लहानपणापासून ऐकत आलो की, नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. तसं,या दोन्ही बाजूंवर एकच चित्र असलेलं नाणं रमेश सिप्पींनी 'शोले' मध्ये अमिताभच्या हातात दिलं होतं, तेवढाच काय तो आजवरचा अपवाद म्हणावा लागेल. पण नाण्याच्या या दोन बाजूंच्या निमित्तानं आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींकडे दोन्ही त-हेनं पहायला शिकवलं गेलं, हे मात्र नक्की! या दोन त-हा कोणत्या तर... चांगलं आणि वाईट! भरीसभर विनोबांनी पण 'ज्ञान ते सांगतो' मध्ये उदाहरणाने पटवून दिलं नि ते मनात पक्कं बसलं. काय सांगितलं विनोबांनी? त्यांनी एका घराचं प्रतिक वापरलं. "प्रत्येक घराला भिंतींप्रमाणेच महत्वाच्या असतात खिडक्या आणि दरवाजे. विनोबा आपल्या शरीराला घराची उपमा देतात. खिडक्या म्हणजे दोष आणि दरवाजा म्हणजे गुण! तर घराला अनेक खिडक्या असतील नसतील पण प्रत्येक घराला एक ना एक दरवाजा हा असतोच असतो. तसंच या देहरुपी घरात दुर्गुणरुपी खिडक्या असल्या तरी प्रवेशासाठी एकतरी सद् गुणाचा दरवाजा असतोच. तो शोधा. त्यातून प्रवेश मिळवा".
हे असे सगळे संस्कार मनावर होत असल्याने प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा चष्मा हा दुहेरी, ज्याला 'बायफोकल' म्हणतात तसा झाला नि म्हणूनच जगावर करोनाची कु-हाड कोसळली तेंव्हा उमटलेल्या भावनाही अशाच दुपेडी होत्या. एकमेकांत गुंतलेल्या. जोवर ती लाट सीमेपलीकडे होती तोवर त्याबद्दल काहीच घेणंदेणं नव्हतं. ग्लोबलायझेशनची चक्की वेगात फिरते, हे तेंव्हा लक्षात आलंच नाही. पण काही काळातच कोरोना आमच्या उंब-याबाहेर येऊन ठेपला आणि आमचं धाबं दणाणलं. बघता बघता आम्ही घरात बंद झालो. इतरांवर अविश्वास दाखवत टाळू लागलो. हा हा म्हणता म्हणता एका अस्वस्थ मानसिक वर्तुळात अडकू लागलो. निराशेच्या या गर्तेत आमचाही 'सुशांत सिंह राजपूत' होण्याची शक्यता निर्माण झाली. आणि.....
आणि....या टप्प्यावर, मनहिंदोळ्याची गती रोखत आमच्या मदतीला आल्यात नाण्याच्या 'त्या' दोन बाजू! खुणावू लागला विनोबांनी दाखवलेल्या घराचा दरवाजा! ही मदत, ही खूण दृष्टीनं टिपली, मनानं नोंद घेतली आणि सकारात्मकता फिरुन रुजू लागली. कशी?
तर असं बघा, लक्षात आलं की करोनानं आम्हाला घरात अडकवलं पण हे अडकणं भावबंध पक्के करणारं ठरलं आहे. हातातल्या आधुनिक यंत्रानं संवाद सुकर केला आहे. 'काय कसं काय?' म्हणत ख्यालीखुशाली कळू लागल्या आहेत. आजवर मित्रांचे समुह होते आता नातेवाईकांचे, गणगोताचे, सगेसोस-यांचे संवादगट तयार झालेत. नुसते अस्तित्वात आले असे नव्हे तर त्याद्वारे रोज विविध उपक्रमही घेतल्या जावू लागले. अशाच एकाक्षणी कुणाच्यातरी डोक्यात समुहाचे चलचित्र तयार करण्याची कल्पना चमकली न् ती वा-याच्या वेगाने पसरू लागली. आयुष्यात कधी चित्रपटात झळकण्याची सुतराम शक्यता नसणा-यांनाही यानिमित्ताने लघु पडद्यावर स्वत:ला बघता येऊ लागले. मित्र, मैत्रिणी, कार्यालय सहकारी, कुटुंब सदस्य, असे अनेक समुह नि त्यांच्या तितक्याच
त-हेच्या कल्पक चित्रफिती याकाळात तयार होऊ लागल्या.
हा एक दरवाजा उघडला होता सामान्य जनांसाठी! तर दुसरीकडे एक रंगमंच उभारल्या जावू लागला होता कलावंतांसाठी! कोणता? तर 'समुह पान भिंतीवर' घरबसल्या प्रत्यक्ष सादरीकरणाचा! नाही कळले नं? अहो, 'ग्रुप फेसबुक पेजवर लाईव्ह' सादर करण्याची संधी अनेकांना मिळू लागली. यामुळे देशविदेशातील छोटे-छोटे कलावंत आणि रसिक एकमेकांशी जोडल्या गेलेत. कधी फिल्मी गाणी, कधी किस्से, कधी नकला, कधी कविता, कधी चित्र, कधी गप्पा, कधी भाव- नाट्य गीतं तर कधी नृत्य! अनेक कला मनमुक्तपणे सादर केल्या जावू लागल्या. मनापासून बहाल केलेले अंगठे, बदाम उमेद वाढवू लागले. उत्साह निर्माण होऊ लागला. करोनाची दहशत कमी व्हायला लागली.
कदाचित चार महिने घरात बसल्याने कधी स्वत:कडे लक्ष दिलं नसतं. पण यासगळ्या आयोजनामुळे स्वत:ला नीटनेटके ठेवण्याकडे कल वाढला. हा एक मोठाच फायदा म्हणता येईल. साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात अशा वेगवान घडामोडी घडत असताना घरच्या आघाडीवर पण बरेच बदल अनुभवता यायला लागले. पुन्हा एकदा आधुनिक यंत्रसामग्री कामात आली आणि स्त्रियाच काय पुरुष सुद्धा 'यू ट्युब' आधारे रसगुल्ला, जिलबी पासून तर डिब्बारोटी पर्यंत अनेक पदार्थ उत्तम करू लागले. यामुळे आजवर केवळ, "घर दोघांचं असतं, एकानं पसरवलं तर दुस-यानं आवरायचं असतं" अशी चारोळी ऐकत नि त्यावर अंमल करत जगणारे अनेकजणं आता, "घर दोघांचं असतं, दोघांनी मिळून आवरायचं असतं" असं जगू लागले. कुटुंब ख-या अर्थाने जवळ यायला लागलं. सहजीवन, सहवेदनेची जाणीव झाली. मनरुपी घराचा दरवाजा हळूहळू उघडायला लागला.
करोना वाईट आहे, पण त्यानं दाखवलेलं किंबहुना त्याच्यामुळे मध्यमवर्गीयांच्या वाटेला येत असलेलं आजचं जगणं हे नवा मार्ग दाखविणारं आहे. ही नवसंवेदना 'सह' भावना जागविणारी आहे. नवं तंत्रज्ञानाची सकारात्मक बाजू दाखविणारी आहे. करोनारुपी नाण्याची ही बाजू समोर ठेवून विचार केला तर काय मिळवलं आणि नको असलेलं काय मागे टाकत आम्ही पुढे जातो आहोत, हे लक्षात येतं. कुणी कदाचित प्रश्र्न उपस्थित करेल की, गरिबांचं काय? मजूरांचं काय? तर सुरुवातीचा काही काळ तेही भांबावले होते पण आता मार्ग काढत जगणं तेही शिकताहेत. नव्याचा स्विकार करताहेत, असं वाटतंय. अनेकांना मुलांच्या शाळा, त्यांच्या शिक्षणाबद्दलचा प्रश्र्न सतावतोय. पण नव्या युगाची नांदी म्हणत आॅनलाईन पर्यायांचा सकारात्मक वापर पालक हळूहळू शिकताहेत. जसा बाजार तसे उद्योग धंदे मोल्ड होताहेत.
इथे मी व्यक्त करतेय ती आहे माझी अनुभूती! माझ्या बाबतीत, या चार महिन्यांत एकदाच अशी उदासी सैरभैर करणारी ठरली होती. पण मी सुरुवातीला मांडल्याप्रमाणे संपर्क, संवादाची किल्ली सापडली आणि दरवाजा हळूहळू उघडायला लागला. एका बेसावध क्षणी मी घरात पडले. एक हात मोडून गळ्यात पडला. वेदनेपेक्षाही मनात पहिला प्रश्न होता, आता घरकामाचे कसे? जेवण कोण बनवेल? काय होईल? पण निभलं. घर दोघांचं, सहवेदना... वगैरे जे मी म्हटलं ते याकाळात अनुभवलं.
कणिक मी मळायची, तो पोळी लाटायचा, मी शेकायची,
तो कांदा-भाजी-लसूण तयारी करुन द्यायचा, मी फोडणी टाकायची,
दाळतांदूळ मी तयार ठेवायची, तो कुकर चढवायचा...
असं मस्त सुरू होतं. पस्तीस वर्षाच्या वैवाहिक जीवनात नाण्याची ही बाजू कधी लक्षात आलीच नव्हती. ती आता कळत होती. मनात कुठेतरी धास्ती होती पण त्या भितीला दूर सारत एकमेकांना सांभाळत जगणं सुरू झालं. हे काही वेगळंच होतं. भावनिक बंध घट्ट करणारं असं काही तरी हे होतं. याशिवाय मला करोनानं दिलेला आणखी एक पाठ म्हणजे, एका हातानं सफाईदारपणे कामं कशी करावीत? हा धडा! भांडी घासणं, कपडे पिळून वाळत घालणं, झाडूपोछा ही कामं एका हाताने कशी करायची? ते याच काळात शिकले. आणि गरजेतून माणूस कशा विविध क्लृप्त्या अंमलात आणू शकतो, तेही कळलं. ही पण नाण्याची एक बाजूच आहे नं? तर असा हा जगासाठी लाॅकडाऊनचा काळ होता पण माझ्यासाठी हे 'लाॅक आऊट' होतं. देहापलिकडे मनापर्यंत पोहचविणारं...! विनोबांच्या उदाहरणातल्या दाराचा शोध घेणारं! लहानपणापासून ऐकलेल्या नाण्याच्या दोन्ही बाजूंसारखं! बायफोकल असणारं!
- सीमा शेटे (रोठे), अकोला.
(फोटो सौजन्य: गुगल)
No comments:
Post a Comment