Saturday, January 15, 2022

व्हाट्सअपायन..!

अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्लाय नसता दिला? काय म्हणता? काsssही बिघडत नाही? अहो बिघडत कसं नाही? मी त्याची सख्खी जन्मदात्री आई अन त्याच्या स्टेटसला माझाच रिप्लाय सगळ्यात शेवटी! माझ्या सगळ्या मैत्रिणींनी दिला सुद्धा असणार रिप्लाय! एक दिवस मेलं सकाळी व्हाट्स अँप बंद होतं तर नेमकं असं झालं! राहू द्या हो तुम्ही, पुन्हा पुन्हा “काsssही बिघडत नाही!” ची रट नका लावू! सकाळी सकाळी पेपर मध्ये डोकं खुपसून एवढं काय महत्वाचं वाचता म्हणते मी! मी म्हणते एक दिवस नाही वाचला पेपर तरी “काsssही बिघडत नाही!” बरं का! थोडं बायकोशी बोललं तर काही नरकात नाही जात लगेच! काय म्हणालात? मी बोलूच देत नाही तुम्हाला? छान! आता हेच ऐकायचं बाकी होतं! माझं तोंड एकदा कायमचं बंद झालं ना की मगच कळेल माझी किंमत! काय? मीच पुन्हा कुठल्या कुठे जाते? जाऊ द्या, तुमच्याशी काही बोलण्यातच अर्थ नाही! मी आपली जातेच कशी. बघा, अकरा वाजले, अजून ही नीता कशी नाही आली पोळ्यांना? येते का नाही देवा! फोन करूनच बघते.

 हॅलो, हॅलो .. नीता ना? अगं काय गं कुठे आहेस? वाटच बघतेय तुझी. काय म्हणतेस? 
सकाळीच मेसेज टाकला होतास व्हाट्स अँप वर! अग फोन नाही का करायचास? काय म्हणालीस? 
आवाज नाही येत आहे गं नीट! घाईघाईत जावं लागलं म्हणतेस! ठीक आहे, पण उद्या येणार आहेस ना ? 
अन् मेसेज बिसेज नको टाकूस बाई! सरळ फोन करत जा बाई मला! . . . . 
हॅलो..,हॅलो...कट झाला वाटतं फोन!

 बघितलंन अहो, ही नीताही आजकाल डोक्यावरच बसत चालली आहे. काय म्हणाली माहिताहे? म्हणे तुम्ही सतत तर व्हाट्स अँप वर असता ताई, म्हणून मेसेज टाकला! आता हिला काय करायचं मी व्हाट्स अँप वर राहो का फेसबुक वर राहो! पण खरंच सांगते हो, व्हाट्स अँप, फेसबुक अन त्यावरचे ते सतराशे छप्पन ग्रुप्स! काय काय अन् किती बघणार? नुसते गुडमॉर्निंग, गुड नाईट अन वाढदिवसाचे बिनकामाचेच मेसेजेस जास्त! नुसतं गरगरतं हो डोकं! कधीकधी तर वाटतंय एखादी नीतासारखी बाईच ठेवावी आता मेसेज डिलीट करायला! तुम्ही का हसताय एवढं गालातल्या गालात? आता मागवा काहीतरी झोमॅटो नाहीतर स्वीगी वरून. मी काही एक करणार नाही आज. तसंही आत्ताच बघितलं तर आज आमचा एक वाजता झूम कॉल आहे शाळेच्या ग्रुपचा. सकाळीच कळतं तर डाय नसतं का केलं आत्तापर्यंत? आता पटकन निदान शॅम्पू तरी करते केसांना! 

थोडा वेळ मेलं व्हाट्स अँप बंद राहिलं तर एवढं सगळं रामायण झालं! सगळे महत्वाचे मेसेज आज सकाळीच यायचे होते मेले! माझ्याच सोबत असं होतं नेहमी! जाऊ दे मेलं! अन अहो, प्लीssssज माझ्या त्या गुलाबी कुर्त्याला जरा प्रेस करून देता का? मी त्यात वीस वर्षांनी तरी तरुण दिसते असं तुम्हीच म्हणाले होते ना त्यादिवशी! अहो जरा जळवते न बालमैत्रिणींना! फेसबुक वरची माझी प्रोफाइल बघूनच ह्या साऱ्या मैत्रिणी आधीच तर जळतात माझ्यावर! माझ्याच एका खासम खास मैत्रिणीने सांगितलं होतं सगळळं, मागे एकदा भेटली तेव्हा. बरं ते जाऊ दे . तुम्ही आधी तेवढं झोमॅटो अन माझ्या कुर्त्याचं बघा बरं प्लीज. ही आलेच मी पटकन शॅम्पू करून! 

 ©मधुमती वऱ्हाडपांडे

Friday, January 14, 2022

बदामी

At Badami caves -Agastya Lake behind

’बदामी’च्या इटुकल्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊन गाडीसाठी थांबलो तेव्हा फार काही वेगळं दिसत नव्हतं. ये कहाँ आ गये हम! असं वाटेतो तिथून रिसॉर्टकडे जाणारा रस्ता लागला तेव्हा मात्र दुतर्फा हिरवीकंचं भातशेतं आणि त्यामागे महाकाय बदामी लालसर तपकिरी रंगाच्या दगड- शिळा- पहाडांच्या रांगा दिसायला लागल्या. पुढे पट्टदकल - ऐहोळे मार्गे हम्पीपर्यंत या बदामी दगड- शिळा- पहाडांच्या राशींनी आणि त्यातूनच साकार झालेल्या अद्भुत लेण्या, गूढ गुहा, देवादिकांच्या रेखीव मूर्ती, नजर पोचेल तिथवर विलक्षण कोरीव नक्षीदार कारागिरीने मढलेली गोपुरं, वेगवेगळ्या शिल्पशैलीत घडवलेल्या देवळा-मंदिरांनी सगळा परिसर कवेत घेतला आहे. लोककथा आणि पुराणकथांमध्ये उल्लेख असलेल्या काळाचे पडसाद इथल्या कलाकृतींवर उमटले आहेत. इतिहासाचे दाखले जागोजागी आहेत. हा परिसर वैभवशाली हिंदू साम्राज्याच्या गौरवास्पद खुणा मिरवतो त्याचबरोबर आक्रमकांनी केलेल्या विध्वंसाच्या क्लेशदायी जखमा देखील. 

इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वास्तुरचना तसेच वेगवेगळ्या कलांमध्ये रस असणार्‍य़ांनी, स्वत:मध्ये रमायला आवडणार्‍यांनी इथे आवर्जून यावं. टूर म्हणजे डान्स, मस्ती, कल्लाच हवा अशी अपेक्षा असणारी, ’तुटक्या कळसात- दगड धोंड्यात काय पाहायचं’ किंवा ’बापरे अजून किती चालायचंय?’ म्हणणारी मंडळी, ये आपके लिए नही है। मैत्रिणींसह केलेली मागची गोवा ट्रीप म्हणजे आतून बाहेरचा प्रवास होता. ह्म्पी-बदामी हा बाहेरुन आतला प्रवास आहे. गोव्याहून आल्यावर काही दिवस आम्ही मनातल्या मनात नुसते नाचत होतो. हम्पीहून आल्यावर मूक झालो आहोत. अर्थात निघताना आमचा ’लेट्स एक्स्प्लोर’ एवढाच साधा सोपा उद्देश होता. बाकी मिळालं ते सगळं बोनस.

Staircases between caves

राहण्यासाठी ’होम स्टे’चा पर्याय निवडला तर स्थानिक संस्कृतीशी, भूभागाशी आपण जास्त चांगले कनेक्ट होऊ शकतो पण त्यासाठी निवांत मुक्काम हवा. खायला जगभरातले पदार्थ उपलब्ध असले तरी तिथल्या लुसलुशीत ’आप्पे’ आणि खरपूस ’अक्की रोटी’ ची चव काही वेगळीच. बिसीबेळी भात खायचा तेवढा राहिला. तिथल्या उपाहारगृहात विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे जपानी चहापानात वापरतात तशी बुटकी लांब टेबल्स. बाजूला मस्तपैकी मांडी घालून बसायचं. ताटलीत हिरवंगार तुकतुकीत केळीचं पान ठेवून ते वाढणार. दुपारच्या जेवणात आम्ही शक्यतो स्थानिक पदार्थांना प्राधान्य द्यायचो. कर्नाटकमधली स्वच्छता आणि शासनाच्या पर्यटन विभागाची कामगिरी आजही चोख आहे. प्रत्येक महत्वाच्या स्पॉटसाठी व्यवस्थित पार्किंग आणि प्रसाधनगृहाची सोय. माहितीचे आवश्यकतेनुसार फलक. आधीच्या कूर्ग-उटी-म्हैसूर ट्रीपमध्येही ही वैशिष्ट्य जाणवली होतीच. 

Astonishing carving in the caves

तर फ्रेश होऊन आम्ही बदामी दर्शन करायला निघालो. बदामी, पूर्वी वातापी म्हणून ओळखले जाई. कर्नाटक राज्यातल्या बागलकोट जिल्ह्यातलं बदामी इ.स. 540 ते 757 पर्यंत चालुक्य राजवटीचं राजधानीचं शहर होतं. चालुक्य वंशातील पुलकेशीन (पहिला) याने ही राजधानी स्थापन केली. त्याचा मुलगा कीर्तिवर्मन (पहिला) याने पुढे तिथे गुहा, मंदिरं निर्मिली. पल्लवांनी इ.स 642 मध्ये बदामी काबीज केले परंतु पुढे इ.स 654 ला पुलकेशिन (द्वितीय)चा मुलगा विक्रमादित्य (पहिला) याने त्यांचा पराभव केला. कंटाळू नका. सोळाव्या लुईइतकं लांबलचक प्रकरण नाही हे. त्यानंतर बदामीवर राष्ट्रकूटांनी राज्य केलं व नंतर त्याचा विजयनगर साम्राज्यात समावेश झाला. पुढे मुघल आक्रमणापासून इंग्रजी अंमलापर्यंत शहराची बरीचशी वाताहत झाली. एके काळच्या राजधानीच्या राजस खुणा मात्र बदामीत जागोजागी आहेत. 

बदामीत विशेष काय बघायचं - एकदा तिथल्या बदामी केव्हज जवळ गाडी पार्क केली की म्युझीयम, अगस्त्य लेक, भूतनाथ मंदिर आणि बदामी किल्ला सगळं जवळपास आहे आणि पायी चालत पाहायचं आहे. बदामीत माकडांचा सुळसुळाट आहे. केव्ह समोरच्या परिसरात गाई, बकर्‍या, क्वचित डुकरं आणि चपळ माकडं पर्यटकांसह गुण्यागोविंदाने नांदत असतात. अनघाची पर्स एका माकडाने ओढली, दुसर्‍याने पाडली, तोवर आम्ही त्यांच्या वरताण कलकलाट करुन ती ताब्यात घेतली. बदामीतली बाकी सर्व स्थळं मग आम्ही पर्सला मिठी मारुन दुसरा डोळा माकडांवर ठेवूनच पाहिली. हा माकडांचाच प्रदेश आहे पण प्रत्येक ठिकाणच्या माकडांचं वागणं मात्र वेगळं आहे. आपण पुणेरी असे, नागपुरचे तसे म्हणतो तसंच काहीसं. 

Badami Caves

हं तर आपण बदामी केव्हज चढत होतो - अवाढव्य बदामी दगडात कोरलेली ही ४ लेणी आहेत. पहिली आणि दुसरी लेणी उत्तर दख्खन शैलीत कोरली आहे तर तिसरी लेणी नागरा आणि द्रविड शैलीत. पहिली तीन लेणी हिंदू प्रतीकं दर्शवतात तर चौथी लेणी जैनांची आहे. पायवाटेवरचे दगड राखाडी आहेत. इथलं कोरीव काम अत्यंत रेखीव आहे आणि विशेष म्हणजे प्रमुख शिल्पकारांचा- कारागिरांच्या नावाचाही तिथे उल्लेख आहे. अभंगातल्या तुका म्हणे, नामा म्हणे सारखी शिल्पकारांची ’सिग्नेचर’ तिथे पाहून फार बरं वाटलं. पहिली केव्ह काहीशी अनाकर्षक वाटली. मग वर वर एक एक केव्ह पाहत जाऊ लागलो तसतसं त्यातली विलक्षण कलाकारी, त्या दगडाचा थंडगार स्पर्श, तिथून अद्भुत दिसणारा अगस्त्य लेक हे सगळं फारच विलोभनीय वाटू लागलं. केव्ह उतरल्यावर समोरच एक दगडी लालसर कोरीव खांबांवर राखाडी पांढरा घुमट असलेली मशीद दिसली. अशा चमत्कारिक रचनेवरुन तो घुमट कळस उद्ध्वस्त करून बांधला असावा हे उघडच आहे. अशा विचित्र विसंगत वास्तू पाहून वाईट वाटतं. मशिदीजवळून पुढे लहान गल्ल्या आणि बकर्‍यांमधून वाट काढत आम्ही म्युझियमपाशी पोचलो. वाटेत एक सुघड तीन कळसांचं सुरेख मंदिर उन्हात चमकत होतं. त्याच्या अगदी समोरच्या घरातली बाई तिकडे पाठ करुन लाल मिरच्या सुकवायला पसरत होती. अभिषेक ऐश्वर्याच्या सौंदर्याचं रोज रोज काय कौतुक करणार म्हणा ! तसंही कलाबिला या सगळ्या भरल्या पोटी आणि फावल्या वेळात करायच्या गोष्टी असतात.

म्युझियम अगदी आखीव नेटकं आहे. मध्ये भटक्या आदिमानवापासून उत्क्रांत होत गेलेल्या आजच्या माणसाचा परामर्श उत्खननातून सापडलेल्या त्याच्या प्रगती आणि अधोगतीच्या खुणांची मांडणी करून घेण्यात आला आहे. तत्कालिन नाणी, हत्यारं, वस्तू अंदाजे त्या त्या कालखंडाचा उल्लेख करुन व्यवस्थित काचेआड ठेवलेल्या आहेत. त्यासह अनेक सुस्थितीतील मूर्ती, काही खंडलेल्या मूर्ती ,स्थापत्यशैलींचे विविध नमुने तिथे ठेवलेले आहेत. तीर्थंकरांच्या एका सुबक मूर्तीपाशी दोनच साध्या ओळी लिहिल्या होत्या. हे जग-भवसागर म्हणजे तीर्थ, यातून पार होऊन किनार्‍यावर (मोक्षाप्रत) नेतो तो तीर्थंकर. 

Badami fort Entrance

म्युझीयमच्या समोरच दुपारच्या उन्हात चमकणारा अगस्त्य लेक आणि उजवीकडे बदामी किल्ल्याचं प्रवेशद्वार. दारातल्या उंच दगडी पायर्‍यांवर ’वेडा राघू’ बघत विसावलो. मग किल्ला चढून एक एक कातळ ओलांडत पार वरच्या देवळापर्यंत गेलो. तिथून आता मघाशी पाहिलेल्या केव्हज समोर दिसत होत्या साधारण किल्ल्याइतक्याच उंचीवर. खाली प्रवेशापाशी बसलेले २ चौकीदार सोडले तर किल्ल्यावर फक्त आम्हीच होतो. ओमायक्रॉनमुळे असेल किंवा नाताळच्या सुट्ट्या संपल्यामुळे असेल पर्यटकांची संख्या रोडावली होती. पुलकेशीनने बांधलेल्या या किल्ल्यावर मध्ये आणि अगदी वर असे दोन भव्य आणि आता काहीसे भग्न शिवालय आहेत. त्याला तिकीट विक्रेता आप्पर एन लोव्वर पॉइंट म्हणत होता.
Straightening huge rocks at Badami fort

आम्हाला लव्हर पॉईंट ऐकू आले. तिथे असताना अचानक लालतोंड्या मोठाल्या माकडांच्या आपसात हाणामार्‍या सुरु झाल्या. मी कड्यावरच्या पट्टीवर उभी असताना त्यापैकी एकाने जवळ धपकन उडी मारली. आम्ही दोघेही एकमेकांना घाबरुन त्या पट्टीवर खो खो खेळू लागलो, शेवटी मी कशीबशी खाली उडी मारली. दरीत नव्हे. त्यांचे चीत्कार ऐकून इतकी सटारली की आम्ही आप्पर पॉईंटकडे जायचा विचार बदलून वेगात खाली उतरलो. 

Bhutnath Temple with Agastya Lake

समोरच्या अगस्त्य लेकला वळसा घालून भूतनाथ मंदिराकडे गेलो. तळ्याकाठी स्तब्ध उभं असलेलं हे निर्जन शांत सुघड मंदिर बदामीमधलं सर्वात देखणं दृश्य वाटलं मला. इ.स. ७००-७२५ च्या सुमारास हे बांधण्यात आलं. आत दगडी घडीव शिवलिंग आणि अश्राप चेहर्‍याचा सावळा काटकुळा पुजारी. या मंदिराच्या सभामंडपातून दिसणारी लगतची लहानशी मंदिरं, डावीकडे केव्ह, उजवीकडे किल्ला आणि समोर संथ तळ. हे तळं निसर्गनिर्मित आहे. अगस्ती ऋषींच्या नावावरुन त्याचं हे नाव पडलंय. विष्णूपत्नी भूदेवी व लक्ष्मीचा वास असल्याच्या आणि इथल्या पवित्र पाण्याच्या प्राशनाने आजार बरे होत असल्याच्या कथा सांगितल्या जातात. सभामंडपात आम्ही बराच वेळ बसून राहिलो. पोटातले कावळे फारच ओरडू लागल्यावर नाईलाजाने निघालो. पुन्हा त्या बकर्‍या, गल्ल्या ओलांडत पार्किंगपाशी पोचलो. 

Local Irkal Saree shop

रिसॉर्टच्या मॅनेजरने त्याच्या (किंवा कमिशन असलेल्या) इरकली साड्य़ांच्या दुकानाचे कार्ड सकाळीच देऊन ठेवले होते. संध्याकाळी तयार होऊन आम्ही आधी बाणशंकरी देवीला गेलो. टिपिकल दक्षिण भारतीय देवस्थान. सकाळी कदाचित इथे खूप प्रसन्न वाटत असावं. आता मात्र बाहेरची दुकानं शटर ओढलेली. एक जोडपं दर्शनाला आलेलं. बाईच्या सावळ्या चेहर्‍यावर कसलेही भाव नाहीत. केसात तिथल्या पद्धतीनुसार भरगच्च गजरे. पुरुष हातात नारळ धरून मख्ख उभा. मग अजून काही नातलग त्यांना चिकटून भराभर फोटो काढू लागले. बाकी शांतता. आत भगभगीत तरीही मलूल वाटणारे पिवळे दिवे. थंडगार फरशी. आडव्या बारच्या सहाय्याने तयार केलेली दर्शनबारी वगैरे. दगडी प्रवेशद्वाराला दिलेले कृत्रिम भडक रंग पाहून आमचा उत्साह बराचसा मावळला. शहाळं प्यायल्याने आणि इरकल खरेदीच्या आठवणीने तो पुन्हा उफाळून आला. परतीच्या रस्त्यावरच्या साडीच्या त्या दुकानात एकदम ८ बायका शिरलेल्या पाहून विक्रेती हरखली. तिने इरकल साड्यांची रास लावली पण तेच ते हिरवे, जांभळे रंग पाहून आम्ही बॅकसीटवर आलो. दुकानभर पसरलेल्या शेकडो साड्यांच्या ढिगांमध्ये मुंडकं घालून मनासारख्या २ साड्या खरेदी करुन अखेर मीनल आणि मंजिरीने आमची लाज राखली. परतलो आणि रिसॉर्टच्या लॉनवर हुडहुडत्या थंडीत अखंड गप्पांमध्ये वेळ मिळेल तेवढं जेवलो. बदामीतला मुक्काम सकाळी न्याहारीनंतर संपणार होता. दुसर्‍या दिवशी पट्टदकल आणि ऐहोळे ही दोन गावं बघायची होती. हम्पीबद्दलची उत्सुकता तर आता खूपच वाढली होती. 


Thursday, January 13, 2022

आपलं तर बुवा असं आहे

 "मम्मी, तुम्ही  आणि बॉईल अंड खाणार? मला तर हे माहीतच नव्हतं, म्हणजे शॉकिंग आहे माझ्यासाठी---"

"अरे बेटा, मला चालतं, आय मीन, आवडतं मला---"
"पण कधीपासून?"---15 दिवसांपूर्वी दोन नंबर च्या दिराकडे गेलो होतो आम्ही उभयता जेवायला ,तर पुतण्या मला विचारत होता. प्रचंड नवल होतं त्याच्या विचारण्यात आणि ते साहजिकच होतं अर्थात. मला "नॉन-व्हेज" चालत नाही, त्याचा वासही सहन होत नाही, इतकंच काय; मी घरी सहसा करतच नाही हे घरात सगळ्यांनाच माहीत आहे.मला इतक्या दिवसात  चिकन आणि मटण ह्यातला फरक देखील कळलेला नाहीये, नाही मी तो जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या घरात मी न माझी मोठी लेक सोडली तर सगळेच "नॉन-व्हेज" चे प्रचंड चाहते. मला मात्र तो  प्रकारच आवडत नाही, बुद्धीला त्याहून पटत नाही.  निव्वळ दुष्टपणा वाटतो मला तो. किळस येते, त्याहीपेक्षा त्या "मुक्या प्राण्यांची "दया येते. माझ्या माहेरी, खास कर आमच्या घरात कुणीही खात नसत. (आपण नाथ पंथी आहोत असे आई म्हणायची)माझा मोठा भाऊ जो आता 70 वर्षाचा आहे; पण आजही त्याच्या समोर कुणी विषय जरी काढला तरी त्याला ओमीटिंग होते.😇🤦‍♀️😊 असो.

मला चालत नसल्याने ह्यांना , मुलांना  नॉन व्हेज खायची इच्छा झालीच तर आतापर्यंत हॉटेलमध्ये च बनवून घरी येत असे किंवा मोठ्या घरी कुणाकडेही बोलावणे असे(ह्या दोन-चार वर्षात तेही कमी झाले अर्थात) किंवा आमचे "सुभाष-वस्ताद"😉 माहीर आहेतच. मुख्य म्हणजे ते मसाला देखील (भाजीची ग्रेव्ही) इतका उत्तम बनवतात, की मला काहीच करावे लागत नाही. त्या बाबतीत मी किती भाग्यवान आहे ते माझ्या बऱ्याच मैत्रिणींना माहीत आहे.😃 असो. मूळ मुद्दा असा की माझ्या काही काही आवडी-निवडी अगदी अचानकच बदलल्या.🤔 आता हे बॉईल अंड्याच्याच बाबतीत सांगायचं झालं तर 3 वर्षांपूर्वी माझा अपघात झाला होता त्यावेळी डॉक्टरांनी मला पनीर, अंडी असे काही  स्पेशली खायला सांगितलं होतं. पण तेव्हाही मी फारसं मनावर घेतलं नव्हतं.; पण मागच्या लॉक डाउन मध्ये समीर देखील बराच काळ घरी होता ,त्याच्या सोबतीने म्हणा किंवा त्याने आग्रह केल्याने म्हणा, मी खायला सुरुवात केली आणि मला चक्क ते आवडायला लागले.🙄😂 ब्रेड आम्लेट आणि भुर्जी पेक्षाही  हे असे बॉईल केलेले अंडे छान तिखट मीठ टाकून खाण्यात मला मजा वाटू लागली.त्यात परवाच वाचले की डाएटिशीयन खुशबू शर्मा म्हणते की अंडी खाल्ल्याने, विशेषतः हिवाळ्यात, वजन बिलकुल वाढत नाही🤪 तसे आमची मीनल देखील आम्हाला योग्य आणि आम्हाला पूरक, पचनी पडेल असा सल्ला देतच असते, वेळोवेळी.😊 असो. "पाणी-पुरीच्या" बाबतीतही हाच प्रकार घडला. म्हणजे वयाच्या 50 वर्षांपर्यंत पाणी पुरी मला अजिबातच आवडत नव्हती. मी चव देखील घेऊन बघितली नव्हती; पण जेव्हा आम्ही दोघे आणि ह्यांचा नागपूरचा मित्र आणि त्याची बायको असे ती दोघे काश्मीर टूर वर गेलो होतो त्यावेळी मला ह्यांच्या त्या मित्राने जबरदस्ती पाणी-पुरी खायला लावली आणि काय आश्चर्य राव---🤔मला तेव्हापासून ती चक्क आवडायला लागली की----इतक्या सडनली माणसाच्या आवडी निवडी अशा बदलतात? बदलू शकतात? सवयीचं एकवेळ समजू शकतो आपण, ती बदलता येते; पण आवड-निवड ? "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही" किंवा "सुंभ  जळाला तरी पिळ काही जात नाही" अथवा "स्वभावाला औषध नसते,हेच खरे"--  ---अशा प्रकारची वाक्ये नेहमीच वाचनात येतात, कानावर पडत असतात. परिस्थिती नुसार, वयानुसार स्वभाव बदलतो माणसाचा, सवयी देखील बदलतात, कधी कधी तडजोड म्हणूनही---- पण आवड? आणि आवड आणि सवय यात नक्कीच अंतर आहे. बऱ्याचशा गोष्टींची इतकी सवय होऊन जाते की आवड नसतांना देखील त्या कराव्या लागतात किंवा केल्याच जातात. आता बायकांचीच गोष्ट पहा ना---घरकाम, म्हणजे घरातली सगळीच कामे आम्हाला खूप आवडतात असे नाही(मला तर बरीचशी---बऱ्यापैकी आवडतच नाहीत😩) तरी करावीच लागतात ना? तो सवयीचा भाग झाला. आणि "परिवर्तन" हा माणसाचा गुणधर्म मानला तरी मूळच्या आवडी,निवडी अशा एकाएकी बदलत नसाव्यात, असे माझे तरी प्रामाणिक मत आहे. मग माझ्या बाबतीत जे घडले त्याला काय म्हणता येईल?

बरं चॉकलेट च्या बाबतीतही सेम हाच प्रकार---- लहानपणी (माझ्या अर्थात) देखील कधी आवडीने चॉकलेट खाल्ल्याचे, त्यासाठी हट्ट केल्याचे आठवत नाही. सुरुवातीला तर "रावळगाव" शिवाय इतर कुठली चॉकलेट माहीतही नव्हती आणि कॅडबरी ची क्रेझ नव्हती. नंतर नंतर फार झालंच तर "एकलेयर्स वगैरे" ---पण कॅडबरी चे फारसे आकर्षण वाटलेच नाही कधी आणि इच्छाही झाली नाही;पण साधारण 6/7 वर्षांपूर्वी आम्ही म्हणजे मैत्रिणी तिरुपती बालाजी ला गेलो होतो, तेव्हा सीमा ने "होम मेड" चॉकलेट्स सोबत घेतले होते आणि ते खाल्ल्यानंतर मला चॉकलेट्स पण आवडायला लागलीत, अचानकच.🤪😋😋 परवा तर मी चक्क समीरला म्हटले, अरे बेटा, चॉकलेट खायची खूप इच्छा होतेय रे----"😇(डोहाळे लागल्यासारखी इच्छा झाली🤭). काय जादू आहे न कळे----
शाळा कॉलेजमध्ये असतांना मी फार भिडस्त स्वभावाची होती, अबोल होती, कुणाला पट्कन उत्तर देणे मला जमत नव्हते; आता मात्र मला खूप बोलायला लागते,तेही सरळ बोलण्यापेक्षा "टांग खेचायला" मजा येते, सतत खूप जणांच्या, विशेषतः मैत्रिणींच्या घोळक्यात राहायला आवडते---- हा बदल झाला स्वभावातला, सवयीतला---; पण आवडीनिवडी कशा काही बाबतीत अचानक बदलल्या, ते कोडे काही सुटत नाहीये.☺️

लहानपणीच्या खूप साऱ्या आवडी-निवडी मोठेपणी बदलतात. अगदी टोकाचा बदल देखील होत असतो. लहान असतांना जादूच्या, चमत्काराच्या, सुरस गोष्टी वाचायला, ऐकायला आवडतात,भूत, राक्षस म्हटले की प्रचंड भीती वाटते, पण तेच मोठं झाल्यानंतर वाचनाच्या बाबतीत प्रचंड बदल होतो, "चॉईस" मध्ये. मोठेपणी माणसाच्याच अंगात भुतांचा न राक्षसांचा संचार होतो, त्यामुळे ते कुणालाच घाबरत नाहीत. परी, राजकन्या, राजकुमार ह्या काल्पनिक विश्वात, आयुष्याचे टक्के टोणपे खाल्लेला माणूस कसा रमेल? बालवयात "ढुंगी" शब्द मजेशीर वाटतो; पण तेच मोठं झाल्यावर "ढुंगण  धुवायची तरी अक्कल आलीये का?"🤭😇 असे कुणी म्हटलेले आवडेल काय? 
थोडक्यात काय तर लहानाचे मोठे होत असताना आवडी निवडी बदलणे हे अगदीच स्वाभाविक आहे; पण वयाच्या ह्या टप्प्यावर म्हणजे आयुष्याची इतकी वर्षे पार केल्यानंतर अचानकच जेव्हा आपल्या आवडी निवडीत आपल्याला बदल जाणवतो, तेव्हा साहजिकच नवल वाटल्यावाचून रहात नाही, जे मला वाटते आहे.🤔 तुम्ही सांगू शकाल काही?🙏

तुमचा अनुभव?

माणिक

सुडोकू

    


रोज सकाळी वर्तमानपत्र (लोकसत्ता) आलं की, आधी ठळक बातम्या, मग अग्रलेखावर नजर, खूप इंटरेस्टींग विषय असेल तर लगेच वाचायचा अग्रलेख, नाहीतर सवडीने! आणि मग वळायचे सुडोकूकडे!

               रोज सकाळी आकड्यांशी थोडफार खेळलं की मला बरं वाटतं! का कुणास ठाऊक! असो. कधीकधी पटकन सोडवून होतं, तर काही वेळा डोक्याचा अगदी भुगा करतं हे सुडोकू! पण जर पहिल्या फटक्यात सोडवलं गेलं, तर इतका आनंद होतो म्हणून सांगू, दिवसच छान जातो मग राव! 😀
            अरे हो! सुडोकू विषयी थोडेसे.....
          काही वर्षांपासून मी सुडोकू सोडवत आहे. आधी मोबाईलवर थोडे सोपे सुडोकू सोडवून, आता पेपर मधले नियमीत सोडवते. बेसिक आयडिया एकदा समजली, की झालं.
     त्यात एक मोठा चौकोन असतो. आणि आत ३×३ असे नऊ छोटे चौकोन असतात. त्या प्रत्येक छोट्या चौकोनात, आणखीन नऊ छोटे चौकोन असतात. आता 1 ते 9 अंक त्यात असे बसवायचे की, कुठल्याही उभ्या-आडव्या (row and column)  रेषेमध्ये अंक रिपीट व्हायला नको. तसेच प्रत्येक छोट्या चौकोनात पण अंक रिपीट होऊ द्यायचा नाही.

       आज सकाळी सुडोकू सोडवताना माझ्या मनात विचार आला की, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचाही असाच एक चौकोन असतो.एक मोठा चौकोन !लहानपणी आई वडिलांचे घर, मग नवऱ्याचं घर! आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांमध्ये तर अगदी सुरक्षित,ऊबदार असा मोठा चौकोन!आतले छोटे-छोटे चौकोन , म्हणजे शाळा, कॉलेज, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, नोकरी, व्यवसाय, राजकारण, कला इ.इ. आयुष्य पुढे पुढे जातं तसं, छोट्या चौकोनामध्ये हे सगळे अंक हळू हळू विराजमान होऊ लागतात. कधी कधी अगदी सहजपणे तर कधी थोड्या संघर्षानंतर! उभ्या-आडव्या रेषा, एक ते नऊ अंकाची मांडणी , यात आपण गुंतत जातो. जसजसे आपण पुढे जातो, तसे आपल्या लक्षात येते की आपल्याला वाटला तेवढा हा उभ्या-आडव्या रेषांचा खेळ सोपा नाहीये. मग आपण आपल्या परीने प्रयत्न करतो, त्यात आपल्याला हवे तसे अंक फिट करण्याचा !जेणेकरून एक ते नऊ अंक नेमके भरले जावेत! कधी सौजन्याने ,कधी तडजोडीने,कधी वैतागून ,कधी जिद्दीने, कधी  हुशारीने आपले प्रयत्न सुरूच रहातात.

           पण अचानक एखाददिवशीचं सुडोकू इतकं क्लिष्ट येतं की मती गुंग करून टाकतं! कुठल्याच मार्गाने ते सुटत नाही.  आपण आधी आश्चर्यचकित होतो, अरे ,एवढं सोपं आपल्याला जमत नाही! Accept करायला मन तयार होत नाही. कधी आपण त्रागा करून घेतो, कधी खूप निराश होतो ,का?का?( का सुटत नाही ?) याचा खूप विचार करतो .मग थोडं शांत झाल्यावर लक्षात येतं की ,अरे ,आपण एकाच ठिकाणी थांबलोय खूप वेळ!जरा वेगळा विचार करूया ना!
      आणि मग अचानक १,२,३,४....... सगळेजण भराभर आपापल्या जागी जाऊन बसतात. अरेच्चा! असं होतं होय? सुटलं की!  मिळालं सुडोकूचं उत्तर! (उगाच एवढा वेळ आणि एनर्जी वाया घालवली.)
        काहीवेळा मात्र सर्व युक्त्या, क्लुप्त्या वापरूनही,जेव्हा वर्तमानपत्रातलं,आयुष्यातलं सुडोकू सुटत नाही,तेव्हा मला वाटतं, चक्क सोडून द्यावं!

     Because,every tomorrow brings you a new sudoku!
So hope and wait for a better sudoku!
Anyways I love sudoku!