Tuesday, March 15, 2022

मोगरा फुलला....

"मोगरा फुलला "हे गो नी दांडेकर यांचे पुस्तक अचानक हाती पडले अनेक दिवसांपासून वाचायची इच्छा असलेले पुस्तक असे अचानक गवसले तर खूप बरे वाटले. पुस्तकावर निळया रंगाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांचा ध्यानस्थ चेहरा, गळयात रुद्राक्षाची माळ, भाळी चंदनाचा टिळा, केस थोडे वाढलेले, मिसरूडही न फुटलेला त्यांचा शांत, अविचल, चेहरा. मागच्या पृष्ठावर पुस्तकाबद्दल आणि गोनीदांबद्दल अल्प परंतु नेमक्या शब्दात परीचय करून देण्यात आला आहे. तो असा -- " ही कहाणी आहे विश्र्वात्मक झालेल्या देवमाणसांची! म्हणजे निवृत्तीनाथांची, ज्ञानदेवाची, सोपान -मुक्ताईची आणि प्रातःस्मरणीय अशा त्यांच्या माता पितरांची! त्यांनी लौकिकात जे भोगले, ते केवळ शब्दातीत आणि जे अलौकिक अनुभवले,ते तर शब्देविण संवादिण्यासारखे! "

अशांची चरित्रे -चित्रे रेखाटण्यास कलाकाराची, लेखकाची कल्पनाशक्ती आणि शब्दसिध्दी "अमृतातेंहि पैजा "जिंकणारी असावी लागते. गोनीदांची लेखनशैली अत्यंत शांत- सौम्य, प्रसन्न करणारी, जीवनाचा उध्दार करणारी, सकारात्मक अशी आहे.  कल्पित पात्रांच्या मुखातून अकल्पिताची कथा सांगितली आहे. गोनीदा या पुस्तकात प्राणा -  मनातून फुलून आले आहेत.

गोनीदा लिहीतात, सातशे वर्षापूर्वी आळंदी एक सुमार खेडे, तिथे विठ्ठलपंतांचा न्याय करतील असे पंडित असणे हे अगदीच असंभव. स्वतः विठ्ठलपंत शास्त्रवेत्ते. गृहस्थाश्रम पुन्हा स्वीकारण्यापूर्वी त्यांनी गुरूच्या आज्ञेपर शास्त्रोक्त प्रायश्चित्त घेतले होते. तरीही वनवासी विजनवास नशिबी आला. ही चार दिप्तीमान मुले ज्यांच्या कुशीत जन्मली ते विठ्ठलपंत आणि रूक्मिणी तपःपूत आणि साधुस्वभाव होती. शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी.

तसे तर आपल्या सर्वांना निवृत्ती  ज्ञानेश्वर ,सोपान, मुक्ताबाई आणि त्यांचे मायबाप विठ्ठलपंत, रुक्मिणी यांच्याबद्दल सगळीच माहिती आहे. पुस्तकात ते सर्व आले आहे तरीपण ते वाचतांना आपण त्यात गुंग होऊन जातो. कारण गोनीदांची लेखन शैली! 

 विठ्ठलपंत, रुक्मिणी भगवत गीता पावलोपावली जगले. आपल्या आचरणात आणून मुलांवर पण तेच संस्कार केले. यदृच्छालाभसंतुष्टव्दंव्दातीतविमत्सर ही गीतेतील सर्व विशेषणे त्यांच्या कुटीत आकारास आली होती.प्रत्यक्ष झाली होती. समाधानाचे,संतोषाचे पांघरुण त्या दोघांनी पांघरले होते. ज्या समाजाने त्यांना वाळित टाकले त्या समाजावर कधीही दोषारोप नाही, मनात कटुता नाही. किती कठीण होते जगणे. त्यांचे ते कष्टप्रद, खडतर जगणे वाचून आपलेही मन भरून येते. त्यावर फुंकर घालायला आपल्यासोबत कथेतील दोन पात्र येतात. विठ्ठलपंतांना तीर्थाटन करीत असतांना भेटलेले सोबती !  भलेही ते काल्पनिक पात्र असतील पण त्या पुस्तकाची हिच खास गोष्ट आहे ते  पात्र  जणू सूत्रधार बनून  आपल्याला त्यांच्यासोबत घेऊन जातात आणि विठ्ठलपंत, रूक्मिणी आणि त्यांच्या मुलांची दिव्यत्वाची प्रचिती वेळोवेळी देत राहतात.  शेवटपर्यंत त्यांनी विठ्ठलपंतांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांना साथ दिली अगदी ज्ञानेश्वर माऊली समाधी घेईपर्यंत!  

 रुक्मिणीची लहानपणीची जीवाभावाची सखी! तिच्याच वडिलांमुळे विठ्ठलपंतांना समाजातून बहिष्कृत केले जाते. तरीही तिची ही जीवाभावाची सखी रुक्मिणीला वेळोवेळी मदत करते. त्यामुळे तिचे माहेर तुटते, समाज तिला पण बहिष्कृत करतो तिच्याच वडिलांच्या सांगण्यावरून.  ज्ञानेश्वरांच्या वेळेचे रुक्मिणीचे बाळंतपण असो,रुक्मिणी विठ्ठलपंत अनंताच्या प्रवासाला गेलेले असो की ज्ञानेश्वरांची समाधी असो प्रत्येकवेळी ही सखी समर्थपणे साथ देते. मला वाटतं " माय मरो मावशी जगो "ही म्हण तेव्हाच रुजली असावी. या सखीचे आणि रुक्मिणीचे बालपणीचे वर्णन पण अतिशय हृद्य झाले आहे. आणि लग्नानंतर माहेरी बाळंतपणासाठी ही सखी येते ते प्रसंग अगदी कमी शब्दात पण तितकेच प्रभावीपणे गोनीदांनी लिहले आहे. 

एकेका प्रसंगाचे वर्णन पुन्हा पुन्हा वाचावे तर त्याची गोडी अजून अजून वाढत जाते. त्र्यंबकेश्वरला हे सर्व कुटुंब जाते ते वर्णन, त्या प्रवासात विठ्ठलपंत वाराणसीला जे शिकले ते मुलांना शिकवत होते. रोज भगवत गीतेवर प्रवचन करून गीता सोप्या भाषेत समजावून सांगत. अफाट बुध्दीमत्तेचे वरदान लाभलेले ते मुलं चटकन शिकत होते. गोनीदांचे भाषेवरचे प्रभुत्व ,गाढा अभ्यास प्रत्येक प्रसंगात अनुभवायला मिळतो. त्याकाळातील समाजजीवनाचे यथार्थ दर्शन होत जाते ते त्यांच्या भाषेमुळे.

 रावणाचा सीता स्वयंवराचा एक गमतीशीर प्रसंग मूळ रामायणात नसलेला परंतु कोणीतरी कौतुकाने रचलेला , असे सांगून गोनीदांनी  अत्यंत छान पध्दतीने , कमी शब्दात लिहीला आहे. तो ही संस्कृत भाषेत! वाचून आपणही मनापासून दाद देतो.

विठ्ठलपंतांची तीव्र इच्छा असावी गीता सामान्यांना समजेल अशा भाषेत लिहावी, ती इच्छा निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी लिहून घेऊन  पूर्ण केली असावी. ज्ञानेश्वरीच्या सुरूवातीला गणपतीचे वर्णन वाचून तर आपण थक्क होऊन जातो. इतके अप्रतिम लिहीले आहे. पुस्तक वाचतांना आपल्यालाही गीतेतील मनोज्ञ , सखोल तत्वज्ञान सोप्या शब्दात समजत जाते. आणि आपलेही आयुष्य सुसह्य होते.   या पुस्तकातील भाषा आपल्याला थेट ज्ञानेश्वरांच्या काळात घेऊन जाते. त्यामुळे आपणही त्या कथेतील एक होऊन जातो. असे  रसाळ, मधाळ भाषेतील हे पुस्तक आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावे असेच आहे. गोनीदांसारख्या संवेदनशील लेखकाने वाचकांच्या मनात खरोखर मोगरा फुलवला आहे. 

अंजली




 

Monday, March 14, 2022

pkv चे अंतरंग !..

 


जल,जंगल,जमीन.... शिवाय माणूस जगूच शकत नाही असं कुठसं वाचल्याच आठवतं. जल आणि जमीनीचं महत्त्व आपण लहानपणापासुन  प्रत्यक्ष अनुभवतो, त्याची अनिवार्यताही माहिती असते पण तितकसं  जंगलाची  अनिवार्यता कळायला जाणिवांच्या कक्षा वाढण्याची गरज असते. जरा समज आल्यावर, जाणिवा रुंदावत गेल्यावर त्याची महती हळूहळू कळू लागली. 

               आठवणीतलं यवतमाळ!.. जे माझं माहेर, ते चारही बाजुंनी जंगलांनी वेढलेलं होतं. एका बाजुला करळगावच जंगल, एका बाजुला उमरीच तर एका बाजुला निळोणाच जंगल.. .ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही लोकं डबापार्टीच्या निमित्ताने भटकंती करायचो . सागाची उंचच झाडं आणि पळसाच रान यांनी जंगलाचं सौंदर्य वाढवलेलं . आता लग्नानंतर अकोल्यातल्या वास्त्यव्यात जवळजवळ वीस पंचवीस वर्षे झालीत. इथल कोरडं रुक्षवातावारण मनाला तितकस रुचेचना पण काय करणार आले या भोगासी म्हणावं नि गप रहावं. ..................          पण , गेल्या पाच सहा वर्षापासुन होत असलेली pkv ची ओळखं  म्हणजे वाळवंटात  पाण्याच सुंदर सरोवर दिसाव अगदी तसच आणि तितकच असोशिचं ठिकाण ! . .......रणरणत्या उजाड अकोल्यासाठी छानसा गारवा देणारं मनाची हिरवळ टिकवून ठेवणार हे ठिकाण मनाच्या कोपर्यात आनंदाचा झरा सदैव वाहत ठेवणार असं आहे.  


आधी फक्त   morning walk पुरतच जाण्याच हे ठिकाण होतं पण हळूहळू तिथल्या पक्षी वैविध्यतेने मनाला भुरळ घालायला सुरुवात केली. Pkv म्हणजे मोरांच साम्राज्य! हे अख्ख्या अकोलेकरांना माहिती आहे .ह्या पक्षीराजाने आपला दबदबा कायमच राखला आहे. त्याला कितीही वेळेला पाहीलं तरी आपलं मन खचितच भरेल . त्याची गर्द निळी मखमली उंच मान व त्यावरील काजळ घातल्यागत पांढरा स्वच्छ चकचकीत डोळा आपल्या डोळ्यात साठवू बघतोन बघतो तोच त्याचे तुरुतुरु चालणे लक्ष वेधुन घेते !  तर कधी आपल्या भरगच्च पिसार्याच सौंदर्य खुलवून दाखवण्यासाठी तो आतुरलेला दिसतो.  तर कधी आपला भरजरी परकर(पिसारा) सांभाळत एकीकडून दुसरीकडे सवंगड्यांना भेटण्यासाठी उडती भरारी मारतो ना तेव्हा तर आपण अगदी खलासच होतो आणि त्याच्या दुप्पट प्रेमात पडतो. त्याचे मान उंच करत चालणे,त्याचे उडणे ,त्याचे पिसारा फुलवणे त्याच्या प्रत्येक हालचालींची मनमोहक अदा म्हणजे एकप्रकारे
 नृत्याविष्कारच असतो.

      * मोरा रे मोरा काय तुझा तोरा *


हे अगदीच पटतं !...या मयुरपुराणानंतर वाट वळवते ती नीलगायींकडे .!अतिशय शामळू लाजाळू असा हा प्राणी ! कळपात राहणारा . हरीण आणि गायीचा मिलाफ असणारा . फिमेल.... गायीच्या वर्णाचा, तर मेल..... काळसर करड्या वर्णाचा .डोक्यावर दोन छोटी शिंग बाळगणारा जरासा अबोल वाटणारा म्हणजे आपल्याच कोषात वावरणारा हा प्राणी आहे पण याचा जंगलातला वावर फारच सुखकारक वाटतो. 


 pkvत गेल्यावर  माझा सगळ्यात लोभस वाटणारा गडी म्हणजे spoted owl !            
आम्ही जिथे गाडी लावतो तिथेच एका गुलमोहराच्या ढोलीत याच वास्तव्य असतं . हा आपलं स्वागत करायलाआपल्या  ढोलीच्या दारात सदैव हजर असतो ! हा दिसताच   मनाची प्रसन्नता दामदुप्पट वाढते.गोल गरगरीत डोळ्यांचा गुबरा गुबरा गडी कोणाला आवडणार नाही ? खरतर ह्याला पाहीलं की मस्त पिचकायची इच्छा होते. पण ते शक्य नसल्याने   त्याला हाय बाय  करुन त्याच कुटूंब आजुबाजुला शोधतच पुढे चालू लागते.  .३६०च्या कोनात मान हलवणारा हा गुबरा गडी इतका लोभस आहे ना की ज्याच नांव ते!   सध्या pkvत यांची संख्या बरीच वाढलेली दिसते आहे .त्याचे तीन चार अड्डे तर आम्हालाच माहिती आहे. यांच त्रिकोणी किंवा चौकोनी कुटूंब बघून उगाच माणसाची आठवण येते आणि हो , हे कुटूंबवत्सल असतात हे विशेष .!

        वातावरण कोणतही असो pkv त सृष्टीबदलाचे वारे आल्हाददायकच वाहतात .कदाचित् हे त्या जागेबद्दलच प्रेमच बोलत असेल माझ्या मनातलं... .आत्ता इतक्यातलीच गोष्ट! .... हिरवाईत लपलेले मोकळाण आता उन्हामुळे  थेट दिसत आहेत .हिरवाईने जमिनीचाच रंग ल्यालेला असल्याने  काटक्यांचा रंग जमिनीच्या रंगात बेमालुम मिसळला आहे.   त्या मोकळाणात तिथे होणार्या केवळ  हालचालींवरुन काहीतरी असण्याची जाणीव झाली .बघतो तर काय चक्क हरणांचा कळप!.....दुरुन निटसे दिसत नसल्याने जवळ जावं ह्या विचारात होतो आणि काटेकुटे तुडवत आवाज होणार नाही अशी दक्षता घेत जवळ जात होतो पण कसचं काय आपल्या आधीच आपला हलकासासुद्धा आवाज  त्यांच्या कानात शिरतो. त्यांनी मस्त लाँगजंप घेत आमच्यापासून पळ काढत  पोबारा केला सुद्धा . पण  ते उड्या मारत पळणारे हरणं बघतांना जे नेत्रसुख मिळाले ना त्याला तोड नाही. मघाशी मी जेव्हा आमच्या गुबर्यागाली पक्षाचा उल्लेख केला ......हो तो च तो (घुबड)!.....काही जण त्याच्या नावाचा उल्लेख करण सुद्धा टाळतात . म्हणे अपशकुनी असतं  ते!...खुद्द लक्ष्मीच वाहन आहे म्हंटल्यावर कसं असेल अपशकुनी.! मला तर तो दिसला नाही की उलट अपशकुन वाटतो  .अर्थात मनात हा असला विचार कधीच नसतो .  ...बरं ते जाऊ द्या मला उलट सांगायच वेगळच आहे. तर त्या दिवशी आम्ही संध्याकाळ होत आली असल्याने परतीच्या वाटेला लागलो होतो तर अचानक टकाचोराचा आवाज ऐकू आला .आवाजाचा कानोसा घेत कुठे बसला हे शोधतच होतो तर तीथेच झाडाच्या दुसर्या फांदीवर हा माझा लाडका गुबर्या बसला होता . छान शांत निवांतपणाचा आस्वाद घेत होता .पण!.... 
पण हा बदमाश टकाचोर  मोठमोठ्याने आवाज करत जणू चल ऊठ ही माझी जागा आहे म्हणत त्याला हुसाकवत होता .हा बिचारा उडून शहाण्या  बाळासारखा दुसर्या फांदीवर बसला तर हा आगाऊ त्याला तिथेपण बसु द्यायला तयार नाही .बिचार्याला आपल्या कर्णकर्कश आवाजाने त्याला बेजार करुन सोडत होता, तर हा गुबर्या हतबल होऊन शेवटी दुसर्या झाडावरच गेला अगदी निमुटपणे त्याच्या स्वभावानुसार .पण ऐकेल तर टकाचोर कसचा. एखाद्या हट्टी द्वाड मुलासारखा माझ्या गुबर्याला अक्षरशः टोचे मारुन तिथुनही हाकलुन लावले. जस काही तिथला एरिया ह्याच्याच बा....चा आहे .ते दृश्य बघताना खरच अवाक् व्हायला झालं !असं  तर आपण माणसं वागतो खर तर  !...पण हे पक्षीसुद्धा !.....?    विचार केला की ,असेल ह्या अशा वागण्याचं लाॕजिक त्यांच्याकडे सुद्धा !. शेवटी प्रत्येकाला आपल्या जिवाची काळजी असतेच ,सुरक्षेचा प्रश्न असतो नाही कां शेवटी. ?  त्यांची त्यांची नियमावलीपण असेलच की !     

   

जगण्यासाठी संघर्ष मात्र सर्वच सजीवांना करावा लागतो हे मात्र चिरंतन सत्य आहे. अशाच  किश्शांची पोतडी भरुन दिली आहे pkv ने ....... कान ,नाक ,डोळे ह्या ज्ञानेंद्रियांना अधिक तीव्र करण्याचा इशारा पण ! चला तर मग भेटूया  परत पुढच्या किश्श्यांसह  !