"कही घनी छाव है,कही धूप है
यह भी एक रूप है,वह भी एक रूप है
कई यहा खोऐंगे, कई जायेंगे
ओ राही , मंजिल की चाह मे"
कई मिलेंगे राह मे " विमल रॉय ह्यांच्या "देवदास" सिनेमातील ह्या ओळी.
किती खरं आहे ना---एकसारखी परिस्थिती कधीच कुठेच नसते. एकीकडे कमालीची शांतता आहे, तर दुसरीकडे तितकाच प्रचंड गोंधळ. एकीकडे पैसाच पैसा आहे, जो कुठे खर्च करावा कळत नाही, तर दुसरीकडे एक वेळच्या जेवणासाठी मरमर करावी लागते आहे. एकाच वेळी काही लोकं अत्यंत आनंदात, सुखात दिवस घालवत आहेत,तर त्याचवेळी कुठेतरी वेदना, मूक रुदन, असंतोष,दुःख हे सगळं काही आहे. हा विरोधाभास आहे म्हणूनच कदाचित सृष्टीचा समतोल टिकून आहे. आशा-निराशा, सुख-दुःख, श्रीमंती-गरिबी, विद्वान-अडाणी--हा भेद असणारच आहे, अन्यथा शिवलीलामृतात म्हटल्याप्रमाणे
"जेथे नाही अधिव्याधी, क्षुधातृषाविरहीत त्रिशुद्धी,नाही काम, क्रोध, द्वंद्व, दुःख,मद मत्सर नाही निःशंक---
अशीच परिस्थिती राहिली असती नाही का भूतलावरची?
सगळीकडे आनंदी आनंद गडे
🥰काश : ऐसा होता----
. असो. परवा एक साधं, सरळ वाक्य वाचण्यात आलं, "कितना सुंदर शब्द था, positive, उसे भी बदनाम कर दिया इस कोरोना ने"--- खरोखर नवलच नाही का, इतर सर्वच बाबतीत आपण "positive" हा शब्द किती यथार्थपणे वापरतो. "Be positive" हे तर जणू आपले घोषवाक्य. (इतरांना सांगण्यासाठी फक्त) नेहमी positive विचार करा, negative विचार मनात आणू नका वगैरे. इव्हन प्रेग्नन्सी चेक करतानाही "positive" रिपोर्ट बघून इच्छुक मंडळी आनंदाने नाचायला लागते, मग हा कोरोना च असा वेगळा कसा? असं काय वेगळं घेऊन आलाय की टेस्ट करायची देखील भीती वाटते, केल्यानंतर रिपोर्ट "positive" यायची तर त्याहून भीती वाटते. "Positive" शब्दाचा अर्थच ह्याने पार बदलून टाकला की हो.
मागील वर्षी आमच्याच एका मैत्रिणीने लिहिले होते, "कोरोना से डर नहीं लगता साब
क्वारनटाईन से लगता है"
त्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की," कोरोना से तो लगता हैही, क्वारनटाईन से अब डर नहीं लागत है (क्यूँकी घर मेही रह सकते है, आरामसे---) हां, पर लोंगोंकी "सलाह और मशवरेसे जादा डर लागत है---"
♀️
आमच्या दोघांमधील "केमिस्ट्री" फार भारिये असं सगळे म्हणतात. 
त्यांचा हात fracture झाला तर माझाही व्हायलाच हवा.
ते आजारी पडले तर मीही पडायलाच हवी----आता त्यांना कोरोना झाल्यावर मी बरी मागे हटेन? त्यांना झाला, मलाही झालाच पाहिजे. अगोदर त्याने ह्यांना भेट दिली.जाणीव करून दिली, मी आहे, but dnt wry, be aware, always. मला मात्र हळूच स्पर्श करून गेला.
( जरी तो लिंगभेद मानत नसला तरी मजवरी जरा कृपा दृष्टी जाहली बेट्याची.)
सुरुवातीचे 4 दिवस असेच गेले. आपण vaccine घेतलंय, आपण रोज 2 वेळा नियमित व्यायाम करतो, एका बैठकीत 500 ते 600 कपाल भारती चे स्ट्रोक मारतो---छे: आपल्याला नसेलच झाला तो कोरोना. (पूर्वी भल्या भल्या गुंडांना आम्ही यू धूळ चारली आहे, तिथे हा कोरोना क्या चीज आहे असा काहीसा भाव, वा समज होऊन बसला होता,त्यामुळे मुलांनी वारंवार सांगूनही टेस्ट करायचे टाळलेच; पण शेवटी समीर आला तत्काळ चे तिकीट करून आणि त्याच दिवशी टेस्ट करवून घेतली. त्याच दिवशी ह्यांना रात्री परत खूप ताप चढला. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांची "सिटी स्कॅन " झाली. त्यात माझा स्कोर आला 0 आणि ह्यांचा आला 8. ह्यांना समीरने लगेच आमच्या असलेल्या पण तरी आमच्या नसलेल्या वास्तूत शिफ्ट करवून घेतले आणि लगेच ट्रीटमेंट सुरू झाली.
त्या परमेश्वराचे लाख लाख आभार, आता हे स्टेबल आहेत.
पण खरी कहाणी आहे ती त्या पाच दिवसात वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळे सल्ले , उपदेश, ज्ञान ऐकण्याची आणि मनावर ताबा ठेवण्याची, तर बरेचदा मन असंतुलित होण्याची, निराशेच्या गर्तेत बुद्धी गहाण टाकण्याची -- --- ऐकायचीये ? कहाणी, सल्ल्यांची?

एकतर माझ्या सारख्या अर्धवट ज्ञान आणि बुद्धी असणाऱ्या व्यक्तींना स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही. त्यामुळे कुणी काही म्हटले तेच खरे आणि योग्य वाटायला लागते. मुख्य म्हणजे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी अगदी विरुद्ध सल्ले दिले तेही पटायला लागतात.(यामागे प्रत्येकाची भावना समजून घेण्याचा उदात्त दृष्टिकोनही असू शकतोच, अर्थात.
). असो. तर दादा, वहिनीला कोरोना झाला
सुभाष और भाबी दोनो को कोरोना हुवा-----अशा तर्हेचया बातम्या कोरोना इतक्याच वेगाने संपूर्ण राज्यभर पसरल्या.(t v वाल्यांनी जरा दुर्लक्षच केलं
)
ह्यांच्या मित्राचा फोन---" ये क्या हुवा? कैसे हुवा? कब हुवा? क्यूँ हुवा?" असे कॉमन प्रश्न विचारल्यानंतर आपण असेही नाही म्हणू शकत, "हो छोडो, ये ना सोचो---" पुढचा सल्ला--"भाबी, आप कूलर चलाते क्या? "ऐसेमे कूलर बिलकुल चलता नहीं ऐसा लोग बोलते है"
मी--"अरे नहीं भैय्या, मुझे खुदही थंड लगने लगती, मै एखादं घंटा चलाती सिर्फ."
भाभी चा फोन---" कुछ काम हो तो बोलना हो, हमे तो इतना खराब लग रहा है, मिलने भी नहीं आ सकते-- समीर घर परही रेहेता है भाभी? आप अलग अलग रूम मे रेहेते होंगे ना? आप के हात का उस्को चलता है क्या? नहीं तो हमारे यहा भेज दो--
🤦♀️(कारण ह्यांचा नाश्ता, चहा, गरम पाणी, जेवणाचे ताट--हे सगळं मी घरूनच पाठवत होती. स्वयंपाक सोडला तर बाकी झाडून सगळी कामे मी स्वतःच
करत होती. समीरच्या हॉस्पिटलमध्ये सतत चकरा सुरू असायच्या, शिवाय बाहेरची कामे, औषधं, बाजार, इतर सामान---)
मी आणि समीर घरीच होतो त्यामुळे आम्ही दोघे "नियमांचे पालन "करतो की नाही हा प्रश्न हमखास असायचा. माझा भाऊ तर म्हटला, समीर ची काळजी घेते आहेस ना? की लाडक्या लेकाला येता जाता जवळ घेणं, मिठ्या मारण सुरू आहे? मी कपाळावर हात मारून घेतला.🤦♀️इतनी भी नादान नहीं हुं मै, मेरे प्यारे भैय्या ---.
त्याने तर मला "remedisivir" ची पण भीती घातली, म्हटला, मी नुकतंच ऐकलं(की वाचलं) की ह्या injections मुळे शुगर लेवल खूप वाढते आणि ते पेशंट साठी खूप घातक आहे. खरे तर काही ह गरज नाही ह्या injections ची. औषधानेच बरा करायला हवा डॉक्टरांनी हा कोरोना, उगाच नंतर side इफेक्ट्स--- मी जाम घाबरली. म्हटलं बापरे, आता काय करायचं? डॉक्टरांना सांगून बघूया का
बरे तो वर असेही म्हटला की मी अगोदर तुला कल्पना दिली नाही असे तू नको म्हणायला.
समीर ला सांगितले तर पोरगा बिचारा आधीच माय,बाप ,डॉक्टर आणि तिथला स्टाफ ह्या चारही आघाड्यांवर एकलाच लढा देत होता. तो वैतागून म्हणाला, मम्मी, आपण डॉक्टरांवर सोडलय ना, मग विश्वास ठेवायला हवा. आणि हे injections हाच यावरचा उपाय आहे (ओव्हर इन्फेक्टिव्ह साठी) अन्यथा त्याचा इतका शॉर्टएज कशाला भासला असता. (एक सांगायचं राहीलच, त्यात माझ्या इंदोर च्या नणंदेचा फोन होता, ती म्हटली माझा स्कोर तर 24 होता, तरी मी घरीच बरी झाली. मला डॉक्टर खूप हुशार भेटले. नो injections and ऑल----
♀️actually तिने सांगितलेला स्कोअर स्कॅन टेस्ट चा नसून दुसराच होता.) समीर ने समजावून सांगितल्यावर मला त्याचेही म्हणणे पटले एकदम.
राधा म्हणायची, मम्मी, तू पण खरे तर 5/6 दिवस ऍडमिट होऊन जायला पाहिजे. घरी राहिली तर कामेच करत राहशील, आराम होणार नाही, मग काय, मला तिचेही म्हणणे अगदी योग्य वाटून स्वतःचीच कीव पण यायला लागली. अरेरे आपण "covid पेशंट" असूनही आपण किती कामे करतो आणि मग उगाचच थकवा जाणवायला लागायचा.
राधा सतत हे देखील सांगत असायची की समीर फक्त आमच्यासाठी धडपडत आलाय तेव्हा त्याची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. पण हा पोट्टया ऐकेल तर शप्पथ! दर दोन तासांनी ह्याची बापाजवळ हजेरी! त्यांना वेळीच गरम पाणी, चहा, नाश्ता, जेवण देणं आणि त्यांची रेग्युलर शुगर ची औषधं स्वतःच्या हाताने देणं----रात्री 12 वाजता पण चक्कर मारून येणार, nurse सलाईन काढायला विसरली तर नाही? त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून तासभर बसून रहाणार----- किती आणि कशी काळजी घ्यावी त्याची?
राधा च्या सासूबाई म्हणे, कुणामुळे झालं त्याचा तपास करा. किंवा कुणा कुणाच्या संपर्कात आले ते बघा म्हणजे त्यांना तरी सावध करता येईल---घाय आता---जिथे गेले होते, तिथून घेऊन आले की देऊन आले हे कसं कळणार? डोकं गरगरायला लागलं अक्षरशः. मोठी बहीण म्हटली, समीर तिथे जातो तर मास्क लावतो ना? तो तिथे गेल्यावर "त्याचे पपा" मास्क लावतात ना? भांडी कुंडी use &throw चीच वापरायला पाहिजेत. तिथली भांडी घरी कशाला आणायची? ---- इतके सल्ले, इतके उपदेश आणि इतके प्रश्न---- की मी स्वतः प्रश्न विचारणे विसरली. जो जे जे म्हणेल ते ते पटल्या सारखं वाटायचं आणि नसलेला मेंदू अजूनच बधीर व्हायचा. ज्यांना होऊन गेलेला त्यांच्या कहाण्या ऐकाव्या लागत, ते अजून वेगळंच. हर्षा म्हणाली, माणिक, ह्या गोळ्यांनी भयंकर झोप येते बरं का, मी तर दिवसभर गुंगीतच असायची. मी म्हटलं, अरे वा! हे बरेच आहे की. तशीही मला दिवसा झोपच येत नाही, कितीही आटापिटा केला तरी -- मी नुसतीच "पडलेली असते " बेडवर, कधी स्वप्नरंजन करत तर बऱ्याचदा कसलं ना कसलं टेन्शन, आणि काळजी करत. स्वभाव असतो एकेकाचा, त्याला कोण काय करणार? ते सिनेमात दाखवतात ना, तशी माझी " split personality" आहे बहुदा.
सीमा ने माझ्यासाठी म्हटलं होतं, "मै ऐसी क्यूँ हुं ---?" पण मी माझ्यासाठी म्हणेन, "मै ऐसी भी हुं और मै वैसी भी हुं---"
हो, मला नातेवाईक आणि घरची मंडळी घाबरट, टेन्शन की दुकान म्हणतात; तर त्याच वेळी माझ्या मैत्रिणी (खूप गोड आहेत म्हणून) मला हसतमुख, "positive" विचारांची, विनोदी वगैरे बरच काही छान छान म्हणतात(जे घरचे कधीच म्हणत नाहीत
)
असो. तर झोप येत नाही म्हणून मी स्वप्नरंजनात देखील मस्त रमते, ज्यात मला असे दिसते की बन्साली ने समीर ला "लाँच " केलंय, समीर "हिरो" झालाय, किंवा त्याने समीर ला दत्तक च घेतलंय
अजय देवगण ने स्वतःहून समीरला जॉब ऑफर केलाय.
आणि मग माझी दुपार छान जाते.तर मूळ मुद्द्याकडे वळू या----
सल्ले---
ह्या सगळ्यात मला एकच सल्ला महत्वाचा वाटला आणि वाटतो, तो म्हणजे, "काळजी करू नका; पण काळजी घ्या"--the- best advice-
काही मदत लागली तर जरूर सांगा असे सगळेच म्हणतात; पण सहसा मदत घेणारेच मदत घ्यायचे टाळतात. त्यातही आमच्या प्रतिभा सारखी रत्ने असतातच, 
हया पटठीचा नवरा I C U मध्ये ऍडमिट असतांना ती मला म्हणते, मी तुझा दोन्ही वेळचा डबा आणू शकते.
मी म्हटलं, हे माते, कुठे आहेत आपले चरण कमल? साष्टांग घालायला मीच येते की.
असो.
अशा निराशाजनक अवस्थेत अशी काही किरणे वेगळीच ऊर्जा देऊन जातात, जेव्हा कुणी हक्काने डबा देऊन जातो (भले बाहेरच्या बाहेर का असेना) कुणाचं हक्काचं पण गोड रागावणं पण ऐकून घायला लागतं, जशी आपली मेधा डियर--- ऑर्डर च सोडली, "फोन बंद किंवा सायलेंट करून ठेवायचा, आराम म्हणजे आरामच करायचा."----🥰 कुणी कॉमन मध्ये तर कुणी पर्सनली व्यक्त होऊन आपल्याला जवळीकतेची जाणीव करून देतात, छान वाटतं; (रेमडीसीविर चा शॉर्टएज असताना भाग्यश्री ने स्वतःहून फोन करून सांगितले की आमच्याकडून घेऊन जा तेव्हा आपण काय कमावलं ह्याची जाणीव पण आपोआप होते.) मीनल, वर्षा, दिशा सारख्या मैत्रिणी "योग्य आहारा" विषयी वेळोवेळी आणि गरज असेल तेव्हा तेव्हा योग्य मार्गदर्शन करतात हे पण "मैत्रीचं भाग्य " च नाही का? पण शेवटी मनुष्य स्वभावानुसार ज्यांनी फोन केलाच नाही, चौकशी सुद्धा केली नाही त्यांच्या बद्दलही मन विचार करायला लागतं. आणि वयानुसार सोडूनही देता येतं, अर्थात. तेवढी maturity तर नक्कीच आलेली असते. आणि winston churchil च्या ह्या ओळी आठवल्या की मग फारसं वाटेनासे होतं.
"When you are 20,you care
What everybody thinks
When you are 40,you stop caring
What everyone thinks
When you are "60" ,you realize
No one was ever thinking about you "in the first place"-----
असं असलं तरी हळवं आणि वेडे मन नेहमीच आशावादी असतं--- ते नेहमीच म्हणत राहतं,
"
एखादा आलाप असा खुलावा
सारा आसमंत उजळून जावा
एखादी लय अशी जुळावी
सारी जाणीव विरून जावी
एखादा संवाद असा जुळावा
गंगेवरती चंद्र झुलावा
एखादं गीत असं छेडावं
शब्दांपलीकडे बोलकं व्हावं ----"(डॉक्टर प्रभा अत्रे )
माणिक
No comments:
Post a Comment