Thursday, July 14, 2022

नेमेचि येतो मग..

 “नेमेचि येतो मग पावसाळा” ह्या उक्ती प्रमाणे यंदाही तो आला, अगदी चातकासारखी त्याची वाट बघणाऱ्या समस्त जिवांना दिलासा देत धो धो बरसला सगळीकडे अन चराचराला सुखावून गेला. पण ह्यावर्षी मात्र मला त्याचं आगमन, त्याचं ते सुखद वास्तव्य, हवेहवेसे अस्तित्व अन कधीकधी खूप दिवस मुक्काम केलेल्या पाहुण्यांचा जसा कंटाळा येतो तसा त्याचाही क्वचित आलेला कंटाळा हे सगळं “ह्याची देहा, ह्याची डोळा” अनुभवता न आल्याने खूपच चुकल्या चुकल्यासारखं होत होतं! आता तुम्ही म्हणाल, “असं का बुवा?” तर त्याचं कारण म्हणजे आम्ही दोघेही 13 जूनलाच अमेरिकेत लेकाकडे आलोय. तोपर्यंत एकदोनदा रात्री केव्हातरी तो हजेरी लावून गेला होता एवढंच! पण त्या चुटपुटत्या भेटीने मुळीसुद्धा समाधान झाले नाही . 


       आता तुम्ही पुन्हा म्हणाल, “मग गेलेच कशाला?”, तर जायचं मुख्य कारण म्हणजे गोडंबा नातू दीड वर्षांचा झालाय, त्याच्या सहवासाची आस तिथेही चैन पडू देत नव्हतीच. नुसत्या फोटो अन व्हिडिओ कॉल वर पोट काही भरता भरत नव्हतं. केव्हा एकदा त्याला प्रत्यक्ष भेटू असं झालं होतं. त्याच्या ओढीने अखेर ‘सात समंदर’ पार करत आम्ही येथे आलोच. आल्याक्षणापासून त्याचा निरागस, निष्पाप, गोजिरा पण खट्याळ चेहरा, त्याच्या गोड गोड बाळलीला, त्याचा मऊ मऊ रेशीमस्पर्श, त्याचं दुडूदुडू धावणं, बोबडं बोबडं बोलणं, निर्व्याज हसणं, त्याच्यासोबत खेळणं यामध्ये सगळं काही विसरायला झालं. “सुख, सुख म्हणजे आणखी काय हो?” असं वाटायला लावणारे त्याच्या सहवासातले हे लडिवाळ क्षण! त्यापुढे अर्थातच शंभर पावसाळेही ओवाळून टाकावे असं ते अवर्णनीय सुख! त्यामुळे एक पावसाळा गेला म्हणून तसं तर अजिबातच काही बिघडलं नाही म्हणा. कारण तो तसाही “नेमेचि” पुढल्या वर्षीही येणारच आहे. पण नातवाचं हे लोभस बालपण काही पुन्हा पुन्हा अनुभवता येणार नाही हे मात्र खरंच! पण आता तिथल्या सगेसोयऱ्यांशी, मित्रमंडळींशी बोलतांना, त्यांनी पाठवलेले पावसाचे, पावसातल्या गरमागरम भज्यांचे, पावसाच्या साक्षीने प्यायलेल्या वाफाळत्या कॉफीचे व्हिडिओ बघितल्यावर बाकी त्याची फार म्हणजे फार म्हणजे फारच आठवण आली. काहीतरी चुटपुट, रुखरुख वाटायला लागली.

भरीस भर म्हणजे “आषाढस्य प्रथम दिवसे..” म्हणत पावसाच्या कवितांचाही  समाज माध्यमांवर सगळीकडे पाऊस पडायला लागलेला.


           मग बाकी त्याच्या पहिल्या आगमनापासूनचं  सगळं काही  उगाचच आठवायला लागलं. खरं तर जीवघेणा, भाजून टाकणारा असा रखरखीत उन्हाळा अगदी असह्य झाल्यावरच तो येतो नेहमी. जीव जातो की काय असं वाटेल अशी गदगद होत असते,  दुपारच्या वेळी तर कुलर, एसी समोरून क्षणभरही दूर व्हावंसं वाटत नसतं अन अचानकच आभाळ भरून येतं, सोबत रस्त्यावरची धूळ सोबतीला घेत वाराही वेड्यासारखा अस्ताव्यस्त वाहायला लागतो अन ताडताड टपोऱ्या थेंबासह, मातीच्या त्या चिरपरिचित सुगंधाची उधळण करत तो येतो, थेट आरपार चिंब करून जातो. त्या पहिल्या पावसाची मजा काही औरच! वय कितीही वाढले तरी ह्या पहिल्या पावसात भिजण्याची एक उर्मी प्रत्येकाच्या मनात दाटून येतेच. भलेही वास्तवाचं भान आल्यावर, वयानुसार मागे लागलेल्या दुखण्यांची आठवण आल्यावर  मग ती उर्मी थोडीशी दाबून टाकावी लागते हा भाग अलहिदा!


            अन् ह्या “नेमेचि” येणाऱ्या पावसाबरोबरच असंख्य नवी-जुनी, हिंदी-मराठी गाणी रिमझिमत्या, सरसरत्या, धुवांधार, तर कधी भुरभुरत्या पावसाबरोबरच तनमन चिंब करत “नेमेचि” मनात रुणझुणायला लागतात. ह्यावर्षी आता फक्त ती ऐकत ऐकतच  दुधाची तहान ताकावर भागवायची! अजून काय?  

वानगीदाखल काही गाणी सांगायचीच तर हटकून ओठांवर येणारं शांताबाईंचं 

   “आला पाऊस मातीच्या वासात ग, 

    मोती गुंफित मोकळ्या केसात ग” 

किंवा सुधीर मोघेंचं 

   “आला आला वारा, संगे पावसाच्या धारा, 

    पाठवणी करा सया निघाल्या सासुरा” 

प्रत्येकवेळी त्या मातीचा गोड सुगंध जणू खोल हृदयात भरून घेतल्यासारखंच मनाला प्रसन्न करून जातं. कधी आकाशात काळेभोर ढग भरून येतात, सोबतीला असतो तनामनाला झोंबणारा, गात्र सुखावणारा गार गार वारा. आत्ता कुठल्याही क्षणी तो सर सर सरींसोबत धो धो कोसळणार असे संकेत मिळतात अन बाभंची कविता 

    “गडद निळे गडद निळे जलद भरून आले, 

    शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले..” 

जणू जिवंत होऊन समोर उभी ठाकते. अन श्रावण सुरु झाला की ह्याचा उन्हासोबतचा लपाछपीचा अवखळ खेळ बघता बघता बालकवींच्या

     “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे 

      क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे” 

ह्या कवितेची आठवण तर प्रत्येक मराठी मनाला येतेच येते. 

आणि कधीतरी एखाद्या अंधाऱ्या रात्री विजेच्या कडकडासह अस्ताव्यस्त धुंवाधार बरसणाऱ्या सरी एकटक न्याहाळतांना बघता बघता मग पाडगावकरांचं 

    “भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची

     रात्र पावसाची होती, धुंद वादळाची होती” 

हे चिंब हळवं गीत अन अरुण दातेंचा तितकाच चिंब हळवा स्वर  थेट आतपर्यंत पोहचत आपल्याला एका हळव्या अलवार स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जातो. 


       असा नाना रूपात भेटणारा हा पाऊस. कधी आडवातिडवा ताडताड झोडपून टाकल्यासारखा, तर कधी एखाद्या मोरपिसासारखा हळुवार, अलगद आहे का नाही असा भुरभुरणारा, कधी येतो येतो म्हणत गडप होणारा, कधी पिरपिर पिरपिर करत सगळीकडे चिखलगारा करून वैताग सुध्दा आणणारा. कधी ध्यानी मनी नसतांना अचानक बरसून चिंब करणारा! तर कधी दिवसेंदिवस प्रतिक्षा करायला लावणारा. श्रावणात उन्हासंगे लपाछपी खेळत इंद्रधनुष्यावर स्वछंदी बागडणारा. प्रत्येकच रूप कसं मोहविणारं, आवडून जातं मनापासून! फक्त ह्याचं रौद्ररूप बाकी अगदी नकोनकोसं, जिवाचा थरकाप उडवणारं, एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकणारं, हजारो निरपराधांचा बळी घेत, सगळं काही आपल्या पोटात गडप करणारं ते भयावह रूप! (सध्या तिकडे संततधार सुरु आहे अशा बातम्या मिळाल्या.) म्हणूनच त्याला विनंती करावीशी वाटते की बाबा रे तुझं तेवढं रूप बाकी नको दाखवूस कधी! बाकी तुझ्या सगळ्या रूपांवर जीव खरंच फिदा आहे! 


©मधुमती वऱ्हाडपांडे


Wednesday, July 13, 2022

नको रे नको मना

 रोज सकाळी पायी फिरायला जातांना एक विचार सतत डोक्यात घोळत रहातो.तो हा की आपण प्लास्टिक निर्मूलन करण्याच्या कामात काहीतरी करायला हवं. ठोस पावले उचलायला हवीत. रस्त्यात जागोजागी ,खड्ड्या-खुड्यांमध्ये साचलेला प्लास्टिक चा ढीग बघून तऱ्हेतऱ्हेचे पर्याय मनात आकार धरू लागतात.  त्यात पेपरमधूनही सतत वाचण्यात येतं---"प्लास्टिक वापरावर आळा घातला गेला नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात."

 नेमके काय करता येईल बरे? आपला इतका मोठ्ठा ग्रुप आहे मैत्रिणींचा--- आपापल्या विभागात दोन दोन जणींचा गट करून घरोघरी जाऊन गोळा करावे का प्लास्टिक? की विभागातील लोकांनाच सांगावे, माझ्या घरी आणून ठेवा सगळं प्लास्टिक म्हणून? पण मग ते कोण आणि कुठे नेऊन देणार त्याचाही विचार करून ठेवावा लागेल.
 किंवा वॉर्ड मेंबर ला सांगून आपल्या विभागातील प्लास्टिक कचऱ्याची "व्यवस्था" लावायला सांगायचे का? पण तो वॉर्ड मेंबर मनावर घेईल का?  रोज साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील देखरेख करणारे कुणीच नसते.तक्रार करूनही त्याची दखल घेतली जाईलच ह्याची खात्री नसते. आता तुम्ही म्हणाल की प्लास्टिक आणि ओला, कोरडा कचरा असे सगळे वेगवेगळे ठेवावेत; पण कचऱ्याच्या ढिगात सगळे एकत्रच होत असणार ना?  आजकाल तर नगरपालिकेची गाडीही दिसेनाशी झालीये.

 किंवा मग एखादा "बेरोजगार" शोधून त्याला ह्या कामावर नेमावे आणि त्याला आपणच आपल्या खिशातून पैसे द्यावेत----? पण तो तरी जबाबदारीने काम करेल का? प्रश्न आणि फक्त प्रश्न--- उपाय काहीच सुचत नाही.
 की जनावरांनाच समजावून सांगावे, की बाबांनो, नका तोंड लावू प्लॅस्टिकला,जहर आहे ते. मीटिंग घयावी त्यांची एखादी? मुके प्राणी जास्त समजदार, वफादार असतात, माणसांपेक्षा मेंढरं बरी--- असं काही बाही आठवतं मग--- मग  अशीही शंका येते, ही जनावरे आपलं म्हणणं ऐकतील का? 
(प्रिय मैत्रिणींची क्षमा मागून)
 हां, आता मोहिनी, स्वाती, सीमा ह्यांच्या सारख्या धुरंधरांनी समजावले तर कदाचित लवकर समजतील---त्यांना सवय आहे ना, चार चौघात (चारशे लोकांत  देखील) बोलायची- - आम्हाला चार चौघात नाही तर "दोघातच" बोलायची जास्त सवय आहे.😉-माफ करा मैत्रिणींनो, गैरसमज नका करून घेऊ कृपया🙏 पण "मुक्या प्राण्यांची देखील सभा गाजवली"म्हणून किती उदो उदो होईल ना तुमचा-----  कधी कधी तर असंही वाटतं की माणसांनाच म्हणावं, जे दुष्ट, हिंसक, घातकी आहेत, त्यांना की बाबांनो, तुम्ही का नाही गिळून टाकत प्लास्टिक?  ह्या धरणीवरचा भार तरी हलका होईल काही प्रमाणात--- हे असं भरकटत राहतं मन---कुठल्याकुठे----😞
खरं तर गोची अशी झालीये की काहीही विचार करण्याचं , लिहिण्याचं,  व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य राहिलंय कुठे आता?अगदी मनातल्या मनात देखील बोलायला आणि विचार करायला खूप विचार करावा लागतो. म्हणायला लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य असलं तरी कुठल्या विधानावरून गदारोळ उठेल आणि कुठल्या लिखाणाने कुठल्या आपत्ती निर्माण होतील ह्याचा भरवसाच नाही राहिला.
  त्यातही  व्यक्ती जितक्या मोठ्या पदावर,तितकी तिच्या वागण्या-बोलण्यावर बंधने अधिक----प्रत्येक शब्द तोलून मापून,जपून बोलावा लागतो, वागताना शंभर वेळा विचार करावा लागतो. ह्या संदर्भात दोन किस्से सहजपणे आठवले ते असे---- 

आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदा ट्विटरवर अब्बास नावाच्या एका सद्गृहस्थाचा उल्लेख केला होता की तो त्यांच्या घरी राहिलेला आहे म्हणून---त्यातही काहींना राजकारण दिसलं. शेवटी त्या अब्बास नावाच्या सद्गृहस्थानेच जो सध्या बहुधा ऑस्ट्रेलियात आहे, कबुली दिली ट्विट करूनच की तो त्यांच्या घरी जवळपास 3 वर्षे राहिला होता आणि त्या काळात जितक्या उत्साहाने होळी, दिवाळी सारखे सण घरी साजरे होत,त्याच उत्साहाने "त्यांचे सण" देखील पंतप्रधानांच्या मातोश्री साजरे करत असत.

 दुसरा किस्सा असा--- अडवाणीजी एकदा पाकिस्तानला गेले असतांना त्यांनी बॅरिस्टर जिनांविषयी काही वक्तव्य केलं होतं. भारतात आल्यानंतर त्यांच्या विधानांवर बंधने घातली गेली. आणि त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आल्यासारखी झाली. 
हे झाले मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत; पण रोजच्या व्यवहारात देखील अशी उदा. बघायला मिळतात. राजकारणाशी संबंधित व्यक्तींच्या विधानांवरून आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेने   कुठलेही भले, बुरे मत देऊ नये हेच योग्य.    आणि कुठल्याही राजकीय पोस्ट वरून आपापसात वाद निर्माण करू नयेत, त्यांच्या  वरील पोस्ट्स व्यक्तिगत घेऊ नयेत. 

सोशल मीडिया चा उपयोग सकारात्मक कार्यासाठी देखील कसा होऊ शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दीपा बारिक.
 परवाच वाचलेल्या एका  बातमीनुसार ---25 वर्षाच्या दीपा बारिक ओडिशात "ट्विटर क्वीन " म्हणून प्रसिद्ध आहेत,असे वाचण्यात आले.2019 पासून  ट्विटरला लोकांचा आवाज बनवणाऱ्या  दीपा ह्यांनी आतापर्यंत सहा हजाराहून अधिक समस्या सोडवल्या आहेत. त्या लोकांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांना "टॅग" करतात आणि लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतात.----असाही उपयोग ट्विट चा----चांगल्या  कामांसाठी आणि जनहितासाठी. नाहीतर ट्विटर "बिटर" व्हायला कितीसा वेळ लागतो?  आपणही असेच काहीसे करावे का? पण त्यासाठी आपल्याला फक्त wa आणि fb वर संतुष्ट होऊन नाही चालणार. आपला आवाका वाढवावा लागेल. ते ट्विटर, इन्स्टाग्राम वगैरे सगळं नीट शिकावं, समजून घयावे लागेल आणि त्यासाठी सर्वात आधी नवीन फोन घ्यावा लागेल---🙄🤦‍♀️ बापरे! त्यापेक्षा तूर्तास हा विचार जरा बाजूलाच ठेवूया म्हणजे झालं. तर मंडळी, थोडक्यात ,प्रत्येकाने वागताना, लिहिताना आणि बोलताना आपली सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवावी हेच योग्य.

 बघा मंडळी, प्लास्टिक निर्मूलनावरून कुठल्या कुठे जाऊन पोचलेत विचार--- शेवटी प्लास्टिक निर्मूलनाचा योग्य आणि ठोस उपाय सापडला नाहीच हे विशेष----  आता तुम्हीच सुचवा काहीतरी-----
 मीही समजावते मनाला--- नको रे, नको  मना--असं भरकटत जाऊस--🙏

माणिक