"मम्मी, तुम्ही आणि बॉईल अंड खाणार? मला तर हे माहीतच नव्हतं, म्हणजे शॉकिंग आहे माझ्यासाठी---"
"अरे बेटा, मला चालतं, आय मीन, आवडतं मला---"
"पण कधीपासून?"---15 दिवसांपूर्वी दोन नंबर च्या दिराकडे गेलो होतो आम्ही उभयता जेवायला ,तर पुतण्या मला विचारत होता. प्रचंड नवल होतं त्याच्या विचारण्यात आणि ते साहजिकच होतं अर्थात. मला "नॉन-व्हेज" चालत नाही, त्याचा वासही सहन होत नाही, इतकंच काय; मी घरी सहसा करतच नाही हे घरात सगळ्यांनाच माहीत आहे.मला इतक्या दिवसात चिकन आणि मटण ह्यातला फरक देखील कळलेला नाहीये, नाही मी तो जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या घरात मी न माझी मोठी लेक सोडली तर सगळेच "नॉन-व्हेज" चे प्रचंड चाहते. मला मात्र तो प्रकारच आवडत नाही, बुद्धीला त्याहून पटत नाही. निव्वळ दुष्टपणा वाटतो मला तो. किळस येते, त्याहीपेक्षा त्या "मुक्या प्राण्यांची "दया येते. माझ्या माहेरी, खास कर आमच्या घरात कुणीही खात नसत. (आपण नाथ पंथी आहोत असे आई म्हणायची)माझा मोठा भाऊ जो आता 70 वर्षाचा आहे; पण आजही त्याच्या समोर कुणी विषय जरी काढला तरी त्याला ओमीटिंग होते.

असो.



मला चालत नसल्याने ह्यांना , मुलांना नॉन व्हेज खायची इच्छा झालीच तर आतापर्यंत हॉटेलमध्ये च बनवून घरी येत असे किंवा मोठ्या घरी कुणाकडेही बोलावणे असे(ह्या दोन-चार वर्षात तेही कमी झाले अर्थात) किंवा आमचे "सुभाष-वस्ताद"
माहीर आहेतच. मुख्य म्हणजे ते मसाला देखील (भाजीची ग्रेव्ही) इतका उत्तम बनवतात, की मला काहीच करावे लागत नाही. त्या बाबतीत मी किती भाग्यवान आहे ते माझ्या बऱ्याच मैत्रिणींना माहीत आहे.
असो. मूळ मुद्दा असा की माझ्या काही काही आवडी-निवडी अगदी अचानकच बदलल्या.
आता हे बॉईल अंड्याच्याच बाबतीत सांगायचं झालं तर 3 वर्षांपूर्वी माझा अपघात झाला होता त्यावेळी डॉक्टरांनी मला पनीर, अंडी असे काही स्पेशली खायला सांगितलं होतं. पण तेव्हाही मी फारसं मनावर घेतलं नव्हतं.; पण मागच्या लॉक डाउन मध्ये समीर देखील बराच काळ घरी होता ,त्याच्या सोबतीने म्हणा किंवा त्याने आग्रह केल्याने म्हणा, मी खायला सुरुवात केली आणि मला चक्क ते आवडायला लागले.
ब्रेड आम्लेट आणि भुर्जी पेक्षाही हे असे बॉईल केलेले अंडे छान तिखट मीठ टाकून खाण्यात मला मजा वाटू लागली.त्यात परवाच वाचले की डाएटिशीयन खुशबू शर्मा म्हणते की अंडी खाल्ल्याने, विशेषतः हिवाळ्यात, वजन बिलकुल वाढत नाही
तसे आमची मीनल देखील आम्हाला योग्य आणि आम्हाला पूरक, पचनी पडेल असा सल्ला देतच असते, वेळोवेळी.
असो. "पाणी-पुरीच्या" बाबतीतही हाच प्रकार घडला. म्हणजे वयाच्या 50 वर्षांपर्यंत पाणी पुरी मला अजिबातच आवडत नव्हती. मी चव देखील घेऊन बघितली नव्हती; पण जेव्हा आम्ही दोघे आणि ह्यांचा नागपूरचा मित्र आणि त्याची बायको असे ती दोघे काश्मीर टूर वर गेलो होतो त्यावेळी मला ह्यांच्या त्या मित्राने जबरदस्ती पाणी-पुरी खायला लावली आणि काय आश्चर्य राव---
मला तेव्हापासून ती चक्क आवडायला लागली की----इतक्या सडनली माणसाच्या आवडी निवडी अशा बदलतात? बदलू शकतात? सवयीचं एकवेळ समजू शकतो आपण, ती बदलता येते; पण आवड-निवड ? "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही" किंवा "सुंभ जळाला तरी पिळ काही जात नाही" अथवा "स्वभावाला औषध नसते,हेच खरे"-- ---अशा प्रकारची वाक्ये नेहमीच वाचनात येतात, कानावर पडत असतात. परिस्थिती नुसार, वयानुसार स्वभाव बदलतो माणसाचा, सवयी देखील बदलतात, कधी कधी तडजोड म्हणूनही---- पण आवड? आणि आवड आणि सवय यात नक्कीच अंतर आहे. बऱ्याचशा गोष्टींची इतकी सवय होऊन जाते की आवड नसतांना देखील त्या कराव्या लागतात किंवा केल्याच जातात. आता बायकांचीच गोष्ट पहा ना---घरकाम, म्हणजे घरातली सगळीच कामे आम्हाला खूप आवडतात असे नाही(मला तर बरीचशी---बऱ्यापैकी आवडतच नाहीत
) तरी करावीच लागतात ना? तो सवयीचा भाग झाला. आणि "परिवर्तन" हा माणसाचा गुणधर्म मानला तरी मूळच्या आवडी,निवडी अशा एकाएकी बदलत नसाव्यात, असे माझे तरी प्रामाणिक मत आहे. मग माझ्या बाबतीत जे घडले त्याला काय म्हणता येईल?









बरं चॉकलेट च्या बाबतीतही सेम हाच प्रकार---- लहानपणी (माझ्या अर्थात) देखील कधी आवडीने चॉकलेट खाल्ल्याचे, त्यासाठी हट्ट केल्याचे आठवत नाही. सुरुवातीला तर "रावळगाव" शिवाय इतर कुठली चॉकलेट माहीतही नव्हती आणि कॅडबरी ची क्रेझ नव्हती. नंतर नंतर फार झालंच तर "एकलेयर्स वगैरे" ---पण कॅडबरी चे फारसे आकर्षण वाटलेच नाही कधी आणि इच्छाही झाली नाही;पण साधारण 6/7 वर्षांपूर्वी आम्ही म्हणजे मैत्रिणी तिरुपती बालाजी ला गेलो होतो, तेव्हा सीमा ने "होम मेड" चॉकलेट्स सोबत घेतले होते आणि ते खाल्ल्यानंतर मला चॉकलेट्स पण आवडायला लागलीत, अचानकच.

परवा तर मी चक्क समीरला म्हटले, अरे बेटा, चॉकलेट खायची खूप इच्छा होतेय रे----"
(डोहाळे लागल्यासारखी इच्छा झाली
). काय जादू आहे न कळे----





शाळा कॉलेजमध्ये असतांना मी फार भिडस्त स्वभावाची होती, अबोल होती, कुणाला पट्कन उत्तर देणे मला जमत नव्हते; आता मात्र मला खूप बोलायला लागते,तेही सरळ बोलण्यापेक्षा "टांग खेचायला" मजा येते, सतत खूप जणांच्या, विशेषतः मैत्रिणींच्या घोळक्यात राहायला आवडते---- हा बदल झाला स्वभावातला, सवयीतला---; पण आवडीनिवडी कशा काही बाबतीत अचानक बदलल्या, ते कोडे काही सुटत नाहीये.

लहानपणीच्या खूप साऱ्या आवडी-निवडी मोठेपणी बदलतात. अगदी टोकाचा बदल देखील होत असतो. लहान असतांना जादूच्या, चमत्काराच्या, सुरस गोष्टी वाचायला, ऐकायला आवडतात,भूत, राक्षस म्हटले की प्रचंड भीती वाटते, पण तेच मोठं झाल्यानंतर वाचनाच्या बाबतीत प्रचंड बदल होतो, "चॉईस" मध्ये. मोठेपणी माणसाच्याच अंगात भुतांचा न राक्षसांचा संचार होतो, त्यामुळे ते कुणालाच घाबरत नाहीत. परी, राजकन्या, राजकुमार ह्या काल्पनिक विश्वात, आयुष्याचे टक्के टोणपे खाल्लेला माणूस कसा रमेल? बालवयात "ढुंगी" शब्द मजेशीर वाटतो; पण तेच मोठं झाल्यावर "ढुंगण धुवायची तरी अक्कल आलीये का?"
असे कुणी म्हटलेले आवडेल काय?


थोडक्यात काय तर लहानाचे मोठे होत असताना आवडी निवडी बदलणे हे अगदीच स्वाभाविक आहे; पण वयाच्या ह्या टप्प्यावर म्हणजे आयुष्याची इतकी वर्षे पार केल्यानंतर अचानकच जेव्हा आपल्या आवडी निवडीत आपल्याला बदल जाणवतो, तेव्हा साहजिकच नवल वाटल्यावाचून रहात नाही, जे मला वाटते आहे.
तुम्ही सांगू शकाल काही?


तुमचा अनुभव?
माणिक
No comments:
Post a Comment