Wednesday, July 13, 2022

नको रे नको मना

 रोज सकाळी पायी फिरायला जातांना एक विचार सतत डोक्यात घोळत रहातो.तो हा की आपण प्लास्टिक निर्मूलन करण्याच्या कामात काहीतरी करायला हवं. ठोस पावले उचलायला हवीत. रस्त्यात जागोजागी ,खड्ड्या-खुड्यांमध्ये साचलेला प्लास्टिक चा ढीग बघून तऱ्हेतऱ्हेचे पर्याय मनात आकार धरू लागतात.  त्यात पेपरमधूनही सतत वाचण्यात येतं---"प्लास्टिक वापरावर आळा घातला गेला नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात."

 नेमके काय करता येईल बरे? आपला इतका मोठ्ठा ग्रुप आहे मैत्रिणींचा--- आपापल्या विभागात दोन दोन जणींचा गट करून घरोघरी जाऊन गोळा करावे का प्लास्टिक? की विभागातील लोकांनाच सांगावे, माझ्या घरी आणून ठेवा सगळं प्लास्टिक म्हणून? पण मग ते कोण आणि कुठे नेऊन देणार त्याचाही विचार करून ठेवावा लागेल.
 किंवा वॉर्ड मेंबर ला सांगून आपल्या विभागातील प्लास्टिक कचऱ्याची "व्यवस्था" लावायला सांगायचे का? पण तो वॉर्ड मेंबर मनावर घेईल का?  रोज साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील देखरेख करणारे कुणीच नसते.तक्रार करूनही त्याची दखल घेतली जाईलच ह्याची खात्री नसते. आता तुम्ही म्हणाल की प्लास्टिक आणि ओला, कोरडा कचरा असे सगळे वेगवेगळे ठेवावेत; पण कचऱ्याच्या ढिगात सगळे एकत्रच होत असणार ना?  आजकाल तर नगरपालिकेची गाडीही दिसेनाशी झालीये.

 किंवा मग एखादा "बेरोजगार" शोधून त्याला ह्या कामावर नेमावे आणि त्याला आपणच आपल्या खिशातून पैसे द्यावेत----? पण तो तरी जबाबदारीने काम करेल का? प्रश्न आणि फक्त प्रश्न--- उपाय काहीच सुचत नाही.
 की जनावरांनाच समजावून सांगावे, की बाबांनो, नका तोंड लावू प्लॅस्टिकला,जहर आहे ते. मीटिंग घयावी त्यांची एखादी? मुके प्राणी जास्त समजदार, वफादार असतात, माणसांपेक्षा मेंढरं बरी--- असं काही बाही आठवतं मग--- मग  अशीही शंका येते, ही जनावरे आपलं म्हणणं ऐकतील का? 
(प्रिय मैत्रिणींची क्षमा मागून)
 हां, आता मोहिनी, स्वाती, सीमा ह्यांच्या सारख्या धुरंधरांनी समजावले तर कदाचित लवकर समजतील---त्यांना सवय आहे ना, चार चौघात (चारशे लोकांत  देखील) बोलायची- - आम्हाला चार चौघात नाही तर "दोघातच" बोलायची जास्त सवय आहे.😉-माफ करा मैत्रिणींनो, गैरसमज नका करून घेऊ कृपया🙏 पण "मुक्या प्राण्यांची देखील सभा गाजवली"म्हणून किती उदो उदो होईल ना तुमचा-----  कधी कधी तर असंही वाटतं की माणसांनाच म्हणावं, जे दुष्ट, हिंसक, घातकी आहेत, त्यांना की बाबांनो, तुम्ही का नाही गिळून टाकत प्लास्टिक?  ह्या धरणीवरचा भार तरी हलका होईल काही प्रमाणात--- हे असं भरकटत राहतं मन---कुठल्याकुठे----😞
खरं तर गोची अशी झालीये की काहीही विचार करण्याचं , लिहिण्याचं,  व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य राहिलंय कुठे आता?अगदी मनातल्या मनात देखील बोलायला आणि विचार करायला खूप विचार करावा लागतो. म्हणायला लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य असलं तरी कुठल्या विधानावरून गदारोळ उठेल आणि कुठल्या लिखाणाने कुठल्या आपत्ती निर्माण होतील ह्याचा भरवसाच नाही राहिला.
  त्यातही  व्यक्ती जितक्या मोठ्या पदावर,तितकी तिच्या वागण्या-बोलण्यावर बंधने अधिक----प्रत्येक शब्द तोलून मापून,जपून बोलावा लागतो, वागताना शंभर वेळा विचार करावा लागतो. ह्या संदर्भात दोन किस्से सहजपणे आठवले ते असे---- 

आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदा ट्विटरवर अब्बास नावाच्या एका सद्गृहस्थाचा उल्लेख केला होता की तो त्यांच्या घरी राहिलेला आहे म्हणून---त्यातही काहींना राजकारण दिसलं. शेवटी त्या अब्बास नावाच्या सद्गृहस्थानेच जो सध्या बहुधा ऑस्ट्रेलियात आहे, कबुली दिली ट्विट करूनच की तो त्यांच्या घरी जवळपास 3 वर्षे राहिला होता आणि त्या काळात जितक्या उत्साहाने होळी, दिवाळी सारखे सण घरी साजरे होत,त्याच उत्साहाने "त्यांचे सण" देखील पंतप्रधानांच्या मातोश्री साजरे करत असत.

 दुसरा किस्सा असा--- अडवाणीजी एकदा पाकिस्तानला गेले असतांना त्यांनी बॅरिस्टर जिनांविषयी काही वक्तव्य केलं होतं. भारतात आल्यानंतर त्यांच्या विधानांवर बंधने घातली गेली. आणि त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आल्यासारखी झाली. 
हे झाले मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत; पण रोजच्या व्यवहारात देखील अशी उदा. बघायला मिळतात. राजकारणाशी संबंधित व्यक्तींच्या विधानांवरून आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेने   कुठलेही भले, बुरे मत देऊ नये हेच योग्य.    आणि कुठल्याही राजकीय पोस्ट वरून आपापसात वाद निर्माण करू नयेत, त्यांच्या  वरील पोस्ट्स व्यक्तिगत घेऊ नयेत. 

सोशल मीडिया चा उपयोग सकारात्मक कार्यासाठी देखील कसा होऊ शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दीपा बारिक.
 परवाच वाचलेल्या एका  बातमीनुसार ---25 वर्षाच्या दीपा बारिक ओडिशात "ट्विटर क्वीन " म्हणून प्रसिद्ध आहेत,असे वाचण्यात आले.2019 पासून  ट्विटरला लोकांचा आवाज बनवणाऱ्या  दीपा ह्यांनी आतापर्यंत सहा हजाराहून अधिक समस्या सोडवल्या आहेत. त्या लोकांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांना "टॅग" करतात आणि लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतात.----असाही उपयोग ट्विट चा----चांगल्या  कामांसाठी आणि जनहितासाठी. नाहीतर ट्विटर "बिटर" व्हायला कितीसा वेळ लागतो?  आपणही असेच काहीसे करावे का? पण त्यासाठी आपल्याला फक्त wa आणि fb वर संतुष्ट होऊन नाही चालणार. आपला आवाका वाढवावा लागेल. ते ट्विटर, इन्स्टाग्राम वगैरे सगळं नीट शिकावं, समजून घयावे लागेल आणि त्यासाठी सर्वात आधी नवीन फोन घ्यावा लागेल---🙄🤦‍♀️ बापरे! त्यापेक्षा तूर्तास हा विचार जरा बाजूलाच ठेवूया म्हणजे झालं. तर मंडळी, थोडक्यात ,प्रत्येकाने वागताना, लिहिताना आणि बोलताना आपली सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवावी हेच योग्य.

 बघा मंडळी, प्लास्टिक निर्मूलनावरून कुठल्या कुठे जाऊन पोचलेत विचार--- शेवटी प्लास्टिक निर्मूलनाचा योग्य आणि ठोस उपाय सापडला नाहीच हे विशेष----  आता तुम्हीच सुचवा काहीतरी-----
 मीही समजावते मनाला--- नको रे, नको  मना--असं भरकटत जाऊस--🙏

माणिक

No comments:

Post a Comment