Monday, December 14, 2020

अशी ही लपवालपवी

 


चलो खामोशियों की गिरफ्त में चलते है 

बातें ज्यादा हुई तो जज्बा़त खुल जायेंगे

आपल्या खऱ्या भावना इतरांपर्यंत पोहोचवणं कठीण नाही पण त्यासाठी तशी इच्छा हवी .इतरांना खरा /खरी मी समजू नये असा प्रयत्न बहुतेकांचा असतो. "खुली किताब" होणे प्रत्येकालाच काही पटत नाही.
आम्ही परवा नवी कार घेतली पण काही सांगत बसलो नाही बुवा सगळ्यांना! मागच्या आठवड्यात मुलाला अजिबात बरे नव्हते, धावपळ करून दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. कळवले नाही कोणाला अजून!!
 म्हणजे दुःख झाले तरी लपवालपवी, आनंदाचे क्षणही चोरट्या सारखे अनुभवणे असे काहीसे बदलत्या जमान्यातील बदलत्या लोकांचे वागणे झाले आहे.

काय काय लपवले जाते बहुतेकांकडून? पूर्वी अनुभवास आलेले वाईट प्रसंग, सध्या एखाद्या अडचणीच्या परिस्थितीतून जात असू तर ते ,दुःख किंवा राग यासारख्या भावना ,आपले एखाद्या व्यक्ती किंवा प्रसंगाविषयी चे मत, आपल्या गरजा ,कमतरता एवढेच नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्वातील एखादा पैलू लपवून इतरांसमोर नं आणण्याची गरज बहुतेकांना सतत वाटत असते.
पूर्वीपासूनच हा स्वभाव विशेष एक मानसिक गरज म्हणूया अशी आहेच.अलिकडच्या काळात त्यात खूप जास्त भर पडली आहे. शब्दातून व्यक्त होण्यापेक्षा "इमोजी" टाकणं जास्त सोपं वाटतंय .चार शब्द लिहिण्यापेक्षा एक "लाईक" ठोकला की खरे मत कळायला मार्ग नाही.  शिवाय आम्ही सहभागी आहोत हे दाखवायला मोकळे. तर अशा मोकळेपणाने व्यक्त नं होण्याची कारणे काय असू शकतील ते समजून घेऊया.
एखादा प्रसंग किंवा कामाबद्दल लाज वाटून ती लपवण्याची इच्छा होते .कारण बुद्धी सांगत असते हे योग्य नाही पण मनाला भुरळ पडलेल्या गोष्टी कराव्याशा वाटतात. मग त्या इतरांपासून लपवून ठेवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. उदाहरणार्थ एखादे व्यसन.

आपण काही सांगितले तर इतरांच्या त्यावर प्रतिक्रिया काय येतील या भीतीने, त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया देण्याच्या अंदाजाने, राग येण्याच्या शक्यतेने, लपवून ठेवलेले /नं सांगितलेलेच बरे असे वाटते.
बरेचदा इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे सगळ्यांना आपण आवडावे म्हणून एखादी दुखरी नस -एखादी कमजोर कडी पडद्याआडच ठेवली जाते.
स्वतःला कमी लेखून ,स्वप्रतिमा चांगली नसल्याने ,आत्मविश्वास कमी, म्हणूनही काही गोष्टी आवश्यक असूनही न सांगणे /मागणी न करणे आणि मनातच ठेवणे असे वर्तन घडते.
वेदनादायक अनुभव इतरांना सांगताना आपली चिंता वाढणे ,मन:स्वास्थ्य बिघडण्याच्या धास्तीपोटी ते आतच दडवून ठेवून वरवर सर्व आलबेल दाखवण्यासारखे उदाहरण दिसतेच.
असुरक्षिततेची भावना ,कोणीही भरवसा ठेवण्यासारखे नाही या विचाराने गोष्टी इतरांपासून लपवून ठेवण्याची सवय जडते.

पूर्वी एकमेकांशी संपर्काची माध्यमं कमी असूनही बहुतेकांना एखाद्याची अंतर्बाह्य माहिती असायची. हल्ली संपर्काची माध्यमं वाऱ्याच्या वेगाने काम करूनही बरेचदा इतरांच्या वरवरच्याच गोष्टी माहिती असतात किंबहुना तेवढ्याच दुसऱ्या पर्यंत पोहोचवल्या जातात.
पण अशा भावना /मतं/ घटना लपवून अनेक तात्कालिक आणि दीर्घकालीन परिणाम दिसतात. एक तर ते सतत लपवण्याची काळजी, कोणाला कळणार तर नाही ना याची भीती वाढतच जाते. आपली भावनिक शक्ती यात प्रचंड प्रमाणात खर्ची पडते.
इतरांशी बोलताना वरवरचे बोलणे किंवा सुरक्षित वाटणाऱ्या विषयांवरच संवाद साधणे म्हणजे थोडक्यात "हवापाण्याच्या गप्पा" मारणे यांनी आपसातील नाते घट्ट राहणे शक्य होत नाही. परस्परांमध्ये विश्वास जवळीक, आत्मीयता निर्माण होत नाही. भावनांचा ओलावा न राहता व्यावहारिक कोरडेपणा तेवढा असतो. आपल्यासाठी असुरक्षित मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक वातावरण आपणच तयार करत असतो आणि पर्यायाने एकटे पडत जातो.
संशोधनानेही सिद्ध झाले आहे की खरे व्यक्त न होण्याच्या, इतरांपासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींमध्ये अकाली मृत्यूचे तीस टक्के आणि कर्करोगाचे सत्तर टक्के अधिक प्रमाण दिसते.

आपली व्यक्त होण्याची, इतरांशी संवाद साधण्याची सवय हळूहळू वाढवता येऊ शकते. काही मानसिक विकारांनी किंवा अनुवंशिक कारणांनी ही सवय सहजपणे बदलता येत नसल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने, समुपदेशनाने यात निश्चित बदल घडवून आयुष्य अधिक सहज आणि समाधानी करता येऊ शकते.
लेखनाच्या विशिष्ट पद्धतीने आपल्या सवयींच्या बाहेर छोट्या-छोट्या पायर्‍यांनी पडता येते. आत्मविश्‍वास वाढवून अधिक सहानुभूतीपूर्वक सर्वांशी नाते ठेवण्यास यातून मदत होते.

Connection is the energy that exists between people when they feel seen, heard and valued. 

योग्य वेळी योग्य व्यक्ती जवळ योग्य पद्धतीने व्यक्त होणे आणि त्यातून आपसातील संबंध जवळिकतेचे ठेवणे महत्त्वाचे आहे.

Sunday, December 13, 2020

अमेरिका डायरी 2- पहिला आठवडा- लिन आणि मी

पहिल्या भागाच्या शेवटी आपण म्हणजे आम्ही.. फिलाडेल्फियात पोचलो होतो. तिथे एका उत्तम हॉटेलमध्ये आमची एक रात्र राहण्याची सोय केलेली होती नंतर आम्हाला आपापल्या पहिल्या होस्टकडे सुपूर्द केले जाणार होते. सकाळी आमच्या स्वागताचा छोटेखानी कार्यक्रम झाला. उपस्थितांमधली जांभळा टी शर्ट,काळा स्कर्ट घातलेली, साडेपाच फूट उंच, कपाळ झाकणारी बॉयकट असलेली, चाळीशी ओलांडलेली, तरतरीत नाकाची आणि चमकदार डोळ्यांची गोरीपान लिन मी आपोआप ओळखली. तिनेही ’मोहानी ?’ असं विचारून मला एकदम मिठी मारली. आपला एक आठवडा नक्की छान जाणार एवढे मला जाणवले. कार्यक्रम आटोपताच मी आणि तिच्या कारने सुसाट वेगाने तिच्या घरी पोचलो.


अमेरिकेतील वास्तव्या्चे व एकूण कार्यक्रमाचे वेळापत्रक आम्हाला भारतात जेव्हा मिळाले त्यापाठोपाठ मला ’लिन’चा इ-मेल आला होता. मी शाकाहारी आहे की मांसाहारी, मला कशाची ऍलर्जी आहे का, पाळीव प्राणी आवडतात का, मी मद्य घेते का, असल्यास आवडता brand कोणता(!) ((असा मेल आपल्याला का आला नाही याचे आमच्या टीममधील एकाला फार दु:ख झाले..), माझ्या कुटुंबात कोण कोण असतं, माझे छंद.., मी नक्की काय करते अशी भलीमोठी प्रश्नावली होती त्यात. पूर्वग्रह ठेवून जायचे नाही असे ठरवूनही प्रत्यक्ष भेटीपूर्वीच माझे मत अनुकूल झाले तिच्याबद्द्ल कारण इतर होस्ट्सचे मेल अगदीच औपचारिक होते. उत्तरात मी पण तिला छोटी प्रश्नावली पाठवली. त्यामुळे ती एमबीए असून तिचा घर ’आतून’ रंगवण्याचा व्यवसाय आहे (!), ती विवाहीत असून नवरा, दोन मुली (आणि कुत्री ऍबी)सह फिलाडेल्फियाजवळच्या एका गावात राहते एवढी माहिती मला तिच्याबद्दल अगोदरच होती.


ठराविक अमेरिकन पद्धतीचे राखाडी घर, शुभ्र दरवाजा...पण लॉनची निगा नीट राखलेली नाही, दाराशी आपोआप उगवलेली चारदोन रंगीबेरंगी ट्युलिप्स सोडली तर सगळे उजाड, दगडी पायर्‍या आणि जरा तिरकी झालेली ’चर्च’ लिहीलेली लाकडी पाटी. आत खालच्या मजल्यावर दिवाणखाना, स्वैपाकघर आणि जेवणाची खोली..वर दोन,तीन बेडरूम्स!.घरात प्रचंड पसारा, वस्तूच वस्तू, एकही टेबल रिकामे नाही. बरेच कॉफीचे मग, कागद, पुस्तकं...पण त्यामुळे मला एकदम हुश्श झाले. नीट आवरलेल्या घरात शिस्तीचे जे दडपण येते ते नव्हतेच इथे. तिने चीज आणि पीचच्या फोडी समोर आणून ठेवल्या. मी पहिला तुकडा उचलताच तळघरातून ऍबीच्या जोरदार भुंकण्याचा आवाज आला. मी कुत्र्यांना घाबरते असे कळवल्याने तिला तिकडे डांबले होते. तिचा तो निषेधाचा सूर असावा. ऍबीशी काहीतरी अनाकलनीय बोलत बोलत मला वर नेऊन तिने माझी खोली दाखवली, तिच्या टीनएजर मुलीला (क्लेअर) त्यासाठी धाकटीची(कॅल्सी) खोली शेअर करायला लागल्याचे मला लक्षात आले. ही खोली कशीबशी आवरलेली दिसत होती...लिन म्हणाली, "आज मला खालचं कार्पेट प्रथमच दिसतय.""दोन्ही मुली होईपर्यंत पहिली चार वर्ष मी घरीच होते, नंतरची चार वर्ष नवरा चार्ली घरी होता (त्यांचं आधी ठरल्याप्रमाणे (काश !! :)-मी मनात)) आता दोघही काम करतो त्यामुळे आवरणं काही होत नाही" अशी त्या पसार्‍यामागची कहाणी तिने ऐकवली.

संध्याकाळी ती मला क्लबहाऊसला पूर्वनियोजित कार्यक्रमाला घेऊन गेली. मी सिल्क साडी नेसल्यावर वाटेने जाताना ’आता वाटतेस तू भारतीय, मला नेसवशील का एकदा साडी, ही सुटण्याची भिती नाही का वाटत, रोज नेसावी लागते का तिकडे साडी, तुझी सासू पण नेसते का, मुलगी नेसेल का, त्यांच्या छोटया साड्या मिळतात का, केवढ्याची असते ही" असा तिचा प्रश्नांचा भडीमार सुरू होता. सासू रोज नेसते, मी क्वचित, मुलगी लग्नात नेसेल बहुतेक, शंभर रू.पासून काही हजारांपर्यंतही मिळते इ. उत्तरे मी दिली. तेव्हा शिल्पा शेट्टीचं हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गीअर ने जाहीर कार्यक्रमात चुंबन घेतल्यामुळे भारतात बराच गदारोळ झाला होता. (ती रिचर्डची फॅन) तुमच्याकडे सिनेमात हे चालतं का? असेल तर मग प्रत्यक्षात केलं तर तिने का नाराज व्हावं असं मला लिनने विचारल.. व्यावसायिक नटी ही प्रत्यक्षात 'available' असते असा चुकीचा संदेश यातून जातो म्हणून ही निदर्शनं झाली असं मी तिला पटवून सांगितलं...आणि मग तेव्हा तरी शिल्पा शेट्टी आणि भारतीय संस्कृती याची सांगड मला घालावी लागली.


सकाळी उठून मी किचनमधे गेले, लिनचा कॉफी करताना फोटो काढला तेव्हा दचकून तिने ’बरं झालं देवा, मी मेकअप केला होता..’ (साडेसहाला !!)अशी अस्फुट किंकाळी फोडली. थोड्या वेळाने खाली उतरलेल्या तिचा नवरा चार्लीशी ओळख करून दिली, मी त्याला भेटीदाखल गांधींचं ’सत्याचे प्रयोग’ दिलं. (त्याची वाचनाची आवड तिने कळवली होती) त्याबद्द्ल आभार मानून त्याने लगेच मुलींचा डबा (पुन्हा काश!!!:)-मी मनात) म्हणजे पीनट बटर सॅंडविच करून फॉईलमधे गुंडाळलं, क्लेअर ते घेऊन आणि मला ’हाय’ व ’बाय’ करून गेली देखील. कॅल्सी काहीतरी चघळत लोळत टीव्ही पाहत होती (हिचे उच्चार काही मला आणि माझे तिला..शेवटपर्यंत समजले नाहीत पण ती फार गोड हसायची). मी तयार होऊनच खाली उतरले होते, लिन म्हणाली "चल, मी तुला तुझ्या आजच्या कार्यक्रमाला नेऊन पोचवते." तिने डिकीत रंगाचे डबे,बटणाने लांबी कमी जास्त होणारे ब्रश, घडीची शिडी असे काही बाही सामान टाकले, एक जुनी रंग सांडलेली हाफ पॅंट घातली आणि आम्ही निघालो. मला आमच्या ग्रुपमधे सोडून ती तिच्या रंगकामाला पसार झाली. आम्ही एक विद्यापीठ, कॅथेड्रल वगैरेंना दिवसभर भेटी देऊन डिनर करून परतलो तेव्हा लिन अप्रतिम पोषाखात हसर्‍य़ा चेहर्‍याने गाडीजवळ उभी होती, "दमलीस का?" म्हणत तिने जवळपास मला उचलूनच गाडीत ठेवले. खरं तर ती एक सबंध घर (आतून) रंगवून आली होती.. एमबीए केलंयस मग हा विचीत्र व्यवसाय का निवडलास ,विचारलं तर म्हणाली "मला आवडतो म्हणून! पुढे बदलीन सुद्धा!" (आता लिन स्टेशनरीच्या व्यवसायात आहे)

रात्री मी खोलीत गेले तर टेबलवर एक चिट्ठी ’मला तू फार आवडलीस..तुझी लिन’. आपण अशी कबुली एखाद्या व्यक्तीला सहज नाही देऊ शकत, नाही का!

लगेचच व्होकेशनल डे होता त्यामुळे नेटवर्कींग बघायला मी फिलाडेल्फियातल्या काही कंपन्यांमधे जाऊन आले, आमचे दुपारचे जेवण तर तिथल्या शाही क्लबमधे होते. चांदीचे काटे चमचे वगैरे.. संध्याकाळी लिनला मी त्याचं वर्णन सांगताना म्हटलं ’एखाद्या पिसांची हॅट घालून झगा फलकारत येणा‍र्‍या राणीचीच काय ती कमी होती’. (मग पुढच्या प्रत्येक जेवणाबद्दल लिन ’was it a 'queen coming’ luncheon?' असं हमखास विचारी). तिने मला झुम्पा लाहिरी लिखीत आणि तब्बू अभिनीत ’द नेमसेक’ पाहिल्याचे सांगितले. अमेरिकेतील वास्तव्यासाठी तडजोड करणार्‍या कुटुंबाची ती कथा आणि त्यातली सांस्कृतिक दुविधा व मुळांपासून दुरावण्याची व्यथा तिने इतक्या छान शब्दात मांडली की मी (पुलाव करता करता) ऐकतच राहिले. ती म्हणाली की अक्खी अमेरिका अशीच आहे, कुणी आयरिश कुणी इटालीयन कुणी मेक्सिकन but we say we are american.

रात्री आमच्या गप्पा उर्फ ’भारत को जानो’ कार्यक्रम सुरू असायचा. जाण्याआधी झालेल्या कार्यशाळेमुळे आमचे ’FAQ’ अगदी घोटून तयार होते तरी सांस्कृतिक फरकामुळे काही वेळेस समजावून सांगताना माझी ’फॅ फॅ’ उडायची :) उदा: जेवणाआधी त्या सगळ्यांनी एकमेकांचे हात धरून एकत्र एक प्रार्थना म्हटली. मी ही नंतर हात जोडून ’वदनी कवळ’ म्हटले. लगेच त्यांनी अर्थ विचारला... मी सार नीटच सांगितले पण ’पूर्णब्रह्म’ वगैरे...! माझी पंचाईत होतेय हे लक्षात आलं की ती मिस्कील हसायची...आणि ’ok ok ,got the essence’ हा मग आमचा परवलीचा शब्द झाला.

चार्ली आपल्या राजकारणाबद्दल विचारायचा.. भारताशी संबंधित ’मुंबई, गांधी आणि नमस्ते’ हे तीनच शब्द त्यांना त्याआधी माहीत होते. आपल्याला मात्र त्यांच्या हॅलोविन पासून सबवे पर्यंत आणि बोस्टन टी पार्टी पासून मोनिका ल्युएन्स्कीपर्यंत सगळं कसं माहीत याचं त्यांना प्रचंड आश्चर्य वाटायचं.. ते दोघे पक्के डेमोक्रॅट. तेव्हा तिकडे ओबामा आणि हिलरी च्या जंगी प्रचारसभा सुरू होत्या. बुश सरकारला फक्त ओरबाडून खाणं माहीत होतं म्हणून अमेरिका समृद्ध असली तरी समाधानी नाही असं ती सांगायची. माझ्यासाठी तिने ’इंडीया एब्रॉड’ वाचायला आणलं होतं. वृत्तपत्रात एकाच वेळेला ऐश्वर्या-अभिषेकचं पंचतारांकित लग्नं आणि दुसरीकडे भारनियमनाच्या बातम्या.. How do you manage to live between extremeties? असं ती विचारी.

चौथा दिवस असेल. ठरलेले कार्यक्रम उरकून अगदी थकून मी घरी आले तर लिन मंद प्रकाशात रेड वाईनचे घुटके घेत सुडोकू सोडवत बसली होती. क्लेअर अजून आली नव्हती त्यावरून डेटींगचा विषय निघाला. लिन म्हणाली "मी तिला सांगितलय की, कार तू आताही चालवू शकतेस पण सरकार परवाना देत नाही. कारण त्यासाठी हवी असलेली समज तुझ्याकडे नाही, अपघाताचा धोका जास्त, डेटींगचही तसच आहे." मग तिला तिचे डेटींगचे दिवस आठवले, दोघांचाही एक एक प्रेमभंग उर्फ अपघात झालेला मग चार्ली कसा भेटला...दर वेळेला लाल ऐवजी पिवळाच गुलाब कसा देत असे असे काही काही किस्से सांगताना तिला एकदम आपल्या ठरवून लग्न करण्याच्या पद्धतीचे कोडे पडले. तू लग्नाआधी नवर्‍याला किती वेळा भेटलीस? मी म्हणाले ,'एकदोनदा'. मग ती म्हणाली "आणि लग्न करून या (एकदोनदाच भेटलेल्या) माणसाच्या तू थेट घरीच राहायला गेलीस?" मी म्हणाले "असच असतं आमच्यात :)" (ती बेशुद्ध पडू नये म्हणून मी तेव्हा घरात आजेसासू-सासरे यांच्यासह ९ माणसे राहत होती हे सांगितले नाही) ती माझ्याकडे अशी काही पाहत होती की मला आपण पानं गुंडाळलेली आदिवासी स्त्री आहोत असे वाटू लागले. मग मी तिला विचारले "तुम्ही पारखून घेऊन लग्न करता ना, मग तरी ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर का मोडतात. मला वाटतं, नाती आणि त्यांचा टिकाऊपणा या व्यक्तीसापेक्ष गोष्टी आहेत. कोणाची पद्धत योग्य आणि कोणाची अयोग्य हा मुद्दाच नाही, तुमचे विचार, विश्वास आणि शेवटी नशीब यावरच त्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं."

लिन कधी कधी तिच्या मुलींना कामाच्या जागी घेऊन जात असे.. take your kid to work at times म्हणजे त्यांना कष्टाची कदर होते असे तिचे म्हणणे. त्याआधी तिची धाकटी मुलगी ATM मधे विचारायची ’is there enough money in the 'wall' to buy this?'. मी पाचव्या दिवशी ’आमिश ’खेड्याला भेट देऊन आल्यावर तर तिने त्यांची ’निसर्गाकडे नेणारी जीवनपद्धती’ मुलींना पुढे बसवून माझ्याकडून ऐकायला लावली. ते अमेरिकेत राहूनही कार न वापरता आणि TV न पाहता जगतात कसे याचे त्या मुलींना कोडे पडले होते.

माझी जुळी मुलं कशी वागतात, भारतीय पालकत्वाच्या कल्पना काय याबद्दल लिन विचारायची.. मी न सांगताही मला घरची, मुलांची आठवण येते आहे हे ओळखायची. मग मी तिला शिकवलेला इंडीयन टी(उकळून) करून आणायची अन नि:शब्द बसायची किंवा कधी मी तिला ५/७ मराठी वाक्य शिकवली होती ती भयंकर उच्चारात (मॅला बुक ल्हागली, दन्नावाद वगैरे) बोलून मला हसवायची. मग मला म्हणावं लागायचं ’ok ok ,got the essence’.


अक्रोड, मध वापरून केलेला गोड पिझ्झा ही तिची खासीयत.. मी निघायच्या आदल्या रात्री माझी भेट व्हावी म्हणून तिने सासूसासर्‍यांना जेवायला बोलावले होते... तिच्या सासूने तिच्या पहिल्या प्रसूतीनंतर बाळाला पाहण्याआधी माझी सून कशी आहे असं विचारलं होतं आणि लिनला कायमचं जिंकलं होतं. त्यांना काही दिवसांनी old age home मधे जावं लागेल याची तिला खंत वाटायची (पण त्यांच्यात तसच असतं.. आणि खरं तर अलिकडे आपल्यातही) आता तर ते खूपच थकलेत. त्यांच्याबद्दल तिने मधे एका मेल मधे लिहिलं होतं We are what is known as the Sandwich Generation - we are still raising our own kids, but we are trying to help, care for our parents.

तर ते येणार म्हणून मी तिला माझी साडी नेसवली. ब्लाऊज ऐवजी काळा स्लीव्हलेस टीशर्ट घालून, साडीचा पदर हातावर घेऊन ती राजकन्येच्या तोर्‍यात जिन्यावरून खाली उतरली. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चार्लीने तिचं want to marry you again वगैरे म्हणत अमेरिकन पद्धतीने कौतुक केलं. आम्ही एकमेकांना भेटी दिल्या.

सकाळी निरोप घेताना चार्लीला मी राखी बांधली, त्याचा अर्थ सांगितला. दौरा संपण्याच्या दिवशी आम्ही पुन्हा भेटणार होतो तरीही त्यांचे घर सोडताना माझे डोळे पाणावले. लिन माझ्याकडे पाहतच नव्हती.. चार्लीनेच मला ठरल्या जागी पोचवले. नंतर पुढचा प्रवास, अनुभव, वेगवेगळ्या होस्टसचं आतिथ्य, आम्ही पाहिलेली स्थळं सगळं मी तिला फोनवर सांगायचे किंवा मेलमधे लिहायचे. माझी कार्यक्रम पत्रिका तिने किचनमधे डकवून ठेवली होती. मैत्री सहवासातून फुलते हे खरं असलं तरी ती सहवासाच्या लांबीवर अवलंबून नसते. नाहीतर फक्त एका आठवडयात माझ्यात आणि लिनमधे हा अनोखा बंध निर्माण झाला नसता. लिनच्या शब्दात सांगायचं तर "I especially remember the times we sat in the living room talking after Charlie and the girls went to bed. We learned so much about each other's lives and beliefs. It doesn't matter to me how long we go between returning emails....we are friends for life! "

Friday, December 11, 2020

कभी धूप,तो कभी छाव

 आपल्यापैकी बऱ्याच जणांना  संगीताची आवड असते. त्यातल्यात्यात "गाणी ऐकणं" हा बहुतेकांचा छंद असतो.  सुमधुर संगीत नेहमीच हौशी मनाला आनंद आणि उ भारी देत असतं. एका वेगळ्याच विश्वात नेऊन  ठेवत असतं. काही गाणी तर अशी असतात, त्यातील शब्द धड समजणारे नसतात, अर्थ देखील असतोच असे नाही;पण चाल, रिदम, आणि एकूणच ती गाणी ऐकल्यावर माणूस त्यात रंगून जातो. काही गाणी मात्र आयुष्याचा सारा सारच सांगून जातात  .पुस्तकी ज्ञान नसलेल्या बहिणाबाई "अरे संसार, संसार म्हणत पूर्ण संसाराचं तत्वज्ञान सांगून जातात. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर---- चटके,मग ते अग्नी चे असोत, उन्हाचे असोत वा दुःखाचे--- तव्याचा चटका लागल्याशिवाय भाकरी ची  गोडी कळत नाही, तसेच दुःखाचे चटके सोसल्याशिवाय सुखाची चव चाखता येत नाही,हे त्या शाळा कॉलेजात न गेलेल्या बाईने किती सहज सांगून टाकले. आयुष्य हे चुलीवरल्या कढइतले कांदे पाहे म्हणत म्हणत काही गाणी "जिदगी के रंग कई रे " म्हणत जीवनाची सफर घडवून आणतात,तर काही गाणी "जिंदगी, कैसी है पहेली हाये, कभी ये हसाये, कभी ये रुलाये---"म्हणत  वास्तवाची जाणीव करून देतात . तर काही "सुख दुःख दोनो, असलेल्या जीवनाच्या नावेची ओळख करून देतात.  थोडक्यात, जीवनात सुख,दुःख, आशा,निराशा हे खेळ सतत सुरूच असतात.. अशी कितीतरी उदा. देता येतील; पण हल्ली माझ्या मनात  घोळत असलेलं आणि माझ्या मनाचा ताबा घेतलेलं असं गाणं म्हणजे "आशा" सिनेमातील----

"अपना अपना हिस्सा है, अपना अपना किस्सा है
कोई लुट जाता है
कोई लूट जाता है----"हे गाणं.
 किती यथार्थ ओळी, नाही? प्रत्येकाचं प्राक्तन वेगळं, प्रत्येकाचे भोग वेगळे, प्रत्येकाच्या वाट्याला येणारी सुख-दुःख वेगळी, आनंद वेगळा आणि येणाऱ्या अडचणी देखील वेगळ्या.    आपल्या हिश्यात जे , जसे येईल ते, तसेच स्वीकारावे लागते.  हे प्रत्येकाला समजते, पण उमगत नाही हेच सत्य आहे.  कुठलाही कठीण प्रसंग ओढवला, मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण झाली तर आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडणारे वाक्य म्हणजे, "हे माझ्याच वाट्याला का? , माझ्याच हीश्यात यायच्या होत्या सर्व अडचणी?   मीच कोणतं असं पाप केलंय, की कुणाचं काही घोडे मारलंय म्हणून माझ्या वाट्याला हे असलं काही यावं?-----वगैरे,वगैरे--  --- तेच आनंदात, सुखात असताना माणूस असे सहसा कधीच म्हणणार नाही की माझ्याच वाट्याला इतके सुखाचे क्षण का म्हणून?  हा असा आनंद, असे सुख जगातल्या प्रत्येक  व्यक्तीला मिळायला हवे. मग आपणच स्वतःचं समर्थन करून घेणार की शेवटी हा प्राक्तनाचा भाग आहे. ज्याचे भोग त्यालाच भोगावे लागतात.  असो. "आशा" मधलं  लता दीदींनी गायलेलं हे गाणं--- त्यातील ह्या आर्त ओळी मनाला स्पर्शून जातात. "
कोई लुट जाता है
कोई लूट जाता है ---" ह्यातील दोन्ही ओळीतील "लूट" हा शब्द परस्परविरोधी अर्थ असलेला, पण जगण्यातील अवघा अर्थ, सारांश सांगून जाणारा---
लुट --- कुणी लुटलं जातं, असहाय्य पणामुळे, तर कधी परिस्थिती मुळे, कधी स्वभावामुळे. मोठा मासा लहान माश्याला गिळतो, तसे कमजोर व्यक्ती नेहमीच बलशाली व्यक्तींपुढे लाचार ठरतात. कधी मनाने तर कधी शरीराने.  सर्वस्व गमावून बसायची वेळ येते,होत्याचं नव्हतं होऊन जातं---लुटलाच  जातो ना माणूस?
लूट--- हिसकावून घेण्याची, बळजबरी गोष्टी प्राप्त करून घेण्याची क्षमता असलेली माणसे असतात काही.  ते मागचा पुढचा किंवा योग्य अयोग्य असा कुठलाही विचार करण्या पलीकडे गेलेली असतात. एखादी गोष्ट हवी असल्यास कुठल्याही मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात. ह्या गाण्यात जरी "संवेदनशील" मनाचा संदर्भ विचारात घेतला असला तरी शेवटी तो दोन परस्परविरोधी मानसिकतेत असलेला फरक आहे, हे लक्षात येते. कुणी लुटलं जातं तर कुणी लुटून नेतं---- अपना अपना हिस्सा है
अपना अपना किस्सा है-------

 हे झालं गाण्यांच्या संदर्भात. पण माणूस देखील कधी कधी नकळतपणे असं काही बोलून जातो की ऐकणारा अंतर्मुख झाल्याशिवाय रहात नाही.  क्वचित हेतुपुरस्सर तर क्वचित  अजाणतेपणी, पण विचार करायला भाग पाडतील अशी काही वाक्ये बोलली जातात.
 त्या दिवशी आम्ही उभयता आमच्या    कामानिमित्त रामदास पेठ मध्ये निघालो होतो. रस्त्याने जाताना ह्यांच्या मित्राच्या डॉक्टर  मुलांच्या हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दोन मिनिटं थांबलो, हे त्यांच्या मित्रांसोबत बोलले आणि आम्ही पुढे निघालो. मी सहजच म्हटले की ह्या लॉक डाउन च्या काळात चांगले काम लागले की तुमच्या मित्राला. बांधकामावर लक्ष ठेवण्याचे. लक्ष ठेवणेही होते आणि टाईम पास ही. त्यावर हे जे बोलून गेले त्यामुळे मी विचारात पडले. हे म्हटले, "तसेही उतारवयात बाप हा मुलाच्या घराचा  वॉचमनच  असतो." आम्हाला स्वतःला काही पूर्वानुभव असण्याची शक्यता नाही कारण आमच्या लेकाचे अजून लग्न व्हायचेय आणि आम्ही आमच्याच घरात वास्तव्यास आहोत.😊पण नकळतपणे जेव्हा अशी वाक्यं बोलली जातात,  तेव्हा त्यात खरोखर काही खोलवर अर्थ दडलेला आहे का  हा   चाळा ही मनाला लागून जातो. आणि मग सुरू होते, विश्लेषण--- आसपासच्या व्यक्तींविषयी, जवळच्या  नात्यांविषयी--- बाप आणि वॉचमन ? छे: कसंसच वाटतं नाही?  खरं सांगायचं तर कधी कधी "बाप" ह्या व्यक्तिरेखे विषयी कीव यायला लागते. कारण झाडून सारे कवी, लेखक, चित्रकार, "आई"च्याच प्रेमात बुडालेले असतात; पण बाप मात्र बहुतांशी दुर्लक्षितच असतो. त्याची मुलांवरची माया, प्रेम, काळजी करणं हे सगळं  पडद्याआड दडलेल्या कालावंतागत असतं. कदाचित त्याला मोकळेपणी, उत्स्फूर्तपणे व्यक्त होता येत नसल्यामुळे किंवा आपलं प्रेम बोलून दाखवता येत नसल्यामुळे म्हणा; पण तो कितीही झटत असला मुलांसाठी, तरी मुलांना आईची ओढ जास्त वाटते, तीच अधिक जवळची वाटते, हा बहुतेक घरातील अनुभव आहे.  आणि उतारवयात करण्यासारखे फारसे नसल्याने,शारीरिक  क्षमता कमी झाल्याने किंवा रिकामपण खायला येत असल्याने---अशा बऱ्याच कारणांमुळे तो आपला वेळ आवडत्या आणि नावडत्या कामातही घालवायला बघतो. ह्या सगळ्यात बाजारहाट करणे, नातवंडांना सांभाळणे, त्यांना बागेत खेळायला घेऊन जाणे, शाळेत नेऊन सोडणे, घराकडे आणि पर्यायाने नातवंडांकडे लक्ष देणे ही कामे ओघानेच अंगावर घेतली जातात, किंवा स्वखुषीनेही केली जातात; पण म्हणून का  तो        वॉचमन?😔  असा विचार येताक्षणी मला नजरेसमोर  "ह्यांचा " लेकाच्या दाराशी केविलवाणे होऊन बसलेला  चेहरा दिसायला लागला आणि अगदी भडभडून आले. छे:  आयुष्यभर रुबाबात राहिलेला, स्वतःच्या मनाने  ,स्वतःच्याच मर्जीने जगलेला माणूस, मग तो कुणी का  असेना, अगदी कुणीही---- शेवटपर्यंत त्याला मानानेच जगता यायला हवं,  वॉच मन ही कल्पनाच खूप विसंगत आहे. मी घरी आल्यावर निवांतपण असताना हे सगळं बोलून दाखवलं ह्यांच्या जवळ,तर खो खो करून हसायलाच लागले. 
"अरे देवा! धन्य आहेस बाई तू. कुठला विषय कुठे नेतेस? अग, मी तर अगदी सहजच बोलून गेलो." 
 मी पण  मनातल्या मनात कबूल केलं  ,"मला पण तर सवयच आहे ना, विनाकारण डोक्याला हात ?? मारून घयायची🤦‍♀️नव्हे, काम लावून घयायची.  आदत से मजबूर, काय करणार?"
 🙆‍♀️😔😃 असो. 

 आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. सरळ, साधं आयुष्य क्वचितच कुणाच्या वाट्याला येतं. हार-जीत, यश-अपयश, सुख -दुःख--सारख्याच ताकदीने पेलायला नी पचवायला मनही खंबीरच हवं. दुसऱ्याला सांगणं जितकं सोपं तितकंच स्वतः आचरणात आणायला कठीण अशा ह्या गोष्टी असतात. 
 असो.😊
तर एकंदरीत हे असं आहे. कुठल्या गाण्यावरून, कुठल्या वाक्यावरून मन कुठे कुठे उड्या मारून येईल आणि कधी  कशावर डोके आपटून घेईल, नेम नाही. तुमच्या बाबतीतही होतं का हे असं? कारण नसताना, फेरफटका?😃
 माणिक