Tuesday, July 14, 2020

आमदार सौभाग्यवती

शेवटी दुर्दैवानी आमच्या इकडल्या एका आमदारांना कोरोना झाला।
        आमदार खरं तर सुविद्य होते( हा शब्द नेहमी सुविद्य पत्नी असा येतो वाचनात । त्यामुळे वेगळं वाटलं का जरा? की आमदार शब्दाशी पटत नाही या शब्दाचं , म्हणून वेगळं वाटलं? वेगळं वाटलं  एवढं मात्र खरं।असो) तर एक तर ते आमदार होते । दुसरं ते सुविद्य होते।तरी कसा झाला कोरोना त्यांना? काळजी नाही घेतली का? स्वच्छतेचं महत्वं कळत नव्हतं का? हातावर पोट असणाऱ्यांना पडावंच लागलं बाहेर। पण आमदार कशाला आपल्या घराबाहेर,की बंगल्याबाहेर,की महालाबाहेर, पडले? सोशल/ फिजिकल डिस्टंसिंग चा विसर पडला का त्यांना? की विरोधी पक्षाच्या लोकांनी काही गडबड केली? विरोधी पक्ष म्हणजे ज्या पक्षात ते आधी होते आणि तिकीट मिळालं नाही म्हणून तो पक्ष सोडून दिला  तो का ?की आता ज्या पक्षात ते आहेत,त्या पक्षाचे विरोधक? की पक्षातलेच  अंतर्गत विरोधक?  की अजून कोणी ? काय झालं काय नेमकं? 
              एक एक प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू या ।काळजी घेतली नाही का त्यांनी? तर घेतली।भयंकर काळजी घेतली। खानपानाची काळजी घेतली। प्रोटीनयुक्त आहार घेतला। पोटातले व्हायरस मरावेत म्हणून अल्कोहोलयुक्त काढे घेतले। स्वच्छतेची काळजी ? ती तर खूपच घेतली।कपडे स्वच्छ पांढरे। प्रतिमा एकदम स्वच्छ। डी पी ला सुद्धा अगदी डाग नाही। हात तर वीस सेकंदांपेक्षा जास्त वेळ  चोळायचे ते। एवढ़े तर तिकीट नाही मिळालं तेव्हाही नसतील चोळले त्यांनी । धुतले पण वारंवार । निवडणूकीच्या काळात जसे कार्यकर्त्यांच्या मागे हात धुवून लागायचे ते , तसेच सतत हात धुतले त्यांनी। हातावर पोट नाही म्हणा त्यांचं। पण हे लौकीकार्थानी। शाब्दिक  अर्थ घेऊ जाता थोडी फार परिस्थिती आहे तशी । पण मला सांगा , जनतेच्या उदंड तक्रारी ,कार्यकर्त्यांच्या लाखो चुका पोटात घालायच्या तर हातानी सावरण्याइतका घेर तर होणारच नं पोटाचा? त्यात काय एवढं?  शिवाय हा काही मुद्दा नाही कोरोना होण्यातला । बरं मग  सोशल फिजिकल डिस्टंसिंग चं काय? अहो,एवढं कळत नाही की काय त्यांना? फक्त ज्या जनतेला त्यांनी नेहमी उराशी पोटाशी धरलं तिला एकदम दूर कसं सारायचं? असं झालं असेल त्यांना केव्हा केव्हा। त्यातही आपण  अल्कोहोलयुक्त काढे बिढे घेत आहोत आणि ती जनता बिचारी तशीच  उपाशी तापाशी । या भावनेतून पडला ही असेल विसर एखाद्या वेळी डिस्टंसिंगचा। म्हणून काय झालं नं? व्हायरस ला काय एवढंही कळू नये की काय?  विरोधी पक्षाचं मात्रं काही सांगता येत नाही। मुळात विरोधी पक्षं कोणता हेच सांगता येत नाही।त्यामुळे त्यांच्या कुठल्या अफवांमुळे किंवा कारवायांमुळे झाला असावा का कोरोना ते ही सांगता नाही येत । तसंही अफवा आणि व्हायरस सारखेच पसरतात म्हणे। शिवाय काहीही  खूप पसरलं की आजकाल त्याला व्हायरल झालं असंच म्हणतात म्हणे। असो ।
          कारण काहीही असो। आमदारांना कोरोना झाला एवढं मात्रं खरं ।आमदार सौभाग्यवतींनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली की " वो तो होना ही था । यहाँ कौन किसकी सुनता है? " नेमकं काय म्हणायचं होतं त्यांना कोणास  ठाऊक...
            पण आमदार दवाखान्यात भरती झाले।आणि व्हॉट्स अॅप एफबी,पेपर बिपरातून लेख झळकले की " जनतेची सेवा करणाऱ्या सुविद्य  आमदारालाही नियतीने सोडले नाही ।" लेखांचा सारांश असा की कोरोना काळात आमदारसाहेबांनी काहीही बंद ठेवले नाही।( भलता अर्थ घेऊ नये। )  जनतेच्या कल्याणासाठी महत्वाचे दौरे,भेटीगाठी वगैरे सातत्यानी सुरू होते । सॅनिटायझरचे निःशुल्क  वितरण,मास्कचे निःशुल्क  वितरण ,औषधी वाटप,काढ्याचे निःशुल्क वाटप असं सगळं पण सुरू होतं।  पक्षाचा पैसा नाही झाला उपलबध तर  प्रसंगी पदरमोड( कुणाची??) करूनही सुरु होतं म्हणे।इतक्या सेवाभावी आमदारावरही नियतीने घाला घालावं नं? दुर्दैव दुसरं काय? शेवटी व्हायरससमोर राजा काय  नि रंक काय ?सगळे सारखेच। त्यात आमदारांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह (मधुमोह असं वाचू  नये कृपया) असल्यामुळे काळजी फारच वाढली। आता सेवाभाव रक्तातच आहे म्हटल्यावर रक्तदाब वाढणारच ।शिवाय गोड तर इतकं बोलवं लागतं की तेही रक्तातच मुरलंय । नतीजा ? मधुमेह । मग आमदारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची धावपळ। एव्हाना खाजगी रूग्णालयातून व्यवस्था करणं सुरु झालं होतं । खरं तर आमदारांनी  सरकारी रूग्णालयात रहायला हवं होतं ।तिथेच खऱ्या जनताजनार्दनाशी भेट झाली असती त्यांची । आणि धावपळ,हेळसांड ,उशीर ,गर्दी, दुर्लक्ष ,कमी मनुष्यबळ, वीज जाणे,पाणीपुरवठा नसणे अशा सगळ्या गोष्टींची खरीखुरी परिस्थिती उलगडली असती।तरीही तिथला स्टाफ आपापल्या हातांवर तो गोवर्धन सावरण्याचा कसा प्रयत्न करतोय तेही दिसलं असतं । त्यांनाही खरं तर जायचं होतं म्हणे सरकारी रूग्णालयात । पण ऐकलं नाही म्हणे आमदार सौभाग्यवतींनी ।
आमदार साहेबांची टेस्ट झाल्यापासून घरातले सगळे नोकरचाकर ड्रायवर पळून गेले होते। तर आमदार सौभाग्यवतींचं म्हणणं असं की
" फिर कौन भागदौड करेगा इस करोनावाले के पिछे ? खानावाना कौन पहुचाएगा? प्रायवेट मे सभी वहाँ के वहाँ हो जाता है। जाने दो नं ज्यादा पैसे गए तो ! " ( वैसे भी  वो कहा अपने है?  पैसे हं ।आमदार साब नही ! असं पण म्हणाल्या म्हणे त्या।) हो! आणि कोरोना तरी कुठे रोज रोज होतो नं कोणाला? एकदाच होतोय तर होऊ द्या की खर्च! 
  आमदार सौभाग्यवतींना काळजी खूप। आणि आम्हाला त्यांचीही काळजी खूप।आमचे प्रतिनिधी बोलायचे रोज त्यांच्याशी फोनवर। आमदारसाहेबांच्या तब्येतीची पण चौकशी करायचे ।
मॅडम म्हणायच्या "  उनको क्या हुआ है? वो मजे मे है उधर आयसीयूमे (!) इधर हम क्वारंटीन होकर फस गए है। सारे नौकर भाग गए है। हमारे टेस्ट भी पॉझिटिव आ सकते है नं अब? "
       आमदार सौभाग्यवतींचं  दुःख कमी करायला आमचे प्रतिनिधी  समजावत त्यांना । नियतीने सोडलं नाही सेवाभावी आमदारांना ,त्याला काय करणार आपण तरी? ,असे म्हणत। फोन तर  करतच कधी कधी व्हीडीओ कॉल पण करत।
         आमदार सौभाग्यवती मात्र वेगळंसंच हसत यावर।सेवाभावी आणि नियती हे शब्द दोनतीनदा  मान हलवून स्वतःशीच म्हणत।
मग डोळे बारीक करुन हळू आवाजात म्हणत की " वो आते थे नं कौनकौन , कौनसी संस्थावाले,  पॉलिटिक्सवाले ,कौनसे फार्महाऊसवाले । रोज साब को बाहर ले जाते थे । खाना पिना सब चलता था।वही तो जड होंगे सारी  समस्या की  । उनमे से किसको हुआ की नही  कोरोना पता नही "।
        मग अजूनच डोळे बारीक करुन ,अजून  हळू आवाजात म्हणत की  " मेरे यहाँ कार्पोरेशन वालो ने आकर घर सॅनिटाईज किया ।और सारा डेटा भी लिया । साब किसकिससे मिले थे,कहाकहा गए थे,घर कौनकौन आया था , सब। तुला माहिती आहे?? साहेबांना तर धरले नियतीनी पण त्यांच्या मित्रांपैकी ज्यांना ज्यांना  नियतीने सोडलं त्या सगळ्यांचे पत्ते फोन नंबर देऊन टाकले मी कार्पोरेशन वाल्यांना ।म्हटलं की जा , या सगळयांना गरज आहे टेस्ट ची आणि क्वारंटीन करण्याची । मग गेले ते कार्पोरेशन वाले त्यांना पण शोधायला।
             " आमदार साब की बिबी हूँ ।तो उनके साथ रहे के  सेवाभाव तो सिखा ही होगा न मैने भी ? " असं म्हणाल्या आमदार सौभाग्यवती।आता त्यांना नियती सोडणार की नाही  हे त्यांचे रिपोर्ट आल्यावरच कळेल बुवा !

Sunday, July 12, 2020

बायफोकल

लहानपणापासून ऐकत आलो की, नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. तसं,या दोन्ही बाजूंवर एकच चित्र असलेलं नाणं रमेश सिप्पींनी 'शोले' मध्ये अमिताभच्या हातात दिलं होतं, तेवढाच काय तो आजवरचा अपवाद म्हणावा लागेल. पण  नाण्याच्या या दोन बाजूंच्या निमित्तानं आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींकडे दोन्ही त-हेनं पहायला शिकवलं गेलं, हे मात्र नक्की! या दोन त-हा कोणत्या तर... चांगलं आणि वाईट! भरीसभर विनोबांनी पण 'ज्ञान ते सांगतो' मध्ये उदाहरणाने पटवून दिलं नि ते मनात पक्कं बसलं. काय सांगितलं विनोबांनी? त्यांनी एका घराचं प्रतिक वापरलं. "प्रत्येक घराला भिंतींप्रमाणेच महत्वाच्या असतात खिडक्या आणि दरवाजे. विनोबा आपल्या शरीराला घराची उपमा देतात. खिडक्या म्हणजे दोष आणि दरवाजा म्हणजे गुण! तर घराला अनेक खिडक्या असतील नसतील पण प्रत्येक घराला एक ना एक दरवाजा हा असतोच असतो. तसंच या देहरुपी घरात दुर्गुणरुपी खिडक्या असल्या तरी प्रवेशासाठी एकतरी सद् गुणाचा दरवाजा असतोच. तो शोधा. त्यातून प्रवेश मिळवा". 
हे असे सगळे संस्कार मनावर होत असल्याने प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा चष्मा हा दुहेरी, ज्याला 'बायफोकल' म्हणतात तसा झाला नि म्हणूनच जगावर करोनाची कु-हाड कोसळली तेंव्हा उमटलेल्या भावनाही अशाच दुपेडी होत्या. एकमेकांत गुंतलेल्या. जोवर ती लाट सीमेपलीकडे होती तोवर त्याबद्दल काहीच घेणंदेणं नव्हतं. ग्लोबलायझेशनची चक्की वेगात फिरते, हे तेंव्हा लक्षात आलंच नाही. पण काही काळातच कोरोना आमच्या उंब-याबाहेर येऊन ठेपला आणि आमचं धाबं दणाणलं. बघता बघता आम्ही घरात बंद झालो. इतरांवर अविश्वास दाखवत टाळू लागलो. हा हा म्हणता म्हणता एका अस्वस्थ मानसिक वर्तुळात अडकू लागलो. निराशेच्या या गर्तेत आमचाही 'सुशांत सिंह राजपूत' होण्याची शक्यता निर्माण झाली. आणि.....
आणि....या टप्प्यावर, मनहिंदोळ्याची गती रोखत आमच्या मदतीला आल्यात नाण्याच्या  'त्या' दोन बाजू! खुणावू लागला विनोबांनी दाखवलेल्या घराचा दरवाजा! ही मदत, ही खूण दृष्टीनं टिपली, मनानं नोंद घेतली आणि सकारात्मकता फिरुन रुजू लागली. कशी?
तर असं बघा, लक्षात आलं की करोनानं आम्हाला घरात अडकवलं पण हे अडकणं भावबंध पक्के करणारं ठरलं आहे. हातातल्या आधुनिक यंत्रानं संवाद सुकर केला आहे. 'काय कसं काय?' म्हणत ख्यालीखुशाली कळू लागल्या आहेत. आजवर मित्रांचे समुह होते आता नातेवाईकांचे, गणगोताचे, सगेसोस-यांचे संवादगट तयार झालेत. नुसते अस्तित्वात आले असे नव्हे तर त्याद्वारे रोज विविध उपक्रमही घेतल्या जावू लागले. अशाच एकाक्षणी कुणाच्यातरी डोक्यात समुहाचे चलचित्र तयार करण्याची कल्पना चमकली न् ती  वा-याच्या वेगाने पसरू लागली. आयुष्यात कधी चित्रपटात झळकण्याची सुतराम शक्यता नसणा-यांनाही यानिमित्ताने लघु पडद्यावर स्वत:ला बघता येऊ लागले. मित्र, मैत्रिणी, कार्यालय सहकारी, कुटुंब सदस्य, असे अनेक समुह नि त्यांच्या तितक्याच 
त-हेच्या कल्पक चित्रफिती याकाळात तयार होऊ लागल्या. 
हा एक दरवाजा उघडला होता सामान्य जनांसाठी! तर दुसरीकडे एक रंगमंच उभारल्या जावू लागला होता कलावंतांसाठी! कोणता? तर 'समुह पान भिंतीवर' घरबसल्या प्रत्यक्ष सादरीकरणाचा! नाही कळले नं? अहो, 'ग्रुप फेसबुक पेजवर लाईव्ह' सादर करण्याची संधी अनेकांना मिळू लागली. यामुळे देशविदेशातील छोटे-छोटे कलावंत आणि रसिक एकमेकांशी जोडल्या गेलेत. कधी फिल्मी गाणी, कधी किस्से, कधी नकला, कधी कविता, कधी चित्र, कधी गप्पा, कधी भाव- नाट्य गीतं तर कधी नृत्य! अनेक कला मनमुक्तपणे सादर केल्या जावू लागल्या. मनापासून बहाल केलेले अंगठे, बदाम उमेद वाढवू लागले. उत्साह निर्माण होऊ लागला. करोनाची दहशत कमी व्हायला लागली.
कदाचित चार महिने घरात बसल्याने कधी स्वत:कडे लक्ष दिलं नसतं. पण यासगळ्या आयोजनामुळे स्वत:ला नीटनेटके ठेवण्याकडे कल वाढला. हा एक मोठाच फायदा म्हणता येईल. साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात अशा वेगवान घडामोडी घडत असताना घरच्या आघाडीवर पण बरेच बदल अनुभवता यायला लागले. पुन्हा एकदा आधुनिक यंत्रसामग्री कामात आली आणि स्त्रियाच काय पुरुष सुद्धा 'यू ट्युब' आधारे रसगुल्ला, जिलबी पासून तर डिब्बारोटी पर्यंत अनेक पदार्थ उत्तम करू लागले. यामुळे आजवर केवळ, "घर दोघांचं असतं, एकानं पसरवलं तर दुस-यानं आवरायचं असतं" अशी चारोळी ऐकत नि त्यावर अंमल करत जगणारे अनेकजणं आता, "घर दोघांचं असतं, दोघांनी मिळून आवरायचं असतं" असं जगू लागले. कुटुंब ख-या अर्थाने जवळ यायला लागलं. सहजीवन, सहवेदनेची जाणीव झाली. मनरुपी घराचा दरवाजा हळूहळू उघडायला लागला. 
करोना वाईट आहे, पण त्यानं दाखवलेलं किंबहुना त्याच्यामुळे मध्यमवर्गीयांच्या वाटेला येत असलेलं आजचं जगणं हे नवा मार्ग दाखविणारं आहे. ही नवसंवेदना 'सह' भावना जागविणारी आहे. नवं तंत्रज्ञानाची सकारात्मक बाजू दाखविणारी आहे. करोनारुपी नाण्याची ही बाजू समोर ठेवून विचार केला तर काय मिळवलं आणि नको असलेलं काय मागे टाकत आम्ही पुढे जातो आहोत, हे लक्षात येतं. कुणी कदाचित प्रश्र्न उपस्थित करेल की, गरिबांचं काय? मजूरांचं काय? तर सुरुवातीचा काही काळ तेही भांबावले होते पण आता मार्ग काढत जगणं तेही शिकताहेत. नव्याचा स्विकार करताहेत, असं वाटतंय. अनेकांना मुलांच्या शाळा, त्यांच्या शिक्षणाबद्दलचा प्रश्र्न सतावतोय. पण नव्या युगाची नांदी म्हणत आॅनलाईन पर्यायांचा सकारात्मक वापर पालक हळूहळू शिकताहेत. जसा बाजार तसे उद्योग धंदे मोल्ड होताहेत.  
इथे मी व्यक्त करतेय ती आहे माझी अनुभूती! माझ्या बाबतीत, या चार महिन्यांत एकदाच अशी उदासी सैरभैर करणारी ठरली होती. पण मी सुरुवातीला मांडल्याप्रमाणे संपर्क, संवादाची किल्ली सापडली आणि दरवाजा हळूहळू उघडायला लागला. एका बेसावध क्षणी मी घरात पडले. एक हात मोडून गळ्यात पडला. वेदनेपेक्षाही मनात पहिला प्रश्न होता, आता घरकामाचे कसे? जेवण कोण बनवेल? काय होईल? पण निभलं. घर दोघांचं, सहवेदना... वगैरे जे मी म्हटलं ते याकाळात अनुभवलं. 
कणिक मी मळायची, तो पोळी लाटायचा, मी शेकायची, 
तो कांदा-भाजी-लसूण तयारी करुन द्यायचा, मी फोडणी टाकायची, 
दाळतांदूळ मी तयार ठेवायची, तो कुकर चढवायचा...
असं मस्त सुरू होतं. पस्तीस वर्षाच्या वैवाहिक जीवनात नाण्याची ही बाजू कधी लक्षात आलीच नव्हती. ती आता कळत होती. मनात कुठेतरी धास्ती होती पण त्या भितीला दूर सारत एकमेकांना सांभाळत जगणं सुरू झालं. हे काही वेगळंच होतं. भावनिक बंध घट्ट करणारं असं काही तरी हे होतं. याशिवाय मला करोनानं दिलेला आणखी एक पाठ म्हणजे, एका हातानं सफाईदारपणे कामं कशी करावीत? हा धडा! भांडी घासणं, कपडे पिळून वाळत घालणं, झाडूपोछा ही कामं एका हाताने कशी करायची? ते याच काळात शिकले. आणि गरजेतून माणूस कशा विविध क्लृप्त्या अंमलात आणू शकतो, तेही कळलं. ही पण नाण्याची एक बाजूच आहे नं? तर असा हा जगासाठी  लाॅकडाऊनचा काळ होता पण माझ्यासाठी हे 'लाॅक आऊट' होतं. देहापलिकडे मनापर्यंत पोहचविणारं...! विनोबांच्या उदाहरणातल्या दाराचा शोध घेणारं! लहानपणापासून ऐकलेल्या नाण्याच्या दोन्ही बाजूंसारखं! बायफोकल असणारं!
सीमा शेटे (रोठे), अकोला.

(फोटो सौजन्य: गुगल)

Friday, July 10, 2020

वृद्धाश्रम

एकदा प्रवासात हायवेवर एक वृद्धाश्रमाची पाटी पहिली. आजूबाजूला शेते, मागे
डोंगर, समोर हायवे. या निसर्गरम्य वातावरणाचं वर्णन करणारी जाहीरात. वानप्रस्थ वगैरे
कल्पनांचा उल्लेख. आणि या निसर्गरम्य वातावरणासाठी, आधुनिक वानप्रस्थाश्रमासाठी
शहराच्या गर्दीपासून दूर, एकांत मिळेल अशा जागी हा वृद्धाश्रम होता. आजवर जेवढ्या म्हणून
वृद्धाश्रमांच्या पाट्या पहिल्या, त्या अशाच जागी होत्या. सहज मनात विचार आला, वृद्धाश्रम
अशाच जागी का असतात?

एका वृद्धाश्रम चालकाने वानप्रस्थाची कल्पना मांडली. संसारातून विरक्त होऊन
घराबाहेर पडायचं तर अशा निसर्गरम्य ठिकाणी निवास करायला हवा आणि गर्दी,
गजबजाटापासून दूर राहायला हवं असं त्याचं मत. पण प्राचीन काळची वानप्रस्थाश्रमाची
संकल्पना आणि आजची वृद्धाश्रमाची संकल्पना यांत काहीच फरक नाही का? वानप्रस्थाश्रम हा
त्या काळी वृद्धांचा स्वतःचा चॉईस असायचा. असे आज ‘बाय चॉईस’ वृद्धाश्रमात राहणारे वृद्ध
किती असतात?

अनेक महिला मंडळे, सामाजिक संस्था यांच्या उपक्रमांत ‘वृद्धाश्रमाला भेट’ असा
एक उपक्रम असतो. ही भेट झाल्यावर ‘अनुभवकथन’ ओघाने आलेच. सर्वच्या सर्व अनुभवांमध्ये
एक मुद्दा अगदी एकसारखा असतो, ‘आता पुन्हा कधी याल ?’ किंवा ‘येत जा असेच अधून
मधून’ हे त्या आश्रमातील वृद्धांचं वक्तव्य. याचाच अर्थ ते वृद्ध बाहेरच्या लोकांच्या भेटीसाठी,
सहवासासाठी आसुसलेले असतात. त्यामुळे त्यांना अशा सो कॉल्ड निसर्गरम्य वातावरणात
एकाकी वाटतं. आपण संसाराचा, सांसारिक पाशांचा त्याग करून इथे आलो आहोत, ही भावना
नसते, तर आपल्याला इथे ‘आणून टाकलं’ हीच भावना प्रभावी असते. पूर्वी फक्त ‘मुलाला आणि
सुनेला नकोसे झाल्यामुळे वृद्धाश्रमात आलेले’ वृद्ध तिथे राहत असतात असं मानलं जायचं.
आता मात्र मुलेच नाहीत म्हणून , किंवा असलीच तर परदेशात आहेत म्हणून, किंवा इतर
कोणत्याही कारणाने मुला-सुनेच्या किंवा लेकी-जावयाच्या घरात न राहता स्वतंत्र राहायचे
म्हणून अनेक वृद्ध वृद्धाश्रमात राहणे पसंत करू लागले आहेत. त्यांची पार्श्वभूमी सधन आहे. ते
‘बिचारे’ नाहीत. त्यांना संसाराचा किंवा सामाजिक जीवनाचा त्यागही करायचा नाहीये. मग
त्यांच्यावर हा एकांतवास का लादला जातो?

जिकडे पाहावे तिकडे फक्त वृद्ध आणि वृद्ध नजरेस पडणार. कुणीही तरुण, उत्साही

व्यक्ती आसपास नाही. समाजात मिसळणे नाही, बाजारात किंवा नाटक सिनेमाला,
व्याख्यानांना जाणे नाही. या सर्वांमुळे वृद्धाश्रम ही शिक्षा वाटू लागते. या वृद्धांपैकी जे
धडधाकट असतील, आपली आपण काळजी घेण्याजोगे असतील त्यांना तर हे वृद्धाश्रम म्हणजे
तुरुंगच वाटतात. निसर्गरम्य मात्र निर्मनुष्य जागा दोन दिवस वीकेंड हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून

बऱ्या वाटतात. कायमचे निवासस्थान म्हणून या जागा आपल्यापैकी तरी किती जणांना
आवडतील? मग हे, आयुष्यात आनंदाने जगलेले, समाजात मिळून मिसळून राहिलेले
,लोकांमध्ये वावरलेले, कर्तृत्ववान वृद्ध अशा अज्ञातवासात आनंदाने जगतील का? तिथे राहून
राहून ते हळूहळू ‘बिचारे’ आणि अगतिक होत जातात.

अनेक वृद्धांचे परदेशी असलेले नातेवाईक त्यांच्यासाठी भेटवस्तू पाठवत राहतात.
त्या त्यांच्यापर्यंत पोहचतही नाहीत. आधी सांगितलेल्या सुविधा मिळत नाहीत. कितीतरी
प्रकारचे अपहार होत राहतात. आणि परदेशात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना ते काळतही
नाही. कधीकधी वाटतं, हे आश्रम यासाठीच तर असे गावाबाहेर नसतील?

कोरोनामुळे आपण सर्वांनी नुकताच लॉकडाऊन चा अनुभव घेतला. आपण
आपापल्या घरी, आपापल्या कुटुंबियांसह मजेत होतो. रोज नवे पदार्थ, नवे खेळ, झूम मीटिंग्स,
फेसबुक, यु ट्यूब आणि इतर apps चोवीस तास हात जोडून सेवेशी हजर होते, तरी आपण
कंटाळलो होतो. काहीजण मानसिक आजारांना बळी पडले. लॉकडाऊनमध्ये मानसिक दृष्ट्या
निरोगी राहण्यासाठी काय करावं यावर मानसशास्त्रज्ञ लेख लिहू लागले. का घडावं असं?
कारण मानव समाजशील प्राणी आहे. सोशल डिस्टंसिंगला अजून सरावलो नाही आपण, मग या
वृद्धांना तर सोशली क्वारंटाइन केलं जातंय. जवळपास नजर जाईल तिथपर्यंत कोणतेही गाव
नाही. वस्ती नाही. आश्रमातील सहनिवासी आणि कर्मचारी सोडले तर बाहेरचे कुणीही दृष्टीस
पडणार नाही, किंवा आतील वृद्ध बाहेर कोणासही दिसणार नाहीत अशी ‘चोख’ व्यवस्था! अशा
ठिकाणी राहून त्यांचं आयुष्य दहा वर्षांनी कमी होत असावं.

मला वाटतं ‘वृद्धाश्रम’ ही संकल्पना री-डिफाईन करायची गरज आहे. वृद्धाश्रम
शहरात असावेत. किमान जिथून बाजार, नाट्यगृहे, सिनेमा हॉल जवळ असतील; जिथे गॅलरीत
उभं राहिल्यावर कुणी तरुण, कुणी लहान मुले दृष्टीस पडतील अशा ठिकाणी तरी असावेत.
म्हणजे मग ते खऱ्या अर्थाने आयुष्याची सेकंड इनिंग खेळू शकतील. समाधानाने जगातील आणि
समाधानाने जगाचा निरोप घेतील.