श्रावणसरींचे कोण कौतुक!...... हवाहवासा ,आल्हाददायक स्पर्शुन जाणारा, अल्डह मुलीगत बागडणारा श्रावण येतो आणि मन उल्हासित होत.सहजच ओठावर गाणी येतात .मन नाचू लागतं .कविता शब्दांना घेऊन दारात ऊभी राहते. काही कविता ओठांशी फेरही धरु लागतात.
हसरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला.
हा असा हासत नाचत येणारा श्रावण हळुच मनाभोवती पिंगा घालू लागतो .त्यातल्या त्यात ती नवपरिणिता असेल तर तिला श्रावणसरींबरोबर आलेला माहेरचा सांगावा अस्वस्थ करतो.पण तशातही तिला आपल्या जोडिदाराची ओढही सतावतच
असते.
झोका मंद झुले श्रावण आला गं
मन कसे दरवळे साजण आला गं
श्रावण आला गं...............।
श्रावणातील मंगळागौरिचे खेळ म्हणजे उत्साह आणि उत्सवाच मुर्तीमंत उदाहरणच.
जुन्याकाळी सख्या शेजारणींसोबत विरंगुळा देणारे क्षण म्हणून, तर आजच्या घडिला फिटनेस फंडा म्हणून मुली हौसेने हे खेळ खेळतात.पिंगा,झिम्मा ,फुगडी,सुप नाचवणे,गोफ,घागर इ. खेळ जुन्या नव्याचा मेळ घालत खेळले जातात. सुंदरसे लांबलचक उखाणे घेत बौद्धिक कसरतही करतात.
श्रावण म्हणताच आठवतो तो आपला प्रिय सखा कृष्ण...! सावळा हरी!..... जणू मेघाचे सावळे रुप घेऊन प्रेमाची बरसात करणारा ,चिंब करुन भिजवणारा!!!.... त्या घनाची आस ठेवतच म्हणावस वाटतं....
ये रे घना ,ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना!
या श्रावणातील मोरपिसी हिरवाई आपल्याला वेड नाही लावेल तरच नवल!.....वार्यासंगे दरवळणारा गंध ,वार्याच्याच्या तालाला सोबत करत डुलणारी झाडं आणि कधीकधी ठेका देत वाजणारे ढग आपल्या अस्तित्वाची जणू जाणिव करुन देतात.
।।आकाशाच्या अस्तित्वाचे नीळेसावळे
तपशील नोंदून .....
फांदी घेते हातावरती लवलवणारे पक्षी गोंदून..
चिवचिवणार्या शब्दकळांनी वृक्षबोलका रानी केला......
आभाळाला खडा मारता पाण्यालाही तडाच गेला.।।
रंगाचे फटकारे मारावे तसे कवींच्या शब्दलहरिंची ही नजाकत डोळ्याला नक्कीच भावते.पण कधी कधी हा पाऊसही रुसतो. अगदी लहान लेकरासारखा फुरगटुन बसतो. तेव्हा आपले शेतकरी बांधव आर्त पुकारा करत त्याची आराधना करतात व विनवणी करतात.
कुणी पुसल्या हिरव्या जागा
कुणी पुसल्या नदीच्या रेघा
तळ्याच्या पायाला किती ह्या भेगा
पायाची आग भिडली नभा
आता तरी निळ्या पाण्याचा लेप
मातीच्या अंगाला दे रेsदे ढगा
दे रेs दे ढगा!.................
पाणी यावे ,बी रुजावे अंतरीचे गाणे होऊन हळूच रान डुलावे. डुलणारी राने जणू आपआपसात गप्पागोष्टी करत हलत डुलत असतात.
डोंगरावरावरुन वाहणारे निर्झर मैत्रिणींसोबत दंगा करावा तशा हसत खिदळत मज्जा करत येत असतात , पुढे त्या सुंदर प्रवाह बनून कोमलांगी कमरेला बाक देत वहात असतात. वाटेत येणार्या प्रत्येकाशी मैत्री करत आपला मित्रपरिवार सहज वाढवतात. आजुबाजुची छोटी छोटी मौसमी झाडं झुडुप आपल्या उगवत्या फुलांतर्फे हसरी भेटच जणू देत असतात.
श्रावण हा सजीव रुतुआहे .सगळ्या सृष्टीचे चैतन्य जगवून त्याला प्रवाहीत करतो.श्रावणातील सर.सर.किलबिलणार्या पक्षांप्रमाणे नाजूक कुंजन करणारी ..तिच्याअंगी धसमुसळेपणा राकटपणा नसतोच मुळी!.
धडधड कोसळणारा पाऊस मात्र जीव नक्कीच दडपून टाकतो.कधीकधी तर इतका आक्रस्ताळा होतो की होत्याच नव्हतं करतो म्हणूनच इंदिराबाई म्हणून जातात की,
नको नको रे पावसा ,असा धिंगाणा हा अवेळी
घर माझे चंद्रमौळी,अन् दारात सायली।।
तरिही पाऊस म्हणताच चिंब भिजणं ,पाण्यात होड्या सोडणं, पाण्यावर काठी मारुन पाणी उडवण या बालपणात केलेल्या खेळकर खोडकर गोष्टी आठवतात .आणि आपण तेवढ्यापुरत का होईना लहानपण उपभोगुन घेतो
।।ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा ।।च्या तालात.
म्हणून ,नदी वाहिलीच पाहीजे,........समुद्राला तीने गळामिठी मारलीच पाहीजे .......आकाशाला भिडून ढगांची दाटी झालीच पाहीजे......... नि हिरवळ पुन्हा फुललीच पाहीजे.......!!!