Thursday, July 14, 2022

नेमेचि येतो मग..

 “नेमेचि येतो मग पावसाळा” ह्या उक्ती प्रमाणे यंदाही तो आला, अगदी चातकासारखी त्याची वाट बघणाऱ्या समस्त जिवांना दिलासा देत धो धो बरसला सगळीकडे अन चराचराला सुखावून गेला. पण ह्यावर्षी मात्र मला त्याचं आगमन, त्याचं ते सुखद वास्तव्य, हवेहवेसे अस्तित्व अन कधीकधी खूप दिवस मुक्काम केलेल्या पाहुण्यांचा जसा कंटाळा येतो तसा त्याचाही क्वचित आलेला कंटाळा हे सगळं “ह्याची देहा, ह्याची डोळा” अनुभवता न आल्याने खूपच चुकल्या चुकल्यासारखं होत होतं! आता तुम्ही म्हणाल, “असं का बुवा?” तर त्याचं कारण म्हणजे आम्ही दोघेही 13 जूनलाच अमेरिकेत लेकाकडे आलोय. तोपर्यंत एकदोनदा रात्री केव्हातरी तो हजेरी लावून गेला होता एवढंच! पण त्या चुटपुटत्या भेटीने मुळीसुद्धा समाधान झाले नाही . 


       आता तुम्ही पुन्हा म्हणाल, “मग गेलेच कशाला?”, तर जायचं मुख्य कारण म्हणजे गोडंबा नातू दीड वर्षांचा झालाय, त्याच्या सहवासाची आस तिथेही चैन पडू देत नव्हतीच. नुसत्या फोटो अन व्हिडिओ कॉल वर पोट काही भरता भरत नव्हतं. केव्हा एकदा त्याला प्रत्यक्ष भेटू असं झालं होतं. त्याच्या ओढीने अखेर ‘सात समंदर’ पार करत आम्ही येथे आलोच. आल्याक्षणापासून त्याचा निरागस, निष्पाप, गोजिरा पण खट्याळ चेहरा, त्याच्या गोड गोड बाळलीला, त्याचा मऊ मऊ रेशीमस्पर्श, त्याचं दुडूदुडू धावणं, बोबडं बोबडं बोलणं, निर्व्याज हसणं, त्याच्यासोबत खेळणं यामध्ये सगळं काही विसरायला झालं. “सुख, सुख म्हणजे आणखी काय हो?” असं वाटायला लावणारे त्याच्या सहवासातले हे लडिवाळ क्षण! त्यापुढे अर्थातच शंभर पावसाळेही ओवाळून टाकावे असं ते अवर्णनीय सुख! त्यामुळे एक पावसाळा गेला म्हणून तसं तर अजिबातच काही बिघडलं नाही म्हणा. कारण तो तसाही “नेमेचि” पुढल्या वर्षीही येणारच आहे. पण नातवाचं हे लोभस बालपण काही पुन्हा पुन्हा अनुभवता येणार नाही हे मात्र खरंच! पण आता तिथल्या सगेसोयऱ्यांशी, मित्रमंडळींशी बोलतांना, त्यांनी पाठवलेले पावसाचे, पावसातल्या गरमागरम भज्यांचे, पावसाच्या साक्षीने प्यायलेल्या वाफाळत्या कॉफीचे व्हिडिओ बघितल्यावर बाकी त्याची फार म्हणजे फार म्हणजे फारच आठवण आली. काहीतरी चुटपुट, रुखरुख वाटायला लागली.

भरीस भर म्हणजे “आषाढस्य प्रथम दिवसे..” म्हणत पावसाच्या कवितांचाही  समाज माध्यमांवर सगळीकडे पाऊस पडायला लागलेला.


           मग बाकी त्याच्या पहिल्या आगमनापासूनचं  सगळं काही  उगाचच आठवायला लागलं. खरं तर जीवघेणा, भाजून टाकणारा असा रखरखीत उन्हाळा अगदी असह्य झाल्यावरच तो येतो नेहमी. जीव जातो की काय असं वाटेल अशी गदगद होत असते,  दुपारच्या वेळी तर कुलर, एसी समोरून क्षणभरही दूर व्हावंसं वाटत नसतं अन अचानकच आभाळ भरून येतं, सोबत रस्त्यावरची धूळ सोबतीला घेत वाराही वेड्यासारखा अस्ताव्यस्त वाहायला लागतो अन ताडताड टपोऱ्या थेंबासह, मातीच्या त्या चिरपरिचित सुगंधाची उधळण करत तो येतो, थेट आरपार चिंब करून जातो. त्या पहिल्या पावसाची मजा काही औरच! वय कितीही वाढले तरी ह्या पहिल्या पावसात भिजण्याची एक उर्मी प्रत्येकाच्या मनात दाटून येतेच. भलेही वास्तवाचं भान आल्यावर, वयानुसार मागे लागलेल्या दुखण्यांची आठवण आल्यावर  मग ती उर्मी थोडीशी दाबून टाकावी लागते हा भाग अलहिदा!


            अन् ह्या “नेमेचि” येणाऱ्या पावसाबरोबरच असंख्य नवी-जुनी, हिंदी-मराठी गाणी रिमझिमत्या, सरसरत्या, धुवांधार, तर कधी भुरभुरत्या पावसाबरोबरच तनमन चिंब करत “नेमेचि” मनात रुणझुणायला लागतात. ह्यावर्षी आता फक्त ती ऐकत ऐकतच  दुधाची तहान ताकावर भागवायची! अजून काय?  

वानगीदाखल काही गाणी सांगायचीच तर हटकून ओठांवर येणारं शांताबाईंचं 

   “आला पाऊस मातीच्या वासात ग, 

    मोती गुंफित मोकळ्या केसात ग” 

किंवा सुधीर मोघेंचं 

   “आला आला वारा, संगे पावसाच्या धारा, 

    पाठवणी करा सया निघाल्या सासुरा” 

प्रत्येकवेळी त्या मातीचा गोड सुगंध जणू खोल हृदयात भरून घेतल्यासारखंच मनाला प्रसन्न करून जातं. कधी आकाशात काळेभोर ढग भरून येतात, सोबतीला असतो तनामनाला झोंबणारा, गात्र सुखावणारा गार गार वारा. आत्ता कुठल्याही क्षणी तो सर सर सरींसोबत धो धो कोसळणार असे संकेत मिळतात अन बाभंची कविता 

    “गडद निळे गडद निळे जलद भरून आले, 

    शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले..” 

जणू जिवंत होऊन समोर उभी ठाकते. अन श्रावण सुरु झाला की ह्याचा उन्हासोबतचा लपाछपीचा अवखळ खेळ बघता बघता बालकवींच्या

     “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे 

      क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे” 

ह्या कवितेची आठवण तर प्रत्येक मराठी मनाला येतेच येते. 

आणि कधीतरी एखाद्या अंधाऱ्या रात्री विजेच्या कडकडासह अस्ताव्यस्त धुंवाधार बरसणाऱ्या सरी एकटक न्याहाळतांना बघता बघता मग पाडगावकरांचं 

    “भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची

     रात्र पावसाची होती, धुंद वादळाची होती” 

हे चिंब हळवं गीत अन अरुण दातेंचा तितकाच चिंब हळवा स्वर  थेट आतपर्यंत पोहचत आपल्याला एका हळव्या अलवार स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जातो. 


       असा नाना रूपात भेटणारा हा पाऊस. कधी आडवातिडवा ताडताड झोडपून टाकल्यासारखा, तर कधी एखाद्या मोरपिसासारखा हळुवार, अलगद आहे का नाही असा भुरभुरणारा, कधी येतो येतो म्हणत गडप होणारा, कधी पिरपिर पिरपिर करत सगळीकडे चिखलगारा करून वैताग सुध्दा आणणारा. कधी ध्यानी मनी नसतांना अचानक बरसून चिंब करणारा! तर कधी दिवसेंदिवस प्रतिक्षा करायला लावणारा. श्रावणात उन्हासंगे लपाछपी खेळत इंद्रधनुष्यावर स्वछंदी बागडणारा. प्रत्येकच रूप कसं मोहविणारं, आवडून जातं मनापासून! फक्त ह्याचं रौद्ररूप बाकी अगदी नकोनकोसं, जिवाचा थरकाप उडवणारं, एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकणारं, हजारो निरपराधांचा बळी घेत, सगळं काही आपल्या पोटात गडप करणारं ते भयावह रूप! (सध्या तिकडे संततधार सुरु आहे अशा बातम्या मिळाल्या.) म्हणूनच त्याला विनंती करावीशी वाटते की बाबा रे तुझं तेवढं रूप बाकी नको दाखवूस कधी! बाकी तुझ्या सगळ्या रूपांवर जीव खरंच फिदा आहे! 


©मधुमती वऱ्हाडपांडे


Wednesday, July 13, 2022

नको रे नको मना

 रोज सकाळी पायी फिरायला जातांना एक विचार सतत डोक्यात घोळत रहातो.तो हा की आपण प्लास्टिक निर्मूलन करण्याच्या कामात काहीतरी करायला हवं. ठोस पावले उचलायला हवीत. रस्त्यात जागोजागी ,खड्ड्या-खुड्यांमध्ये साचलेला प्लास्टिक चा ढीग बघून तऱ्हेतऱ्हेचे पर्याय मनात आकार धरू लागतात.  त्यात पेपरमधूनही सतत वाचण्यात येतं---"प्लास्टिक वापरावर आळा घातला गेला नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात."

 नेमके काय करता येईल बरे? आपला इतका मोठ्ठा ग्रुप आहे मैत्रिणींचा--- आपापल्या विभागात दोन दोन जणींचा गट करून घरोघरी जाऊन गोळा करावे का प्लास्टिक? की विभागातील लोकांनाच सांगावे, माझ्या घरी आणून ठेवा सगळं प्लास्टिक म्हणून? पण मग ते कोण आणि कुठे नेऊन देणार त्याचाही विचार करून ठेवावा लागेल.
 किंवा वॉर्ड मेंबर ला सांगून आपल्या विभागातील प्लास्टिक कचऱ्याची "व्यवस्था" लावायला सांगायचे का? पण तो वॉर्ड मेंबर मनावर घेईल का?  रोज साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील देखरेख करणारे कुणीच नसते.तक्रार करूनही त्याची दखल घेतली जाईलच ह्याची खात्री नसते. आता तुम्ही म्हणाल की प्लास्टिक आणि ओला, कोरडा कचरा असे सगळे वेगवेगळे ठेवावेत; पण कचऱ्याच्या ढिगात सगळे एकत्रच होत असणार ना?  आजकाल तर नगरपालिकेची गाडीही दिसेनाशी झालीये.

 किंवा मग एखादा "बेरोजगार" शोधून त्याला ह्या कामावर नेमावे आणि त्याला आपणच आपल्या खिशातून पैसे द्यावेत----? पण तो तरी जबाबदारीने काम करेल का? प्रश्न आणि फक्त प्रश्न--- उपाय काहीच सुचत नाही.
 की जनावरांनाच समजावून सांगावे, की बाबांनो, नका तोंड लावू प्लॅस्टिकला,जहर आहे ते. मीटिंग घयावी त्यांची एखादी? मुके प्राणी जास्त समजदार, वफादार असतात, माणसांपेक्षा मेंढरं बरी--- असं काही बाही आठवतं मग--- मग  अशीही शंका येते, ही जनावरे आपलं म्हणणं ऐकतील का? 
(प्रिय मैत्रिणींची क्षमा मागून)
 हां, आता मोहिनी, स्वाती, सीमा ह्यांच्या सारख्या धुरंधरांनी समजावले तर कदाचित लवकर समजतील---त्यांना सवय आहे ना, चार चौघात (चारशे लोकांत  देखील) बोलायची- - आम्हाला चार चौघात नाही तर "दोघातच" बोलायची जास्त सवय आहे.😉-माफ करा मैत्रिणींनो, गैरसमज नका करून घेऊ कृपया🙏 पण "मुक्या प्राण्यांची देखील सभा गाजवली"म्हणून किती उदो उदो होईल ना तुमचा-----  कधी कधी तर असंही वाटतं की माणसांनाच म्हणावं, जे दुष्ट, हिंसक, घातकी आहेत, त्यांना की बाबांनो, तुम्ही का नाही गिळून टाकत प्लास्टिक?  ह्या धरणीवरचा भार तरी हलका होईल काही प्रमाणात--- हे असं भरकटत राहतं मन---कुठल्याकुठे----😞
खरं तर गोची अशी झालीये की काहीही विचार करण्याचं , लिहिण्याचं,  व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य राहिलंय कुठे आता?अगदी मनातल्या मनात देखील बोलायला आणि विचार करायला खूप विचार करावा लागतो. म्हणायला लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य असलं तरी कुठल्या विधानावरून गदारोळ उठेल आणि कुठल्या लिखाणाने कुठल्या आपत्ती निर्माण होतील ह्याचा भरवसाच नाही राहिला.
  त्यातही  व्यक्ती जितक्या मोठ्या पदावर,तितकी तिच्या वागण्या-बोलण्यावर बंधने अधिक----प्रत्येक शब्द तोलून मापून,जपून बोलावा लागतो, वागताना शंभर वेळा विचार करावा लागतो. ह्या संदर्भात दोन किस्से सहजपणे आठवले ते असे---- 

आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदा ट्विटरवर अब्बास नावाच्या एका सद्गृहस्थाचा उल्लेख केला होता की तो त्यांच्या घरी राहिलेला आहे म्हणून---त्यातही काहींना राजकारण दिसलं. शेवटी त्या अब्बास नावाच्या सद्गृहस्थानेच जो सध्या बहुधा ऑस्ट्रेलियात आहे, कबुली दिली ट्विट करूनच की तो त्यांच्या घरी जवळपास 3 वर्षे राहिला होता आणि त्या काळात जितक्या उत्साहाने होळी, दिवाळी सारखे सण घरी साजरे होत,त्याच उत्साहाने "त्यांचे सण" देखील पंतप्रधानांच्या मातोश्री साजरे करत असत.

 दुसरा किस्सा असा--- अडवाणीजी एकदा पाकिस्तानला गेले असतांना त्यांनी बॅरिस्टर जिनांविषयी काही वक्तव्य केलं होतं. भारतात आल्यानंतर त्यांच्या विधानांवर बंधने घातली गेली. आणि त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आल्यासारखी झाली. 
हे झाले मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत; पण रोजच्या व्यवहारात देखील अशी उदा. बघायला मिळतात. राजकारणाशी संबंधित व्यक्तींच्या विधानांवरून आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेने   कुठलेही भले, बुरे मत देऊ नये हेच योग्य.    आणि कुठल्याही राजकीय पोस्ट वरून आपापसात वाद निर्माण करू नयेत, त्यांच्या  वरील पोस्ट्स व्यक्तिगत घेऊ नयेत. 

सोशल मीडिया चा उपयोग सकारात्मक कार्यासाठी देखील कसा होऊ शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दीपा बारिक.
 परवाच वाचलेल्या एका  बातमीनुसार ---25 वर्षाच्या दीपा बारिक ओडिशात "ट्विटर क्वीन " म्हणून प्रसिद्ध आहेत,असे वाचण्यात आले.2019 पासून  ट्विटरला लोकांचा आवाज बनवणाऱ्या  दीपा ह्यांनी आतापर्यंत सहा हजाराहून अधिक समस्या सोडवल्या आहेत. त्या लोकांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांना "टॅग" करतात आणि लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतात.----असाही उपयोग ट्विट चा----चांगल्या  कामांसाठी आणि जनहितासाठी. नाहीतर ट्विटर "बिटर" व्हायला कितीसा वेळ लागतो?  आपणही असेच काहीसे करावे का? पण त्यासाठी आपल्याला फक्त wa आणि fb वर संतुष्ट होऊन नाही चालणार. आपला आवाका वाढवावा लागेल. ते ट्विटर, इन्स्टाग्राम वगैरे सगळं नीट शिकावं, समजून घयावे लागेल आणि त्यासाठी सर्वात आधी नवीन फोन घ्यावा लागेल---🙄🤦‍♀️ बापरे! त्यापेक्षा तूर्तास हा विचार जरा बाजूलाच ठेवूया म्हणजे झालं. तर मंडळी, थोडक्यात ,प्रत्येकाने वागताना, लिहिताना आणि बोलताना आपली सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवावी हेच योग्य.

 बघा मंडळी, प्लास्टिक निर्मूलनावरून कुठल्या कुठे जाऊन पोचलेत विचार--- शेवटी प्लास्टिक निर्मूलनाचा योग्य आणि ठोस उपाय सापडला नाहीच हे विशेष----  आता तुम्हीच सुचवा काहीतरी-----
 मीही समजावते मनाला--- नको रे, नको  मना--असं भरकटत जाऊस--🙏

माणिक

Wednesday, June 15, 2022

Pkv चे अंतरंग भाग २



।ऐ हवा मेरे संग संग चल ,मेरे दिलमे हुई हलचल ।
अशी काहीशी स्थिती, pkvत  माझी असते. मस्त निवांत एकलकोंडी रस्ता ,आजुबाजुला हलकीशी पानांची सळसळ ,एका लयीत चालणारे बुटांचे आवाज आणि अर्थात  विविध पक्षांची सुरेल सोबत! ......... माझ्यासाठी हेच स्वर्गसुख !

आमच्या या निवांतपणावर मी सतत खूष असते पण एके दिवशी अचानक या निवांतपणावर घाला झाला व चक्क त्या रस्त्याने जाण्याची आम्हाला मनाई केली.  ....  वरुन आॕर्डर आहेत तशा !..... असे म्हणाले..... जीव अगदी हिरमुसला होऊन गेला. डोळ्यापर्यंत आसवं येऊन थांबली होती पण मी कसोशीने त्यांना थोपवून धरले होते. आता काय?.......हा प्रश्न सतावत होता...... रस्ता पण आपला लाडका असु शकतो याची जाणीव प्रथमच या प्रकर्षाने झाली. त्याचं लाडकेपण इतक मनात घर करुन बसलय की ,हे नाही तर काहीच नाही... तसही  सध्या ऊन असल्यामुळे  मी आणि स्वाती फक्त रविवारीच pkvत जातो .ते पण जमेल तसं.  या रविवारी आधीच एकमेकींना विचारुन झालं होतं  गेट उघडे नसेल तर काय गं?.....म्हंटलं बघु वेळेवर, आधी जाऊ तर खरी! ..सुदैवाने गेट उघडं होतं....त्या दिवशी परमेश्वराचे किती आभार मानु अन् किती नाही असं झालं होतं ....खर्या अर्थाने आनंद गगनात मावत नव्हता. आजचा दिवस मस्त जाणार!......आज सगळ्यांशी यथेच्छ भेटी होणार, आठ दिवसातला इत्थंभूत समाचार नजरेस पडणार  ! .....आम्हाला दर दिवशी दिसणार्या वेगळ्या अनुभवाची गाथा कोण सांगतं ?.......तर खुद्द  pkv तला तो शांत परिसर !.......जाताजाता सहजच मातीच्या रस्त्याकडे लक्ष गेलं तर त्यावर मोरांचे नि नीलगायींचे पगमार्क(पाऊल चिन्हे) नजरेस पडले .  ताजे ताजे  !  अगदी  नुकतेच फेरफटका मारल्यासारखे.......म्हणजे रानवाटांवर चालायला त्यांनादेखील एकांतच हवाहवासा वाटत असतो तर ! अगदी आपल्यासारखाच ! यालाच कदाचित् स्वतःची स्पेस जपणे म्हणत असावेत. 

 इस राहपर भटक रहे थे हम अकेले,
मगर पता ही न चला की ,                         
सुकूनने हमारा हाथ  कब  थाम लिया !
      
   

 
आता आजचीच गंमत  बघा ना . तुम्हाला माझा लाडका गुबर्या एव्हाना चांगलाच पाठ झालाय माहितीय मला .तर आताशा तो त्याच्या मुख्य ठिकाणी नसतोच तर तिथे सतत दोन साळुंक्या दिसत असतात त्याच्या ढोलीत वाकून वाकून जणू सांगतात की  ," अब ये हमारा इलाका हो गया है! " त्यांनी  त्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आम्हाला दाट संशय आहे . पण गुबर्या आम्हाला दिसत नाही  असं अजिबात होत नाही बरं कां ! त्याच वास्तव्य फक्त बदललय. तो आता आम्हाला त्याच्या तीन छोट्या छोट्या बछड्यासंह वेगळ्या बिर्हाडात दिसतो. त्याच्या बछड्यांचे वेगवेगळे मिश्कील गोंडस हावभाव नजरेत किती साठवू अन् किती नाही असं होतं. दरम्यान एका फांदीवर त्यांची आई ! सकाळच्या मोकळ्या हवेत आपल्या केसांना मस्त उडवताना     दिसते.जणू लाडाने आपल्या साथीदाराला  म्हणते

      । लट ऊलझी  सुलझा जा बालमा । 

आहे की नाही एक एक गंमत!...    

                   बस! ऐसी नजरसे देखो की ,नजर   को ही  लगे की, हमारी नजरने ऐसा पहले क्यूँ नही देखा! 

      आज असेच परत नवीन जे नजरेला दिसले ते म्हणजे टकाचोराचा अड्डा ! त्याचे राहण्याचे ठिकाण. .सकाळी सकाळी दोन टकाचोरांची आपसात एका विस्तीर्ण  झाडावर  मस्त  जुगलबंदी चालली होती . तितक्यात तिसरा गडी पण त्यांच्यात सामील झाला आणि चौथा तिथेच अवती भवती उंडारत होता. लेकरु होतं बहुदा  ते ! (हा..हा..)आणि मग अचानक आठवलं की मागल्या वर्षी पावसाळ्यात आपल्याला याच परिसरात खाली जमिनीवर केलेल्या घरट्यात नवीन जन्मलेल पिल्लु नजरेस पडलं होतं म्हणजे आता तर नक्की! शिक्का मोर्तबच झाला  की हो!... की हेच यांच ठाणं आहे म्हणून. .


pkvत गेल्यावर काय होतं माहिती आहे .माणूस नादिष्ट होतो. गोष्ट तीच असते पण दरदिवशी तिथली पात्र बदलत राहतात त्यामुळे ती नित्यनूतन वाटत राहतात. असाच pkv तला सुर्यास्त लक्षवेधी असतो. रंगछटा किती- किती आणि कशा-कशा असाव्यात ते त्याच्या सायंदर्शनाने नक्कीच कळू लागतं. त्यासाठी चित्रकारच असावं लागतं असं अजिबात गरजेच नाही उलटपक्षी मी तर म्हणेन की ,आपल्यासारख्या सामान्यांना हा  निसर्ग  ते सहज शिकवून जातो. झाडांचेपण असेच! हिरव्यापानांनी लगडलेली झाडं बघताना हिरव्यातल्याच विविध छटा जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो तेव्हा नजरेतुन फक्त आहा!..... एवढच बाहेर पडतं. तशीच तर्हा निष्पर्ण झाडांची सुद्धा ! शिशीरातल्या पानगळीत सर्वस्व स्वाहा करुन "इदं न मम्! " ही शिकवण तोच तर देतो आपल्याला .त्याला माहीत असतं की पुन्हा इथेच उगवायच आहे वसंतात.... ! 
फुलवायचा आहे वसंत!...
 मनामनात !

Wednesday, June 8, 2022

तुम्ही घडवलत मला

 आज whatsapp वर आलेला 'मला पेढे द्यायचे नव्हते ' हा लेख वाचला . डोळे  भरुन आले. मनात विचार आला खरं आहे जे प्रामाणिक प्रयत्न करतात त्यांनाही असं ऐकून घ्याव‌ लागत यशाचा आनंद होण्या आधीच पुसला जातो . सहजच उद्गार काढले जातात आमच्यावेळी बरं होतं पण लगेच लक्षात येत ,परिस्थिती पुर्णपणे बदलेली आहे. यात मुलांचा काहीच दोष नाही . खरं तर शालेय जीवन कसं मजेत ,आनंदाचं ,नि विकास साधण्याचं आहे. हे वाक्य लिहिलं की मला आठवत मी वाचलेलं ' तुम्ही घडवलत आम्हाला' हे अनुवादित पुस्तक एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल लिहिलेले लेख आहेत ज्या शिक्षकांनी त्यांना घडवलं .उदा. द्यायचं झालं चित्रकार आर.के.लक्ष्मण यांचं देता येईल.त्यानी काढलेल्या एका पिंपळ पानांचं कौतुक करतानाच त्यांनी सांगितलं तू मोठा चित्रकार होशील ,शिक्षकांचे हे वाक्य ऐकून त्यांनी चित्रकार होण्याचं ठरवलं. थोडक्यात विद्याथ्र्यांच्या यशात ,विकासात शिक्षकांचा वाटा असतो.हे पुस्तक वाचतांना मनात विचार आला . विद्यार्थ्यांच्या पाठीशी शिक्षक असतात पण असं कधी होत का? की, शिक्षकांच्या यशात विद्यार्थ्यांचा सहभाग असू शकतो .थोडं मागे जाऊन विचार केला तर काही प्रसंग मला आठवले ज्या प्रसंगानी मला काही शिकविले . नि शिक्षक बनवलं

  माझी पहिलीच बॅच ड वर्ग ,मुलींचा वर्ग आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाच्या सहा तुकड्या त्यातला ड वर्ग मुलींचा मराठी मिडीयमचा .साधारणपणे नवीन शिक्षकांना सुरुवातीला मराठी मिडीयमचा वर्ग देण्याची पध्दत होती. खरं तर हे वर्ग पुढे नेणं फक्त उत्कृष्ट शिक्षकाचच काम आहे. या वर्गात डोंगरे आडनावाची एक मुलगी होती .ती नेहमी तक्रार करीत असे ,टीचर एक मुलगा माझ्याच एरियात राहणारा तिला फार त्रास देतो ,शाळेत  येताना मागेमागे येतो .मी म्हटलं घरी सांग की,आईला तर म्हणाली त्यांना माहिती  आहे.एक दिवस‌मधली सुट्टी  संपल्यावर ती धावतच माझ्याकडे आली ,हात समोर करुन मला म्हणाली हे बघा माझ्या दप्तरात मला काय सापडलं ,ती एक अंगठी होती  सोन्याची कुठून आली कोणी टाकली माहित नाही .शंका आहे की, ही त्या मुलानेच टाकली  ती रडू लागली .तिला म्हटलं ,हे सगळं आईला‌ जाऊन सांग .तू म्हणतेस ना घरी सगळ्यांना माहित आहे  मग घाबरण्यासारख काही नाही .फारतर वडिलांना नको सांगून ते काम आई करेल .त्या मुलीनं माझं ऐकलं .दुसरे दिवशी तिची आई आली म्हणाली टीचर तुमचे आभार मानते माझ्या मुलीला योग्य सल्ला दिल्याबद्दल .ती घरी मला सगळं सांगते त्यामुळे काळजी वाटत नाही . नुसतं मुलींना नीट बनवून चालत नाही तर योग्य ते वळण पण‌ लावता आलं पाहिजे.

        साधारण ९२ /९३ सालातली गोष्ट असेल ,माझ्या वर्गात समीर नावाचा विद्यार्थी होता , एक दिवस त्याचे वडील शाळेत आले नि  म्हणाले Teacher कालपासून समीर घरीच आला नाही‌हो सगळीकडे शोधलं पण कुठेच नाही .मी त्यांना विचारलं शाळेतूनच घरी आला नाही का? तर म्हणाले नाही शाळेतून घरी आला नंतर जो. बाहेर गेला तो आलाच नाही . मी त्यांना थोड शांत केलं घरात काही भांडण,तुम्ही रागावलात का? तर म्हणाले नाही .काय झालं कळत नाही. दुसरे दिवशी त्याच्या मामाचा फोन आला तो त्यांचेकडे असल्याचा त्याचे वडील त्याला घेऊन आले लगेच ,शाळेतही कळवले तो सुखरुप असल्याचं. काही दिवस तो शाळेत आला नाही . दहाव्या वर्गात असल्याने खूप शाळा बुडवून‌ चालणार नव्हतं एक दिवस त्याचे वडील आले उद्यापासून शाळेत पाठवतो पण तो काही बोलतच नाही. मी म्हटलं मी त्याला बोलतं करीन ,तो काय म्हणतो ते सांगीन पण एक अट आहे‌ .मी हे तुम्हाला सांगीतलय हे त्याला कळून देऊ नका.ते तयार झाले .मध्ये दोन तीन दिवस गेले स्टाफरुममध्ये एकटी असतांना मी त्याला बोलावले .कसा आहेस ,मित्र काही बोलतात का? वगैरे चौकशी केली .थोडा मोकळा झाल्यावर त्याला विचारल काय रे तू का?असं केलंस ?घरातून निघून का गेलास .सुरुवातीला तो काही बोलेना .शेवटी मीच त्याला म्हटलं ,अरे तू जे मला सांगशील ते मी कुणालाही सांगणार नाही .माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा त्याचा चेहरा बदलला,नि तो बोलू लागला
,तो म्हणाला ,"Teacher,मी आणि माझ्या भावाने मिलट्रीस्कूलची परीक्षा दिली. त्याचा भाऊ  आठवीत आमच्याच शाळेत होता . तो सिलेक्ट झाला आणि मी नाही .त्यावरुन सतत तुलना केली जाते.त्यांचा मला त्रास होतो त्याला मी कंटाळलो .मनात विचार आला नाहीतरी मी यांना नकोच आहे. नि निघून गेलो . दोन दिवसांनी त्याचे वडील मला भेटायला आले तेव्हा मी त्यांना हे सगळं सांगितल‌ . तुम्ही तुलना करणं थांबवा ,आपल्या हाताची बोटं सारखी असतात का?मग मुलं कशी सारखी असतील ?ते म्हणाले बरोबर यापुढे तुलना करणार नाही .महत््वाच वर्ष आहे वाया जाता कामा नये.Thanks देऊन नि आश्वासन देऊन परत गेले.मार्च महिन्यात परीक्षा होती ही घटना‌घडली डिसेंबरला . पुढे फेब्रुवारी ते त्यांनी सुट्टी घेऊन त्याचा आत्मविश्वास वाढवला .

याच वर्गात एक आणखी असाच प्रकार केला पण फार ताणले नाही .एकदा घरातून निघून गेला नि मित्राकडे जाऊन बसला लवकर घरीच गेला नाही त्याचे आई-वडील घाबरेघुबरे त्याला शोधत होते आई तर सारखी रडतच होती .एका मित्राने त्याला हे जाऊन सांगितले तुझी आई सारखी रडते आहे.तो लगेच घरी गेला. दुसरे दिवशी ही बातमी आम्हास कळली  त्याचे कारण वेगळेच होतेम्हणे माझ्या अभ्यासावरुन आईबाबा सारखे भांडतात त्या भांडणाचाच कंटाळा आला मी तर अभ्यास करतो ना सांगा तुम्हीच ?शिक्षकांवर विश्वास असतो हे लक्षात आलं
.
               व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणतात प्रत्येक बॅचचे विद्यार्थी वेगळे .पुढच्या विद्यार्थ्यांनी तर परीक्षाच घेतली.  जानेवारी फेब्रुवारी महिना होता कोर्सेस संपून सराव सुरु होता .विद्यार्थी पेपर सोडवत होते ,तपासून घेत होते .अशातच एक दिवस अंकूश माझ्याकडे आला एक निबंध माझ्याकडे दिला म्हणाला तपासून द्याल का? मी हो म्हटल्यावर म्हणाला मार्कपण द्याल . दुसरे दिवशी तो आला ,टीचर झाला का? मी त्याला तपासलेला कागद दिला त्याने पहिल्यांदा मार्क पाहिले आणि हसला .मी विचारलं का हसला ? तर म्हणाला रागावणार नसाल तर सांगतो .ठीक आहे नाही रागावणार .तेव्हा तो म्हणाला , तुम्ही कमी मार्क देता असं सगळे म्हणतात म्हणून मी स्वतः न लिहिता दहावी दिवाळीतला निबंध आहे तसा लिहून आणला तुम्ही किती मार्क देता हे पाहण्यासाठी, मग काय झालं तर तो म्हणाला तुम्ही दिलेले आणि दहावी दिवाळीचे मा्र्क सारखे आहेत ह्या प्रसंगानी आपण म्हणजे शिक्षकांनी परफेक्ट असलं पाहिजे हे कळलं.

        फक्त आपल्या विषयात परफेक्ट असून चालत नाही तर प्रसंगावधानी असावं हे पुढच्या प्रसंगानी शिकवलं मला. माझ्या वर्गात प्रशांत,विशाल,अजय हे त्रिकूट आल‌.तिघही घनिष्ट मित्र नि एकदम इबलिस .रोज त्यांच्याबद्दल काही ना काही तरी तक्रार असायची . ह्यातला प्रशांत प्रथम घटक चाचणी पेपरची अदलाबदली म्हणून शिक्षा झाली . प्रथम सत्र परीक्षा अंगावर शहारे येणारा प्रसंग , प्रशांतची सरांनी कॉपी पकडली ,त्यांचा पेपर घेतला ,परीक्षा विभागाकडे पाठवलं ,त्यांनी त्याला पालकांना आणायला सांगितलं ,एवढं सगळं घडलं पण मी वेगळ्याच वर्गात होते नि त्यादिवशी माझी हाफडे सुट्टी घेऊन  शेगावला जायचं ठरलं होतं .त्यामुळे मला रिलिव्हर ठेवलं होतं. हा मुलगा मला शोधत आला . त्याने‌एक छोटासा चिटोरा माझ्या हातात दिला आणि निघून गेला .मोठ्या कागदावर अर्ज द्यावा ,छोटा चिटोरा दिला तर न वाचता फेकून देणारी मी ,सुबुद्धी झाली म्हणूया ,तो वाचला नि  वर्ग सोडून बाहेर त्या मुलाच्या मागे पळाले ,मला बघून बाजूच्या वर्गात असलेले ओझरकरसर म्हणाले ,काय झालं मॅडम ?मी म्हटलं त्या मुलाला आधी पकडा मग सांगते ,त्यांनी धावत जाऊन  त्याला वरच्या मजल्यावरुन उडी मारण्यास आगोदर पॅंटचा बेल्ट धरुन मागे खेचला ,त्यावेळी शाळेचं तिसऱ्या मजल्याच काम सुरु होत . लक्षात आलंच असेल की, त्या मुलाने ,चिटोऱ्यावर टिचभर "मी आत्महत्या करायला जातोय". असं लिहिलं होतं. नशीबाने त्या मुलाला आम्ही वाचवू शकलो. त्यांच्या वडीलांना बोलावून घडला प्रकार त्यांच्या कानावर घातलं नि त्यांना सांगितलं उद्यापासून रोज प्रशांतला तुम्ही आणून पोहचवा नि घ्यायला येत जा. जातांना क्लासटिचरला सांगायचं .त्यादिवशीचा प्रसंग संपला पण बरच काही शिकवून गेला.

      कंचन ह्या मुलीने तर मला बरंच काही शिकवलं . मी मराठीची शिक्षिका ,मग वक्तृत्वस्पर्धा , निबंध स्पर्धा,वादविवाद स्पर्धा अशा सगळ्याच स्पर्धामध्ये विद्यार्थी सहभागी करणे त्यांची तयारी करुन घेणे ,संचलनाची तयारी करुन घेणे .अशा सगळ्याच गोष्टी कराव्या लागत असत ,एकदा वर्गात. याच संदर्भात सूचना देण्यासाठी गेले असतांनाच .ती मला म्हणाली ,"टीचर ,तुम्ही कधी स्पर्धेत भाग घेतला काहो किंवा घेता का? खरच होत तीच ,जे आपण दुसऱ्याला सांगतो त्याची सुरुवात स्वतः:पासूनच करायला हवी असं मीच त्यांना एकदा म्हटलं होतं ते लक्षात ठेऊन की काय ती असं म्हणाली नि मी विचारात गुंतली .पुढे विद्यार्थ्यांसाठी मी पण स्पर्धामध्ये विशेषतःनिबंधस्पर्धामध्ये भाग घ.यायला सुरुवात केली सुदैवानी माझा नंबर पण येत गेला .मी जे लिहितो असे ते पाठवण्यापूर्वी विद्यार्थ्यांना वाचायला देत असे . आधी केले मग सांगितले हे मला इथं समजलं .एवढंच नाही मेहनत कशी हेही या मुलींना मला लक्षात आणून दिलं .एका कथाकथन स्पर्ध्येमध्ये तिनं भाग घेतला नेमकं मला सुट्टी घ्यावी लागली ,कथा निवडली होती ,कशी सांगायची तेही समजावलं होतं नि सरावासाठी शिक्षकही सांगितले होते पण ही मुलगी शाळा सुटल्यावर माझ्या घरी येऊन सराव करीत असे.तिला म्हटलं माझ्या घरी खूप पाव्हणे आहेत तर ती म्हणाली मग काय झालं त्यांच्यासमोर सराव करायला मला चालेल .थोडक्यात काय तर कुठल्याही गोष्टीसाठी लाजायच नाही. मी जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा ही मुलगी म्हणाली ,तुमच्यासारख्या शिक्षकांनी सेवानिवृत्त होऊच नये.

     अदिती कुळकर्णी छोट्या‌चणीच व्यक्तिमत्व पण हुशार ,सुत्रसंचलन छान करीत असे. विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला आयोजित विद्यार्थी कवी संमेलनाची जबाबदारी माझेकडे आली. अदिती सुत्रसंचलन करीत असे शिक्षक म्हणून तिची तयारी करुन घ्यावी लागे , लिहून देणे वाचून घेणे .ऐनवेळी काही बदल होईल त्या सूचना .तिचं खूप कौतुक होत असे पण ती नेहमी म्हणायची टीचर सगळं तुम्ही करता मी फक्त वेळेवर वाचते ,बोलते कसं बोलायचं ते ही पण तुम्हीच सांगता .पण तुमचं कोणी कौतुक करत नाही हे  काही मला आवडत नाही.वाईट वाटतं.पण एका कार्यक्रमात डॉ. विठ्ठल वाघ सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ,तिने केलेल्या निवेदनाबददल विचारलं कुणी लिहिलं ,त्यांचं कौतुक केलं नि गुलाबपुष्प देऊन सत्कार केला तो दिवस शिक्षकदिन होता .बोलता बोलता ,असे शिक्षक ज्या शाळेत आहेत ती शाळा धन्य आहे असं म्हणून गुलाबपुष्प दिलं .त्यावेळी अदिती अक्षरशःउड्या मारुन टाळ्या वाजवू लागली.कार्यक्रम संपल्यावर म्हणाली आज कार्यक्रम पूर्ण झाला .मी खूप आनंदात आहे. एवढ प्रेम विद्यार्थी शिक्षकांवर करतात .हे मला त्यादिवशीच‌ कळल .माझ्या घराजवळ राहायची आम्ही घर बदल तेव्हा म्हणाली आम्हाला आता करमणार नाही खरं तर आम्ही काही रोज भेटत नव्हतो की एकमेकींच्या घरीही जात नव्हतो . खूप प्रेम या मुलींनी माझ्यावर .
   ‌‌.   काचन पाटील ,आक्टोबरच्या परीक्षेची मार्क्सिस्ट घ्यायला आली त्यावेळी भेटली. मला बघितलं नि  गळ्यातच पडली नि रडू लागली .मला वाटलं परत नापास झाली‌म्हणून तिची मार्कलिस्ट घेतली ती पास झाली होती .मी म्हटल अगं तू तर पास झालीस मग का रडतेस तर म्हणाली तुमची फार आठवण येते . मग यायचं की शाळेत किंवा माझ्या घरी .खरच टीचर केव्हाही आलं तर चालेल मग हसत निघून गेली .हीच मुलगी आठवीत असतांनाच  ट्रीपला जातांना आईला घेऊन आली होती .टीचरला भेटायला नाही टीचर  दाखवायला .हिचीच लहान बहिण M.sc.झाली B.ed.ला तिचा नंबर अकोला शासकीय महाविद्यालयात लागला .Lesson आमच्याच शाळेत लागले तिचे . स्टाफ रुम मध्ये आली म्हणाली ओळखलंत का मला . मी म्हटलं हो‌तू पाटील ना .तिला आश्चर्यच वाटलं . म्हणिली मला  तुमच्याशी खूप बोलायचं आहे . ठीक आहे बोल पण हसनच्या शेवटच्या दिवशी आली नि एक पत्र दिले नि म्हणाली मला जे बोलायचं होतं ते सगळं यात लिहिलं आहे. नक्की वाचा.पत्रात वाचनाची सवय ,वाटलं होतं तुम्ही फक्त हुशार‌विद्यार्थीच लक्षात ठेवता पण तुम्ही मला ओळखलंत मला खूप आनंद झाला .आज मी शिक्षक होते आहे तुमच्यासारख बनण्याचा प्रयत्न करीन.नि बरच काय काय लिहिलं होतं.. विद्यार्थी लक्षात ठेवणं पण आवश्यक आहे हे मला तेव्हा कळलं . हो ओळखलं की, ते खूष होतात ,म्हणून  ओळखलं असंच सांगायचं हे मी तेव्हाच ठरवलं.

      मी मुख्याध्यापक झाल्यावर १५ ऑगस्टला नुकतेच दहावी पास झालेले विद्यार्थी भेटायला आले त्यातला विद्यार्थी मला म्हणाला टीचर तुम्ही जिजाऊ मध्ये जाऊन आमच्या म्हणजे न्यू इंग्लिश हायस्कूलच नुकसान केल. मला काही कळलंच नाही तो म्हणाला आता आमच्या शाळेत मराठी कोण शिकवेल .,पुस्तकांची ओळख कोण  करुन देईल .स्पर्धांच मार्गदर्शन कोण करेल .असं तो बरच काही बोलत गेला .मला काय बोलावं ते सुचेच ना .शेवटी मी म्हटलं ,अरे माझं प्रमोशन झालं याचा आनंद नाही झाला का तुला तर तोंड वाकड‌करून म्हणाला ,थोडी झाला पण  .असे अनेक प्रसंग ,अनेक विद्यार्थी सांगता येतील . तुम्ही शिकवलं तेव्हा मी नव्हतो मग तुम्ही मार्क का कापले‌ म्हणणारा कप्तान . माझ्या ज्ञानरचनावादाच्या निबंधाच्या संशोधनात मदत‌ करणारा नववा वर्ग . ज्योतीचा अंक लिहिणाऱ्या विद्यार्थीनी,सहलीला आलेल्या विद्यार्थीनी  अशा कितीतरी गोष्टी आज आठवतात आहेत. या नि अशा विद्यार्थ्यांनी नि प्रसंगानी मला घडवल त्यांच्याशी एक वेगळंच नातं निर्माण झालं .स्वाती बुटोले,अनघा गुर्जर,नि त्यांचा गृप मुद्दाम तुमच घर बघायचं म्हणून येणाऱ्या नि निस्सिम प्रेम करणाऱ्या मुली ,वरुडकर,विक्रांत राजे , तुम्हाला फक्त मुलीच आवडतात म्हणणारा प्रशांत , शिल्पा जोशी ,राधिका ,अंजली उन्हाळे नि त्यांचा गृप .किती आणि कोणाकोणाची नाव घ्यावी.

      श्रध्दा बियाणी एक अतिशय मेहनती ,हुशार . गणिताच्या ट्युशनला स्वतः:ला विसरुन दिवसभर गणित करणारी ,ब वर्गातल्या मुलाला मराठीत ९५ मार्क मिळतात मग मी एवढा छान पेपर सोडवला मला का नाही हा प्रश्न विचारणारी बोर्डाच्या परीक्षेत जेव्हा वर्गात ,नि शाळेत मराठीत प्रथम म्हणून बक्षीस घेतांना माझ्याकडे बघून हसणारी . ही मुलगी क्वानव्हेंटमधून आठव्या वर्गात शाळेत आली .मराठी Third  भाषा त्यामुळे ते फारशी जमत नव्हती ,प्रिलिम  मध्ये फक्त मराठीत कमी मार्क मिळालेलं बघून आमचे सुपरवाईझर मला म्हणाले होते ,मॅडम फक्त मराठी मुळे तिचा मेरीट जाईल .तिला तयार करा ,मी म्हटलं अस नाही होणार पण मनात थोडा गोंधळ उडालाच .तुम्ही बिछवे का घालत नाही म्हणून विचारणारी तिची लहान बहीण.

 तीस वर्षांच्या आयष्यात असे खूप प्रसंग आलेत,प्रत्येक प्रसंगानी काहीतरी शिकवलच, पण त्यातले ठळक तेवढेच घेतले विद्यार्थ्यांनी मला कसं घडवलं किंवा एका शिक्षकाच्या यशामागे विद्यार्थी असतात एवढंच सांगायचं होतं . प्रा.प्रवीण दवणे यांच पुस्तक आहे,'प्रकाशाची अक्षरे' या पुस्तकाच्या मलपृष्ठावर य.दी .फडके यांच एक वाक्य आहे,ते म्हणतात प्रत्येक शिक्षकांच्या अनुभव विश्वात त्यांच्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असतो आणि तो असलाच पाहिजे ,ते अपरिहार्य आहे.
         ‌.  कल्पना कोलारकर.

Sunday, May 15, 2022

मंगल कार्य

 


धावत-पळत मंगल कार्यालय गाठलं. जवळजवळ साडेअकरा होत आले होते. चांगलाच उशीर झाला होता. आता कदाचित सर्वांचा ओरडा ऐकावे लागणार, अशा विचारात मी तिथे गेले. पाहते तर... सर्वत्र सामसूम. कार्य आहे की नाही, इतकी शांतता. तसे मंडप सजावट वगैरे सर्व काही होतं पण समोर कोणी दिसत नव्हतं. आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना... असे एक क्षण वाटून गेले.

 असं होणार नाही. नेहमीप्रमाणे जरी माझ्या हातून पत्रिका गहाळ झाली होती तरी लग्न दिनांक आणि स्थळ - मुहूर्त हे सगळं आदल्या दिवशी लहान भावाला विचारून कन्फर्म करून घेतलं होतं, त्यामुळे तशी काही चूक झाली नसावी याबद्दल खात्री होती. आत मध्ये तर जाऊ...म्हणत आत कार्यालयात गेले. तर भव्य अशा सजवलेल्या सभा मंडपासमोर जरीचा झब्बा कुर्ता व फेटा घालून वधूपिता इतरांसह गप्पा गोष्टी करताना दिसले आणि हायसं वाटलं. 
'चला योग्य ठिकाणी आलो.'
 संपूर्ण सभागृहात तशी तुरळकच माणसं होती. मला पाहताच वधूपिता सुहास्य मुद्रेने पुढे आलेत. 
मी म्हटलं, "मला वाटलं, उशीर झाला."
 माझ्या या वाक्यावर..., "असा कसा उशीर होईल? 12:50 चा मुहूर्त आहे ना!" हे त्यांचे उत्तर...
 (मुहूर्ताची वेळ अकरा सांगणाऱ्या भावाला काय म्हणावं?)
 "चला म्हटलं जरा लवकर जाऊ तेवढीच आपली मदत", असं वरकरणी हसत मी म्हटलं.
"मदत वगैरेची काही गरज नाही हो... आपण ए टू झेड कॉन्टॅक्ट दिलं आहे. सर्व तेच करणार. आपण मस्तपैकी तयार व्हायचं आणि एन्जॉय करायचं".
 हे ऐकलं आणि जाणवलं काळ बदलला आहे. आज लग्न म्हणजे एक इव्हेंट्! इव्हेंट मँनेजमेन्टवाले तो सोहळा दृष्ट लागावा इतपत चांगला करतात. पण तरीसुद्धा या सर्वात पाच सहा दिवस चालणाऱा तो पूर्वीचा लग्न सोहळा, त्या चालीरिती आपल्याला कुठे तरी आठवत राहतातच नं...
पूर्वी लग्न म्हटलं की, मुलीकडच्यांना चांगलाच ताण असायचा. एक म्हणजे वरपक्षाचा वरचष्मा! दुसरं सगेसोयरे, व-हाडी माणसांचं आदर स्वागत! तिसरं मुलीच्या सासरी जाण्याचं दुःख! लग्न ठरल्यापासून मुलीच्या आईच्या डोळ्याच्या धारा वाहायला लागायच्या, "तांदूळ ओढून आलेत हो, आता काकण सुटे पर्यंत कुठलं काम करायचं नाही. पुढे अख्खा जन्म नशिबाला कामं बांधली आहेतच" एखादी आजी, मामी, आत्या, मावशी असं कुणीतरी समजून सांगायचे. लग्नघर म्हटलं की, कितीतरी एक ना दोन शंभर काम असायची. ती निपटायसाठी तेवढेच हात मदतीला असायचेत. त्यासाठी महिना पंधरा दिवस आधीपासून जवळची      व-हाडीण मुक्कामी असायची. मुहूर्तापासून कामं सुरु होत असत. पाच सवाष्णींसह जात्या पाट्याची पूजा करुन शेवया, वड्या, कुरड्या, पापड, किकसा वगैरे करायला सुरुवात व्हायची. 
   तेंव्हा लग्न हे कुणा एकाच्या मुलीचं नसायचं तर तो, अमक्या गावच्या मुलीचा तमक्या गावच्या मुलासोबत असणारा लग्नसंबंध असायचा. केवळ घराणीच नाही तर गावांचं ते मनोमिलन असायचं.
 तेंव्हाचा सगळा व्यवहार धान्याच्या बदल्यात चालायचा. पैसा हे चलन व्यवहारात खूप नंतर आलं. आज प्रत्येकाजवळ पैसा आहे आणि मुख्य म्हणजे तो स्वतःसाठी उपयोगात आणण्याची वृत्ती आहे. पुढल्या पिढीसाठी गाठीला बांधून ठेवण्याची गरज आज वाटेनाशी झाली आहे. त्यांचं ते पाहून घेतील, असा मनात विचार त्यामागे असतो.
   

पूर्वी हळद चढवण्याआधी बलुत्याच्या सगळ्या कुळांना 'नग' देण्याची पद्धत होती.  त्यात एकएक करंजी,अनारसा, लाडू, पोळी आणि किकसा- पापड असायचा. 'किकसा' हा शब्दही आजकाल तसा फारसा परिचित नाही. आज हळद सर्वांना माहीत आहे पण पूर्वी हळद आणि ज्वारीचे उबटन तयार केलं जायचं, ते म्हणजे किकसा! तो किकसा आणि सुपारी-हळकुंडाचा गेठा, हे दोन्ही आधी जात्याला बांधल्या जायचं आणि नंतर मग नवरदेवाला चढवलं जायचं. एकदा गेठा बांधल्यावर ते जातं नवरदेव म्हणून सव्वा महिना तसंच ठेवलं जायचं.
   काय एक-एक पद्धती होत्या... लग्नाआधी नानमुखाची किंवा हळदीची गावपंगत असते तेंव्हा वरमाय आपल्या ओटीत तांदूळ घेऊन भोजन मंडपाच्या चारी दिशांना आधी तांदूळाची आणि नंतर पाण्याची शिंपडण करून 'मांडव शिंपते'. 
मांडवाच्या दारी 
वरमाय बायातीन
मांडव शिंपला
नवरीच्या मावशीनं


देव्हारा लिंपो कुणीही पण त्यावर नवरदेव नवरीच्या नावासह अंबरवेल काढण्याचा मान 'फुयी'चाच असायचा! अंबरवेलासोबत त्या चित्रात चंद्र सूर्य, पालखी, घोडा, तुळशी वृन्दावन असं सगळं रेखाटल्या जायचं. तोरणताटी तयार करण्यासाठी आणि ती टाकण्यासाठी हवा असायचा मामा! जेवणारच्या पाटीसाठी पाच कुळातले पाच जणं, देव कुंडी बसवण्यासाठी भाऊबंदकीचे लोक हवे असायचे. देवकुंडीसाठी शेतातली सौंदळची काडी, रुई, चराट्याची फांदी नि आंब्याची डाखोळी... देव्हाऱ्याजवळ पाच मडक्यांमध्ये ठेवलेली हळद-कुंकू, अक्षता, किकसा वगैरेची उतरंड... देवघरात देवक बसवणं म्हणजे भाऊबंदातील देव आपल्या घरात आणून विड्याच्या पानावर त्याची प्रतिष्ठापना करणं...., 

मांडवाच्या दारी 
अहिर भारी भारी
कुणाची नेसू साडी
ल्यायले भावाची पितांबरी

 थट्टामस्करी, उखाणे, कोडी घालत रात्र जागवत केल्या जाणारे अनारसे, करंज्या, पुऱ्या... एकमेकींच्या कानगोष्टी, उखाळ्यापाखाळ्या, टोमणे, रुसवेफुगवे सगळंच काही असायचं. अगदी मानाच्या एका पोळीच्या तुकड्यावरून होणारी भांडणं, शिदोरीची गंमत... हे सगळंच काही त्यात होतं. त्या असण्यात खूप मौज होती आणि आता त्या नसण्यात एक प्रकारचं सुनेपण आहे.  
     लग्न ठरणं, लग्न करणं आणि लग्न होऊन निभवणं... या सर्व महत्वाच्या टप्प्यांवर अनेक पद्धती बदलल्या आहेत.  काही अनावश्यक होत्या तर काहीत काळानुरूप बदल झाला. हल्ली पूर्वी इतका वेळ नसल्याने १२.५० च्या लग्नाला १२.४९ पर्यंत व-हाडी येतात. सुलग्न लावतात. आग्रहाची वाट न बघता बुफे आस्वाद घेतात. आता सगळे जणं लग्न एन्जॉय करतात. खूप छान प्रकारे संगीत, मेहंदी, हळद, लग्न, गृहप्रवेश हे सर्व विधी आनंदात पार पडतात. पण कधीतरी जुन्या चालीरीती सहजच आठवतात. मनात विचार येतो, काळ आहे तो बदलत राहणारच. बदल झालेत, चांगले की वाईट... हे ज्याचं त्यानं ठरवावं. बदल झाला हे मागल्या पिढीनं समजून घ्यावं आणि नव्या पिढीसह एन्जाँय करावं, नाही का?

-सीमा शेटे - रोठे, अकोला.