शेवटी दुर्दैवानी आमच्या इकडल्या एका आमदारांना कोरोना झाला।
आमदार खरं तर सुविद्य होते( हा शब्द नेहमी सुविद्य पत्नी असा येतो वाचनात । त्यामुळे वेगळं वाटलं का जरा? की आमदार शब्दाशी पटत नाही या शब्दाचं , म्हणून वेगळं वाटलं? वेगळं वाटलं एवढं मात्र खरं।असो) तर एक तर ते आमदार होते । दुसरं ते सुविद्य होते।तरी कसा झाला कोरोना त्यांना? काळजी नाही घेतली का? स्वच्छतेचं महत्वं कळत नव्हतं का? हातावर पोट असणाऱ्यांना पडावंच लागलं बाहेर। पण आमदार कशाला आपल्या घराबाहेर,की बंगल्याबाहेर,की महालाबाहेर, पडले? सोशल/ फिजिकल डिस्टंसिंग चा विसर पडला का त्यांना? की विरोधी पक्षाच्या लोकांनी काही गडबड केली? विरोधी पक्ष म्हणजे ज्या पक्षात ते आधी होते आणि तिकीट मिळालं नाही म्हणून तो पक्ष सोडून दिला तो का ?की आता ज्या पक्षात ते आहेत,त्या पक्षाचे विरोधक? की पक्षातलेच अंतर्गत विरोधक? की अजून कोणी ? काय झालं काय नेमकं?
एक एक प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू या ।काळजी घेतली नाही का त्यांनी? तर घेतली।भयंकर काळजी घेतली। खानपानाची काळजी घेतली। प्रोटीनयुक्त आहार घेतला। पोटातले व्हायरस मरावेत म्हणून अल्कोहोलयुक्त काढे घेतले। स्वच्छतेची काळजी ? ती तर खूपच घेतली।कपडे स्वच्छ पांढरे। प्रतिमा एकदम स्वच्छ। डी पी ला सुद्धा अगदी डाग नाही। हात तर वीस सेकंदांपेक्षा जास्त वेळ चोळायचे ते। एवढ़े तर तिकीट नाही मिळालं तेव्हाही नसतील चोळले त्यांनी । धुतले पण वारंवार । निवडणूकीच्या काळात जसे कार्यकर्त्यांच्या मागे हात धुवून लागायचे ते , तसेच सतत हात धुतले त्यांनी। हातावर पोट नाही म्हणा त्यांचं। पण हे लौकीकार्थानी। शाब्दिक अर्थ घेऊ जाता थोडी फार परिस्थिती आहे तशी । पण मला सांगा , जनतेच्या उदंड तक्रारी ,कार्यकर्त्यांच्या लाखो चुका पोटात घालायच्या तर हातानी सावरण्याइतका घेर तर होणारच नं पोटाचा? त्यात काय एवढं? शिवाय हा काही मुद्दा नाही कोरोना होण्यातला । बरं मग सोशल फिजिकल डिस्टंसिंग चं काय? अहो,एवढं कळत नाही की काय त्यांना? फक्त ज्या जनतेला त्यांनी नेहमी उराशी पोटाशी धरलं तिला एकदम दूर कसं सारायचं? असं झालं असेल त्यांना केव्हा केव्हा। त्यातही आपण अल्कोहोलयुक्त काढे बिढे घेत आहोत आणि ती जनता बिचारी तशीच उपाशी तापाशी । या भावनेतून पडला ही असेल विसर एखाद्या वेळी डिस्टंसिंगचा। म्हणून काय झालं नं? व्हायरस ला काय एवढंही कळू नये की काय? विरोधी पक्षाचं मात्रं काही सांगता येत नाही। मुळात विरोधी पक्षं कोणता हेच सांगता येत नाही।त्यामुळे त्यांच्या कुठल्या अफवांमुळे किंवा कारवायांमुळे झाला असावा का कोरोना ते ही सांगता नाही येत । तसंही अफवा आणि व्हायरस सारखेच पसरतात म्हणे। शिवाय काहीही खूप पसरलं की आजकाल त्याला व्हायरल झालं असंच म्हणतात म्हणे। असो ।
कारण काहीही असो। आमदारांना कोरोना झाला एवढं मात्रं खरं ।आमदार सौभाग्यवतींनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली की " वो तो होना ही था । यहाँ कौन किसकी सुनता है? " नेमकं काय म्हणायचं होतं त्यांना कोणास ठाऊक...
पण आमदार दवाखान्यात भरती झाले।आणि व्हॉट्स अॅप एफबी,पेपर बिपरातून लेख झळकले की " जनतेची सेवा करणाऱ्या सुविद्य आमदारालाही नियतीने सोडले नाही ।" लेखांचा सारांश असा की कोरोना काळात आमदारसाहेबांनी काहीही बंद ठेवले नाही।( भलता अर्थ घेऊ नये। ) जनतेच्या कल्याणासाठी महत्वाचे दौरे,भेटीगाठी वगैरे सातत्यानी सुरू होते । सॅनिटायझरचे निःशुल्क वितरण,मास्कचे निःशुल्क वितरण ,औषधी वाटप,काढ्याचे निःशुल्क वाटप असं सगळं पण सुरू होतं। पक्षाचा पैसा नाही झाला उपलबध तर प्रसंगी पदरमोड( कुणाची??) करूनही सुरु होतं म्हणे।इतक्या सेवाभावी आमदारावरही नियतीने घाला घालावं नं? दुर्दैव दुसरं काय? शेवटी व्हायरससमोर राजा काय नि रंक काय ?सगळे सारखेच। त्यात आमदारांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह (मधुमोह असं वाचू नये कृपया) असल्यामुळे काळजी फारच वाढली। आता सेवाभाव रक्तातच आहे म्हटल्यावर रक्तदाब वाढणारच ।शिवाय गोड तर इतकं बोलवं लागतं की तेही रक्तातच मुरलंय । नतीजा ? मधुमेह । मग आमदारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची धावपळ। एव्हाना खाजगी रूग्णालयातून व्यवस्था करणं सुरु झालं होतं । खरं तर आमदारांनी सरकारी रूग्णालयात रहायला हवं होतं ।तिथेच खऱ्या जनताजनार्दनाशी भेट झाली असती त्यांची । आणि धावपळ,हेळसांड ,उशीर ,गर्दी, दुर्लक्ष ,कमी मनुष्यबळ, वीज जाणे,पाणीपुरवठा नसणे अशा सगळ्या गोष्टींची खरीखुरी परिस्थिती उलगडली असती।तरीही तिथला स्टाफ आपापल्या हातांवर तो गोवर्धन सावरण्याचा कसा प्रयत्न करतोय तेही दिसलं असतं । त्यांनाही खरं तर जायचं होतं म्हणे सरकारी रूग्णालयात । पण ऐकलं नाही म्हणे आमदार सौभाग्यवतींनी ।
आमदार साहेबांची टेस्ट झाल्यापासून घरातले सगळे नोकरचाकर ड्रायवर पळून गेले होते। तर आमदार सौभाग्यवतींचं म्हणणं असं की
" फिर कौन भागदौड करेगा इस करोनावाले के पिछे ? खानावाना कौन पहुचाएगा? प्रायवेट मे सभी वहाँ के वहाँ हो जाता है। जाने दो नं ज्यादा पैसे गए तो ! " ( वैसे भी वो कहा अपने है? पैसे हं ।आमदार साब नही ! असं पण म्हणाल्या म्हणे त्या।) हो! आणि कोरोना तरी कुठे रोज रोज होतो नं कोणाला? एकदाच होतोय तर होऊ द्या की खर्च!
आमदार सौभाग्यवतींना काळजी खूप। आणि आम्हाला त्यांचीही काळजी खूप।आमचे प्रतिनिधी बोलायचे रोज त्यांच्याशी फोनवर। आमदारसाहेबांच्या तब्येतीची पण चौकशी करायचे ।
मॅडम म्हणायच्या " उनको क्या हुआ है? वो मजे मे है उधर आयसीयूमे (!) इधर हम क्वारंटीन होकर फस गए है। सारे नौकर भाग गए है। हमारे टेस्ट भी पॉझिटिव आ सकते है नं अब? "
आमदार सौभाग्यवतींचं दुःख कमी करायला आमचे प्रतिनिधी समजावत त्यांना । नियतीने सोडलं नाही सेवाभावी आमदारांना ,त्याला काय करणार आपण तरी? ,असे म्हणत। फोन तर करतच कधी कधी व्हीडीओ कॉल पण करत।
आमदार सौभाग्यवती मात्र वेगळंसंच हसत यावर।सेवाभावी आणि नियती हे शब्द दोनतीनदा मान हलवून स्वतःशीच म्हणत।
मग डोळे बारीक करुन हळू आवाजात म्हणत की " वो आते थे नं कौनकौन , कौनसी संस्थावाले, पॉलिटिक्सवाले ,कौनसे फार्महाऊसवाले । रोज साब को बाहर ले जाते थे । खाना पिना सब चलता था।वही तो जड होंगे सारी समस्या की । उनमे से किसको हुआ की नही कोरोना पता नही "।
मग अजूनच डोळे बारीक करुन ,अजून हळू आवाजात म्हणत की " मेरे यहाँ कार्पोरेशन वालो ने आकर घर सॅनिटाईज किया ।और सारा डेटा भी लिया । साब किसकिससे मिले थे,कहाकहा गए थे,घर कौनकौन आया था , सब। तुला माहिती आहे?? साहेबांना तर धरले नियतीनी पण त्यांच्या मित्रांपैकी ज्यांना ज्यांना नियतीने सोडलं त्या सगळ्यांचे पत्ते फोन नंबर देऊन टाकले मी कार्पोरेशन वाल्यांना ।म्हटलं की जा , या सगळयांना गरज आहे टेस्ट ची आणि क्वारंटीन करण्याची । मग गेले ते कार्पोरेशन वाले त्यांना पण शोधायला।
" आमदार साब की बिबी हूँ ।तो उनके साथ रहे के सेवाभाव तो सिखा ही होगा न मैने भी ? " असं म्हणाल्या आमदार सौभाग्यवती।आता त्यांना नियती सोडणार की नाही हे त्यांचे रिपोर्ट आल्यावरच कळेल बुवा !