ओरिसानंतर कित्येक ठिकाणांना भेटी दिल्या, पण ओरिसात भेटलेले लोक, त्यांच्या आठवणी या नेहमीच एका खास कप्प्यात राहिल्या. त्या विसरणे अशक्य!
Tuesday, September 15, 2020
श्रीमंती
Sunday, September 13, 2020
अमेरिका डायरी- प्रयाण
ग्रुप स्टडी एक्स्चेंज (सांस्कृतिक आणि व्यावसायिक आदानप्रदान)च्या मुलाखतीसाठी मी नाशिकला गंजमाळ हॉलमध्ये पोचले. हायफाय माहौल दिसत होता. सूटबूट आणि सिल्क साड्या इकडून तिकडे झोकात वावरत होत्या. काही जण बुद्धासारखे आढयाकडे टक लावून पाहत होते. मोबाईल प्रकरण तेव्हा दुर्लभ असल्याने काही पुस्तकात डोकं खुपसून बसले होते. मग माईकवरुन घोषणा झाली की हा प्रकल्प अमेरिकेसाठी असल्याने, निवड झालेल्यांना अमेरिकन कुटुंबांसोबत एकट्याने राहायचं असल्याने आणि तिकडच्या १०,१२ क्लब्जमध्ये सादरीकरण करायचं असल्याने लेखी फेरी, उत्स्फूर्त वक्तृत्व फेरी, मुलाखत आणि पुढचे सगळे सोपस्कार पूर्णपणे इंग्लीशमधून होतील. मध्येच हिंदी, मराठीचा टेकू घेतला तर तुम्ही बाद. सगळ्यांच्या घशाला आता थोडी कोरड पडली. ४,५ सूट आणि साड्या तर ताडकन उठून चालत्या झाल्या. वक्तृत्व फेरीत काही जण हातात आलेली विषयाची चिठ्ठी वाचून दीर्घ श्वास घेऊन एकदम एक्झिट घेते झाले. चला, तेवढीच स्पर्धा कमी. तरी ७० जण उरले. मला ’करप्शन’ विषय आला होता. मनात ’हर हर महादेव’ म्हणून मी काय ते बोलून आले. बहुतेक जण चांगले बोलले. शेवटी ९ जणांच्या पॅनेलने प्रत्यक्ष मुलाखत घेतली. भारताचा आणि अमेरिकेचा इतिहास, करंट अफेअर्स, तुम्ही आयुष्याकडे कसे बघता, तुमचे आदर्श कोण, तेच का?, अवांतर कौशल्ये कोणती, काही लॉजिकल आणि वैयक्तिक प्रश्न असे स्वरुप होते. ४-४ च्या दोन टीम आणि प्रत्येकी २ स्टँड बाय असे फक्त बारा जण निवडले जाणार होते.
निकाल आला. डॉ. किबे सर आणि याच प्रकल्पासाठी कॅनडाला जाऊन आलेले प्रा. नावलेकर यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली तयारी आणि मुलाखत मनासारखी झाली असे वाटल्याने निदान स्टँड बाय साठी तरी निवड होईल अशी मला खात्री होती. पण चक्क पहिलेच नाव माझे घोषित झाले तेव्हा क्षणभर अवाक झाले. मग अभिनंदन वगैरे आटोपले. घरी, आईला, सरांना कळवले. आमच्या टीममध्ये डॉ. श्रीया, आर्किटेक्ट वैशाली, हॉर्टीकल्चरीस्ट हेमराज आणि मी असणार आणि आम्ही ईस्ट कोस्टला फिलाडेल्फियाला जाणार असे कळले. दुसरी टीम शिकागोला. आता व्हिसाच्या अर्जासाठी पासपोर्ट जमा करायचा होता. माझा सहज म्हणून काढलेला पासपोर्ट तयार असून मी नागपूरला जाऊन तो घेऊन यायचे बाकी होते. व्हिसा अर्जाच्या आत म्हणजे परवा सकाळपर्यंत तो जमा केला नाही तर नाईलाजाने माझी संधी स्टँड बायला द्यावी लागणार होती. ते होते अमरावतीचे. आपण त्यांना भयंकर बडबडे म्हणून ब म्हणू. मला पासपोर्ट न मिळण्यावर त्यांची अमेरिकावारी अवलंबून असल्याने आमचे एक चमत्कारिक नाते तयार झाले होते. निकालाचा आनंद आणि पासपोर्ट न जमा केल्यास हातातून संधी निसटते की काय याचा ताण अशा द्विधा मनस्थितीत मी निघाले. तिकिट नेमके कन्फर्म झाले नाही पण ’ब’ने मला त्यांच्या बर्थवर बसू दिले. known devil is better than unknown angel या न्यायाने मी बसले पण अकोला येईपर्यंत त्यांनी कर्कश्य आवाजात माझे कान गळून पडतील इतकी बडबड केली.
घरी सगळे सांगून मुलांना भेटून मी तडक नागपूरला गेले. सुदैवाने पासपोर्ट लगेच मिळाला आणि महेशच्या सांगण्यानुसार मिळेल त्या गाडीने थेट नाशिकला जाऊन मी तो एकदाचा जमा केला. हुश्श. आता आमच्यापैकी कुणाचा व्हिसा रिजेक्ट झाला तर ब ला पुन्हा संधी होती. त्यांच्याबरोबर अमेरिकेला जायच्या कल्पनेने मला आधीच हिव भरले पण आमची कागदपत्रं व्यवस्थित असल्याने आणि फिलाडेल्फिया विभागाच्या गव्हर्नरच्या आमंत्रणपत्रामुळे आम्हाला सगळ्यांना लगेच व्हिसा मिळाला, तो ही १० वर्षांसाठी. बाहेर आलो तर त्या मुंबईच्या कार्यालयासमोर अजूनही मारुतीच्या शेपटासारखी रांग होती. व्हिसा न मिळालेल्या, चुडे ल्यालेल्या काही पंजाबी नव्या नवर्या बाजूला अक्षरश: गळा काढून रडत होत्या. अमेरिका-कॅनडामध्ये बरेच पंजाबी आहेत. काही जण भारतात येऊन लग्न करतात आणि एकटेच आधी परत जातात. मागून व्हिसा मिळेल तेव्हा बायका येतात. अनेक देश तिकडे पोचल्यावरही व्हिसा देतात पण हा व्हिसा मिळालेल्यांच्या उड्या, मिठ्या, चुंबनं पाहून आपल्याला काहीतरी अद्भुत मिळालेले दिसतेय याची आम्हाला जाणीव झाली. शिरीष कणॆकरांनी " अमेरिकेचा व्हिसा मिळाल्याचा आनंद हा सात मुलींच्या पाठीवर ज्याला मुलगा होतो त्याच्या आनंदाच्या जवळपास जाणारा असतो" असे याचे खासच वर्णन केले आहे. मला इतकाबितका नाही पण आनंद झाला, त्याच वेळी चाळीस दिवस आपल्या साडेचार वर्षांच्या इवलुश्या जुळ्यांना ठेवून जायचेय या कल्पनेने पोटात खड्डा पण पडला होता.
माझा न्यूजर्सीचा मामेभाऊ विक्रम, आता लॉस एंजेलिसला राहणारा (त्याला एलए म्हणायचं म्हणे) कंपनीतला माजी बॉस आणि मित्र श्रीराम आणि ऑर्कुटवर (तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप नव्ह्तंच) ओळख झालेले न्यूयॉर्कचे अनिल नेने या तिघांना विचारून जमेल तशी तयारी सुरु केली. अकोल्यात तेव्हा काहीच मिळायचे नाही. दरम्यान रोटरीकडून नागपूरला झालेले ग्रूमिंग सेशन्स खूपच मोलाचे होते. अगदी वेस्टर्न टॉयलेट एटिकेट्सपासून, देहबोली कशी असावी, वेळव्यवस्थापन ते प्रेझेंटेशन स्किल्सपर्यंत. भारतीयांची प्रतिमानिर्मिती तुमच्या हातात आहे हे सतत बजावून सांगितले गेले. अशा भेटींमुळॆ आमच्या टीमची एव्हाना आपसात चांगली मैत्री झाली होती. आता आमचे अमेरिकेतील कार्यक्रमांचे सिस्टमॅटिक वेळापत्रक मेलवर आले. जायचा दिवस आला. विमानतळावर टीमपाशी वेळेत पोचलो. चेक इन पाशी महेशकडे एकदा शेवटचे वळून पाहिले, म्हटलं ’विमान वाटेत धडपडलं तर काय घ्या’. श्रीया, वैशाली व आमच्या टीमलीडर सरांनी भारतात बरेचदा विमानप्रवास केला होता. हेमराज आणि मी मात्र पहिल्यांदाच विमानात बसून एकदम बुईंग अमेरिकेलाच निघालो होतो. विमानात सीटबेल्ट कसे वापरावे हे हवाईसुंदरी सांगते मात्र तिथले टॉयलेट कसे वापरावे हे काही कोणी शिकवले नव्हते पण ’हर हर महादेव’ म्हटले की सारे जमते. :-)
गाडी, आपलं, विमान फ्रँकफुर्टला (फ्रँकफर्ट म्हणायचं म्हणे) म्हणजे जर्मनीत पोचले. ४ तास हॉल्ट होता. अगदी पॉश पण अवाढव्य एसटी स्टँड असावे तसे लोक बाकावर, खाली कुठेही बसले होते. काळे, करडे, निळे, तपकिरी एवढेच कपड्यांचे रंग. तिथे कॉफी विचारली. किंमत ऐकून मनात गुणाकार केला, डोळे पांढरे केले आणि काचेतून दिसणारे देखणे लखलखते शहर पाहत गप्प बसलो. नाहीतर काय नुसतं काळं गरम पाणीच असतंय अशी मनाची समजूत घातली. इथे पुढच्या फ्लाईटचे चेक-इन धिप्पाड अमेरिकन अधिकारी करत होते. नियमबाह्य गोष्टी भल्यामोठ्या डस्टबीनमध्ये अक्षरश: फेकून देत होते. लोक कुई-कुई करुन काही सांगू लागले की मानगूट धरुन बाजूला करत. वैशाली आणि सरांचे जास्त वजनाचे बरेच महागडे कॉस्मेटिक्स त्यात फेकले गेले. अमेरिकेने ट्वीन टॉवर हल्ल्यापासून ब्रोकन विंडो सिक्युरिटी ठेवलीय. म्हणजे काचेवरचा साधा तडा सुद्धा ते बॉबस्फोटाइतका गंभीर मानतात त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत ते तडजोड करत नाहीत. अगदी शाहरुख खानला सुद्धा त्यांनी संशयावरुन तपासणीसाठी बाजूला बसवून ठेवल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. अखेर हे दिव्य आटोपून एकदाचे विमान सुटले आणि आमचे वर्हाड फिलाडेल्फियाला सुखरुप पोचले. (19 April 2007)
क्रमश:
Saturday, September 12, 2020
गच्ची
गेल्या जवळजवळ सहा महिन्यांपासून आपण सगळेच कोरोनाकाळ अनुभवतोआहोत. आता ’ रोज मरे त्याला कोण रडे’ अशा काहीशा स्थितप्रज्ञ स्थितीला
आपण सगळेच येऊन पोहचलेलो असलो तरी काही घटना आपल्याला हादरवून टाकतात हे
खरेच. घराबाहेर मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आपल्या प्रत्येकाचं जग
ह्यामुळे आकुंचन पावलं आहे. आता हळुहळु सगळं सुरळीत करण्याचे प्रयत्न
सुरु झालेत पण प्र्त्येकाच्याच मनात अस्वस्थतेचं मळभ काही काळ राहणार हे
निश्चित !
ह्या नवीन परिस्थितिशीही आपण हळुहळु जुळवुन घ्यायला लागलो
आहोत . प्रत्येकाचं आपलं रुटिन सेट झालंय . कोरोना काळापासुन माझ्या
नव्हे आमच्या तिघांच्याही रोजच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनलीय ती आमची
गच्ची !
तसं बैठ्या घरात राहणार्याला गच्चीचं नाविन्य नाही पण
सहनिवासात राहणार्या आम्हाला गच्ची कोरोनाकाळात प्रिय झाली. दिवस दिवस
घरात बसून राहिल्यानंतर संध्याकाळी आमचे पाय आपोआप जिन्याकडे वळायचे. तसं
इथे रहायला येऊन आम्हाला जवळपास पंधरा वर्ष झालीत , आमच्या सहनिवासाच्या
जवळ एक लग्नाचे कार्यालय आणि लॉन आहे , सुरवातीला आदित्य लहान असतांना
त्याला तिथला बॅंड आणि नेत्रदिपक रोषणाई दाखवायला आम्ही गच्चीवर जायचो पण
अर्थातच नंतर त्यातलं नाविन्य कमी झालं , मग सहभोजन , कोजागिरी ,
नववर्षाचा स्वागत कार्यक्रम अश्या काही कारणांनी गच्चीचा सहवास घडायचा पण
नंतर कोण एव्हढं 4 जिने चढुन जाईल असा विचार करुन हळुहळु ते कमी होत गेलं
आणि मधल्या 7,8 वर्षात तर हे सगळं बंदच झालं .
कोरोनाकाळ सुरु झाला आणि बाहेरचा व्यायाम घरात आला
.उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरचा व्यायाम झाला की संध्याकाळची मोकळी हवा
खायला म्हणून गच्चीवर जाणं सुरु झालं . इतर काही शेजारी पण यायचे मग जरा
वेळ गप्पाटप्पा करुन परत सगळे आपापल्या घरात . आजुबाजुला असे अनेक
सहनिवास असल्याने तिथले लोकही संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी गच्चीवर यायचे
, मी त्यांना ’ गच्चीवरचे शेजारी ’ म्हणते . मग ’ भोचकपणा ’ किंवा ’
चौकसपणा ’ नावाचा जो एक गुण [?] आपल्या सगळ्यांमधे असतो त्याला जागुन ,
"आज ही एकटीच दिसतेय , मैत्रीण आली नाही वाटतं!" , " बाप रे! हे घर
खटल्याचं दिसतंय , बरीच मंडळी असतात वरती " अशी माझी स्वगतं चालत असत.
मग काही दिवसांनंतर इमारतीच्या वरच्या भागावरुन ही कुठली इमारत
असेल असे आमचे ’ओळखा पाहू’ चे खेळ चालायचे आणि मग काही कामानिमित्त बाहेर
पडल्यावर ती इमारत अगदी खालपासून वरपर्यंत पाहिली जायची . जसजसा उन्हाळा
सरुन पावसाळ्याची चाहूल लागली तसतसे निसर्गातले अनेक जादुई विभ्रम
दिसायला लागले. विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळाले, एकदोनदा तर चक्क
सातपुड्याचे दर्शन झाले.
आकाशात तर काय रोजच जणू जादुचे प्रयोग सुरु झाले . रोज
वेगवेगळी रंगसंगती , आकार साधून आकाश जणू नटुन बसलेले असायचे. कधी नुसतेच
पांढरेशुभ्र ढगांचे पुंजके इतस्ततः भटकत असायचे तर कधी त्यांची जागा
काळेकुट्ट ढग घेत, कधी हेच काळे ढग सोनेरी जर लेवुन यायचे. लाल , गुलाबी
, केशरी, करड्या रंगाच्या इतक्या विविध छ्टा पाहिल्यावर आपल्याला रंगकाम
येत नाही ह्याचे मला वैषम्य वाटत असे. निसर्गाइतकी अद्भूत रंगसंगती
पाहिल्यावर " ये कौन चित्रकार है ?" असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक नाही
का ? , ह्या सगळ्या जादुई पार्श्वभूमीवर अस्ताचलावरचे ते देखणे सुर्यबिंब
तर डोळ्याचे पारणेच फेडायचे.
पावसाचा जोर वाढल्यावर हळुहळु गच्चीवरचे प्रेक्षक कमी होऊ
लागले पण आम्ही मात्र नियमित जायचो. आता दिवस हळुहळु लहान व्हायला लागलाय
पण कधीकधी चांदण्यांची खडी पसरलेल्या निरभ्र आकाशाखाली बसणं किंवा
अभ्राच्छादित आवरणाखाली बसून इतस्ततः पसरलेले ते पुंजके बघत राहणं हे
स्थळकाळाचे भान विसरायला लावणारं आहे हे खरे. आपल्यातली सगळी नकारात्मकता
जणू ह्या विश्वाच्या अथांग पोकळीत गुडुप होते आहे आणि तिथली चिरंतन चेतना
आपल्या ठायी जन्म घेते आहे असा अनुभव निसर्ग आपल्याला नेहमीच देतो .
काही काळाने सध्याची सगळी परिस्थिती सुरळीत होईल , आपण परत
आपल्या व्यापात गुरफटुन जाऊ , वाया गेलेला काळ भरुन काढण्याच्या
निमित्ताने कदाचित दुप्पट वेगाने धावायला लागु. स्पर्धेत अव्वल
येण्याच्या मिषाने अष्टौप्रहर काम करु त्या नादात गच्चीवर जाणं कमी होत
होत हळुहळु बंद होईल, पण ती कायमच स्मरणात राहिल. अस्वस्थतेचा काळ परत
आला तर निसर्गाकडे उघडणारं हे दार आपल्या जवळच आहे ही हमी मात्र त्यामुळे
कायम राहिल
Thursday, September 10, 2020
क्या यही प्यार है
"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी----" अगदी शाळेत असल्यापासून हे गाणं ऐकत आलेली आहे.अरुण दातेंनी अक्षरशः जीव ओतला आहे गाण्यात."का राणीने मिटले डोळे,दूर दूर जाताना,का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गातांना----" ह्या ओळी असोत किंवा"अजुनी रुसुनी आहे, खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ, पापणी हलेना----" ह्या कुमार गन्धर्व ह्यांच्या आर्त ओळी असोत---ऐकल्यानंतर काळजात कुठेतरी कालवाकालव झाल्याशिवाय रहात नाही. मनात,आतल्या आत काहीतरी हलल्यासारखे,खुपल्यासारखे होते.दोन प्रेमी जिवांची जेव्हा ताटातूट होते,तेव्हा संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झाल्यागत भासते.भविष्य अंधःकारमय दिसू लागते.कुठल्याच गोष्टीत मन रमत नाही,कुठलाही आनंद मनाला भुरळ घालू शकत नाही,विरह वेदनेने व्याकुळ होणारा जीव आतल्याआत घुसमटत जातो, संपत जातो-----अर्थात अशी सगळी अवस्था होत असते, हे फक्त वर्णनात वाचलेलं, ऐकलेलं किंवा चित्रपटात,पाहिलेलं--;पण प्रत्यक्षात खरच होत असेल का अशी अवस्था? "प्रेम" हा विषय तसा झाडून सगळ्या लेखक,कवी,चित्रकार वगैरे मंडळींचा आवडीचा, आपुलकीचा. प्रेमावर भरभरून लिहिलं जातं, बोललं जातं,दाखवलं जातं; पण खरंच असतं का इतकं शुद्ध, निखळ, निःस्वार्थ प्रेम?