Tuesday, September 15, 2020

श्रीमंती

 ओरिसानंतर कित्येक ठिकाणांना भेटी दिल्या, पण ओरिसात भेटलेले लोक, त्यांच्या आठवणी या नेहमीच एका खास कप्प्यात राहिल्या. त्या विसरणे अशक्य!

               अकोला ते ओरिसा हा जवळपास 36 तासांचा रेल्वे प्रवास! (त्यावेळी आमची विमान प्रवासास अजून सुरुवात झाली नव्हती.) एवढा लांबचा प्रवास, बाहेरचे खाणे टाळायचे, म्हणून घरून खूप काही खाण्याचे पदार्थ सोबत घेतले होते, अर्थात टिकतील असे! प्रवास तर छानच झाला. आम्ही पुरीला उतरल्यावर, हॉटेलमध्ये गेलो फक्त आणि मला जो काही ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला, तंत्रच बिघडले पूर्ण पोटाचे! आम्ही रूम मध्ये जस्ट गेलो होतो, तर ते हॉटेल बॉय एक-दोनदा येऊन गेले काहीना काही कामासाठी, झालं, त्यांनाही कळलं की माझी तब्येत बिघडलीय . मी एका तासात पार गळून गेले. संध्याकाळी मला तर बाहेर जाणे शक्य नव्हते पण मी मुलांना म्हटलं की तुम्ही तिघे जाऊन या, फिरायला आलोय आपण इथे! कसतरी पटवलं त्यांना! तेवढ्यात हॉटेलचे मॅनेजर स्वतः आले आणि म्हणाले की मॅडमची तब्येत खूप बिघडल्याचं समजलं, डॉक्टरांना इथे बोलवायचं की तुम्ही जाता डॉक्टर कडे? मी सोबत कोणाला तरी पाठवतो. मी म्हटलं, नको मी आता आराम करते, मग वाटलं तर पाहू. ही पहिली झलक ओरिसाची! घरच्यासारखी प्रेमाने विचारपूस, लगेच न मागता मदतीचा हात! खूप बरं वाटलं.....
                दुसऱ्या दिवशी साईट सिइंग मध्ये कोणार्कचं सूर्य मंदिर इत्यादी होतं. त्यामुळे त्रासाकडे दुर्लक्ष करून जायचंच, असं मी ठरवलं. एका मोठ्या बिसलेरीत इलेक्ट्रॉल पावडर टाकली व दिवसभर त्या पाण्यावर राहिले, पण सगळीकडे फिरले. हॉटेलला परतलो तर ते दोघे हॉटेल बॉय होतेच तिथे उभे! म्हणाले,"मांजी, कैसी तबियत है आपकी अब?"(मी ४३चीच होते बरं का तेव्हा, आणि दिसतही होते फार तर ऑंटीसारखी) पण तिथे मांजी म्हणण्याची पद्धतच आहे, तेही बंगाली एक्सेंट मध्ये! मी पण लगेच त्यांना, तबियत तो कल से ठीक है. लेकिन सुबह से कुछ खाया नही मैने! (कडकडून भूक लागली होती तेव्हा) तर लगेच प्रेमाने म्हणाले,"मांजी अब आराम से गरमागरम रोटी खाना, सिर्फ चावल मत खाना, फिर आप को और अच्छा लगेगा!"परक्या ठिकाणी अशी विचारपूस! मला तर त्यानेच बरं वाटायला लागलं.

            दुसऱ्या दिवशी साईट सिइंग आटोपून हॉटेलवर आलो आणि लगेच डिनर झाल्यावर फोन करायला म्हणून बाहेर पडलो (तेव्हा मोबाईल फोन सर्रास वापरात नव्हते.) मला आईला आणि निकिताला,मैत्रिणीला फोन करायचा होता. मी बाहेर पडताना पर्स वगैरे काही घेतली नव्हती. शंभराची एक नोट घेऊन बाहेर पडले होते .फोन करून झाल्यावर फोनचं बिल द्यायला गेले तर म्हणाले, सुट्टे नाहीत! म्हटलं, शेजारच्या दुकानातून आणा.कारण माझ्याकडे नाहीत सुट्टे! तर चट्कन म्हणाले," ठीक आहे उद्या आणून द्या पैसे!" मी अवाक्!  मी कोण कुठली माहित नाही. तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये उतरलाय?असा साधा प्रश्नही हा माणूस विचारत नाही. कमाल आहे !मलाच ते पटेना. पण काही नाही. उद्या आणून द्या पैसे, हेच उत्तर पुन्हा मिळालं. शेवटी आम्ही दुकानातून बाहेर पडलो.

मग तसेच चक्कर मारत पुढे गेलो तर, काही दुकाने बंद झाली होती,तर काही बंद होत होती. मला कोणीतरी सांगितलं होतं की,हैदराबाद सारखेच इथेही  pearls छान मिळतात. पण इथे मला वाटतं,पर्यटकांचे प्रमाण कमी असल्याने आपल्याला इतकी माहिती नाही. मी म्हटलं,बघायला काय हरकत आहे? मुकुंद सोबत नाहीयेत तर ,चान्स घ्या!नाहीतर उगाच काहीतरी घेत बसू नको ,अकोल्याला जाऊन डस्टबीनचे धन होईल इ.ऐकावे लागले असते.
             आम्ही एका छोट्याशा दुकानात शिरलो.त्यानेpearl, rice pearl चे सेट दाखविले.त्यातला एक मला खूप आवडला.दुकानदारांना बरोबर कसं कळतं ना की आपल्याला काय आवडलय ते! मांजी, ले लिजीए, ज्यादा सोचिए मत्! (माझे बार्गेनिंग चे कसब पणाला लावून झाले होते) पण मी तर पर्सच नेली नव्हती.मी त्याला म्हटलं की,मी घेईन हा सेट,पण उद्या!कारण मी आता पर्स  नाही आणली तर तो म्हणाला,"पैसे कहा जानेवाले है? सेट आप अभी ले लीजिए और कल बाहर निकलोगे तब पैसे दिजियेगा.नो प्रॉब्लेम!
     आता मात्र हद्द झाली.अरे,या पुरीतील माणसं याच पृथ्वीतलावरची आहेत ना? चाटच पडले मी! एवढी मोठी रक्कम!(फोनची तरी छोटी रक्कम होती) तरी पुन्हा तेच! एकही प्रश्न नाही .इतका विश्वास अनोळखी व्यक्तीवर? डायरेक्ट घेऊन जा सेट! मला राहवलं नाही. मी त्याला म्हटलं,"भाईसाब अगर मै पैसे देने कल नही आई तो आप क्या करोगे? आप कैसे कैसे बिझनेस करते हो? ऐसे अंजान लोगोंपे भरोसा कैसे कर सकते हो? त्यावर त्यांनी शांतपणे उत्तर दिले,मांजी, आप यहां किसलिये आये हो?जगन्नाथ के दर्शन के लिये ना? हमारा भरोसा उनपें  है और उनके दर्शन के लिए आनेवाला भक्त कभी हमें फसां नही सकता! मी पुन्हा नि़:शब्द!
          दुसर्‍या दिवशी सकाळी बाहेर पडल्यावर आधी फोनचे, नंतर त्या दुकानदाराचे पैसे दिले,तेव्हा मला शांत वाटलं.पैसे घेताना तो दुकानदार हसला फक्त!

तसंच आम्ही जगन्नाथाचे दर्शन झाल्यावर, जेवायला एका हॉटेलमध्ये गेलो. देवळात, कडक सोवळ्यात जो जो नेवेद्य केला जातो, खूप पदार्थ खूप प्रमाणात केले जातात रोज! (ते सगळं वर्णन करायचं तर खूपच सांगावं लागेल, असो.) तर तो बाहेरच्या हॉटेलमध्ये प्रसाद म्हणून पोचवला जातो. कांदा-लसूण विरहीत अतिशय चविष्ट असे जेवण, थाळी सिस्टीम मध्ये हॉटेलमध्ये उपलब्ध होते. निकिता तशी मोठी होती, पण खाण्याचा आनंद! म्हणून आम्ही त्या हॉटेल वाल्याला म्हटलं की तीनच थाळ्या द्या. आम्ही चार थाळ्यांचे पैसे देतो. मातीच्या भांड्यात केलेला स्वयंपाक अतिशय रुचकर होता. आम्ही अगदी खुश झालो.
जेवण झाल्यावर बिल द्यायला गेलो, तर पुन्हा तेच अगत्यशील बोलणं,"३ थाली के ही पैसे देना, बच्चीने कुछ  खायाभी नही." अरे, हे ओरिसाचे लोक कुठल्या मुशीतून घडलेत?"
                  हॉटेलच्या खाली ओपन गार्डन मध्ये एक साऊथ इंडियन काउंटर केलं होतं. तिथे सकाळी एक अम्मा यायची. तिच्या हातचे गरमागरम डोसे खातानाही अगदी होमली वाटायचं. आग्रहाने, प्रेमाने मस्त खाऊ घालायची. तसंच तिथे कावड घेऊन एक माणूस यायचा. मी वरून पाहिले, तर त्या कावडीत काय असेल ?असा प्रश्न मला पडला. काय असेल बरं त्यात? तर मस्त चवीचे ताजे ताजे रसगुल्ले! तोही तसाच, टिपिकल ओरिसा!
            जेव्हा आम्ही बाहेर फिरायचो, तेव्हा खूप जाणवायचं ,इथे खूप गरिबी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट विशेष नाही. त्यामुळे रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. काही भागांमध्ये तर खूप हलाखीची परिस्थिती वाटली. पण असं असूनही, प्रत्येक ठिकाणी जे अनुभव आले, ते पाहून मनाची श्रीमंती काय असते, ते समजलं!

Sunday, September 13, 2020

अमेरिका डायरी- प्रयाण

 


ग्रुप स्टडी एक्स्चेंज (सांस्कृतिक आणि व्यावसायिक आदानप्रदान)च्या मुलाखतीसाठी मी नाशिकला गंजमाळ हॉलमध्ये पोचले. हायफाय माहौल दिसत होता. सूटबूट आणि सिल्क साड्या इकडून तिकडे झोकात वावरत होत्या. काही जण बुद्धासारखे आढयाकडे टक लावून पाहत होते. मोबाईल प्रकरण तेव्हा दुर्लभ असल्याने काही पुस्तकात डोकं खुपसून बसले होते. मग माईकवरुन घोषणा झाली की हा प्रकल्प अमेरिकेसाठी असल्याने, निवड झालेल्यांना अमेरिकन कुटुंबांसोबत एकट्याने राहायचं असल्याने आणि तिकडच्या १०,१२ क्लब्जमध्ये सादरीकरण करायचं असल्याने लेखी फेरी, उत्स्फूर्त वक्तृत्व फेरी, मुलाखत आणि पुढचे सगळे सोपस्कार पूर्णपणे इंग्लीशमधून होतील. मध्येच हिंदी, मराठीचा टेकू घेतला तर तुम्ही बाद. सगळ्यांच्या घशाला आता थोडी कोरड पडली. ४,५ सूट आणि साड्या तर ताडकन उठून चालत्या झाल्या. वक्तृत्व फेरीत काही जण हातात आलेली विषयाची चिठ्ठी वाचून दीर्घ श्वास घेऊन एकदम एक्झिट घेते झाले. चला, तेवढीच स्पर्धा कमी. तरी ७० जण उरले. मला ’करप्शन’ विषय आला होता. मनात ’हर हर महादेव’ म्हणून मी काय ते बोलून आले. बहुतेक जण चांगले बोलले. शेवटी ९ जणांच्या पॅनेलने प्रत्यक्ष मुलाखत घेतली. भारताचा आणि अमेरिकेचा इतिहास, करंट अफेअर्स, तुम्ही आयुष्याकडे कसे बघता, तुमचे आदर्श कोण, तेच का?, अवांतर कौशल्ये कोणती, काही लॉजिकल आणि वैयक्तिक प्रश्न असे स्वरुप होते. ४-४ च्या दोन टीम आणि प्रत्येकी २ स्टँड बाय असे फक्त बारा जण निवडले जाणार होते. 

निकाल आला. डॉ. किबे सर आणि याच प्रकल्पासाठी कॅनडाला जाऊन आलेले प्रा. नावलेकर यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली तयारी आणि मुलाखत मनासारखी झाली असे वाटल्याने निदान स्टँड बाय साठी तरी निवड होईल अशी मला खात्री होती. पण चक्क पहिलेच नाव माझे घोषित झाले तेव्हा क्षणभर अवाक झाले. मग अभिनंदन वगैरे आटोपले. घरी, आईला, सरांना कळवले. आमच्या टीममध्ये डॉ. श्रीया, आर्किटेक्ट वैशाली, हॉर्टीकल्चरीस्ट हेमराज आणि मी असणार आणि आम्ही ईस्ट कोस्टला फिलाडेल्फियाला जाणार असे कळले. दुसरी टीम शिकागोला. आता व्हिसाच्या अर्जासाठी पासपोर्ट जमा करायचा होता. माझा सहज म्हणून काढलेला पासपोर्ट तयार असून मी नागपूरला जाऊन तो घेऊन यायचे बाकी होते. व्हिसा अर्जाच्या आत म्हणजे परवा सकाळपर्यंत तो जमा केला नाही तर नाईलाजाने माझी संधी स्टँड बायला द्यावी लागणार होती. ते होते अमरावतीचे. आपण त्यांना भयंकर बडबडे म्हणून ब म्हणू. मला पासपोर्ट न मिळण्यावर त्यांची अमेरिकावारी अवलंबून असल्याने आमचे एक चमत्कारिक नाते तयार झाले होते. निकालाचा आनंद आणि पासपोर्ट न जमा केल्यास हातातून संधी निसटते की काय याचा ताण अशा द्विधा मनस्थितीत मी निघाले. तिकिट नेमके कन्फर्म झाले नाही पण ’ब’ने मला त्यांच्या बर्थवर बसू दिले. known devil is better than unknown angel या न्यायाने मी बसले पण अकोला येईपर्यंत त्यांनी कर्कश्य आवाजात माझे कान गळून पडतील इतकी बडबड केली. 

घरी सगळे सांगून मुलांना भेटून मी तडक नागपूरला गेले. सुदैवाने पासपोर्ट लगेच मिळाला आणि महेशच्या सांगण्यानुसार मिळेल त्या गाडीने थेट नाशिकला जाऊन मी तो एकदाचा जमा केला. हुश्श. आता आमच्यापैकी कुणाचा व्हिसा रिजेक्ट झाला तर ब ला पुन्हा संधी होती. त्यांच्याबरोबर अमेरिकेला जायच्या कल्पनेने मला आधीच हिव भरले पण आमची कागदपत्रं व्यवस्थित असल्याने आणि फिलाडेल्फिया विभागाच्या गव्हर्नरच्या आमंत्रणपत्रामुळे आम्हाला सगळ्यांना लगेच व्हिसा मिळाला, तो ही १० वर्षांसाठी. बाहेर आलो तर त्या मुंबईच्या कार्यालयासमोर अजूनही मारुतीच्या शेपटासारखी रांग होती. व्हिसा न मिळालेल्या, चुडे ल्यालेल्या काही पंजाबी नव्या नवर्‍या बाजूला अक्षरश: गळा काढून रडत होत्या. अमेरिका-कॅनडामध्ये बरेच पंजाबी आहेत. काही जण भारतात येऊन लग्न करतात आणि एकटेच आधी परत जातात. मागून व्हिसा मिळेल तेव्हा बायका येतात. अनेक देश तिकडे पोचल्यावरही व्हिसा देतात पण हा व्हिसा मिळालेल्यांच्या उड्या, मिठ्या, चुंबनं पाहून आपल्याला काहीतरी अद्भुत मिळालेले दिसतेय याची आम्हाला जाणीव झाली. शिरीष कणॆकरांनी " अमेरिकेचा व्हिसा मिळाल्याचा आनंद हा सात मुलींच्या पाठीवर ज्याला मुलगा होतो त्याच्या आनंदाच्या जवळपास जाणारा असतो" असे याचे खासच वर्णन केले आहे. मला इतकाबितका नाही पण आनंद झाला, त्याच वेळी चाळीस दिवस आपल्या साडेचार वर्षांच्या इवलुश्या जुळ्यांना ठेवून जायचेय या कल्पनेने पोटात खड्डा पण पडला होता. 

माझा न्यूजर्सीचा मामेभाऊ विक्रम, आता लॉस एंजेलिसला राहणारा (त्याला एलए म्हणायचं म्हणे) कंपनीतला माजी बॉस आणि मित्र श्रीराम आणि ऑर्कुटवर (तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप नव्ह्तंच) ओळख झालेले न्यूयॉर्कचे अनिल नेने या तिघांना विचारून जमेल तशी तयारी सुरु केली. अकोल्यात तेव्हा काहीच मिळायचे नाही. दरम्यान रोटरीकडून नागपूरला झालेले ग्रूमिंग सेशन्स खूपच मोलाचे होते. अगदी वेस्टर्न टॉयलेट एटिकेट्सपासून, देहबोली कशी असावी, वेळव्यवस्थापन ते प्रेझेंटेशन स्किल्सपर्यंत. भारतीयांची प्रतिमानिर्मिती तुमच्या हातात आहे हे सतत बजावून सांगितले गेले. अशा भेटींमुळॆ आमच्या टीमची एव्हाना आपसात चांगली मैत्री झाली होती. आता आमचे अमेरिकेतील कार्यक्रमांचे सिस्टमॅटिक वेळापत्रक मेलवर आले. जायचा दिवस आला. विमानतळावर टीमपाशी वेळेत पोचलो. चेक इन पाशी महेशकडे एकदा शेवटचे वळून पाहिले, म्हटलं ’विमान वाटेत धडपडलं तर काय घ्या’. श्रीया, वैशाली व आमच्या टीमलीडर सरांनी भारतात बरेचदा विमानप्रवास केला होता. हेमराज आणि मी मात्र पहिल्यांदाच विमानात बसून एकदम बुईंग अमेरिकेलाच निघालो होतो. विमानात सीटबेल्ट कसे वापरावे हे हवाईसुंदरी सांगते मात्र तिथले टॉयलेट कसे वापरावे हे काही कोणी शिकवले नव्हते पण ’हर हर महादेव’ म्हटले की सारे जमते. :-)


गाडी, आपलं, विमान फ्रँकफुर्टला (फ्रँकफर्ट म्हणायचं म्हणे) म्हणजे जर्मनीत पोचले. ४ तास हॉल्ट होता. अगदी पॉश पण अवाढव्य एसटी स्टँड असावे तसे लोक बाकावर, खाली कुठेही बसले होते. काळे, करडे, निळे, तपकिरी एवढेच कपड्यांचे रंग. तिथे कॉफी विचारली. किंमत ऐकून मनात गुणाकार केला, डोळे पांढरे केले आणि काचेतून दिसणारे देखणे लखलखते शहर पाहत गप्प बसलो. नाहीतर काय नुसतं काळं गरम पाणीच असतंय अशी मनाची समजूत घातली. इथे पुढच्या फ्लाईटचे चेक-इन धिप्पाड अमेरिकन अधिकारी करत होते. नियमबाह्य गोष्टी भल्यामोठ्या डस्टबीनमध्ये अक्षरश: फेकून देत होते. लोक कुई-कुई करुन काही सांगू लागले की मानगूट धरुन बाजूला करत. वैशाली आणि सरांचे जास्त वजनाचे बरेच  महागडे कॉस्मेटिक्स त्यात फेकले गेले. अमेरिकेने ट्वीन टॉवर हल्ल्यापासून ब्रोकन विंडो सिक्युरिटी ठेवलीय. म्हणजे काचेवरचा साधा तडा सुद्धा ते बॉबस्फोटाइतका गंभीर मानतात त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत ते तडजोड करत नाहीत. अगदी शाहरुख खानला सुद्धा त्यांनी संशयावरुन तपासणीसाठी बाजूला बसवून ठेवल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. अखेर हे दिव्य आटोपून एकदाचे विमान सुटले आणि आमचे वर्‍हाड फिलाडेल्फियाला सुखरुप पोचले. (19 April 2007)


क्रमश: 

Saturday, September 12, 2020

गच्ची

 




गेल्या जवळजवळ सहा महिन्यांपासून आपण सगळेच कोरोनाकाळ अनुभवतो

आहोत. आता ’ रोज मरे त्याला कोण रडे’ अशा काहीशा स्थितप्रज्ञ स्थितीला
आपण सगळेच येऊन पोहचलेलो असलो तरी काही घटना आपल्याला हादरवून टाकतात हे
खरेच. घराबाहेर मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आपल्या प्रत्येकाचं जग
ह्यामुळे आकुंचन पावलं आहे. आता हळुहळु सगळं सुरळीत करण्याचे प्रयत्न
सुरु झालेत पण प्र्त्येकाच्याच मनात अस्वस्थतेचं मळभ काही काळ राहणार हे
निश्चित !
           ह्या नवीन परिस्थितिशीही आपण हळुहळु जुळवुन घ्यायला लागलो
आहोत . प्रत्येकाचं आपलं रुटिन सेट झालंय . कोरोना काळापासुन माझ्या
नव्हे आमच्या तिघांच्याही रोजच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनलीय ती आमची
गच्ची !


          तसं बैठ्या घरात राहणार्‍याला गच्चीचं नाविन्य नाही पण
सहनिवासात राहणार्‍या आम्हाला गच्ची कोरोनाकाळात प्रिय झाली. दिवस दिवस
घरात बसून राहिल्यानंतर संध्याकाळी आमचे पाय आपोआप जिन्याकडे वळायचे. तसं
इथे रहायला येऊन आम्हाला जवळपास पंधरा वर्ष झालीत , आमच्या सहनिवासाच्या
जवळ एक लग्नाचे कार्यालय आणि लॉन आहे , सुरवातीला आदित्य लहान असतांना
त्याला तिथला बॅंड आणि नेत्रदिपक रोषणाई दाखवायला आम्ही गच्चीवर जायचो पण
अर्थातच  नंतर त्यातलं नाविन्य कमी झालं , मग सहभोजन , कोजागिरी ,
नववर्षाचा स्वागत कार्यक्रम अश्या काही कारणांनी गच्चीचा सहवास घडायचा पण
नंतर कोण एव्हढं 4 जिने चढुन जाईल असा विचार करुन हळुहळु ते कमी होत गेलं
आणि मधल्या 7,8 वर्षात तर हे सगळं बंदच झालं .
          कोरोनाकाळ सुरु झाला आणि बाहेरचा व्यायाम घरात आला
.उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरचा व्यायाम झाला की संध्याकाळची मोकळी हवा
खायला म्हणून गच्चीवर जाणं सुरु झालं . इतर काही शेजारी पण यायचे मग जरा
वेळ गप्पाटप्पा करुन परत सगळे आपापल्या घरात . आजुबाजुला असे अनेक
सहनिवास असल्याने तिथले लोकही संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी गच्चीवर यायचे
, मी त्यांना ’ गच्चीवरचे शेजारी ’ म्हणते . मग ’ भोचकपणा ’ किंवा ’
चौकसपणा ’ नावाचा जो एक गुण [?] आपल्या सगळ्यांमधे असतो त्याला जागुन ,
"आज ही एकटीच दिसतेय , मैत्रीण आली नाही वाटतं!" , " बाप रे! हे घर
खटल्याचं दिसतंय , बरीच मंडळी असतात वरती " अशी माझी स्वगतं चालत असत.
          मग काही दिवसांनंतर इमारतीच्या वरच्या भागावरुन ही कुठली इमारत
असेल असे आमचे ’ओळखा पाहू’ चे खेळ चालायचे आणि मग काही कामानिमित्त बाहेर
पडल्यावर ती इमारत अगदी खालपासून वरपर्यंत पाहिली जायची . जसजसा उन्हाळा
सरुन पावसाळ्याची चाहूल लागली तसतसे निसर्गातले अनेक जादुई विभ्रम
दिसायला लागले. विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळाले, एकदोनदा तर चक्क
सातपुड्याचे दर्शन झाले.
         

आकाशात तर काय रोजच जणू जादुचे प्रयोग सुरु झाले . रोज

वेगवेगळी रंगसंगती , आकार साधून आकाश जणू नटुन बसलेले असायचे. कधी नुसतेच
पांढरेशुभ्र ढगांचे पुंजके इतस्ततः भटकत असायचे तर कधी त्यांची जागा
काळेकुट्ट ढग घेत, कधी हेच काळे ढग सोनेरी जर लेवुन यायचे. लाल , गुलाबी
, केशरी, करड्या रंगाच्या इतक्या विविध छ्टा पाहिल्यावर आपल्याला रंगकाम
येत नाही ह्याचे मला वैषम्य वाटत असे. निसर्गाइतकी अद्भूत रंगसंगती
पाहिल्यावर " ये कौन चित्रकार है ?" असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक नाही
का ? , ह्या सगळ्या जादुई पार्श्वभूमीवर अस्ताचलावरचे ते देखणे सुर्यबिंब
तर डोळ्याचे पारणेच फेडायचे.
          पावसाचा जोर वाढल्यावर हळुहळु गच्चीवरचे प्रेक्षक कमी होऊ
लागले पण आम्ही मात्र नियमित जायचो. आता दिवस हळुहळु लहान व्हायला लागलाय
पण कधीकधी चांदण्यांची खडी पसरलेल्या निरभ्र आकाशाखाली बसणं किंवा
अभ्राच्छादित आवरणाखाली बसून इतस्ततः पसरलेले ते पुंजके बघत राहणं हे
स्थळकाळाचे भान विसरायला लावणारं आहे हे खरे. आपल्यातली सगळी नकारात्मकता
जणू ह्या विश्वाच्या अथांग पोकळीत गुडुप होते आहे आणि तिथली चिरंतन चेतना
आपल्या ठायी जन्म घेते आहे असा अनुभव निसर्ग आपल्याला नेहमीच देतो .
          काही काळाने सध्याची सगळी परिस्थिती सुरळीत होईल , आपण परत
आपल्या व्यापात गुरफटुन जाऊ , वाया गेलेला काळ भरुन काढण्याच्या
निमित्ताने कदाचित दुप्पट वेगाने धावायला लागु. स्पर्धेत अव्वल
येण्याच्या मिषाने अष्टौप्रहर काम करु त्या नादात गच्चीवर जाणं कमी होत
होत हळुहळु बंद होईल, पण ती कायमच स्मरणात राहिल. अस्वस्थतेचा काळ परत
आला तर निसर्गाकडे उघडणारं हे दार आपल्या जवळच आहे ही हमी मात्र त्यामुळे
कायम राहिल

Thursday, September 10, 2020

क्या यही प्यार है

 


"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी----" अगदी शाळेत असल्यापासून हे गाणं ऐकत आलेली आहे.अरुण दातेंनी अक्षरशः जीव ओतला आहे गाण्यात."का राणीने मिटले डोळे,दूर दूर जाताना,का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गातांना----" ह्या ओळी असोत किंवा"अजुनी रुसुनी आहे, खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ, पापणी हलेना----" ह्या कुमार गन्धर्व ह्यांच्या आर्त ओळी असोत---ऐकल्यानंतर काळजात कुठेतरी कालवाकालव झाल्याशिवाय रहात नाही. मनात,आतल्या आत काहीतरी हलल्यासारखे,खुपल्यासारखे होते.दोन प्रेमी जिवांची जेव्हा ताटातूट होते,तेव्हा संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झाल्यागत भासते.भविष्य अंधःकारमय दिसू लागते.कुठल्याच गोष्टीत मन रमत नाही,कुठलाही आनंद मनाला भुरळ घालू शकत नाही,विरह वेदनेने व्याकुळ होणारा जीव आतल्याआत घुसमटत जातो, संपत जातो-----अर्थात अशी सगळी अवस्था होत असते, हे फक्त वर्णनात वाचलेलं, ऐकलेलं किंवा चित्रपटात,पाहिलेलं--;पण प्रत्यक्षात खरच होत असेल का अशी अवस्था? "प्रेम" हा विषय तसा  झाडून सगळ्या लेखक,कवी,चित्रकार वगैरे मंडळींचा आवडीचा, आपुलकीचा. प्रेमावर भरभरून लिहिलं जातं, बोललं जातं,दाखवलं जातं; पण खरंच असतं का इतकं शुद्ध, निखळ, निःस्वार्थ प्रेम?

 आजकालच्या तरुण पिढीचं एकंदरीत वातावरण बघता तरी वाटत नाही असं प्रेम कुणी करत असेल म्हणून. कारण  क्षणात प्रेम जमलं,आणि तासात ब्रेकअप झालं----लग्न होऊन वर्ष सहा महिने होत नाहीत तर पटत नाही म्हणून सेपरेशन झालं---- लग्नाची बायको/नवरा असताना पर पुरुषा विषयी/परस्त्री विषयी आकर्षण वाटणं----हे सगळं "कॉमन" झालंय हल्ली.एकाच जोडीदाराशी "लॉयल" असणं, त्याच्या गुण दोषांसकट त्याचा स्वीकार करून संसार सुरळीत होण्याच्या दृष्टीने (दोन्ही बाजूने) प्रयत्न करणं हे साधारण कमी होत चाललंय.

   हे सगळं लिहिण्यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीने लक्ष वेधून घेतलं होतं.बातमी होती," चिमणीच्या विरहात वर्षभरापासून तिच्या येण्याची वाट पहातोय चिमणा, आर्त चिवचिवाट करतोय--सतत---" नागपूरच्या एका कुटुंबात घडलेली चिमणा-चिमणीच्या विरहाची प्रत्यक्ष कहाणी,अगदी आंखो देखा हाल----पिलांची चाहूल लागल्यानंतर चिमणीला जिवापाड जपणारा चिमणा, दाणे टिपण्यासाठी बाहेर पडलेली चिमणी हॉल मधल्या पंख्याला धडकून बेडरूम मध्ये जाऊन पडते आणि  तिथेच प्राण सोडते. घरची मंडळी तिला जड अंतःकरणाने घराच्या मागील आवारात नेऊन पुरतात. चिमण्याला ह्याची काहीच कल्पना नसते. तो चिमणा म्हणे त्या दिवसापासून रोज त्याच्या चिमणीची वाट पहात आर्त चिवचिवाट करतोय. इतर कुणाही चिमणीला जवळपास फिरकूही देत नाही,हल्लीच्या भाषेत,"आव्हान केलं, प्रपोज केलं" तरी. एक चिमणी तर म्हणे आपल्या दोन पिल्लांना घेऊन त्याच्या घरट्यात आलीही; पण तिलाही त्याने हुसकावून लावलं.जणू म्हणत होता, "दोनो ने किया, था प्यार मगर, मुझे याद रहा,तू भूल गयी----" हृदयात कुठेतरी खोलवर जाऊन भिडली ही गोष्ट. आणि आठवायला लागली सहज ती गाणी,"मुरगा मुरगी प्यार से देखे----" दो कलिया मधलं छोट्या गोड  नितुच्या  आवाजातील निरागस गाणं -----आणि वैजयंतीमाला वर चित्रीत झालेलं , "दो हंसो का जोडा बिछड गयो रे-----" 
हे असं,इतकं निरतिशय, एकनिष्ठ प्रेम पक्षीही करू शकतात? की फक्त पक्षीच करू शकतात? विचार करण्यासारखी बाब आहेच. ख्यातनाम अरण्यऋषी "मारुती चितमपल्ली" म्हणतात,की माणसापेक्षा पक्षांमध्ये हे प्रेम अधिक गहिरे असते. जसे सारस म्हणजे क्रौंच पक्षी. सारस नेहमी जोडीने रहातो आणि फिरतो.एकाच जोडीदाराशी एकनिष्ठ असलेला सारस पक्षी जोडीदाराला मरेपर्यंत सोडत नाही.दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा अन्नपाणी वर्ज्य करून प्राणत्याग करतो. असे म्हणतात की एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या पती-पत्नीला सारस पक्ष्यांच्या सान्निध्यात ठेवायची प्रथा भारतात एकेकाळी होती.दोघांपैकी एकाची शिकार केली किंवा झाली तर त्याचा/तिचा जोडीदार झुरून प्राण त्यागतो. 

माणूस हा सर्वांमध्ये संवेदनशील प्राणी आहे असे म्हणतात(सगळे म्हणतात म्हणून आपणही म्हणायचे) ; पण माणसांमध्ये आढळते का इतकी एकनिष्ठता?   काही कारणे असूही शकतात, पर्यायी जोडीदार निवडण्यामागे,कधी स्वेच्छेने तर कधी तडजोड करायची तयारी नसते म्हणून, कधी कधी नाईलाज म्हणूनही; अर्थात तो एक वेगळा आणि चर्चेचाच भाग आहे म्हणा; पण तरीही हा संवेदनशील समजला जाणारा मनुष्यप्राणी इतकं उत्कट ,निःस्वार्थ प्रेम करूच शकत नाही,अपवाद असतीलही बोटावर मोजण्याइतके, आणि इतकं उत्कट आणि निखळ प्रेम करायला समोरची व्यक्तीही तितक्याच ताकदीची हवी असा गोड युक्तिवाद ही केला जातोच.  माणसांच्या जगात ,जोडीदाराचा "आश्वस्त सहवास",पुरेसा विश्वास,सोबत जीवन जगण्याचा आनंद आणि ओढ---किमान इतक्या गोष्टी पुरेशा असतात प्रेम टिकविण्यासाठी. पक्ष्यांच्या जगात काय नियम असतील ह्या बाबतीत? आपल्या नजरेत तर पोपट म्हणजे सगळे एकजात दिसायला सारखेच, आपण सगळ्या पोपटी रंगाच्या पक्ष्याला पोपट म्हणून मोकळे होतो(पण बरेचदा आपलाच पोपट होत असतो) चिमणी म्हटली तर सगळ्या चिमण्या इथून तिथून सारख्याच असणार,त्यात अजून वेगळं काय असणार? असा विचार आपल्या मनात येतोच कारण आपण तेवढं बारकाईने निरीक्षण करतही नाही. प्रत्येक मनुष्य दिसायला,म्हणजेच रंग रूपाने ,उंची,जाडीने वेगळा असतो,तो झटकन ओळखला जातो; पण हे पक्षी कसे ओळखत असतील आपल्या जोडीदाराला? कुठली खूण लक्षात ठेवत असतील? त्यांचे प्रेम कसे जमत असेल? प्रेम करण्याची पद्धत कशी असेल? त्यांची भाषा तर पक्षी प्रेमीं ना कळते म्हणतात; पण तरी असे बरेच प्रश्न आहेत ज्याविषयी माहिती करून घ्यायला हवी, त्यांच्याही "life style" चा अभ्यास करायला हवा, असं प्रकर्षाने वाटू लागतं, असलं काही वाचल्यावर.

  खरं सांगायचं तर "प्रेमाच्या बदल्यात प्रेम" इतकं साधं,सरळ समीकरण असायला हवं, माणसाच्याही जीवनात. जाणिवेची जाणीव, वेदनेची संवेदनशील। ओळख, एक हळुवार ,नितळ मन,जोडीदाराला समजून घेणारं----अजून काय हवं असतं? अगदी जीवच ओवाळून टाकायला हवा असं नाही; पण किमान जीव कासावीस व्हायला हवा,त्याच्या/तिच्या साठी.
अगदीच चांद तारे तोड लावू---इतका अतिरेक नसला प्रेमात;तरी जोडीदाराच्या सहवासात चंद्राची शीतलता, ताऱ्यांच्या प्रकाशाचा दिलासा हवा. "तू नहीं तो कोई और सही" हा तटस्थ पणा नसावा,तर "तुम अगर साथ देनेका वादा करो---" असा विश्वास असायला हरकत नसावी.
 आज प्रेमाच्या नावाखाली जो गोंधळ घातला जातोय, भावनांचं जे विडंबनात्मक प्रदर्शन केलं जातंय, एकतर्फी प्रेमातून जोडीदाराला विद्रूप केलं जातंय, हत्या केली जातेय ,उद्वेगाने, निराशेतून आत्महत्या होताहेत---- हे सगळं पाहून वाईट वाटतं, चिडही येते. 
-प्रेम भावनेचा खरा अर्थच ज्यांना कळलेला नाहीये, त्यांनी प्रेम कसे करावे, हे ह्या पक्ष्यांकडून शिकायलाच हवे, नाही का? 

 माणिक नेरकर.