर्तींनी आणि तत्त्वज्ञानाने दिला. वारी च्या संपूर्ण प्रवासात वारकरी तहान भूक विसरून अक्षरशः तल्लीन होऊन जातात.

नवीन पिढीतील युवक युवतींना या वारीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. सर्वप्रथम म्हणजे वारकऱ्यांची अतूट श्रद्धा,जे सर्व प्रकारच्या गैरसोयी सोसून पांडुरंगाच्या भेटीसाठी श्रद्धेने चालत रहातात.ही श्रद्धा कोणत्याही तराजूत तोलता येत नाही.दुसरे म्हणजे शारीरिक श्रम झेलण्याचा काटकपणा . अडीचशे ते तीनशे किमी चालणे,तेही उन्हा पावसात, सोपे नाही.कसोटीच लागते क्षमतेची. विशेषतः स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने चालतात. मुक्कामाचे ठिकाणी थंड पाण्याने स्नान वा जे प्राप्त होईल ते अन्न ब्रह्म हे चौथे अप्रूप.पाचवे म्हणजे स्वावलंबन. आपापले गाठोडे सांभाळणे, कपडे धुणे,वेळच्या वेळी आवरणे, ज्याची कामे त्यालाच करावी लागतात. सहावे म्हणजे संघटन. सातवे म्हणजे विराट-विशाल विविधतेतील एकात्म भाव!  या सगळ्यातून येणारा अनुभव--- जो प्रत्यक्ष घेणाराच समजू जाणे" " या तो अनुभवाच्या गोठी"----
वारकरी संप्रदायाचे हेही वैशिष्ट्य म्हणावे लागेल की भूतदया, शांती, क्षमा, अहिंसा, सत्य यासारख्या सद्गुणांनी वारकऱ्याला अलंकृत करण्याचा प्रयत्न या संप्रदायाने केला.
वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र "रामकृष्णहरी"--राम आणि कृष्ण---या दोन अवतारांमध्ये  भारतीय संस्कृतीचे अवघे सार सामावले आहे. पांडुरंगानेच सर्व अवतार धारण केले आहेत, अशी वारकरी संतांची श्रद्धा आहे. भक्तांच्या चित्ताचे हरण करणारा तो हरि---भक्तांची दुःखे नाहीशी करून ती हरण करणारा तो हरि असा आशय गर्भ  शब्द म्हणजे "हरि". 

वारकरी संप्रदायात सकाळी, दुपारी व सायंकाळी असे तीन वेळा भजन करण्याची रीत आहे. सकाळच्या भजनाची सुरुवात बहुदा "जय जय रामकृष्णहरी" या मंत्राने करतात.तर काहीजण ती ज्ञानदेव माऊलींच्या उच्चारानेही करतात. मराठवाड्यात मात्र "भानुदास एकनाथ" म्हणून भजनाला प्रारंभ करतात.त्यानंतर "रूप पाहता लोचनी" हा  अभंग  म्हणतात.यानंतर "सुंदर ते ध्यान"--या तुकारामांच्या अभंगाने दुसरी मालिका सुरू होते. तिच्यातील दहा अभंग झाल्यावर भूपाळ्या आणि वासुदेव, आंधळा, पांगळा, मुका, बहिरा, जोगी,जाते, दळण, गौळणी इत्यादी भारुडातले पद्यप्रकार म्हटले जातात.
 वारकरी संप्रदायाच्या भजनात निरूपण नसते. वारीतील भजनाला मात्र खूप महत्व असते.
संतांची अनेक रूपके, भारुडे वारीत सानंद , साभिनय सादर केली जातात. या सर्व रुपकांचा, भारुडांचा ,खेळांचा वरवरचा अर्थ  प्रापंचिक; पण लक्षणार्थ मात्र अवघा पारमार्थिक कल्याणाचा! .ज्ञानदेवांची रूपके त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणेच भव्यदिव्य आहेत. त्यांचे "घोंगडीचे" रूपक सर्वश्रुतच आहे.त्यांचे "गाईचे " रुपकही अप्रतिम आहे. त्यांच्या तीन गायी म्हणजे "त्रिपुटी". आणि दुभती गाय म्हणजे "साक्षात पांडुरंग". 
गोंधळ, पांगुळ, पिंगळा, वासुदेव, व्यापार, धेनू, स्वप्न अशा नित्य परिचयाच्या अनेक विषयांमधून नामदेवांनी भक्तीची अनेक सुंदर रूपके मांडली आहेत. त्यांचे "पिंगळा" हे रूपक असेच सुंदर आहे.
 अज्ञानाचा  अंधकार जाऊन ज्ञानाची प्रभात येत असल्याचे  प्रतीक म्हणजे "पिंगळा" होय.
 तसेच नाथांची भारुडे वारकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. लोकभाषेतील जेवढ्या परंपरा लोकरीतीनुसार "बहुरुढ त्यांना भारुड" म्हणतात. नाथांची भारुडे म्हणजे जनजागृतीची उपदेशपर रुपकेच होत.( विंचू चावला, कान्होबा तुझी घोंगडी ) प्रत्येक  रुपकामागे गहन अर्थ दडलेला आहे, जसे वासुदेव ह्या रुपकातून---"दुर्गुण टाकून सद्गुणांसंगे---सुखदुःखा समान सकळ जीवांचा कृपाळ
ज्ञानाचा उद्बोध भक्तीप्रेमाचा कल्लोळ|" . अशी स्थितप्रज्ञता अंगी बाणविण्यास सांगतो. मोहभ्रांतीचा अंधार त्यागून गुरुसंगतीत ज्ञानाचे डोळे प्राप्त करण्याचा उपदेश "आंधळा" करतो.
वारीत जो "फुगडी" प्रकार खेळला जातो, ती प्रपंचरूपी फुगडी आहे. फुगडी घालताना त्रिगुणांची वेणी पाठीवर उडते, ती आवरली पाहिजे. "हुंबरी" हा तोंडाने विशिष्ठ आवाज काढून करण्याचा खेळ होय. तुकारामांना हा आवाज आत्मनादाचा वाटतो. "टिपरी" च्या खेळात क्रोध, अभिमान पायतळी अंथरले जातात.
"दिंडीनृत्य" हा अजून एक विशिष्ट प्रकार. महाराष्ट्रातील वारकरी आषाढी, कार्तिकी एकादशीला संतांच्या किंवा देवाच्या पालखीपुढे भजन करीत नाचत जातात,त्यांना दिंडी असे म्हणतात. दिंडी या शब्दाचे लहान दरवाजा व  पताका असे दोन अर्थ आहेत.  आपल्याना स्वर्गाची दारे खुली व्हावीत या हेतूने वारकरी भजन करतात, म्हणून  त्यांच्या वाटचालीला दिंडी नाव पडले अशी एक कल्पना आहे. आणि सोनोपंत दांडेकर ह्यांच्या मते, भजनी मंडळातील एकजण दिंडी नावाचे वीणेसारखे  वाद्य  वाजवीत पुढे जातो आणि बाकीचे त्याच्या मागोमाग जातात, म्हणून त्या मंडळाला दिंडी म्हणतात.
"पायी वारी घडो, देह संताघरी पडो
अवघी एकाचीच वीण, तेथे कैचे भिन्न,भिन्न."
 वारकरी संप्रदायातील लोक पंढरपुरास जाताना  आपल्याबरोबर संतांच्या पादुकांच्या पालख्या वाहून नेतात, हेही आपण सर्वजण जाणतोच.
ह्यात "रिंगण" हा एक प्रकार फारच सुंदर असतो.  माऊलींच्या पालखीची एकूण सहा रिंगणे आषाढी वारीत होतात. ह्या रिंगणाची रचना अत्यंत शिस्तबद्ध असते. मध्यभागी छोट्या वर्तुळात  पालखी रथ उभा असतो. त्याभोवती वर्तुळात पताकांच्या रांगा वैभवाने उभ्या असतात. त्याभोवतीच्या गोलात दोन्ही अश्वांचा प्रदक्षिणा मार्ग असतो. त्याही बाहेरच्या गोलात असंख्य भक्तगण असतात. बाहेरच्या शेवटच्या वर्तुळात दिंड्यांची रांग असते. या पाच वर्तुळांचे मिळून "रिंगण" तयार होते.
चोपदार सर्व दिंड्याना गोलाकार करतात.त्यांचे भजन, फुगड्या, हमामा, झिम्मा इत्यादी खेळ चालू असतात. दोन्ही अश्व रिंगणात येतात,त्यावेळी आनंदाचा कल्लोळ होतो. प्रथम पालखीचे दर्शन झाल्यावर अश्व गोलाकार धावतात. त्यात मोकळ्या अश्वावर साक्षात ज्ञानेश्वर माऊली वा पांडुरंग माऊली आरूढ आहे अशी भाविकांची श्रद्धा असते. दुसऱ्या अश्वावर चोपदार असतो. चोपदाराच्या अश्वाला देवाच्या अश्वाने मागे टाकून प्रदक्षिणा पूर्ण केली की रिंगण पूर्ण होते. त्यांनतर मृदुंगाचा घोष संपूर्ण आकाशाला व्यापून टाकतो.
 अहाहा! किती सुरेख वर्णन! वाचून किंवा tv वर पाहून किमान एकदा तरी आयुष्यात ह्या वारीत सहभागी व्हावे आणि हा सुंदर अनुभव प्रत्यक्षात घ्यावा, असे वाटल्यावाचून रहात नाही.

 खरे सांगायचे तर भारतातील सर्व भक्तीसंप्रदायांनी हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती  अभंग रहावी म्हणून फार मोठे सृजनशील योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील संप्रदाय त्याला अपवाद नाहीत. विशेषतः वारकरी संप्रदायाची परंपरा लक्षणीय ठरते, ती त्या वेळच्या परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर.  एका अत्यंत प्रतिकूल  कालखंडात यवनी आक्रमणाचे जबरदस्त तडाखे  या भूमीला बसत असतांना रामदासी, वारकरी आणि दत्त आदि संप्रदायांनी जी कामगिरी केली ती निःसंशय प्रशंसनीय आहे. त्या भयावह आक्रमणांनी भारताचे भावजीवन आणि सांस्कृतिक जीवन उद्धवस्त करून टाकले होते. आक्रमणाच्या कालखंडात निर्माण झालेल्या दऱ्या वारकरी संप्रदायातील संतांनी नाहीशा केल्या.

मराठी भाषा आणि मराठी संस्कृती  शुद्धाति शुद्ध ठेवण्याचे  महनीय कार्य देखील वारकरी संप्रदायाने केले. ह्या संप्रदायाची साहित्य संपदा  फार श्रीमंत आहे. मराठीचा गौरव वाढवण्याचे अन टिकवण्याचे काम ह्या संप्रदायाने केले., ह्या सर्व दृष्टीने ह्या संप्रदायाचे योगदान लक्षात घेण्याजोगे आहे.; पण वारी, वारीची परंपरा, संतांचे योगदान---याविषयी फारच थोड्याना माहीत असते. त्याविषयी उद्बोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी ह्या संप्रदायाने काही ठोस नियोजन केल्यास योग्य होईल. वारीचा आनंद शतगुणित होईल.  वाटचाल सुकर, सुलभ व्हावी म्हणून सर्व तिर्थक्षेत्राहून  येणारे मार्ग चौपदरी व्हायला हवेत, विश्रांतीचे थांबे अधिक असावेत, सार्वजनिक स्वच्छतेच्या सुविधा  अधिक प्रमाणात असाव्यात. महाराष्ट्र शासन याबाबत योगदान करतेच, त्यात अजून वाढ व्हावी. 
तसे अन्नदान करणारे, वारकऱ्यांची व्यवस्था बघणारे देखील भरपूर आहेत आणि आजकाल बराच सुशिक्षित समाज देखील वारीत सहभागी व्हायला लागला आहे, हे विशेष.

शेवटी एक महत्वाचा मुद्दा---
 वारकरी संप्रदायाची गुणवत्ता श्रेष्ठ आहेच; पण आज दिसणारा वारकरी संप्रदाय हा सर्वार्थाने निर्दोष आहे असे मात्र म्हणता येणार नाही, अशी खंत अभ्यंकर महाराजांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक संप्रदायात काही ना काही उणिवा असतात, तशा ह्या संप्रदायात देखील आहेत. वारकरी फडांमुळे पारंपारिक अध्ययन उत्तम होते हे खरे आहे;पण त्यालाही एक विशिष्ट चौकट असल्यामुळे चौफेर वाचन करणारे बहुश्रुत कीर्तनकार फार थोडे असतात. कीर्तनात विश्वात्मक अनुभूतीची वचने हे बोलतात;परन्तु तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेल्या समर्थ रामदासांसारखे  श्रेष्ठ संत आणि त्यांचा दासबोधासारखा अलौकिक ग्रंथ  हा मात्र त्यांना त्याज्य असतो.हा विरोधाभास न उलगडणारा आहे.
असो.

 शेवटी श्रद्धा महत्वाची. भाव तिघेच देव, नाही का? खरे भक्त "वारीचा आनन्द" खऱ्या अर्थाने अनुभवतात. मागील वर्षांपासून ह्या निखळ आनंदावर "कोरोना "चे दाट आणि वाईट सावट आले असले तरी ह्या वर्षी ते संकट नक्कीच दूर होईल आणि विट्ठल भक्त "वारीचा पुरेपूर आनंद उपभोगतील, अशी आशा करूया.  
आपण वारीत  शरीराने प्रत्यक्षात सहभागी नाही होऊ शकलो तरी मनाने आणि अगदी मनापासून सहभागी होण्याचा प्रयत्न करूया.🙏
"कांदा मुळा, भाजी
अवघी विठाई माझी
लसूण, मिरची, कोथिंबीरी
अवघा झाला माझा हरी
मोट, नाडा, विहीर, दोरी
अवघी व्यापिली पंढरी
सावता म्हणे केला मळा
विठ्ठल पायी, गोविला गळा "
जय हरी विठ्ठल.🙏🙏🙏

माणिक