Saturday, August 15, 2020

मेरी भावना

भावनिक गोंधळ आपण सतत अनुभवत असतो. नैराश्य, भिती, चिंता, असहाय्यता, अपराधीपणा, राग यासारख्या भावनांची तिव्रता आजूबाजूला आपण आपल्या सकट सगळ्यांचीच बघत असतो. भावनिक संतुलन, भावनिक साक्षरता येण्यासाठी अनेक उपाय आहे. आपण समाजात राहतो. आपले नातेसंबंध निकोप कसे ठेवायचे? कठीण माणसं, कठीण प्रसंग कसे हाताळायचे? यासाठी मानसशास्त्र पुरेसे नाही तर मानसशास्त्राच्य्या जोडीला अध्यात्मिक आणि तात्विक बैठक असणं खूप गरजेचे आहे. यासाठी सच्चे देव शास्त्र गुरु या त्रयींनी आपल्यासाठी मार्ग दाखवला आहे. त्या मार्गाने जाण्यासाठी अनेक उपाय त्यांनी सांगितले आहे. मनाचे श्लोक, बारा भावना, वैराग्य भावना, मेरी भावना इत्यादी. जैन मुनि आचार्य 108 प्रमाणसागर महाराजांनी भावनायोग हा मनाचा व्यायाम विकसित केला आहे. त्याचे खूप चांगले परिणाम जनामनावर होत आहेत. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी भावनायोग लाभदायक ठरतो आहे. मनाची व्याप्ती, व्यथा आणि हीत या संत, गुरुंनी बरोबर ओळखली आणि आपल्या सारख्या सामान्य साधकाला मार्गदर्शन केले. 

पंडित जुगलकिशोरजी मुख्तार यांची मेरी भावना त्याचे दुसरे नाव राष्ट्रीय नित्यपाठ हे आहे. शाळेच्या पुस्तकात पहिल्या पानावर प्रतिज्ञा लिहलेली असते भारत माझा देश आहे... तसाच हा राष्ट्रीय नित्यपाठ प्रत्येकाने रोज करायला हवा आपल्यातील तात्विक, अध्यात्मिक बैठक मजबूत होण्यासाठी क्रोध मान माया लोभ यावर जे विजय मिळवू शकतात त्यांना मोक्ष मार्ग गवसतो.काय आहे त्या राष्ट्रीय नित्यपाठात की आपण रोज करायला हवा? तर आत्म्याचे त्या चैतन्य शक्ती चे गुण काय आहे हे  तर त्यात सांगितले आहेच त्याप्रमाणे आपण कसे वागायचे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. स्वतः पासून सुरुवात करत समाज, देश आणि त्यापुढे अख्खं जग कसे सुखी होईल हे सांगितले आहे. स्वतःत काय बदल करायचे तर राग, द्वेष, अहंकार, ईर्ष्या, खोटे पणा इत्यादी नकारात्मक अवगुण सोडून द्यायचे आणि त्याऐवजी सरळ सत्य आचरण, मैत्रीपूर्ण संबंध, दिनदुखींची सेवा माझ्या कडून घडू दे. दुसर्‍यांच्या गुणांची बेरीज आणि दोषांची वजाबाकी मला करता येऊ दे. कुठल्याही विपरीत परीस्थितीत न्यायमार्गावर सोडता कामा नये. कोणी चांगले म्हणो वाईट म्हणो, पैसा येवो किंवा जावो. भिती, लालूच, मरण आले तरीही, सुखात दुःखात समान राहिले पाहिजे. साक्षीभाव मला अमलात आणता येऊ दे. कारण कोणतीच गोष्ट निरंतर राहत नाही. त्यामुळे इष्ट अनिष्ट योग आला तसा तो जाणार आहेच. त्यात सहनशीलता दाखवली की त्रास होत नाही. प्रत्येक व्यक्तीने असे वागायचे ठरवले तर समाजात चांगले परिणाम बघायला मिळतील. आपापसातील वैरभाव, अभिमान सोडून माणूसकीचा धर्म आचरण करून ज्ञान, चरित्र  उन्नत केले पाहिजे. अशा समाजातून घडलेला नेता पण तसाच येईल माणूसकीच्या धर्माने आणि न्याय्य पद्धतीने राज्य करू शकेल. अशा या देशात पाऊस वेळेवर आणि पुरेसा पडू दे. रोग, महामारी, दुर्भिक्ष्य पसरूच नये आणि प्रजा शांतिपूर्ण समाधानाने जगावी. परस्परांबद्दल प्रेम पसरू दे. अप्रिय, कटूक, कठोर शब्द हद्दपार होऊ दे. परम अहिंसाधर्म  (शारिरीक आणि मानसिक अहिंसा यात अभिप्रेत आहे) सगळ्या जगात पसरू दे. सगळे प्राणीमात्र सुखी होऊ दे. प्रत्येक सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टींचा समावेश या नित्यपाठात केला आहे. 

अशी ही मेरी भावना, राष्ट्रीय नित्यपाठात केलेली प्रार्थना, विनम्र विनंती!! प्रत्येकाने एकमेकांसाठी करून संपूर्ण जगाला त्याचा लाभ करून द्यायला हवा. आजच्या घडीला याची सर्व मानवजातीला नितांत गरज आहे.

अंजली 

Monday, August 10, 2020

। श्रावणपिंगा ।।

  श्रावणसरींचे कोण कौतुक!...... हवाहवासा ,आल्हाददायक स्पर्शुन जाणारा, अल्डह मुलीगत बागडणारा  श्रावण येतो आणि मन उल्हासित होत.सहजच ओठावर गाणी येतात .मन नाचू लागतं .कविता शब्दांना घेऊन दारात ऊभी राहते.  काही कविता ओठांशी फेरही धरु लागतात. 

   हसरा नाचरा जरासा लाजरा 
    सुंदर साजिरा श्रावण आला.

हा असा हासत नाचत येणारा श्रावण हळुच मनाभोवती पिंगा घालू लागतो .त्यातल्या त्यात ती नवपरिणिता असेल तर तिला श्रावणसरींबरोबर आलेला माहेरचा सांगावा अस्वस्थ करतो.पण तशातही तिला आपल्या जोडिदाराची ओढही सतावतच
 असते.
        
      झोका मंद झुले श्रावण आला गं 
       मन कसे दरवळे साजण आला गं
       श्रावण आला गं...............।

श्रावणातील मंगळागौरिचे खेळ म्हणजे उत्साह आणि उत्सवाच मुर्तीमंत उदाहरणच.
जुन्याकाळी सख्या शेजारणींसोबत विरंगुळा देणारे क्षण म्हणून, तर आजच्या घडिला फिटनेस फंडा म्हणून मुली हौसेने हे खेळ खेळतात.पिंगा,झिम्मा ,फुगडी,सुप नाचवणे,गोफ,घागर इ. खेळ जुन्या नव्याचा मेळ घालत खेळले जातात. सुंदरसे लांबलचक उखाणे घेत बौद्धिक कसरतही करतात.  
    श्रावण म्हणताच आठवतो तो आपला प्रिय सखा कृष्ण...! सावळा हरी!..... जणू मेघाचे सावळे रुप घेऊन प्रेमाची बरसात करणारा ,चिंब करुन भिजवणारा!!!.... त्या घनाची आस ठेवतच म्हणावस वाटतं....

ये रे घना ,ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना!

या श्रावणातील मोरपिसी हिरवाई आपल्याला वेड नाही लावेल तरच नवल!.....वार्यासंगे दरवळणारा गंध ,वार्याच्याच्या तालाला सोबत करत डुलणारी झाडं आणि कधीकधी ठेका देत वाजणारे ढग आपल्या अस्तित्वाची जणू जाणिव करुन देतात. 

।।आकाशाच्या अस्तित्वाचे नीळेसावळे
 तपशील नोंदून .....
फांदी घेते हातावरती लवलवणारे पक्षी गोंदून..
चिवचिवणार्या शब्दकळांनी वृक्षबोलका रानी केला......
आभाळाला खडा मारता पाण्यालाही तडाच गेला.।।

रंगाचे फटकारे   मारावे तसे कवींच्या शब्दलहरिंची ही नजाकत डोळ्याला नक्कीच भावते.पण कधी कधी हा पाऊसही रुसतो. अगदी लहान लेकरासारखा फुरगटुन बसतो. तेव्हा आपले शेतकरी बांधव आर्त पुकारा करत त्याची आराधना करतात व विनवणी करतात.

       कुणी पुसल्या हिरव्या जागा
        कुणी पुसल्या नदीच्या रेघा
        तळ्याच्या पायाला किती ह्या भेगा
         पायाची आग भिडली नभा 
        आता तरी निळ्या पाण्याचा लेप
        मातीच्या अंगाला दे रेsदे ढगा
         दे रेs दे ढगा!.................

पाणी यावे ,बी रुजावे अंतरीचे गाणे होऊन हळूच रान डुलावे. डुलणारी राने जणू आपआपसात गप्पागोष्टी करत हलत डुलत असतात.
डोंगरावरावरुन वाहणारे निर्झर   मैत्रिणींसोबत दंगा करावा तशा हसत खिदळत मज्जा करत येत असतात ,  पुढे त्या सुंदर  प्रवाह बनून कोमलांगी कमरेला बाक देत वहात असतात. वाटेत येणार्या प्रत्येकाशी मैत्री करत आपला मित्रपरिवार सहज वाढवतात. आजुबाजुची छोटी छोटी मौसमी झाडं झुडुप आपल्या उगवत्या फुलांतर्फे हसरी भेटच जणू  देत असतात. 
 श्रावण हा सजीव रुतुआहे .सगळ्या सृष्टीचे चैतन्य जगवून त्याला प्रवाहीत करतो.श्रावणातील सर.सर.किलबिलणार्या पक्षांप्रमाणे नाजूक कुंजन करणारी ..तिच्याअंगी धसमुसळेपणा राकटपणा नसतोच मुळी!. 
धडधड कोसळणारा पाऊस मात्र जीव नक्कीच दडपून टाकतो.कधीकधी तर इतका आक्रस्ताळा होतो की होत्याच नव्हतं करतो म्हणूनच इंदिराबाई म्हणून जातात की,

नको नको रे पावसा ,असा धिंगाणा हा अवेळी
घर माझे चंद्रमौळी,अन् दारात सायली।।

 तरिही पाऊस म्हणताच चिंब भिजणं ,पाण्यात होड्या सोडणं,  पाण्यावर काठी मारुन पाणी उडवण या बालपणात केलेल्या खेळकर खोडकर गोष्टी आठवतात .आणि आपण तेवढ्यापुरत का होईना लहानपण उपभोगुन घेतो 

।।ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा  ।।च्या तालात.

 म्हणून ,नदी वाहिलीच पाहीजे,........समुद्राला तीने गळामिठी मारलीच पाहीजे .......आकाशाला भिडून ढगांची दाटी झालीच पाहीजे......... नि हिरवळ पुन्हा फुललीच पाहीजे.......!!!

@अर्चना मुळ्ये.

Saturday, August 8, 2020

पोलीसकाका जयहिंद..!

 

मी दुसरी तिसरीत असेन तेव्हाची गोष्ट. आम्ही अंजनगाव ला राहायचो. अंजनगाव तसं लहानसंच गाव. त्यामुळे अकोला म्हणजे आमच्या मते एक खूप मोठ्ठ शहर होतं. साहजिकच आम्हाला त्याचं आकर्षण वाटायचं. अकोल्याला माझी मावशी, मामा राहायचे. त्यामुळे आम्ही भावंडं दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अकोल्याला यायचो. मामा, मावशी दोघेही डाबकी रोड ला राहायचे. कधी मामाकडे तर कधी मावशीकडे आम्ही सगळे खूप मज्जा करायचो. आम्हाला सगळ्यात जास्त अप्रूप असायचं  ते राणा प्रताप पार्क मध्ये जाण्याचं. खास करून तिथल्या खरमुऱ्याच्या गाडीवर कागदाच्या कोन मधले गरमगरम खरमूरे खायचं आणि  टिन टिन घंटीच्या गादीवर, स्टीलच्या इवल्याश्या सुबक कपात जिभेवर विरघळणारं व्हॅनिला आइसक्रीम खायचं! सुट्यांमध्ये आम्ही नेहमीच हट्ट करून पार्कमध्ये जायचो. चार वाजले की आमची  बच्चेकंपनी डाबकी रोड वरून रमतगमत पायी निघायची. रस्त्यात ते भिरड चे हॉटेल, कस्तुरबा हॉस्पिटल, त्या लहान लहान गल्ल्या, जयहिंद चौक आणि मग दगडी  पूलावरून एकदाचे पार्क मध्ये पोहचायचो. त्या दगडी पुलाचे पण खूप आकर्षण असायचे. त्यावरून जाता-येतांना खूपदा आम्हाला एक दोन पोलीसकाका हातात दंडुका घेऊन फिरतांना दिसायचे. त्या वयात पोलीस म्हटला की एक वेगळीच भीती किंवा दबदबा वाटायचा. पोलीस चोरांना तर पकडतातच पण आपणसुद्धा काही चुकीचं वागलं, मोठ्यांचं ऐकलं नाही, हट्टीपणा केला, त्रास दिला की पोलीस पकडून नेतात हे सुद्धा खूपदा ऐकलेलं. त्यामुळे कधी रस्त्याने जातांना  पोलीस दिसला की नकळतच  सोबत असलेल्या व्यक्तीचा हात घट्ट पकडल्या जायचा! मात्र  पोलीस  चांगल्या लोकांना मदत करतात हे बाकी मनात पक्के बिंबलेले. केव्हातरी असंच मी पोलिसाला घाबरते हे कळल्यावर माझा मामा मला म्हणाला होता; “पोलीसकाका  दिसले की त्यांना जयहिंद करून टाकायचं, मग ते आपले दोस्त होऊन जातात!” त्यामुळे एकदा खूप म्हणजे खूपच हिम्मत करून, धडधडत्या छातीने  समोरून येणाऱ्या एका पोलीसाला  मी म्हणूनच टाकले, "पोलीस काका जय हिंद!". आणि आश्चर्य म्हणजे त्यानेही तोंडभरून हसून उत्तर दिले "बेबी जय हिंद!” बापरे! चक्क पोलीसकाकाने मला उत्तर दिले होते! त्या बालवयात ती फारच मोठी अचिव्हमेंट वाटली होती. आपण कुणीतरी खास असल्यासारखं वाटलं होतं. साक्षात एक पोलीस काका माझ्याशी बोलला होता, मला जयहिंद म्हणाला होता!  काय मजाक समजता का भाऊ! त्यानंतर कितीतरी दिवस ही घटना मी माझ्या अंजनगावच्या सगळ्या मैत्रिणींना खूप फुशारक्या मारून, रंगवून रंगवून सांगायची. काळाच्या ओघात बालमनावर बिंबलेलं पोलीसांचे ते चित्र  नक्की केव्हा बदलून गेलं ते बाकी कळलंही नाही! पण अजूनही तो प्रसंग आठवून खूप हसू येतं आणि अजूनही खाकी युनिफॉर्म मधला कुणी पोलीस दिसला की  “पोलीसकाका जयहिंद..!” आठवतंच आठवतं!

​​​​​​​​​ 

©मधुमती वऱ्हाडपांडे


Monday, August 3, 2020

My Diary

 आज तंत्रज्ञान घरोघरी पोहोचून व्यवस्थित विराजमान झालेले आहे. सध्याच्या कोरोना प्रभावित टप्प्यात तर प्राथमिक गरजांपासून सर्वच बाबतीत तंत्रज्ञान वापरणे हा एक वादातीत पर्याय झालेला आहे. भाजी किराण्यचे ऑनलाइन पेमेंट ,वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शैक्षणिक क्लासेस, विविध विषयातील स्पर्धा ,पारिवारिक समारंभापासून सगळच तंत्रज्ञानाच्या पुरेपूर वापरामुळे शक्य होत आहे. प्रत्येक घरातला वय वर्षे तीन ते चार पासून वय वर्षे 75 ते 80 पर्यंत सर्वच सदस्य तंत्रज्ञाना भोवती गोवले गेले आहेत .

यावरून आजच्याच दिवशी बरोबर एका वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग डोळ्यासमोर आला. त्यावेळी तंत्रज्ञानाची मदत घेतल्यामुळेच तो प्रसंग पार करता आला होता. बारावीच्या पुढचे शिक्षण घ्यायला माझ्या मुलाला मुंबईला कॉलेज प्रवेशासाठी जायचे होते. ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करणे, कॉलेज हॉस्टेल इत्यादी बघून घेणे एकाच वेळी करावे म्हणजे पुढे त्याचा तो कॉलेज सुरू झाल्यावर जाऊ शकेल म्हणून आम्ही तीन ऑगस्ट ला ट्रेन ने निघालो. एडमिशन साठी चार आणि पाच अशा दोन तारखा मिळाल्या होत्या. चार ऑगस्ट ला पोहोचून कॉलेजचे काम करून घ्यावे आणि काही अडचण आलीच तर पाच तारखेचा एक दिवस हाताशी ठेवावा म्हणून पाच ऑगस्टला परतीचे रिझर्वेशन केले होते. ट्रेन निघाल्यावर सहज गप्पांमध्ये लक्षात आले माझे बाबा 4 ऑगस्टला देवाघरी गेले आहेत ,त्याच तारखेला मुलाची पदवी अभ्यासक्रमाला ऍडमिशन होते आहे!
 पावसाळ्याचे दिवस असल्याने ट्रेनची वेळ मागेपुढे होऊ शकते हे गृहीत धरून कल्याणला नातेवाईकांकडे उतरून पुढे कॉलेजला जायचे की सरळ दादरला उतरायचे ते ठरवावे लागणार होते. दरम्यान इगतपुरी च्या आसपास पाऊस सुरू झाल्याचे लक्षात आले. पहाटेच्या वेळी बाहेर पाऊस आणि अंधार यापलीकडे काही दिसत नव्हते. दिवस उजाडला तसे बाहेरचे निसर्गसौंदर्य एकटक बघत रहावेसे वाटत होते .कसारा घाट जवळ आला तसे सगळीकडे गर्द हिरवळ ,डोंगरावरून फेसाळत जाणारे पांढरेशुभ्र झरे आणि पावसाची अखंड रिमझिम या अनुभवात तरंगत असतानाच ट्रेन थांबली अचानक !आम्ही आपल्या गप्पा -खाण्यात रमलेलो. काही वेळाने लक्षात आले की अजूनही ट्रेन सुरू झालेली नाही .पण स्वतःलाच धीर दिला होईल सुरू .आपण सध्या वेळेत आहोत म्हणजे ठरल्याप्रमाणे पोहोचू नक्की. थोड्यावेळाने ट्रेन सुरू झाली पण वेग मंदावला होता. दुसऱ्यांदा जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा आजूबाजूला खुसपुस सुरू झाली. इथे नेहमीच पावसाळ्यात प्रॉब्लेम येतो. एकदा का कसारा घाट सोडून आंबिवली पर्यंत गेलो की पुढे काही घोर नाही .पण तोपर्यंत काही सांगता येत नाही !
ही नवीन माहिती कळल्यावर आम्ही जरा काळजीत पडलो .पण आहे दुपारपर्यंत चा वेळ त्यामुळे इथून बाहेर पडायला उशीर झाला तर सरळ कॉलेजला जाऊ मध्ये कुठे न उतरता, असा  प्लान बी  वापरायचे निश्चित करून आम्ही निश्चिंत झालो. थोडाफार खाऊ सोबत होता तो खाऊन निवांत बसलो. आजूबाजूला ,बाहेर कसलीही हालचाल ,दुसऱ्या ट्रेनचे आवाज असे काही जाणवत नव्हते. अर्धीअधिक बोगी अजून साखर झोपेत होती .पुस्तक आणि भोवतालचा निसर्ग वाचणे सुरू ठेवले .वातावरणामुळे लक्षात आले नाही पण दहा वाजून गेल्यावर ही ट्रेन जिथल्या तिथेच थिजलेली होती .मग जरा बोगीमध्ये सगळ्यांच्या हालचाली, फोनाफोनी, चर्चा सुरू झाल्या .दुपारी बाराच्या दरम्यान ट्रेन पुन्हा हलली. बहुतेकांनी हुश्श केलं. काहींनी चक्क एकमेकांना टाळ्या दिल्या. अजूनही पुढे जात राहिलो तर कॉलेजचे काम करायला पुरेसा वेळ होता.
 थोडे पुढे गेल्यावर मात्र  ट्रेन जी थांबली ती चार तास त्याच जागेवर !लोक चक्क खाली उतरून बाहेर फिरायला लागले .झाडाखाली बसून गप्पा मारणे ,मोबाईल बघणे सुरू होते. मग लक्षात आले मोबाईलचे चार्जिंग पुरेसे टिकले पाहिजे. जो तो आपला मोबाईल चार्ज करून ठेवू लागला. पॅन्ट्री मधून आलेले रेल्वे मिल घेऊन बहुतेकांनी जेवून घेतले होते .पण ट्रेन नक्की कधी निघणार आणि आता निघणार की नाही अशी भीती वाटू लागली. पुढून आणि मागून कुठलीच ट्रेन येत जात नव्हती. संपूर्ण ट्रॅक ठप्प झाला होता तिथे उतरून रस्त्याने वगैरे जाण्याचा प्रश्नच नव्हता .घाटात मध्येच कुठेतरी ट्रेन थांबलेली असल्याने गुपचूप बसून वाट बघणे हेच हातात होते. संध्याकाळी पाचच्या दरम्यान ट्रेन पुढे निघाली ही खरंच हलली की आपल्याला भास झाला असे एक क्षण वाटून गेले. पण खरंच पुढे जाऊन ट्रेनने बरा वेगही घेतल्याचे जाणवले .आतापर्यंत संपर्कात असलेल्या सगळ्यांना आम्ही निघालो वगैरे मेसेज टाकले .चार्जिंग टिकवायला हवे म्हणून व्हाट्सअप वर चॅटिंग जास्त सुरू होते. नशीब नेटवर्क चांगले होते. जरा रिलॅक्स होऊन बसतोय तेवढ्यात कसारा स्टेशन वर ट्रेन थांबली आणि ती पुढे थांबूनच राहिली .मग रेल्वे कर्मचाऱ्यांनी निरोप दिले -स्टेशनवर उतरून फुड पॅकेट्स वाटप सुरू आहे ते घेऊन या. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती .अन्न पाण्याची सोय सर्व प्रवाशांना पुरेल एवढी रेल्वेने केली हे बघून कौतुक वाटले .स्टेशन वर सगळीकडे मोठ्या संख्येने पोलीसही होते. बऱ्याच जणांनी तिथून उतरून बाय -रोड पुढे जाण्याचा निर्णय घेतला .काहींनी जवळपासच्या भागातून गाड्या बोलावून ट्रेन सोडली. आता मात्र बिकट वेळ आमच्यावर आली. पुढे उतरून जावे तर ओळख पाळख नाही ,रूट अनोळखी. ट्रेनमध्ये बसून राहावे तर सिक्युरिटी आहे पण किती वाट बघावी लागेल याचा नेम नाही. आधीच आम्ही बारा तास एकाच कंपार्टमेंटमध्ये होतो .दिवस मावळतीला आलेला म्हणून अजूनच चिंता वाटू लागली.मी आणि दोन मुलं -काय करावे ते सुचेना .फोनवर सगळ्यांच्या सूचना सुरूच !
इतक्यात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अनाउन्स केले बाहेर एसटी बसेस आहेत त्यांनी कल्याणला जा. रेल्वे रिकामी करा .सूचना दिल्या- दिल्या लागलीच ट्रेनमधले लाइट पंखे बंद करून दरवाजा लॉक करणे सुरू झाले. पर्याय नव्हताच. भराभर बॅग्ज गोळा केल्या.निघालो. डोक्यावरून पाऊस, आजूबाजूला अंधार! माणसं चालली होती त्या दिशेने निघालो स्टेशनबाहेर तीन बसेस उभ्या होत्या .असे वाटले खास रेल्वे प्रवाशांसाठी आणलेल्या आहेत ,पण तसे नव्हते. त्यात आधीच प्रवासी बसले होते. एक वेगळ्याच ठिकाणची बस होती. नाव वाचून कल्याणच्या बस मध्ये चढेपर्यंत सराईत प्रवाशांनी बस मध्ये जागा पटकावल्या होत्या. आम्ही जागा नव्हती तर चक्क बसच्या बोनेटवर बसलो .पायाशी सामान कसेतरी कोंबले. भिजलेलो होतोच .पण कल्याण पर्यंत जायला मिळतंय पुढे टॅक्सीने पोचता येईल असे वाटून बसलो. बस निघाली. साधारण दोन तास लागतील. म्हटलं काढूया दोन तास बॉनेटवर. सतत कोसळणाऱ्या पावसाने बस धीम्या गतीने सरकत होती. व्हाट्सअप वर मेसेज पाठवणे, रूट ट्रॅक्टरवर आपलं नेमकं लोकेशन समजून घेणं सुरु होते. दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी ही बस पण थांबली!! 
पुढे जायला जो पूल आहे तो ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे बस इथेच थांबवावी लागली असे कळले .हा सगळ्यात उंच पूल होता यावरून पाणी आहे म्हणजे पुढच्या आणखीन दोन पुलांवरून  पाणी असणार म्हणून बस पुढे जाणार नाही कळले. एका भोजनालयाच्या दिशेने हात करून कंडक्टर म्हणाला- काय तरी खाऊन घ्या सगळ्यांनी. रात्री बस मध्ये बसून रहावे लागणार .शरीर आणि डोकं दोन्ही अवघडलेलं होतं .खाली उतरून पाय मोकळे करायला निघालो .दरम्यान सतत संपर्कात असलेला माझा भाऊ आणि भाचा म्हणाले आम्ही ऑनलाईन पुढच्या ट्रॅक चेक केले आहेत. ठाण्याजवळ पाणी साचलेले नाही. ड्रायव्हर कंडक्टर ला सांगून बस ठाण्याहून पुढे न्या .ठाणे स्टेशन वर पोचवायला सांगा .पहाटे पाचला लोकल असते त्यांनी तुम्ही येऊ शकाल. बरोबरच होते रात्रभर बसमध्ये बसून काहीच निष्पन्न होणार नव्हते. भाच्याच्या ओळखीच्या नगरसेवकांची माणसे विचारपूस करायला आली .जवळच एका शाळेत अशा पावसात अडकलेल्या लोकांची सोय केली आहे .तिथे रात्रभर थांबा म्हणून सांगितले .पण पुढे निघून जाण्यात शहाणपण होते. मात्र बस मधल्या एवढ्या प्रवाशांचे एकमत व्हायला हवे.
 तंत्रज्ञान आणि आजचे शतक कितीही प्रगती करत असले तरी रात्री नऊ आणि दहा वाजता अशा वातावरणात एक बाई आपल्याला शहाणपण शिकवते आहे, सतत फोनवर बोलते आहे हे टिपणाऱ्या नजरा त्याच जुन्या सामाजिक व्यवस्थेतल्या होत्या! मग कंडक्टर आणि एका प्रवाशाला व्यवस्थित समजावून सांगितले. फोनवर भावाशी बोलणे करून दिले. कुठला रूट पाणी नसलेला आहे ,इथून पुढे जाता येईल असे पटल्यावर त्यांनी लगेच बस अस त्या रूटने  पुढे न्यायला होकार दिला. दरम्यान बसचे, त्या जागेचे ,अडकलेल्या प्रवाशांचे फोटो सोशल मीडियावर पाठवले .काही ओळखीच्या लोकांच्या मदतीने नेमके त्या जागेवर मदत पोचवणे शक्य होईल का ते बघायचे होते. कारण आमच्याकडे आलेले बरेच प्रवासी आजूबाजूला छोटे लॉज किंवा शाळा, मंदिर इत्यादी ठिकाणी थांबले होते .नजरेच्या टप्प्यातील एकमेव भोजनालयातील थंडगार समोसे आणि बिस्किटाचे पाकीटही संपले होते. सोशल मीडियाचा असाही वापर करण्याची पहिल्यांदाच वेळ आली होती.
 एकदाची बस ठरवलेल्या रूट वरून ठाण्याकडे निघाली. भावानी मला व्हाट्सअप लोकेशन आॅन ठेवायला सांगितले. दरम्यान भावजयीचा भाऊ- आमचा कुमार ,दादा नेत्रा वहिनी ठाण्याला राहतात. त्यांच्याशी बोलून मला रात्री तिथे थांबण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. बस ठाणे स्टेशन वर जाणार होती. सर्व प्रवाशांना सोडायला. आम्ही अलीकडे माजिवडा नाक्याला उतरायचे ठरले .बस पुढे जाताना नेमका रस्ता, आजूबाजूचे ठळक ठिकाण, सगळं माझ्या व्हाट्सअप लोकेशन वर माझा भाऊ आणि भाचा बघत होते. भावाने लगेच फोन करून सांगितले- पुढे चार पाच मिनिटात तुमचा स्पॉट येईल तिथे उतरा. कुमार घ्यायला येतो आहे. आम्ही सामान गोळा करून उतरण्याच्या तयारीत असताना घड्याळांमध्ये रात्रीचे बारा पन्नास झाले होते. कंडक्टरला सांगून आम्ही तिथे खाली उतरलो. कुमार दादाने फोन करून सांगितले- वर्षा काळजी करू नकोस. पुलाच्या खाली उजव्या हाताने थांब म्हणजे पाऊस लागणार नाही. आम्ही पोचतोय.
 मी एक मोठा आवंढा गिळला .खाली उतरून सांगितलेल्या ठिकाणी आडोशाला थांबलो, बस इतर प्रवाशांना घेऊन पुढे गेली. एक दोन मिनिट थांबलो असू आम्ही. लगेच भाच्याचा फोन -आत्या तुमची बस पुढे का जात नाहीये ?मला कळेना हा काय विचारतोय. लगेच लक्षात आले माझे लोकेशन मी पुढे सरकलेली दाखवत नव्हते ,काळजीपोटी त्यांनी फोन केला होता. मी त्याला समजावून सांगत असतानाच कुमार आणि नेत्र आले. आम्ही सुरक्षित आहोत याची त्या क्षणाला खात्री पटली. घरी पोचून झोपायला दोन वाजले होते.
 सकाळी नेत्रांनी गरम नाश्ता आग्रहाने खायला घालून मुलांशी गप्पा मारून त्यांचा मूड एकदम मस्त केला. कुमार दादाने त्याच्या गाडीने कॉलेज पर्यंत सोडले आणि पुढे तो त्याच्या ऑफिसला गेला.
 पाच तारखेचा हातचा ठेवलेला दिवस ऍडमिशन पूर्ण करायला वापरून परतीची फक्त आमची निघणारी ट्रेन गाठून परतीच्या प्रवासाला निघालो. कारण इतर ट्रेन्स अतिवृष्टीमुळे कॅन्सल करण्यात आल्या होत्या! आम्ही सुखरूप परतून दुसऱ्या दिवशी रुटीन सुरू केले.

 राहून राहून  वाटत होते 4 ऑगस्ट चा योगायोग असा साधला! बाबांच्या आशीर्वादाने अडचणी भयंकर येऊन सुद्धा तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यातून सुटका करून घेतली. जुने त्यातल्या सोन्यावर विश्वास ठेवून नवीन ते आत्मसात करण्याची तयारी ठेवली तर कुठलीही अडचण मोठी नाही याची खात्री पटली.

डॉ वर्षा देशपांडे