“नेमेचि येतो मग पावसाळा” ह्या उक्ती प्रमाणे यंदाही तो आला, अगदी चातकासारखी त्याची वाट बघणाऱ्या समस्त जिवांना दिलासा देत धो धो बरसला सगळीकडे अन चराचराला सुखावून गेला. पण ह्यावर्षी मात्र मला त्याचं आगमन, त्याचं ते सुखद वास्तव्य, हवेहवेसे अस्तित्व अन कधीकधी खूप दिवस मुक्काम केलेल्या पाहुण्यांचा जसा कंटाळा येतो तसा त्याचाही क्वचित आलेला कंटाळा हे सगळं “ह्याची देहा, ह्याची डोळा” अनुभवता न आल्याने खूपच चुकल्या चुकल्यासारखं होत होतं! आता तुम्ही म्हणाल, “असं का बुवा?” तर त्याचं कारण म्हणजे आम्ही दोघेही 13 जूनलाच अमेरिकेत लेकाकडे आलोय. तोपर्यंत एकदोनदा रात्री केव्हातरी तो हजेरी लावून गेला होता एवढंच! पण त्या चुटपुटत्या भेटीने मुळीसुद्धा समाधान झाले नाही .
आता तुम्ही पुन्हा म्हणाल, “मग गेलेच कशाला?”, तर जायचं मुख्य कारण म्हणजे गोडंबा नातू दीड वर्षांचा झालाय, त्याच्या सहवासाची आस तिथेही चैन पडू देत नव्हतीच. नुसत्या फोटो अन व्हिडिओ कॉल वर पोट काही भरता भरत नव्हतं. केव्हा एकदा त्याला प्रत्यक्ष भेटू असं झालं होतं. त्याच्या ओढीने अखेर ‘सात समंदर’ पार करत आम्ही येथे आलोच. आल्याक्षणापासून त्याचा निरागस, निष्पाप, गोजिरा पण खट्याळ चेहरा, त्याच्या गोड गोड बाळलीला, त्याचा मऊ मऊ रेशीमस्पर्श, त्याचं दुडूदुडू धावणं, बोबडं बोबडं बोलणं, निर्व्याज हसणं, त्याच्यासोबत खेळणं यामध्ये सगळं काही विसरायला झालं. “सुख, सुख म्हणजे आणखी काय हो?” असं वाटायला लावणारे त्याच्या सहवासातले हे लडिवाळ क्षण! त्यापुढे अर्थातच शंभर पावसाळेही ओवाळून टाकावे असं ते अवर्णनीय सुख! त्यामुळे एक पावसाळा गेला म्हणून तसं तर अजिबातच काही बिघडलं नाही म्हणा. कारण तो तसाही “नेमेचि” पुढल्या वर्षीही येणारच आहे. पण नातवाचं हे लोभस बालपण काही पुन्हा पुन्हा अनुभवता येणार नाही हे मात्र खरंच! पण आता तिथल्या सगेसोयऱ्यांशी, मित्रमंडळींशी बोलतांना, त्यांनी पाठवलेले पावसाचे, पावसातल्या गरमागरम भज्यांचे, पावसाच्या साक्षीने प्यायलेल्या वाफाळत्या कॉफीचे व्हिडिओ बघितल्यावर बाकी त्याची फार म्हणजे फार म्हणजे फारच आठवण आली. काहीतरी चुटपुट, रुखरुख वाटायला लागली.
भरीस भर म्हणजे “आषाढस्य प्रथम दिवसे..” म्हणत पावसाच्या कवितांचाही समाज माध्यमांवर सगळीकडे पाऊस पडायला लागलेला.
मग बाकी त्याच्या पहिल्या आगमनापासूनचं सगळं काही उगाचच आठवायला लागलं. खरं तर जीवघेणा, भाजून टाकणारा असा रखरखीत उन्हाळा अगदी असह्य झाल्यावरच तो येतो नेहमी. जीव जातो की काय असं वाटेल अशी गदगद होत असते, दुपारच्या वेळी तर कुलर, एसी समोरून क्षणभरही दूर व्हावंसं वाटत नसतं अन अचानकच आभाळ भरून येतं, सोबत रस्त्यावरची धूळ सोबतीला घेत वाराही वेड्यासारखा अस्ताव्यस्त वाहायला लागतो अन ताडताड टपोऱ्या थेंबासह, मातीच्या त्या चिरपरिचित सुगंधाची उधळण करत तो येतो, थेट आरपार चिंब करून जातो. त्या पहिल्या पावसाची मजा काही औरच! वय कितीही वाढले तरी ह्या पहिल्या पावसात भिजण्याची एक उर्मी प्रत्येकाच्या मनात दाटून येतेच. भलेही वास्तवाचं भान आल्यावर, वयानुसार मागे लागलेल्या दुखण्यांची आठवण आल्यावर मग ती उर्मी थोडीशी दाबून टाकावी लागते हा भाग अलहिदा!
अन् ह्या “नेमेचि” येणाऱ्या पावसाबरोबरच असंख्य नवी-जुनी, हिंदी-मराठी गाणी रिमझिमत्या, सरसरत्या, धुवांधार, तर कधी भुरभुरत्या पावसाबरोबरच तनमन चिंब करत “नेमेचि” मनात रुणझुणायला लागतात. ह्यावर्षी आता फक्त ती ऐकत ऐकतच दुधाची तहान ताकावर भागवायची! अजून काय?
वानगीदाखल काही गाणी सांगायचीच तर हटकून ओठांवर येणारं शांताबाईंचं
“आला पाऊस मातीच्या वासात ग,
मोती गुंफित मोकळ्या केसात ग”
किंवा सुधीर मोघेंचं
“आला आला वारा, संगे पावसाच्या धारा,
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा”
प्रत्येकवेळी त्या मातीचा गोड सुगंध जणू खोल हृदयात भरून घेतल्यासारखंच मनाला प्रसन्न करून जातं. कधी आकाशात काळेभोर ढग भरून येतात, सोबतीला असतो तनामनाला झोंबणारा, गात्र सुखावणारा गार गार वारा. आत्ता कुठल्याही क्षणी तो सर सर सरींसोबत धो धो कोसळणार असे संकेत मिळतात अन बाभंची कविता
“गडद निळे गडद निळे जलद भरून आले,
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले..”
जणू जिवंत होऊन समोर उभी ठाकते. अन श्रावण सुरु झाला की ह्याचा उन्हासोबतचा लपाछपीचा अवखळ खेळ बघता बघता बालकवींच्या
“श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे”
ह्या कवितेची आठवण तर प्रत्येक मराठी मनाला येतेच येते.
आणि कधीतरी एखाद्या अंधाऱ्या रात्री विजेच्या कडकडासह अस्ताव्यस्त धुंवाधार बरसणाऱ्या सरी एकटक न्याहाळतांना बघता बघता मग पाडगावकरांचं
“भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
रात्र पावसाची होती, धुंद वादळाची होती”
हे चिंब हळवं गीत अन अरुण दातेंचा तितकाच चिंब हळवा स्वर थेट आतपर्यंत पोहचत आपल्याला एका हळव्या अलवार स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जातो.
असा नाना रूपात भेटणारा हा पाऊस. कधी आडवातिडवा ताडताड झोडपून टाकल्यासारखा, तर कधी एखाद्या मोरपिसासारखा हळुवार, अलगद आहे का नाही असा भुरभुरणारा, कधी येतो येतो म्हणत गडप होणारा, कधी पिरपिर पिरपिर करत सगळीकडे चिखलगारा करून वैताग सुध्दा आणणारा. कधी ध्यानी मनी नसतांना अचानक बरसून चिंब करणारा! तर कधी दिवसेंदिवस प्रतिक्षा करायला लावणारा. श्रावणात उन्हासंगे लपाछपी खेळत इंद्रधनुष्यावर स्वछंदी बागडणारा. प्रत्येकच रूप कसं मोहविणारं, आवडून जातं मनापासून! फक्त ह्याचं रौद्ररूप बाकी अगदी नकोनकोसं, जिवाचा थरकाप उडवणारं, एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकणारं, हजारो निरपराधांचा बळी घेत, सगळं काही आपल्या पोटात गडप करणारं ते भयावह रूप! (सध्या तिकडे संततधार सुरु आहे अशा बातम्या मिळाल्या.) म्हणूनच त्याला विनंती करावीशी वाटते की बाबा रे तुझं तेवढं रूप बाकी नको दाखवूस कधी! बाकी तुझ्या सगळ्या रूपांवर जीव खरंच फिदा आहे!
©मधुमती वऱ्हाडपांडे