Tuesday, June 15, 2021

नदिया चले चले रे धारा....


भीमामाईचा उलगडणार प्रवास! अशी बातमी सकाळला वाचली. पुण्यातील भीमानदीचा उगमापासून ते कर्नाटक राज्यातील हद्दीतील भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास प्रथमच होणार आहे.मला हे वाचून "ब्रम्हपुत्राच्या शोधात " हा प्रदीप आपटेंचा लेख आठवला.  1878 ला जेव्हा कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नसतांना तंत्रज्ञानाचा शोधही लागला नसतांना अत्यंत कठीण, दुर्गम अशा पहाडांवर चढून, घनदाट जंगलातून वाट काढत ब्रम्हपुत्र नदाचा उगम आणि विस्तार शोधणे किती कष्टप्रद होते. त्या लेखात आश्चर्यकारक आणि  इंटरेस्टिंग माहिती दिली आहे. त्यांच्या लेखातील काही इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून हे लेखन केले. 

विशाल, विहंगम, तितकाच विक्राळ, फार विस्तीर्ण भाग व्यापणारा, दमवून टाकणारा जलौघ म्हणजे ब्रम्हपुत्र! याला स्त्रीलिंगी नदी नव्हे तर पुल्लिंगी "नद" म्हणतात! कारण तो ब्रम्हाचा पुत्र आहे. ब्रम्हपुत्राचे लांबच लांब पात्र, खोल दर्याखोर्यातला धडकी भरवणारा खळाळ आणि पुढला अवाढव्य प्रवाह, त्याचे विनाशी महापूर, अचानक होणारे पात्रबदल. नेपाळच्याही पलिकडून वाहणारी त्सांगपो नदी ब्रम्हपुत्र आहे का, ती नक्की कुठे उगम पावली? पुढे भारतात आल्यावर तिचे नाव ब्रम्हपुत्र झाले का? आपटे म्हणतात, सासरी जाणाऱ्या मुलीचे नाव बदलावे तशी त्याची नाव बदलतात. दक्षिण तिबेट मधून एका छोट्याश्या धारातून उगम पावल्यावर नेपाळ मध्ये प्रवेश केला की त्याचे नाव त्सांगपो होते. उगमापासून 2900 किलोमीटर चा लांब पल्ला गाठताना भारतात अरूणाचल प्रदेशात प्रवेश झाला की दिहंग नाव होते. बांग्लादेश मध्ये आला की जमुना नदी होते बांग्लादेशात पद्मा नदीशी संगम होतो .भारतात पद्मा नदीला गंगा नदी म्हणतात, तोच गंगा जमुना संगम! या संगमावर खूप मोठा त्रिभुजप्रदेश  निर्माण झाला आहे तो अंतराळातून पण दिसतो असे म्हणतात. संगम झाल्यावर पुन्हा नाव बदलून मेघना नदी होते ती शेवटी बंगालच्याखाडीला जाऊन मिळते. ब्रम्हपुत्र चा प्रवास असा संपतो किंवा थांबतो. पाच देशांची माती यात मिसळते. असीम ताकद, विशाल आकार यामुळे पुल्लिंगी नाव आहे. भारतात प्रवेश केल्यानंतरच्या प्रवासात काझीरंगा आणि सुंदरबन हे नॅशनल पार्क या नदाच्या किनार्‍यावर आहे. भरपूर वृक्षसंपदा, जैवविविधता, प्राणी, पक्षी या जंगलांमध्ये बघायला मिळतात. .ब्रम्हपुत्राच्या किनार्‍यावर मानवी संस्कृती निर्माणही झाली आणि नष्टही होत असते. इतका प्रचंड, बेकाबू प्रवाह आहे की माणूस त्यापुढे यत्किंचितही नाही. अजूनही एक सुध्दा बांध किंवा पुल माणूस बांधू शकला नाही या नदावर. कारण पात्रच 18 किलोमीटर रुंदीचे आहे, शिवाय सतत बदलत जाणारा प्रवाह आणि अति विशाल आकार! त्यामुळे पुल बांधणे कठीण आहे. 

नदीचे मूळ विचारू नये असे म्हणतात तरीही ब्रम्हपुत्र नदीचा उगम शोधून काढायचे महाकठीण काम चोखपणे केले गेले. 
"त्यांची भारतविद्या " या सदरात प्रदीप आपटेंचे वाचनीय लेख येतात. कुतुहल, जिद्द, मेहनतीची तयारी असणारे अनेक परदेशी भारतात आले आणि गेले, काही तर इथेच राहिले. भारतातील अनेक गोष्टी त्यांच्या कष्टपूर्वक प्रयत्नांमुळे आपल्याला कळल्या ती त्यांची आपल्याला लाभलेली भारतविद्या!   प्राचीन भारताचे भूवर्णन, जगाचे नकाशे, समुद्रमार्ग, दक्षिण आणि पश्चिम भारतातील प्राचीन लेण्या, अजिंठा वेरूळच्या लेण्या, तक्षशिलाचे स्तूप इत्यादी अनेक गोष्टींचे शोधन, अहवाल लेखन, लेण्यांचे  चित्र काढणे त्यावर भाष्य करणे, ते सर्व जतन करणे इत्यादी अनेक अवघड कामे परदेशी चित्रकार, शिल्पकारांनी करून ठेवले आहे.  त्याचा दस्तऐवज तयार करून त्या वास्तू आणि दस्तऐवज दोन्हीचे जतन करून पुढील पिढीला उपलब्ध करून ठेवला. अर्थात त्यातल्या काहीच परदेशी लोकांनी एवढे कष्ट घेतले, जसे भारतात असे अभ्यासू ज्ञानवंत होऊन गेले तसे काही परदेशी पण होते. आपल्या भारतीयांच्या मदतीने  त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी करून ठेवल्या ज्याचा आपल्या भारतीयांना लाभ झाला. तर अशा परकीयांच्या कर्तृत्वाबद्दल, कामाबद्दल या लेखमालेत लिहिले आहे. प्रदीप आपटे लिहतात, " इतिहासाकडे बघतांना पराकोटीचा स्वाभिमान आणि टोकाचे हिणवणारे पूर्वग्रह हे दोन 'राहू - केतू ' संशोधनाला ग्रासतात.  'आपले" ते "चांगले" अशा हट्टापेक्षा "चांगले" ते "आपले" ही समबुध्दी इतिहास समजून घेतांनाही बाळगावी. "

1878 मध्ये पहाडांचा प्रचंड अभ्यास असलेला किंटुपी उर्फ केपी नावाच्या सिक्कीमला राहणार्‍या माणसाची नेमणूक एका जिद्दी आणि कष्टाळू हार्मान नावाच्या अधिकार्‍याने केली होती. हा किंटुपी उर्फ केपी अतिशय धडधाकट, चपळ आणि तडफदार होता. मात्र खुद्द त्यालाच सर्वेक्षण निरिक्षक म्हणून पाठवण्यात अडचण अशी होती की हा केपी बव्हंशी निरक्षर होता. जुजबी अक्षरापलिकडे त्याला वर्णन लिहणे, हिशेब करणे, नोंदी घेणे अजिबात येत नव्हते. म्हणून मग चिनी लामाला त्याच्या बरोबर पाठवले. या शोधमोहीमेची पध्दत खासच होती पत्र्याच्या पुंगळ्यामध्ये संदेश, नोंदी इत्यादींचे कागदाचे भेंडोळे भरायचे, लाकडाच्या (ओंडके कोरून) ओंडक्यात बरोबर ते अडकवायचे आणि नदीच्या प्रवाहात ती ओंडकी सोडून द्यायची. इकडे हार्मान ओंडकी हेरून ती पकडायचा आणि त्यातील माहिती, मजकूर गोळा करायचा.    सुरुवातीला सगळे ठीक झाले पण नंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या. चिनी लामाने स्वतःच्या सुटकेसाठी केपीला गुलाम म्हणून विकून टाकले आणि या शोधमोहीमेतून गायबच झाला. केपी ने तब्बल दोन वर्षे गुलामीत काढली. परंतु त्याच्या चांगल्या वागणूकीमुळे त्याला तिर्थयात्रेला जाण्याची परवानगी कशीबशी मिळाली आणि केपीने तिथून स्वतःची सुटका करून घेतली. त्याला त्याच्या कामगिरीची आठवण होतीच त्याप्रमाणे त्याने हार्मानला निरोप पाठवायची सोय केली परंतु दोन वर्षांत हार्मान आणि इतर अधिकारी बदलून किंवा सोडून गेले होते. त्यामुळे सगळी मेहनत शब्दशः पाण्यात वाहून गेली होती.  जिथून त्यांची शोधमोहीमेची सुरुवात झाली होती केपी तिथे पोहचेपर्यंत त्याला या बदलाची काहीच माहिती नव्हती. त्सांगपो नदी म्हणजेच ब्रम्हपुत्र! ब्रम्हपुत्राचे चढ उतार, दिशा, किनारे, गाव सगळे त्याच्या स्मरणात पक्के होते, परंतु नोंदलेले नव्हते. म्हणून नवे अधिकारी केपीचे म्हणणे ऐकून घेण्याच्या तयारीतच नव्हते. त्यांच्या मते चिनी लामा आणि केपी दोघेही वाट तरी चुकले किंवा घनदाट जंगलात एखाद्या प्राण्याच्या तावडीत सापडून त्यांचे काही बरेवाईट झाले असेल किंवा  घनदाट जंगलातील आदिवासींच्या नजरकैदेत असतील. पण केपीच्या मिनतवार्यांनी नवीन अधिकारी कसेबसे तयार झाले. केपी च्या प्रवासाचा वृत्तांत नोंदला गेला  पण त्याची सत्यता कशी पडताळून बघायची हा प्रश्न होताच. केपीने सांगितलेले निरिक्षण आणि वर्णने खरी आहे हे कळायला  तब्बल तीन दशके गेली. केपीने इतका त्रास, कष्ट सोसूनही म्हणावा तसा सन्मान आणि बक्षिस त्याला मिळू शकले नाही कारण निरक्षरपणा! लेखक प्रदीप आपटे लिहीतात, "एवढे सगळे श्रेय एका अविद्येने हरपले. " शिक्षणाचे महत्त्व किती होते आणि आहे हेच यावरून कळते. 

असा हा अद्भूत नद ब्रम्हपुत्र! उगमापासून तर समुद्राला मिळेपर्यंतच्या मोठ्ठ्या प्रवासात देवते प्रमाणे पूजलाही जातो आणि खूप ठिकाणी लोकांना घाबरवतो सुध्दा! एकीकडे अनेक जीव जंतूं निर्माण करतो आणि दुसरीकडे महापूराच्या तडाख्याने नष्टही करतो. 
असे म्हणतात की नदी आपल्या पित्याला म्हणजे पहाडाला भेटायला पाऊस होऊन जाते. पुन्हा उगम पावते आणि स्वतः चे जीवन प्रवाही करते. उंच सखल भागातून, दरीखोरीतून स्वतः चा मार्ग स्वतः काढून, पुन्हा समुद्रात मिसळून जाते.  जीवनप्रवाह मग तो आपला असो किंवा नदीचा /नदाचा सतत सुरू असतो. शेवटी मथितार्थ काय तर सगळ्यांचा प्रवास एकाच दिशेने... विलीन होण्यासाठीच आहे.

अंजली 

Monday, June 14, 2021

चिवडा

आमच्या मैत्रिणींच्या गृपमध्ये .......एखाद्या विषयाला धरुन.... खूssप.... खूssप म्हणजे.... अगदी खूsssपच काथ्याकूट होत असेल तर ,किती चिवडा करताय गं!.......हा आमचा परवलीचा शब्द आम्ही वापरतो.... प्रत्येकिचा सल्ला म्हणजे जणू चिवड्यातला एकेक जिन्नस!.....चिवड्यात किती घटक पदार्थ ॲड केला तरी काही म्हणजे ....,काही म्हणजे.....काsssही बिघडत नाही. 

     so हा *चिवडा*  ......असा पदार्थ आहे ना, जो संकटकाळचा खरा मित्र आहे..... ." मै हुँ ना!."...टाईप .....". फिकर नाक्को! ".....        ."जसा भाजीत बटाटा!... तसा स्नॕक्स मध्ये चिवड्याला पर्याय नाही" !......गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या घरात   तो दिमतीला हजर असतोच असतो  !......हां आता कुवतीप्रमाणे वा आवडीप्रमाणे त्यातील घटकपदार्थ बदलत असतील पण त्याचा मुळ घटक पोहे  हा मात्र काॕमन फॕक्टर असतोच असतो. नाही म्हणायला फराळी चिवडा हा नामसाधर्म्य जपलेला 


आणखी एक चवदार पदार्थ आपण यात ॲड नक्कीच करु शकतो. 
      माझ्या आईच्या  तोंडी एक म्हण सतत असायची "  एक गहू तीचे प्रकार बहु"   
थोडक्यात शक्कल लावा व एकातून अनेक पदार्थांना जन्माला घाला. मराठी लोकांकडे पोह्याचा चिवडा, ...पोहे व मुरमुर्याचा मिळून चिवडा, .....नुसत्या मुरमुर्याचा चिवडा,........ कांद्याचा चिवडा,..... भाजक्या पोह्यांचा तळलेला चिवडा, ......ड्रायफ्रुट्स घालून केलेला शाही चिवडा .........असे कितीतरी प्रकार!...... त्यात तिखटाचा ,कमी तिखटाचा ,  आंबट चटकदार वगैरे वगैरे....! आणखी एक मजेदार चिवडा म्हणजे उडता चिवडा ....जो प्लेटमध्ये घेताच फर्र हवेनी दाणाफाण होतो.  

 पूर्वी  चिवड्यासारखा पदार्थ सुद्धा आतासारखा सहज सरकट होत नसे. एकतर सणासुदिला ,लग्न कार्यात वा डोहाळजेवणासारख्या तत्सम छोटेखानी समारंभात हा लाडवाच्या सोबतीने आपला नखरा कायम ठेवणारा होता. 
 लग्न कार्यात तर गरमागरम चिवडा पत्रावळीमध्ये वा ताटात घेऊन त्याभोवती मस्त गोलाकार बसुन  गप्पा  करत आणि चिवड्याचे फकणे तोंडात टाकत व फोडलेल्या कांद्याची सोबत करत खाताना जी मजा यायची ना ! ...त्याला तोड नाही !.....सोबतीला बुंदीचे लाडू वा रवा बेसनाच्या लाडवांची साथसंगत महफीलीत अधिकच रंगत आणायची. म्हणूनच लग्न आणि चिवडा हे समीकरण  फारच अतुट होतं.तेव्हा नुसता जल्लोष असायचा.

   

असाच संबंध वा नातं कच्च्या चिवड्याचा ऊन्हाळी सुट्टीशी आहे. ऊन्हाळी सुट्टी+पत्ते+चिवडा--धमाल  !..पत्ते खेळा व चिवडापार्टी करा. आमच्या विदर्भात हा कच्चा चिवडापण तीतकाच लोकप्रिय आहे. यातही विविधता जपलेली आहे. पोहे+दाणे+डाळवा ---चिवडा,      मुरमुरे+दाणे+डाळवा ---चिवडा ,     ह्यात कधी कच्च तेल तिखट मीठ, कांदा कोथिंबीर तर कधी .गोड लोणच, तिखट लोणच्याशी केलेली चटकदार मैत्री. तर कधी सातुच्या पिठाशी काकडी व इतर जिन्नसासह बांधलेले संधान जीभेवर टाॕक म्हणणारे असतात.  ......यातच जरा हळुच कधी टमाटा हजेरी लावून जातो तर कधी  शेव तर कधी .ऊसळीसोबत मिसळ व भेळेची नवीन डीश तयार करतो.. इथे पदार्थांना बंधन नाही. जे घरात जिन्नस असेल त्यातून जे बनेल तसा चिवडा तयार  करायचा नि गट्टम करायचा. आता हा ओला चिवडा म्हणजे भेळ असतो .


त्याच जातकुळीतला कोकणातला पदार्थ म्हणजे    "दडपे पोहे"    जे नारळाच्या दुधात भिजवून करतात . त्याचीच बहीण म्हणू या कां? ती म्हणजे चिंचेच्या कोळातले पोहे !ते साऊथची ओळखकरुन देतात. आणि आपल्या महाराष्ट्रातले कांदेपोहे तर थेट मुलगी पसंत आहेची पावती देणारे असतात ,पिवळे धम्मपोहे  लिंबाच्या फोडीसोबत वा लोणच्यासोबत वरती खोबर कोथिंबीर पेरलेले. मध्यप्रदेशात असाल तर बारीक शेव व जीरावन घातलेले .गुजारथेत असाल तर डाळींबदाणे घातलेले व नागपुरात असाल तर तिखट तर्री घातलेले!...... मी म्हंटल नव्हतं एक गहु तीचे प्रकार बहु म्हणून!.... तरी अजुन दुधसाखर पोहे, दहीसाखर पोहे, सुदाम्याचे पोहे म्हणजे फक्त  साखर  व कोरडे  पोहे . अशा ह्या पोह्यांचा प्रवास पार चारही दिशांनी झालेला !....


पण शेवटी सांगता करायची म्हणजे काला तर व्हायलाच हवा. गोड,आंबट,तिखट,खारट,तुरट,कडू  अशा षड्रसांनी युक्त व बहुगुणी पदार्थानेच होणारा गोपालकाला कधी आपले षड्विकार दूर करतो ते आपले आपल्यालाही कळत नाही.  
हीच ती मैत्री  हेच ते प्रेम !                                                           \
गोपालकाला गोड झाला ।                     
गोपालाने गोड केला ।।                                

 @अर्चना मुळ्ये.

Sunday, June 13, 2021

फॉल

 


मी ह्यावेळेस अमेरिकेत गेली तेव्हा फॉल सीझन नुकताच संपत आलेला होता. आपल्याकडे जसे तीन मुख्य ऋतू असतात हिवाळा, उन्हाळा, पावसाळा तसे तेथे विंटर, स्प्रिंग, समर आणि ऑटम हे चार मुख्य ऋतू असतात. पावसाळा वेगळा नसतो. वर्षभर केव्हाही पाऊस पडतो. ऑटममध्ये मुख्यतः सगळी पानगळ होते. ह्या पानगळीच्या ऋतूलाच फॉल म्हणतात. आणि नंतर स्प्रिंग मध्ये सृष्टी पुन्हा सगळा शृंगार करते. मी ऑटम च्या शेवटी शेवटी पोहचली त्यामुळे मला ह्यावेळेस फॉल बघता आला.  फॉल किंवा पानगळीच्या सगळ्या स्टेजेस खूपच  विलोभनीय असतात. सुरवातीला सगळी पानं केशरी, लाल अन् नंतर पिवळीजर्द  होत जातात तेव्हा तर कमालीची  सुंदर दिसतात. आणि नंतर पूर्ण गळून पडतात. मी ह्यावेळेस पहिल्यांदाच बघितल्या ह्या स्टेजेस. आपण जे पेंटिंग्ज मध्ये लाल, केशरी, पिवळ्या रंगांची सुंदर सुंदर झाडं  आणि रस्त्यावर अंथरलेले पानांचे मनमोहक लाल, पिवळे, केशरी गालिचे बघतो तसं प्रत्यक्षात बघायला मिळालं. (सोबत फोटो टाकले आहेत) 

             पानगळ झाल्यावर बाकी सगळे मोठमोठे वृक्ष पूर्ण उघडे बोडखे दिसतात. वेगवेगळ्या उंचीचे, आकाराचे, काही उंचच उंच वाढलेले, काही पसरलेले, काहींच्या फांद्या वेड्यावाकड्या पण आकर्षक कलात्मकतेने पसरलेल्या. संपूर्ण पानगळ झालेली. अख्ख्या झाडावर औषधालासुद्धा एकही पान नाही. मी येथे आल्यावर जेमतेम महिन्याभरात हे स्थित्यंतर झालेले दिसले. काही दिवसांपूर्वीच  हिरव्या गच्च पानांनी आच्छादलेले, फुला फळांनी बहरलेले सगळे वृक्ष हळूहळू लालबुंद  होत गेले, मग पूर्ण पिवळे झाले अन नंतर  एखाद्या नखशिखांत दागिन्यांनी मढलेल्या महाराणीने सगळे दागिने एकेक करून उतरवून ठेवावेत तसा सगळा पर्णसंभार जसा काही  उतरवून ठेवला झाडांनी. 


                       एकदा का आपल्या शरीरावरचं सगळं ओझं उतरवून टाकलं की मग सगळी झाडं  मूकपणे, निःशब्द अवस्थेत जणू चिंतन करत उभे असतात! एखाद्या स्थितप्रज्ञासारखे निश्चल..! संपूर्ण पानगळ झालेले  ते गगनचुंबी वृक्ष मला सर्वसंगपरित्याग केलेल्या योग्यांसारखे वाटायचे. त्यांची सगळी गतीच थांबलेली दिसायची. पानांची सळसळ नसल्याने सगळीकडे वेगळीच स्तब्धता दाटून आल्यासारखी वाटायची.  चोहीकडे अशी शांत उभी, उघडी बोडखी, उजाडलेली झाडं! मात्र स्प्रिंग सुरु होताच हे सगळं दृश्यच एखादी जादूची कांडी फिरावी तसं पटापट  बदलतं. पुन्हा सगळी सृष्टी हिरवीगार होऊन डोलायला लागते,  ती सगळी झाड पुन्हा फुलतात, बहरतात. अगदी सहजपणे. जणू पुन्हा नव्याने जन्म घेतात. आपल्याकडेही शिशिरात पानगळ होते पण ती इतकी प्रकर्षाने  जाणवत नाही. कदाचित आजूबाजूला इतक्या प्रचंड संख्येने वृक्ष नसतात म्हणूनही जाणवत नसावं कदाचित. 

                    

              


पानगळीच्या मौसमातली तिथली सगळी झाडं बघून सहजच  मनात आलं आपल्यालाही असं जमलं तर? खरंच किती छान होईल! ह्या झाडांसारखा असाच ठराविक  दिवसांमध्ये दरवर्षी एक ब्रेक घ्यायचा. जसा ते आपला पर्णसंभार उतरवून ठेवतात, अगदी तस्संच काही काळ आपले सगळे मुखवटे खरंच उतरवून ठेवायचे अन त्यांच्यासारखंच शांत, स्तब्ध राहून चिंतन करायचं, वर्षभराचा आपला आपणच आढावा घ्यायचा. एकजात सगळी अहंकाराची, रागाची, लोभाची, इर्षेची, मत्सराची, मोहाची पानगळ होऊ द्यायची. आपल्याच मनाचा तळ दिसेल असं मन स्वच्छ करायचं. काय बरोबर, काय चूक तपासून बघायचं. झालेल्या चुका खुल्या मनाने स्वीकारून टाकायच्या. दुरुस्त होण्याजोग्या नसतील तर निदान त्यापासून धडा घेऊन त्या पुन्हा होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. अन एकदा का हा सगळा  “फॉल” आटोपला की पुन्हा टवटवीत नवीन पालवी फुटू द्यायची! मनात आलं, खरंच जमेल का हे आपल्याला? कठीण तर आहेच  पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? नाही का?


©मधुमती वऱ्हाडपांडे