Friday, October 15, 2021

ते आणि आपण

 गेल्या काही लेखांमध्ये अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया परिसरातली स्थळं आणि घटनांचं धावतं वर्णन होतं. अजून थोडं बाकी आहेच. मन घट्ट करून ठेवा. आज मात्र फक्त काही तुलनात्मक नोंदींबद्दल.

दरम्यान एक सुंदर कॅथेड्रल पाहिले होते. गाभारा म्हणता येईल असा मुख्य भाग भव्य होता, छत मान दुखेल इतके उंच, सुरेख आरस्पानी कोरीव काम. तिथली प्रकाशयोजना तर खिळवून ठेवणारी होती. तळघरात Bishop धर्मगुरुंचे बाप्तीस्मा, लग्न, अंत्यविधी इ. प्रसंगानुसार वेगवेगळे पोशाख काचेच्या कपाटात टांगलेले दिसत होते. जवळच महिला प्रसाधनगृह होते. तिथे चक्क सॅनिटरी नॅपकीन्स ठेवलेले होते. कॅथेड्रलमध्ये !! मासिक धर्म व धर्म याची गल्लत न करता त्याचा इतका शांतपणे स्वीकार आपल्याकडे होईल का! गोव्याला मंगेशीच्या देवळाबाहेर ’अशा’ महिलांनी प्रवेश करु नये, असे स्पष्ट लिहिले आहे. अनेक धार्मिक ठिकाणी असे लिहिलेले असते किंवा अध्याहृत असते. जिला त्रास होतो, आराम हवा आहे ती अशा वेळी मंदिरात काय कुठेच जाणार नाही, जाऊही नये पण जी खास तिथे दर्शनाला आली आहे तिला या कारणाने दर्शन नाकारणे मग ते ’देवी’चे देऊळ असले तरी, हे सगळे अतार्किक तर आहेच पण दुर्दैवी आहे. ती सूचना वाचताना मला हे कॅथेड्रल पुन्हा आठवले होते.

मी आता सौ चिकन खाके अकोल्याला येऊन शाकाहारी झालेली बिल्ली असल्याने रोजचे जेवण ही एक दिव्य परिक्षा असे. आपल्याकडे पाहुण्याला तो हात आडवा धरुन गयावया करेतो आग्रह केला तरच आपण चांगले यजमान असल्याचं सिद्ध होतं असं आपण मानतो, त्यात अर्थात भारतीय आतिथ्यशीलतेचा भाग असतो हे खरंय. इकडे आम्हाला किचनमध्ये कुठे काय आहे ते होस्ट दाखवून देत. गोदरेज कपाटाहून मोठ्या फ्रीजमध्ये दूध, लोणी, जॅम, चीज, भाज्या, ज्यूसेस आणि सॉसेस हे किमान असायचेच. घरात पाव आणि तांदूळ असत. त्यामुळे पोळी जरी मिळत नसली तरी आम्ही संशोधन करुन बरेच इंडोवेस्टर्न खाद्यप्रकार शोधून काढले. बाहेर गेलो की मात्र आमची विशेषत: माझी पंचाईत होई. मोठ्या क्लब मिटिंग असल्या की आपल्या अ‍ॅवॉर्ड फंक्शन सारखी गोल टेबलांची रचना असे. बोके आणि मांजरींना सुटाबुटात बसवले तर जसे दिसेल तशी मंडळी आजूबाजूला असत. ते खात असलेले पदार्थ अनोळखी असत. एकदा व्हेज प्लॅटर मागवली तर बशीत हे माँ माताजी!! उकडलेली भेंडी आणि परतलेली अळणी पानकोबी आली. बरं हॉटेलमधला मेनू पण इतक्या फॅशनेबल शब्दात लिहिलेला असे की त्यावरुन आत काय घातलंय याचा अंदाज येत नसे. धिप्पाड सहा फुटी वेटरशी एकमेकांना समजेल अशा इंग्लीशमधली चर्चा निष्फळ ठरली तर ज्यूस मदतीला येई. हॉटेलमध्ये आपल्याकडच्यासारखं पाणी आणून ठेवलेलं नसे. कोणतंही पेय इतकं काठोकाठ भरुन देत की आम्ही ’खाली ग्लास’ मागवून ते शेअर करत असू पण पानात काही टाकत नसू. त्यांना हे विचित्र वाटे कारण तिकडे सहसा आई पण मुलाचे उष्टे खात नाही. एकंदर ’टाकणे’ हा प्रकार तिकडे अगदी सर्वसामान्य आहे. टाकणं हा अन्नब्रह्माचा अपमान आहे मग बिल कुणी का देईना हे आम्ही त्यांना समजावून सांगत असू.  

व्हिक्टर्स कॅफे नामक १०० वर्षांची परंपरा असलेल्या एका आगळ्यावेगळ्या उपाहारगृहात आम्ही गेलो होतो. आम्ही व फिली क्लबचे ५,६ जण मिळून. चपळ हालचाली करणारे चुणचुणीत वेटर आणि वेट्रेस अगदी तरुण विद्यार्थी असावेत असं वाटत होतं. अचानक घंटा घणघणली. दरवाज्यात उभ्या असलेल्या वेट्रेसने खड्या आवाजात एक छोटीशी कथा सांगितली. फ्रेंच राजकन्या आणि तिचं दुभंगलेलं हृदय असं काही त्यात होतं. हे सांगून होताच आम्ही दचकलो इतक्या तार स्वरात ती गाऊ लागली. आपल्या संगीतनाटकांमधल्या पदांसारखा हा ओपेरावजा गायनप्रकार होता. ती वेट्रेस त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत होती असे कळले. असे अनेक होतकरु कलाकार तिथे गायक कम वेटर म्हणून काम करतात आणि आपली कला सादर करतात. हेच या कॅफेचं वैशिष्ट्य. इथला अनुभव म्हणे त्यांच्या कलाविश्वातील करियरमधला मह्त्वाचा टप्पा मानला जातो. तसंही तिथे कामाचा आणि खानदान की इज्जतचा काही संबंध नसतो. एका उच्चभ्रू जोडप्याने तर आम्हाला त्यांची मुलगी सकाळचं कॉलेज आटोपल्यावर संध्याकाळी जिथे वेट्रेस म्हणून काम करायची त्या रेस्टॉरंटला आवर्जून जेवायला नेलं होतं. तर हे गायन प्रकरण आटोपल्यावर आमच्या ग्रुपमधल्या एकाचा वाढदिवस केक मागवून आम्ही साजरा केला आणि ’बार बार दिन ये आये’ हे आपलं युगानुयुगाचं कंपलसरी बड्डेसॉंग कोरस मध्ये म्हटलं. उपस्थितांसाठी अगम्य असणार्‍या या गाण्यात शेवटी ’हॅपी बर्थडे टू यू’ हा भाग इंग्लीशमध्ये असल्याने सर्वांना कळला आणि अख्ख्या हॉटेलमधल्या मंडळींनी टाळ्या पिटून ग्लासेस उंचावून त्याला विश केलं. 

एका ग्रामपंचायतीला (नाव टाळते आहे) भेट दिली असताना तिथल्या समुपदेशिकेला गावातल्या सोयी आणि समस्यांबद्द्ल विचारले. एक तर अशी पोस्ट तिथे असणं हे मला नवलाईचं वाटलं. आपल्याकडच्या पंचायत समिती किंवा तत्सम कचेर्‍यात गेल्यावर आपण अगदी अडाणी असल्याचं फीलिंग येतं. इकडे व्यवस्थित पाट्या, हसरी देखणी स्वागतिका. छताला झुलणारं एकही जाळं नाही, मध्ययुगीन काळातले वाटणारे निराशावादी पंखे नाहीत. फायलींवर धूळ असायला फायलीच नाहीत कारण सगळीकडे चकचकीत कपाटं. हा, तर त्या समुपदेशिकेला त्या पोस्टींगचं कारण विचारलं. ती म्हणाली, १२-१३ वर्षांच्या कुमारी माता ज्याला ते किड्स प्रेग्नंसी म्हणतात त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मोठ्या हॉस्पीटलमध्ये प्रसूतीचा खर्च प्रचंड. शाळेतल्या मुलींना लैंगिक शिक्षण देण्याऐवजी गर्भनिरोधक वाटावी लागणं, शाळेत सोबत कोणी हत्यार, बंदूक आणलेली नाही ना हे तपासण्यासाठी मेटल डिटेक्टर बसवावे लागणं ही तिथली शोकांतिका ऐकून धस्स झालं. योग्य अयोग्य याची निवड करण्याची समज वाढवण्याऐवजी ते तात्पुरती मलमपट्टी करतायत असं जाणवलं. नंतर सॅल्व्हेशन आर्मी (पुनर्वसन) केंद्र पाहिलं. तारवटलेल्या लालसर डोळ्यांचे, भकास चेहर्‍याचे गर्दुल्ले किंवा पियक्कड तिथे टीव्हीवर चमत्कारिक सिनेमा पाहत कसेही वेडेवाकडे बसले होते. कर्कश्य संगीत सुरु होतं. चित्रविचित्र कपडे, पिळापिळाच्या केशरचना, बहुतेक सगळे ब्लॅक. संसार टिकण्याचं प्रमाण कमी, पोरांचं लेंढार सांभाळत एकटं राहिलेल्या नशेच्या आहारी गेलेल्या, डिप्रेशनमधल्या जंकफूडच्या अतिसेवनाने लठ्ठ झालेल्या बायका, अशा एकल पालकांची भणंग बेकार अल्पशिक्षित मुलं. हे सुद्धा चकाकत्या अमेरिकेचं विदारक रुप आहे. आपल्याकडेही आता या समस्या खूप वाढत असल्या तरी याबाबतीत आपण त्यांच्यापेक्षा थोडे मागासलेले आहोत याचे पहिल्यांदा बरे वाटले. 

एका होस्टच्या मित्राला आम्हाला काही ठिकाणं दाखवायची जबाबदारी दिली होती. रस्त्यात मध्येच गाडी थांबवून त्याने आम्हाला एका घराशी नेलं. घर अगदी टिपिकल अमेरिकन पद्धतीचं. एका बाजूला गॅरेज, हिरवंगार लॉन, घराची पांढरी आणि राखाडी पण टवटवीत रंगयोजना. घर बंद होतं. मागच्या खिडकीत एक वेगळाच शोपीस लटकत होता. त्याने त्यावरुन हात फिरवला. ’अजूनही हा इथंच आहे’ म्हणत हसला. आम्हाला काही कळेना. मग त्याने सांगितलं की तो आणि त्याची आधीची बायको इथे ५ वर्ष राहत होते. मग आम्ही हं म्हणणार तर तो पुढे म्हणाला की हे घर त्या बायकोच्या आधीच्या नवर्‍याचं आहे. आम्ही ’जोड्या लावा’ खेळत होतो तोच तो म्हणाला की त्याच्या बायकोचा (ह्याच्या) आधीचा नवरा म्हणजे घराचा मूळ मालक आणि त्या नवर्‍याची आताची बायको सध्या तिथे राहतात पण ते नेमके कुठेतरी गेलेले दिसतायत. हे घर आतून खूप सुंदर आहे आणि वाटेवरच होतं म्हणून तुम्हाला जस्ट दाखवायला आणलं होतं. हे सगळं ऐकून आम्हाला घेरी यायची बाकी होती. आपलं ८ वं लग्न आपल्याच पहिल्या नवर्‍याशी पुन्हा करणारी एलिझाबेथ टॆलर (चुभू देणेघेणे) आठवली. आम्हा सर्वांचे आधीचे आणि आत्ताचे नवरे व बायका तेच असल्याबद्दल आम्हाला एकदम हायसे वाटू लागले. :-D  

शेवटी एक नोंद राजकारणाबद्दल. गांधीजी ही तेव्हा बहुतेक मध्यमवर्गीय अमेरिकनांना माहित असणारी महवाची एकमेव भारतीय व्यक्ती होती. वॉशींग्टनला भारतीय वकिलातीसमोर त्यांचा पुतळा आहे. आपल्याइकडे मात्र अमेरिकेच्या राजकारणावर तावातावाने चर्चा होते. आपल्याला नुसते त्यांचे राष्ट्राध्यक्षच नव्हे तर मोनिका ल्युएन्स्कीपासून मिशेल ओबामापर्यंत, रिपब्लिक डेमोक्रॅट पक्षांबद्दल बरच काही माहित असतं. त्यांना आपली बीजेपी, कॉंग्रेस वगैरे काहीही माहित नसायचं (तेव्हा तरी) लिंबूटिंबू पक्ष तर जाऊच द्या. कारण अमेरिका हेच त्यांचं जग आहे. मार्क ट्वेनने उपरोधाने म्हटलं होतं, अमेरिकेला भूगोल कळावा म्हणून बहुतेक जगात युद्ध होत असावीत. तर तेव्हा ओबामा आणि हिलरीपैकी कुणाला तिकिट मिळेल याची चर्चा होती. माजी अध्यक्षाची बायको म्हटल्यावर ती जास्त प्रसिद्ध असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात या महासत्तेची अध्यक्ष एक स्त्री कधीच होऊ शकत नाही हेच जनतेचं साधारण मत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आजही कमला हॅरिस उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष नाही. आपल्याकडे एका दशकाहून जास्त इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. ममता, जया, मायावती, सुषमा स्वराज यांच्यासारख्या भिन्न मतप्रवाहाच्या पण पंतप्रधानपद सांभाळण्याचं पोटेन्शिअल असलेल्या आणि अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द करणार्‍या महिला आठवून मला आपल्या देशाचं कौतुक वाटल्याशिवाय राहिलं नाही.

आज इतकंच.  ☺

Thursday, October 14, 2021

उपेक्षितांच्या जगात

 2 ऑक्टोबर--- नुकतीच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री  ह्यांची जयंती साजरी झाली. सरकार मान्य सुट्टी जाहीर असल्याने  " ती कुणी, कोणत्या प्रकारे साजरी केली, हा अर्थातच चर्चेचा भाग आहे. दोघेही नेते आपल्या आपल्या परीने तितकेच महान; पण गांधीजींचा जितक्या मोठ्या प्रमाणावर आणि विस्तृत लेव्हल वर उदो उदो झाला,अजूनही होतो आहे--(माफी मागते, उदो उदो हा शब्दप्रयोग वापरल्याबद्दल--पण दुर्दैवाने ते खरंय.) तेवढ्याच प्रमाणात शास्त्रीजींना मात्र "उपेक्षित" ठेवलं गेलंय किंवा ते उपेक्षित राहिलेत ,कायमच,असे म्हणता येईल.वर्तमानपत्रातही गांधीजींविषयी रकानेच्या रकाने भरून भरभरून लिहिलं जातं; पण त्याच पेपरमध्ये शास्त्रीजींसाठी मात्र एखादे पान देखील उपलब्ध नसावे? नाही म्हणायला सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या कार्याविषयी, घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांविषयी, त्यांच्या देशाविषयीच्या  श्रद्धा आणि निष्ठेविषयी, सरळ, साध्या, निगर्वी आणि निरिच्छ स्वभावधर्माविषयी एक विशिष्ट पोस्ट फिरत असते, तीही वर्षातून एकदा----हेही नसे थोडके. अत्यंत सालस, कायम जमिनीवर पाय असणाऱ्या ह्या व्यक्तीमध्ये देशाचा पंतप्रधान झाल्यावरही  तसुमात्र देखील फरक पडला नाही. व्यक्तिगत सुख-दुःखाचा, "पोझिशन" चा किंचितही विचार न करता ज्याने फक्त देश बांधव आणि देशाप्रतीच विचार केला त्याचे कर्तृत्व, त्याची महानता मात्र दुर्लक्षितच राहिली.

शास्त्रीजींना जयंतीच्या शुभेच्छा देखील विभागूनच मिळाल्या, तिथेही वाटेकरी----पूर्णपणे त्यांचं असं नाहीच काही. इतकंच काय, नेहरुजींवर "खास त्यांच्यासाठी" गाणं लिहिलं गेलं---
-" करती है फरीयाद ये धरती, कई हजारो साल
तब् जाके पैदा होता है एक जवाहर लाल---"
 गांधीजींवरही खास त्यांच्यासाठी गाणं लिहिलं गेलंय---
" दे दी हमे आजादी, बिना खड्ग,बिना ढाल
साबरमती के संत तुने कर दिया कमाल---" 
वास्तविक पहाता, हातात शस्त्र न घेता स्वातंत्र्य मिळालं, निव्वळ अहिंसेचा मार्ग पत्करून----हे कोण, कोणत्या आधारावर ठासून म्हणू शकेल? स्वातंत्र्यासाठी ज्या लाखो क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं जीवन सर्वस्व वाहून दिलं, भारतमातेच्या चरणी---त्यांचं काय?एका व्यक्तीच्या बलिदानामागे संपूर्ण कुटुंब होरपळून निघाले, त्याचं काय? आणि इतकं करूनही खरा रक्तपात तर स्वातंत्र्यानंतरच झाला. खऱ्या अर्थाने शस्त्रे वापरली गेली, अगणित अत्याचार झालेत, माणूसपणाची विटंबना झाली, त्या सगळ्याचा हिशोब कशात मांडायचा? असो. तर गाणं देखील शास्त्रीजींना विभागूनच मिळालं, हे देखील दुर्दैवच नाही का?----

" एक का नारा अमन एक का जय जवान, जय किसान ---धरतीपर दो फुल खिले, जिनसे मेहेका हिंदुस्तान----"😊 2 ऑक्टोबर चा दिवस आला की आपल्याला  गांधीजीच प्रकर्षाने आठवतात, अर्थात गांधीजींना फक्त त्या दिवसापूर्ती आठवायची गरज नाही, हे देखील तितकेच खरे म्हणा. ते कायमच लोकांच्या स्मरणात आणि मनात अधिराज्य करत असतात. हे भाग्य शास्त्रीजींच्या वाट्याला आले नाही ह्याचे वाईट वाटते. खरे तर "ताशकंद करार" आणि भारत-पाक (1965) युद्धाच्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका ह्या दोन्ही घटना अत्यंत महत्वाच्या असल्या तरी-----त्या गोष्टींची हवी तशी दखल कुणाला घ्यावी वाटली नाही. ज्यांचं थोरपण प्रकाशात येत नाही, प्रशंसनीय असूनही----ते "उपेक्षितांच्या यादीत" मोडले जातात.; पण मला वाटतं, त्यांच्या उपेक्षित असण्यातच त्यांची महानता दडलेली असावी का?

 रामायणात "उर्मिला", महाभारतात " महामंत्री विदुर, कर्णपत्नी वृषाली", शिवाजी महाराजांच्या इतर पत्नी जशा पुतळाबाई, सकवार,सगुणा बाई-- ही सगळी व्यक्तिमत्वे उपेक्षितच म्हणायला हवीत.--- सई बाई महाराजांची प्रथम,लाडकी पत्नी म्हणून, दुर्दैवी समजल्या गेलेल्या शंभूराजांची आई म्हणून तर सोयराबाई कट-कारस्थानी म्हणून लक्षात राहिल्या.  बाकी सगळ्या उपेक्षितच.तसेच स्वातंत्र्य प्राप्तीच्या यज्ञात प्राणार्पण करणाऱ्या महान व्यक्तींच्या पत्नी----- अशी उपेक्षितांची यादी बरीच वाढेल, साहित्य क्षेत्रात, सामाजिक कार्यक्षेत्रात , कला क्षेत्रात आणि अजून बऱ्याच  क्षेत्रात----

ह्या सर्वांविषयी मनात आदरभाव असूनही ,"उपेक्षित" ह्या संज्ञेच्या  संदर्भात मला दुसरी आणि ठळक बाजू मांडायचा मोह आवरता येत नाहीये, हेही तितकेच खरे----ती बाजू अशी---
ही जी कुणी महान मंडळी उपेक्षित म्हणून राहिली असे आपल्यासारख्याना वाटत असते, त्यामागे ती स्वतःच कारणीभूत असतात असे वाटते. कारण ही सर्व मंडळी ज्या काळात जगली,वागली तो काळ वेगळा होता आणि तो काळ लोटूनही आता दीर्घ काळ लोटला आहे.जगात इतकं साधं,सरळ, प्रामाणिक राहून चालतं का? निदान आजच्या ह्या आधुनिक युगात? झपाट्याने विकसीत होऊ पहाणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात? दिवसागणिक बदलत जाणाऱ्या जीवनशैलीला अनुसरून होत रहाणाऱ्या बदलत्या काळात?
 कॉर्पोरेट क्षेत्रात तर तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करत रहावं लागतं. तुमच्याजवळ बुद्धिमत्ता नुसती असून चालत नाही,तर ती दाखवावी लागते, वेळप्रसंगी तिचं प्रदर्शनही करावं लागतं. तुमच्या "आतले गुण" जे कधीही "बाहेरच्या जगाला कसे दिसत नाहीत"  म्हणून तुम्ही रडगाणं गाऊ शकत नाही. कुणाला इतका वेळ ही नाही आणि गरज तर मुळीच नाही, तुमच्यातले सुप्त गुण ओढून बाहेर काढायला. नसलेल्या गुणांची बढाई मारावी लागते, असलेले दोष जाणीवपूर्वक लपवावे लागतात. स्पर्धेच्या युगात टिकून रहायचं असेल तर हे सगळं करावंच लागतं.जाणीव करून दिल्याशिवाय जाणीव होत नाही,हे मान्य करावेच लागेल तुमच्यातील आत्मविश्वास, चिकाटी, संयम  आणि पुढे जाण्याची धडपड ह्याच गोष्टी तुम्हाला स्पर्धेत टिकून  रहाण्यासाठी तुम्ही किती सक्षम आहात, हे ठरवतात. आणि आजची तरुण पिढी ह्या बाबतीत पूर्णपणे जागरूक आहे असे वाटते. आजच्या तरुणाईला, अर्थात, ज्यांच्या नजरेसमोर एक विशिष्ट ध्येय आहे आणि ते गाठण्याची जिद्द आहे त्यांना "स्वतःला सिद्ध कसे करायचे" हे सांगावे लागत नाही. नवी पिढी विलक्षण वेगाने सगळे जगणे कवेत घेते आहे. नव्या धारणा आणि धोरणांशी नियोजनपूर्वक समायोजन करत आहे. कोणतीही पिढी ही मागच्या पिढ्यांच्या खांद्यावरच उभी असते. मात्र आजची पिढी हा केवळ त्या पिढ्यांचा परिपाक नव्हे. मागच्या पिढीच्या कैकपट पुढे आजची पिढी आहे.आजच्या तरुणाईला  कोणताही "वाद" नकोय,वा कोणत्याही "आदर्शवादाशी" बांधिलकी नकोय.त्यांना कोणाच्यातरी चष्म्याने जग पहायचे नाही,मग तो चष्मा मार्क्स चा असो, वा हेडगेवारांचा. त्यांना खरे म्हणजे चष्म्यानेच जग पहायचे नाही. त्यांना त्यांच्या लख्ख, स्वच्छ डोळ्यांनीच हे जग बघायचे आहे. त्यांना या जगावर स्वार व्हायचे आहे, जग जिंकायचे आहे.  ह्या पिढीला अतिसंवेदनशील असूनही खरे तर चालणार नाहीये. एकवेळ "प्रॅक्टिकल" असणं मान्य; पण फार भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणे हे त्यांच्या आयुष्याच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या संपूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने घातक ठरणारे असते. 
"सानेगुरुजी" त्या काळातले आदर्श असले तरी त्यांचा हळवा, संवेदनशील स्वभाव,अति वैचारिक क्षमता हेच त्यांच्या आयुष्यात अडथळे ठरले. अशी हळव्या मनाची माणसं त्यांच्याही नकळत "आत्महत्येसारख्या" अत्यंत चुकीच्या निर्णयापर्यंत कधी येऊन पोचलेले असतात, त्यांना देखील कळत नाही. आणि शेवटी कुणी कसे वागावे हे आपण ठरवू शकत नाही; पण आपण स्वतः कसे वागावे हे तर आपणच ठरवू शकतो. आजच्या काळात तर "तू फक्त" लढ" म्हणणारे शिक्षक हवेत आणि त्याच जिद्द आणि चिकाटीने ध्येय उराशी बाळगून लढणारे विध्यार्थी हवेत. नेत्यांच्या बाबतीत विचार केला तर आज "मोदीजी" सारखे नेतृत्व हवे. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी ह्या गुणांसोबतच 
आजूबाजूच्या (विशेषतः शेजारच्या) देशांना "हलवून, हादरवून" सोडेल अशी करणी,
शांत दिसत असले वरकरणी
तरी खऱ्या अर्थाने धोरणी--राजकारणी, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आज तरी अशाच "नेत्यांची" जास्त गरज आहे देशाला. जे "योग्य दिशेने योग्य ती पावले टाकतील आणि इतरांना त्याची उघड उघड जाणीवही करून देतील".

आपण "शास्त्रीजींपासून" सुरुवात केली त्यामुळे शेवटही त्याच मुद्द्याला धरून करावा लागेल. शास्त्रीजींसारखी जी मोजकीच; पण खरोखर महान व्यक्तिमत्वे। आहेत, त्यांना स्वतःला आपण उपेक्षित ठरल्याचे कधी जाणवले ही नसेल. कारण त्यांनी जे काही कार्य केले ते कुठल्याही अपेक्षेविना, निःस्वार्थ भावाने आणि स्वेच्छेने केलेलं असणार; आपल्यासारखी सामान्य मंडळी त्यावर उलट सुलट चर्चा करत रहाते, इतकंच.
 पण म्हणूनच मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की आजच्या युगात फार प्रामाणिक, सरळ, साधं असून चालत नाही. अती चांगुलपणा म्हणजे बावळटपणा समजला जातो. व्यक्त न होऊ शकण्याला मुखजड आणि खरे असले तरी स्पष्ट बोलू न शकण्याला भित्रेपणा किंवा कमकुवतपणा समजला जातो. "पाणी फक्त निर्मळ अन खरे हवे" हे तत्व काही खऱ्याखुऱ्या आयुष्यात कामी येत नाही. अर्थात, ह्याचा अर्थ चुकीने वा अन्यायाने वागावे असा मुळीच नाही. पण किमान जशास तसे आणि योग्य व न्याय्य बाजू कायम ठेवत बदलत्या परिस्थिती नुसार स्वतःमध्ये बदल करायला शिकणे इतके तरी हवेच. 

 पण शेवटी प्रत्येक व्यक्तीचा स्वभावधर्म वेगळा असतोच आणि ती व्यक्ती ज्या वातावरणात "घडलेली" असेल,ज्या आंतरिक संस्कारात विकसित झालेली असेल त्यानुसारच तिचे वागणे ठरते.🙏 
फक्त आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहेत, ते बाहेर यायला हवेत, नव्हे आपणच ते जगासमोर आणायला हवेत आणि "उपेक्षितांच्या" यादीत आपले नाव जोडले जाऊ नये, किंबहुना कुणाच्याही वाट्याला उपेक्षित जगणे येऊ नये ,(उपेक्षित हा शिक्का कुणाच्याही नावासमोर लावला जाऊ नये)हीच प्रामाणिक इच्छा.🙏

माणिक

Wednesday, October 13, 2021

इतना गहराईमें सोचो मत......

 त्याचं असं झालं की, आम्ही इथे पुण्यात डायनिंग सेट पहायला दुकानात गेलो होतो, तिथे एक मार्बलचा सेट आवडला. ते नवीन प्रकारचं मार्बल होतं, तर माझ्या मनात आलं की,ह्यावर हळदीचे, तेलाचे डाग पडले तर कसे जातील? आणि ते किती खराब दिसेल! मी त्या दुकानदाराला म्हटलं की, भगवान के मंदिर मे जो मार्बल लगा है, उसपे हल्दी कुमकुम के दाग जल्दी निकलते नही है( तो मुस्लिम होता) पुणेरी असल्यामुळे, त्याला मी काय म्हणते, ते थोडं तरी समजलं असावं. तेव्हा तो म्हणाला, अरे,हमने इतनी गेहराईमें कभी सोचा ही नहीं, आपभी मत सोचिए! मुझ पर भरोसा रखके ले जाइये!

            मला त्याचं ते वाक्य खूपच आवडलं! खरंच उगाच किती छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करत बसतो. मी अगदी  फ्लॅशबॅकमध्ये गेले. लहानपणी शाळेत असताना मित्र-मैत्रिणी वहयांच्या मागच्या-पुढच्या बाजूला त्यांचे क्रिएटिव वर्क करायचे. मी मात्र वहयांच्या दोन्ही बाजू अगदी स्वच्छ व कोऱ्या ठेवायचे. बोअर पिरियड चालू असताना, वह्यांच्या मागे मेसेजेस लिहून वही फॉरवर्ड व्हायची. पण तसे करतानाही मी विचारपूर्वकच करायचे.दर वर्षी वर्ष संपल्यावर ,पुस्तके विकताना दुकानदार खुश होऊन थोडे जास्तच पैसे द्यायचा मला !कारण ती पुस्तकं अगदी कोरी वाटावी इतकी छान असायची. कॉलेजमध्ये सुद्धा पॉकेट मनी मिळत नसला तरी बॅग मध्ये थोडेफार पैसे नक्की असायचे. पण कधी उशीर होतोय म्हणून, कंटाळा आला म्हणून ऑटो रिक्षा केली नाही. कॉलेजला, स्टेशन पर्यंत चालतच जायचे. खूप थंडीत सकाळी पावणेसातला कॉलेज सुरु व्हायचे तर मस्त चहा प्यावासा वाटायचा. पण तोही कटिंग प्यायचा.स्टेशनसमोरच फेमस उडपी हॉटेल होते. पण कधी आत जाऊन एखादी डिश खाल्ली नाही.हॉटेलमध्ये जायचं ते कुटुंबाबरोबरच !शॉपिंग साठी बांद्राचं एल्को मार्केट प्रसिद्ध आहे. तिथे आम्ही मैत्रिणी ठरवून एकत्र शॉपिंग ला जायचो. तेव्हाही दिलेले पैसे पूर्ण खर्च न करता,परत आणलेले! नेहमी असंच विचार करत राहायचं....
.कुठलीही वस्तू घेताना खरच ती उपयुक्त आहे का? त्याची किंमत, आपलं बजेट ,आता घेणे खरच गरजेचे आहे का की नंतर घेतलं तरी चालेल आणि मग घरात आहे त्या वस्तूचं काय करायचं असं सगळं मनात येतं नेहमीच!

मुलं लहान असताना शाळेचे मिडीयम बाबतचा निर्णय, मुलांना वाचनाची गोडी लागावी त्यांनी शैक्षणिक, खेळ, वक्तृत्व सगळ्यात प्रगती तर करावी, पण त्यांना कुठेही आपल्यावर हे लादलं जातय असं तर वाटत नाही ना ?असं काही काही मनात यायचं. घरात असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळींबाबतही तेच !नेहमी त्यांचे वय, त्यांचा स्वभाव ,आवडी-निवडी, त्यांनी वर्षानुवर्ष जपलेली मूल्ये, देवाधर्माबाबतचे यमनियम व्यवस्थितपणे पाळले जात आहेत ना याची चिंता!

          घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा कुठला छोटा मोठा कार्यक्रम असेल तरी घराची स्वच्छता इतर गोष्टींबाबतचा  काटेकोरपणा जपण्यासाठी तडफड! कामवाल्या बाईकडून ,स्वयंपाकीण बाई कडून काही जास्तीची कामे करून घेताना फक्त पैशाचा असं नव्हे, तर मग आपण आळशी होऊन जाऊ  आपली सवय तुटेल कामाची !असे काही काही (गहन विचार ).आजही संध्याकाळी साधं हॉटेलमध्ये जायचं असेल तर, सकाळचा स्वयंपाक नेमका व्हायला हवा ,तो उरायला नको याचा विचार!
      
 प्रवासाला निघण्यापूर्वी बॅग भरताना ट्रॅव्हल लाईट हे नेहमीच मनात असतं .आपल्याला किंवा कुणालाही उचलायला बॅग जड होऊ नये (अगदी हमालालाही )असं वाटतं.ट्रेन मध्ये कम्फर्टेबल वाटेल असा ड्रेस , जेवणाचा डबा, आणि आधार कार्ड वगैरे इतर आवश्यक बाबी सगळ्याचच खूप प्लॅनिंग असतं.

बरं, जेव्हा आजूबाजूला आपण बघतो ,अनुभवतो ,की लोक किती बेफिकिरीने वागतात.खुशाल पाणी वाया घालवतात! आपल्याकडून जर असं झालं चुकून, किंवा आपण जर पाणी वाया गेलेलं जरी पाहिलं,तरी लगेच आपल्याला पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे ,हे कसं समजवायचं या मंडळींना म्हणून कासावीस व्हायला होतं. सार्वजनिक ठिकाणी गाडीतून किंवा बसमधून कुठलेही wrapper, बाटल्या लोक सहज फेकताना पाहिलं की वाटतं, अरे आपण तर चॉकलेटचा साधा कागदही पर्समध्ये ठेवून घरी आणतो!

 सध्या सोशल मीडियामुळे फारच अलर्ट राहावं लागतं.चुकून एखाद्याच्या पोस्टला रिप्लाय केलं गेलं नाही किंवा विश केलं गेलं नाही तर समज गैरसमज तर होणार नाही ना याची काळजी! मस्त मनात येईल ते बोलणाऱ्या ,मनात येईल तसं बेधुंद आयुष्य जगणाऱ्या ,बेफिकीर ,बेदरकार व्यक्ती पाहिल्या की असं वाटतं ,असं मनमुराद जगण्यात एक वेगळाच आनंद असेल !आपल्याला केव्हा जमेल असं?

           साधं या महिन्यात एम सिरीज असताना,ब्लॉग लिहिणं मला जमणार नाही असं सांगणंही तर जमलं नाही ना मला!
        उसके लिये भी गहराई में सोचती रही.