Monday, November 15, 2021

बालपण दे गा देवा

 


एका शाळेच्या बालक दिनाच्या कार्यक्रमातील ही घटना मला बरंच काही शिकवून गेली. सतत गप्पा मारणाऱ्या आणि आपल्या बांगडीशी ती हातातून बाहेर काढून खेळणाऱ्या एका मुलीला शिक्षिकेने शांत बसायला सांगितल्यावरही तिने आपला चाळा सुरूच ठेवला. मग  शिक्षिकेने तिच्या हातातील बांगडी काढून स्वतःजवळ ठेवली. कार्यक्रम संपल्यावर त्या मुलीने माफी मागून बांगडी परत मागितली आणि आज बालक दिन आहे तर आज तुम्ही मला शिक्षा न करता क्षमा करायला हवे असे सांगितले. त्यावर शिक्षिकेने दिलेले उत्तर मार्मिक होते .त्या मुलीला उद्देशून म्हणाल्या- बालक दिनाच्या निमित्ताने क्षमा करावी. मात्र याच निमित्ताने का होईना तुम्ही बालकां सारखे राहायला हवे ना? केवळ आजच नाही तर सर्वच दिवस बालकाची निरागसता असते का तुमच्यात? तुम्ही असे निरागस रहाल तर शंभर वेळा तुमच्या चुकांबद्दल तुम्हाला माफ करण्यात येईल.

   खरंच निरागसता लहान मुलांमध्ये किती बघायला  मिळते हा प्रश्नच आहे. कार्बाईडच्या वापराने वेळेआधी पिकवलेल्या फळां प्रमाणे आजची बालके घाईने मोठी केली जात आहेत .शारीरिक वाढीचे टप्पे वेगाने गाठण्याचे प्रमाण असे आहे की बसती झालेली बालके रांगण्याची पायरी चुकवून सरळ उभी राहायला लागलेली आहेत. मग मानसिक वाढीचे टप्पे ही वेग -अतिवेग धरू लागले आहेत. वयानुसार भाव- विभाव दाखवणारी बालके, लहान मुले शोधावी लागतात. बहुतेक मुलांना माझे ते माझे आणि तुझे तेही माझे अशी शिकवण कळत-नकळत मिळते आहे. आपली मूठ झाकून दुसऱ्याच्या ओंजळीतले हिसकावून घेणे हे करता येणारी मुलं आजच्या जगात "फिट" आहे म्हणून त्याची पाठ थोपटली जाते.
   सदगुणांना धाब्यावर बसवून षड्रिपुना  आपले दोस्त बनवले जात आहे. दया-क्षमा-शांती ही केवळ स्त्रियांची नावे म्हणूनच माहिती आहेत का असा प्रश्न पडतो .मत्सर मात्र ठासून भरलेला दिसतोय .त्याच्याकडे तेवढे माझ्याकडे एवढेच ?असा असमाधानी सूर कायमच मुलांमध्ये दिसतो. कितीही मिळाले तरी इतरांकडे पाहून त्यावर विरजण पडते आहे .त्यातून मद, उन्मत्त पिढी तयार होते आहे .मला मिळायला हवे, इतरांशी काय करायचे ?सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ बघितला .इमारतीमधील लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माणसे भरल्याने ती थांबते. अस्वस्थपणे ती सुरू होण्याची , वर चढण्याची वाट बघत प्रत्येकच व्यक्ती इतरांकडे अपेक्षेने बघते .मात्र स्वतः भार कमी करण्याचा विचार त्यातील कुणालाच येत नाही .अखेर एक कुबडयांच्या आधारे उभी असलेली मुलगी तिथून बाहेर पडते आणि लिफ्ट सुरू होताना बघते. निरागसता न जोपासलेली लहान पिढी  मोठी झाल्यावर अशी उन्मत्त, भावशून्य झाली तर त्यात काय नवल?
  लोभ हव्यास वाढवायला समजुतीचे बीज न पेरले जाणेच कारणीभूत असते ना? " ब्लॅक होल" नावाचा एक लघुपट मध्यंतरी बघितला. एका कागदाच्या मध्यभागी जादुई काळा गोल असतो त्यातून पलीकडच्या वस्तू पर्यंत आरपार पोहोचता येते हे जेव्हा एका व्यक्तीला कळते तेव्हा तो आधी बंद फ्रीजमधले खाद्यपदार्थ हात आरपार घालून काढतो आणि खातो मग त्याच्या वापराने तिजोरीतील धन काढण्याचा मोह त्याला आवरता येत नाही आणखीन आत हात घालून सर्व धन बाहेर काढता काढता तो कधी आत डोकावतो आणि आतच गडप होतो हे त्याचे त्यालाही कळत नाही. 
  आपल्या प्रत्येकातील खरा बालक जेव्हा सक्रिय राहील तेव्हाच संपूर्ण मानवजातीचे हित साधले जाईल. यानिमित्ताने ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांच्या एकमेकांशी घडलेल्या संवादा वरील ओळी आठवल्या

    अरे अरे ज्ञाना झालासी पावन 
     तुझे तुज ध्यान कळो आले 

 अध्यात्मिक पार्श्वभूमीवर रचलेल्या या ओळी स्वतःला स्वतःची ओळख झाल्यावर पावित्र्य येते हे सांगणाऱ्या आहेत .आत्मा आणि परमात्मा यांच्यातील एकरूपता दर्शवणाऱ्या आहेत. अशीच एकरूपता बालक दिनाच्या निमित्ताने आपल्यातील प्रत्येकाने स्वतःतील बालकाशी साधली तर जगणे खऱ्या अर्थाने सुंदर होईल .

     दीपकी दीपक मावळल्या ज्योती
      घरभरी वाती शून्य झाल्या 

  ज्ञानाच्या प्रकाशाने जसे जगातील सर्व गोष्टी उजळून निघतात आणि आपल्या न संपणार्‍या इच्छा नाहीशा होतात तशाच बालसुलभ भावाविशेषांनी आपल्यातील कोमलता जागृत ठेवून षड्रिपूंचे दमन करणे गरजेचे आहे.

    वृत्तीची निवृत्ती अपणांसकट
    अवघेचि वैकुंठ चतुर्भूज

 बालकांच्या शोधक नजरेने चांगल्या गुणांचा मार्ग जोपासत संपूर्ण विश्वामध्ये दैवी गुणांची ज्योत अखंड जागवत ठेवूया.
 बालक दिनाच्या शुभेच्छा!!!

Sunday, November 14, 2021

अक्षरांच्या वाटा

 


'टाॅलस्टाॅयला वाटायचं की, 'यास्नाया पोल्यानाच्या गर्द हिरवाईत, द-याखो-यात कुठेतरी दूर एक हिरवी फांदी असते, धरतीच्या पोटात पुरून ठेवलेली अन् त्या फांदीला रसरशीत अक्षरांचे घोस लागलेले असतात...', किती सुंदर कल्पना आहे नं? अक्षरांचे घोस! झाडाझाडांवर लटकलेले! संपर्कात येणा-या प्रत्येकाला ज्ञानरसपान करवणारे!...

 अक्षरांचे असे पीक घेता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे पण "घेता आले तर...", ही कविकल्पना आहे. वास्तवापेक्षा वेगळी असली तरी मनाला सुखावणारी! 
सुखावते यासाठी की, लहानपणी  जे वाक्य ऐकलेलं असतं..., "सुंदर जगण्याचा मार्ग अक्षरांच्या वाटेवरून जातो"..., त्याच्याशी ही कल्पना नातं निर्माण करणारी वाटते. अक्षरांचा असा सुसंगत मेळ शब्दाची निर्मिती करतो. या शब्दाला शब्द जोडून साहित्य निर्माण होतं नि मनाला मन जोडून जीवनगाणं आकाराला येतं.

एक इवलासा शब्द
त्याच्या मुठीत असेल
एखाद्या कवितेचा प्रहर अविनाशी
म्हणून त्याच्या गालांपाशी, डोळ्यांपाशी
माझे काळीज ठेवते मी, 
किती वेडी आहे ना मी!
 असं अरूणाताई ढेरे यांनी लिहिलंय. शब्द हे असे वेड लावणारे असतात. भावनांना व्यक्त करणारे असतात. ते विलक्षण बोलके असतात आणि समाजाच्या सांस्कृतिक स्थित्यंतराचे दर्शन घडविणारे माध्यम असतात. आयुष्य सुखकर करणारे हे 'शब्द मळे' रसिकांसाठी जे फुलवितात, ते असतात साहित्यिक! आपल्या प्रतिभेनं शब्दसृष्टी उभी करणारे हे प्रतिभावंत! ते निर्माण करतात नवनव्या साहित्य वाटा! 
पण... त्यांच्याबद्दल आपल्याला कितपत माहिती असते? त्यांचं लिखाण आपण कितीसं वाचलेलं असतं? हा प्रश्न आपण कधी आपला आपल्यालाच विचारून पहा... उत्तर नकारार्थी येईल. कधीकधी साहित्य वाचनापेक्षा त्या साहित्यिकाबद्दलची ऐकीव माहितीच बरं वाईट मत तयार करत असते. आम्ही वाचनाबद्दल किती गंभीर असतो? मराठी आमची मातृभाषा आहे...त्यातील लेखकांची आम्ही किमान नावं तरी ऐकलेली असतात पण इतर भाषांमधील लेखकांची फार तुटपुंजी माहिती आम्हाला असते. त्याविषयी त्या त्या भाषेच्या प्राध्यापकांना देखिल कधीकधी काहीच सांगता येत नाही, हे दुर्दैव आहे. 

 आता हेच बघाना...आम्हाला विसाव्या शतकातील 'मिलोराद पावीच' हा पूर्व युरोपीय कादंबरीकार, ज्याने कुठूनही- कुठेही - कशाही वाचता येतील अशा कादंब-या लिहिल्या, तो माहित नसतो. शब्दकोड्याचा आकृतीबंध स्विकारून त्यानं कादंबरीची रचना केली होती. त्या रचना नि तो लेखक आपल्यासाठी अज्ञात असतो. 
आम्ही कधी 'पेस्सोआ' या पोर्तुगीज लेखकाबद्दल, ज्यानं पन्नासहून अधिक टोपणनावाने लिखाण केलेलं आहे, त्याच्याबद्दल ऐकलेलं नसतं. स्वतःच्या लेखनाबद्दल अतिशय तटस्थ असणाऱ्या या लेखकाच्या लेखनाचा मराठीत एकही अनुवाद नाही पण हिंदीत मात्र, 'एक बेचैन का रोजनामचा' उपलब्ध आहे. ही माहिती नीतीन रिंढेंचं पुस्तक वाचलं की आपल्याला कळते, तोवर ही नावंही आपल्यासाठी अनोळखी असतात.  'हायकूचा संत' जपानचा महाकवी बाशोबद्दल आम्हाला दिवाळी अंकातून तरी कळतं. परदेशी लेखकच काय भारतीय लेखकांचे साहित्य सुद्धा आपल्याला क्वचित वाचायला मिळतं.   
उदाहरणं द्यायची तर.... 'जगणं आणि लिहिणं हे समानार्थी शब्द आहेत. लेखक हा स्वप्न दाखवणारा आणि जगण्यावर प्रेम करणारा असतो', या तत्वानं लिखाण करणारी उडिया लेखक प्रतिभा राय यांच्या साहित्यापासूनही आपण अनभिज्ञ असतो. 

'लेखन हा एक शोध असतो. लेखकासाठी लेखन हा एक नवे प्रदेश धुंडाळण्याचा प्रयत्न असतो', हा दृष्टिकोन जपत लेखन करणा-या कन्नड लेखिका, वैदेही यांचे लेखनही आपण क्वचित वाचले असते.
अशी कितीतरी नावं आणि साहित्य आपल्यापासून दूर आहे. आमच्या वाचनाला मर्यादा आहेत, हे खरं आहे शिवाय महत्वाची अडचण आहे, भाषेची! आणि त्यासाठी गरज आहे, प्रभावी अनुवादाची!

    नीतीन रिंढे म्हणतात तसं, गेल्या चाळीस वर्षातले जगातले मोठे लेखक मराठीत माहित नाहीत तर त्यांचे अनुवाद होणं दूरच राहिलं आहे. हिंदी त्याबाबतीत मराठीच्या पुढे आहे. तिथे जगातले बहुतेक मोठे लेखक-कवी वाचायला मिळतात. मराठीतही ती यायला हवीत.
म्हणून असं वाटतं की, टाॅलस्टाॅयच्या कल्पनेतील 'अक्षरांचे घोस' जगातल्या अनेक भाषारूपी फांद्यांवर लटकलेलेे आहेत. फक्त गरज आहे ती त्यापर्य॔त पोहोचण्याची...! नि त्या वाटा धुंडाळण्याची! 

-सीमा शेटे (रोठे), अकोला.