ताडोबाच्या जंगल सफारीत जवळून वाघ बघता आला. खूप वर्षांची इच्छा पूर्ण झाली .माझ्या लहानपणी मी वाघाच्या खूप गोष्टी ऐकल्या वाचल्या होत्या. त्यामुळे वाघाबद्दल एक कुतुहल आणि एक भीती मनात स्वभाविकच निर्माण झालेली होती. एकदा नागपूरच्या महाराज बागेतून पिंजऱ्यातला वाघ निसटला होता.तेव्हा तर त्या न बघितलेल्या वाघाच्या दहशतीनी मी चार दिवस झोपले नव्हते. असा वाघ त्याच्या नैसर्गिक - मुक्त वातावरणात इतक्या जवळून समोरासमोर बघता येईल असं कधी वाटलंही नव्हतं. प्रत्यक्षात त्याला समोर बघताना त्याचे तेजस्वी काळे पिवळे पट्टे, त्याचे जबरदस्त पंजे, त्याहूनही जबरदस्त त्याची रोखलेली भेदक नजर ,त्या नजरेतली ती जरब ,तो धाक - तो दरारा हे सगळं किती थरारक आणि अविस्मरणीय असेल, हे वेगळं सांगायला नको. मनात असा प्रश्न आला , की या समोरच्या वाघाच्या मनात आलं आणि त्यानी सरळ एखाद्या जिप्सी वर झेप घेतली तर काय होईल? क्षणभर भीतीच वाटली . आपल्याला याची भीती का वाटते ? आणि आत्ता तो झेप घेईल असं वाटतंय याचं कारण तीच भीती आहे का ?माझ्या लहानपणीच्या मुलांच्या गोष्टीत बरेचदा वाघ म्हातारीच्या मागे लागलेला असायचा किंवा एखाद्या वाघाने माणसाला खाऊन टाकल्याची गोष्ट असायची. म्हणून भीती निर्माण झाली असावी. पुढेपुढे तर जेव्हा जिम कॉर्बेट वगैरे वाचत होते तेव्हा वाघांचे भाससुद्धा व्हायचे, काही वेळा स्वप्नही तशीच भीतीदायक पडायची ! मग काही इंग्रजी गोष्टी ,काही कार्टून्स ,आणि हॉब्ज सारख्या चित्रमालिकांमधून वाटायला लागलं की , "अरेच्या! वाघ हा तर माणसाचा मित्रही असू शकतो!" या छोट्या मुलाच्या गोष्टीत हॉब्ज हा वाघ, त्याचा मित्र बनून त्याच्या घरी राहात असतो आणि हा छोटा मुलगा त्याला आईपासून लपवून ठेवत असतो. आता ही मजेदार गोष्ट ऐकणाऱ्या मुलांच्या मनात वाघाबद्दल काय निर्माण होईल? तो या मुलांचा मित्रच होणार नाही का ? टारझन नव्हता का ? म्हणजे आपण काय गोष्ट ऐकतो किंवा वाचतो त्यानुसार आपल्या मनात भीती, कुतूहल, मैत्री यापैकी काहीतरी निर्माण होत असतं का? ज्या वेळेला या सगळ्याचा समग्रपणे विचार करता आला , त्यावेळेला अपरिहार्यपणे एक प्रश्न मनात उभा राहिला, की इथे राहणारी ; रोज वाघ पाहणारी माणसं , आपापल्या मुलांना वाघाच्या कोणत्या गोष्टी सांगत असतील ?
Saturday, May 15, 2021
वाघ बघितल्याच्या गोष्टीची गोष्ट!
जंगल सफारीच्या गेट पासून ज्या पाणवठयावर आम्हाला वाघ दिसले होते तिथपर्यंतचे अंतर कदाचित पंधरा किलोमीटर असेल, तिथपर्यंत , जवळपासच्या गावातली माणसं फिरताना दिसली होती का? इतक्या अंतरावर जिप्सी येईपर्यंत मध्ये आम्ही खूप पायवाटांवर ,वळणांवर ,शेतांच्या तुकड्यांपर्यंतही गेलो होतो, तर तिथे माणसे दिसली होती की ! कुठल्या कुठल्या वळणावरून गाडी पुढे जातांना डावीकडे उजवीकडे छोट्याशा शेताच्या तुकड्यांमध्ये काम करणारी, दोन-तीन ,दोन-तीन माणसं दिसली होती. मोहाची फुलं गोळा करणारी , झाडाच्या फांद्या गोळा करून नेणारी बायका नि माणसं पण दिसली होती. प्रत्येक वेळी या घनदाट जंगलातल्या वातावरणात असे कुणी शेतकरी- कष्टकरी दिसले की " यांना भीती वाटत नाही का ?" हा प्रश्न माझ्या मनात उभा राहात होता .मग मी गाईडला तसं विचारलं .तो म्हणाला की, " त्यांना सवय झालेली असते. लहानपणापासून हे लोक जंगलात फिरतात, मध गोळा करतात , डिंक गोळा करतात , मोहाची फुलं गोळा करतात , लाकडं - वाळलेली पानं गोळा करतात .आणि हेच तर त्यांच्या निर्वाहाचे साधन आहे . ही बरीच माणसं आदिवासी जमातीतली आहेत, ज्यांना शिक्षणाचा अजूनही फार गंध नाही." हे सगळं ऐकल्यावर पुन्हा मला असं वाटलं की इथली ही बाया माणसं आपापल्या मुलांना वाघाची गोष्ट कशी सांगत असतील ?
आम्ही या जिप्सीच्या प्रवासात शेताच्या बांधावर छोटी छोटी म्हणजे आपल्या गुडघ्यापेक्षाही कमी उंचीची देवळं पहिली होती .ही देवळं म्हणजे एक छोटासा ओटा आणि वर छत .मधल्या पोकळ जागेत छोट्या-छोट्या दोन तीन मूर्ती दिसायच्या. लांबून या मूर्ती कशाच्या आहेत ते कळलं नव्हतं . पण एकदा जवळून पाहता आलं आणि दिसलं की त्या वाघाच्या प्रतिकृती आहेत .म्हणजे इथले लोक वाघाला देव मानतात का ? तर , हो ! असं का? तर त्यांना वाघाची भीती वाटते ! आणि माणसाचा इतिहास हेच सांगतो की ज्याची भीती आपल्याला वाटते त्याला देव मानून आपण पूजतो! त्याची कृपा असली तरच निर्विघ्नपणे आपले आयुष्य पार पडेल असे आपल्याला वाटते. तर इथे या जंगलात आदिवासीना वाघ हा देव वाटतो! कारण त्यांना त्याची भीती वाटते ! हे जंगल त्यांचं सहज पालनपोषण करू शकतं ,मात्र इथे फिरताना वाघाशी गाठ पडणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं! ज्या दिवशी जंगलात फिरून रानमेवा गोळा केला आणि वाघ दिसला नाही, त्याची चाहूल लागली नाही ,त्याचे पंजे मातीवर उमटलेले दिसले नाहीत , तो दिवस त्यांच्यासाठी भाग्याचा ! म्हणजे गंमत बघा ! की आम्ही दहा हजार रुपये भरून, नेटवर बुकिंग करून, नोकऱ्यांमधून सुट्टी घेऊन इथे वाघ बघायला येतोय. कधी कधी फक्त त्याच्या खुणा दिसतात कधी पंजे दिसतात, कधी कधी त्यानी शिकार करून अर्धवट खाऊन टाकलेला प्राणी दिसतो .तर एवढा अनुभव सुद्धा आमच्यासाठी थरारकच असतो! आणि इथे यांना वाघ दिसला नाही तर बरं वाटतं! मग, आज तरी निदान वाघ दिसू नये ,असं वाटणा-या या माणसांच्या अनुभवाचं काय ? त्यांच्या गोष्टीतला वाघ कसा असेल? आलाच वाघ समोर ; लाकडं किंवा मोह फुलं गोळा करतांना , तर काय करतात ते ? हा प्रश्न मी आमच्या गाईडला विचारला ." कोणी करूच काय शकतो अशा वेळी? पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात काहीही अर्थ नसतो. चार सहा माणसं जवळ असली आणि भरपूर आरडाओरडा केल्यामुळे ती धावून आली तर काहीतरी वाचण्याची शक्यता असते.बाकी काय?"गाईड म्हणाला.
" वाघाने हल्ला केला थेट, असं कधी होत नाही का ?" मी परत विचारलं.
"होतं की ! बरेच वेळा असं होतं ! आणि तुम्हाला सांगू का? की आज सकाळी सुद्धा असं झालेलं आहे !" गाईडचं हे बोलणं ऐकताना माझ्या घशाला कोरड पडली. तळहाताला घाम फुटला .मगाशी जवळून बघितलेला तो वाघ, त्याचे मजबूत पंजे,सुळे , त्याची भेदक नजर, त्यातला धाक हे सगळं मनाशी आठवत ,मी कल्पना केली की, मी शेतात काम करत असेल ,आजूबाजूला दोन-चार माणसं असतील, आणि अचानक असा वाघ समोर उभा ठाकला ,तर माझं काय होईल ? कल्पनेनेच माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं !
"काय झालं आज सकाळी?" मी आवंढा गिळत विचारलं .
" आज सकाळी नवरा बायको आणि मुलगी असे तिघे त्यांच्या शेतीपासून बरेच दूर झाडाखाली मोहफुले गोळा करत असताना अचानक वाघ आला ."
" मग?" मी घाबरुन विचारलं.
" होतं काय की ,बरेचदा लोक खाली बसून मोह फुलं गोळा करत असतात , त्यांची नजर जमिनीकडे असते , त्यामुळे जनावर अगदी जवळ येईपर्यंत त्यांना पत्ताच लागत नाही! मग त्याच्या शरीराचा वास आणि गुरगुरणं यावरुन धोक्याची जाणीव होते .आणि मग मान वर करून शोधे पर्यंत ,उठण्याचा प्रयत्न करेपर्यंत वेळ निघून गेलेलीअसते. हा कुठला तरी गुडघ्या एवढ्या उंचीचा प्राणी आहे असं वाटून,नि तो आता काही तरी हालचाल करतो आहे हे दिसून वाघाला असुरक्षित वाटतं . तो क्षणात झेप घेतो .खरं तर वाघाची काही दुश्मनी नसते. तो प्रत्येक वेळी भुकेला असतो असं सुद्धा नसतं. तो स्वतः सुद्धा थोडा भित्रा असतोच. आणि जिथे स्वतःच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होते ,असं वाटतं तिथे तो आक्रमक होतो !"
" मग तिथे वाघ आल्यावर काय झालं ?" मी विचारलं.
" काही नाही त्या वाघाने झेप घेतली त्या माणसाच्या अंगावर .त्या धक्क्याने अर्थातच तो माणूस मागच्यामागे कोलमडला. वाघाने आपले दात मागून-पुढून त्याच्या मानेत रुतवले. त्यामुळे तो माणूस ओरडण्याचा तर प्रश्नच नव्हता .मात्र या झटापटीची चाहूल जवळच काम करणाऱ्या त्याच्या बायकोला लागली." गाईड सांगत होता. " कल्पना करा की माणूस पाठीवर सरळ पडला आहे .त्याची मान वाघाच्या जबड्यात आहे, आणि जणू काही वाघ आडवं पडलेल्या त्या माणसावर स्वार झाला आहे . तो माणूस जिवाच्या आकांताने हातपाय झाडतो आहे.जेव्हा त्या बाईला चाहूल लागते,ती वळून पाहते आणि तिला तिच्यापासून अवघ्या काही फुटांवर हे दृश्य दिसतं , तेव्हा तिचं काय झालं असेल? " माझ्या डोळ्यांसमोर आता जणू ते चित्र दिसत होतं.
गाईडच्या या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं. माझी वाचा बसली होती . हातापायाला सूक्ष्म कंप सुटला होता . मी अवाक्षरही बोलले नाही .ती बाई करूच काय शकते ?काय केलंअसेल तिनी? पळून गेली असेल. खूप ओरडली असेल. मला आत्ता ऐकताना धडधडतय तसंच तिला पण छातीत भयंकर धडधडलं असेल . हातापायाला मरणाचा कंप सुटला असेल . धावून ओरडून डोळ्यापुढे अंधारी आली असेल .आणि नंतर नेमकं काय होतंय ते कळून , रडून-रडून तिनं आक्रोश केला असेल ! माझ्या मनाशी गाईडच्या प्रश्नाचं उत्तर साधारण असंच होतं .पण गाईड म्हणाला," तुम्हाला सांगतो, त्या बाईनं पटकन पुढे होत माणसाचे दोन्ही पाय तळपायांकडून पकडले आणि वाघाच्या तावडीतून त्याला सोडवण्यासाठी जबरदस्त झटापट केली . दुसरीकडे तोंडानी मदतीसाठी आक्रोश सुरू ठेवला .त्यामुळे आजूबाजूच्या शेतातली माणसं पण धावून आली आणि वाघ चक्क पळून गेला ! "
" मग ? त्या माणसाचा जीव वाचला? "
" नाही! दुर्दैवाने माणूस तिथेच खलास झाला! पण तुम्हाला सांगतो की वाघाने माणूस मारणं या गोष्टीची जेवढी चर्चा झाली ,त्यापेक्षा जास्त चर्चा त्या बाईने माणसाचे पाय धरून त्याला ओढण्याचा प्रयत्न केला या तिच्या धीटपणाची झाली !" आता हे नवं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. मनात परत एक विचार आला , की या बाईला तिच्या लहानपणी तिच्या आई-वडीलांनी वाघाची गोष्ट कशी सांगितली असेल? आणि आता या नवरा बायकोची मुलगी ; जी हे दृश्य थोड्या अंतरावरून बघत होती ती ,या झटापटीत आईचं धैर्य नि बापाचा मृत्यु बघत होती,ती पुढे तिच्या मुलांना वाघाची गोष्ट कशी सांगेल?
जंगल सफारी संपली पण या प्रश्नांची मनात निर्माण झालेली भेंडोळी आणि या प्रश्नांनी केलेला पाठलाग अजूनही संपलेला नाही.....
Friday, May 14, 2021
आठवणींची शिंपण
"काँलनीतल्या बायकांनी आज मुलाबाळांसह सिनेमा पहायला जायचं ठरवलं. नुकताच लागला असल्यानं खूप गर्दी होती. म्हणून तर तिकिटं काढायची जबाबदारी दोनतीन मुलांकडे दिली. सगळ्याजणी छान तयारी वगैरे करून सिनेमाला गेल्या. तिकिटं मिळाली असतील की नाही? याची प्रत्येकीला थोडी धाकधुक वाटत होतीच. पण हातात तिकिटं फडकवणारी मुलं दिसलीत आणि त्यांना 'हुश्श' झालं. सगळे आनंदात होते. आधीचा शो संपला. मग बाहेरच्या उभ्या असलेल्यांना आत सोडायला सुरुवात झाली आणि... आत्तापर्यंत आनंदानं फुललेले चेहरे पार लटकले. कारण?
कारण मुलांनी नाटकाची काढतो तशी पहिल्या रांगेतली तिकिटं काढून ठेवली होती. समोरच्या पडद्यावर लंबोळके चेहरे दिसत होते. मान वर करून अख्खा सिनेमा पहाताना डोळ्यांवर आला तो ताण वेगळाच होता".
पहिल्या रांगेतली तिकिटं काढणारा हा बहाद्दर म्हणजे आमचा दादा ! साधारण साठ ते सत्तरच्या दशकात मुंबईत बांद्रयाहून चालत जात प्लाझा टाँकीज मधली ही 'तिकीट पराक्रम' स्टोरी आईकडून आणि दादाकडून आजवर शंभर सव्वाशे वेळा तरी ऐकलेली. ती पुन्हा एकदा आठवायला निमित्त झालं ते एका पुस्तकाचं वाचन....
वाचणा-या प्रत्येकाला नाँस्टेल्जिक करणारं हे पुस्तक आहे, 'सिनेमा पाहणारा माणूस' ! म्हणायला हे त्यांचं आत्मकथन आहे. पण त्याहीपेक्षा भारतीय सिनेमाच्या बदलत्या रुपाचा तो लेखाजोखा आहे. अशोक राणे हे चित्रपट समीक्षक म्हणून सगळ्यांना माहिती आहेतच. पण ते आणखी ब-याच भुमिकेत सगळ्ययांना परिचित आहेत. ते काय आहेत? या प्रश्नाचं तेच उत्तर देतात, "मी सिनेमा पाहणारा माणूस"! सिनेमा जगणाऱ्या या माणसानी घेतलेला हा धांडोळा वाचताना वाचकही जुन्या आठवणींमध्ये रमतो. जसं मला सिनेमा संदर्भात एक एक गोष्ट आठवू लागली होती. दादाचं पहिल्या रांगेची तिकिटं काढणं हे त्यापैकीच एक !
मला लहानपणी आपलं उगाचच वाटायचं की, आमच्या अकोल्यातच फक्त एका रांगेत सिनेमा टाँकीज आहेत. म्हणजे पहा नं... समजा तुम्हाला 'मानेक' टाँकीज मध्ये तिकीट नाही मिळालं तर तुम्ही धावतपळत 'श्याम' गाठू शकता. नसेलच तिथे तर समोरच 'प्लाझा'. थोडं अंतर काटलं की 'रिगल' नि खेटूनच शालीनी. चौक ओलांडला की 'चित्रा' आणि वळसा घातला की 'वसंत'... असे जवळपास एकाच रस्त्यावर सगळी सिनेमाची दुनिया ! मला वाटायचं की हे फक्त आपल्याच इथलं वैशिष्ट्य. पण या पुस्तकानं मला जाणवून दिलं की त्याकाळात देशभरात बहुतांश शहरात अशीच रचना होती. त्याला कारण भारतीयांची मानसिकता! एकदा घरातून बाहेर पडलो आहोत नं? तर सिनेमा पाहूनच घरी जायचं. त्यासाठी प्रेक्षकांची ही सोय बघितल्या जायची. आणि मुख्य म्हणजे रिळांच्या डब्ब्यांची ने आण करणं सोयीचं व्हायचं.
पुस्तक वाचता वाचता समांतर स्वतःच्याही आठवणी जाग्या होत होत्या. राणे एका प्रकरणात सिनेमा बुकलेट आणि तिकिटांचा संग्रह छंदाबद्दल लिहितात. असा छंद असणाऱ्या एका प्रसिद्ध साहित्यिकाचा ते उल्लेख करतात. त्या साहित्यिकाचं नाव वाचता क्षणी मी तर चमकलेच. त्यांच्या जवळ केवळ संग्रह आहे असे नाही, तर या चोपड्या 'ए टू झेड' अशा अल्फाबेटिकली सांभाळून ठेवलेल्या आहेत... ते साहित्यिक आहेत, भालचंद्र नेमाडे!
स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा सिनेमा माणसाला बसल्या जागेवरून जगभर फिरवून आणतो, असं जे अशोक राणे म्हणतात ते किती खरं होतं. एक काळ होता, ज्यात दर शुक्रवारी ही नवी दुनिया खुली व्हायची. थिएटर असो की ओपन थिएटर पहिल्या दिवशीचा पहिला खेळ पहायला झुंबड उडायची. गणेशोत्सव- शारदोत्सवात मैदानात मधोमध पडदा उभारून चित्रपट दाखवला जायचा. बायकांच्या वाट्याला सहसा उलटी बाजूच यायची. पण त्याची गंमत काही वेगळी होती. एकीकडे काही रिळं झाली की तो डब्बा दुसऱ्या उत्सवात आणि तिथला इथे... यामध्ये कितीतरी गमतीजमती घडत. अशाच गंमतींचे पुष्कळ किस्से यात आहेत. पडद्यावरल्या देवाची भावभक्तीने पूजा करणारा प्रेक्षक तर मी पण पाहिला आहे, जय हो संतोषी माता की...
सिनेमाचं जादुई जग आजही भुरळ घालतंच पण तो सत्तरचा जमाना काही वेगळाच होता बाबू मोशाय
मला आठवतं...मी, अरू आणि कौमुदी साधारण एकाच वयाच्या. आम्हाला 'गोपाल कृष्ण' सिनेमा दाखविण्याची जबाबदारी दादावर होती. (पुन्हा दादा आहेच. काय करणार? माझं लहानपण बहिणींपेक्षा जास्त दादा आणि त्याच्या मित्रांमध्येच गेलंय, त्यामुळे आठवणीही त्याच आहेत) तो आम्हाला सिनेमाला घेऊन गेला. शालिनी टाँकीज सुर्यवंशींचं! म्हणजे आईच्या मैत्रिणीचं. तिथे त्याने आम्हाला बाल्कनीत बसवून दिले. माझ्या आणि कौमुदीच्या मध्ये अरू. आणि तो बाजूला रिगलमध्ये कोणता दुसरा सिनेमा बघायला निघून गेला. सिनेमा सुरू होताच काही क्षणात कौमुदी झोपून गेली. आणि पडद्यावर अक्राळविक्राळ पुतना मावशी अवतरली. झालं जे मी भोकाड पसरलं. 'अरू घरी चल' चा धोशा लावला की बिचारी अरू पुढे काही पाहू शकली नाही की काका (म्हणजे माझा दादा) येईपर्यंत उठूही शकली नाही. मध्यंतरात तो आला नि त्याने पापकाँर्न वगैरे वगैरे बरेच काही घेऊन दिले, तेंव्हा कुठे मी शांत बसली. ही गंमत आजही आमची अरू खूप रंगवून सांगते. त्याचीही आठवण हे पुस्तक वाचताना मनात जागी झाली.
ब्लँकची तिकिटं, तेंव्हाचे लेडीज, पोक्त भासावे म्हणून मिशा रंगवणे वगैरे अनेक गोष्टी यात येतात. तेंव्हा त्या कुठे न कुठे तरी आपल्याही.बाबतीत घडलेल्या असतात नि त्याचीच एक स्मरणसाखळी आपण न कळत गुंफत नेतो. मला खात्री आहे, हे वाचत असताना तुमच्याही मनात अशाच काही आठव ढगांनी गर्दी केली असेल. हो नं? अरे मग थांबलात कशाला? करा झरझर टाईप आणि बरसू द्या... होऊन जाऊ द्या आठवणींची शिंपण!
- सीमा शेटे - रोठे,. अकोला.
Thursday, May 13, 2021
टूर डी बालपणीचे प्रवास
आज सहाव्या वर्गात शिकणाऱ्या लेकीची वर्च्युअल ट्रीप शाळेने काढली होती. सध्याच्या कोरोना प्रभावामुळे ही आभासी जगात नेलेली पिकनिक सगळ्यांनाच खूप नवलाईची वाटली. मुलांबरोबर त्यांचे उत्साही पालक सुद्धा घरबसल्या थेट पीरामिडस ऑफ इजिप्त बघून आले. त्यामुळे आजपासून लेकीला "व्हर्चुअली फॉरेन रिटंर्ड" असे बिरूद तिच्या दादाने चिकटविले आहे.
या सगळ्या धामधुमीत मला पण लहानपणापासून केलेले त्या त्या वेळी खूप एक्सायटिंग वाटलेले प्रवास आठवले .अंदाजे चौथ्या वर्गात असताना चंद्रपूर हुन ताडोबा अभयारण्यात वडिलांबरोबर गेल्याची आठवण माझ्यासाठी खूप रम्य आहे .मोठ्या भावाची बारावीची परीक्षा बाबांच्या फॉरेस्ट कॉलेजच्या स्टडी टूर च्या वेळी होती .त्यामुळे तो आईबरोबर चंद्रपूरला थांबला होता. मधला भाऊ आणि मी बाबांबरोबर ऑफिसच्या जीपने ताडोबाला गेलो होतो .बाकी सगळा स्टाफ बस ने आला होता. तिथल्या रेस्ट हाऊस मध्ये राहणं म्हणजे पर्वणीच होती .प्रशस्त आवार ,भरपूर झाडं ,फुलझाडं ,खिडक्यांना जाळी चे पट ,सागवानी लाकडाचे सगळे फर्निचर ,झोपण्याच्या पलंगांवर पांढऱ्या शुभ्र चादरी ,आणि मच्छरदाण्या ....सगळं डोळ्यासमोर आता ही स्पष्ट दिसतं आहे. जंगल सफारी सकाळ-संध्याकाळ आणि बाबांच्या कामाच्या वेळेला पत्ते, गाण्याच्या भेंड्या खेळणे ,तिथल्या पाळीव कुत्रा मांजरी, ससे ,पोपट,लव्हबर्ड्स शी खेळणे असे दोन दिवस अगदी मजेत गेले .पहिल्यांदाच हत्तीवर बसायला या ठिकाणीच मिळाले होते. खाण्यापिण्याची पण खास चव होती .काहीशा तिखट चवीच्या फणसाची भाजी तिथे जशी होती ती पुन्हा कुठेही मिळाली नाही .त्या 2 दिवसात घराची ,आईची अजिबात आठवण नाही !कधी झोप लागते ते कळायचं नाही ,कधी उजाडलं ते घड्याळात बघितलं नाही .परत निघताना मात्र नाराज नव्हते वाटत. घरी जाऊन कधी आईला आणि मोठ्या भावाला सगळं सांगतेय याची वाट बघतच प्रवास पूर्ण केला होता.
अशीच एक आठवण एसटी बसने पहिल्यांदा केलेल्या प्रवासाची. सहावीत असताना ,काय घटना घडली ते नीट आठवत नाही कारण त्यावेळी कळत नव्हते पण माझ्या काकूं बरोबर आम्हाला चंद्रपूर ते अकोला बस ने प्रवास करावा लागला होता .कुठेही जायचे तर बाबांच्या ऑफिसची जीप असायची. मला कळायला लागल्यावर सार्वजनिक बसने जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती .आमचे काका कायम ट्रेन ने प्रवास करायचे .मात्र काकू आणि आता चुलत बहिणी पण नको रे बाबा ,बसच बरी -म्हणून बसनेच प्रवास असायचा त्यांचा. तर अशा काकूंबरोबर मी आणि माझा भाऊ असे आम्ही तिघे निघालो. दोन सीटवर आम्ही तिघे म्हणजे माझं सॅंडविच !भावाला सरक म्हटलं की तो दादागिरी करणार आणि काकूंना व्यवस्थित बसता यावं म्हणून त्यांना काही म्हटलं नाही .जमेल तशी आपापली जागा घेऊन बस फुल्ल झाल्यावर आम्ही निघालो. या काकू मुळातच खूप अबोल. बस मधली गर्दी ,भावाचे पण चेहऱ्यावरचे त्रस्त भाव बघून कुठे फसलो आपण असे झाले होते मला. लोकांना बस लागते म्हणजे काय होतं ते या प्रवासानच मला शिकवलं .त्यातल्या त्यात काकूंना काही बोलतं करावं म्हणून मीच त्यांना घरातल्या सगळ्यांच्या नावाचे अर्थ विचारायला सुरुवात केली. अलका ,संजीव ,राजीव....करत करत सचिन ,नितीन अशी माझ्या भावाच्या नावाचा अर्थ त्यांनी सांगितला .सचिन हे इंद्राचे नाव आणि नीतीने वागणारा तो नितीन! माझ्या भावाने स्वतःची कॉलर टाइट करून घेतलेली मी तिरप्या डोळ्यांनी बघितली. माझी मात्र फार निराशा झाली. साधं ,सरळ वर्षा नाव !कोणीहीअर्थ सांगेल ! आई-बाबांना चांगलं कठीण नाव ठेवायला काय हरकत होती ?असं वाटून गेलं. हा प्रवास संपवून आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. पुढे कधीतरी आई-बाबांना माझे नाव जरा वेगळे, चांगले का ठेवले नाही असे विचारायचे ठरवले .जुलै महिन्यातला माझा जन्म .आईने सहज सांगून दिले -अगं तू झालिस तेव्हा बक्षी काकू भेटायला आल्या होत्या. खूप खुश होत्या .दोन भावांना बहिण झाली म्हणून .आणि म्हणाल्या- ये बारिश के मौसम की है| इसका नाम "वर्षा "रखो. झालं माझं नाव ठरलंही! पुढे अनेक वर्ष आई-बाबांनी फार विचार केलाच नाही कोणीतरी सांगितलेलं नाव दिलं ठेवून -यावरून माझे भाऊ मला चिडवत राहिले आणि मी चिडत राहिले.
असेच कायम लक्षात राहिलेले काही प्रवास म्हणजे चंद्रपूर ते पैठण वृक्ष दिंडी काढली तो, नागपूर ते पुणे पहिल्यांदा ट्रेनच्या फर्स्ट क्लासने प्रवास केला तो, नागपूर ते भोपाळ बहिणीबरोबर दोघींनी केलेला प्रवास ,नागपूर ते अकोला पहिल्यांदा एकटीने केलेला प्रवास ,आई बाबा आणि आम्ही तिघेही पहिल्यांदा जीवाची मुंबई करायला गेलो तो प्रवास. असे अनेक प्रवास झरझर डोळ्यांपुढून आज दिवसभर जात आहेत. त्यात अजून थोडी रमते आणि लिहिणे इथेच थांबवते.
-वर्षा देशपांडे -
Subscribe to:
Posts (Atom)