Wednesday, April 14, 2021

मैत्र

 लहानपणीच्या मैत्रीच्या माझ्या आठवणी जरा वेगळ्या आहेत. आम्ही मुलुंडला त्यावेळच्या वाडीत राहायचो, भरपूर घरे होती तिथे! पण एकजात सगळे गुजराथी! काही मोजकी महाराष्ट्रीयन घरे तळमजल्यावर होती,पण तरीही माझ्या बरोबरीच्या अशा मुली फारशा नव्हत्याच. त्यामुळे लहानपणी मला खेळायला मैत्रिणी नाहीत, ही खरं तर माझ्या आईची समस्या होती. त्यातून माझा स्वभाव मुळूमुळू! त्यामुळे सगळ्या माझ्यावर दादागिरी करून घेत. एक वयाने थोडी मोठी असलेली मुलगी (नावही तिचं बेबा) सगळ्यांची बाॅस होती. तिने सांगितलं  की,सगळ्यांची माझ्याशी कट्टी! मी यायचे घरी रडत! मग माझी आई मध्यस्थी करणार, त्या बॉसची अट असायची, खासच! काय? तर माझं नाव पन्नास वेळा घेतलं मेधाने, तर बोलेन परत ! मग काय? अस्मादिक नामस्मरण करताना घेतात, तसे तिचे नाव ती म्हणेल, तितक्यांदा घ्यायचे. मग सगळ्या मला खेळायला घ्यायच्या! मला आजही ते आठवलं की स्वतःचा राग येतो, इतकी कशी मी ------ होते!

         जरा समजायला लागल्यावर, म्हणजे पाचवीत असताना, माझा शेजारी मित्र, अंबरीश,आफ्रिकेतून परत आला. आम्ही दोघेही एकाच वर्गात! आमची दोघांची इतकी गट्टी झाली की,मी त्या तथाकथित मैत्रिणींना मग कधीच भाव दिला नाही. आमचं दोघांचं खूप पटायचं, मैत्रिणींपेक्षा जवळचा असा माझा हा मित्र होता, सगळं शेअर करायचो आम्ही दोघं! आजही ती मैत्री कायम आहे. तो चेष्टेने सगळ्यांना सांगतो की, अगदी रिबीनी आणल्या तरी मला दाखवायची मेधा!अगदी निरागस, निर्मळ, निर्व्याज मैत्री!
              पुढे शाळेत खूप मैत्रिणी झाल्या. त्यात मिनाक्षी केतकरशी खास सूर जुळले, सतत सगळीकडे दोघीही बरोबर! कधीच भांडलो नाही, स्वभावात खूप तफावत असूनही!
आजही दोघांशी नेहमी फोनाफोनी, मेसेजेस नसतात, पण आमच्यापैकी कोणीही प्रॉब्लेम मध्ये असले तर ,खूप काळजी वाटते व आनंदात खूप एन्जॉय करतो. भेटलो की खूप गप्पा रंगतात. अंतराचा काहीही परिणाम झाला नाही ,अशी मैत्री! शाळेतल्या  मैत्रिणीही,मी मुलुंडला गेल्याशिवाय कुठलेही गेट टुगेदर ठरवित नाहीत.प्रेम थोडंही कमी झालं नाहीये.
         नंतर काॅलेज मध्येही मैत्रिणी झाल्या, पण खूप घट्ट अशी मैत्री नाही झाली कुणाशी! पुढे लग्न लवकर झाल्याने,graduation नंतर लगेच अकोल्यात आले. इथे बंगले--- एरियात घरं कमीच! तरी समोर रहाणार्यांना पाच मुली---- त्यांच्याशी तेव्हा जी मैत्री  झाली किंवा बहिणींचं नातं आजही तसेच कायम आहे. मग इथे ओळखी व्हाव्यात, म्हणून मी बीसी जॉईन केली, काही समवयस्क, काही वयाने मोठ्या अशा अनेक मैत्रिणी मिळाल्या. आणखीन एका ग्रुपला जॉईन झाले,तिथे एका विशिष्ट ज्ञातीच्या सर्वजणी होत्या, पण समवयस्क, मी एकटीच वेगळी! पण मला कॉस्मोपॉलिटन वातावरणाची सवय असल्याने कधीच वेगळे वाटले नाही व त्यांनीही मला सामावून घेतले. आजही त्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणी आहेत! नंतर ब्राम्हण व्यापारी संघ, मेडिकल ग्रुप असा मैत्रिणींचा विस्तार झाला. अकोल्यात पोस्ट ग्रॅज्युएशन external केलं,तेव्हा ट्युशन लावली.तिथे एका मुस्लीम मुलीशी छान मैत्री झाली होती, ती खूपच खमकी होती. आम्ही सगळे विरुद्ध ती, असे आमचे केव्हातरी वाद चालत, पण मजा यायची. तिच्याही घरी वगैरे गेलो होतो तेव्हा आम्ही! परधर्मीय अशी ती एकच मैत्रीण!
          नंतर एल. आर.टी. कॉलेज व पुढे एन. के. गोखले कॉलेज तसेच भारत विद्यालय इथे काही वर्ष नोकरी केली. गोखले कॉलेज मध्ये असलेली मैत्रिण,सनातन संस्थेशी निगडीत होती, आमचं खूप पटायचं. पण हा विषय निघाला की, मी माझी मतं स्पष्टपणे मांडायची, बाकीचे टिचर्स वयाने लहान होते. त्यांना आश्चर्य वाटायचं, पण आम्ही एकमेकींना मान्य केलं होतं व मैत्रीत काही बाधा आली नाही त्यामुळे! भारत विद्यालयातही खूप छान मैत्रिणी मिळाल्या. त्यातील काही सख्ख्या मैत्रिणी झाल्या पुढे! नंतर बी.एड .करतानाही मैत्रिणींमधे भर पडली. पुढे भाग्यश्रीने अक्षरा गृपबद्दल मला सांगितलं, नुकतीच अक्षराची सुरवात झाली होती. निकीता त्यावेळी ९-१० वीत होती बहुतेक! तर मी लगेच जाॅइन न करता, थोडं नंतर अक्षरा गृप जॉईन केला! आणि तुम्हाला सांगते की ,मला हव्या असलेल्या मैत्रिणींचा जणू खजिनाच सापडला! कारण इतकी वर्षं नुसती वाचत होते लहानपणापासून! पण वाचलेलं शेअर करायला, चर्चा करायला असं कुणीच आजपर्यंत मिळालं नव्हतं. प्रेम, जिव्हाळा या बरोबरच बौद्धिक भूकही असते माणसाला! या वयाने थोड्या लहान,पण समविचारी अशा मैत्रिणी अक्षरा मुळे लाभल्या. मैत्रीचं एक खास पर्व सुरू झालं. महिन्यातून एकदाच अक्षराची मिटींग का असते असं तेव्हाही वाटायचं आणि आताही! आम्ही केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमातून, इतक्या वर्षांच्या सहवासातून ही मैत्री अगदी पक्की झालीय आता!
( वेगळंच समाधान देणारं मैत्र)
संवाद घर ग्रुप हा आमचा आणखीन एक ग्रुप! इथे सगळ्या समवयस्क, समविचारी! समवयस्क मैत्रीची लज्जत वेगळीच! ती चाखल्याशिवाय नाही कळत! वाटेल त्या विषयावर वाट्टेल ते बोलायचं, वय विसरून दंगामस्ती, एकमेकींची खेचाखेची, नुसती धमाल. आम्ही एकत्र केलेल्या वेगवेगळ्या ट्रिपसमुळे आम्ही आणखीन जवळ आलो. हा ग्रुप म्हणजे एंजॉय आणि फक्त एंजॉय! ( अर्थात संवाद घरचे उपक्रम ही तेवढेच एंजॉय करतो) लहानपणची मैत्री वेगळी, ह्या वयात मात्र सूर जुळावे लागतात, तसे ते खूपजणींशी जुळून आलेत. 
       आपल्या चेहऱ्यावरून आपल्या मनातले ओळखणारी, उगाच हो ला हो न करता स्पष्टपणे काय ते सांगणारी, उगाच खोटं कौतुक न करणारी, आपल्या चुका परखडपणे सांगणारी, आपल्या तब्येतीची आपल्यापेक्षा जास्त काळजी वाटणारी, हक्काने रागवणारी पण तितकाच जीवही लावणारी ( गुळाच्या पोळ्या आवडतात म्हणून आवर्जून पाठवणारी) अशी एकतरी मैत्रिण लाभली तरी तुम्ही भाग्यवान! मी याबाबत खरच खूप भाग्यवान आहे! 
          एका पुस्तकातलं वाक्य आहे की खरा मित्र कोण? तुमच्या संकटकाळात, दुःखात धावून येतो तो! पण नाही, तुमच्या आनंदात जर तो मनापासून सहभागी होऊ शकला, तुमच्याइतकाच आनंद त्याला झाला, तर तो खरा मित्र! मला हे अगदी पटतं! असं मैत्र मला लाभलय! आणखीन काय हवं? 

Tuesday, April 13, 2021

अमेरिका डायरी - दुसरा आठवडा - जनजीवनातून फेरफटका १

लिनकडे इतकं प्रेम, आपुलकी मिळाली, आता पुढचे होस्ट कसे असतील याची उत्सुकता होती आणि धाकधूकही. कल्पना कर, एका पूर्ण अनोळखी कुटुंबात ८ दिवस राहायचं ते ही अमेरिकन. एका मॉटेलपाशी खुणेच्या जागी मला चार्लीने उतरवलं. चार पदरी प्रशस्त रस्त्यांवरुन टीमच्या इतर सदस्यांना घेऊन त्यांच्या होस्टच्या गाड्या पाठोपाठ पोचल्या. "हा बस चौकातच आहे, पोचले का तुम्ही" वगैरे काहीही फोनाफोनी न होता सगळे वेळेत पोचले. वक्तशीरपणा हा तिथल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. तो सामूहिक गुण असावा लागतो. एकट्याने पाळला की लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरी ’आवाज वाढव डीजे’वर थिरकणार्‍या व-हाड्यांकडे पाहत राहण्याखेरीज आपल्या हाती काही उरत नाही. तर आता आमची टीम नव्या होस्ट्सकडे सुपूर्द करण्यात आली. लिंडा मेसर्स- गोरी, सोनेरी केसांची, चेहर्‍यावर टिपिकल वांग असलेली मध्यमवयीन लिंडा वळणावळणाच्या रस्त्याने, वाटेतल्या महत्वाच्या जागांची माहिती देत मला घेऊन तिच्या घरी निघाली.

तिचं तिमजली घर प्रशस्त आवारात एकटंच उभं होतं. आवारात पडलेली वाळकी पानं इकडे तिकडे उडत होती. तिकडे घरं एकमेकांपासून अंतरावर असल्याने शेजार्‍यांकडच्या सुरस हकीकती त्यांना कळत नसणार. आत ’दिल का भँवर करे पुकार’ गाण्यातल्यासारखे निमुळते जिने एकावर एक होते. मला दिलेली खोली छान होती पण बघावं तिकडे मांजरीचे केस. त्या घरात माणसांपेक्षा जास्त असलेल्या मांजरी शेपटी उगारुन सारख्या खालीवर फिरत फिस्कारत होत्या. 

फ्रेश होऊन आम्ही लगेच औपचारिक वेलकम पार्टीसाठी तयार झालो. काही स्थानिक क्लबचे सदस्य आमच्या स्वागताला आपल्या तिरंग्याच्या छटांचा केक घेऊन आले होते. लिंडाचा छोटा मुलगा बारटेंडर झाला होता. काळा कोट, बो अशा वेषात तो लगबगीने वडिलांबरोबर पाहुण्यांना ड्रिंक्स देत होता. तिच्या २ षोडशा मुली किलबिलत होत्या. लिंडाने स्वत: खपून मटन बॉलसदृश पदार्थ केला होता. त्यानंतर मात्र मला ती एकदाही किचनमध्ये काही शिजवताना दिसली नाही. 

दुसर्‍या दिवशीपासून आमचे झंझावाती कार्यक्रम सुरु झाले. पहिली भेट थेट अ‍ॅस्ट्न गावच्या पॉश पोलिसस्टेशनला. अधिकारी आणि पोलीस हसरे, मनमोकळे, फिट आणि देखणे होते. पासपोर्टवर सही घ्यायला मी आपल्या पोलीसस्टेशनला गेले तेव्हा भेटलेले पोट सुटलेले, कंटाळलेल्या चेहर्‍याचे हवालदार आठवले. अर्थात आपले एकच नांगरेपाटील त्यांच्या शंभरांना देखणेपणात पुरुन उरतील हा भाग वेगळा. तर त्यांनी त्यांच्या आपण हॉलीवूड सिनेमात सुसाट धावताना पाहतो तशा गाडीतून छोटी चक्कर मारली. 

आतली यंत्रणा दाखवली. स्टेशनमधली अजब शस्त्र दाखवली. एक गन अशी होती की फायर केली की छर्रा पायाला लागून चोर अडखळून पडे. आतली कच्ची कैद दाखवली, बाहेर कैद्याचे कपडे घालून एक स्मार्ट पुतळा बसवला होता, त्याचे प्रयोजन कळले नाही.

तिकडून आम्ही गेलो अग्नीशमन दलाच्या कचेरीत. तिथले बंब (गाड्या) अतिशय अवाढव्य होते. फायरसेफ्टी आणि त्यांची यंत्रणा यावर तिथे एकाने आम्हाला छान माहिती दिली. भारतीय आया तिकडे मुलांकडे गेल्या की पूजेत धूपदीप लावतात मग फायर अलार्म वाजतो आणि पोलीस आणि या गाड्या पॅ पॅ सायरन वाजवत धडाधड पोचल्या की नुसता गोंधळ उडतो वगैरे किस्से आपण ऐकलेलेच असतील. इथल्याच कँटीनला थोडं खाऊन तिथल्या भल्यामोठ्या नगर वाचनालयात गेलो. बाहेर खायचे म्हटले की आमचा अर्धा वेळ आम्हाला चालेल असा मेनू शोधणे -त्यात पोर्क बीफ नाही नं हे वेटरला समजेल अशा इंग्लीशमध्ये विचारणे यातच जायचा. ज्यूस तर इतका द्यायचे की आम्ही त्यांच्या चमत्कारिक चेहर्‍यांकडे दुर्लक्ष करुन ’खाली’ ग्लास मागवून शेअर करत असू. 

ते जणू स्वप्नातले वाचनालय होते. पुस्तकाचे नाव सांगितले की ते कॉम्प्युटरच्या मदतीने अचूक आणून देत होते. पिवळ्या फायलीत नंबर शोधणे मग हवे ते पुस्तक त्या विभागातल्या बाईंड केलेल्या २३४ पुस्तकातून शोधेतो त्यातला रस संपणे, असं काही व्हायचा चान्सच नाही. काही जण पेय पीत वाचत बसले होते. पुस्तकातील संदर्भ हवे असले तर कॉपी करायला तर तिथेच प्रिंटर, स्कॅनर वगैरे सोय होती. अशी आमची आई असती तर आम्हीही देखणे झालो असतोच्या चालीवर अशी आमची लायब्ररी असती तर आम्ही बालवयातच पीएचडी झालो असतो असे वाटले. अशी लायब्ररी मी नुकतीच अंजूच्या पुण्यातील घराजवळ पाहिली अर्थात ती याच्या तुलनेने फार चिमुकली होती. 

वाचनालयानंतर कोर्टाची भेट होती. प्रशस्त दगडी इमारतीतल्या एका दालनात आम्हाला एकदम आत नेल्यावर कळलं की चक्क एक सुनावणी सुरु आहे. हसर्‍या चेहर्‍याची जज बाई उंचावर एका आसनावर बसली होती. आपल्याकडे पिंचू कपूरटाईप लोकच जजच्या इंग्रजाळलेल्या डगल्यात पाहायची सवय. चश्मदीद गवाह एक दोन असावे. तसंही आत मोजकेच लोक होते. गुन्हा बहुतेक ड्र्ग्जशी संबंधित असावा. एक चिनी तोंडवळ्याचा पण एकूण मेक्सिकन वाटणारा माणूस म्हणजे मुजरिम असावा. त्याच्या मागे राकट पोलीस उभा होता. त्या मुजरिमच्या चेहर्‍याकडे बघायलाही भीती वाटत होती. आमच्या टीममध्ये एकही वकील नसल्याने चालू सुनावणीमधले ओ की ठो कळेना. तेवढ्यात अदालत बरखास्त करुन जजबाई उठून आमच्याकडे आल्या. परिचय- शेकहँड वगैरे झाले. मुजरिमला पोलीस घेऊन गेले. 

शब्दश: गाव भटकून आल्याने घरी आल्याने फार दमलो होतो. डिनरच्या तयारीचे काही चिन्ह दिसेना. या प्रोजेकटच्या आधी आमचे तिथे कसे वागावे याचे ग्रूमींग सेशन झाले होते तसेच या होस्टची कार्यशाळा पण इकडे झाली होती. कोण, कोणत्या देशातले लोक येणार, त्यांच्या रितीभाती कशा असतात, ते साधारण काय खातात, काय नाही, संवाद कसा असावा, काय माहिती द्यावी, कुठली स्थळे दाखवावी इ. पण लिंडाला बहुतेक यापैकी खाण्याचे काय करावे कळेना. तिने फ्रीज भाज्या,चीज, फळांनी भरुन ठेवला होता. त्यात अनेक तयार पदार्थांचे टिनही होते. काय हवं ते करुन खा म्हणून ती वर निघून गेली. ऑ! आता काय बा करावे. मी खुडबूड करुन त्यातून भात आणि भाज्या एकत्र शिजवून, त्यात दिसतील ते इंटरनॅशनल मसाले घालुन, कुकिंग रेंजशी खटाटोप करत काहीतरी पुलाववजा पदार्थ केला. चव येईना मग त्यात एक दोन सॉस घालून ते प्रकरण मांजरींना चुकवत शांतपणे खाल्ले. पुढे आठवडाभर डिनरला असेच प्रयोग केल्याने मी बर्‍याच नव्या पदार्थांचे शोध लावले असावे. 

क्रिकेटशी एकनिष्ठ असलेल्या माझ्या भारतीय मनाला बेसबॉलचा सामना पाहण्यात फार रस नव्हता पण लिंडाचा नवरा जॉन (हा गे होता असा लिंडाचा समज होता ,तो कसा दूर झाला याची कहाणी तिने पुढे एका रात्री ऐकवली) यांनी तसा कार्यक्रम आधीच आखला होता. दुसर्‍या दिवशी स्टेडियमवर पोचलो तर तिथे उत्सवी वातावरण होतं. कुटुंबच्या कुटुंब तिथे सहलीला यावं तशी येऊन बसली होती. कोक वगैरे न पिता अमेरिकन माणसं मुकाट्याने बसूच शकत नाहीत. प्रचंड थंडी, त्यात हातातलं बर्फाचे खडे घातलेलं कोक, मला तर हुडहुडी भरली. जॉन हातवारे करुन आम्हाला खेळाचे नियम समजावून सांगत होता. समजा मैदानाच्या आकाराचा एक मोठा चौकोन काढला, त्याच्या चार पैकी

एका बिंदूवर हातात स्टंपसारखा दांडू घेऊन फलंदाज उभा केला. आता गोलंदाजाने टाकलेला चेंडू टोलवून इतर खेळाडू तो पकडेतो चौकोनाच्या बॉर्डरवरुन धावत जाऊन त्याला मूळ जागी परत यायचं आहे. असा काहीसा तो खेळ आहे. चौकोनी धाव पूर्ण झाली की स्कोअरबोर्ड वरचे आकडे बदलत आणि लोक जल्लोष करु लागत. पंक्तीप्रपंच नको म्हणून आम्ही पण बेगानी शादीमधल्या दीवान्या अब्दुलासारख्या एक दोनदा टाळ्या वाजवल्या. मध्येच एक मिकी माऊससारखा मोठा मॅस्कट उभा राही, इकडे तिकडे बागडे, लहान मुलं खदाखदा हसत. खेळ आहे की जत्रा असं मला वाटायला लागलं. आता आयपीएल क्रिकेट, त्यातल्या चीअरगर्ल्स, जाहिरातींचा धडाका हे बघता त्या दिवशीची जत्रा फारच बाल्यावस्थेतली वाटू लागली आहे. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची त्यांची संस्कृती एव्हाना आपण चांगलीच अंगीकारलीय. 

अपरात्री कारच्या ब्रेकच्या जोरात आवाज आला म्हणून खिडकीतून खाली पाहिलं तर लिंडाची मोठी मुलगी उतरुन आत येताना दिसली. दुसर्‍या दिवशी तिमजली मॅन्शनची मालकीण लिंडा म्हणाली की मुलगी आठवड्यातून ३ संध्याकाळ बेबी सिटींग करायला जाते. त्यातून ती तिच्या फीचा खर्च करते. मला एकाच वेळेला कौतुक आणि विषाद वाटला. असो.

पुढच्या भागात आपल्याला पेनसिल्वानियातील या चिमुकल्या गावाजवळचं वाईडनर विद्यापीठ, हॅरीसबर्ग शहरातल्या आकर्षक विधानभवनापासून स्वप्ननगरीतली वाटावी अशा चॉकलेट फॅक्टरीच्या भेटीपर्यंत बरंच काही अनुभवायचंय. 


-मोहिनी

Sunday, April 11, 2021

वो पाच दिन

  "कही घनी छाव है,कही धूप है

यह भी एक रूप है,वह भी एक रूप है
कई यहा खोऐंगे, कई जायेंगे
ओ राही , मंजिल की चाह मे"
कई मिलेंगे राह मे "  विमल रॉय ह्यांच्या "देवदास" सिनेमातील ह्या ओळी. 
 किती खरं आहे ना---एकसारखी परिस्थिती कधीच कुठेच नसते.  एकीकडे कमालीची शांतता आहे, तर दुसरीकडे तितकाच प्रचंड गोंधळ. एकीकडे पैसाच पैसा आहे, जो कुठे खर्च करावा कळत नाही, तर दुसरीकडे एक वेळच्या जेवणासाठी मरमर करावी लागते आहे. एकाच वेळी काही लोकं अत्यंत आनंदात, सुखात दिवस घालवत आहेत,तर त्याचवेळी कुठेतरी वेदना, मूक रुदन, असंतोष,दुःख हे सगळं काही आहे. हा विरोधाभास आहे म्हणूनच कदाचित सृष्टीचा समतोल टिकून आहे.  आशा-निराशा, सुख-दुःख, श्रीमंती-गरिबी, विद्वान-अडाणी--हा भेद असणारच आहे, अन्यथा शिवलीलामृतात म्हटल्याप्रमाणे 
"जेथे नाही अधिव्याधी, क्षुधातृषाविरहीत  त्रिशुद्धी,नाही काम, क्रोध, द्वंद्व, दुःख,मद मत्सर नाही निःशंक---
अशीच परिस्थिती राहिली असती नाही का भूतलावरची?
सगळीकडे आनंदी आनंद गडे😃🥰काश : ऐसा होता----

. असो. परवा एक साधं, सरळ वाक्य वाचण्यात आलं, "कितना सुंदर शब्द था, positive, उसे भी बदनाम कर दिया इस कोरोना ने"--- खरोखर नवलच नाही का, इतर सर्वच बाबतीत आपण "positive" हा शब्द किती यथार्थपणे वापरतो. "Be positive" हे तर जणू आपले घोषवाक्य. (इतरांना सांगण्यासाठी फक्त)  नेहमी positive विचार करा, negative विचार मनात आणू नका वगैरे.  इव्हन प्रेग्नन्सी चेक करतानाही "positive" रिपोर्ट बघून इच्छुक मंडळी आनंदाने नाचायला लागते, मग हा कोरोना च असा वेगळा कसा? असं काय वेगळं घेऊन आलाय की टेस्ट करायची देखील भीती वाटते, केल्यानंतर रिपोर्ट "positive" यायची तर त्याहून भीती वाटते. "Positive" शब्दाचा अर्थच ह्याने पार बदलून टाकला की हो. 
मागील वर्षी आमच्याच एका मैत्रिणीने लिहिले होते, "कोरोना से डर नहीं लगता साब
क्वारनटाईन से लगता है"
 त्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की," कोरोना से तो लगता हैही, क्वारनटाईन से  अब डर नहीं लागत है (क्यूँकी घर मेही रह सकते है, आरामसे---) हां, पर लोंगोंकी "सलाह और मशवरेसे जादा डर लागत है---"😔🙆‍♀️
  आमच्या दोघांमधील "केमिस्ट्री" फार भारिये असं सगळे म्हणतात. 😝
 त्यांचा हात fracture झाला तर माझाही व्हायलाच हवा.🙄ते आजारी पडले तर मीही पडायलाच हवी----आता त्यांना कोरोना झाल्यावर मी बरी मागे हटेन? त्यांना झाला, मलाही झालाच पाहिजे.  अगोदर त्याने ह्यांना भेट दिली.जाणीव करून दिली, मी आहे, but dnt wry, be aware, always.  मला मात्र हळूच स्पर्श करून गेला.
( जरी तो लिंगभेद मानत नसला तरी मजवरी जरा कृपा दृष्टी जाहली बेट्याची.)  
  सुरुवातीचे 4 दिवस असेच गेले. आपण vaccine घेतलंय, आपण रोज 2 वेळा नियमित व्यायाम करतो, एका  बैठकीत 500 ते 600 कपाल भारती चे स्ट्रोक मारतो---छे: आपल्याला नसेलच झाला तो कोरोना. (पूर्वी भल्या भल्या गुंडांना आम्ही यू धूळ चारली आहे, तिथे हा कोरोना क्या चीज आहे असा काहीसा भाव, वा समज होऊन बसला होता,त्यामुळे मुलांनी वारंवार सांगूनही टेस्ट करायचे टाळलेच; पण शेवटी समीर आला तत्काळ चे तिकीट करून आणि त्याच दिवशी टेस्ट करवून घेतली. त्याच दिवशी ह्यांना रात्री परत खूप ताप चढला. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांची "सिटी स्कॅन " झाली. त्यात माझा स्कोर आला 0 आणि ह्यांचा आला 8. ह्यांना समीरने लगेच आमच्या असलेल्या पण तरी आमच्या नसलेल्या वास्तूत शिफ्ट करवून घेतले आणि लगेच ट्रीटमेंट सुरू झाली. 
त्या परमेश्वराचे लाख लाख आभार, आता हे स्टेबल आहेत.

 पण खरी कहाणी आहे ती त्या पाच दिवसात वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळे सल्ले , उपदेश, ज्ञान ऐकण्याची आणि मनावर ताबा ठेवण्याची, तर बरेचदा मन असंतुलित होण्याची, निराशेच्या गर्तेत बुद्धी गहाण टाकण्याची -- --- ऐकायचीये ? कहाणी, सल्ल्यांची?👆😊
 एकतर  माझ्या सारख्या अर्धवट ज्ञान आणि बुद्धी असणाऱ्या  व्यक्तींना स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही. त्यामुळे कुणी काही म्हटले तेच खरे आणि योग्य वाटायला लागते.  मुख्य म्हणजे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी अगदी   विरुद्ध सल्ले दिले तेही पटायला लागतात.(यामागे प्रत्येकाची भावना समजून घेण्याचा उदात्त दृष्टिकोनही असू शकतोच, अर्थात.😉). असो. तर दादा, वहिनीला कोरोना झाला🙄सुभाष और भाबी दोनो को कोरोना हुवा-----अशा तर्हेचया बातम्या कोरोना इतक्याच वेगाने संपूर्ण राज्यभर पसरल्या.(t v वाल्यांनी जरा दुर्लक्षच केलं 😔)
 ह्यांच्या मित्राचा फोन---"  ये क्या हुवा? कैसे हुवा? कब हुवा? क्यूँ हुवा?" असे कॉमन प्रश्न विचारल्यानंतर आपण असेही नाही म्हणू शकत, "हो छोडो, ये ना सोचो---" पुढचा सल्ला--"भाबी, आप कूलर चलाते क्या? "ऐसेमे कूलर बिलकुल चलता नहीं ऐसा लोग बोलते है"
मी--"अरे नहीं भैय्या, मुझे खुदही थंड लगने लगती, मै एखादं घंटा चलाती सिर्फ." 
भाभी चा फोन---" कुछ काम हो तो बोलना हो, हमे तो इतना खराब लग रहा है, मिलने भी नहीं आ सकते-- समीर घर परही रेहेता है भाभी? आप अलग अलग रूम मे रेहेते होंगे ना? आप के हात का उस्को चलता है क्या? नहीं तो हमारे यहा भेज दो--😇🤦‍♀️(कारण ह्यांचा नाश्ता, चहा, गरम पाणी, जेवणाचे ताट--हे सगळं मी घरूनच पाठवत होती. स्वयंपाक सोडला तर बाकी झाडून सगळी कामे मी स्वतःच
 करत होती. समीरच्या हॉस्पिटलमध्ये सतत चकरा सुरू असायच्या, शिवाय बाहेरची कामे, औषधं, बाजार, इतर सामान---)

 मी आणि समीर घरीच होतो त्यामुळे आम्ही दोघे "नियमांचे पालन "करतो की नाही हा प्रश्न हमखास असायचा. माझा भाऊ तर म्हटला, समीर ची काळजी घेते आहेस ना? की लाडक्या लेकाला येता जाता जवळ घेणं, मिठ्या मारण सुरू आहे? मी कपाळावर हात मारून घेतला.🤦‍♀️इतनी भी नादान नहीं हुं मै, मेरे प्यारे भैय्या ---.
त्याने तर मला "remedisivir" ची पण भीती घातली, म्हटला, मी नुकतंच ऐकलं(की वाचलं) की ह्या injections मुळे शुगर लेवल खूप वाढते आणि ते  पेशंट साठी खूप घातक आहे.  खरे तर काही ह गरज नाही ह्या injections ची. औषधानेच बरा करायला हवा डॉक्टरांनी हा कोरोना, उगाच नंतर side इफेक्ट्स--- मी जाम घाबरली.   म्हटलं बापरे, आता काय करायचं? डॉक्टरांना सांगून बघूया का🤔 बरे तो वर असेही म्हटला की मी अगोदर तुला कल्पना दिली नाही असे तू नको म्हणायला.
 समीर ला सांगितले तर  पोरगा बिचारा आधीच माय,बाप ,डॉक्टर आणि तिथला स्टाफ ह्या चारही आघाड्यांवर एकलाच लढा देत होता. तो वैतागून म्हणाला, मम्मी, आपण डॉक्टरांवर सोडलय ना, मग विश्वास ठेवायला हवा. आणि हे injections हाच यावरचा उपाय आहे (ओव्हर इन्फेक्टिव्ह साठी)  अन्यथा  त्याचा इतका शॉर्टएज कशाला भासला असता. (एक सांगायचं राहीलच, त्यात माझ्या इंदोर च्या नणंदेचा फोन होता, ती म्हटली माझा स्कोर तर 24 होता, तरी मी घरीच बरी झाली. मला डॉक्टर खूप हुशार भेटले. नो injections and ऑल----🙆‍♀️actually तिने सांगितलेला स्कोअर स्कॅन टेस्ट चा नसून दुसराच होता.)  समीर ने समजावून सांगितल्यावर मला त्याचेही म्हणणे पटले एकदम.
 राधा म्हणायची, मम्मी, तू पण खरे तर 5/6 दिवस ऍडमिट होऊन जायला पाहिजे. घरी राहिली तर कामेच करत राहशील, आराम होणार नाही, मग काय, मला तिचेही म्हणणे अगदी योग्य वाटून स्वतःचीच कीव पण यायला लागली. अरेरे आपण "covid पेशंट" असूनही आपण किती कामे करतो आणि मग उगाचच थकवा जाणवायला लागायचा.😫राधा सतत हे देखील सांगत असायची की समीर फक्त आमच्यासाठी धडपडत आलाय  तेव्हा त्याची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. पण हा पोट्टया ऐकेल तर शप्पथ! दर दोन  तासांनी ह्याची बापाजवळ हजेरी! त्यांना वेळीच गरम  पाणी, चहा, नाश्ता, जेवण  देणं आणि त्यांची रेग्युलर शुगर ची औषधं स्वतःच्या हाताने देणं----रात्री 12 वाजता पण चक्कर मारून येणार,  nurse सलाईन काढायला विसरली तर नाही?  त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून तासभर बसून रहाणार----- किती आणि कशी काळजी घ्यावी त्याची?😔

राधा च्या सासूबाई म्हणे, कुणामुळे झालं त्याचा तपास करा. किंवा कुणा कुणाच्या संपर्कात आले ते बघा म्हणजे त्यांना तरी सावध करता येईल---घाय आता---जिथे गेले होते, तिथून घेऊन आले की देऊन आले हे कसं कळणार? डोकं गरगरायला लागलं अक्षरशः. मोठी बहीण म्हटली, समीर तिथे जातो तर मास्क लावतो ना? तो तिथे गेल्यावर "त्याचे पपा" मास्क लावतात ना? भांडी कुंडी use &throw चीच वापरायला पाहिजेत. तिथली भांडी घरी कशाला  आणायची? ---- इतके सल्ले, इतके उपदेश आणि इतके प्रश्न---- की मी स्वतः प्रश्न  विचारणे विसरली. जो जे जे म्हणेल ते ते पटल्या सारखं वाटायचं आणि  नसलेला मेंदू अजूनच बधीर व्हायचा. ज्यांना होऊन गेलेला त्यांच्या कहाण्या ऐकाव्या लागत, ते अजून वेगळंच. हर्षा म्हणाली, माणिक, ह्या गोळ्यांनी भयंकर झोप येते बरं का, मी तर दिवसभर गुंगीतच असायची. मी म्हटलं, अरे वा! हे बरेच आहे की. तशीही मला दिवसा झोपच येत नाही, कितीही आटापिटा केला तरी -- मी नुसतीच "पडलेली असते " बेडवर, कधी स्वप्नरंजन करत तर बऱ्याचदा कसलं ना कसलं टेन्शन, आणि काळजी करत. स्वभाव असतो एकेकाचा, त्याला कोण काय करणार?  ते सिनेमात दाखवतात ना, तशी माझी " split personality" आहे बहुदा.😇 सीमा ने माझ्यासाठी म्हटलं होतं, "मै ऐसी क्यूँ हुं ---?" पण मी माझ्यासाठी म्हणेन, "मै ऐसी भी हुं और मै वैसी भी हुं---" 
 हो, मला नातेवाईक आणि घरची मंडळी घाबरट, टेन्शन की दुकान म्हणतात; तर त्याच वेळी माझ्या मैत्रिणी (खूप गोड आहेत म्हणून)  मला हसतमुख, "positive" विचारांची, विनोदी वगैरे बरच काही छान छान म्हणतात(जे घरचे  कधीच म्हणत नाहीत😔
असो. तर झोप येत नाही म्हणून मी स्वप्नरंजनात देखील मस्त रमते, ज्यात मला असे दिसते की बन्साली ने समीर ला "लाँच " केलंय, समीर "हिरो" झालाय, किंवा त्याने समीर ला दत्तक च घेतलंय🙄😃 अजय देवगण ने स्वतःहून समीरला जॉब ऑफर केलाय.👏👏 आणि मग माझी दुपार छान जाते.तर मूळ मुद्द्याकडे वळू या----

सल्ले---
 ह्या सगळ्यात मला एकच सल्ला महत्वाचा वाटला आणि वाटतो, तो म्हणजे, "काळजी करू नका; पण  काळजी घ्या"--the-   best advice-👍 काही मदत लागली तर जरूर सांगा असे सगळेच म्हणतात; पण सहसा मदत घेणारेच मदत घ्यायचे टाळतात. त्यातही आमच्या प्रतिभा सारखी रत्ने असतातच, 😄😘हया पटठीचा नवरा I C U मध्ये ऍडमिट असतांना ती मला म्हणते, मी तुझा दोन्ही वेळचा डबा आणू शकते. 😳 मी म्हटलं, हे माते, कुठे आहेत आपले चरण कमल? साष्टांग घालायला मीच येते की.😂  असो. 
अशा निराशाजनक अवस्थेत अशी काही किरणे वेगळीच ऊर्जा देऊन जातात, जेव्हा कुणी हक्काने डबा देऊन जातो (भले बाहेरच्या बाहेर का असेना) कुणाचं हक्काचं पण गोड रागावणं पण ऐकून घायला लागतं, जशी आपली मेधा डियर--- ऑर्डर च सोडली, "फोन बंद किंवा सायलेंट करून ठेवायचा, आराम म्हणजे आरामच करायचा."----🥰 कुणी कॉमन मध्ये तर कुणी पर्सनली व्यक्त होऊन आपल्याला जवळीकतेची जाणीव करून देतात, छान वाटतं; (रेमडीसीविर चा शॉर्टएज असताना भाग्यश्री ने स्वतःहून फोन करून सांगितले की आमच्याकडून घेऊन जा तेव्हा आपण काय कमावलं ह्याची जाणीव पण आपोआप होते.) मीनल, वर्षा, दिशा सारख्या मैत्रिणी "योग्य आहारा" विषयी वेळोवेळी  आणि गरज असेल तेव्हा तेव्हा योग्य मार्गदर्शन करतात हे पण "मैत्रीचं भाग्य " च नाही का? पण शेवटी मनुष्य स्वभावानुसार ज्यांनी फोन केलाच नाही, चौकशी सुद्धा केली नाही त्यांच्या बद्दलही मन विचार करायला लागतं.  आणि वयानुसार सोडूनही देता येतं, अर्थात. तेवढी maturity तर नक्कीच आलेली असते. आणि winston churchil च्या ह्या ओळी आठवल्या की मग फारसं वाटेनासे होतं.
"When you are 20,you care
What everybody thinks
When you are 40,you stop caring
What everyone thinks
When you are "60" ,you realize
No one was ever thinking about you "in the first place"----- 
 
असं असलं तरी हळवं आणि वेडे मन नेहमीच आशावादी असतं--- ते नेहमीच म्हणत राहतं, 👆"
 एखादा आलाप असा खुलावा
सारा आसमंत उजळून जावा
एखादी लय अशी जुळावी
सारी जाणीव विरून जावी
एखादा संवाद असा जुळावा
गंगेवरती चंद्र झुलावा
एखादं गीत असं छेडावं
शब्दांपलीकडे बोलकं व्हावं ----"(डॉक्टर प्रभा अत्रे )


माणिक

Saturday, April 10, 2021

महाराष्ट्र एक्सप्रेस

 पण ही “महाराष्ट एक्सप्रेस”च न? 


माझं लग्न झालं त्यानंतर एक-दोन वर्षातला हा किस्सा!  पीयुष अगदी तान्हा होता तेव्हाची गोष्ट. थोडी पार्श्वभूमी सांगते आधी. माझी MSc ची परीक्षा झाल्या झाल्या मला अकोल्यालाच शिवाजी कॉलेजला जॉब मिळाला आणि त्याच दरम्यान लग्नही ठरलं. अकोल्याला चालू सेशन पूर्ण करून मी वर्धेला सासरी आली. लगोलग बाळराजेंचंही आगमन झालं. त्याच दरम्यान वर्धेच्या एकुलत्या  एक सायन्स कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू  होते म्हणून मी तेथे गेली., इंटरव्ह्यू वगैरे छान झाला आणि इंटरव्ह्यू बोर्ड मध्ये असणारी तीन चार प्रतिष्ठित मंडळी, जी  माझ्या सासऱ्यांच्या चांगल्याच परिचयाची होती. त्यांनी सासऱ्यांना सांगितले “सुनबाई ची डिग्री इलेक्ट्रॉनिक्स मधली  आहे आणि आपल्याकडे तर जागा कम्प्युटर सायन्स मध्ये आहे, त्यामुळे तुम्ही आपल्याच कॉलेज मध्ये असलेला  नागपूर युनिव्हर्सिटी चा एक वर्षाचा “पोस्ट बीएससी डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स” करायला सांगा.  मग पुढल्या वर्षी बघू या.” 

           झालं! मग मी त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज  पूर्ण करण्याच्या मागे लागली. ऍडमिशन फॉर्म वगैरे भरला. पण एक अडचण होती. अजून मी युनिव्हर्सिटीतून टीसी आणलेला नव्हता. त्यामुळे तो आणण्यासाठी मला अमरावती ला जावे लागणार होते.  मग दुसर्‍या दिवशी मी आणि सोबत म्हणून कॉलेजमध्ये शिकणारी माझी चुलत नणंद मृदुला( जिला सगळे मधुच म्हणायचे)अशा आम्ही दोघी वर्धेहून सकाळीच निघालो.  दोन एक तासात बडनेराला  (तेथून नंतर ऑटो ने दहा बारा मिनिटात अमरावतीला) पोहोचलो.  थेट युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन काम आटोपले. टीसी घेतला , एका ठिकाणी थोडी पोटपूजा केली आणि निघालो परत जायला. 

             काम झटपट आटोपले म्हणून मी खुश होती. आम्हाला दोन वाजताची महाराष्ट्र एक्सप्रेस पुन्हा बडनेराहून पकडायची होती. तेव्हा ती नागपूर-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस होती. नंतर ती गोंदिया-कोल्हापूर अशी झाली. बरं मी नेहमीच अकोला-वर्धा महाराष्ट्र एक्सप्रेसने  जायची, यायची. कारण लग्नानंतरही तीन चार महिने, चालू सेशन संपेपर्यंत माझा अकोल्याचा जॉब सुरूच होता. त्यामुळे शनिवार-रविवार अकोला-वर्धा चकरा असायच्याच. बडनेरा दोघांच्या मधलं स्टेशन. त्यामुळे घरातल्या सगळ्यांना वाटले  काळजीचे काही कारण नाही. जातांना स्टेशन वर कुणीतरी सोडून देईलच. येतांना महाराष्ट्र एक्सप्रेसने येतील आरामात परत. 

            आम्ही दोघी पावणेदोन ला स्टेशनवर पोहोचलो सुद्धा . दहाबारा  मिनिटातच  गाडी आली. बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला मी कन्फर्म करायला विचारले “महाराष्ट्र एक्सप्रेसच आहे न ही ?” तो म्हणाला,  “हो, महाराष्ट्र एक्सप्रेसच आहे!”. मग  मी अन मधूने पटकन मस्तपैकी खिडकीजवळची जागा पटकावली अन बसलो गप्पा करत. तेव्हा रिझर्वेशन वगैरे एवढं काही  प्रस्थ नव्हतं. नंतरच्या स्टेशनवर चहा घेतला.  बाजूच्या  माणसाने विचारले, “कुठलं स्टेशन?”  त्यालाही सांगितलं मुर्तीजापुर आहे  म्हणून.  पुन्हा आमच्या गप्पा सुरु.  थोड्यावेळाने सहजच बाजूच्या बाईने विचारलं, “कुठे जाताय?”  आम्ही सांगितलं, “वर्धेला!”. ती थोडीशी विचित्र नजरेने बघत म्हणाली,  “वर्धा तर कधीचच गेलं हो ताई!” पण मी तिला अगदी कॉन्फिडंटली सांगितलं, “नाही हो! आता येईल वर्धा!”  ती माझ्याकडे “दिसते तर  बापडी चांगली शिकली सवरलेली!”  अशा काहीश्या नजरेने बघायला लागली. आता बाकी डब्यातल्या इतर लोकांनीही कान टवकारले आणि तेही उत्सुकतेने गंमत बघायला लागले. सगळ्यांचे चेहरे बघून परत एकदा कन्फर्म करायला मी बाजूच्या माणसाला पुन्हा एकदा विचारलं “महाराष्ट्रच आहे न हो ही?”  तो “हो” म्हणाला  अन मी निश्चिंत होऊन परत मधूशी  काहीतरी बोलणार तोच जवळचा एक प्रवासी, ज्याला  काय गडबड झाली असावी  ते लक्षात आलं, तो म्हणाला, “अहो ताई,  तुम्ही बडनेराला चढल्या न गाडीत? ही नागपुर-कोल्हापुर एक्सप्रेस आहे. कोल्हापूरला चाललीय!” तरीही आम्ही निर्विकार!  तेव्हा तोच पुन्हा म्हणाला “ताई, तुम्ही चुकीच्या गाडीत बसल्या आहात बहुदा! आता अकोला येईल. तुम्ही तिथे उतरा, दुसरी एखादी गाडी पकडून वर्धेला जा!”  

         मला काही कळेना. मी पुन्हा म्हटलं, “अहो, पण ही महाराष्ट्रच आहे न ?“ त्याला आता आमची कीव आली असावी. तो समजावणीच्या  सुरात म्हणाला “होय ताई! बडनेरा ला दोन वाजता एकाच वेळी दोन्ही महाराष्ट्र एक्सप्रेस येतात. एक कोल्हापूर ला जाणारी आणि एक नागपूरला जाणारी. तुम्ही गडबडीत चुकीच्या गाडीत चढलेल्या दिसताहेत!” आता बाकी काय घोटाळा झाला हे लक्षात येऊन आमचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. डब्यातल्या इतर   लोकांचीही  चांगलीच करमणूक होत होती.  आता इतरही सल्ले द्यायला पुढे सरसावले. “तुम्ही आता अकोल्याहून कोणकोणती  गाडी पकडू शकता आणि केव्हा पोहचाल, तुम्ही एस टी ने पण जाऊ शकाल, नाहीतर अकोल्याला मुक्काम करून उद्या सकाळीच जा” इत्यादी इत्यादी अनेक सल्ले पुढे येऊ लागले.  आम्ही दोघीही चुपचाप हो ला हो करत बसलो.  दुसरा पर्याय तरी काय होता  म्हणा! 

              सुदैवाने अकोला माझे माहेरच असल्याने काही प्रॉब्लेम नव्हता. अकोल्याला उतरून थेट आईकडे गेलो.  अचानकच न कळवता कशी काय आली म्हणून सगळे जण चकित! त्यांना सगळं  रामायण सांगितलं.  STD बूथ वर जाऊन भावाने वर्धेला फोन केला. मोबाईल वगैरे काही नव्हते तेव्हा! नंतर जेवणखाण  आटोपून रात्री साडेआठच्या नवजीवनने निघालो परत वर्धेला जायला.  रात्रभर आराम करून दुसऱ्या दिवशी पण जाऊ शकलो असतो पण तान्हा पीयुष घरी होता त्यामुळे माझी तगमग सुरू होती. शेवटी रात्री बाराला एकदाचे वर्धेला पोहोचलो. स्टेशनवर आम्हाला घ्यायला नवरोजी उभेच होते मिस्कील हसत, मला चिडवायला एक सॉलिड पॉईंट मिळाला म्हणून! घरी पोचल्यावर सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झालेली!  तेव्हापासून महाराष्ट्र एक्सप्रेस म्हटली की अजूनही हा किस्सा आठवून खूप हसायला येतं. खरं  म्हणजे दोन्ही महाराष्ट एक्सप्रेस आजूबाजूच्या प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी येत असल्याने आणि ते माहिती नसल्याने असा घोटाळा होणं सहजच शक्य होतं. पण नंतर पुढे कितीतरी दिवस मग “काय तरी हुश्शाssर  बॉ तुम्ही दोघी मधू!” म्हणत आमच्या त्या बावळटपणाचा उद्धार अनेकदा झाला, हे सांगणे न लगे!


©मधुमती वऱ्हाडपांडे