Wednesday, October 14, 2020

अधीर झालोया, मग बधीर झालो

एक मुलगी परवा भेटायला आली. इंग्लिश शिकायचंय म्हणाली. कोर्सबद्दल चौकशी केली. मीही  तपशीलवार माहिती दिली. तिचा लगेच प्रश्न, " एका महिन्याच्या कोर्सनंतर मला पूर्ण इंग्लिश येईल ना? म्हणजे मी काहीही वाचू शकेन, समजू शकेन ना? आणि मी दुसऱ्यांना इंग्लिश शिकवू सुद्धा शकेन ना?"

मला हसावं की रडावं ते कळेना. 
आजकाल प्रत्येकाला सगळं काही इन्स्टंट हवं आहे. त्यासाठी पैसे मोजायची त्यांची तयारी आहे. पण कष्ट बिष्ट घेणे ही संकल्पना त्यांना माहीत नाही. संयम, धीर वगैरे शब्द त्यांच्या शब्दकोशातून हद्दपार झाले आहेत. सगळं काही मनात येताच पुरं व्हावं अशी अपेक्षा नव्हे, मागणी आहे. 'आज आत्ता ताबडतोब' हा एकच काळ समजतो आहे, जाणवतो आहे. 

आज जगून घ्या, पुढचं कुणी पाहिलंय? यासारखे विचार सोशल मीडियावर व्हायरलच नव्हे, पॉप्युलर होत चालले आहेत. हा विचार पहिल्यांदा मांडणाऱ्या व्यक्तीने ज्या उद्देशाने मांडला असेल, तो फार वेगळा असावा. भूतकालाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर वागवणारे किंवा भविष्याची  सतत चिंता करत वर्तमानातील आनंद उपभोगू न शकणारे काही लोक असतात. त्यांनी आपल्या आणि इतरांच्या वर्तमान आनंदाची विनाकारण वाट लावू नये यासाठी असे विचार त्यांना सांगितले जातात. 

मात्र याचाही अतिरेक करणारे अनेक जण अवतीभवती असतात. याच अतिरेकी विचारसरणीचं बाय प्रोडक्ट म्हणजे इन्स्टंट चा आग्रह. एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहणं, थांबणं यांना मान्यच नाही. साधं स्वयंपाक करताना सुद्धा पदार्थ शिजायला जो वेळ लागतो, तो द्यायची यांची तयारी नाही. मुलांना सगळं काही लगेच आलं पाहिजे, हे म्हणणारे यांचेच चुलतभाऊ असतात. आम्ही गावातल्या बेस्ट क्लास ला मुलाचं नाव टाकलंय, चांगले वीस हजार रुपये ताबडतोब भरलेत, मग तो साठ टक्क्यांवरून नव्वदवर लगेच पोहचला पाहिजे. यात त्या मुलाची बुद्धी, आकलनक्षमता, विषयाची आवड इ गोष्टी गौण असतात. मग पालकांची बुद्धी इ. चा तर विचारच करायचा नाही. पैसा फेको, तमाशा देखो, असं प्रत्येकच बाबतीत झालंय.

आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेणे ही केवढी जबाबदारी ची गोष्ट. मात्र त्यातही घाई. एकदा एका पालकत्वाच्या सेमिनारमध्ये मी पालकांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. एका पालकाने मला 'कमर्शियल आर्ट ' हे क्षेत्र मुलींसाठी कसं आहे आणि त्या क्षेत्रात त्यांच्या मुलीला नेमक्या काय आणि किती संधी उपलब्ध असतील याची माहिती मागितली. मी मुलीचा बॅकग्राऊंड, आवड इ ची चौकशी केली. त्यांनी मला तिची चित्रं (त्यांच्या भाषेत just a few sketches, showing her genius) दाखवली. मग "हा मोर बघा, मॅडम ,आणि ही तिची आवडती मांजर. विमान बघा कसलं काढलंय" इ सुरू झालं. मला त्यातलं काहीही ओळखता येईना. मात्र आपली चित्रकलेची समज इतकी कमी असेल, यावरही माझा विश्वास बसेना. शेवटी मी त्यांना विचारलं, 'ती सध्या काय करते' , तर त्यांनी अभिमानाने 'जस्ट सेकंडला गेलीय' असं सांगितलं. तरी मी निर्लज्जपणे "कुठे? जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये का?" असं विचारलं तर ती इयत्ता दुसरीत गेलीय आणि आत्तापासूनच करिअरची दिशा निश्चित करणं कसं आवश्यक आहे इ ज्ञान मज पामराला प्राप्त झालं. 

जी गोष्ट करिअरची, तीच लग्नाची. लग्न करायची घाई, मग ते मोडायचीही घाई. दोघांनीही एकमेकांना समजून घेण्यासाठी कितीतरी काळ लागतो, पण तेवढा वेळ आहे कुणाकडे? 
रस्त्याने दुचाकी चालवताना एवढा वेग, की जणू काही यांच्यावाचून भारत चीन संबंधातली आंतरराष्ट्रीय बैठक खोळंबलीय. मग कुणाला कट लागला, कुणी ज्येष्ठ नागरिक घाबरून गेले तर ते सर्व 'स्लो' असतात, हा निष्कर्ष निघतो. 

या अशा लोकांची मानसिकता आधी 'अधीर झालोया, मग बधीर झालोया' अशी होत चाललेली दिसते. मनोवेगाच्या वारूवर सैराट झालेले हे लोक आहेत. मीडिया आणि सोशल मीडिया मधून त्यांच्या विचारप्रवाहाला खतपाणी मिळतंय. ही वाटचाल नेमकी कोणत्या दिशेला सुरू आहे? 

नाही, मला घाई नाही, मी थांबायला तयार आहे, फक्त मला अभ्यासपूर्ण उत्तर हवंय.

Tuesday, October 13, 2020

बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है.....???

 " फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अँड मोस्ट इम्पॉर्टन्ट इंप्रेशन " असं म्हणण्याच्या पद्धतीनुसार व्यक्ती नेहमीच आपलं इंप्रेशन जपण्याकरता स्वतःला टिपटाप ,नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करत असते .आपणसुद्धा प्रथमदर्शनी कुठलीही व्यक्ती बघून पेहेराव, राहणीमान यावरून तिच्या  व्यक्तीमत्वाला जाणण्याचा प्रयत्न करत असतो .  एखाद्या व्यक्तीचे कपडे , रंगरंगोटी  ,वेशभूषा - केशभूषा बघून काही एक मत आपलं त्या व्यक्तीबद्दल तयार होत असतं . गंमत म्हणजे कित्येकदा नावांवरून, आडनावावरूनही आपण व्यक्तीबद्दल मनातल्या मनात अंदाज बांधायला लागतो.  खरं तर हा आपल्या मनाचा एक वेगळाच खेळ असतो आणि कधी कधी आपण लावलेले अंदाज साफ चुकलेले आहेत असं नंतर आढळून येतं .मला व पु काळे यांच्या कथाकथनातलं एक वाक्य आठवतं की " ज्यांचं आडनाव पटवर्धन असतं ते एक्झॅक्टली  रीसबुडांसारखे का दिसतात ? " तर असंच आपण बांधलेल्या आडाख्यांचंही होतं .

           एकूणच काय तर समोर येणाऱ्या माहितीवरून आपण थोडंफार अनुमान लावण्याचा प्रयत्न करत असतो ,की एकूण हे व्यक्तिमत्व कसं असेल? म्हणूनच समोरच्या व्यक्तीचं निरीक्षण करणं किंवा तिच्याबद्दल न बोलताच जाणून घेणं यासाठी देहबोली विज्ञानाचा उदय आणि विकास झाला आहे .त्यात आता एका नवीन संकल्पनेचा उदय गेल्या काही वर्षांपासून झाला आहे. ही संकल्पना आहे " डिजिटल बॉडी लैंग्वेज " नावाची. डिजिटल बॉडी लैंग्वेज म्हणजे काय ?आणि त्यावरून एखाद्या व्यक्तीबद्दल आपण अनुमान कसे लावतो ? याचे रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे व्हाट्सअपच्या डीपी वरून किंवा फोनच्या स्टेटस वरून आपण व्यक्तीबद्दल काही विशिष्ट अनुमान लावतोच की नाही?एखादी व्यक्ती हसतमुख,मनमिळावू असेल किंवा नाही हे एकदा पाहिलेल्या फोटोवरून ठरवण्याचा प्रयत्न करतोच की नाही?खरं तर आपण सर्वोत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आहोत असं भासवण्याचा प्रयत्न  कळत नकळत सगळेच करत असतात. भेटीतून असो की डीपी,फेसबुक प्रोफाईल असो ,फ्रेश दिसायला,खूष दिसायला सगळ्यानाच आवडत असतं.
               अलीकडे फोनचा डीपी, फेसबुकचे प्रोफाईल याबाबत लोक बरेच जागरूक असायला लागले आहेत,काळजी घेऊ लागले आहेत. विशेषतः युवापिढीत याबाबत खूप निरनिराळ्या  कल्पना  आहेत . मी माझ्या विद्यार्थी समूहामध्ये खूपदा असं बघितलं आहे की ,जेव्हा कॉलेजमध्ये  शांतता आणि एकांत असतो ,अशावेळी काही मुलं मुद्दाम कॉलेजला येतात , मग अंगणातल्या हिरवळीवर किंवा व्हरांड्यात उभं राहून ; पिलरला टेकून किंवा चक्क  गाडीच्या सीटवर लोळून, गॉगल लावून ,गॉगल काढून, कमरेवर हात ठेवून ,वगैरे वगैरे फोटो काढले जातात आणि हे फोटो काढण्यासाठी मुलं आपल्याबरोबर आपल्या मित्रांनाही घेऊन येतात .आणि मग काढलेल्या फोटोतून त्यातल्या त्यात "  हॉट "  फोटो सिलेक्ट करून तो डीपी म्हणून,  फेसबुक स्टेटस म्हणून ठेवला जातो . त्याला अनेक कमेंट्स आणि लाईक्स मिळतात. पण हे समाधान दोन किंवा तीन दिवस टिकतं.आणि मग परत शांत वेळेला कॉलेज गाठावं  लागतं ,नवनवीन डीप्यांची सोय करण्यासाठी !! मी  जाता येता असे लडिवाळ  " सोहळे "अनेकदा पाहिले आहेत. युवा पिढी मधील मित्र-मैत्रिणी या फोटोंवरून खरोखरच एकमेकांबद्दल अंदाज बांधत असतात .तसही फोटो काढणार्‍या व्यक्तीला आपला टार्गेट ग्रुप माहित असतो .कोणासाठी हे फोटो स्टेटस मध्ये डीपी मध्ये ठेवले आहेत, याची त्या व्यक्तीला पूर्ण जाणीव असते. त्यांना खूप अपेक्षित फीडबॅक सुद्धा बरेचदा मिळत असतात.  पण त्यामुळे  होणारी गंमत अशी  आहे की " हॉट " नसणारी मुलंमुली सुद्धा " हॉट"  वाटू लागतात . तसंच कुटुंबवत्सल नसणारी व्यक्ती सुद्धा फार प्रेमाने कुटुंबातील व्यक्तींसोबत रहात आहे ,असा अंदाज लावता जातो .काही महाभाग(त्यांना खरंच या कला अवगत आहेत असे सन्माननीय अपवाद सोडून) स्टेटस मध्ये  स्वतःचं गाणं किंवा नृत्य टाकून आपण प्रचंड खूष असल्याचा संदेश देत असतात. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती अगदीच याविरुद्ध असते . डिजिटल बॉडी लँग्वेजचं विज्ञान नेमक्या या तफावतींवर काम करतं.कधी पुस्तकांचा ढीग फोटोत दिसतो ,तर कधी घाम येईपर्यंत व्यायाम केल्याचा अविर्भाव असतो.पण खरंच दमछाक होईल इतका अभ्यास,व्यायाम केला असतो का? तर मुळीच नाही! खरीखुरी चित्रणं यात नसतात बोचदा.मला तर आज पर्यंत कोणतीही व्यक्ती डीपी किंवा स्टेटस मध्ये नाराज किंवा उदास पाहिल्याचंही आठवत नाही. याचा अर्थ असा आहे का की कोणीच नाराज किंवा उदास कधीच नाही ? प्रश्नच आहे खरा! . " भावासाठी क्काssय पन " असं स्टेटस ठेवणारा मुलगा प्रत्यक्षात आपल्या भावाशी,मित्राशी  कडकडून भांडणारा असू शकतो . " रिलेशनशिप्स आर मोअर इम्पॉर्टंट  दॅन इगोज्  " असं स्टेटस् ठेवणारा माणूस प्रत्यक्षात मात्र भयंकर  रागीट- अहंकारी आणि त्यामुळे नाती तोडून टाकणाराही असू शकतो.  कडेवर-  खांद्यावर आपल्या छोट्या मुलीला घेऊन हौसेनी फोटो काढून तो डीपी किंवा स्टेटस मध्ये ठेवणारा माणूस, आपल्या मुलीच्या संगोपनाची,तिला सांभाळण्याची जबाबदारी घेत असेलच, असं सांगता येत नाही. लॉकडाऊनच्या काळात तर केर काढण्याचे ,स्वतः चहा करत असल्याचे - स्वयंपाक करत असल्याचे फोटो(विशेषतः पुरुषांचे) मुद्दाम स्टेटस मध्ये किंवा फेसबुक वर शेअर केले गेले . याचा अर्थ ही माणसं घरातली जबाबदारी घेत असतीलच असं सांगता येत नाही . " नाssssद  नाssssय  करायचा!!  " असं स्टेटस ठेवणारी माणसं प्रत्यक्षात भित्रट,पळपुटी नसतील  हे कशावरून?  पुलंच्या कथाकथनात एक किस्सा आहे की, त्यांच्या मित्राने ट्रीपला गेल्यावर , नेपाळी गुरखा लोक जवळ ठेवतात तशी कुकरी आणली ! पु लं यावर मिष्कील  टिपणी करतात,"  की पोस्टमनला पाहून चळाचळा कापणारा आमचा हा  मित्र या कुकरीचं काय करणार आहे ? हे देवच जाणे! पण येता-जाता ज्याला-त्याला ती कुकरी दाखवून शूरपणाचा आव आणून त्यानी आम्हा सगळ्यांना मात्र अगदी वात आणला होता !"  अगदी अशाच प्रकारे मैत्रीचा ,सिंसियर असल्याचा, कुटुंबवत्सल असल्याचा ,आणि विशेषतः खूप आनंदी असल्याचा मुखवटा घालून , तसं भासवून माणसं कधीकधी वात मात्र खरंच आणत असतात. डिजिटल बॉडी लँग्वेजचं विज्ञान या खऱ्या खोट्याची शहानिशा सहजतेनी करू शकतं.  खऱ्याखुऱ्या भावना फोटोत चित्रित केल्या असत्या, आणि त्यासकट फोटो डीपी किंवा स्टेटस मध्ये ठेवले असते, तर सुशांतचं उद्या  काय होणार आहे?  हे आदल्या दिवशीच्या त्याच्या फोन स्टेटस वरूनच आपल्याला कळलं नसतं का? यावरून आपण नक्कीच विचार करू शकतो.


              काही लोक उधार उसनवार स्टेटस ठेवतात .एकदा मी माझ्या मैत्रिणीचे स्टेटस वाचले त्यात सुंदर अशा निसर्गदृश्याखाली काहीतरी मनाला स्पर्श करणारा मेसेज लिहिला होता. मात्र मी त्या फोटोवर बोटे टेकवून थोडं स्क्रीनवर हलवून पाहताच वरच्या भागात मला माझ्या मैत्रिणीच्या  नावाबरोबर " राजा ,नागपूर " अशी अक्षरं ओव्हरलॅप झाल्यासारखी  दिसली .मी माझ्या मैत्रिणीला
," राजा ... फ्रॉम नागपूर कोण आहे ? "असं विचारताच ती भडकली.  मी तिची मैत्रीण असताना ,तिला न सांगता, मी तिच्या  ओळखीच्या "  राजा ,नागपूर "  ला कसं काय ओळखते? असं वाटून ती माझ्याशी कडकडून भांडायला लागली.मी शांतपणे जरा वेळ तिचं आकांडतांडव ऐकून घेतलं आणि  हसून तिला सांगितलं की " राजा कोण हे मला माहीत नाही,पण त्या  राजाचं स्टेटस तुला आवडलेलं दिसतंय . कोणाचं आवडलेलं स्टेटस , स्वतःच्या फोनचं स्टेटस म्हणून  ठेवायचं असलं , तर, स्क्रीनशॉट काढल्यावर निदान नीट  क्रॉप तरी करायला नको का? तुझं स्टेटस पाहून ते तुझं नाही तर  कुठल्याशा राजाचं आहे,हे कळतंय ना सुंदरे !! "  तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं ,की मला काय म्हणायचं आहे !                     
                एकदा एका वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ मी एका व्यक्तीच्या स्टेटस मध्ये पाहिला, त्याचीही गोष्ट सांगूनच टाकते.  ऑलरेडी लावलेलं आणि छान वाढलेलं,आळं करून ठेवलेलं झाड होतं ते ,ज्याच्या जवळ ही व्यक्ती पोझ देऊन  " फावडं "  घेऊन उभी होती. आणि खाली वाकून ती समोरच्या मुलांना विचारत होती की "रेडी का रे? "  मग व्हिडिओमध्ये न दिसणाऱ्या मुलांचे,  "हो हो "  असे आवाज आले . आणि मग वृक्षारोपणवाल्या व्यक्तीने जीव नसल्यासारखं उगाच काहीतरी जमिनीला त्या फावड्याने खाजवायला सुरुवात केली . लगेच वर पाहून " झालं का रे?" असं पण विचारलं .पुन्हा मुलांनी " हो " म्हटलं .आणि व्हिडिओ बंद झाला. हा व्हिडिओ निदान  थोडा एडिट करायचा, किंवा आपण व्हिडिओ लोकांसमोर पाठवतोय  तर निदान स्वतःच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरतं तरी नीट वागायचं नं?  एवढं सुद्धा भान व्हिडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीला नसतं का?   यातून तुम्ही किती नाटकी आहात हे देखील कळतं आणि तो नाटकीपणा झाकायचा तुम्ही प्रयत्न सुध्दा करत नाही आहात, हे देखील कळतं .
       म्हणूनच या जगाला " आभासी जग " असा शब्द देणार्‍याचं कौतुकच केलं पाहिजे. एकूणच हा सगळा वरवरचा मामला आहे, आभासाचा पसारा आहे . ज्याला या आभासी जगातलं व्यक्तिमत्त्व आणि प्रत्यक्षातलं व्यक्तिमत्त्व यातलं अंतर कळत नाही, त्याची फसगत नक्की होऊ शकते.

 
          हा आभासाचा पसारा जरा तरी आवरता यावा म्हणूनच डिजिटल बॉडी लैंग्वेज नावाचा अभ्यास उदयाला आला असावा .डिजिटल बॉडी लँग्वेज मध्ये तुम्ही डिजिटल माध्यमातून जगाला कसं दिसण्याचा किंवा काय भासवण्याचा प्रयत्न करत आहात , त्याचा तर अभ्यास केला जातोच ,पण सत्यता - वास्तव आणि आभासी चित्र यातील गॅप्स शोधण्याचा प्रयत्नही केला जातो.  उदाहरणार्थ हसर्‍या चेहर्‍याकडे बघतांना व्यक्तीच्या ओठांची टोकं वर वळली आहेत का? आणि डोळे जरा बारीक होऊन डोळ्याभोवती हलकी तरी रेषांची जाळी दिसते आहे का ? यावरून फोटोतील स्मितहास्य हे खरंखुरं हास्य आहे की नुसतं " स्माईल प्ली    ssssज " वालं हास्य आहे , याचा पत्ता अभ्यासकांना बरोब्बर लावता येतो. उभं राहण्याची पद्धत कशीही असली तरी हात कसे आणि  कुठे ठेवले आहेत ? हाताची बोटं,हालचाली, चेहऱ्यावरचे भाव , डोळे या सगळ्या गोष्टीं एकमेकांशी मॅच होत आहेत  किंवा नाही ? यावरून व्यक्तीच्या संदेशातील खरेखोटेपणा शोधता येतो .
      डिजिटल बॉडी लँग्वेजचे अभ्यासक डिजिटली प्रदर्शित केलेल्या छबीचे नीट विवरण करू शकतात. याबरोबरच  लॅपटॉप वापरताना सुद्धा एखादी व्यक्ती कुठल्या पद्धतीने बोटं कि-बोर्ड वर फिरवते, किंवा टेबलावर तिनी तिचं कोपर कसं टेकवलेलं असतं ,किंवा स्क्रीन वरचे मेसेज वाचताना व्यक्तीचे चेहऱ्यावरचे भाव कसे कसे असतात , या वरून सुद्धा डिजिटल लैंग्वेज अभ्यासकांना एकूण एक पत्ता व्यक्तिमत्वाबद्दल लागत असतो.  एखाद्या ई मेल किंवा मेसेजला व्यक्ती काय उत्तर देते किंवा उत्तरच देत नाही किंवा उत्तर द्यायला किती वेळ घेते यावरून सुद्धा अभ्यासक अंदाज लावतात ,आणि निष्कर्ष काढतात. एखाद्या व्यक्तीचा व्हीडीओ  बारकाईने पाहून, त्यातल्या व्यक्तीच्या हालचाली आणि चेहऱ्यावरचे हावभाव, डोळे बघून , त्या व्यक्तीबद्दल एक ठाम मत तयार करू शकतात.  कार्पोरेट सेक्टरमध्ये तर आता इंटरव्यू पॅनलवर डिजिटल बॉडी लैंग्वेज स्टडी करणारा माणूसही असतो. तो उमेदवाराच्या ईमेल आयडी मध्ये किती स्टार्स,कोणते नंबर्स आहेत, इथपासून तर उमेदवाराच्या फोनच्या, फेसबुकच्या प्रोफाइल फोटो-  स्टेटस पर्यंत सगळ्याचा अभ्यास करून त्या व्यक्तिमत्वाबद्दल पक्के अंदाज लावू शकतो . किती वेळात कशाप्रकारे कोणकोणत्या मेसेजेस आणि ई मेलला कशी  उत्तर पाठवली आहेत ,यावरूनही अंदाज लावू शकतो. मेलमध्ये वापरलेली भाषा आणि शब्द यावरून स्वभावाबद्दल अंदाज बांधू शकतो . ऑनलाइन इंटरव्यू मध्ये व्यक्ती कॅमेर्‍याला कसे फेस करतेय,त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ,डोळे काय बोलतात ? यावरून व्यक्तिमत्वाची नीट पारख करू शकतो.  लॅपटॉप, माऊस किंवा मोबाईल या वस्तू  उमेदवार कसा हाताळतो ? त्याच्या बोटांची पकड कुठे कशी आहे ? यावरून तो पुढे कितपत जबाबदारीने काम करेल, याचाही अंदाज लावता येतो .आणि याच सगळ्या अभ्यासाला ' डिजिटल बॉडी लैंग्वेज स्टडी'  असं म्हणतात .या विद्याशाखेचा बोलबाला असण्याचेच दिवस आहेत सध्या.तेव्हा आता आपण फोन कसा वापरतो?  कीबोर्ड कसा हाताळतो? आपला डीपी काय आहे ? स्टेटस काय आहे ? कोणी त्यावर कौतूक किंवा कमेंट केल्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो? आपण नेमकं काय भासवण्याचा प्रयत्न करतो? याकडे जरा बारकाईने बघू यात का यानंतर??म्हणजे बघायलाच हवं......

( लेखातील सर्व  अनुभव आणि प्रसंग काल्पनिक  आहेत .कोणाला कुठल्या घटनांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!?!.......)

सितादही


पिका मंदी पिक प-हाटी पिकली

तिच्या वस्त्रानं सारी दुनिया झाकली

             - लोककवी डॉ. विठ्ठल वाघ
   
प-हाटी...! कापूस...! व-हाडचं लेनं...! पांढरं सोनं...! ज्याच्या माथी इथला शेतकरी राजा होतो..., तो कापूस! 
कापूस म्हणजे पानावरील चुना
कापूस म्हणजे उरूस
कापूस म्हणजे चंद्राचं कमळ
कापूस म्हणजे लक्ष्मीचं रूप
कापूस म्हणजे विधात्याने निर्माण केलेले मातीच्या वैभवाचे रूप
    असा हा कापूस शेतात आंगोपांगी बहरतो. बोंडाच्या आडून टचटचून बाहेर पडलेला हा पांढराशुभ्र साज नजरेला सुखावतो, तेव्हा शेतकऱ्याला वेध लागतात ते त्याच्या वेचण्याचे! कापसाचा वेचा करायचा तर त्यासाठी तयारी करावी लागते. तयारी कशाची? मुहूर्ताची! सितादहीची!  सितादही हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेव्हा, वाटलं होतं बोलणार्‍यांनं चुकीचा उच्चारला असेल. पण चूक त्यांची नव्हती. माझ्या शहरी मानसिकतेचा तो घोटाळा होता. माझ्या नागरी मनाला हे प्रादेशिक वैशिष्ट्य माहितीच नव्हतं. निसर्ग आणि भूमी यांच्याशी असणारं नातं कुठेतरी दुरावलेलं असताना ग्रामजीवनातील हा 'सितादही सोहळा' मला कसा माहीत असावा?
    खरंय! आमची रसरशीत जिवंतपणा असणारी ग्रामसंस्कृती हरवत चालल्याची तक्रार आम्ही नेहमी करतो आणि तिचे धागेदोरे शोधायचे तर फक्त ओवी गीतांपर्यंतच जाऊन थांबतो. पण त्याही पलीकडे असणाऱ्या या ग्राम लोकरितींचा आम्ही फारसा शोध घेत नाही. काय नाही या लोकरितीत? कृषी जीवन आणि निसर्गाच्या एकरुपत्वाचं दर्शन त्यात होतं. त्यातूनच निर्माण होतात समाजधारणा आणि लोकजीवनाच्या श्रद्धा परंपरा!त्याचं परिवर्तन होत असतं, 'सितादही' सारख्या ग्राम पूजाविधीमध्ये! हे लोकसंस्कृतीचे पूजाविधी आहेत. यात निसर्गातले दगड, माती, पान-फुल, साल यांचा आपसूक समावेश झालेला दिसतो. माणसाला जगण्याची उमेद देणारे हे विधी असतात. ते संस्कृतीच्या आधारे समाजाला सुख-समृद्धी प्रदान करण्याची परंपरा निर्माण करत असतात. भूमी हीच या विधीमध्ये केंद्रस्थानी असते. तिला स्त्री रूप समजून तिची पुजा करण्याची प्रथा व-हाडातच नव्हे तर सर्वत्र आढळते.
     मराठवाड्यात ती पौष/ माघात 'नव्याची पुनव' म्हणून साजरी होते. "चावर चावर चांगभले" म्हणत, भूमीला नैवेद्य नारळ अर्पण करत हा पूजा विधी संपन्न होतो. तर कर्नाटकात नव्या ज्वारी-बाजरीचे पीक घेऊन अंगावर घोंगडे पांघरून, "वलऽघे, वलऽघे" असा उद्घोष करत शेताला प्रदक्षिणा घातली जाते. ओरिसात 'नुआखाई' म्हणजे हंगामातील पहिल्या भाताची कापणी करताना कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. ही नुआखाई भाद्रपदात केली जाते. त्यावेळी भात आणि खीर भूदेवतेला अर्पण करण्याची प्रथा आहे. द. ता. भोसले यांच्या लोकसंस्कृती विषयक पुस्तकात  हे विधी वाचताना मला कुठेतरी 'सितादही'शी त्याचं साम्य जाणवलं. म्हणून मग मी शोध घ्यायला सुरुवात केली.

किती करावं कवतिक मन हरिकलं बाई
आज माझ्या वावरात आहे गड्या सितादही
अशी प-हाटी फुलली आंगोपांगी बहरली
त्यात शोभून दिसते माही ईठाई माऊली
दहीभाताचं हे बोनं वावरात शिपडलं
काया धरतीच्या पायी आज नारय फोडलं
शिरनी वाटताना मन हुरळून जाई
ओटी कापुस येचता याद माहेराची येई
                            - मीराताई ठाकरे

 

   ही कविता सितादहीचा पूजाविधी सांगत होती पण त्याचा कार्यकारणभाव मात्र कळत नव्हता. विचार करता लक्षात आलं की, आपल्या कृषी जीवनात भूमीचे महत्त्व आहे तसंच स्त्रीचं सुद्धा महत्त्व आहे. फ्रेझर म्हणतो, स्त्री मनुष्याला जन्म देते, तिच्या ठिकाणी सुफलीकरणाची अद्भुत शक्ती असते.  'A fruitful woman makes plants fruitful, a barren woman makes them berren'  हे तत्व कृषी जीवनात महत्त्वाचं मानलं गेलं असावं. म्हणूनच शेतीत काही पूजा विधि हे स्त्रियांकडून, विशेषतः लेकुरवाळ्या स्त्रियांकडून करून घेतले जातात. त्यापैकी एक आहे, सितादही!
शेताच्या मालकिणीनं ही पूजा करायची, असा संकेत आहे. ही पूजा दशमी, बारस, बुधवार किंवा रविवार या दिवशी करतात. ज्या दिवशी कापूस वेचा करायला सुरुवात करायची आहे, त्याच्या आदल्या दिवशी ही घरधनीन गायीच्या दुधाचं छान प्रकारे दही विरजवायला ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी हे विरजलेलं घट्टसर दही आणि मऊसर शिजवलेला भात तसंच, शेतात काम करणाऱ्या स्त्रियांच्या जेवणाची शिदोरी... अशी तयारी करून, हे सगळं घेऊन शेतात जातात. तिथे गेल्यावर सात गोटे (छोटे छोटे दगड) एका रांगेत ठेवल्या जातात. त्या गोट्यांना न्हाऊ माखू घालून त्यांची पूजा केली जाते. कणकेचे सात दिवे, सात नैवेद्य ठेवले जातात. आरती केल्या जाते. प-हाटीच्या दोन झाडांच्या आधारे झोळीचा, पिवळ्या कापडाचा पाळणा बांधला जातो. त्या पाळण्यात प-हाटीच्या फुलाचा गोपा करून ठेवतात. पिवळ्या कपड्याचे सात छोटे छोटे तुकडे करून त्यात कापसाचे बोंड टाकून गाठोडे बांधतात. ते सात गाठोडे पाळण्या शेजारी ठेवल्या जातात. नंतर प-हाटीच्या झाडाची खणानारळाने ओटी भरली जाते. घर मालकीण आणि शेतात वेचा करायला आलेल्या मजूर बायका ही पूजा करतात. "घर धनधान्यानं भरून जाऊ दे" हे मागणं मागतात. दहीभाताची शितं शेताच्या चारी बाजूला फेकतात आणि त्यावर पाणी शिंपडतात. काही ठिकाणी अशा प्रकारची पूजा एकाच शेतात करण्याची प्रथा आहे. कोरकू आदिवासी मात्र अशा प्रकारची पूजा त्यांच्या प्रत्येक शेतात करतात. हा सगळा पूजा विधि मला, माझी जावू शोभा, नणंद गंगाबाई, सत्यभामा आणि भाच्चे सून रजनी यांनी सविस्तर सांगितला. शोभाला त्यामागचा कार्यकारणभाव माहित नव्हता. पण सत्यभामा म्हणाली की, "हे सात दगड म्हणजे सप्तमातृका शक्तीचे प्रतीक आहेत. आपल्या संस्कृतीत... साती आसरा, मरीआई, म्हसोबा, वेताळ बाबा, सिदोबा अशा देव-देवता कोणत्याही प्रकारचं अरिष्ट निवारण व्हावं, म्हणून  लोकमानसाने स्वीकारलेल्या आहेत. त्यातीलच सात आसरांचे प्रतीक म्हणून हे सात दगड मांडले जातात. त्यांची पूजा केली जाते. त्यांची पूजा म्हणजे जी आसरा माता असते तिचीच पूजा! त्याचंच हे रूप आहे. गंगाबाई म्हणाल्यात की, "ही जी दहीभाताची शितं शेताच्या चारी बाजूला फेकली जातात त्यावरूनच हे शितं व दही असं म्हटल्या जात असावं. "सितला दहीच ते अपभ्रंश रूप होत होत 'सितादही' झालं असावं", असं माझी भाच्चे सून, रजनी म्हणाली. दहीभातच का? तर गंगाबाई सांगतात, "त्याचा रंग पांढरा आहे आणि कापूसही पांढरा असतो. या दही भाताप्रमाणेच शेतभर कापूस दरवर्षी फुलावा, ही मनोकामना या पूजेद्वारे करत असावेत." 
     कापसाच्या झाडाला पाळणा बांधून गोपा का करत असावे? तर त्यामागे लोकजीवनात रुजलेली सितेच्या जन्मकथेची श्रद्धा आहे.
     कारणंं काहीही असो, पण ग्रामीण भागातला हा एक महत्वाचा पूजाविधी आहे. पूजा झाल्यावर नारळ फोडून त्याची 'शेरणी' म्हणजे प्रसाद वाटला जातो. नंतर कापूस वेचायला प्रारंभ होतो. पहिला वेचा, किलो दीड किलोचा एका पिवळ्या कापडात बांधतात. त्याला 'लोथ' म्हणतात. ती 'लोथ' जपून घरी आणल्या जाते. घरातला सगळा कापूस विकल्या जाईपर्यंत ती 'लोथ' जपतात.  दिवसभराचा वेचा झाला की कापूस घरी आणल्या जातो. पहिल्या दिवशी तागड्या गोट्याची पूजा केली जाते आणि कापूस मोजतात. दिवसभराची मजुरी मजुरांना मिळते. घरी आणलेली ती 'लोथ' जपून ठेवल्या जाते. त्यातील कापसाचा उपयोग देवासाठी वाती तयार करण्यासाठी होतो.

संसाराचा गाडा कापसाच्या माथी
उजळती वाटा जळताना वाती
    - लोककवी डॉ. विठ्ठल वाघ

या 'लोथ' बद्दल सांगत असतानाच माझा पुतण्या सचिनला एकदम राशीच्या पूजेची आठवण आली. आता 'सितादही'च मला माहिती नव्हती तर राशीची पूजा कुठून माहित असेल? मग गंगा बाई म्हणाल्या, "पूर्वी थ्रेशर वगैरे नव्हते तेव्हा शेतात खळं तयार करायचे. त्याद्वारे ज्वारी तयार व्हायची. शेतात ज्वारीचा गंज लागला की घरातून पाटी दिवा आणि शेणाचे पाच पांडव व एक धुरपदी करून न्यायची. ते दसऱ्याला आधीच तयार केले जायचे. वाळून तयार असायचे. मग ही पाटी ज्वारीच्या गंजावर ठेवून त्याची पूजा केली जायची. तो दिवा तिथे ठेवून त्या पाटीत पोहरा 2 पोहरे ज्वारी भरून, परत त्यावर दिवा ठेवून ते घरी आणलं जायचं. शेणाचे पाच पांडव आणि एक धुरपदी अंगणात एका बाजूला ठेवून त्यांची पूजा केली जायची आणि पाटी भरून आणलेली ज्वारी, देवाधर्मासाठी आंबील करायला किंवा दान देण्यासाठी उपयोगात आणल्या जायची. दसऱ्यापासून या रास पूजेची तयारी केल्या जायची... ते गाई गोंदणाच्या पूजे पूर्वी पूर्ण व्हायची", गंगाबाई हे सांगत असतानाच आमच्या सचिनला आठवलं की, किसन आबा ही ज्वारी धानो-याच्या देवाला पाठवायचे. मात्र आता ते 'खळं' ही राहिलं नाही आणि ती 'रासपूजा' ही होत नाही. ही प्रथा जरी नामशेष झाली असली तरी 'सितादही' मात्र आजही सर्वत्र मनोभावे केल्या जाते. 
   नव्याचं आकर्षण आणि जुन्याचा अभिमान हा मानवी स्वभाव आहे. निसर्ग पूजेच्या निमित्तानं तो जपल्या जातो आहे. तसंच या लोकरितीच्या निमित्तानं पूजा अर्चने द्वारे मिळणारे भूमीचे आशीर्वचन लोक मनाला सुखावताहेत. समृद्धी आणि सृजन प्रक्रियेशी निगडीत या लोकरिती म्हणजे पुढल्या पिढीसाठी जगण्याच्या वाटा ठरत आहेत...
                           -सीमा शेटे (रोठे), अकोला.